पांडुरंग रंगीं रंगुन नामामृता प्यालो
पांडुरंग अंतरंगीं, मी विलीन झालो ।।
द्वैत आणि अद्वैतातिल फरक मज कळेना
निर्गुण-सगुणातिल मजला भेद आकळेना
तरी परब्रह्म दिसलें, धन्य धन्य झालो ।।
नकळतांच हृदयीं मोठा चमत्कार झाला
निमिषातच माझा सारा मीपणा गळाला
चिंता-भय मिटले सारे, अंतरीं निवालो ।।
मावळतां ‘मी’, उरला गर्व ना ज़राही
वंदत वा निंदत कोणी, भान मुळी नाहीं
पांघरून विठ्ठलशेला, अनासक्ति ल्यालो ।।
गहिवरलो पाहुनिया तो पंढरिचा नाथ
चरण स्पर्शतां मी, उठवी घरूनिया हात
देहभान विरलें, त्याच्यासंगतीं निघालो ।।
-- सुभाष स. नाईक
पंढरीचा राणा
बागेतील तारका-
संघर्षाची बिजें जळतील, जाणतां तत्व पुनर्जन्माचे ।
आपसांमधील हेवे-दावे, मिटून जातील कायमचे ।।१।।
फिरत असते चक्र भोवती, स्वार्थीपणाचे भाव आणिते ।
त्यांनाच मिळावे सारे काही, जाणता स्वरक्ताचे नाते ।।२।।
उगम झाला जाती धर्माचा, स्वार्थीपणाच्या याच कल्पनी ।
वाटीत सुटतो प्रेम तयांना, केवळ सारे आपले समजूनी ।।३।।
कन्या जेव्हां सासरीं जाते, नाती-गोती नवीन बनती ।
वाटत होते परकीय जे, आज आपले होवून जाती ।।४।।
आपलेपणाच्या भावामध्ये, दडले असते प्रेम सारे ।
शत्रू देखील तुमचे होतील, समजूनी येता नाते खरे ।।५।।
भाऊ बहीण, मामा, चुलते, दूरवरची आप्त मंडळी ।
बंधन ते पडून प्रेमाचे, बांधली जाती एकत्र सगळी ।।६।।
कुणास कळले याचक्षणी, परका कुणीतरी दुरीचा ।
नात्यामध्ये नजीक असूनी, ऋणानूबंध तो पूर्वीचा ।।७।।
ओढला जाईल आत्मीयतेने, अज्ञानाचा पडदा उठता ।
पूर्वजन्मीचे ज्ञान शिकविल, आपापसातील मानवता ।।८।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
आळस देत देत बाळकृष्णा
भजनाचे सूर आळवीत होता आणि
दामू ठाकूर ढोलक्यावर
थापा मारीत त्याला साथ करीत होता
बाबांच्या मुखांतून रामरक्षा
वातावरण भक्तिमय करीत होती
त्याचवेळी धोंडू सबनीस
नगराची सेवा करण्यासाठी
लगबगीने निघाले होते
आळसावलेला सदा धुमाळ
हातांत मशेरी घेऊन
अंगणातच पचापचा
थुंकून अंगण काळे करीत होता
आणि ....
डोक्यावर टोपले घेऊन
व फटकूर नेसून
सुंद्रा कालवे आणण्यासाठी
खाजणाकडे निघाली
एव्हं! नां उन्हे रणरणली
कराड्याच्या पोरांनी
अंगणातच रस्ता वेढून
गोट्यांचा खेळ मांडला
खिशांतील चिठ्या सावरीत
क्लोजिंगचा हिशोब करीत
दि ना सबनीस लगबगीने
घराबाहेर पडला
-श्री. सु. ग. दिघे.
भास्करा दिन कालचा काळा, प्रेमास फुलत्या तुझ्या माझ्या,
मध्यभागात येऊन जसा,
चंद्रमाने आणला अडथळा ,--!!!
काही काळ दर्शना तुझ्या,
जीव कासावीस माझा,
कोलाहल माजतां उरां,
नुरला कुठलाही आसरा,--!!!
न्यारी प्रेमाची खुमारी,
चंद्राने अशी वाढवतां,---
स्वर्ग दोन बोटे राहिला ,
जशी ग्रहणाची सांगता,--!!!
मात देत सकल अंधारा,
उगवशील माझ्या राजा,
जरी तु होशी झाकोळतां,
उणीव नाही तुझ्या तेजां,--!!!
तारे वारे आणि चंद्रा,
सांगते रे मी कितीकदा,
सूर्यदेवाची करते पूजा,
तो एकमेव माझा त्राता,--!!!
चांद मध्ये असा डोकावतां,
खळबळ तनामनां,माजतां, दिनकराच्या किरणा तरसतां,--- आधार सहस्रबाहुंचा मला,--!!!
काय वर्णू त्याचा महिमा,
माझ्या राजाच्या वेगळ्या थाटां,
न कोणी धजावे लावण्यां, हाता,
महाराणी शोभे सम्राटां,--!
ग्रहण येवो काही अथवा,
फिकिर नाही मजला,
प्रियकर एवढा तेजाळतां,
अंधाराचीही नाही तमा,--!!!
© हिमगौरी कर्वे
खिडकीमधूनी टिपत होतो
बाह्य जगाचे द्दष्य आगळे
लोभसवाणें चित्र बघण्या
आतूर होऊन गेले डोळे
नयन नव्हते बघत ते
बघत होतो मीच खरा
खिडकीसम नयनातूनी
द्दष्य उमटते आंत जरा
संगीताचे सूर निनादूनी
लहरी त्यांच्या उठताती
कर्णा मधल्या पडद्यायोगे
आनंद मजला देवून जाती
मालक असूनी मी देहाचा
इंद्रिये सारी असती सेवक
ती केवळ साधने असूनी
आंतील 'मीच' असे साधक
मालक असूनी ताबा नसणें
स्वच्छंदी बनवी सेवकाला
इंद्रिये ती गोंधळ घालती
जागृकता नसतां मनाला
सोडून द्यावी वृत्ति मनाची
अरोप करणें इंद्रियावरी
ती तर केवळ सेवक असूनी
मनाची इच्छा पूर्ण करी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
विसरण्यातच लपला आहे, आनंद जीवनाचा
आठवणीचे द्वार उघडता, डोंगर दिसे दु:खाचा...१
दृष्य वस्तूचे मिळता ज्ञान, असे जे बाह्य जगीं
आकर्षण त्याचे वाटत असते, सदैव आम्हां लागी....२
वस्तूच्या त्या होवूनी आठवणी, सुख देई आम्हांला
क्षणिक असती सारे सुख, दु:ख उभे पाठीला...३
उपाय त्यावरी एकची आहे, विसरून जाणे आठवणी
विसरूनी जातां त्या सुखाला, दु:खी होई न कुणी...४
एकाग्र मनाची स्थिती म्हणजे, दुसरे काही नसे
जाता विसरूनी स्वत:लाही, जगास विसरत असे ... ५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
देह मनातील, तफावत दिसून येते ।
चंचल असूनी मन सदैव, शरीर परि बदलत राहते...१,
चैतन्ययुक्त मन सदा, स्थिर न राहते केव्हांही ।
जन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही...२,
परिस्थितीच्या चौकटीमध्यें, विचारांचा दबाव राहतो ।
शरीराच्या सुदृढपणाचा, मनावरती परिणाम होतो...३,
दिसून येते केव्हां केव्हां, मन अतिशय उत्साही ।
परि शरीराचा अशक्तपणा, मनास त्याक्षणी साथ न देई....४
विचित्र होते वातावरण ते, जेव्हां मनास साथ ना मिळे ।
विचारांच्या चुका होऊनी, दु:खी होते जीवन सगळे...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti