विश्व केवढे थोरले, मानव केवढासा बिंदू ,
तो तर केवळ एक थेंब
ब्रम्हांड सारे मोठा सिंधू ,--!!!
असे असता गर्व करी,
नको इतका अहंकार करी,
हातात नाही काही तरी,
उगीचच मिशीवर ताव मारी,--!!
मेंदू केवढा, बुद्धी केवढी,
आचार-विचार मात्र वेगळे, संस्कारांच्या नावाखाली,
पोकळ बढाया मारती सगळे,--!
हातात नाहीत पुढचे क्षण ,
काय घडेल त्याचा नेमच नाही, जन्मामुळे दुःखे भोगती,
म्हणत आता येऊ दे मरण,--!!!
जन्ममरणाचा फेरा चुकवत,
का कधी कोण आला - गेला,-?
प्रारब्धाच्या अगम्य चरकांत,
जो तो चिरडला गेला,
निघून जातो जीवनरस,
राहतात फक्त चिपाडे,
क्रूर केवढे नशीब म्हणावे,
त्याला पुन्हा चरकातूनच काढे,--!!
कसला अहम अन् कसली गुर्मी
साध्या जगण्याचीही नसे हमी, ज्याला त्याला अहंकार नासवी, माणसा जाण आपली कमी--!!
© हिमगौरी कर्वे
रावण नव्हता कुणी राजा, ती होती व्यक्ति
व्यक्तीचा तो इतिहास नव्हता, ती होती प्रवृत्ति....१,
आजही दिसती कित्येक आम्हा, रावण या जीवनीं
कशी रंगेल जीवन कथा, रावणा वांचूनी...२,
विरोधात्मक बुद्धी तुमची, अडथळे आणते
क्रोध, लोभ, अहंकार गुणांनी, प्रवाहाला रोकते...३,
सद्गुणांचा पाया खोलवर, जेवढा तो गेलेला
रावण वृत्ति हार जाईल, त्याच मग वेळेला....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
शरद ऋतूचे आगमन होता ....
झळकत येतो अश्विन मास !!
तरुणाईच्या जल्लोषात अन ....
थोरांचा तो जागरहाट !
घट बसता नवरात्राचे
प्रतिपदा ते नवमीचे !!
सज्ज झाली महिषासुरमर्दिनी...
असुरांचा वध तो करावया
अखंड दीप हे प्रतीक असे .....
शक्ती अन त्या वायूचे !!
लहरी त्याच्या दाही दिशातही .....
घननीळा त्या बरसतात !
नवरात्रीचे नऊ रंग हे ,
बहरत जाती चोहीकडे !
नेवेद्याचा थाटमाट तो ,
पुरणा - वरणाचा
घरोघरी सुटे घमघमाट
पंचपक्वानाचा !!
मान मिळे तो कुमारिकेला ...
नवरात्री ती देवीसम भासे
गरबाचा गजर अन ठेका,
गोलाकार घट मंडल असे
पाठ करुनी सप्तशतीचे ,
करुणा भाकू भक्तीची!!
हे देवी ज्ञान मिळू दे ...
त्या विद्येचे अन विज्ञानाचे
दुःख दूर सार , ......
विनाश अन दारिद्र्याचे
महालक्ष्मी , महासरस्वती , महाकाली
अशी अनेक रुपी तुझी सम भासे !!
दशमीचा तो दिवस उजाडे
दसरा सण मोठा ,
नाही आनंदाला तोटा !!
पूजन करूनी शस्त्र ...व
सरस्वतीचे ....
सीमोल्लंघन अन शमीपूजनाचे !!
सोने लुटूया आपट्याचे ,
आनंदाचे अन एकोप्याचे !
एकच ध्यास तो हिंदुत्वाचा
दरवळ भासे चोहीकडे !!
© ** राज **
सौ . राजश्री भावार्थी
सिंहगड रोड, पुणे
https://www.facebook.com/rajashri.bhavarthi
धडपड असते प्रत्येकाची जगण्यासाठी,
तेच जगती जगी या शक्ति ज्यांचे पाठी...१,
बुद्धी, अनुभव, विचार, बळ शक्तीची रूपे
यश मिळविण्या जीवनातील हीच मोजमापे...२,
नीती-अनिती, पाप-पुण्य, सामाजिक बंधने
सरळमार्गी जगण्यासाठीं हवीत ही कारणे...३,
जन्म मृत्यूच्या रेषेवरती, उभा संकटकाळी
पशुसमान वागत दिसतो, मानव त्यावेळी...४,
प्रथम गरज भागवी सारे, स्वजीवनाची
आदर्श जगणे तत्वे राहती, मग नंतरची....५,
मृत्यूच्या दाढे मधूनी, एक सुटून जातां
मृत्यूपाश टाकी दुजासाठी, स्व जगण्या करिता....६,
जगण्यासाठी मृत्यू आणि मृत्यूमुळेच जगणे
निसर्गाचे चाले अविरत हेच खेळणे....७
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
आजी आजोबा होते थकलेले
थकलेल्या वाड्यात रहात होते.
काळाने केला भयानक घात
सारं उद्ध्वस्त झालं भूकंपात
पण पडताना वाड्याने हात टेकले
आजी आजोबांना त्याने वाचविले
जख्मी वाड्याला बघून आजोबा खचले
अगदी थोडया दिवसांतच देवाघरी गेले
आजी मात्र एकटीच राहिली धीराने
वाडा नाही सोडला तिनं हट्टाने
म्हणाली, आहे मी अजून जिवंत मजेनं
या तूम्ही सारी असेच दर वर्षी हौसेनं
आम्हीही अधुन मधुन तिकडे जात राहीलो
वाड्याच्या अंगा खांद्यावर खेळत राहिलो
एके दिवशी आजीने देह सोडला
आणि आमचा उन्हाळा करपून गेला
एकाकी वाडा खूणवत होता
आतुरतेन आम्हाला बोलवत होता.
खचलेल्या वाड्याने मग धीर सोडला
मातीचा देह मातीला शरण गेला.
- डॉ. सुभाष कटकदौंड

राजा सूर्यदेवा तुला
माझा नमस्कार
तुझ्यामुळे उघडते
दिवसाचे दार
जीवन हर घडिला अवलंबूनी, आहे दूजावरी
व्यर्थ मग कां अभिमान, बाळगतोस उरी
नऊ मास होता गर्भामध्यें, जेंव्हा आईच्या
शोषण केले अन्न सारे, रक्तामधूनी तीच्या
माता पित्याच्या कष्टाचा तो, घाम गळत होता
तुझे बालपण फुलविण्या, ओलावा देत होता
घर गृहस्थीचे सुख भोवतीं, पत्नी मुला पासूनी
समाधान ते मिळतां तुजला, गेला बहरुनी
वृद्धत्वाला काठी लागतें, स्थिरावण्या तोल सदा
हातभार तो देईल कुणी, विवंचना हीच अनेकदा
मृतदेह जर तसाच पडला, किडे मुंग्या खाती
त्याही क्षणी मदत लाभूनी, चिता-अग्नी देती
जन्मापासूनी मृत्युपर्यंत, परावलंबी जीवन
कुणी तरी दिले तुजसाठीं, हे घे जाणून
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
बीजाचे समर्पण पहावे,स्वतःला देऊन टाकते,
एक तरु जन्माला यावे,
म्हणूनच स्वतःला गाडते,---!!
पुन्हा मातीत रूजून,
एकदम कात टाकते,
अंकुराचा स्वरूपाने ,
मातीच्या कुशीत येते,--!!!
काळी आई कुरवाळते ,
सर्व संगोपन करते,
बघता बघता नजरेत भरते,
अंकुराचे फोफावणे, --!!!
अंकुराचा त्याग करून,
बीज वाढीस लागते,
रोपट्याच्या स्वरूपात,
सानुले झाड उगवते ,--!!!
रोपट्याला फुटती पाने,
त्यांचेही वर जाणे,
करता करतां झाड वाढते,
हिरवेगार, डौलदार दिसते,--!!!
हळूहळू संपन्न होते,
घोंस लागती फुलाफळांचे,
झाड होते मोठे,
कधी रूप घेते वृक्षाचे,--!!!
फळे-फुले भरलेले,
वृक्ष घनदाट डंवरलेले,
कोसळती किती फळेफुले,
शेवट पुन्हा बीजरुपे,--!!!
© हिमगौरी कर्वे.
प्रयत्न करितां जीव तोडून, जेव्हां यश तुम्हा न येई
सोडून देता त्याला तुम्हीं, नशिबास दोष देत राही..१
दोष नका देवू नशिबाला, मार्ग निवडले तुम्ही चुकीचे
का न मिळाले यश तुम्हां, मूल्यमापन करा प्रयत्नाचे...२
चूक दिशेने प्रयत्न होतां, वाहून जातो सदा आपण
यश जेव्हा मिळत नसते, निराश होवून जाते मन...३
पुनः पुन्हा प्रयत्न करूनी, यश न आले तुमचे हातीं
प्रयत्नाची दिशा बदलतां, जुळून सहजच सारे येती...४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti