(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • पुंडलिकाचे दैवत

    आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला,
    उभा विठ्ठल दारावरती, हेच तो विसरला ।।धृ।।

    आईबाप हे दैवत ज्याचे,
    रुप पाही त्यांच्यात प्रभूचे ।
    सेवा करीत आनंद लूटतां, तल्लीन जो जहला
    उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।१।।

    निद्रेमध्यें असतां दोघे,
    मांडी देऊनी आपण जागे ।
    कशी मोडू मी झोप तयांची, प्रश्न विचारी भगवंताला,
    उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।२।।

    वीट देऊनी विठ्ठलासाठीं,
    उभे केले त्या जगजेठी ।
    आपण गेला घेऊन त्यांना, स्नानाकरीता चंद्रभागेला,
    उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।३।।

    आठ्ठाविस युगे गेली उलटूनी,
    कटीवरती हात ठेवूनी ।
    पांडूरंग बघे वाट तयांची, भक्तितच जे विसरती जगाला,
    उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • आनंदी भाव हाच भगवंत

    बागेतील तारका-

  • चाळीशी

    आयुष्य पुढे धावत असते,
    वय सारखे वाढत असते,
    पण......
    खरी मजा जगण्याची,
    चाळीशीनंतर सुरू होते ,,,,,

    उच्छृंखल आणि समंजसपणा,
    यामधली मर्यादा कळते,
    अल्लडपणावर हलकीशी, प्रगल्भतेची झालर चढते,
    खरी मजा जगण्याची,
    चाळीशीनंतर सुरू होते,,,,,

    जगण्याची परिभाषा,
    थोडी थोडी बदलू लागते,
    काय हवे अन् काय नको,
    हे नेमकेपणे कळू लागते,
    खरी मजा जगण्याची,
    चाळीशीनंतर सुरू होते,,,,,,

    मन जोडीदाराचं,
    न बोलताच कळू लागते,
    गोडी संसारातली,
    एक पायरी वर चढते,
    खरी मजा जगण्याची,
    चाळीशीनंतर सुरू होते,,,,,,

    जगणे समजुन घेण्याचे,
    हेच खरे वय असते,
    याच वयात आपण स्वत:साठी, जगायचे असते,
    खरी मजा जगण्याची,
    चाळीशीनंतर सुरू होते,,,,,

    आयुष्याच्या चित्रपटातील,
    हेच मध्यंतर असते,
    इथूनच पुढे,
    शेवटच्या क्लायमेक्स कडे
    जायचे असते,
    खरी मजा जगण्याची,
    चाळीशीनंतर सुरू होते,,,,,

    म्हातारे होण्याआधीचे,
    हे शेवटचे तरूणपण असते,
    ते, आपण मनापासून उपभोगायचे असते,
    खरी मजा जगण्याची,
    चाळीशीनंतर सुरू होते,,,,,,

    चाळीशीनंतरही पावसात
    भिजावेसे वाटणे,
    हे मन अजुन हिरवे असल्याचे
    लक्षण असते,
    खरी मजा जगण्याची,
    चाळीशीनंतर सुरू होते,,,,,

    चाळीशीपुढच्या मित्र मैत्रिणींनो, एकदा तरी अवश्य वाचाच....

    खरंतर हेच वय आहेन आयुष्याला चॅलेंज करायचे.

    त्याने शिकवलेले अनुभव वापरून, इच्छा असल्यास चाकोरी मोडून आपल्याला आनंद मिळेल ते सुरु करण्याचे.

    आयुष्याच्या विमानाचा डिसेंड सुरु व्हायला अजुन अवकाश आहे. आत्ता तर कुठे "सिट बेल्ट ऑफ" ची साईन आली आहे.

    ही वेळ आणि वय आहे "क्रूझ" करायचं, नवी क्षितिज गाठायचं, नवी आव्हान स्वीकारायचं, आयुष्याकडून शिकायचं, जे शिकलो ते इतरांना द्यायचं..!

    कारण चाळीशी / पन्नाशी म्हणजे नृसिंह अवस्था.!

    ना तरुण ना म्हातारा,
    ना नवशिका,
    ना पूर्ण अनुभव संपन्न,
    ना खूप आसक्ति
    ना पूर्ण विरक्ति,
    ना पूर्ण सौष्ठव,
    ना गलित गात्र,

    आयुष्याच्या एका फेज मधून दुसऱ्या फेज मधे जायचा उंबरठा....

    अरे जमवा मित्र दर महिन्याला,
    घेऊन जा घरच्यांना फॉरेन ट्रिपला,
    नसेल परवडत तर शक्य असेल तिथे करा एखादी "हनीमून स्पेशल" टूर वर्षातून एक दोनदा....

    जमतील तसे आणि तेथे आपले अनुभव शेयर करा.

    आपण आयुष्यात अनुभवलेले खड्डे चुकवायला इतरांना मदत करा,
    पोरांचे मित्र व्हा,
    त्यांच्या मित्र मैत्रिणींचे Buddy व्हा,
    सामाजिक कार्यात सक्रीय भाग घ्या,
    सभ्यतेच्या परिघात राहून बिनधास्त फ्लर्ट करा,
    गॉसिप करा,
    शाळेची गेट टुगेदर आयोजित करा,
    ट्रेकला जा,
    रिक्षा किंवा टॅक्सीवाल्यावर दादागिरी करून "आवाज कुणाचा" चे ऐन जवानीतले जोशाचे दिवस कधीतरी परत अनुभवा.

    बर्फी वहिनी किंवा पेढा शेजारी दिसला तर हळूच कटाक्ष टाका.

    औषधे किंवा गोळ्या ज्यांच्या नाशिबी लागल्या असतील त्यांनी त्या नेमाने घ्या, पण एखाद्या पार्टीत मित्रांबरोबर कॉलेजातल्या पहिल्या क्रशची आठवण जागवताना क्वचित एखादा पेग जास्त झाला तर त्याची झिंग पण एन्जॉय करा.

    पावसात भिजा,
    जॉगिंग करा,
    सूर्यनमस्कार घाला,
    लाँग ड्राइव्हला जा,
    सिनेमे पहा,
    काका / काकू म्हणतील त्यांचे काका / काकू व्हा,
    दादा म्हणून जवळ येतील त्यांचे थोरले बंधू व्हा,
    अनुभवाचं ओझं इतरांना वाटून थोड हलक करा.

    मुख्य म्हणजे हसत रहा.
    एकदा मनाशी पक्के बांधले की चाळीशीचा / पन्नाशीचा घाटमाथा म्हणजे, पालिकडल्या उताराची सुरुवात न वाटता अलिकडचा चढ चढून शिखर सर केल्याचा आनंद देऊ शकतो. पन्नाशी टेंशन न रहाता सेलिब्रेशन बनते.

    आणि मग चाळीशी / पन्नाशी हा फक्त एक आकडा रहातो...
    जस्ट अनदर ब्लडी नंबर...

    म्हणूनच म्हणतो .....
    ENJOY YOUR
    चाळीशी पुढे ......

    -- From Whatsapp share for you

  • नवरात्र

    पूर्वी कसे नवरात्रीला
    नऊ दिवस आपण
    नऊ रंगाचे कपडे
    परिधान करायचो...
    तू नाचायचीस मनसोक्त
    आणि मी तुझं ते
    नाचणं डोळेभरून
    पाहत राहायचो...
    रंगाच फार काही नाही
    पण तू जवळ असल्यावर
    मी नेहमीच आनंदात
    भरभरून जगायचो...
    तुझा आनंद मी माझ्या
    हृदयात साठवून तो
    साऱ्या जगाला हसत
    आनंदाने वाटायचो...
    आता फक्त राहतो उभा
    तुझी वाट पाहत
    तसाच त्या वळणावर
    जसा पूर्वी राहायचो...

    © कवी - निलेश बामणे
    दिनांक - ९ ऑक्टोबर २०२१

  • पापाचा हिशोब

    वेगाने तो जात असता, घटना एक घडली ।

    तुडवले गेले जीव जंतू , त्याच्या पाययदळी ।।

    ज्ञात नव्हते कांहीं त्याला, त्याच्या कृत्याचे ।

    स्वकर्मा मध्ये गुंतले होते, एक चित्त त्याचे ।।

    नजर गेली अवचित त्याची, एका सरड्यावरती ।

    दगड मारूनी बळी घेतला, असूनी अंतरावरी ।।

    पापाचा बने भागीदार, मारूनी सरड्याला ।

    अकारण कृत्य जे केले, पात्र ठरे शिक्षेला ।।

    अगणित जिवाणू जेंव्हां मेले, कृत्य नव्हते त्याचे ।

    जाणतेपणातील कर्म आणिते, हिशोब पाप पुण्ण्याचे ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • प्रभूची धांवपळ

    चकीत झालो बघूनी, प्रभूला दारावरी
    त्रिशूळ घेऊनी हातीं, आला होता जटाधारी

    क्षणीक थांबूनी दारावरती, गेला तो निघूनी
    बहूत वेळ येत राहिला, दार ना ओलांडले त्यांनी

    कळले नाहीं मजला, ही त्याची रीत
    विचार करीता मनी, जाणली मी ही गम्मत

    उपास तापास करुनी, देह शुद्ध केला
    भजन पूजन करुनी, तप मिळाले मजला

    गुंतले होते माझे मन, संसारातील मोहांत
    राग लोभ अहंकार, मुरले होते अंगात

    मान देऊनी तपशक्तिला, येत होता ओढूनी
    अशांतता बघूनी मनातील, जात होता परतोनी

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

  • परमोच्य बिंदु

    ऊर्जा शोषत असतां पाणी

    उकलन बिंदूवर येते

    पाण्याचे रुप बदलूनी

    बाष्प त्यांतून निघूं लागते

    एक सिमा असे निसर्गाची

    स्थित्यंतर जेव्हां घडते

    एक स्थीति जावून पूर्ण

    दुजामध्ये ती मिळून जाते

    तपोबलाची ऊर्जा देखील

    प्रभूमय ते सारे करिते

    परमबिंदूचा क्षण येतां

    साक्षात्कार तुम्हां घडविते

    तुम्ही न राहता, तुम्ही त्या वेळीं

    ईश्वरमय होऊन जाता

    सारे परि ते तेव्हांच घडते

    परम बींदूला जेव्हां पोहंचता

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • जगणें अटळ असतां

    वाट कुणाची बघतो आम्हीं,

    ठाऊक असते सर्वांना,

    मृत्यू हा अटळ असूनी,

    केव्हांही येई अवचित क्षणा ।।१।।

    आगमनाचा काळ त्याचा,

    कल्पनेनें ठरविला जातो,

    अचूक जरी शक्य नसले,

    विचार त्यावरी करीता येतो ।।२।।

    जीवन म्हणती त्या काळाला,

    जगणे आले मृत्यू येई तो,

    जगण्यापुढे पर्याय नसतां,

    सुसह्य करण्या प्रयत्न होतो ।।३।।

    तन मनाला सुख देऊनी,

    जीवन काल वाढविती कांहीं,

    सद्उपयोग तो केला जावा,

    हीच इच्छा सदैव राही ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • पाऊस

    पहिला पाऊस मुठीत पकडण्याचा निरर्थक प्रयत्न करत होतो … मुठीत सापडला पण ! निसटलाही अगदी तिच्यासारखा …

  • वेडी

    रस्त्यावर उभी राहूनी,

    हातवारे ती करीत होती,

    मध्येच हसते केंव्हां रडते,

    चकरा मारीत बसे खालती ।।१।।

    गर्दी जमली खूप बघ्यांची,

    कुत्सीतपणे न्याहळू लागली,

    'शिपाई आणा जावूनी कुणी',

    ठाण्यात नेण्यास सांगू लागली ।।२।।

    जीवनातील दु:खी चटका,

    सहनशक्तीचा अंत पाहतो,

    मनावरील ताबा सुटूनी,

    वेडेपणा हा दिसून येतो ।।३।।

    इतकी गर्दी जमून कुणीही,

    तिच्या मनीचा ठाव न जाणला,

    रूख रुख वाटली ती बघोनी,

    सहानुभुती शून्य समाजाला ।।४।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com