तुका.....!
युगे युगे गुलामगिरीत जगलेल्या,
अन माणसालाच जनावर बनवुन,
त्यांच्यावर अंमल करणार्या,
वर्णवादी व्यवस्थेवर आसुड ओढुन,
तु तुझ्या अभंग ओव्यांनी,
येथील भुमिपुत्रांच्या मेंदुवरील,
जळमट पाश काढुन,
तु माणसाला माणसात आणलं...!
गारूड केलं तुझ्या ओव्यांनी,
ईथल्या जनसामान्यावर...!
झाडा पाखरांत रमणारा तु,
आडाणी देवभोळ्या समाजाचे शोषण बघुन व्यथीत झाला,
आणि त्यांच्या देवालाच,
आव्हाण देऊ लागलास,
तेंव्हा मात्र हादरली ईथली व्यवस्था,
अन व्यवस्थेचे रखवालदार...!
मग मात्र त्यांनी,
यावर नामी उपाय काढला,
बुडवली तुझी गाथा,लेखनी,
इंद्रायणीच्या पाण्यात,
अन साक्षात तुलाही....!
अन उडवली हाळी तु सदेही
वैकुंठाला गेल्याची...!
पण त्यांना नव्हत माहीत की,
ईथल्या मातीत तु पेरलेलं बीज,
जस ईथं रूजलं ना तसच,
इंद्रायणीच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबरच
तुझी गाथा घरोघरी अन,
ओठा ओठांवर पोचलीय म्हणुन,
तुझ्या ज्ञानाच्या सागरात,
विलीन होऊन....!
©गोडाती बबनराव काळे,लातुर
9405807079
धडपड असते प्रत्येकाची जगण्यासाठी,
तेच जगती जगी या शक्ति ज्यांचे पाठी...१,
बुद्धी, अनुभव, विचार, बळ शक्तीची रूपे
यश मिळविण्या जीवनातील हीच मोजमापे...२,
नीती-अनिती, पाप-पुण्य, सामाजिक बंधने
सरळमार्गी जगण्यासाठीं हवीत ही कारणे...३,
जन्म मृत्यूच्या रेषेवरती, उभा संकटकाळी
पशुसमान वागत दिसतो, मानव त्यावेळी...४,
प्रथम गरज भागवी सारे, स्वजीवनाची
आदर्श जगणे तत्वे राहती, मग नंतरची....५,
मृत्यूच्या त्या दाढे मधूनी, एक सुटून जातां
मृत्यूपाश टाकी दुजासाठी, स्व जगण्या करिता....६,
जगण्यासाठी मृत्यू आणि मृत्यूमुळेच जगणे
निसर्गाचे चाले अविरत हेच ते खेळणे....७
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
ज्याचे चिंतन आम्हीं करितो
तोच 'शिव ' ध्यानस्थ भासतो
स्वानुभवे चिंतन करुनी
चिंतन शक्ति दाखवितो १
जीवनाचे सारे सार्थक
अन्तरभूत असे चिंतनांत
चिंतन करुनी ईश्वराचे
त्याच्याशी एकरुप होण्यात २
सारे ब्रह्मांड तोच असूनी
अंश रुपाने आम्हीं असतो
जेव्हां विसरे बाह्य जगाला
तेव्हांच तयात सामावितो ३
चिंतन असे निश्चीत मार्ग
प्रभुसंपर्क साधण्याचा
लय लागूनी ध्यान लागतां
आनंदीमय होण्याचा ४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bbknagapurkar@gmail.com
माझे मन आहे चण्याची पुडी
जड विचारांची तळाशी बुडी
भरले आहेत चणे फुटाणे
तेच चव साधती साधेपणे
मावत नाही काजू अक्रोड
कशास हवी ती डोकेफोड ?
लांब ठेविले बदाम मनुके
यास्तव मन हे हलके फुलके
चणा वाटतो आपलाच सहज
बाकी भासती किंमती ऐवज
नको बेदाणे खारीक पिस्ते
तेच घडविती विवाद नस्ते
चघळत बसतो एक चणा
मुरवत त्यातील साधेपणा .
-अजित देशमुख .
सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
मनावरचं ओझं हलकं करायला शिका.
प्रत्येक नातं शेवटपर्यंत टिकत नाही,
हे सत्य हसत स्वीकारायला शिका.
ज्यांनी साथ अर्ध्यावर सोडली,
त्यांच्यावर रुसत बसू नका.
स्वतःच्या आनंदाच्या शोधात,
नव्या वाटा चालायला शिका.
गेल्या क्षणांच्या सावल्यांत,
वर्तमान हरवू देऊ नका.
कालच्या वेदना विसरून,
उद्याच्या आशेला कवटाळायला शिका.
सोडून देणं म्हणजे पराभव नव्हे,
तो आत्मविश्वासाचा नवा आरंभ असतो.
मन मोकळं करून जगताना,
खरा आनंद स्वतःमध्येच सापडत असतो.
सोडून द्यायला शिका...
कारण काही गोष्टी हातातून निसटल्या,
की आयुष्य आपल्याला
स्वतःची खरी ओळख करून देतं.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
माणसें बेजार हल्ली
वाढले आजार हल्ली .
देव, गुरु, अध्यात्म, सिद्धी
मांडला बाजार हल्ली .
धर्म वेदी, माणसें अज
म्हणुन हा गोंजार हल्ली .
एक नुरला कार्यकर्ता
मात्र, नेते फार हल्ली .
लोपल्या पर्जन्यधारा
आसवांची धार हल्ली .
शत्रुची आतां न भीती
दोस्त करतो वार हल्ली .
माणसा माणूसकीचा
सोसवेना भार हल्ली .
‘भक्त‘ म्हणवत, जन विठूचा
टाळती शेजार हल्ली .
करत दो गोष्टी शहाण्या
मात्र जन दो-चार हल्ली .
अज : बकरा
-- सुभाष स. नाईक
Copyright © 2025 | Marathisrushti