जिथे नसावा गलबला, गलका, कोलाहल काही
काळालाही शाप नसावा, लगबग वा घिसाडघाई
मनस्ताप वा कसली चिंता, गोंगाटही नाही
शांततेला मग धीर यावा, नीरवता जिवंत व्हावी ॥
असावी शांततेला एक वात्सल्याची झाक
काळालाही नसावा वेळेचा काही धाक
ऐकू यावी अंतरीची केवळ हळूवार हाक
समाधि लागावी या जगाची न उरे जाग ।।
जिथे विहरावा वारा मुक्त आपुलकीचा आज
जिथे सागरा उधाण यावे चैतन्याचा हो स्पर्श
जिथे व्हावे मोकळे आकाश, विसरुनी सारे पाश
गर्भरेशमी हिरव्यापानी, लेवून लवावी लाज ॥
जिथे नसावी घरांना द्वारे मोकळे व्हावे कोंडले श्वास
संकोचाचे संदर्भ सुटावे आकारुनी यावे अपूर्ण ध्यास
स्वर्गाचा तो तोल ढळूनी, तादात्म्याचे ताल जुळावे
द्वैताचे मग भान हरपूनी, धरिणीमध्ये आभाळ मिळावे ॥
जिथे नसावी जुनी जळमटे, उमेदीला वा भगदाडे
ममत्वाच्या भासाने खुलावी, मनामनाची हळू कवाडे
शांत सनातन शांतीच्या मग कुशीत होऊन अधीन
आसमंतात विरघळत जावे, व्हावे निसर्गाशी तल्लीन ॥
(जगभरच्या वाढत्या कोलाहलात, गर्दीत दुर्मिळ झालेल्या शांततेचा कधी अनिवार ध्यास लागतो. काही नको फक्त आपण व आपली शांतता एवढंच हवं असं वाटू लागतं)
-यतीन सामंत
June 19, 2022
आत्मा कोठे असतो, नाभी केंद्रात शोधाल का ?
तो तर दिसत नसे, मग त्यास जाणाल का ?....१,
सर्व इंद्रिये वापरली, परि न झाला बोध,
कोठे लपला आहे, न लागे कुणा शोध....२,
विचार आणि भावना, संबंध त्याचा ज्ञानाशी
मेंदूत आहे इंद्रिय, संपर्क त्यांचा सर्वांशी....३,
मेंदूवरी ताबा असे, नाभीतील मध्य बिंदूचा
समजून घ्या सारे, तेथेच आत्मा देहाचा...४,
मातेचे अपूर्व देण, बाळाच्या नाभीत जमते,
आत्मा हेच ते रूप, जीवन कार्य चालविते.....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 17, 2018
खारेपणा हा अंगी असतां, कोण खाईल केवळ मीठ
परि पदार्थाला चव येई, मिसळत असता तेच नीट....१,
जीवन सारे खडतर ते, भासते मिठासम मजला
केवळ जीवन बघता तुम्हीं, पेलणें अवघड सर्वाला..२,
तेच जीवन सुसह्य होई, ‘आनंदात’ जेंव्हां मिसळते
हर घडीच्या प्रसंगामध्ये, समाधानाचे अंकूर फूटते....३
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 27, 2019
पर्वत शिखरीं जाऊन खोदून आणली माती,
हातकौशल्यने केला एक गणपती ।।१।।
मूर्ती बनली सुरेख आनंद देई मनां,
दाम मिळेल ठीक हीच आली भावना ।।२।।
घेऊन गेलो बाजारीं उल्हासाच्या भरांत,
कुणी न त्यासी पसंत करी निराश झालो मनांत ।।३।।
बहूत दिवस प्रयत्न केला कुणी न घेई विकत,
कंटाळून नेऊन दिला गणपती शाळेत ।।४।।
भरले होते भव्य प्रदर्शन हस्तकला कौशल्याचे,
नवल वाटले गणपती बघून दालनातील सुरवातीचे ।।५।।
चकीत झालो जाणूनी मिळाला राष्ट्रीय पुरस्कार,
गणपतीच्या भव्यतेनी मिळविला हा अधिकार ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 16, 2015
बऱ्याचदा घरी एखादा खास पदार्थ खाल्ल्यावर आपण म्हणतो . . . बनलाय चांगला पण चव मागच्या वेळेसारखी नाही बरं का. किती सहजपणे बोलून जातो आपण. बनवणाऱ्या व्यक्तीने काही दिवस आधी ठरवून आणि काही तास मन लावून बनवलेला असतो हा पदार्थ. जीव ओतून केलेल्या या पदार्थावरची आपली एक कॉमेंट तिचा हिरमोड करायला पुरेशी ठरते आणि नव्याणव टक्के हा पदार्थ बनवणारी व्यक्ती तुमची आई किंवा पत्नी असते.
कशी असेल हो चव मागच्यासारखी सेम टू सेम? बाजारातून आणलेल्या जिन्नसांचं सोडा, पण इतरही अनेक गोष्टी कारणीभूत आहेत चवीत बदल करणाऱ्यासाठी. मला सांगा, पूजेच्या दिवशी सत्यनारायणाचा प्रसाद आणि इतर दिवशी त्याच मापाने बनवलेला शिरा वेगळा का लागतो बरं?
उन्हाळ्यात खाल्लेली आणि पावसाळ्यात खाल्लेली कांदा भजी वेगळी का लागतात? कितीही लज्जतदार जेवणाचा पहिला घास आणि शेवटचा घास सारखाच लागतो का हो ? नाही ना? कारण चवीची अनुभूती स्थलकालऋतू परत्वेच नव्हे तर तुमच्या मनस्थिती (मूड) वर पण अवलंबून असते, तुमच्या भूकेवर अवलंबून असते, तुमच्या त्या व्यक्तीवरच्या प्रेमावर पण अवलंबून असते.
एरवी बघताक्षणीच फस्त होणारे पिठलं भात घडलेल्या एखाद्या दुःखद प्रसंगानंतर खाताना कुठे चवदार लागतय सांगा बरं ! एखाद्या व्यक्तीच्या विरहात किंवा आठवणीत 'अन्न गोड लागत नाही' असे म्हणतात ते यालाच. पदार्थाची चव तीच असते, तुम्हालाच बेचव किंवा वेगळी लागते.
कधी तुमची नववी-दहावीतली मुलगी पहिल्यांदाच तिच्या आईच्या देखरेखीत एखादी साधीशी भाजी बनवते. किती धांदल असते तिची ! काहीतरी नक्कीच कमी पडलेलं असतं त्या भाजीत. पण कसले खुश असता तुम्ही. इथे कौतुकाच्या मसाल्याने त्या भाजीची चव बदललेली असते.
कधी सणकून भूक लागली असते, तेव्हा घरातली शिळी भाकरी पण गोड लागते. रोजच्या घाईत ऑफिसला निघता निघता कसाबसा प्यायलेला चहा आणि सुट्टीच्या दिवशी आरामखुर्चीत पेपर वाचत घेतलेला तोच चहा परत 'घोटभर' प्यावासा वाटतो. कधी कधी लग्न होऊन गेलेल्या बहिणीकडे जेवताना तुम्हाला प्रत्येक घासागणिक तुमच्या आईच्या हातच्या चवीची आठवण येते; टचकन डोळ्यात पाणी येतं आणि नंतरचा तो प्रत्येक घास त्या आठवणीत अधिकच चवदार होत जातो.
भुकेला धर्म नसतो, अन्नाला जात नसते, पण चवीला मात्र नातं असतं. खरंच सांगतो, चव फक्त पदार्थात नसते, चव मनात असते, चव प्रेमात असते, चव आठवणीत असते.
चवीची अनुभूती घेण्यासाठी जीभ नावाचे एक वेगळे इंद्रिय जरी देवाने दिले असले तरी त्या चवदार आठवणींचा अनमोल ठेवा जपण्यासाठी तुमच्या हृदयासारखी दुसरी जागा नाही. म्हणूनच हृदयात रुळणाऱ्या आणि जिभेवर रेंगाळणाऱ्या प्रत्येक चवीबरोबर एकातरी प्रिय व्यक्तीची आठवण नेहेमीच जपलेली असते... !!!
June 7, 2017
(आमच्या झोपायच्या खोलीच्या खिडकी समोर उंबराचे झाड आहे. त्यावर चिमण्या राहतात. पहाटे साडेचार पाच वाजल्यापासून त्यांची चिवचिव चालू होते. जाग आल्यावर वाटते झाडच जणू गात आहे. हे गाणे दोन-तीन तास चालू असते.)
उंबराच्या झाडाच्या गाण्याने
पहाटे जाग येते तेव्हा वाटते
जणू कोणी नर्तक
पायात बांधून घुंगरांचा साज
करतोय सुंदर पदन्यास
उंबराच्या झाडात म्हणे असतो
सद्गुरूंचा वावर
म्हणूनच काही चिमणी पाखरं
पहाटेच सुरू करतात
मधुर मंत्रजागर?
असेलही खरे
म्हणूनच म्हणतात का बरे?
चराचर सृष्टीतच
भरला आहे ईश्वर?
पहाटेच्या मंगल वेळी
गोड किलबिल मंजुळ वाणी
गाणारे झाड
अलौकिकाचा स्पर्श!
किमयागार तो
सृष्टीचा इश
जोडूनी दोन्ही कर
त्याला करू वंदन!
-- विनायक अत्रे.
July 14, 2022
रंग पहा नभांगणात,रोज कसे जमतात,
एकत्र येऊन फिरतात,
पंचमी साजरी करतात,--!!
निळेशार राखाडी पांढरे,
मेघांची लगीनघाई,
इकडून तिकडे जाती कुठे ? बघणाऱ्यांना ठाऊक नाही,--!!!
प्रभात काळी एकेक रंग,
उषा क्षितिजावर उधळते,
पिवळे निळे काळे तांबडे,
त्यात सोनसळी भर असे,--!!!
कुठून येई,लख्ख प्रकाश ,
खजिनाच वर वर येई,
ढगांआडून प्रकाशदाता,
सगळ्यांना आपुले दर्शन देई,--!!!
सकाळ होता राज्य त्याचे,
सम्राटाची सारी जादू ,
रंग पिवळसर सोनेरी,
लागतो पसारा मांडू,--!!!
श्यामल संध्या गगनी येतां,
पुन्हा रंगांचीच लीला,
तांबडे निळे राखाडी सोनेरी,
क्षितिजावर पखरण होतां,--!!!
वसुंधरेवर तम टाकते,
आपले पहिले पाऊल,
जसा सूर्या घरी निघतो,
होता तांबूस संधिकाल,--!!!
काळा रंग आता पसरे,
महत्त्व त्याचे येता रजनी,
नभी दुधी चांदणे,उगवता,
काळ्या ढगांस कडा रुपेरी,--!!!
हिमगौरी कर्वे ©
May 11, 2019
खोलीमध्ये कोंडूनी मांजर, हाती घेई काठी ।
मारून टाकण्यासाठी तीला, लागला तो पाठी ।।
अतिशय भीत्री असूनी ती, जीवासाठी पळे ।
हतबल होता पळून जाण्या, मार्ग तो ना मिळे ।।
उपाय नसता हाती कांहीं, चमत्कार घडे ।
सर्व शक्तीनी त्याच्यावरती, तुटून ती पडे ।।
उडी मारूनी नरडे धरले, दोन्ही पंजानी ।
मृत्यूचाच तिने गळा घोटला, शक्ती युक्तींनी ।।
प्रत्येकामध्ये सुप्त असते, शक्ती लपलेली ।
अवचित वेळ पडता दिसे, बाहेर आलेली ।।
मदत देतो निसर्ग तुम्हां, संधी बचावासाठी ।
जीवनासाठी झगडत रहा, शिकवण ही त्याची ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
October 28, 2016
जरी मी संपलो इथे
प्रवास संपणार नाही
चार लाकडांसोबत
माझा ध्यास जळणार नाही
राख निजेल मातीच्या कुशीत
स्वप्ने निजणार नाही
राहतील रेंगाळत येथेच
पण सावली दिसणार नाही...
मायमराठीचे काव्यरत्न
कविवर्य मंगेश पाडगावकर
प्रथम पुण्यस्मरण
३० डिसेंबर २०१६
January 1, 2017
असते कां खरे? दर्पणातले रूप बिलोरी
झांकता अंतरी मलाच माझे कळत नाही
मी खराखुरा कां? खरे प्रतिबिंब बिलोरी
हा संभ्रम मनीचा अजुनही दूर होत नाही
हसवे, फसवे, नाटकी सत्यरुप मनीचे
तो आरसा बिलोरी कधीच दाखवित नाही
अदृश्य वास्तवी अंतरीचेच प्रतिबिंब खरे
आरश्यातले प्रसन्न रूप बेगडी सत्य नाही
निर्मळ स्पर्श मानवतेचा हीच खरी सुंदरता
जगी याविण दूजे सुंदर रूप बिलोरी नाही
**********
-–वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३१७
२/१२/२०२२
December 14, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti