(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • ध्यास

    अंतरी स्नेहलभाव असावा
    मनी नसावी असुया कटुता
    निर्मल मैत्रसहवास घडावा
    भक्ती प्रीतीचा छंद जडावा....

    संस्कारी अमृतात भिजावे
    हॄदयी सत्यप्रकाश पडावा
    संतत्वाच्या जळात डूंबता
    जीवनाचा सत्यार्थ कळावा....

    जन्म मानवी संचित युगांचे
    सत्कर्मी सदा जगत रहावा
    चैतन्याचा आत्माच हरिहर
    ध्यास जीवा त्याचा असावा....

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र.२८९

    ७ /११ /२०२२

  • गलेलठ्ठ नोटांच्या गठ्ठ्यांनो

    गलेलठ्ठ नोटांच्या गठ्ठ्यांनो
    आणि खणखणीत आवाज उमटवणाऱ्या
    तालेवार, चमकदार नाण्यांनो...
    डॉलर, पौंड, युरो, दिनार, रुपये ही तुझी
    दिमाखदार, लोभस, राजस रूपे

    विविध रंगांनी, ढंगांनी नटलेली, सजलेली.

    डिजिटल क्रांतीत गोठलेली, मात्र 24X7 टक्के जागी,

    सदैव तत्पर असलेली आणि...

    माणसाचं अवघं आयुष्य प्राणपणाला लावणाऱ्या,

    त्याला थकवणाऱ्या, आणि सतत पळायला लावणाऱ्या

    क्रिप्टोकरन्सी नामक आभासी चलनांनो...

    तुमचे चाल-चलन आता आम्हाला चांगलेच

    उमजू लागले आहे!

    जेव्हा त्याचा तेजस्वी हात पडतो

    एखाद्या सामान्य, दिनवाण्या डोळ्याच्या माणसाच्या टाळूवर.

    तेव्हा तो उजळून निघतो एका क्षणात

    होतो निर्भय, ताकदवान आणि राज्य करतो साऱ्यांवर!

    तो कवेत घेतो जुन्या वास्तूंना, नापीक जमिनींना

    हळूहळू खेड्यांना, गावांना, महानगरांना. मग...

    माणसांनाही!

    मजले चढू लागतात दरवर्षी एकावर एक

    अपुरी पडू लागतात महाकाय कप्पे गठ्ठ्यांना ठेवण्यासाठी

    तो होतो सर्वशक्तिमान

    पुराणकथेतल्या सार्वभौम राजासारखा!

    मात्र.. मात्र तोच तेजस्वी हात जेव्हा पडतो निसटून

    एखाद्या राजाच्या टाळूवरून

    तेव्हा तो उठतो भर बाजारातून

    उतरतो लोकांच्या नजरेतून

    इन्व्हेस्टमेन्टच्या भांड्याला पडते भलंमोठं भोक

    आणि गळू लागतो अहंकार, माज, मस्ती

    गोड्यातेलाच्या चिकट धारेसारखा!

    गुंतून जातो भूतकाळात

    अचानक आठवतात बालपणीचे दिवस, सगेसोयरे, मित्र.

    तरीही तो टाळू लागतो प्रत्येकाला

    आणि जाऊन बसतो एकटाच

    अरण्यात, तपश्चर्येला!

    आठवतोय ना तो दिवस... नोटबंदीचा,

    होत्याचं नव्हतं झालं क्षणात

    रद्दीच्या भावात गठ्ठयांनो तुम्ही विकला गेलात

    लोकं टाळू लागली तुम्हाला

    तुमचा स्पर्शही नकोसा झाला.

    तेव्हा नोटांनो, उतू नका, मातू नका. घेतला वसा टाकू नका.

    किमान तो दिवस तरी विसरू नका!

    नोटांच्या गठ्ठ्यांनो आणि वाजणाऱ्या नाण्यांनो

    तुमचा जन्मही झाला नव्हता तेव्हाची गोष्ट...

    आम्ही सारेच सुखनैव नांदत होतो, बार्टर सिस्टीममध्ये !

    तिथं नव्हती ईर्षा, हुकूमत आणि जीवघेणी स्पर्धा

    होती केवळ देवाणघेवाण

    निष्कपट, पारदर्शी, निखळ मैत्रीची, नात्यांची

    आणि शुद्ध माणुसकीची!

    इतकं असूनही तुम्ही आम्हाला हवे आहात

    असं म्हणतात, ‘तुमच्या येण्यानं सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात’

    मग.. आकाशातलं थंडगार चांदणं,

    शुभ्र लाटांची गाज, रानगंध आणि कौलारू घराच्या पडवीत

    ऐटीत विसावलेली समाधानाची आरामखुर्ची

    विकत घेता येईल?

    गलेलठ्ठ नोटांच्या गठ्ठयांनो, नाण्यांनो

    नक्की विचार कराच!

    -रामदास खरे, ठाणे (सेवानिवृत्त बँक मॅनेजर)

    (व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

  • केसरी हिंदोळा

    सुमनांजली या काव्यसंग्रहातून….. 

  • देवकी माता !

    काय म्हणू ग तुजला देवकी भाग्यवान की अभागी

    ईश्वर तुझीया उदरी येवूनी सुख न लाभले तुजलागी //

    जन्मोजन्मीचे पुण्यसाचुनी मात्रत्व लाभे स्त्रिजन्माला

    तु तर असता जननी प्रभूची तुजविण श्रेष्ठ म्हणू कुणाला //

    राज वैभवी वरात निघता कारागृही तुज घेवून गेले

    अवताराची चाहूल असूनी दुःखी सारे जीवन गेले //

    कंसाने तव मुले मारीली निष्ठूर होऊनी स्वार्थापोटी

    तु गिळून घेशी दुःखे सारी आगमन प्रभूचे होण्यासाठी //

    ईश्वर येता तव उदरी भाग्यवान तू ठरलीस

    जनकल्याणा त्यागूनी त्याला सर्व श्रेष्ठपदी गेलीस //

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • काहीतरी…

    काहीतरी आहे असे जे
    तुझ्यात मुरले आंत आहे
    राख तू होशील तेव्हा ते
    जाईल म्हटले जात आहे।।

    तुझ्यात मुरले आंत काही
    वेगळेच हमखास आहे
    नावडो आवडो कुणालाही
    त्यानेच जीवन खास आहे ।।

    वेगळेच हमखास त्याने
    पोसलेला पिंड आहे
    तरीच ना? हरघडी नव्याने
    लढवतोस तू खिंड आहे।।

    पिंड असूदे नसूदे न्यारा
    'अंतरंग' वेगळा आहे
    जगण्याच्या तुझ्या कलेला
    त्याचाच रंग सगळा आहे ।।

    -- मी मानसी
    मानसी कावले

  • पाऊस

     

  • विनाश – ईश्वरी व मानवी

    संतुलन करूनी चालवी, निसर्गाचा खेळ सतत ।

    जन्ममृत्यूची चाके फिरवी, एकाच वेगाने अविरत ।।१।।

    जन्म घटना ही शांत होता, मृत्यू परि घेई लक्ष्य खेचूनी ।

    नष्ट होतो जेव्हां मानव, विचार लाटा उठती मनी ।।२।।

    मरणामध्यें निसर्ग असतां, हताश होऊनी दु:ख करी ।

    मानवनिर्मित नाश बघूनी, घृणायुक्त येई शिसारी ।।३।।

    पूर वादळे धरणी कंप, पचवितो आम्ही ही संकटे ।

    मानव निर्मित युद्ध दंगली, सूड भावना तेथे पेटे ।।४।।

    विनाश असता दोन्हीमध्ये, मान तुकवी निसर्गापुढे ।

    बिघडले घर देईल बांधूनी, विश्वास बाळगी ईश्वराकडे ।।५।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • दुःख विसर बुद्धी

    कसे मानू उपकार, देवा तुझे
    देऊन बुद्धि विसर, करी कल्याण माझे

    खेळ आहे जेथें, हार जीत आहे
    घर बांधणीते, पड झड पाहे

    असे जन्ममरण, ह्याच देहीं
    हेच असतां जीवन, सुख दुःखे पाही

    एक दुःख येतां, मन होई निराश
    काळ पुढे जाता, विसरे ते सावकाश

    एका दुःखाचा चटका, दग्ध करी मनां
    जमता दुःखे अनेक, नष्ट करील जीवनां

    निसर्गाची रीत, दुःख तोची काढी
    करता दुःखावर मात, दुःखाचा विसर पाडी

    दुःख होते दुर, हेच आणिल समाधान
    दुःख बुद्धि विसर, असे तत्व महान

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • कवीचा जन्म

    रणरणत्या ग्रीष्मास सोसता
    केलीस एक कविता,
    इथेच जन्म झाला एका कवीचा
    कोसळत्या धारा झेलून,
    किळस नाहीं चिखलाचा
    वेड्या हाच श्रावण ओलेत्या कवितांचा
    शोधशी सौन्दर्य पानापानांतून,
    पान गळताना.... दुखावणारा
    होई हळव्या मृदू मनाचा
    दिवस रात्रीचे, जगरहाटीचे
    बंधन झुगारणारा
    त्या काळावर स्वार होणारा
    स्त्री पुरुष ही जात नाहीं
    भेदभाव मानणारा
    होई ममत्व बाळगणारा
    भावना नऊ रसांच्या उत्कट
    दाटता लिहीत जाणारा
    सरसर शब्दांत गुंफणारा
    अशी लक्षण दिसली कधी तर
    समजून जा ना मित्रा
    तू जन्मदाता कवितांचा!!
    -- वर्षा कदम.
  • आठवण

    अनामिक जे होते पूर्वी,

    साद प्रेमाची ऐकू आली ।

    योग्य वेळ येतां क्षणी,

    हृदये त्यांची जूळूनी गेली ।।१।।

    शंका भीती आणि तगमग,

    असंख्य भाव उमटती मनी ।

    विजयी झाले ऋणानुबंध,

    बांधले होते हृदयानी ।।२।।

    उचंबळूनी दाटूनी आला,

    हृदयामधला ओलावा ।

    स्नेह मिळता प्रेम मिळाले,

    जगण्यासाठी दुवा ठरावा ।।३।।

    मनी वसविल्या घर करूनी,

    क्षणीक सुखांच्या आठवणी ।

    जगण्यासाठी उभारी देतील,

    शरीर मनाच्या दु:खी क्षणी ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com