कृपा होऊनी शारदेची,
कवित्व तुजला लाभले
शिक्षणाच्या अभावांतही,
भावनांचे सामर्थ्य दिसले ।।१।।
कुणासी म्हणावे ज्ञानी,
रीत असते निराळी,
शिक्षणाचा कस लावती,
सर्व सामान्य मंडळी ।।२।।
कोठे शिकला ज्ञानोबा,
तुकोबाचे ज्ञान बघा,
दार न बघता शाळेचे,
अपूर्व ज्ञान दिले जगा ।।३।।
जिव्हेंवरी शारदा,
जेव्हा वाहते प्रवाही,
शब्दांची गुंफण होवूनी,
कवितेचा जन्म होई....४
भाव शब्दांचा सुगंधी हार,
माझी अंबिका भवानी
वाहत रहा आनंदाने,
यशस्वी होशील जीवनी ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
ओठावरले गीत माझे, आज कसे हे रुकून गेले
गीतामधले शब्द रूकता, ओठ कसे हे सुकून गेले....।। धृ ।।
आकाशातील थवे पाहूनी,
चंचल माझी नजर झाली
भिर भिरणाऱ्या दृष्टी पटावर
असंख्य चित्रे उमटूनी गेली
चित्र बघूनी नाचे मन जे
पाषाणा परी स्थिर कां झाले....१
ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले
गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले
झूळझूळ वाहे सरीता पाणी
पाण्यावरती दिसे तरंग
हलके हलके भिजवी अंग
पुलकीत करी रोम रोम जे
थंड आज परि होता दिसले....२
ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले
गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले,
सारे कांहीं तसेच आहे
सभोवतालचा निसर्ग ठेवा
अंतर्मनही माझे आपले
लुटीत असे जो सुखद मेवा
परि दोन्हीमधले अंतर ते
आज भासते दूर जाहले...३
ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले
गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
रक्तातुनी गुण-दोष उतरतो, वंश परंपरेने
व्यक्तीतील स्वभाव धर्म, जाणता येतो रक्ताने...१,
मनांतील विचार मालिका, कृत्य करण्या लाविती
सभोवतालच्या परिस्थिती रूपे, रक्ताला जागविती...२,
कर्म फळाच्या लहरींना, रक्त शोषून घेई,
ह्याच गुणमिश्रीत रक्तामधूनी, बिजे उत्पन्न होई....३,
बिजांचे मग रोपण होवूनी, नव जीवन येते
स्वभाव गुणांची मालिका, अशीच पुढे जाते...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
नियमित जाऊनी मंदिरी, श्रवण करी तो किर्तन
तन्मयतेनें ऐकत असतां, जाई सदैव तेथे झोपून...१,
एकाग्र करिता चित्त प्रभूसी, निद्रेच्या तो आहारी जाई
निघूनी जाती सर्व मंडळी, एकटाच तो तेथे राही....२,
पवित्रतेच्या वातावरणीं, प्रभू नामाच्या लहरी फिरती
झोपीं गेला कोपऱ्यांत तो, परिणाम त्या त्यावरी करती....३,
शांत असूनी निद्रीस्त इंद्रीये, शोषूनी घेती त्या लहरी
आनंदाचे वलय भोवती, समाधान ते त्यास करी....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
ते देखणे मंदिर होतं. सुशोभीत केलेलं… चकचकीत… बऱ्याच जणांची तिथे गर्दी झालेली… कुणाला कशासाठी न्याय हवा होता, कुणाला कशासाठी… कुणावर अत्याचार झाला होता, कुणी अन्यायाची शिकार झालेलं… प्रत्येकाची बाजू वेगवेगळी… न्याय मिळवून घेण्याची प्रत्येकाची घालमेलही वेगवेगळी… सगळेच फिरत होते… कोट घातलेल्या व्यक्तींच्या मागे… इकडून तिकडे… गरजवंताला आणि शोषीतांना काही कळत नाही… सांगतील तसे वाकतात ते… बिचारे.
अचानक हातात कागदाचे भेंडोळे घेऊन कोटवाल्यांची धावपळ सुरू झाली… तिकडे बिचाऱ्यांची पळापळ झाली… आता न्याय मिळेल असे बिचाऱ्यांना वाटू लागले होते… पण… झाले मात्र वेगळेच… न्यायाचे दान काही पदरात पडले नाही… सत्य काही समोर आलं नाही… बिचारे हताश झाले… उदास झाले… डोळ्यात पाणी दाटलं… तसेच निघाले होते माघारी… डोळ्यात पाणी दाटलेलं.. समोरचं चित्र धुकेलं… काही दिसेनासे झालेलं… त्याचवेळी एका बिचाऱ्याचा पाय लागला… तिथे पडलेल्या एका गाठोड्याला… तसे ते गाठोडं हललं… बिचारा भयंकीत झाला… हादरला.. भ्यालाही… तसं ते गाठोड उभं राहिलं… म्हणालंही ‘कुणी लाथ मारली’ म्हणून. बिचाऱ्याची बोलती बंद झालेली… न्याय न मिळाल्याने ग्लानी आलेला तो बिचारा. झाल्या प्रसंगाने पुन्हा गांगरला.. काय बोलावे सुचेना… तरीही हिंमत एकवटुन म्हणाला… ‘माझाच पाय लागला तुम्हाला… माफी द्या… पण… तुम्ही कोण? इथे कसे? का पडलात इथे?’ एका दमात त्यानं विचारून टाकलं सारं…. तसे ते गाठोडं थोडं मोकळं झालं… म्हणालं… ‘जेव्हा पासुन तुम्ही हे मंदिर बांधलं ना, तेव्हा पासुन मी इथेच आलोय रहायला… पुर्वी आत रहायचो… पण अलिकडे आत मला जागा मिळेनाशी झाली… तेव्हा मी माझं बस्तान हलवलं… बाहेर पडलो… मग इथे असतो पडुन… गपगुमान…’.
गाठोड्याच्या उत्तरानं बिचारा अधिकच गांगरला… काही कळेना काय होतयं… मी कोणाचा शोध घ्यायला आलो होतो मंदिरात … काय हवं होतं मला… न्याय की सत्य… मला न्याय हवा होता… समाजाला सत्य हवं होतं… सत्य ही न्यायाची देवता… म्हणजे या मंदिरात न्यायदेवता नाही… सत्य नाही… असा त्याचा अर्थ लावायचा का? बिचाऱ्याची मती गुंग झाली… काही केल्या त्याला काही कळेना… तसं गाठोडं म्हणालं… ‘हे मंदिर बांधलय खुप छान. दिमाखदार इमारत आहे त्याची. पण त्यात माझी किमत शुन्य झालीय, पैशांची मात्र वाढलीय. मंदिरात सत्याची लक्तरे वेशीवर टांगली जाऊ लागली… तसतशी माझी अवस्था खराब होऊ लागली… मंदिरातून मी बाहेर पडलो आणि इथेच पडुन असतो पडुन…’. आता कुठे बिचाऱ्याच्या डोक्यात प्रकाश पडला… म्हणजे मंदिरात मी जे शोधायला आलो होतो, जे मिळवायला आलो होतो, ते सत्य इथे बाहेर पडलयं…. गाठोडं होऊन… सत्याची ही अवस्था झालीयं.. कुणी केलीय… कशासाठी केलीयं… एक ना अनेक प्रश्न बिचाऱ्याच्या मनात उसळू लागले… तसा निर्धाराने त्याने गाठोड्याचा हात धरला म्हणाला, मी सामान्य माणुस आहे… साधारण आहे… पण सत्य बोलण्याची ताकद माझ्यात आहे… चल माझ्याबरोबर मी सांभाळीन तुला प्राणपणाने… असे बोलून बिचारा आणि गाठोड्यातलं सत्य दोघेही चालू लागले…!
दिनेश दीक्षित जळगाव.
एकटाच बसलो होतो, खोलीमध्यें शांत
करमणूक करीत होते, दुरदर्शन आत..१,
दूरीवरील व्यक्ती बघूनी, शब्द त्याचे ऐके
केवळ चावी फिरवितां क्षणी, दृष्य दुजे देखे...२,
जगामधली सर्व ठिकाणें, खोलीत अदृष्य तीं
साधनांचा उपयोग करीता, जाण त्याची येती....३,
वातावरण निसर्गाने, व्यापले सर्व जगी
सुक्ष्मापासूनी अनंततेचे, गुण एकाचे अंगी....४,
तेथे आहे जे येथेही, व्यापूनी सर्व स्थळी
ब्रह्माडांची व्यापकता, बिंदूत एका सगळी....५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
पर्वत शिखरीं जाऊन,खोदून आणली माती
कौशल्य पणास लावून,केला मी गणपती ।।१।।
मुर्ती बनली सुरेख,आनंद देई मनां
दाम मिळेल ठिक,हीच आली भावना
घेऊन गेलो बाजारीं,उल्हासाच्या भरांत
कुणी न त्यासी पसंत करी,निराश झालो मनांत
बहूत दिवस प्रयत्न केला,कुणी न घेई विकत
कंटाळून नेऊन दिला,गणपती मी शाळेत
भरले होते भव्य प्रदर्शन,हस्तकला कौशल्याचे
नवल वाटले गणपती बघून,दालनातील सुरवातीचे
चकीत झालो जाणूनी,मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
गणपतीच्या भव्यतेनी,मिळवीला हा अधिकार
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
एक बाबा थकलेला कमरेमध्ये वाकलेला
हातात काठी तुटका चष्मा उदासवाणा बसलेला
अंगावर सुरकुत्या चुरगळलेल्या स्वप्नांच्या
फाटकं धोतर फाटका सदरा अनवाणी चाललेला..!
कधीकाळचा सूर्य आज निस्तेज झाला आहे
करपलेल्या मनाचा एक कोपरा ओला आहे
डोळ्यांवर हात ठेवून वाट अजून पाहतो आहे
येईल कधीतरी लेक माझा शहरात राहतो आहे..!
वाट पाहून वाटा सरल्या नवी वाट दिसत नाही
काळोखात रडतो चंद्र, सूर्य कधीही हसत नाही
जगरहाटी चालू आहे वेळ कुणाला मिळत नाही
रोज मरणा-या बापाचं मन कधीच कुणाला कळत नाही...!!
राजेश जगताप
मुंबई..
९८२१४३५१२९
चिंव चिंव करुं नकोस चिमणे, बाळ माझे झोपले
काय हवे तुज सांग मला ग, देईन मी सगळे
कपाट सारे उघडून ठेवले, समोर ओट्यावरी
मेवा समजून लुटून न्यावे, डाळ दाणे पोटभरी
घरटी बांध तूं माळ्यावरती, काडी गवत आणूनी
कचरा म्हणूनी काढणार नाही, ही घे माझी वाणी
नाचून बागडून खेळ येथे, निर्भय आनंदानें
परि शांत न बसलीस तूं तर, जागेल बाळ तान्हें
चिंव चिंव करणे गीत आहे कां ? अंगाई तुमची
गावूनी आपल्या पिल्ला करीतां रमवी मने त्यांची
असे असेल तर चालू ठेव तूं चिंव चिंव ते गाणें
शाहणा माझा बाळ तो ठावे त्याला सोसणे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
खंत वाटली मनास कळला नसे व्यवहार ।
शिकला सवरला परि न जाणला संसार ।।
पुढेच गेले सगे सोयरे आणिक सारी मित्रमंडळी ।
घरे बांघूनी धन कमविले श्रीमंत झाली सगळी ।।
वेड्यापरी बसून कोपरी रचित होता कविता ।
कुटुंबीय म्हणती त्याला कां फुका हा वेळ दवडीता ।।
सग्यांच्या उंच महाली बैठक जमली सर्व जणांची ।
श्रेष्ठ पदीचा मान देवूनी कौतूके झाली कवितांची ।।
व्यवहारी निर्धन जरी तो विराजमान मनीं दुजांचे ।
ईश्वरी चैत्यन्न स्फुरले जे जे गुंफूनी ठेविले हार तयांचे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti