रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट //
भावंडाचे संगोपन
रमवूनी त्यांचे मन
आईच्या कामी मदत देऊन
आनंदिले बालपणी, गीत गावूनी नीट //१//
रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट
लक्ष्य संसारी
प्रेम पतीवरी
मुलांची जोपासना करी
संसार सुखाचे प्याले, भरी काठोकांठ //२//
रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट
होता मुले मोठी
संसार त्यांचा थाटी
राहुनी त्यांचे पाठी
सुखासाठी त्यांच्या, करी देहकष्ट //३//
रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट
ईच्छा उरली नसे मनी
लक्ष्य सारे प्रभू चरणी
सर्वस्वी त्यासी अर्पुनी
विनवी ईश्वारासी, डोळे आता मिट //४//
रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
३१-१६१२८३
ठसका लागून प्राण जातो, घशांत अडकून काही तरी ।
क्षणांत सारा खेळ आटपतो, धडपड केली किती जरी ।।
हृदय जेव्हा बंद पडते, उसंत न मिळे एक क्षणाची ।
केवळ तुम्हीं चालत असतां, यात्रा संपते जीवनाची ।।
कांचेचे भांडे निसटता, तुकडे त्याचे होऊन जाती ।
देहाचा काय भरवसा, जेव्हां सांपडे अपघाती ।।
वाढ करण्या शरीराची, पडत असती बहूत कष्ट ।
क्षणभंगूर देह असूनी, केव्हांही होऊन जाईल नष्ट ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
कवि होणें सुलभ असावे रसिक होण्यापरि
जिवंत ठेविती कवितेला हीच मंडळी खरी
भावनेचे उठतां वादळ व्यक्त होई शब्दानीं
भाव शब्दांचा हार दिसतो काव्य ते बनूनी
भाव येणे सहज गुण तो मानवी मनाचा
परि बंदिस्त त्याला करणे खेळ हा कवीचा
शब्द पिंजरा नि भाव पक्षी ओळखी को रसिक
कवि मनाशीं 'स्व' भावांचे करी जुळवणूक
कविते वरली टीका टिपणी मूल्यमापन त्याचे
खरी चेतना रसिक असूनी भाव जागवी मनाचे
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
(काव्य, १५ ऑगस्ट २०१८ स्वातंत्र्यदिनाप्रीत्यर्थ )
आम्ही स्वतंत्र झालो , आम्ही स्वतंत्र आहो
स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
गर्जलो, “गटापुढती कुठल्या न नमवुं माथा”
अन् ‘पंचशील’-तत्वीं विश्वास पूर्ण होता
बदललो परी नंतर, नाहीं ‘अलिप्त’ उरलो
त्या पंचशील-तत्वा पुरते अम्ही विसरलो
निज राजकारणाचा अभिमान , परी, लाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
प्रगतिचें नांव घेउन वाढत ‘आयात’ राही
परकीय-चलन सरलें, आश्चर्य यात नाहीं
गंगाजळीच संपे , हातीं कटोरा धरला
जागतीकरण मारी देशी उद्योगाला
इंडस्ट्री ग्रस्त अजुन, ऐशीच ध्वस्त राहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
मुठभर सुदूरदेशीं ‘आय्. टी.’ मधून जाती
झालें भलेंच, होवो, पण लाख अन्य मरती
जणुं बनवतां न येती ‘कंझ्यूमर-गुडस्’सुद्धा
परदेश धरत लावुन ‘आयात-शुल्क’-मुद्दा
उणवलें शुल्क, प्रार्थत, ‘चलनी-प्रवाह वाहो’ ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
बेकायदाच रस्ते भूमीत बांधुनीया
साळसूद-देश म्हणे, ‘आमुच्या संगतीं या’
शेजारी, जो अपुला ‘व्यापार-पार्टनर’ही
घुसती दहशतवादी, त्यांना आधार देई
कळुनही विसंगति, कां, तूं गप्प वज्रबाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
परदेशी-कंपन्यांची चंगळ बहू जहाली
देशी उत्पादनांचा आलेख जाइ खाली
बेरोजगार वाढत , पसरते हलाखीही
डोळ्यावरील अमुच्या हटतच ‘झापड’ नाहीं
वदतो , ‘शाबास ! ऐशा प्रगतीत देश नाहो !’
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
कळलेंच ना अम्हांला दुर्दैव हाय ! अमुचें
बनलो ‘अधीन’ आम्ही परदेशवासियांचें
पश्चिम व पूर्व इथुनी ‘कंटेनर’ रोज येती
नागरीक बेपर्वा , तो विकत माल घेती
‘टोचणी’स निजलेल्या, निद्रा अशीच वाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
निज चालते न मर्जी, कैसा असे स्वतंत्र ?
परकीय गारुड्यांचे चालती येथ मंत्र
राष्ट्रें पुढारलेली पिरगाळतात हाता
उघडलें दार आम्हिच, सार्या उगाच बाता
बोळ्यानें दूध पितो, त्या काय म्हणावें हो ?
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
किति ही अदूरदृष्टी ! लांबचा विचार नसे
पत्ता न, पतन-खड्डा पायाखालीच असे
शेतें उजाडलेली , पुरते न वीज, पाणी
आयुष्य जाहलें हें, ‘अघोषित-आणिबाणी’
‘जयकार’ झाकतो की - जन फोडतात टाहो ।।
स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
ऐसे नव्हे , कुणाला कांहींच ठावकी ना
प्रतिसाद मिळेल कसा कोणाचिया प्रयत्नां ?
करण्यांस साध्य, कोणां उरली न संधि कांहीं
लागली चटक, त्याला रोखणें शक्य नाहीं
एकल्या-यत्नवंतां लोभी-जगत् न दाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
सगळेंच सत्य, दोस्ता, अतिशयोक्ती न कांहीं
सारेच आपण दोषी, तूंही, तसाच, मीही
चकमा न खाउं, जोखूं अपुलेंच आपण स्वत्व
दावूं ममत्व कोठें , देऊं कशां महत्व
ठरवूं या - हृदयिं खरें निजदेशहितच राहो ।।
स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
- - -
लाहो : लाभो, मिळो, प्राप्त होवो
वज्रबाहू : ज्याचे हात वज्राप्रमाणें आहेत असा
(अर्थात्, आपल्या सेनेमधील वीर सैनिक )
-
- सुभाष स. नाईक
( M- 9869002126).
आकाशातील चंद्र
आकाशातील चंद्र एकदा अचानक लपूनच बसला
वेड्यासारखा मी त्याला रात्रभर शोधला
विसरून जा भूतकाळ तो, नजर ठेवूनी भविष्यावरी,
वर्तमानी राहून प्रवाही, जीवन सारे यशस्वी करी....१,
व्यर्थ होतील प्रयत्न तुझे, उगाळता गत आठवणी,
खीळ पडेल उत्साहाते, अपयश आले हे जाणूनी...२,
ज्ञान जगाचे मिळूनी तुला, जन्म जहाला आजच खरा
अनुभवी नव बालक तूं, वाहून नेई जीवन धुरा...३
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
मातीचा पुतळा एक
फोडला कुण्या वेड्यानी
जीवंत पुतळे अनेक
जाळून टाकले शहाण्यानी ।।
एक करि तो पिसाट
ठरवी वेडा त्याला
अनेकाची उसळता लाट
धर्माभिमानी ठरविला ।।
अशी आहे रीत
नाहीं समजली मना
करुन विचारावर मात
श्रेष्ठ ठरे भावना ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
(भारताने न्यूझीलंडमध्ये सपाटून मार खाल्ला. साउथ आफ्रिकेत चालू असणाऱ्या वर्ल्ड कप २००३च्या पहिल्याच सामन्यात आपल्या टीमने ऑस्ट्रेलियाकडून पुन्हा नामुष्कीचा पराभव खाल्ला. काय म्हणावे या कर्माला?)
वाघाची डरकाळी
सिंहाची गर्जना
कागदी वाघ
करतात वल्गना
चिखलातले बेडूकराव
करतात डराव डराव
तट्ट फुगले तर काय
नंदीश्वर होतील काय?
गाढवाने पांघरले
वाघाचे कातडे
म्हणून काय त्याचे
लपेल ओरडणे?
आपलाच डंका
आपणच पिटायचा
मूर्खाचे लक्षण
विकत आताचा तमाशा
-- विनायक अत्रे.
माणसाला माणुसकीचं वागणं कळावं।
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसाचे शरीर अमोल किंमतीचं
पशु-पक्ष्यांपेक्षा खूपच मोलाचं
माणसाच्या हातून चांगलंच घडावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसाच्या वागण्यात स्वार्थ नसावा
माणसानं आचरणात बदल करावा
आपल्या आचरणातून इतरांना सांगावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसानं नजरेतून चांगलच पहावं
चांगलच ऐकावं,चांगलच बोलावं
चांगलं वाईट माणसाला कळावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसानं चंचल मनाला आवरावं
चांगल्यांच्या संगतीत त्याला रमवावं
वाईटाला दूर करावं, चांगल्याला जवळ करावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसानं तहानलेल्या जीवाला पाणी पाजावं
भुकेलेल्या जीवाला अन्न द्यावं
इतरांसाठी प्रेम द्यावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसाला माणुसकीचं वागणं कळावं।
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
आई हा शब्द असतो थोर
जो सर्वांच्या ओठावरील असतो मोर
आई या शब्दाला नसतो दुजाभाव
तो सर्वांच्या मनाचा घेई ठाव
वाऱ्याचा वेग जसा अंगाला शहारतो
तसाच आईचा स्पर्श मनाला भावतो
आईचे प्रेम करते मनाला पल्लवीत
ते दृष्टीस पडता मन होते हर्षीत
काही करण्याची हिम्मत आईमुळे मिळते
म्हणूनच तर ती आत्माला ऑ
आणि इश्वरातलाइ असते
- भाग्यश्री सतीश प्रधान
अलिबाग
Copyright © 2025 | Marathisrushti