बांधले होते सुंदर घरटे, कौशल्य सारे एकवटूनी
वृक्षाच्या उंच फांदिवरी, लोंबत होते झोके घेवूनी...१,
दूर जावूनी चारा आणिते, पक्षीण आपल्या पिल्याकरिता
जग सारे ते घरटे असूनी, स्वप्न तिचे त्यांत राहता...२,
वादळ सुटले एके दिनी, उन्मळून पडला तो वृक्ष
पिल्लासाठी ती गेली होती, शोधण्यासाठी आपले भक्ष्य...३
शाबूत घरटे फांदी वरते, वृक्ष जरी तो पडला होता
पिल्लामधली ती कुजबुज, असह्य दशेत ऐकत होता...४
कित्त्येक वर्षीचे जीवन त्याचे, क्षणांत भूमिगत झाले
स्थिर बघूनी पक्षी घरटे, अखेरचे ते अश्रू गळले...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
राहू केतुनो सोडून द्या तुम्ही,मगरमिठीतून चंद्राला
बघा बघा ह्या प्रथ्वीवरती,काय तो हा: हा: कार मजला
प्रेमिजानांचा प्रेमबिंदू तो,सौंदर्याचा मुकुटमणी
झाकळला सारा नभात हा,म्हणती त्यास गिळला कुणी
आत्मा जाता सोडून देहा,उरे न कांही मागे
चंद्र चांदणे नभात नसता,सौंदर्याची मिटतील अंगे
सौंदर्यातची बघतो सारे,जगण्यासाठी सौंदर्य हवे
विश्वचक्र हे फिरत रहाण्या चंद्राचे आस्तित्व सतत हवे
नष्ट होतील जीवजीवाणू,आनंद त्यांचा जाईल विरुनी
बलिदानाच्या पुण्याईने परि, सुटेल चंद्र मगरमिठीतून
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
दिवा होता छोटासा, एक मजकडे
इन्धन मिळतां तेलाचे, प्रकाश तो पडे
तळांत होती योजना, तेल सांठवण्याची
शिरीं असूनी वात ती, क्रिया चाले जळण्याची
छिद्र पडतां तळाला, व्यर्थ जाई इंधन
मंदावली ज्योत दिव्याची, शक्ती ती जावूनी
देह आहे दिव्यासारखा, चैतन्य तेज तयाचे
प्रकाश फेकी आनंदाचा, इंधन मिळतां शक्तीचे
केंद्रित होते देह उर्जा, नाभीच्या भोवतीं
व्यय टाळून प्रवाही करा, तीच प्रभूवरती
ऐहिक सुखाच्या जातां मार्गीं, गुरफटतो संसारीं
तीच उर्जा प्राणास मिळतां, चेतवी ज्योत ईश्वरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
पाणी शोषत असतां ऊर्जा,
उकळ बिंदूवर येते ।
पाण्याचे रुप बदलूनी,
वाफ त्यांतून निघूं लागते ।।१।।
एक स्वभाव प्रकृतिचा,
स्थित्यंतर जेव्हां घडते ।
एक स्थिती जावून पूर्ण,
दुजामध्ये मिसळून जाते ।।२।।
तपोबलाची ऊर्जा देखील,
मानसिकता बदलून टाकीते ।
रागलोभादी षडरिपू जाऊनी,
साक्षात्कारी तुम्हां बनविते ।।३।।
तुम्ही न राहता, तुम्ही त्या वेळीं,
ईश्वरमय होऊन जाता ।
सारे परि ते तेव्हांच घडते,
परम बिंदूला जेव्हां पोहंचता ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
सुरां - सुरांचे गीत व्हावे,
अर्थवाही शब्दातुनी,
भावनांची गोड पखरण,
मंजुळ तराणे नादातुनी,--!!!
काळजाचा ठांव घेत असे, स्वाभाविक त्या गानातुनी, आलापातुनी अगदी अल्लद ,
स्वर्गीय गान निर्मितसे,--!!!
शब्द होती जिवंत केवढे,
संगीत वाहते निर्झरापरी,
सुरेल बनत आरोह अवरोह,
अंतिम ते हृदयस्पर्शी गाणे,--;!!
सूर लागता भान हरपतसे
डोहातून त्या तरंग उठती ,
स्वरमयी ती विलक्षण थरथर,
अंतरातुनी अगदी पार जातसे,--!!!
ताल-नादांच्या विश्वामध्ये, सुखदुःखे मागेच पडती,
आनंदाचे अविरत निधान,
थेट आत्म्याशी संवाद साधे,--!!!
माना -पानाच्या कल्पनांचे,
बुडबुडे आत आत विरती,
अहमभावाचे मोठे अडसर,
गानकला धुळीस मिळवती,--!!!
जसे सापडती मार्ग सुरांचे,
असुरी* भावना नाहीशा होती, आपल्यासाठी उघडे स्वर्ग ,
समोर ते गंधर्वच गाती,--!!!
© हिमगौरी कर्वे.
एकलव्यापरीं शिकलो विद्या, गुरुद्रोणा विणा
काव्यामधल्या जाणून घेतल्या, साऱ्या खाणाखुणा
शोधू लागलो प्रथम गुरुला, पद्य रचनेसाठीं
कुणी न शिकवी कला श्रेष्ठ ही, राहून माझे पाठी
उठत होती भाव तरंगे, अन आकाशी भिडती
शब्दांनी परि पकड न येता, निष्टूनी ती जाती
मार्गदर्शक तो भेटत नाही, खंत लागे मना आता
व्याकूळ झाला जीव बघूनी, मनाची ही दुर्बलता
गोविंदाग्रज नि केशवसूत, आणिक ग.दि.मा.
तांबे- बोरकर- यशवंत, सर्वजण आले कामा
ग्रंथ तयांचे सारे जमवूनीं, एकत्र ठेवियले
शब्द भावना यांची सांगड, मन करुं लागले
द्रोण मुर्तिपरी भासूं लागली, त्यांची ग्रंथ संपदा
काव्यामधली स्फूर्ति मिळूनी, आनंदी झालो सदा
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti