(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • तन मनातील तफावत

    देह मनाच्या वया मधील, तफावत ती दिसून येते
    चंचल असूनी मन सदैव, शरिर परि बदलत राहते...१,

    चैतन्ययुक्त ते मन सदा, स्थिर न राहते केव्हांही
    जन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही...२,

    परिस्थितीच्या चौकटीमध्यें, विचारांचा दबाव राहतो
    शरिराच्या सुदृढपणाचा, मनावरती परिणाम होतो...३,

    दिसून येते केव्हां केव्हां, मन अतिशय उत्साही
    परि शरिराचा दुबळेपणा, मनास त्याक्षणी साथ न देई....४

    विचित्र होते वातावरण ते, जेव्हां मनास साथ ना मिळे
    विचारांच्या चुका होऊनी, दु:खी होते जीवन सगळे...५

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • सुखाला माहीत नसते

    सुखाला माहीत नसते
    दुःखाचे दुःखद उमाळे
    अर्थाला माहीत नसते
    अनर्थाचे घातक सोसणे
    शब्दांना माहीत नसते
    वाक्यांचे अर्थ सारे
    वाक्यांना माहीत नसते
    शब्दांचे भाव सारे
    प्रेमाला माहीत नसते
    मायेचे पड वेगळे
    मायेला माहीत नसते
    प्रेमाचे आंधळे वागणे
    सुराला माहीत नसते
    लयाचे बोल न्यारे
    लयाला माहीत नसते
    सुराचे स्वर सारे वेगळे
    आनंदाला माहीत नसते
    वाईटाचे दिवस वेगळे
    वाईटाला माहीत नसते
    आनंदाचे हसणे आगळे
    डोळ्यांना माहीत नसते
    पापण्यांचे अश्रू खारे
    पापण्यांना माहीत नसते
    डोळ्यांचे ओल हळवे भिजणे
    पुरुषाला माहीत नसते
    स्त्रीचे मन नाजूकसे
    स्त्रीला माहीत नसते
    पुरुषाचे भाव तरंग वेगळे
    -- स्वाती ठोंबरे.
  • परमात्मा

    पुण्यपावन हे दत्तधाम
    कृष्णाकाठी, भक्तीचे
    त्रैलोकी शाश्वत कृपाळू
    स्वर्गद्वार ते मोक्षमुक्तीचे।।

    निश्चिन्ततेच्या महासागरी
    दर्शन आगळेच पंचत्वाचे
    दत्तगुरू, अखंड कृपाळु
    माहेर लडिवाळ गुरुकृपेचे।।

    तृप्तीचे श्वास तिथे निरंतर
    मनी कारंजे श्रद्धाभक्तीचे
    जीवास नाही, घोर चिंता
    ध्यास मनहृदयी विरक्तीचे।।

    मन ब्रह्मानंदी विरुनी जाते
    सत्य, दर्शन होते आत्म्याचे
    परमात्मा! तो परमकृपाळु
    रूप! भवसागरी दत्तकृपेचे।।

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ४३.

    ११ - २ - २०२२.

  • राजमाता कैकयी

    अकारण कां नांवे ठेवता सदैव कैकयीला ।
    चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला ।।धृ।।

    जेव्हां दशरथ युद्धास जाई ।
    कैकयी त्याच्या सेवेत राही ।।
    राजनीति अन् युद्धनीति ही ।
    अवगत झाली सारी तिजला ।।१।।

    चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला

    नजीकच्या त्या देशामधूनी ।
    रावणादी असुरी शक्ती वाढूनी ।।
    सामान्य जनाला जर्जर करुनी ।
    हा हाः कार तो माजविला ।।२।।

    चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला

    परिस्थितीला जाणून घेतां ।
    केवळ चौदा वर्षाकरीता ।।
    राम वनी तो पाठवी माता ।
    तोड नसे त्या दूरदृष्टीला ।।३।।

    चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला

    माता आणि राजधुरंदर ।
    दुहेरी भूमिका ही शिरावर ।।
    निर्णय घेऊनी अतिशय खडतर ।
    इतिहास जिने घडविला ।।४।।

    चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला

    रावणवृत्ती महा असूरी ।
    नष्ट केली तिनेच खरी ।।
    मार्ग निवडले जरी कांटेरी ।
    यशस्वी केले रामप्रभुला ।।५।।

    चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला

    धाडीला नसतां राम वनीं ।
    मारीला असता रावण कुणी ?
    स्वतःचे शिरीं कलंक घेवूनी ।।
    धरणीवरचा पाप भार रोकला ।।६।।

    चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

  • शृंगार वेलीवर एक वेल बहरावी

    शृंगार वेलीवर एक वेल बहरावी
    हलकेच स्पर्शात तुझ्या सांज मोहरावी
    तप्त ओठांवरी ओठ आल्हाद टेकता
    चुंबनात न्हाले दोन तन एकांत क्षणा
    मिठीत अलवार स्पर्श सोहळे सजले
    साखर चुंबनात ओठ ओठांना भिडले
    वारा ही तेव्हा अवखळ बावरा होता
    पदर वाऱ्यावर उडून लाज डोळ्यांत साठता
    केशर संध्या समयी पाऊल वाटेवर थबकले
    हात हातात अलगद नजर स्पर्श काही बोलले
    धुंद वेळ ती गंधित फुलला मोगरा तेव्हा
    ओल्या सांजवेळी केसात तिच्या रमला केवडा
    नजरेचे बहाणे नजरेच्या चालल्या खुणा
    रातराणीत गंधाळला तिच्या चुंबनाचा लाल विडा
    मलमली भाव मखमली पहाट ती जवळ येता
    चंद्र पाहतो प्रिये तुज लाजू नकोस तू आता
    -- स्वाती ठोंबरे.
  • तप- शक्ती

    तप आणि सत्याची,

    महान असे शक्ती,

    वाढवूनी बघा तुम्ही,

    प्रभूस ती खेचती ।।१।।

    तप वाढता तुमचे,

    झुकेल तो ईश्वर,

    हतबल होत असे,

    भक्त जणांसमोर ।।२।।

    विश्वाचा तो मालक,

    दिसत नाही कुणा,

    प्रयत्न होवूनी व्यर्थ,

    निराशा येई मना ।।३।।

    मिळविण्यास जा तुम्ही,

    मिळत नसे केव्हां

    तपशक्ती वाढविता,

    आपोआप येई तेव्हां ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • जीवन ध्येय

    प्रभूची लीला न्यारी विश्वाचा तो खेळ करी

    कुणी न जाणले तयापरी हीच त्याची महिमा ।।१।।

    जवळ असूनी दूर ठेवितो आलिंगुनी पर भासवितो

    विचित्र त्याचा खेळ चालतो कोणी न समजे त्यासी ।।२।।

    मोठे मोठे विद्वान त्यांत कांहीं संतजन

    अध्यात्म्याचे ज्ञान घेऊन विश्लेषण करिती प्रभूचे ।।३।।

    कांहीं असती नास्तिक कांही असती आस्तिक

    त्यांत कांही ज्ञानी मस्तक चर्चा करिती प्रभूची ।।४।।

    सत्य परिस्थीती ऐसी कुणी न जाणले प्रभूसी

    सर्वांची चालना तर्कासी प्रभू अस्तित्वा विषयीं ।।५।।

    फक्त एकमुखी वाच्यता असे ती सर्वता

    महान शक्ति असता त्या ब्रह्मांडामध्यें ।।६।।

    सर्वानी जाणले एक 'अपूर्व शक्ती' ह्याचा चालक

    त्याच उर्जेचे हे प्रतीक सारे विश्वमंडल ।।७।।

    कुणी नाहीं दुजा भाव समजोनी त्या शक्तीची ठेव

    ज्ञान विज्ञान देती नाव निरनिराळे त्या शक्तीसी ।।८।।

    कुणी म्हणती राम कुणी म्हणे रहीम

    कुणी संबोधती गौतम येशू असे कुणाचा ।।९।।

    परी तत्व नसे वेगळे नांवे होत निरनिराळे

    सामान्यास ते न कळे हीच खरी शोकांतिका ।।१०।।

    सारे जीवन निघून जाई परी त्या शक्तीचा बोध न होई

    विश्लेषण करीत राही त्याच्या अस्तित्वाविषयी ।।११।।

    जाणावी ती शक्ती रुप आकार त्यासी नसती

    शक्ती समजोनी करावी भक्ती आदरभाव ठेवून ।।१२।।

    मानवजन्म श्रेष्ठ ठरविला विशेष बुद्धी मिळून त्याला

    विचार शक्ती उमजण्याला सर्वप्राण्यामध्ये ।।१३।।

    बहूत झाले विद्वान कर्तव्याने मिळवी मान

    मानव जातीची ती शान ह्या संसारी ।।१४।।

    मार्ग निरनिराळे दाखवी सारे मिळती एक ध्येयी

    सर्वार्पण त्या शक्ती होई ध्येय मिळतां जीवनी ।।१५।।

    विचार करा मनाशी वैर आपले आपणाशी

    नसते केंव्हां प्रभूशी हेच मूळ दुःखाचे ।।१६।।

    वाद नसतो ध्येयापरी चर्चा असे मार्गापरी

    हीच मानव निर्मिती खरी सर्व सुख दुःखाची ।।१७।।

    तथा कथीत पंडित विद्वान सामान्यात

    बहूजनांपेक्षां ज्ञान त्यांचे थोडेसे ज्यास्त ।।१८।।

    वापरुन ज्ञान शक्ती सामान्यजनास वाकविती

    आपले अस्तित्व स्थापती विसरुन प्रभू शक्तीसी ।।१९।।

    तर्क शक्ती थोर “आहे चा नाही” करणार

    “नाहीं ला आहे” पटविणार , करुनी ज्ञानाचा खेळ ।।२०।।

    मार्गाचा करुनी भेद वाद करीत राही

    जीवन करी बरबाद विसरुनी ध्येयासी ।।२१।।

    ध्येय हे साध्य, मार्ग हे साधन

    वाया जाई आयुष्य माध्यम साधन समजून ।।२२।।

    साध्य नका समजू साधनासी ठेवा विश्वास साध्यासी

    कोणत्याही साधनाने साधका प्राप्त साध्य होई ।।२३।।

    अनेक मार्गाचे प्रयोजन ज्ञान शक्ती वापरुन

    स्व अस्तित्व ठेवण्या टिकवून ।।२४।।

    आस्तित्वाची भावना मोठी प्रत्येक झगडतो त्यासाठीं

    सकळजन आयुष्य खर्ची त्या पोटी ।।२५।।

    न कळे त्यास देवपण भांडण्यांत जाई विसरुन

    टाकी आयुष्य मातीमोल करुन ।।२६।।

    विसरुन जा सर्व भेद मिटवा वादविवाद

    नष्ट करा त्वरीत लहान मोठ्यांचा संवाद ।।२७।।

    न कुणी मोठे न लहान सारेच आहे समान

    असती सारे मानवनिर्मित घ्या सारे समजून ।।२८।।

    ज्ञात धर्म होत अनेक हे मानवनिर्मीत प्रतिक

    न कळे अज्ञाना सर्व मार्गाचे ध्येय एक ।।२९।।

    मानव शक्ती तीच ईश्वर दुसरा नसे कोणी वर

    सगुण रुप देऊनी आपणची देतो त्यासी आकार ।।३०।।

    मानवता हाच धर्म खरा आपसातील भेद विसरा

    जीवन सुखी करण्या प्रभू देई तयांना आसरा ।।३१।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    9004079850

    bknagapurkar@gmail.com

  • ती पण तशीच

    ती पण तशीच
    तो पण तसाच..
    दोघेही विकृतच
    म्हणावे लागतील...
    त्याने समाजाची,
    पैसा मिळावा म्हणून
    वाट लावली तर तिने
    स्वतःच्या भुकेसाठी...
    दोघांच्या भुका घातकच
    आज दोघांचे चेहरे
    त्यांच्या विकृतीमुळे
    संध्याकाळी विझू पाहत आहेत
    अजूनही लंगडत लंगडत
    तो त्याची विकृती सांभाळून आहे...
    त्याला माहित आहे..
    आपला शेवट जवळ आहे..
    तरी पण विकृतीला चिकटून आहे
    त्याची सत्तेची हाव..पैशाची हाव
    तशीच आहे...
    हे पण स्वतःवरचेच
    प्रेम आहे पण विकृतच
    असे अनेक तो आणि ती
    आपल्याला आपल्याच
    आजू-बाजूला
    दिसतात तेव्हा जाणवते...
    कालाय तस्मे नमः.....

    -- सतीश चाफेकर.

  • सदैव जागृत रहा

    झोप घ्या हो शांत, जागृत राहूनी तुम्ही,

    विचित्र वाटे ही रित, परि येई तुमचे कामी ...१

    विश्रांती लागत असते, गरज म्हणून शरिराला

    ती तर मिळत नसते, केव्हांही तुमच्या मनाला ..२

    चंचलता हा स्वभाव, आहे आपल्या मनाचा,

    शांत करण्या मना, उपाय नसे झोपेचा..३

    एकाच दिशेने धावूनी, मिळवते मन विश्रांती

    एकाग्र चित्त असणे, उपाय हाच त्यावरती...४

    चित्त करूनी एकाग्र, दिशा त्यास या प्रभूसाठीं

    मिळेल सारे तुम्हां, जागृत राहण्या पोटी...५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५९

  • वचन

    वाणी मधूनी शब्द निघाला, कदर त्याची करीत होते ।
    मुखावाटे बाहेर पडे जे, वचन त्याला समजत होते ।।
    दिले वचन पालन करण्या, सर्वस्व पणाला लावीत होते ।
    प्राणाची लावून बाजी, किंमत शब्दांची करीत होते ।।
    स्वप्नामध्ये दिले वचन, हरिश्चंद्र ते पालन करी ।
    राज्य गमवूनी सारे आपले, स्मशानी बनला डोंबकरी ।।
    प्राण आहूती देई दशरथ, वनी धाडूनी राम प्रभूला ।
    पालन केले तेच वचन, रणांगणी दिले जे कैकयीला ।।
    आज लोपूनी तेज वाणीचे, तुटले विश्वासाचे नाते ।
    बदलूनी जाती क्षणात सारे, घटकेपूर्वीचे शब्द जे होते ।।
    मित्र वा आप्त कुणी, आई-बाप वा भाऊ-बहीण ।
    स्वार्थीभाव अंगी मुरूनी, पाळीत नाही आपले वचन ।।
    अंतर्यामी बसला ईश्वर, जाण त्याची सदैव असावी ।
    ‘वचन’रूपे व्यक्त होई , हीच भावना मनी ठसावी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com