वेदना विपन्नावस्थेची सारी भोगूनी झाली..
तरीही प्रारब्धयोगे सारे सुखऐश्वर्य लाभले..
तरीही जीव हा मोहपाशात कां ? गुंतलेला..
वाटते जीवा ! बरेच काही अजूनही राहिले..।।..१
सांग मना , आज तुज जवळ काय नाही..
तुज श्रेष्ठ विवेकी जन्म लाभला मानवाचा..
वात्सल्यप्रीतीच्या सरोवरी तुडुंब रे डुंबला..
अनंत जन्मांचे हे भाग्य अलौकिक आगळे..।।..२
आज जीवात्म्यावर मंडरते रे सांज केशरी..
आत्माही भाळला श्रीरंगी मंजुळ वेणूवरती..
जीव आता मुक्तीच्या त्या विरक्त वाटेवरती..
तरी कां भासते जगायचे बरेच काही राहिले..।।..३
जन्मासंगेच मृत्यू , हेच सुर्यप्रकाशी सत्य..
त्या सत्याची दोरी त्या अनामीकाच्या हाती..
युगायुगांची पराधिनता ही तुझीच रे मानवा..
हव्यास कशाला अजुन काही जगायचे राहिले..।।..४
©️ वि.ग.सातपुते..(भावकवी)
9766534908
रचना क्र.५१/ २-४-२०२१
नकळत लोपले प्रहर , प्रहर
रूप प्राचीचे पश्चिमी ढळलेले
उभी यामिनी क्षितिजावरती
तरीही जगणेच नाही कळलेले
कळीकळीने मुक्त गंधाळावे
हेच सृष्टिचे , सत्यरूप रंगलेले
निर्माल्याचे , वरदान सजीवा
तत्व निर्मोही चराचरी रुजलेले
देतादेता सर्वस्वी मनी सजावे
अंती आठवावे सारे जगलेले
ओसंडिता अंतरी क्षण आनंदी
उधळावे तृप्त जीवन मंतरलेले
-- वि.ग.सातपुते ( भावकवी )
9766544908
रचना क्र. १७८
२३/७/२०२२
उंचावून झेप, नको घेवू उडी
खोल आहे दरी, पाय तुझा मोडी...१
अंदाज घे तूं, खोलीचा प्रथम
यश येई तुला, तया मध्यें ठाम...२
अनुमान काढ, आपल्या शक्तीचे
झेपेल कां ते, विचार युक्तीचे...३
निर्णय घ्यावेस, सदा विचारांनी
निराश न होई, त्यामध्ये कुणी....४
जाणून घे तूं, स्वत:ची पात्रता
यश असे पाठी, ज्याची जी योग्यता...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
बऱ्याचदा घरी एखादा खास पदार्थ खाल्ल्यावर आपण म्हणतो . . . बनलाय चांगला पण चव मागच्या वेळेसारखी नाही बरं का. किती सहजपणे बोलून जातो आपण. बनवणाऱ्या व्यक्तीने काही दिवस आधी ठरवून आणि काही तास मन लावून बनवलेला असतो हा पदार्थ. जीव ओतून केलेल्या या पदार्थावरची आपली एक कॉमेंट तिचा हिरमोड करायला पुरेशी ठरते आणि नव्याणव टक्के हा पदार्थ बनवणारी व्यक्ती तुमची आई किंवा पत्नी असते.
कशी असेल हो चव मागच्यासारखी सेम टू सेम? बाजारातून आणलेल्या जिन्नसांचं सोडा, पण इतरही अनेक गोष्टी कारणीभूत आहेत चवीत बदल करणाऱ्यासाठी. मला सांगा, पूजेच्या दिवशी सत्यनारायणाचा प्रसाद आणि इतर दिवशी त्याच मापाने बनवलेला शिरा वेगळा का लागतो बरं?
उन्हाळ्यात खाल्लेली आणि पावसाळ्यात खाल्लेली कांदा भजी वेगळी का लागतात? कितीही लज्जतदार जेवणाचा पहिला घास आणि शेवटचा घास सारखाच लागतो का हो ? नाही ना? कारण चवीची अनुभूती स्थलकालऋतू परत्वेच नव्हे तर तुमच्या मनस्थिती (मूड) वर पण अवलंबून असते, तुमच्या भूकेवर अवलंबून असते, तुमच्या त्या व्यक्तीवरच्या प्रेमावर पण अवलंबून असते.
एरवी बघताक्षणीच फस्त होणारे पिठलं भात घडलेल्या एखाद्या दुःखद प्रसंगानंतर खाताना कुठे चवदार लागतय सांगा बरं ! एखाद्या व्यक्तीच्या विरहात किंवा आठवणीत 'अन्न गोड लागत नाही' असे म्हणतात ते यालाच. पदार्थाची चव तीच असते, तुम्हालाच बेचव किंवा वेगळी लागते.
कधी तुमची नववी-दहावीतली मुलगी पहिल्यांदाच तिच्या आईच्या देखरेखीत एखादी साधीशी भाजी बनवते. किती धांदल असते तिची ! काहीतरी नक्कीच कमी पडलेलं असतं त्या भाजीत. पण कसले खुश असता तुम्ही. इथे कौतुकाच्या मसाल्याने त्या भाजीची चव बदललेली असते.
कधी सणकून भूक लागली असते, तेव्हा घरातली शिळी भाकरी पण गोड लागते. रोजच्या घाईत ऑफिसला निघता निघता कसाबसा प्यायलेला चहा आणि सुट्टीच्या दिवशी आरामखुर्चीत पेपर वाचत घेतलेला तोच चहा परत 'घोटभर' प्यावासा वाटतो. कधी कधी लग्न होऊन गेलेल्या बहिणीकडे जेवताना तुम्हाला प्रत्येक घासागणिक तुमच्या आईच्या हातच्या चवीची आठवण येते; टचकन डोळ्यात पाणी येतं आणि नंतरचा तो प्रत्येक घास त्या आठवणीत अधिकच चवदार होत जातो.
भुकेला धर्म नसतो, अन्नाला जात नसते, पण चवीला मात्र नातं असतं. खरंच सांगतो, चव फक्त पदार्थात नसते, चव मनात असते, चव प्रेमात असते, चव आठवणीत असते.
चवीची अनुभूती घेण्यासाठी जीभ नावाचे एक वेगळे इंद्रिय जरी देवाने दिले असले तरी त्या चवदार आठवणींचा अनमोल ठेवा जपण्यासाठी तुमच्या हृदयासारखी दुसरी जागा नाही. म्हणूनच हृदयात रुळणाऱ्या आणि जिभेवर रेंगाळणाऱ्या प्रत्येक चवीबरोबर एकातरी प्रिय व्यक्तीची आठवण नेहेमीच जपलेली असते... !!!
एकेकटे पाहून झाडं तोडता तुम्ही
दाटी असता वृक्षाची ......
अटकता ,लटकता ,
भटकता तुम्ही ....!
-- श्रीकांत पेटकर.
कौशल
शब्द माझा मोगरा, अन शब्द माझा पिसारा,
शब्द माझा बोलका,
नि तोच माझा किनारा,
तोलतो मापतो,वाटतो,
शब्दही सतत 'झुंज' देतो,
राखतो पूर्ण ताकदही,
सत्ताही पालटून देतो,---!!!
खेळतो खेळी कल्पनांची,
काव्यतुरेही तो खोवतो ,
राखतो बहुत अंतरे,---
नाना जिवांना सांभाळतो,--!!!
प्रकटे पण शब्दांतूनही,---
कितीक आकसनेमका,
तोच कधी जिंकून घेईल,
अनेक हृदय संपदा, --!!!
वाट दाखवी कधी,
वचन नित्य पाळतो,
'दटावे' कधी क्वचित,
गुरू होऊन सुधारतो,--!!!
शिस्त लावे 'करडी',
कठोर शिक्षणही देतो,
नेहमी जवळ घेऊनी,
आई बनुनी समजावतो,,--!!!
पित्यासमान हात देतो,
तरी जरब' वाटते बालका,-!!
वडील बनुनी धावतो,--
प्रसंगी,येतो कसा रक्षणां,--!!!
मित्र म्हणून मदत करी,
धावतो बिकट संकटा,
नातेही सगळी जपताना,
न करी विचार थोडका,---
शेजारी होऊन सख्खा
सावलीगत पाठीराखा,--!!!
अनोळखी हात देई,
प्रसंग उद्भवता बांका,
अलगद बाहेर काढतो,
त्यांतून ठरवून नेमका,--!!!
शब्द नेतो देवाजवळी,
हृदयांतर करी सारखा,
, आपल्या माणसांसाठी,
प्रसंगी नशिबाला धडका,-!!
शब्दांवाचून सर्व "निर्धन",
कवी त्याच्यावाचून पोरका,
शब्दच आमुचे अमोल रत्न,
बेलभांडार वाहते शब्दां--!!
©️ हिमगौरी कर्वे.
पहिल्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
चिंचा बहुत लागल्या
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।१।।
..............................
दुसऱ्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
पेरू बहुत लागले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।२।।
..............................
तीसऱ्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
संत्री बहुत पिकले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।३।।
..............................
चौथ्या माशीचा घडवा येतो येतो रे शिरवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
मोसंबी बहुत पिकल्या
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।४।।
..............................
पाचव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
डाळिंब बहुत पिकले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।५।।
..............................
सहाव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
द्राक्ष बहुत पिकले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।६।।
..............................
सातव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
आंबे बहुत पिकले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।७।।
..............................
आठव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
खरबूज बहुत पिकले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।८।।
..............................
नवव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
टरबूज बहुत पिकले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।९।।
भटकत जातो वाटसरू ,
जंगलामधील अज्ञात स्थळी,
आंस लागते जाण्याकरिता,
दूरवरच्या दिव्या जवळी ।।१।।
मार्ग जाण्याचे अज्ञात असूनी,
निराशेने वेळ दवडितो,
ध्येय दिसत असून देखील,
मार्गामुळे अडून पडतो ।।२।।
अज्ञानाच्या अंधारात ,
शोधत असतो असेच त्याला
मार्गदर्शन सद्गुरुचे,
न लाभता ध्येय मिळे कुणाला ।।३।।
वाट दाखवी सद्गुरु ,
प्रभूचरणी जाण्याचा,
दुवा साधतो आमच्यामध्ये,
त्यात एकरूप होण्याचा ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti