अव्यक्त, निःशब्दी मौन
मिटलेले निरागस डोळे...
सांग कसे मी समजावे
हितगुज तुझ्या मनातले...
नित्य तुझीच गं आठवण
मन्मनी प्रीतभाव गुंतलेले...
हेची सत्य अजुनही उरात
मग शब्द अबोल कां झाले...
जीवास, प्रीतदान भाळीचे
मन भावनांत कां उगा गुंतले...
सखये बोल नां सत्य एकदा
सांग नां तूं तुझ्याच मनातले...
होवू दे मनहृदय शांत आता
कळू दे प्रीतभाव लोचनातले...
--वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र.२६६
२०/१०/२०२२
देशा तुझीया तिरंग्याचा सार्थ आम्हां 'अभिमान'
गर्वाने आम्ही सारे म्हणतो, मेरा भारत महान |
स्वातंत्र्याचे 'सेनानी' अन क्रांतिवीरांना सलाम
संग्रामिच्या शूर लढवय्या महिलांनाही प्रणाम |
प्राण देऊनी त्यांनीदिधले, 'स्वातंत्र्याचे' दान,
त्यावेळीच्या राज्यकर्त्यांनी ठेविला तयांचा मान |
पण पवित्र देशा, कणखर देशा, सोन्याच्या देशा,
काय जाहली बघ तुझी ही, आज अशी 'दूर्दशा' |
कैसे जडले तुजला देशा , तीन भयंकर रोग?
पॉप्युलेशन, पोल्यूशन वर करपशनाचे भोग |
देशा तुझीया सुरक्षेची कुणी न घेती हमी,
तीनही मार्गे शत्रू घुसूनी करीती ते हानी |
आदर्शाला कुणी ना पात्र, घोटाळे मात्र,
स्त्रीभ्रूणहत्या, बलात्कार अन् खूनही सर्वत्र |
न्यायदेवता तुझी खरोखर, आज होई आंधळी,
अपराध्याला कधी न होई शिक्षा त्याचवेळी |
'नैतिकमूल्ये' ढासळताना नाही पाहवत देशा,
पुनश्र्च निघु दे धूर 'सोन्याचा', हेची सांगणे ईशा |
-- सौ.अलका वढावकर
अजूनही प्रणयाचे ऐकू येते गुंजन!
हुळहुळते अधरांवर माझ्या पहिले चुंबन!!
तुझा स्पर्श पहिल्यांदा झाला मला असा की,
उभ्या हयातीचे या माझ्या झाले कंचन!
गगनामध्ये अजून गर्दी नक्षत्रांची
तुझ्या नि माझ्या प्रीतीला ती करती वंदन!
सवे माझिया तू असली की, असे वाटते....
स्वर्गामधले अवतरले भवताली नंदन!
श्वासाश्वासामधे चालते तुझीच घमघम
अजून कुठले मला पाहिजे दुसरे रंजन!
मला न वाटे जीवन-मरणाची या भीती
जोवर आहे नाम:स्मरणाचे हे इंधन!
पहा लागलो बहराया मी दिशादिशांना
तुझ्या कृपेचे जेव्हा झाले अविरत सिंचन!
शब्द अता बोलतात माझे तुझीच भाषा
करतो आता तुझेच वाचन, तुझेच चिंतन!
हयात माझी गझलमय जणू झाली आहे
झोपेमध्ये सुद्धा चालू विचारमंथन!
कळते मजला तुझ्याविना मी अपूर्ण आहे
तू माझा स्वर, मी तर साधे आहे व्यंजन!
प्रोफेसर
प्रा. सतिश देवपूरकर
दलदल होता चिखल मातीची,
पाय जाती खोलांत,
प्रयत्न व्यर्थ जाऊनी ,
न होई त्यावर मात ।।१।।
सावध होऊनी प्रथम पाऊली,
टाळावे संकट,
मध्यभागी शिरल्यानंतर,
दिसत नाही वाट ।।२।।
मोह मायेची दलदल असती,
सदैव भोवताली,
चुकूनी पडतां पाऊल ,
खेचला जातो खाली ।।३।।
जागृतपणाचा अभाव असतां,
गुरफूटत जातो,
मोहमायेच्या आकर्षक गुणाला,
बळी तोच पडतो ।।४।।
वेगवान जीवन प्रवाही,
खिळ बसे मोहाने,
क्षणीक सुखाच्या मागे जातां,
दु:खी होई जीवने ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
चला, आठवणींच्या गावा जाऊ, स्मृतींचे हिंदोळे झुलवत
पुन्हा एकदा लहान होऊ,
हाती हात मिळवत,--!!!
आठवांचे गावच रमणीय,---!!!!
किती नांदती सगेसोयरे,
हासुन आपले स्वागत करती,
त्यात बालपणीचे वडीलधारे,--!!!
शाळेतील शिक्षकांच्या हाती,
मुळीच लागायचे नाही,
त्यांनी केलेल्या कठोर शिक्षा, काहीच आठवायचे नाही,
आठवावा तो निरागसपणा,
निष्पाप कोवळे ते वय ,
अशावेळी हमखास येते,
मैत्रिणींची खूप सय,
कधी लुटूपुटूची भातुकली,
त्यातले खोटेच रुसवे-फुगवे,
आज डोळे गहिंवरती,--!!!!
पण वाहून ना जाती त्या सयी,
लग्न बाहुला-बाहुलीचे,
सासूने मागता हुंडा,
ठाम राहून नकार देत,
मुलगी परतवणे घरां,
बरोबर येई मग सासू,
हीच मुलगी करायची,
दोन तोळे जास्त घालू,
समजूत अशी काढायची,--!!!!
आट्यापाट्या लपंडाव लगोरी, किती त्यांच्या आहारी जाणे,
वेळ काळ विसरत सगळे,
त्यावरून बोलणी खाणे, बालपणीची ही धुंदी,,---!!!!
अजूनही गेली नाही,
भोंडल्याची खरी मज्जा,
आजच्या मुलीला कळत नाही,
पाच दहा पैसे परंतु,
कधी हाती ना लागले,
त्यासाठी किती सायास कित्येकाना पटवावे लागले,--!!!
हिरव्या लाल गाभुळल्या चिंचा, आवळे जाम आणिक बोरे,
त्यांची किंमत सांगा आज,
थोडी आठवून बघा बरे,--!!!
मे महिन्याच्या सुट्टीत कसा,
घरात घालायचा धिंगाणा,
जो येईल तो ओरडे,
पण विचारलेच नाही कुणा,--!!!
पापड पापड्या कुरडया,
पदार्थांची रेलचेल असे,
कामाच्या सांगून नावाखाली, पळवापळवी" ठरलेली असे,
वेळ येता आजोबांचा,
मिळे खंबीर पाठिंबा ,
त्यांच्या प्रेमापुढे गप्प सगळे,
हिंमत"" व्हायची नाही कुणा,--!!!
किती अशा आठवणी,
शब्दच अपुरे पडती,
*स्वप्नातील हे गाव ठरते,
डोळे उघडून बघा भोवती*,--!!!
हिमगौरी कर्वे©
येणार नवीन वर्ष
येणार नवीन वर्ष, एक नवीन संकल्प घेऊन येत
स्वप्न ते देऊन जात, आठवणी घेऊन जात
पांडूरंगाचे दर्शन घेण्या, गेला पंढरपूरी ।
चुकली नाही कधीही, आषाढी कार्तिक वारी ।।
आजपरी शरीर दुबळे साथ देईना ।
मन तजेले दर्शन घेण्या हट्ट सोडीना ।।
आधार घेऊनी आज कुणाचा गेला पंढरपूरी ।
भरून आले डोळे त्याचे बघता शिखर मंदिरी ।।
आशा नव्हती थोडी देखील दर्शन मिळण्या तेथे ।
अंगणीत जमले भक्त गण नाचत सारे होते ।।
चार दिवस पडून होता विठ्ठल विठ्ठल गजरी ।
फिरणे नाही मागे अशी मनीची तयारी ।।
गेला नाही कण अन्नाचा चार दिवस पोटी ।
ध्यास लागला मनी एकची त्याच्याच भेटीसाठी ।।
टाळ मृदुंग विठ्ठल नामी एक रूप झाला ।
नाचत नाचत प्रभू चरणी येऊन तो पडला ।।
विलीन झाला अनंतात तो फिरूनी नाही उठला ।
देह सोडूनी पांडूरंगी चरणी वैकूंठी गेला ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
दोन्हीं दारीं मारामारी
खानेसुमारी पानसुपारी.
खालीवर तागडी जुळली फुगडी
हुशारला गडी फुशारला गडी.
आतां झाली पक्की आतां मिळेल नक्की
लाल-दिव्याची गाडी !
- सुभाष स. नाईक
रस्त्यावरती उभी राहूनी, हातवारे ती करित होती
मध्येच हसते केंव्हां रडते, चकरा मारीत बसे खालती...१,
गर्दी जमली खूप बघ्यांची, कुत्सीतपणे न्याहळू लागली,
'शिपाई आणा जावूनी कुणी', ठाण्यात नेण्यास सांगू लागली...२
जीवनातील दु:खी चटका, सहनशक्तीचा अंत पाहतो,
मनावरील तो ताबा सुटूनी, वेडेपणा हा दिसून येतो...३
इतकी गर्दी जमून कुणीही, तिच्या मनीचा ठाव न जाणला
रूख रुख वाटली ती बघोनी, सहानूभुती शून्य समाजाला...४
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
दोघेही येती एकाच वेळीं
श्रीकृष्णाच्या भेटीला
अर्जून उभा चरणाजवळी
दुर्योधन बसत उशाला...१
प्रथम दर्शनी नेत्र उघडता
नजर गेली अर्जूनावरी
प्रभूकडे तो आला होता
आशिर्वाद त्याचे घेण्यापरी....२
दुर्योधन दिसे बघता पाठी
अहंकाराने होता भरला
मदत करण्या युद्धासाठी
विनंती करि तो हरिला....३
युद्धामध्ये भाग न घेई
सांगेन गोष्टी उपदेशाच्या
परि सारे त्याचे सैन्य जाई
लढण्या दुसऱ्या बाजूच्या...४
विश्वास होता सैन्यावरी
दुर्योधन मागतो अनेक
आशिर्वाद हवा होता
अर्जून निवडतो एक...५
निवड करूनी श्रीकृष्णाची
विश्वास येई स्वत:वरी
अस्तित्व शक्ती जेथे प्रभूची जयश्री जाईल कशी दुरी...६
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti