(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • पुनर्जन्म

    संघर्षाची बिजें जळतील, जाणतां तत्व पुनर्जन्माचे ।
    आपसांमधील हेवे-दावे, मिटून जातील कायमचे ।।

    फिरत असते चक्र भोवती, स्वार्थीपणाचे भाव आणिते ।
    त्यांनाच मिळावे सारे काही, जाणता स्वरक्ताचे नाते ।।

    उगम झाला जाती धर्माचा, स्वार्थीपणाच्या याच कल्पनी ।
    वाटीत सुटतो प्रेम तयांना, केवळ सारे आपले समजूनी ।।

    कन्या जेव्हां सासरीं जाते, नाती-गोती नवीन बनती ।
    वाटत होते परकीय जे, आज आपले होवून जाती ।।

    आपलेपणाच्या भावामध्ये, दडले असते प्रेम सारे ।
    शत्रू देखील तुमचे होतील, समजूनी येता नाते खरे ।।

    भाऊ बहीण, मामा, चुलते, दूरवरची आप्त मंडळी ।
    बंधन ते पडून प्रेमाचे, बांधली जाती एकत्र सगळी ।।

    कुणास कळले याचक्षणी, परका कुणीतरी दुरीचा ।
    नात्यामध्ये नजीक असूनी, ऋणानूबंध तो पूर्वीचा ।।

    ओढला जाईल आत्मीयतेने, अज्ञानाचा पडदा उठता ।
    पूर्वजन्मीचे ज्ञान शिकविल, आपापसातील मानवता ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

  • आपले अर्धे प्रेम

    कोणाच्याही अर्ध्या प्रेमाला जोडून
    पूर्ण प्रेम होत नाही
    निर्माण होतो तो आभास
    त्या अभासातून
    जन्माला शेवटी
    प्रेम अपूर्णच येते...
    दोन अपूर्ण प्रेमांना
    पूर्णत्व क्वचितच मिळते
    कारण आपले
    खरे ! अर्धे प्रेम
    मिळविण्यासाठी
    फार मोठी किंमत
    मोजावी लागते
    जी मोजण्याची
    हिंमत आजच्या
    स्वार्थी जगात
    बहुतेक कोणाकडेच नसते
    म्हणूनच आज
    प्रत्येकाचे प्रेम शेवटी
    अपूर्ण असते....

    © कवी - निलेश बामणे

  • जागर देवीचा

    शरद ऋतूचे आगमन होता ....
    झळकत येतो अश्विन मास !!
    तरुणाईच्या जल्लोषात अन ....
    थोरांचा तो जागरहाट !
    घट बसता नवरात्राचे
    प्रतिपदा ते नवमीचे !!
    सज्ज झाली महिषासुरमर्दिनी...
    असुरांचा वध तो करावया
    अखंड दीप हे प्रतीक असे .....
    शक्ती अन त्या वायूचे !!
    लहरी त्याच्या दाही दिशातही .....
    घननीळा त्या बरसतात !
    नवरात्रीचे नऊ रंग हे ,
    बहरत जाती चोहीकडे !
    नेवेद्याचा थाटमाट तो ,
    पुरणा - वरणाचा
    घरोघरी सुटे घमघमाट
    पंचपक्वानाचा !!
    मान मिळे तो कुमारिकेला ...
    नवरात्री ती देवीसम भासे
    गरबाचा गजर अन ठेका,
    गोलाकार घट मंडल असे
    पाठ करुनी सप्तशतीचे ,
    करुणा भाकू भक्तीची!!
    हे देवी ज्ञान मिळू दे ...
    त्या विद्येचे अन विज्ञानाचे
    दुःख दूर सार , ......
    विनाश अन दारिद्र्याचे
    महालक्ष्मी , महासरस्वती , महाकाली
    अशी अनेक रुपी तुझी सम भासे !!
    दशमीचा तो दिवस उजाडे
    दसरा सण मोठा ,
    नाही आनंदाला तोटा !!
    पूजन करूनी शस्त्र ...व
    सरस्वतीचे ....
    सीमोल्लंघन अन शमीपूजनाचे !!
    सोने लुटूया आपट्याचे ,
    आनंदाचे अन एकोप्याचे !
    एकच ध्यास तो हिंदुत्वाचा
    दरवळ भासे चोहीकडे !!

    © ** राज **

    सौ . राजश्री भावार्थी
    सिंहगड रोड, पुणे
    https://www.facebook.com/rajashri.bhavarthi

  • मी एकटी, मी एकाकी

    अरे, एव्हाना ती यायला हवी होती !
    अजून कशी उगवली नाही ती गवताची पाती !

    ती आल्यावर प्रार्थनेचे सुर उमटतात.
    आसमंत उजळून निघतो, लता वेली डोलू लागतात.

    सुरू होते पूजा अर्चना
    आणि सरस्वतीची आराधना.

    मध्येच पोटात कावळ्यांचा कलकलाट.
    खाऊ झालाच समजा सफाचाट.

    कधी कधी ऐकू येतो गलका.
    माझ्या कानांना मस्त बसतो दणका.

    थोड्या वेळाने परतायची वेळ होते.
    आमचं मन खट्टू होते.

    मी पुन्हा एकदा नव्याने उजळणी करते.
    आणखी एक आवर्तन पूर्ण होते.

    उद्याच्या पुनर्भेटीचा संकल्प ठरतो
    आणि सुर्य पश्चिमेला मावळतो.

    पण आता सगळं सुनसान आहे.
    सर्वत्र स्मशानकळा आली आहे.

    सगळीकडे जमली आहेत कोळीष्टके.
    सगळे आयत, चौरस झाले आहेत ओकेबोके.

    इकडे आणि तिकडे जमले आहेत धुळीचे थर.
    माणसाचा कुठे उरला आहे इकडे वावर.

    त्यामुळेच मनात काहूर उठलंय
    की ती आता कधीच येणार नाहीत की काय ?

    कधीची उभी आहे मी निष्पर्ण वृक्षासारखी.
    मी एकटी, मी एकाकी.

    प्रत्येक गावा गावातील शाळा.
    प्रत्येक शहरा शहरातील शाळा.

    -- शरद दिवेकर
    कल्याण
    70457 30570

  • वस्तीतल्या दिव्यांच्या

    वस्तीतल्या दिव्यांच्या,भाळी काय आले,--?
    उघडे --वाघडे घरदार,
    पाहून जीव निमाले,----

    उजेड देत गरीबा,
    सगळेच ते दमले,
    ओळीने घराघरात,
    वातावरण अंधारलेले,---

    निवारा फाटका तुटका,
    झोपडे मोडकळलेले,
    आभाळाचाच आधार आता,
    जसे काळीज फाटले,---!!!

    कण-कण प्रकाशाचा,
    आतून कसा थरथरे,
    काही त्यास कळेना,
    वाढून काय ठेवले,--?

    आईस येई कळवळा,
    रिकामे पोट पोरांचे,
    करू तरी काय आता,
    पेचाने हृदय द्रवले, ---!!!

    पोटासाठी धावतां,
    दुर्लक्ष घराकडे जाहले,
    झोपडीतून आरपार,
    किरण साक्षीस आले,---!!!

    वर आभाळ दिसतां,
    साऱ्या आशांचे उमलणे,
    येता उजेडाची तिरीप,
    वाटते आभाळच फाटलेले,--!!!

    © हिमगौरी कर्वे

  • सुखाची मोहमाया

    तप्त लोखंडात, लपली ती आग
    दिसे लाल लाल, जाळी सर्व भाग...१,

    सुंदर फूलात, सुंगध तो छान
    अवती भवती काटे, ते कठीण...२,

    विजेची ती तार, प्रकाशी दिव्याला,
    झटका तो देई, स्पर्श होता तिला..३,

    सुखाच्या पाठीशी, असे दुःख छाया
    न दिसे ती आम्हा, असे मोह माया...४

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • विधी कर्मांना सोडा

    रूद्राक्षाच्या माळा घालूनी,
    भस्म लाविले सर्वांगाला,
    वेषभूषा साधू जनाची,
    शोभूनी दिसली शरीराला ।।१।।

    खर्ची घातला बहूत वेळ,
    रूप सजविण्या साधूचे,
    एक चित्त झाला होता,
    देहा भोंवती लक्ष तयाचे ।।२।।

    शरीरांनी जरी निर्मळ होता,
    चंचल होते मन त्याचे,
    प्रभू मार्गास महत्त्व देतां,
    विसरे तोच चरण प्रभूचे ।।३।।

    विधी कर्मात वेळ दवडता,
    प्रभू सेवेसी राहील काय ?,
    देहाच्या हालचाली बघूनी,
    समाधानी तुम्हीं होत जाय ।।४।।

    सोडून द्या हे सारे सारे,
    जे मनास गुंतवी भलतीकडे,
    केवळ तुमचे शांत चित्त,
    नेईल तुम्हां ध्येयाकडे ।।५।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • नाते

    तुझे नी माझे कसले नाते
    अजून मला ते कळले नाही
    एकदा तरी तुज पाहिल्यावीना
    मजला काही करमत नाही ।
    ऊजाडताच दिवस नवीन
    रोज नव्याने तुला पाहतो
    रम्य त्या गत आठवणीने
    का पुन्हा रोमांचित होतो ।
    आता तरी तू सांग मजला
    काय आहे आपुले नाते
    का आजही तव आठवणीने
    मन माझे ग मोहीत होते ।

    सुरेश काळे
    मो. 9860307752
    सातारा.
    दि. ३ आक्टोंबर २०१८

  • मशाल

    श्री गुरू दत्ताचे अवतार, अवतरले या भूमिवर ।
    विविध नामे परि, दुर्बलांची करण्या कामे ।१।

    अक्कलकोटचे निवासी, स्वामी समर्थ आले उदयासी ।
    दैवी शक्ती अंगी, अंधारी चमकली ठिणगी ।२।

    मशाल घेवून हाती, आला धावत पुढती ।
    अति वेगाने, सर्वांची उजळीत मने ।३।

    कर्म योग आणि भक्ती, ह्या तीन ईश्वरी शक्ती ।
    एकत्र जाहल्या, मशालीत त्या समावल्या ।४।

    वाहत्या काळाच्या ओघात, ते शरीर झाले शांत ।
    जग सोडूनी, परि मशालीत शक्त ठेऊनी ।५।

    ही तीच मशाल घेवूनी, पुढती चाले दूजा कुणी ।
    वारसा त्यांचा, प्रेषित ज्या शक्ती ।६।

    जरी तो नाही जगी आता, तत्त्व कार्य ते मागे उरता ।
    मशाल रूपे, जन म्हणूनीच जपे तिजला ।७।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • आज यमुनेचा उर

    आज यमुनेचा उर,किती भरुनी आला,
    आनंदाने पाण्या तिच्या,
    पूर भरतीचा आला,--!!!

    गोकुळातील नंदकिशोर,
    मदतीस तिच्या धावला,
    कालिया -- मर्दनाने,
    गोकुळीचा त्राता झाला,--!!!

    गोकुळ तिचे सर्वस्व असता,
    बाल कान्हा तारक झाला,
    भितीने तिची काया थरथरता कृष्णस्पर्शे, जीव कृतार्थ झाला-!

    गोकुळावरील संकट केवढे,
    गोपगोपिकांवर जीवघेणे,
    गारठून भीतीने गेले, कृष्णावताराने वाचवले,--!!!

    लहानगे ते पुढे धावतां,
    बेचैनी येईल त्यांच्या चित्ता,
    पुढे उभे ते, आव्हानच संकटा,
    मात देत त्या अजस्त्र फण्या,--!!!

    यमुनेचे काळीज कापले,
    लेकरू जेव्हा उभे ठाकले, ललकारून सामोरी गेले,
    डोळा भीती उमटे त्यांच्या,--!!!

    थयथयाट शिरावर करतां,
    कृष्ण निवांत उभा राहिला,
    अवतारआभाळाएवढा,
    थक्क त्या सर्वांनी पाहिला,--!!!

    सहजच दुर्जनाचा अंत केला,
    रंग बदलला यमुनेचा,
    कालिंदी नाव तिचे पडता, चेहरामोहराच तिचा बदलला,--!!!

    हिमगौरी कर्वे©