हिंदोळा – मित्र चमूंचा

सुमनांजली या काव्यसंग्रहातून….. 



दिवस तुमचे आले हे आतां,
बाळांनो,
दिवस तुमचे आले हे आतां, ।
झोपाळ्यावरी झुलायचे ।।
अन्
झुलतां झुलतां, स्मृतींना सार्‍या स्मरायचे ।।धृ।।

बाल्य बाळांचे सरले सारे ठाणे या ग्रामीं ।
शोधिल्या सार्‍या, संधीसुवर्ण, तेथेही नामी ।।
वाणीनं लाघवी ऽ सकलां जवळ केले ।
साथींत तयांच्या मनीं चांदणं फुले ।।
दिन दु:खाचे ते सरले आतां,
आले क्षण हसत खेळत जगायचे ।।१।।

करुनि आटा नि पिटा सार्‍या जिवाचा ।
मार्ग शोधिला कष्टुनि चिर सौख्याचा ।।
“मंगल” मांगल्य या जीवनीं लाभतां ।
अमंगल ते, सारे दूर दूर सरतां ।।
हृदयीं शल्य न कसले आतां,
घेऊनि घटिका आल्या क्षण हर्षाचे ।।२।।

विचारपूस सदा सार्‍यांची करुनि ।
मदतीसाठी दिसा नि राती तत्पर धांवुनि ।।
सकलां ते अपुले अपुल्या घरचे वाटले ।
हृदय मंदिरीं हिरे हे, कोंदणीं ठसले ।।
मार्ग श्रमांचा तो सरला आतां,
दिन हे आलेत, हलकेच खिदळायचे ।।३।।

मित्र-चमुंनी गंध गुलाब फुलविले ।
आप्त-स्वकीय तोषिले मनीं अतुल परिमळे ।।
लाभो बाळां या, आयु शतका शतकांचे ।
बोल ठरतिल खरे, या दासगुचे ।।
काळ काळा, बाळांनो, सरला आतां,
उरले दिन, सौख्य-सागरीं डुंबायचे ।।४।।

-गुरुदास / सुरेश नाईक

२० डिसेंबर २००९
ठाणे

— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास

Author