‘ये, जवळ बस’ म्हणालीस तूं,
मी बसलोही
क्षीण तुझा कर करीं घेउनी
सुखावलोही .
नव्हतें माहित, ‘उद्या’ परंतू
काय व्हायचें होतें
‘उद्या’च येथुन कायमचें तुज
दूर ज़ायचें होतें.
- - -
( दिवंगत प्रियपत्नी डॉ. स्नेहलता
हिच्या आठवणीत )
-- सुभाष स. नाईक
तो तर देत नसतो कांहीं,
घ्यावे लागते खेचूनी ।
शक्ती लावूनी खेचा सारे,
देईल परि ढील सोडूनी ।।
जरी असला दयेचा सागर,
केवळ मागणें मान्य नसे ।
तुटून तुमचे प्रयत्न होता,
ओजळीने तो देत दिसे ।।
व्यर्थ घालवी जीवन कांही,
स्वार्थीपणाच्या मागणी पायी ।
वेडे ठराल तुम्हींच परि,
काळ मात्र कधी थांबत नाही ।।
धडपड करा, लुटून घ्या
सांघिकतेच्या भूमिकेतूनी ।
जाच न होई दुजास त्याचा,
हीच भावना उरी बाळगूनी ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
*निसर्ग*
अद्भुत घटनांनी भरलेला
कविंना वेडावून सोडणारा
तुझ्या चमत्कारांनी मी भारावलेला
या मानवाला गुढतेत ढकलणारा
*मन*
मन हे चपळ चपळ
कधी इथे तर कधी तिथे
मन हे उथळ उथळ
कधी रडे तर कधी हसे
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
कृष्ण कमळ-
माझाच जन्म व्हावा
म्ह्णून माझ्या आई-बापाचं मिलन झालेलं नव्हतं...
माझ्या जन्माचं कोडं
त्यांना आणि मलाही कधी उलगडलं नव्हतं...
माझा जन्म आता
मला, माझ्या आई-बाबाला आणि जगालाही ओझं ठरलं होतं...
मला शक्य असतं तर
या जगात जन्माला येणंच मी स्वतःहून नाकारलं असतं...
किती बरं झालं असतं
या जगात जन्माला येणं न येणं हे आपल्या हातात असतं...
© कवी – निलेश बामणे ( एन.डी.)
दिनांक – 9 मार्च 2016
माळी असूनी मी, गुंफी फूलांचे हार,
अर्पित जातो ते, प्रभू चरणांवर....१,
राम नाम जपत, कुणी एक येतात
घटकाभरासाठी, विश्रांती ते घेतात....२,
रोज देती मजला, ओंजळभर फूले
कोणत्या बागेतली, कधी न सांगीतले....३,
त्यांच्याच सांगण्याने, हार मी गुंफीतो
बघतात कौतुकें कसा मी अर्पितो....४,
फूलांची ओंजळ ती, नव्हे तो तर शब्दांचा ठेवा,
कवितेच्या रचनी, उपयोगी पडावा....५,
शारदेचा आशिर्वाद, त्यांच्यातर्फे मिळतो
विषय मिळूनी, काव्य मी रचीतो....६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
गेले सारे आयुष्य परि न कळला ईश
इच्छा राहिली अंतर्मनीं प्रभू भेटावा एके दिनीं ।।१
बालपणाचा काळ करुनी अभ्यास नि खेळ
मनाची एकाग्रता केली शरीरा करिता ।।२
तरुणपणाची उमेद जिंकू वा मरु ही जिद्द
करुन प्रयत्नांची पराकाष्टा बनवी जीवन मार्ग निष्ठा ।।३
संसारातील पदार्पण इतरासाठी समर्पण
वाढविता आपसातील भाव जाणले इतर मनाचे ठाव ।।४
काळ येता वृद्धत्वाचा दाखवी मार्ग अनुभवाचा
भजन पुजेत जाई वेळ ज्ञान गोष्टी सांगे सकळ ।।५
आता झालो देह दुर्बल प्रभू चिंतनात जाई वेळ
वाट बघतो निरोपाची ओढ फक्त जगदंबेची ।।६
आयुष्य संपता सारे खंत येऊन मन विचारे
कां न प्रभू भेटला ह्याची रुखरुख मनाला ।।७
आत्म चिंतन करिता जाणवे मी भगवंता
ईश्वर निर्गुण निराकार कर्म करी त्यास साकार ।।८
दया क्षमा शांती ह्याच ईश्वराच्या शक्ती
आयुष्यातील आनंदी क्षण हीच ईश्वराची खूण ।।९
जीवनांतील समाधान ईश्वर प्राप्तीचे लक्षण
नसावी मनी खंत आनंदी भाव हाच भगवंत ।।१०
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti