पंचामध्ये मोठा पंच
गावगाडा सरपंच
सरकारचा दूत जसा
प्रश्नपत्रिकेचा संच!
घडो काहीबी गावात
बोला म्हणे सरपंच
लोकांचे धरी धनुष्य
आपला तुटतो प्रपंच!
बोलणे खातो तसाच
टवाळी विषय होतो
दिसली कडक टोपी
म्हणती माल हाणतो!
आरोपीच्या पिंजऱ्यात
रोजच खडा असतो
मतदानाच्या बुथवर
विरोधी राडा असतो!
आली जर का योजना
भोवती गराडा असे
निघली त्यांची बिले
आभाळी बघत बसे!
खरं बोलायला जावा
शहाणा झाला म्हणती
खोटं बोलायच तर
पंचायत मोठी होती!
तोंडदाबी बुक्की मार
घरावर तुळसीपत्र
शेंबडे पोर देते दम
मग मुळव्याधी सत्र!
नळ बघा, घाण बघा
मिटवा त्यांची भांडणं
नको नको म्हणताना
गळा आयोग लोंढणं!
हापशावरची चर्चा
तशी पांदीलाबी होते
सरपंच वरनं शाबूत
आत भुंगा पोखरते!
याचे दोन, त्याचे दोन
गुमान कामे करतो
भूषण एवढेच की
माणसांत देव पाहतो
पंचामध्ये....
-- विठ्ठल जाधव.
संपर्क - ९४२१४४२९९५
शिरूरकासार, जि.बीड
आत्म्याला ओढ असते
ईश्वराच्या मिलनाची
जाण सदैव राहते
प्रभुमय स्वरुपाची ।।१।।
अंशात्मक भाग असे
आत्मा हा परमात्म्याचा
उत्कंठ ते आकर्षण
गुणस्वभाव तो त्याचा ।।२।।
आत्म्यास पडले असे
बंधन ते शरीराचे
जीवन कार्ये करुनी
प्रयत्न करी मुक्तीचे ।।३।।
मुक्त होई त्या क्षणीं
अनंतात समावतो
परमेश्वरि रुपांत
विलीन होऊन जातो ।।४।।
आत्मा मुक्त होत असे
देहकर्म फळावर
चांगले कर्म नसता
नविन देह घेणार ।।५।।
दोन प्रकारांनी आत्मा
प्रभू समर्पण होतो
देह मृत वा सजीव
असतांना हे साधतो ।।६।।
ध्यान साधना करणारे
उतरती समाधीत
त्याच क्षणी शरिराला
आत्मा असे सोडीत ।।७।।
देह सोडूनी भुवरी
आत्मा येई बाहेरी
क्षणिक काळा करितां
मिलन होई ईश्वरी ।।८।।
समाधी असे साधन
प्रभू मिलन होण्याचे
देह समाधीत जाणें
सार असते जिवनाचे ।।९।।
जिवंतपणीच तुम्हीं
प्रभूमय होत असे
आनंदी नितांत क्षण
खराखुरा तोच असे ।।१०।।
आत्म चिंतन करुनी
आत्म ज्ञान प्राप्त होई
तोच ईश्वर असूनी
दुजा ठिकाणीं तो नाहीं ।।११।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
वाणी मधूनी शब्द निघाला, कदर त्याची करीत होते ।
मुखावाटे बाहेर पडे जे, वचन त्याला समजत होते ।।
दिले वचन पालन करण्या, सर्वस्व पणाला लावीत होते ।
प्राणाची लावून बाजी, किंमत शब्दांची करीत होते ।।
स्वप्नामध्ये दिले वचन, हरिश्चंद्र ते पालन करी ।
राज्य गमवूनी सारे आपले, स्मशानी बनला डोंबकरी ।।
प्राण आहूती देई दशरथ, वनी धाडूनी राम प्रभूला ।
पालन केले तेच वचन, रणांगणी दिले जे कैकयीला ।।
आज लोपूनी तेज वाणीचे, तुटले विश्वासाचे नाते ।
बदलूनी जाती क्षणात सारे, घटकेपूर्वीचे शब्द जे होते ।।
मित्र वा आप्त कुणी, आई-बाप वा भाऊ-बहीण ।
स्वार्थीभाव अंगी मुरूनी, पाळीत नाही आपले वचन ।।
अंतर्यामी बसला ईश्वर, जाण त्याची सदैव असावी ।
‘वचन’रूपे व्यक्त होई , हीच भावना मनी ठसावी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला
उभा विठ्ठल दारावरती, हेच तो विसरला ।।धृ।।
आईबाप हे दैवत ज्याचे
रुप पाही त्यांच्यात प्रभूचे
सेवा करीत आनंद लूटतां, तल्लीन जो जहला ।।१।।
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला
निद्रेमध्यें असतां दोघे
मांडी देऊनी आपण जागे
कशी मोडू मी झोप तयांची, प्रश्न विचारी भगवंताला ।।२।।
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला
विट देवूनी विठ्ठलासाठीं
उभे केले त्या जगत्जेठी
आपण गेला घेवून त्यांना, स्नानाकरिता चंद्रभागेला ।।३।।
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला
आठ्ठाविस युगे गेली उलटूनी
कटीवरती हात ठेवूनी
पांडूरंग बघे वाट तयांची, भक्तितच जे विसरती जगाला ।।४।।
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail – bknagapurkar@gmail.com
-- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
वेलींना तो आधार होता, वृक्ष वाटला दणकट परि
बुंधा ज्याचा किडूनी गेला, कोसळणार मग कधीतरी
नष्ट करिल तो तरूवेलींना, धरणीवरती आडवा होता
सौंदर्य दिले लताफूलांनी, सारे कांहीं विसरूनी जाता
वेलींनो आणि झुडपानों, सोडूनी घ्या तो आधार पोकळ
स्वतंत्रपणे तुम्ही जगण्या , स्वावलंबनाचे टाका पाऊल
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
भूकंप काय जाहला,
सारा इंडोनेशिया हादरला,
त्सुनामीच्या भीतीने,
जगभरातील मानव शहारला.....!!
भूकंपाचा भयकंप,
उडविल सगळ्यांचा थरकंप,
त्सुनामीची लाट,
लावील सगळ्यांची वाट........!!
असे घडेल आक्रीत,
घडेल एका रात्रीत,
सगळ्यांचा जीव टांगणीला,
असे केले होते भाकीत........!!
-- मयुर तोंडवळकर
युगानू युगें उभा राही, एका विटेवरी
कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी ।।धृ।।
आई वडिलांची सेवा
पुंडलीक भक्तीचा ठेवा
भक्तित होई तल्लीन
जगास गेला विसरुन
उभा करुनी तुजला, गेला निघूनी चंद्रभागेतीरी ।।१।।
कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी
विषाचा पेला
मीरेनें प्राशन केला
भजनांत गेली दंग होऊनी
पचविले विष तूं घेऊनी
दुधामधले विष शोषूनी, दाह त्याचा सहन करी ।।२।।
कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी
भक्तीत गुंगली राधा
तुमचा होता ध्यास सदा
कष्ट पडता संसारी
विसरुन गेली ती सारी
झेललेस तूंच ते वार पडले तिच्या पाठीवरीं ।।३।।
कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी
राहीला नाथाघरीं
आनंदाने पाणी भरी
श्रीखंड्या समजे तुजला
कुणी न जाणी भक्तीला
सुगंधी चंदन घासूनी, सेवा नाथाची करी ।।४।।
कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी
सखूसाठीं धावला
देह झिझविला
निवडणे केले, कांडणे केले
राशीभर धान्य दळले
उभा राहूनी पाठीं, सखूचे कामी मदत करी ।।५।।
कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
आला उन्हाळा आला घेऊन गरम गरम हवेच्या झळा
अंगाची करीत लाही जीवाची करीत काहिली
घामाच्या घेऊन धारा पंख्याचा शीतल वारा
तहानेने पाणी-पाणी शीतपेयांची आणीबाणी
सरबतांचा शितल मारा सगळे फ्रीजमध्ये सारा
आइस्क्रीमचा चाटा मलिदा सोबत थंडगार फालुदा
पेप्सी आणि कोकची जोडी गुलाबजाम वर कुल्फीची उडी
सर्दी खोकल्याची जोड गोळी उन्हाळ्याची दोस्तमंडळी
घराघरातून रहदारी उन्हाळी औषधांची घुसखोरी
डॉक्टरांची पायरी पाय ठेवायला जागा नाही वरी
आला उन्हाळा घेऊन गरम हवेच्या झळा
ये रे बाबा पावसा नको रुसून बसू असा
-- विनायक अत्रे.
Copyright © 2025 | Marathisrushti