हे मुरलीधर मनमोहना
वेड लावतोस तूं कुणां कुणां ? //धृ//
तुझ्या भोवती नाचती गौळणी
भान त्यातर गेल्या हरपूनी
थकूनी गेल्या नाच नाचुनी
विसरुनी गेल्या घरदारानां //१//
वेड लावतोस तूं कुणां कुणां ?
हे मुरलीधर मनमोहना
रमले सारे गोकूळवासी
पेंद्या, गोंद्या, सख्या, बन्सी
बागडती सारें तव सहवासी
करमत नाही तुजविण त्यांना //२//
वेड लावतोस तूं कुणां कुणां ?
हे मुरलीधर मनमोहना
संसार सोडला राधेने
भारुनी गेली तव प्रेमानें
ध्यास घेतला तुझाच तिनें
तुजविण नव्हती दूजी भावना //३//
वेड लावतोस तूं कुणां कुणां ?
हे मुरलीधर मनमोहना
मीरेचे तर प्रेम निराळे
विषालाही प्राशन केले
तुजसाठी सर्वस्व अर्पिले
कसा तारशी तुं भक्तांना //४//
वेड लावतोस तूं कुणां कुणां ?
हे मुरलीधर मनमोहना
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
खिळ्यांचे जगही असेच असते,
चुकांमधून सुधारत असते !
लहान खिळ्यांना चुका म्हणतात,
चुकता चुका खिळे होतात !
चुकांचे सुद्धा किती प्रकार,
टेकस, छोटेखिळे विविध आकार !
लहान खिळ्यांना चुका म्हणण्याचे कारण काय?
खिळे बनवितांना चुका झाल्या काय?
चुकल्या चुका, नादावले खिळे,
चुका आणि खिळ्यांच्या नशिबी हातोडे !
रुसल्या चुका, रुसले खिळे,
लाकडात शिरण्या नाही रुचे !
किती वर्ष असे लपून राहायचे?
मुक्त श्वास घेण्या कधी बाहेरे यायचे?
आमचे जीवन असेच सरायचे,
चाकोरीच्या बाहेर कधीच नाही जायचे !
हातोड्यांचे घाव सोसतो आम्हीं,
स्वत:चा कार्यभाग उरकता तुम्हीं !
-- जगदीश पटवर्धन
आभाळीच्या देवराया
कां ? पेरितोस रे माया
अवचित येसी, घेवूनी जासी
कां ? रुजवितोस रे माया
कां ? निर्मिलास रे निसर्ग
उध्वस्त क्षणात सारे व्हाया
निष्ठुर करिसी तू पंचभूते
कुठेच न उरे आसरा जगाया.
कां ? जाळलिस रे लंका
कां? बुडविलिस द्वारका
तूच रे निर्माता अन त्राता
तूच आभाळीचा देवराया
चैतन्य तुझेच रे हे सारे
घाल रे तुझीच पाखरमाया
निर्बुद्ध जरी मी हा पामर
शरणागत येईन तुझिया पाया
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. १०६.
९ - ४ - २०२२
हे गणराया, गौरीतनया, आनंदाचें धाम
हे लंबोदर, करुणाकर, माझा स्वीकरी प्रणाम ।।
संपते न वाट, होई न पहाट ; मज जाणें पैलथडी
आलोक तूंच, तम रोख तूंच, मम ज्ञानचक्षु उघडी
मिळतात सुखें, मिटती दु:खें, घेतांच तुझें शुभनाम ।।
आदि ना अंत तुज, एकदंत, तूं विश्वाची शक्ती
नाशतोस खल, तूं सुजनां देतोस सकल, मुक्ती
स्वानंऽद हे, आनंऽद दे, चरणीं करुं दे मुक्काम ।।
- - -
- सुभाष स. नाईक
हे मयुरेश्वर, श्रीसिद्धिविनायक
हेरंभ, लंबोधर शुभाय
प्रगटलास विविध रुपा धरणीवर ह्या
तुझ्या कृपेचा आशीर्वाद द्याया
वंदू तुजला प्रथपुजीताय !
बल्लाळेश्वर, वरदविनायक
रूप तुझे मोहक सुंदर
तुंदिल शोभे लंबोधर
तुझीया दर्शना चिंता-कष्ट दूर
वंदू तुजला गणाध्यक्षाय !
चिंतामणी, गिरिजात्मक
आम्हीं तुझी बालके अडाणी
बोबडे बोल, आमुची वाणी
शहाणे करण्या सत्वर येशी
भक्ती-सेवेत आम्हां गुंतवीशी
वंदू तुजला श्रीभक्तकल्याणाय !
श्रीविघनेश्वर, महागणपती
मोदकांवरी प्रीती भारी
एकवीस नैवैद्याते अर्पण सत्वरी
आनंदाने सर्व स्वाहीशी
तृप्तीचे एकवीस ढेकर पिताश्री देती
वंदू तुजला एकदंता, भालचंद्रा !
काय वर्णाव्या तुझ्या लिला
आमच्या अल्पमती बुद्धीच्या पलीकडल्या
करुनिया अल्पश्या गुणसंकीर्तना
ठेवितो तुझ्याया चरणी माथा
वंदू तुजला शूर्पकर्णाय विकटाय !
घेउनी पंचारती, मंजुळ वाजंत्री अनेक
सहर्ष स्वागता आम्हीं सज्ज
मानुनी घे मोदकापरी गोड
भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिस !
जगदीश पटवर्धन
पुण्यामधलंच स्थळ हवं ।
मुंबईला सेकंड ऑप्शन ।
लिकर पी कर विकएन्ड ।
लाईफसाठी हीच कॅप्शन ।।
शनवारवाडा , वैशाली हे ।
आऊटडेटेड झाले पॉईंट्स ।
गोल ऍचिव्ह करण्यासाठी ।
शोधते मी नव्या हाईट्स ।।
मल्टिप्लेक्स , मॉल मध्ये ।
टाईमपास भारी होतो ।
सिंहगड पर्वतीवर ।
आता कोण जातो येतो ?
फेबु ट्विटर मेसेंजरवर ।
अपडेट्सचा धूर अन् जाळ ।
मेमरी होते फुल तरीही ।
नेटवरचा येतोच गाळ ।।
जेवण घरचं बेचव सालं ।
हवा यार पिझ्झा बर्गर ।
पब क्लब डान्सफ्लोअर ।
सच तो है ये हुक्का पार्लर ।।
बाईकवरची नशाच न्यारी ।
गच्च धरावं बॉयफ्रेंडला ।
तोंडावरती स्कार्फ बांधून ।
थेट घुसावं लॉंग ड्राइव्हला ।।
चॅटिंग डेटिंग करण्यासाठी ।
फार्म हाऊस पॅकेजवाली ।
ब्रेकअप , पॅचअप इव्हेंट्ससाठी ।
तिथेच होते पार्टी ओली ।।
ऑनलाइन मिटिंगमधल्या ।
पोझिशन्स अँड कमिटमेंट्स ।
एमबीए चं येडं पकवतं ।
रिझल्ट्स, मॉरल , एटिकेट्स ।।
स्थळाला दे होकार बये ।
आई रडते रोज घरी ।
' वय वाढतं ' बोअर करते ।
पॅनिक होते घरीदारी ।।
नकोच मुलं , नकोच नाती ।
डस्टबीन्स तर नकोच घरी ।
ऑकेजनली ड्रग्ज साठी ।
लिव्ह इन चा ऑप्शन भारी ।।
चौकट नको , स्पेस हवी ।
त्यासाठीच तर धावाधाव ।
माझं पॅकेज , माझं शहर ।
मीच ठरविन , माझी हाव ।।
* * * *
पस्तिसाव्या वाढदिवशी ।
कुणी नाही विश केलं ।
अजून तिला कळलं नाही ।
क्षितीज किती दूर गेलं ।।
अजून तिला वाटत राहतं ।
पुण्यामधलंच स्थळ हवं ।
आरसा हसतो हळूच गाली ।
तिला नसतं भान नवं ।।
- डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
निघून जाते आयुष्य खिसे आपुले भरताना
वेळ जाते निघून दिवस रात्र धावताना
हरवून गेले आहे सारे सुख विकत घेताना
क्षणभर हसणे सुद्धा महाग झाले लोकांना
विसरलीत नातीगोती सारे जवळ असताना
धावपळीचे आयुष्य निमूटपणे जगताना
आयुष्य आहे सुरेख कुणीच पाहत नाही
नुसती दगदग सुरु वेळ कुणाजवळच नाही
बसून मित्रांसोबत आज कुणी बोलत नाही
सुखामागे धावताना माणूस आज हरवला आहे
हातच सुख सोडून दुःखामागे लागला आहे
आयुष्य काय आहे आज कुणाला कळले नाही
जगण्याचे गुपित कोडे कुणालाच उमजले नाही..
मधु दारसेवाड...
“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
Copyright © 2025 | Marathisrushti