पूर्णपणें मज पटले आतां
कविता कुणी करवून घेतो
कोण असेल तो माहित नाहीं
मजकडून तो लिहून घेतो
घ्यानी मनीं कांहींही नसतां
विषय एकदम समोर येतो
भाव तयांचे जागृत होऊन
शब्द फुले ती गुंफून जातो
एका शब्दानंतर दुसरे
आणि तिसरे, लगेच चौथे
शब्दांची ती भरुनी ओंजळ
माझ्या पदरीं कुणी टाकतो
गुंफण करुनी हार बनता
त्याजकडे मी बघत असे
फक्त प्रभूचे नाम घेऊनी
अर्पण त्याला करीत असे
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
-- स्वाती ठोंबरे.
रसर क्षणक्षण सरता
वर्षानुवर्षे सहजी सरती
भाळी भोग सुखदुःखांचे
चिरंजीव साऱ्याच स्मृती
निसर्गाची सारी किमया
अखंड कालचक्राची गती
स्मरणाचेच दान जीवाला
सत्कर्माचे संचित सदगती
सद्गुणांना रुजवीत जावे
सद्भावनां! सुखदाच अंती
क्षण! हरविले उरी जपावे
उसवित रहाव्या गतस्मृती
नवे वर्ष, ही नवी पालवी
ईश्वराची अगम्य अनुभूती
आनंदाने सुस्वागत करावे
हीच जीवनाची फलश्रुती
-- वि.ग.सातपुते.(भावकवी )
9766544908
रचना क्र. १६४
३१ - १२ - २०२१.
कुठे नाही स्वरूप देवा,
बघायला मिळत आम्हा,
काळीज नमते तुज पाहता,
चराचरातील या घटका, ---
निसर्ग मज वाटतो,
तुझेच रुप देवा,
तिथेच आम्ही तुला मानतो,
स्वरूप कोणते का असे बा,
ना तू कुठल्या देवळा,
ना कुठल्या मंदिरी,
प्रत्येकाच्या हृदयी
बसशी,असशी तू हरी,----
प्रेम, माया, ममता,
आपुलकी, जिव्हाळा,
कुठे तू नसशी
फक्त सांग मज गा ,---!!!!
माणुसकी जे जपती,
त्यांच्या मनोमनी तू ,
दया करुणा अहिंसा,
दाखवीत प्रगटशी तू,--!!!.
अनोळखी हात करता,
निरपेक्ष ती सहाय्यता,
बापुड्या दीन -दुबळ्या,
जिवांचा तू रक्षण कर्ता,--!!!
संकटात कोण पुढे येई,
कोण देईल अमोल दिलासा,
कोण आपला हात देई,
असता कुठली अवघड वेळा,--!!!
वैविध्य अन् वैचित्र्य ,
पाहुनी माणूस चकित होई,
कोण नेई शेवटास,
जिंकता जरी कुठली लढाई,--!!!
नीतिमत्तेची चाड नसता,
कोण ओढे फटकारे,
आत्म्यातला परमात्माच दाखवी, आपुले अस्तित्व बरे,--!!!!
हिमगौरी कर्वे.©
आता स्वतःसाठीही थोडेसे जगू या
आज थोडे या जगाला विसरु या
हृदयावरी या कोरलेली प्रश्नचिन्हे
आज ती हलक्या हातांनी रे पुसू या
घेत गेलो दुःख कोणाचे कुणाचे
आज अपुल्याही व्यथेला सावरु या
सोसल्या ज्या वेदनाही लपवूनी
एकमेकांना तरी त्या दाखवू या
प्रौढत्व माथी घेऊनी जे हरवले
कोवळेपण जाईचे ते भोगू या
खूप जळलो पाहुनी तम भोवती
आज थोडे चांदणेही पांघरु या
वाट ही ना संपली अजुनी तरी
काढण्या काटे पढीचे थांबू या
आयुष्य जगला का कुणी प्रश्नांविना?
समजाऊनी हे एकमेकांना; हसू या !
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
अस्तित्वशक्तीला बाधा येणें, अति भयंकर घटना ती
तयांना मृत्यूची वाटे भीति....।।धृ।।
गरिबीत जगती कित्येक,
भ्रांत पाडे ती भाकरी एक
जगण्यासाठीं झगडा देती, तयांना मृत्यूची वाटे भीति....१,
आरोग्याला धक्का बसतां
शरिर जर्जर होवूनी जातां
देह तारण्या धडपड होती, तयांना मृत्यूची वाटे भीति....२,
समाज रचना बघा कशी,
लौकिक जाई तो राही उपाशी
कुणी न दाखवी सहानुभूती, तयांना मृत्यूची वाटे भीति...३,
प्रवास करिता वाहनातूनी
अपघात शंका येई मनी
अवलंबून जे दुजावरती, तयांना मृत्यूची वाटे भीती....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
*गझल*
*वृत्त :- भुजंगप्रयात*
*लगावली :* लगागा लगागा लगागा लगागा
नको वागणे आज झाडाप्रमाणे
तया लोटते जग कवाडाप्रमाणे
धनाचेच लोभी ,महाराज काही
किती वागती ते ,लबाडाप्रमाणे
सगेसोयरे फार लाडावले तू
तरी वार त्यांचेच भ्याडाप्रमाणे
तुझे दु:ख आहे, जरी फार मोठे
नको वागवू ते , बिऱ्हाडाप्रमाणे
कशाला कुणाशी ,अबोला धरावा
नसे जिंदगी जर, पहाडाप्रमाणे
तुला कर्ण कोणी, उगा का म्हणावे
तुझे दान आहे ,चिपाडाप्रमाणे
जरा खर्च कर तू ,जगी संयमाने
जगा भासतो तू ,घबाडाप्रमाणे
© जयवंत वानखडे,कोरपना
खिन्न मनानें बसला होता, उन्हांत एका खडकावरी ।
डबके घाण पाण्याचे, वातावरण दुषित करी ।।
किड्या-मुंग्यांचे वारूळ तेथें, आणिक पडला काडी कचरा ।
नजिक येईना वाटसरूं कुणी, बघूनी सारा गालिच्छ पसारा ।।
सोडून देऊनी निवारा , नदीकांठच्या शिखरीं गेला ।
निर्मळ करूनी जागा, आश्रम त्याने एक बांधला ।।
बाग फुलवूनी सुंदर तेथें फळा फुलांना येई बहर ।
राघू मैना मयुर पक्षी, गाऊनी नाचती तालावर ।।
निसर्गरम्य सौंदर्य ठेवा, बाळगला जो त्या परिसरी ।
धुंद राही तो सदैव तेथें विसरूनी इतर जनांपरी ।।
जमू लागले वाटसरू, घेती विसावा कांहींक्षण ।
विनानिमंत्रित येत होते, बघूनी प्रसन्न वातावरण ।।
लाभे प्रभू सहवास त्यांना, निर्मळ देही पवित्र मनी ।
तोच येईल तुम्हा भेटण्या, देह मंदिर केवळ बघूनी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
जगण्याची नाहीं शक्ती
मरण्याची आहे सक्ती ।।
कारा जग, मी तडफडतो
पण मिळतच नाहीं मुक्ती ।।
परमेश्वर साह्य करेना
तरि ढळे न माझी भक्ती ।।
काळास चकविण्याची मज
कळली ना अजुनी युक्ती ।।
लढलोही असतो रे, पण
हिंमतच मुळी ना रक्तीं ।।
नर हतबल भाग्यापुढती
मी सार्थ ठरवली उक्ती ।।
स्तुति दो शब्दांतच संपे
त्यातही असे पुनरुक्ती !
जीवन-रहस्य गूढच, पण
उकलिन मरणाच्या वक्तीं ।।
दाविल जो दोष जगाचे
पुरती त्याची कंबक्ती !
Copyright © 2025 | Marathisrushti