आमचं अन्न, आमची माती
आमचं धान्य, आमची शेती
कळेनाच कोणालासुद्धा
कुठून कोठे जाती !
-
आमच्या विहिरी, आमच्या सरिता,
आमचे निर्झर अन् सरोवरें
पडतिल कधि कोरडेठाक हे,
कोणां ना ठाऊकच रे !
-
वितळतील कां नद्या हिमाच्या
चढेल वरवर सागर-पाणी ?
बुडतिल कां काठाची शहरें ?
विचार हृदयीं कंपन आणी !
-
‘घडलें नाहीं असें आजवर
म्हणुनच, ना घडणार उद्याही’,
व्यर्थच आहे सें बोलणें
घटित उद्या कळणारच नाहीं !
-
ज़रा बघा रे होउन जागे,
भूमातेच्या नयनीं पाणी,
‘मला वाचवा’, भिक्षा मागे,
‘तऽरच टिकेल मनुष्यप्राणी’ !
*
आपली माणसं, आपली नाती
हलवुन उठवूया सर्वांना
पिढ्या-उद्याच्या ज़गण्यांसाठी
जिवंत ठेवूं पर्यावरणा .
- सुभाष स. नाईक
हा निसर्ग देखणा
प्रतिबिंब बिलोरी
मन मनास भुलते
झुलते प्रीत अंतरी
हा लोभस नजारा
कोण? हा रंगारी
रंगकर्मी रविवर्मा
स्वर्गिचा, चितारी
रूप अनामिकाचे
विलसले चराचरी
हा डोह प्रसन्नतेचा
इथे डूंबावे निरंतरी
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र.२४७
२५/९/२०२३
गोकुळीच्या आम्ही गोपिका,
निघालो विकण्या दूध, लोण्या कितीदा विनवावे तुज श्रीरंगा, उशीर होई मथुरेच्या बाजारां,--!!
करून सगळी आवरां -आवरी, निघालो आम्ही सगळ्या सत्वरी कामे सारी भराभरा आटोपुनी, डोईवर घेऊनी भरलेला घडा,--!!
ठुमक ठुमक चालीची
नक्कल करीत थांबशी, उगी आम्हां विलंब करीशी काय केला आम्ही गुन्हा,-!!
नको नको रे मारुस खडा,
ओघळ दह्यादुधाचे पहा, दंगेखोर किती तुमचा जथा,
मिळून घालता ना डांका--!
गोंडस तव रूपाला देखण्या,
नुसते आम्ही बघत राहतां,
अल्लद हे घडेही पळवतां, नवनीत सारेफस्त करतां, सांगा काय समजवावे तुम्हां,
दया कर आम्हांवर कान्हा,-!
भांडू कातुझ्याश गोविंदा* पाहता तुला,कासाविशीजीवां
सोड, वाट मनमोहना ,
कसे सांगावे नंद -यशोदा,--!
हिमगौरी कर्वे.©
योजना तुमची चुकून जाते, जीवनाच्या टप्प्याची ।
अखेरचा क्षण जवळीं येतां, आठवण होते त्याची ।।
जोम असतां शरीरीं तुमच्या, करीता देहासाठीं ।
वृद्धत्वाचा काळ तुम्हीं ठेवता, ईश चिंतना पोटीं ।।
गलित होऊनी गेली गात्रे, अशांत करी मनां ।
एकाग्रचित्त होईल कसे तें, मग प्रभू चरणां ।।
दवडू नका यौवन सारे, ऐहिक सुखामागें ।
त्या काळातील प्रचंड ऊर्जेस, लावा सत्कर्मे ।।
सदृढ असते शरीर जेव्हां, एकाग्र करा चित्त ।
मिळणाऱ्या ऊर्जेला, खर्च करा योग्य चिंतनांत ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७८५०
आता सरु लागले आयुष्य हे सारे
तरीही तुझे मौन मात्र संपले नाही...
कसला हा असा दैवयोग भाळीचा
हे गूढ तुझे अजूनही कळले नाही...
शब्द तुझे अजूनही कां? अव्यक्त
हेच मजला अजूनही उमगले नाही...
नव्हते कधीच काहीच मागणे माझे
तुजवीण जगणे कधीच रुचले नाही...
श्वासासंगे, तुजवरी प्रेम करीत आहे
तुला कधीच विसरूही शकलो नाही...
तूही हे सारे, सारेच जाणतेस तरीही
तुझे व्रत मौनाचे आजही संपले नाही...
प्रीतिवीना कां? कधी जग हे जगते
हे सत्य, कधीच असत्य ठरले नाही...
रचना क्र.५४
२२/६/२०२३
-वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
ते जातील उडूनी पंख फुटता पाहत राहशील, डोळे भरुनी
आजवरी जे प्रेम दिले तू शक्ती त्याची उरी बाळगुनी
माया, वेडी कशी असे बघ वाटते तुजला तुझीच पिले ती
हसून, खेळून बागड्तील सदैव तुझ्या पदारा खालती
जेंव्हा पडले पाउल पहिले आधाराविण तुझ्या अंगणी
नांदी होती दूर जाण्याची तुजपासुनी त्याच क्षणी
परी दूर दृष्टी ही नव्हती तुजला मायेचा तो पडदा असता
टिपून घेशी अश्रू आज ते परिस्थितीची जाणीव होता
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
आपल्या सीकेपींच्या पद्धती, जिन्नस सगळंच कसं खास, छान छान
त्यातून कडव्या वालांना लाभलय एक विशिष्ट प्रमुख स्थान ॥1॥
"वालाचं बिर्ढ" नेहमीच "नंबर वन", त्याचा पहिला मान
दिमाखात वाटीत खुलतं आणि वाढवतं जेवणाची शान ॥2॥
चवीष्ट लोभसवाणं "बिर्ढ" खाणा-यांची भूकही वाढवतं
ताटातल्या इतर पदार्थांपुढे स्वत:चा सुंदर ठसा उमटवतं ॥3॥
कडवे वाल येताच इथला तिथला भाव, क्वालिटी चा सर्व्हे करत सुटायचं
काकीला/मावशीला/मामीला, "तुझ्या यादीत माझे पण 5 किलो लिहून टाक", हक्कानी सांगायचं ॥4॥
वाळवणं, तेल लावणं, भरणं हे सगळे सोपस्कार करणं सास्वा-सुनांचं आवडीचं काम,वालाचं मनासारखं कोडकौतुक झाल्याशिवाय हातांना त्यांच्या नसतोच आराम ॥5॥
तेवढ्याच प्रेमाने भिजवून, ऊपसून, सोलून शिजवून, गृहिणीला मिळतं आगळं समाधान,खवय्ये मंडऴींबरोबर जणू काही गोंडस स्मित करतं भरलेलं पान ॥6॥
चपाती-प्रेमी मंडळी, "बिर्ढ" केलं की मात्र शेवटी पुन्हा बिर्ढ-भात घेणारच
भरपेट जेऊन, "वाह मस्त" अशी ऊत्स्फूर्त तारीफ हमखास तोंडातून काढणारच ॥7॥
रूचीपालट म्हणून अधूनमधून मुगाचं, चवळीचं, चण्याचं बिर्ढही आपल्याकडे असतं,नाॅनव्हेजचा वार नसला तरी आपलं हे "बिर्ढ" सगळं निभावून नेतं ॥8॥
संकष्टीला, सणावाराला बिना कांदा-लसणाचंही सगळे आवडीने खातात
शिल्लक राहिलेलं दुस-या दिवशीही "बिर्ढ आहे नं गं, वाढ नं," म्हणून आवर्जून मागून घेतात ॥9॥
मनापासून करतो, उत्साहाने, आवडीने व आग्रहाने खाऊ घालतो
आनंदी चेहरे बघून तृप्त होतो, म्हणूनच कदाचित आपण स्वत:ला कायस्थ म्हणवतो ॥10॥
-----सौ.वर्षा कुळकर्णी खोपकर-----
डोक्यावरी घिरट्या घालीत, काळ सदा फिरतो
वेळ साधतां योग्य अशी ती, त्वरित झेपावतो...१
भरले आहे जीवन सारे, संकटांनी परिपूर्ण
घटना घडूनी अघटीत, होऊन जाते चूर्ण...२
फुलांमधला रस शोषतां, फूल पाखरू नाचते
झाडावरती सरडा बसला, जाण त्यास नसते...३
आनंदाच्या जल्लोशात कुणी, चालले सहलीला
अपघात घडतां उंचावरी, नष्ट करे सर्वाला...४
खेळी मेळीच्या वातावरणी, हसत गात नाचते
ठसका लागून कांहीं वेळी, हृदय बंद पडते...५,
सतत जागृत असता तुम्हीं, टाळता येई वेळ
सावध तुमचे चित्त बघूनी, निघून जाई काळ ...६
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti