खेळ केवढा चाललेला,
या दुनियेच्या पटावरती,
पर्याय नसे सोंगट्यांना,
कळसूत्री बाहुल्या हलती,--!!!
जेजे घडे, मागे त्या,
कर्ता करविता असतो कोणी, दिसत नाही आपल्या डोळ्यांना, जाणिवे नेणिवेच्या पल्याडही,--!
कोण घडवी सगळ्या घटना,
मदत करी अडल्या प्रसंगी,
असंख्य रूपे तुझी देवा,
दिसती आम्हा समयी समयी,--!!!
करुणा शांती क्षमा, प्रेम, दया,
भावनांचे किती प्रकार असती, सिद्ध करत आपुला देवपणा,
देवमाणसे तत्परता दाखवती,-!
माया, ममता,आपुलकी,जिव्हाळा,
सद्भावना ना मरते कधी,
वाहे झरा माणुसकीचा,
तूच नांदतशी त्यांच्या हृदयी,--!!!
कठोर, क्रूर, निर्घृण, भयंकरा,
मात देण्या प्रवृत्त करशी,
भयानक, भीषण, भयावह प्रसंगा, चीत करण्या मार्ग दाखवशी,--!!
छळती मानवा यातना वेदना,
संहार त्यांचा करावया पाही,
अशा संकटांचा सामना करण्या,
हे ईश्वरा तूच बळ देई,--!!!
नको कुठली सुखे अनंता,
पाखर सतत तुमची रहावी,
दुसरे काही मागणे ना, नाअपेक्षा दुसरी काही,--!!!
© हिमगौरी कर्वे.
दिव्याची ज्योत पेटली, वात दिसे जळताना
जळेना परि वात ती, दिव्यांत तेल असताना,
जळत असते तेल, देवूनी प्रकाश सारा
आत्मबलीदानाचा दिसे, शोभून तेथे पसारा
बागडे मूल आनंदी, तिळा तिळाने वाढते
आई-बापाच्या मायेनी, झाड कसे बहरते
कष्ट त्याग हे जळती, सुगंध आणिती जीवनी
गर्भामधली ही चेतना, जाणतील का कुणी ?
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
चकली, कडबोळी, भाजाणी आणि करंज्या… या गाण्यात…
(१५ ऑगस्ट २०१८ , स्वातंत्र्यदिनाप्रीत्यर्थ )
आम्ही स्वतंत्र झालो , आम्ही स्वतंत्र आहो
स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
गर्जलो, “गटापुढती कुठल्या न नमवुं माथा”
अन् ‘पंचशील’-तत्वीं विश्वास पूर्ण होता
बदललो परी नंतर, नाहीं ‘अलिप्त’ उरलो
त्या पंचशील-तत्वा पुरते अम्ही विसरलो
निज राजकारणाचा अभिमान , परी, लाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
प्रगतिचें नांव घेउन वाढत ‘आयात’ राही
परकीय-चलन सरलें, आश्चर्य यात नाहीं
गंगाजळीच संपे , हातीं कटोरा धरला
जागतीकरण मारी देशी उद्योगाला
इंडस्ट्री ग्रस्त अजुन, ऐशीच ध्वस्त राहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
मुठभर सुदूरदेशीं ‘आय्. टी.’ मधून जाती
झालें भलेंच, होवो, पण लाख अन्य मरती
जणुं बनवतां न येती ‘कंझ्यूमर-गुडस्’सुद्धा
परदेश धरत लावुन ‘आयात-शुल्क’-मुद्दा
उणवलें शुल्क, प्रार्थत, ‘चलनी-प्रवाह वाहो’ ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
बेकायदाच रस्ते भूमीत बांधुनीया
साळसूद-देश म्हणे, ‘आमुच्या संगतीं या’
शेजारी, जो अपुला ‘व्यापार-पार्टनर’ही
घुसती दहशतवादी, त्यांना आधार देई
कळुनही विसंगति, कां, तूं गप्प वज्रबाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
परदेशी-कंपन्यांची चंगळ बहू जहाली
देशी उत्पादनांचा आलेख जाइ खाली
बेरोजगार वाढत , पसरते हलाखीही
डोळ्यावरील अमुच्या हटतच ‘झापड’ नाहीं
वदतो , ‘शाबास ! ऐशा प्रगतीत देश नाहो !’ ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
कळलेंच ना अम्हांला दुर्दैव हाय ! अमुचें
बनलो ‘अधीन’ आम्ही परदेशवासियांचें
पश्चिम व पूर्व इथुनी ‘कंटेनर’ रोज येती
नागरीक बेपर्वा , तो विकत माल घेती
‘टोचणी’स निजलेल्या, निद्रा अशीच वाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
निज चालते न मर्जी, कैसा असे स्वतंत्र ?
परकीय गारुड्यांचे चालती येथ मंत्र
राष्ट्रें पुढारलेली पिरगाळतात हाता
उघडलें दार आम्हिच, सार्या उगाच बाता
बोळ्यानें दूध पितो, त्या काय म्हणावें हो ?
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
किति ही अदूरदृष्टी ! लांबचा विचार नसे
पत्ता न, पतन-खड्डा पायाखालीच असे
शेतें उजाडलेली , पुरते न वीज, पाणी
आयुष्य जाहलें हें, ‘अघोषित-आणिबाणी’
‘जयकार’ झाकतो की - जन फोडतात टाहो ।।
स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
ऐसे नव्हे , कुणाला कांहींच ठावकी ना
प्रतिसाद मिळेल कसा कोणाचिया प्रयत्नां ?
करण्यांस साध्य, कोणां उरली न संधि कांहीं
लागली चटक, त्याला रोखणें शक्य नाहीं
एकल्या-यत्नवंतां लोभी-जगत् न दाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
सगळेंच सत्य, दोस्ता, अतिशयोक्ती न कांहीं
सारेच आपण दोषी, तूंही, तसाच, मीही
चकमा न खाउं, जोखूं अपुलेंच आपण स्वत्व
दावूं ममत्व कोठें , देऊं कशां महत्व
ठरवूं या - हृदयिं खरें निजदेशहितच राहो ।।
स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
- - -
लाहो : लाभो, मिळो, प्राप्त होवो
वज्रबाहू : ज्याचे हात वज्राप्रमाणें आहेत असा
(अर्थात्, आपल्या सेनेमधील वीर सैनिक )
-
- सुभाष स. नाईक
( M- 9869002126).
आई भाकर
थापते चार
खायला सारे
बेजार फार
-- माणिक (रुबी)
हृदयात वणवा होता
नजरेत ती होती
मंद गारवा हवेत
मनात उब होती
डोक्यात विचार होता
ओठावर कविता होती
मंद गारवा हवेत
शब्दात उब होती
भोवती प्रेम होते
सुंदर ती होती
मंद गारवा हवेत
तिच्यात उब होती
जगणे सुरू होते
जीवनात मजा होती
मंद गारवा हवेत
जगण्यात उब होती
जवळ ती नाही
फक्त कल्पनेत होती
मंद गारवा हवेत
स्वप्नात उब होती
© निलेश बामणे
अनुकरण करणे हा स्वभाव
काय मग म्हणू मी त्याला हो...।।धृ।।
स्वतंत्र बुद्धि तुम्हां असूनी
निर्णय शक्ती असते मनीं
दुजाचे जीवन यश बघूनी,
अनुकरण त्याचे करता हो....१,
अनुकरण करणे हाच स्वभाव,
काय मग म्हणू मी त्याला हो ...
त्याची स्थिती वेगळी होती
म्हणून यश पडले हातीं
वातावरण निराळे असती
तुम्हास सारे हे कळते हो.....२,
अनुकरण करणे हाच स्वभाव,
काय मग म्हणू मी त्याला हो ...
यशस्वी ठरला कुणी एक
जेव्हां केले प्रयत्न अनेक
विसरू नका नशीब ठीक
जे यशांत सहभागी होते हो....३,
अनुकरण करणे हाच स्वभाव,
काय मग म्हणू मी त्याला हो...
सोडून द्या अनुकरण ते
निर्णय घ्या जे बुद्धी सांगते
तुमचा आत्मा प्रभू असूनी
त्याजवरती विश्वास करा हो.....४
अनुकरण करणे हाच स्वभाव,
काय मग म्हणू मी त्याला हो ...
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
जीवन गंगा वहाते ,
फुलवित सारी जीवने ।
पडेल प्रवाहीं कुणी,
लागते त्याला वाहणे ।।१।।
काही काळ वाहतो देह,
डुबून जाणे अंतीम,
कसा वाहतो केंव्हा डुबतो,
प्रवाही वेगाचे हे काम ।।२।।
बुडूनी जाती देह प्रवाही,
कर्मे आतील तरंगती ।
वाहत वाहत नदी किनारी,
स्थीर होऊन काठी राहती ।।३।।
देह क्षणाचा जरी,
कर्मे राहती निरंतर ।
कर्तृत्वाच्या कल्पतरूची,
आठवण काढती इतर ।।४।।
त्या कर्माच्या राही आठवणी,
मार्गदर्शक बनती इतरा ।
डुबणाऱ्या देहाकडूनी,
सावध राहूनी कर्म करा ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
ठसका लागून प्राण जातो,
घशांत अडकून काही तरी ।
क्षणांत सारा खेळ आटपतो,
धडपड केली किती जरी ।।
हृदय जेव्हा बंद पडते,
उसंत न मिळे एक क्षणाची ।
केवळ तुम्हीं चालत असतां,
यात्रा संपते जीवनाची ।।
कांचेचे भांडे निसटता,
तुकडे त्याचे होऊन जाती ।
देहाचा काय भरवसा,
जेव्हां सांपडे अपघाती ।।
वाढ करण्या शरीराची,
पडत असती बहूत कष्ट ।
क्षणभंगूर देह असूनी,
केव्हांही होऊन जाईल नष्ट ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti