भोवतालच्या जगाकडे मी जेव्हा डोळसपणे पहातो
मनाचा आरसा माझा मी अलगद उघडतो
वाटतो मला आंधळा
जगाच्या अधोगतीकडे पाहून
घेत असेल डोळे मिटून
वाटतो मला एकांध
घेत असेल संधी
एक डोळा मारुन
दाखवत नसेल ना लंगडा जीवनातला अधूरेपणा
पृथ्वीवर असता एक डोळा दूजा चंद्रावर रोखून
वेध नसेल ना घेत अनंताचा एखादा चकणा
पुढे आलेले दात दिसतात गाताना रडगाणे
पुढे आलेले डोळे वाटतात ओंगळवाणे
करतो विचार तेव्हा मी कसा असेन
मनाच्या आरशात माझ्या मीच कसा दिसेन
कदाचित दाखवीत नसेन ना मी
दोन पायांवर उभा असलेला एक पशू?
- यतीन सामंत
ह्या जीवनाच्या अस्तित्वाचे, ध्येय कोणते खरे ।
उत्तर याचे कुणा मिळेना, आज पावतो बरे ।।
संतसाधू आणि ज्ञानीजन, बहूत ते झाले ।
समाधानी परि एक मताचे, उत्तर नाही दिले ।।
खेळखेळणे उड्या मारणे, अन् खाणे पिणे ।
बालपणीच्या आनंदाला, नव्हते काही उणे ।।
विसरून जाता खेळ उड्या अन् , प्रेम करू लागलो ।
यौवनाच्या उंबरठ्यावरी, बहरून गेलो ।।
संसार करिता कळले आम्हा, जीवन दुजासाठी ।
प्रौढवयाची वर्षे घालविली, समाज सेवेपोटी ।।
वृद्धत्वाचा काळ येता, ओढ लाभली प्रभूची ।
आहिक सुख त्याग करुनी, जीवन मुक्तीची ।।
एक एक ती पायरी चढलो, जीवन शिडीवरी ।
शोधीत होतो 'आनंद' तेथे, मिळेल काहीतरी ।।
हर घडीला रूप निराळे, होते आनंदाचे ।
गुंतले होते संबंध तेथे, तन मनाचे ।।
ओढ प्रभूची लागली, जेंव्हां थकूनी गेला देह ।
संसारातील सर्व सुखाचा, निघून गेला मोह ।।
मृत्यूच्या जवळी जाता, विरून जाईल तमनम ।
कोठून आला कोठे गेला, याची न येई जाण ।।
आता त्याचा आनंद कोठे, असेल तो गुंतला ।
देहमनाचे वेष्टन नव्हते, ज्या घटकेला ।।
हा तर आहे केवळ ‘आनंद’ दुजा नसे काही ।
‘आत्मा’ ‘मुक्ती’ अशा परि यालाच नावे देई ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मुलाचे लग्न ठरले मन खूप अस्वस्थ झाले
आनंद तर झालाच पण काळजीने घेरले
सुनेचे आगमन होणार घरात बदल होणार
माझा मुलगा अन संसारही तिचा होणार
आजवर ह्या संसारावर हक्क फक्त माझा
भांडीकुंडी अन घरभर पसारही माझा
आता मात्र माझ्या संसारात तिची लुडबुड
मनाच्या ताणाने सुरु झाली भांड्यांची खुडबुड
भांड्यावर हात फिरवून त्यांना समजावले
पण मनाचे भांडे खडखडच राहिले
कारण आजवर मीच होते गृहिणी सर्वश्रेष्ठ
माझेच पदार्थ वाटायचे सर्वांना चविष्ट
आता माझी घरावरची सत्ता जाणार
माझा काळजाचा तुकडाही तिचा होणार
कोणाला सांगणार मी बापडी ही व्यथा
माझ्यातली आई लपवत होती सारी अस्वस्थता
एका डोळ्यात हसू एका डोळ्यात आसू
करू लागले तयारी मनाची होण्यासाठी सासू
शेवटी मनाला समजावले,
अरे सून तर येणार अन कुटुंबात बदलही होणार
पण आता कामांची विभागणी होणार
सारे तर नेहमीप्रमाणे पसारा करणार
पण आता आवरायला तिची मदत असणार
आजवर खूप केले संसार उभारण्यासाठी
आता थोडे जगू या फक्त स्वतःसाठी
आपली संसाराची खुर्ची जपून ठेवायचीच
पण आपल्या शेजारी तिची खुर्ची मांडायची
अशी झाली युती भावी सुनेशी मनाची
अन करू लागले तयारी मनापासून लग्नाची
आता तिच्या रूपाने आला आहे घरी आनंद
आता ठेवायचे आहे तिला कायम टवटवीत प्रसन्न
सौ. मंजुषा श्याम देशपांडे,
पुणे.
वाटत होता शांत मला तो, बघुनी त्याच्या हालचालींना
शिस्तबद्ध ते जीवन असूनी, हास्य उमलते त्याच्या मना....१,
अल्प बोलणें अल्प चालणें, आहार तोहीं अल्पची घेणे
प्रभू नाम ते मुखी असूनी, चिंतन त्याचे सतत करणे....२,
संघर्षाला टाळीत होता, परिस्थितीशी जुळते घेवूनी
वातावरण ते शांत ठेवण्या, प्रयत्न चाले लक्ष देवूनी...३,
अहंकार तो सुप्त असूनी, राग न दाखवी चेहऱ्यावरी
जगण्याचे ते प्रेम बघूनी, मोहाचे वेष्ठन दिसे शरिरी...४,
दाबता साऱ्या षढरिपूंना, बेगडी शांतता बाह्य दिसे
जिंकती त्यांनाच सहजपणे, खरी शांतता चित्तीं वसे...५
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
निरागस भावनांची गीतांजली
निर्मली, भावफुलांची रंगोली
दीपज्योत! अंतरी संवेदनांची
निक्षुनी! सुरेल सत्य गुंफलेली
सात्विक, प्रीतभाव मनसागरी
अलवार प्रसवती शब्द ओंजळी
राशी! सुखदुःखांच्याच ललाटी
झरझरते भावगंगा ओथंबलेली
झाले मुक्तमोकळे, अव्यक्त मन
शब्दफुले! कवितेतूनी गुंफलेली
काव्यप्रतिभा! वरदान दयाघनी
प्रतिभा! जणु प्रांगणी मंतरलेली
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ३४.
३ - २ - २०२२.
प्रेम-स्वभाव असे ईश्वरी गुण
मनीं ठसला हा आत्म्यांत राहून
प्रेम करावे वाटे आंतरिक ही ओढ
ज्याची मुळे खोल पडने अवघड
आपसांतील प्रेम आत्म्यातील नाते
न दिसता देखील बांधलेले असते
सर्व जीवाविषयीं सहानुभूती भासे
ह्रदयामध्ये ती सुप्तावस्थेत दिसे
आमचे राग लोभ बाह्य संबंधामुळें
षडरिपू विकार शारीरिक सगळे
वाईट गुणधर्म देहाशीं निगडीत
चांगले जे कर्म आंतरीक इच्छेत
राग येऊन केंव्हां दुष्कृत्य घडते
पश्चाताप वाटता मन शांत होते
कितीही दुष्ट असो प्रेम भाव असतो
आनंदाच्या प्रसंगीं उभारुन तो येतो
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
-- स्वाती ठोंबरे.
आपल्याला इच्छा आहे | प्रभू तुमच्या नामस्मरणाची | परंतू ऐकून घ्या |कहाणी आमच्या अडचणींची ।।
माझ्या झेपावत्या पंखांना
तूरेशिमपाश बांधलास
नि त्यांनी वसा घेतला मायेचा -- प्रेमाचा
आता या पंखांखालून
तू होऊ नकोस - रानभरी !
शस्त्रांचीच सवय होती
या माझ्या हातांना !
तू पेटत्या हातात फुलं दिलीस,
शस्त्रं आपोआप बोथटली
नि फुलांची वरमाला कधी झाली कळलंच नाही !
मी निघाले होते
स्वातंत्र्याचा पत्ता शोधीत
निखाऱ्यांचा वसा घेऊन
सोन्याच्या बेड्या तोडून
तू मला नजरकैद केलंस - तुझ्या प्रदेशात
थांब ! तुला जन्मठेप देण्यासाठी
मनाचा तुरुंग मीही खुला केलाय !
असा हसू नकोस
हा हात नाजूक आहे म्हणून....
या बोटांचा बंध
सोडवता येणार नाही - सात जन्म तरी !
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
शोभिवंत घर केले, आधुनिक बनलो मी
विविध वस्तू संग्राहिले, शोभा देण्या आले कामी
शिरे व्याघ्र, हरणाची, लटकाविली भिंतीवरी
झाडे रंगीत पानांची, कुंडीत शोभती बरी
काचेचा मोठा टँक घेऊनी, पाण्याने भरला
रंगीत मासे आंत सोडूनी, दिव्यानी प्रकाशिला
रंगी बेरंगी आकर्षक मासे, चपळाईने पाण्यांत पोहती
नयनाला ते मनोहर भासे, चित्त साऱ्यांचे वेधती
खेळून भूक लागली, हा विचार आला मनी
जीवंत किडे सोडले जली, खाण्यासाठी माशांना
शर्यत किडे माशांची, बघून वाटली गम्मत
भक्ष्ये पकडूनी किड्यांची, मासे असती जिंकत
मनी निराशा आली अवचित, विचार येता ध्यानीं
जीवन मरणाची ही शर्यत, जगे एक दुसऱ्यास मारुनी
परि निसर्गाची रीत निराळी, संधी देई जगण्याते
बंदीत टाकूनी किडे सगळी, वंचित केले त्या संधीते
निराश होऊनी जातां, काढून घेतले माशांना
जलाशांत सोडूनी देतां, आनंद झाला मनां
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti