अनामिक जे होते पूर्वी,
साद प्रेमाची ऐकू आली ।
योग्य वेळ येतां क्षणी,
हृदये त्यांची जूळूनी गेली ।।१।।
शंका भीती आणि तगमग,
असंख्य भाव उमटती मनी ।
विजयी झाले ऋणानुबंध,
बांधले होते हृदयानी ।।२।।
उचंबळूनी दाटूनी आला,
हृदयामधला ओलावा ।
स्नेह मिळता प्रेम मिळाले,
जगण्यासाठी दुवा ठरावा ।।३।।
मनी वसविल्या घर करूनी,
क्षणीक सुखांच्या आठवणी ।
जगण्यासाठी उभारी देतील,
शरीर मनाच्या दु:खी क्षणी ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
August 23, 2016
पांडुरंग रंगीं रंगुन नामामृता प्यालो
पांडुरंग अंतरंगीं, मी विलीन झालो ।।
द्वैत आणि अद्वैतातिल फरक मज कळेना
निर्गुण-सगुणातिल मजला भेद आकळेना
तरी परब्रह्म दिसलें, धन्य धन्य झालो ।।
नकळतांच हृदयीं मोठा चमत्कार झाला
निमिषातच माझा सारा मीपणा गळाला
चिंता-भय मिटले सारे, अंतरीं निवालो ।।
मावळतां ‘मी’, उरला गर्व ना ज़राही
वंदत वा निंदत कोणी, भान मुळी नाहीं
पांघरून विठ्ठलशेला, अनासक्ति ल्यालो ।।
गहिवरलो पाहुनिया तो पंढरिचा नाथ
चरण स्पर्शतां मी, उठवी घरूनिया हात
देहभान विरलें, त्याच्यासंगतीं निघालो ।।
-- सुभाष स. नाईक
पंढरीचा राणा
July 3, 2017
May 23, 2022
एका टोंकावरती जातां, शांत न राही झोका तेथें,
विलंब न करता क्षणाचा, जाई दुजा टोका वरती ।।१।।
जीवनांतील झोके देखील, असेच सदैव फिरताती,
बऱ्या वाईटातील अंतर, नेहमी चालत असती ।।२।।
समाधान ते मिळत नसे, जेव्हां बघता तुम्हीं भोग,
त्यांत देखील निराशा येते, मनीं ठरविता जेव्हां योग ।।३।।
जवळपणाच्या नात्यामध्यें दुरत्वाचे अंकूर फूटते,
दूर असता कुणी तरी, जवळ करावे वाटते ।।४।।
संतूलन करूनी मनाचे, समत्व बुद्धी ठेवावी,
टोकावरती जाण्याची भूमिका, सदैव टाळीत रहावी ।।५।।
मध्य बिंदू तो साधतां, निवड न राही एकाची,
स्थिरत्व येईल जीवनाचे, टोके जातां सुख दु:खाची ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
September 9, 2020
बांधले होते सुंदर घरटे, कौशल्य सारे एकवटूनी
वृक्षाच्या उंच फांदिवरी, लोंबत होते झोके घेवूनी...१,
दूर जावूनी चारा आणिते, पक्षीण आपल्या पिल्याकरिता
जग सारे ते घरटे असूनी, स्वप्न तिचे त्यांत राहता...२,
वादळ सुटले एके दिनी, उन्मळून पडला तो वृक्ष
पिल्लासाठी ती गेली होती, शोधण्यासाठी आपले भक्ष्य...३
शाबूत घरटे फांदी वरते, वृक्ष जरी तो पडला होता
पिल्लामधली ती कुजबुज, असह्य दशेत ऐकत होता...४
कित्त्येक वर्षीचे जीवन त्याचे, क्षणांत भूमिगत झाले
स्थिर बघूनी पक्षी घरटे, अखेरचे ते अश्रू गळले...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 31, 2019
मजला नव्हते ज्ञान कशाचे,
पद्यामधल्या काव्य रसाचे ।
कोठून येते सारी शक्ती,
काव्य रचना करूनी जाती ।।१।।
अवचितपणे विचार येतो,
भावनेशी सांगड घालीतो ।
शब्दांचे बंधन पडूनी,
पद्यरूप जातो देऊनी ।।२।।
सतत वाटते शंका मनी,
हे न माझे, परि येई कोठूनी ।
असेल कुणी महान विभूती,
माझे कडूनी करवून घेती ।।३।।
तळमळ आता एक लागली,
जाणून घ्यावी शक्ती आगळी ।
अर्पीन माझे प्राण त्याला,
स्फूर्ती देवता जो मज झाला ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 4, 2016
कोण उठविते प्रात:समयी निद्रेमधूनी,
न ऐकीली कधीही हाक तयाची कानी ।।१।।
चाळविली न निद्रा शरिरा स्पर्श करूनी,
नित्य जागवी तरीही तीच वेळ साधूनी ।।२।।
निद्रेसाठी जाण्यापूर्वी प्रभू वंदन केले,
प्रात:काळी ध्यान करावे हेच मनी योजिले ।।३।।
नाम प्रभूचे घेता घेता डोळे मिटले,
निद्रेच्या आधीन जाता जग परि विसरले ।।४।।
तोच अचानक जाग येवूनी बघे जगाला,
कुणी नव्हते जवळी माझ्या त्या घटकेला ।।५।।
तनमन निद्रेमध्ये असता जागे राही कुणी,
पूर्ण करी ते संकल्प मनीचा अंतरयामी राहूनी ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 12, 2020
स्मृतिदोषचि तो आम्हां शिकवी, जीवन सुसह्य बनविण्याते
अटळ असूनी प्रसंग कांहीं, दुर्लक्ष करितो आम्ही त्याते...१,
माझ्यातची तो ईश्वर आहे, आम्हास जाणीव याची असते
शोधांत राहूनी त्याच्या, जीवन सारे फुलत राहते...२,
मृत्यू घटना कुणा न चुकली, परि आठवण येई न त्याची
विस्तृत योजना मनी आंखतां, काळजी नसते पूर्णत्वाची...३,
विसरूनी जावूनी त्या मृत्यूला, जीवनांत तो रंग भरी
प्रेम करितो जीवनभर, देह असला नाशवंत जरी...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
December 26, 2019
दोघे एका डहाळीवरच झुलू,निसर्गाचे ,देणे किती पाहू,
बघ, रसरशीत खाली फळे,
दोघे मिळून चवीने खाऊ,--!!!
पक्ष्यांची जात आपुली,
निसर्गमेवा"आपुल्याचसाठी,
मानव त्याचा बाजार मांडे,
निसर्गराजा, फिरवी कांडी,
एका वृक्षा,-- किती फळे,
रसाळ,गोड,चविष्ट मधुर,
तुझ्यासमवेत स्वाद वाढे,
फळ बने आणखी रुचिर,
प्रेमसंगत वाढून आपुली,
एकमेकांचे उष्टे' खाऊ,--!!
त्यागातच प्रेम असते,
सखे, दुनियेस दाखवून देऊ,--!!
दोन "सांसारिक" जीव आपुले,
करती मधुर रसपाना,--!!!
निसर्गच लुटून देतो सारे,
शिकवतोही साऱ्या जगतां,--!!!
संसार या कैरीसारखा,--
कच्चा असता चटकदार,
चाखण्यां मिळती सर्व चवी,
आंबट, तुरट, गोडसर फार,--!!
नवीन संसार सुरु होतां,
फळां, जपावे लागते,
करतां-करतां,फळ मग,
कशी संपन्नता आणते,--!!!
हिरवाकंच रंग संपे,
जो असतो तारुण्याचा,
पिवळसर कांतिमान रंग चढे,
पिकल्यावर तो प्रौढत्त्वाचा,--!!!
आंबट, तुरट फळ,
हळूहळू, होई जसे गोड,
तसेच साथीदार होती कृतार्थ,
संसारी मिळतां योग्य जोड,--!!!
फळ संपे दुसऱ्यासाठी,
बघ त्याचे समर्पण,
सूचित होई त्यातून प्रिये,
संसाराचेच उदाहरण,--!!!
हिमगौरी कर्वे.©
April 19, 2019
दूर लोटते ही माती, म्हणून का खिन्न होशी?
तुझी माझी वाटचाल दूर नक्षत्रांच्या देशी
राजहंसाचे कौतुक बगळ्यांनी का करावे?
तुझ्या-माझ्या डोळ्यातील इथे परकेच रावे
स्वर्गभूमीची ही स्वप्ने धरेवरी परदेशी
दीड वितीचे हे जग म्हणायचे ते म्हणू दे
चार काचमण्यांसाठी ऊर फाटेतो धावुदे
नाते आपले जडले आगळ्याच प्राक्तनाशी
तिथे अमृताचा चंद्र रोज चांदणे सांडतो
कल्पवृक्षाच्या तळाशी जीव थोडा विसावतो
लीन होऊनिया येते दुःखसुध्दा उंबऱ्याशी !
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
April 26, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti