(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • ग्रीष्माची काहिली सोसता

    ग्रीष्माची काहिली सोसता,
    धरणीला संजीवन -डोहाळे,
    संततधार वरुन बरसतां,
    तनी--मनी तिच्या पावसाळे,--!!!

    निराळीच प्रीतीची तऱ्हा,
    प्रेम असते आगळे,
    थेट भिडे ती गगनां,
    सृष्टीचे शृंगारलेणे,--!!!

    प्रणयाची रीत पहा,
    गगन धरतीवरी झुके,
    आपुले देणे देई धरा,
    प्रेम बोलके असून मुके,--!!!

    गगन गाजवी पुरुषार्थ,
    काम क्रोध मोहा,---
    वसुंधरा स्त्रीच शेवट,
    निमूट करते संसारा,
    ऋतू पालट होता होता,
    पृथा गर्भार राहे,
    नभ उघडे आपला डोळा,
    तिला तशीच पहात राहे,--!!!

    संजीवन -डोहाळे लागता,
    आभाळ तिचे लाड पुरवे,
    संजीवन पिता पिता,--
    ती काळी आई बने,--!!!

    हिमगौरी कर्वे©

  • जागृत आंतरात्मा

    कोण उठविते प्रात:समयी निद्रेमधूनी,
    न ऐकीली कधीही हाक तयाची कानी,
    चाळविली न निद्रा शरिरा स्पर्श करूनी,
    नित्य जागवी तरीही तीच वेळ साधूनी,
    निद्रेसाठी जाण्यापूर्वी प्रभू वंदन केले
    प्रात:काळी ध्यान करावे हेच मनी योजीले,
    नाम प्रभूचे घेता घेता डोळे मिटले,
    निद्रेच्या आधीन जाता जग परि विसरले
    तोच अचानक जाग येवूनी बघे जगाला
    कुणी नव्हते जवळी माझ्या त्या घटकेला,
    तनमन निद्रेमध्ये असता जागे राही कुणी,
    पूर्ण करी ते संकल्प मनीचा अंतरयामी राहूनी

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • थवा राव्यांचा

    सकाळच्या या प्रसन्न प्रहरी
    सूर्यकिरण पसरले अंबरी ।।

    उदर भरण करण्यासाठी
    लगबग उडाली ही पक्ष्यांची ।।

    कावळे, घारी, साळुंखी ही
    पारवे, चिमण्या, बुलबुल संगती ।।

    प्रत्येकाचा सूर निराळा
    गाऊन सवंगड्या साद घालती ।।

    पटकन आला थवा राव्यांचा
    मंदिर शिखरी क्षणभर विसावला ।।

    घाणेरीच्या झुडुपांमध्ये
    क्षणात हा मिसळून गेला ।।

    मोबाईल हा गप्प बसेना
    मग नजारा हा राव्यांचा ।।

    छायाचित्रण करुनी तयांचा
    आनंदाचा क्षण साठविला ।।

    (रावा=पोपट)

    -- मी सदाफुली
    संध्या प्रकाश बापट

  • कॉन्ट्रॅक्ट

    अठ्ठावीस युगांचं लिझ
    आता संपलेलं आहे
    विठ्ठला, तुझ्या पायाखालची
    वीट आता त्यांची आहे
    ना तुझी - ना पुंडलिकाची
    त्या धनदांडग्या बिल्डर्सची
    बेगुमान राजकारण्यांची
    ज्यांनी केव्हांच खरेदी केलेय
    येथील प्रत्येक वीट अन् वीट.

    हां! देऊ करतील
    तुला, ते एकादी सीट
    कारण तसा तू प्रसिद्ध
    मात्र मोहरांच्या गोणी
    ठेव सिद्ध.

    नेऊन ओत त्यांच्या
    कोठारामध्ये, गुपचूप
    मग आणतील ते
    तुला निवडून -
    निवडून येताच एक मात्र कर
    त्या टाळकर्‍यांच्या दिंड्या
    करुन टाक बंद एकदम
    किती किती प्रदूषण
    त्यापेक्षा बोलाव जॅक्सन
    कर सौंदर्यस्पर्धेची आखणी
    म्हणजे मंत्रीपदी नक्की

    -- सुधा मोकाशी

  • उभारी

    कोपऱ्यांत तो पडला होता, शरिर जर्जर होऊन

    जरी झाला हतबल देह, सदैव उत्साही त्याचे मन...१,

    झगडा देवूनी आयुष्याशीं, जीवनाचे घरकूल बांधले

    सुख दु:खाच्या विटा चढवूनी, त्याग श्रमाचे लिंपन केले...२,

    कर्तृत्वाचे शब्द उमटती, घरकूलाच्या भिंती मधूनी

    जगण्यासाठी उभारी देती, इच्छा शक्तीस जागवूनी...३,

    गतकाळाच्या आठवणी त्या, जगण्याचा तो ठेवा बनला

    सार्थकतेच्या जाणीवेनें, अंत दशेतील क्लेश विसरला...४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • शून्याचे गणित

    समजण आणि असणं
    याच्यात तिनशे साठ
    अंशाचा कोन होतो

    त्यांच्या समीकरणातून
    माणूस शून्यात जाऊन पोहचतो ||

    कर्तबगारीच्या जमेतून
    प्रौ़ढीची वजाबाकी करतो
    त्यावेळी माणूस परत
    शून्याकडेच वळतो ||

    सत्कर्माच्या गुणाकराला
    अनितीने भागतो त्यावेळी
    माणूस परत शून्याकडे वळतो ||

    हरिस्मरणाचे बीजगणीत
    श्रध्देने सोडवत जातो त्यावेळीही
    माणूस शून्याकडे जाऊन पोहचतो ||

    -- चंदाराणी कोंडाळकर

  • काळ व कार्याची सांगड

    मानव जीवन तुम्हां लाभले,
    महत् भाग्य ते समजावे
    कर्म दिधले पाठी तुमच्या,
    सद्उपयोगी यांसी करावे....१,

    जीवन रेखा मर्यादेतच,
    ठेवली असती तुमचे हातीं
    जाणीव त्याची मनीं असावी,
    कर्म कार्ये जेव्हां करिती...२,

    हाती घेतल्या कार्यामध्ये,
    एकचित्त तो प्रयत्न व्हावा
    काळ केवढा तुमचे जवळी,
    याचा विचार सतत यावा...३,

    कार्ये राहता अपूर्ण अशी,
    वेळ न उरे तुमचे हाती
    अभाव असता योजनेचा,
    अपयश ते पदरी पडती....४

    कार्य व्याप्तीची दिशा असावी,
    शक्ती साधन काळ बघूनी
    जीवन यशाचा आनंद खरा,
    लुटाल तुम्ही हे ध्या जाणूनी.....५

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • सुखामागे धावताना

    सुखामागे धावताना
    माणूसच हरवला आहे
    आयुष्य जगताना
    आपली नाती विसरला आहे
    भविष्याची तयारी करताना
    मनातील भाव हरवला आहे

    - गायत्री डोंगरे

    व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी - महिला विशेषांकातून साभार

  • बहिणीची हाक

    राखण करीतो पाठीराखा, भाऊ माझा प्रेमळ सखा,

    विश्वासाचे असते नाते, एकाच रक्तामधून येते ।।१।।

    आईबाबांचे मिळूनी गुण, तुला मला हे आले विभागून,

    हृदयामधली ज्योत त्यांच्या, तेवत आहे आज आमच्या ।।२।।

    प्रकाश झाला परंपरेनें, त्याला माहित पुढेच जाणे,

    मार्ग जरी भिन्न चालले, मूळ तयाचे खालीं रूजले ।।३।।

    अघात पडतां तव वर्मी, दु:खी होऊन जाते बघ मी,

    दिसत नाही कुणा हे बंधन, जीव श्वासाचे अतूट स्पंदन ।।४।।

    भांडत रूसत हासत होतो, जगण्यामधला भाग असे तो,

    खेच खेचता ढील सोडतां, सुटत नाहीं मग तो गुंता ।।५।।

    बाह्यांगीं तूं दूर आहे जरी, तव प्रतिमा ही राही अंतरी,

    बघत राहते तुझी भाऊबीज, आठवणीत मी जगते आज ।।६।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • लग्न म्हणजे काय असतं ?

    लग्न म्हणजे काय असतं ?
    एक चुकलेलं गणित असतं
    कारण तिथे एक आणि एक तीन असतं...
    लग्न म्हणजे काय असतं ?
    उगाच त्याग करणं असतं
    कारण त्यातून काहीतरीमिळवायचं असतं
    लग्न म्हणजे काय असतं ?
    दोन जीवांचं मिलन असतं
    कारण एक अगोदर जाणार हे ठरलेलं असतं
    लग्न म्हणजे काय असतं ?
    मोक्षाकडे नेणारं दार असतं
    कारण ते तोडावसंकित्येकांना वाटत असतं
    लग्न म्हणजे काय असतं ?
    जगण्याला एक निमित्त असतं
    कारण त्याशिवाय जिवंत राहण अवघड असतं

    © कवी – निलेश बामणे