फुले अनंताची देखणी,
मंद,मंद सुवासी,--!!!
बागेत जागा खास त्यांची
स्वागतां अतिथीच्या प्रारंभी,
जास्वंदीचा तोरा मोठा,
श्रीगणेशांचे लाडके,--
ऐट त्यांची घ्या पाहुनी,
प्रथम हाती धरावे नेटके,
मदनबाणांची छाप विलक्षण,
निसर्गाचीच किमया ती,
सुवासिक, दिमाखी त्याची,
लावे दुनिया विसराया खाशी,
बकूळ ती फुलतांना,
केवळ पहांत रहावे,
सडा पडतांच अवनीवरती,
जीव जसा सांडत रहावे,--!!!!
गुलाबाला पाहण्या विशेष,
नजर' ती लागे,---
पाकळी अन् पाकळी सारखी,
आंत आंत गुंतलेले धागे,
सायली नाजूक साजूक,
तलम पाकळी अगदी,
हात जपून लावण्या,
धाडस करा थोडके,--!!!
मोगरा उत्फुल्ल होतां,
न कुणाचेच ऐके,---
आकर्षित करीत जगा,
वाऱ्यावर घेत झोके,
भुईचाफा जरा गंधाळता,
जाता त्याकडे ओढले,---
खाली वाकून त्याला,खुडतां,
सौंदर्यांची 'होड' लागे,--!!!!
©️ हिमगौरी कर्वे.
दुष्काळ
कोणी म्हणे बाप माझा शेतकरी,
झीजतो राञं-दिस कर्तव्यापोटी,
घेवून वाड वडिलांची आण,
बनवी काळ्या मातीस सोन्याची खाण..
जवान मरतो देशासाठी,
लाभते त्यास वीरमरण प्राप्ती,
मी पिकवतो पोटाच्या खळगीसाठी,
तरी गळफास-उपासमार माझ्याच माथी…
अवचित दुष्काळ अन् पाणीटंचाई,
निसर्ग कोपाची भलतीच घाई,
उजाड माळरान फाटकी धरती,
कळोखांचा नभ डोळ्यांनभावती…
मान- सन्मान- सत्ता नाही,
काळी काया, हाडावर मुठभर मांस नाही,
मजसाठी नाही राजा कोणी,
छळवाद मांडला माझ्या भाळी…
पोशिंद्याची उपमा मला,
जय जवान जय किसान नारा,
जरी स्वातंत्र्य मिळाले देशाला,
तरी पारतंत्र्यात जगतोय माझा बळीराजा….!
पूर्वीच ते घर कसं
जायचं अगदी गजबजून
गप्पांच्या त्या मैफलीत
आठवणी यायच्या धावून.
आता कसं सर्व काही
शांत अन् निवांत आहे
पण, आठवणींच्या आठवणींने
मन थोडसं अशांत आहे.
पूर्वी आठवणी कशा
अगदी मनमोकळ्या हसत
सवय नव्हती त्यांना
अन् नव्हत्या कधी रुसत.
आठवणी पूर्वी कशा
रहायच्या सदैव बोलत
कुजबूजतात कधिमधी
आणि बसतात आता झूरत.
भिजतात काही आठवणी
अन् ओल्या होतात आतनं
बसतो उमेदीच्या ऊन्हात...
सुकवण्याचा एक प्रयत्न.
पूर्वी आठवणींची फुलपाखरं
कशी स्वछंदी बाडगळत
आता काही सैराट भुंगे
बसतात मन पोखरत.
पूर्वी आठवणी कशा
प्रेमानं थोपटुन निजवत
आता मात्र उदास बसतात
रात्र रात्र उगाच जागवत.
पूर्वी आठवणींच्या झाडाखाली
थंड मंद वारा वाही
आता मात्र मनाच्या वळचणीला
पूर्वीसारखा थारा नाही.
- डॉ.सुभाष कटकदौंड
काही असले नसले,तरी आनंदातच जगावे,
काय आणले, काय न्यायचे, सर्वांनाच आहे ठांवे ,--!!!
,मी मी करत करत,
कमरेला बांधून गोष्टी,
पैसाअडका, सोने-नाणे,
सारे ठेवायाचे पाठी ,--!!!
शेतीवाडी, जमीनजुमला,
भाईबंद हक्क सांगती,
भाऊबंदकी होऊन निव्वळ,
तुटतात सगळी नाती गोती,--!!!
हे माझे ते तुझे,
कशासाठी, आपपरभाव,-?
स्वार्थ आपमतलब शेवटी,
करून दु:खी होतो मानव,--!!!
सख्खे, सख्खे न राहती, परस्परांच्या जिवांवर उठती,
आपल्या पोळीवर तूप ओढुनी, दुसऱ्यास वाईट ठरवती,-!!!
काय मिळते असे करून,
जीवनी फक्त ताण तणाव,
शरीर मन नसते धड,
दुखण्यानाही चढतो भाव,--!!!
जगण्यातलानिखळआनंद निसर्गात खूप दडला असे,
पदोपदी शिक्षण देई ,
निसर्गासारखा गुरु नसे,--!!!
प्रत्येक घटक त्याचा,
त्याग समर्पण शिकवे, माणूस राही किती अडाणी, त्याचीभाषा समजत नसे,
हिमगौरी कर्वे.©
काय होतं कुणास ठाऊक देवासंग नातं
अनवाणी चालत कुत्रं वारीला गेलं होतं
पाऊसपाण्यात जरी भिजलं होतं अंग
विठ्ठलाच्या गजरात तरी झालं होतं दंगं...!
चंद्रभागेच्या पाण्यात अंग ओलं केलं
मनात घेऊन वेडा भाव पायरीशी गेलं
दारामागच्या देवाला भेटणार तरी कसं
माणसांपुढे बिचा-याचं झालं होतं हासं.!
माणसाचा देव माणसांसाठी असतो
ज्याच्या खिशात पैसा त्यालाच तो दिसतो
पायरीवर बसून शेपूट हालवू लागलं
देवाला भेटण्यासाठी रातभर जागलं..!
निराश होऊन सकाळी मागे फिरलं
रस्त्यावरचं भटकं म्हणून त्याला धरलं
गाडीत घालून त्याला कुठेतरी नेलं
पाप्यांच्या दुनियेत जिवानिशी गेलं...!!
.... राजेश जगताप, मुंबई
९८२१४३५१२९
संघर्षाची बिजें जळतील, जाणतां तत्व पुनर्जन्माचे ।
आपसांमधील हेवे-दावे, मिटून जातील कायमचे ।।
फिरत असते चक्र भोवती, स्वार्थीपणाचे भाव आणिते ।
त्यांनाच मिळावे सारे काही, जाणता स्वरक्ताचे नाते ।।
उगम झाला जाती धर्माचा, स्वार्थीपणाच्या याच कल्पनी ।
वाटीत सुटतो प्रेम तयांना, केवळ सारे आपले समजूनी ।।
कन्या जेव्हां सासरीं जाते, नाती-गोती नवीन बनती ।
वाटत होते परकीय जे, आज आपले होवून जाती ।।
आपलेपणाच्या भावामध्ये, दडले असते प्रेम सारे ।
शत्रू देखील तुमचे होतील, समजूनी येता नाते खरे ।।
भाऊ बहीण, मामा, चुलते, दूरवरची आप्त मंडळी ।
बंधन ते पडून प्रेमाचे, बांधली जाती एकत्र सगळी ।।
कुणास कळले याचक्षणी, परका कुणीतरी दुरीचा ।
नात्यामध्ये नजीक असूनी, ऋणानूबंध तो पूर्वीचा ।।
ओढला जाईल आत्मीयतेने, अज्ञानाचा पडदा उठता ।
पूर्वजन्मीचे ज्ञान शिकविल, आपापसातील मानवता ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
पावन हो तू आई
पावन हो तू आई तव चरण शरण येई ।।धृ।।
संसाराचा खेळ मांडला
खेळविसी तूं मजला
थकूनी मी जाई ।।१।।
पावन हो तू आई तव चरण शरण येई
रात्रंदिनीं ध्यास लागला
जीव माझा तगमगला
झोप तर येतच नाही ।।२।।
पावन हो तू आई तव चरण शरण येई
आळवितो मी तुजला
विसरुनी देहभानाला
नयनी तव रुप पाही ।।३।।
पावन हो तू आई तव चरण शरण येई
देह झिजविला
दुर सारुनी सुखाला
कां तप फळा न येई ।।४।।
पावन हो तू आई तव चरण शरण येई
साद दे हांकेला
पेटलो आहे हट्टाला
नसता परत जन्म घेई ।।५।।
पावन हो तू आई तव चरण शरण येई
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
सोनं येचीतो मातीतं....
सोनं येचतो मातीतं...
संगणीच्या संगतीतं...
मोती घामाचे पिकवितो...
काळी मायच्या कुशीतं....
पशु पक्षी वृक्षवल्ली
काळ्या मायची लेकरं
सार तिच गणगोतं
तिलं सृष्टीचा संसारं....
पिकं शेतात डोलते
पाना फुलांनी सजते
फुले काळीज बळीचं
मनं हारखुन जाते.....
मका पोटुशी पोटुशी...
डोकं जवारी काढते...
गहु मिशांना ताविते...
फुलं सुर्याच डोलते...
पक्षी झाडाशी बोलती,
गाय गोठ्यात हंबरी,
मह्या शेतातली शाळा,
मलं ईथच पंढरी........!!!
©गोडाती बबनराव काळे
लातुर
९४०५८०७०७९
उत्साहाने करित होता, सारे कांहीं इतरांसाठी
क्षीण होवूनी जाता शरीर, आधार तयाला झाली काठी...१,
धनाचा तो प्रवाह वाहतां, गंगाजळीचे पाणी पाजले
दुजाकरिता त्याग करूनी, समाधानी ते इतरा केले....२,
धन संपत्तीचे झरे आटतां, प्रेमळपणाचे शब्द राहीले
कालक्रमणाच्या ओघामधल्या, दुर्बलतेस कुणी न जाणले...३,
अपेक्षा ती सदैव असते, मिळत रहावा सहयोग
अवमूल्यन ते केले जाते, दुर्लक्ष करूनी दुर्बल अंग...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti