क्षण तोच धुंद , बेभान
अस्तित्वा हरवुनी गेला
मी , तू सहज विसरूनी
मिठितच गुंतवुनी गेला
तो सोहळाच प्रीतस्पर्शी
अंतरंगी विर्घळूनी गेला
तादात्म्य ! भाव निर्मळी
स्वत्वास ! समर्पूनी गेला
तोच अवीट स्पर्शानंद
श्वासास सजवुनी गेला
खेळ साराच संचिताचा
जन्म , हा कृतार्थ झाला
--वि.ग.सातपुते ( भावकवी )
9766544908
रचना क्र.१८६
३/८/२०२२
मनी वाटते नाम तुझे, सदैव मुखी यावे,
कर्तव्या माजी एकाग्र असतां, कसे बरे हे व्हावे ?
कोडे हे उकलून घ्यावे......।। धृ ।।
श्वास चालतो रात्रदिनीं,
लक्ष्य न घेई खेचूनी,
ऊर्जा मिळते देहातूनी,
परि मनास बंधन नसावे....१,
कोडे हे उकलून घ्यावे
एकचि कार्य एके क्षणी,
एकाग्रता येई दिसूनी,
अवसर मिळे मग कोठूनी,
त्याच घडीला कसे नाम घ्यावे......२,
कोडे हे उकलून घ्यावे,
संसाराचे ‘जू’ मानेवर,
ओढण्यासांगे ईश्वर,
मार्ग सारे असता खडतर,
कसे त्यास वळवावे पाहावे......३,
कोडे हे उकलून घ्यावे.
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
सुर्य किरणें रानभर
ऐस पैस पसरली
झाडा खाली वेडी
सावली घुटमलली
फुलून रानभर वेली
गंध फुलाचा दरवलतो
फुलपाखराचा थवा
त्यावरती भिरभीरतो
घालीत शिल
रानपाखरे गाती गाणे
मन वेडे करती
मनमोहन किलबीलणे
@ शरद शहारे
देशासाठी वीरमरण ते,
भाग्यवान" किती तुम्ही,
कितीदा मागावे मरण असे, मिळत नाही "जन्मोजन्मी," --!!!
भारत मातेची सेवा" करता,
देह तुम्ही हो ठेवला, --
देशसेवा करता करता,
पाईकांनी कसा बळी दिला,--!!!
अगदी पुण्यकर्म हे ठरे,
असा मृत्यू तुमच्या नशिबी,
नेताना तुम्हाला तोही घाबरे,
पडलात ना देशाकारणी,--!!!
ज्या मातीत खेळलो,वाढलो,
तिचे केले रक्षण तुम्ही,--
आईला पूजताना शेवट,
कुडी झाली निव्वळ माती,--!!!
घरदार-- आईबाप,
पडतील उघड्यावरी,
विचाराने नाही छळले,--
इतकी तुमची होती तयारी,--!!!
शूरवीर देशाचे सैनिक,
खरेच तुम्ही धाडसी, --!!!
निधड्या छातीने सिंहागत,
शत्रूला झेलता अंगावरी,--!!!
हिमगौरी कर्वे
उगवता सूर्य, नमन करती त्याला,
विसरती सारे सुर्यास्ताला ||धृ||
ऐश्वर्याची झलक, श्रीमंतीचे सुख
बिनकष्टाची संपत्ती, लक्ष मिळवण्याती
माना डोलावती, डामडोलाला ||१||
उगवता सूर्य. नमन करती त्याला
प्रथम हवे दाम, तरच होई काम
पैशाच्या भोवती, सारेच फिरती
पैशाचे गुलाम, मानती पैशाला ||२||
उगवता सूर्य, नमन करती त्याला
सत्तेची नशा, दाखवी जना आशा
स्वतःसी समजे थोर, असुनीया शिरजोर
हांजी हांजी करती, बघता सत्तेला ।।३।।
उगवता सुर्य, नमन करती त्याला
अधिकाराची रीत, बघती स्वहीत
गरजवंता अडविती, शोषण तयांचे करती
सलाम करती, अधिकाराच्य़ा खुर्चीला ।।४।।
उगवता सुर्य़, नमन करती त्याला
कालचा नटसम्राट, होता अती श्रेष्ठ
डोंगर उतरला त्यानी, आज विचारिना कुणी
जवळ करती, उमलणाऱ्या फुलाला ।।५।।
उगवता सुर्य, नमन करती त्याला, विसरती सारे सुर्यास्ताला.
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Bknagapurkar@Gmail.com
बस मधून चाललो होतो मी, शेजारी होती जागा रिकामी
येवून बसली जवळ एक सुंदर, चंचल तरूण बालीका
तिला बघून मनाची खुलली कलीका
तरीही मी एका क्षणांत माझी जागा बदलली बरका
कारण ती हासत मुरकत म्हणाली
“ थोडसं, सरकता का तिकडे काका ? ”
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
हा अतिशय सुंदर लेख शेअर करतोय. लेखक माहित नाही.
"मी असा काय गुन्हा केला ?" हे शब्द मा. प्रमोद महाजन यांनी, मा.गोपीनाथ मुंडे यांच्याजवळ, आपल्या अंत समयी उच्चारले होते. आपल्या सख्ख्या भावानेच गोळ्या घातल्यावर विचारांच्या कल्लोळातून त्यांना असे व्यक्त व्हावेसे वाटले होते.
"अरे, अरे हे काय करताय ?" असे इंदिराजींनी अतिशय अविश्वासाने आपल्या मारेक-यांना विचारले होते. महात्मा गांधीजींचे जातानाचे शब्द होते, "हे राम" तर चाफेकर बंधू किंवा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी "वंदे मातरम" म्हणत मृत्यूचे स्वागत केले होते. तर "मी या स्वार्थी जगात आता राहू शकत नाही",असे म्हणून साने गुरुजींनी जीवनयात्रा संपवली आणि सात भाऊ असते तरी मातृभूमीसाठी दिले असते. आता माझे काम संपले असे ठामपणे सांगून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी प्रायोपवेशन केले.
एखाद्याचे जातानाचे शब्द नेमके काय असतात याची आपल्याला अतिशय उत्सुकता लागून राहिलेली असते. एखादे वयोवृद्ध वडील गेल्यावर जेव्हा नातेवाईक भेटायला येतात तेव्हा "काय म्हणाले हो ते जाताना ?" असे हमखास विचारले जाते. अगदी बोलायला यायला लागल्यापासून आपण अगणित वाक्ये बोलतो पण आयुष्याच्या अंतकाळी जे बोलतो ते खरेखुरे असते. त्यात खोटेपणाचा, दांभिकपणाचा, "मी"पणाचा लवलेशसुद्धा नसतो.
ब-याचवेळा आयुष्यातल्या चुकांची किंवा पापांची कबुलीही असू शकते. बालपण संपल्यानंतर इतका मनाचा निरागसपणा यापूर्वी कधीच अनुभवता आलेला नसतो. कदाचित समोर दिसत असलेल्या मृत्यूमुळे ख-याखु-या जीवनाची जाणीव, आयुष्य संपताना होत असावी.
एक एकांकिका पाहिली होती. लेखकाने कल्पना अशी केली होती की, पराभव दिसायला लागल्यावर अडॉल्फ हिटलरने आपल्या नवपारिणित वधूसह आत्महत्या केली होती. मग ज्या रात्री त्याने आत्महत्या केली त्या रात्री त्याचा त्याच्या बायकोशी नेमका काय संवाद झाला असेल ? अतिशय कल्पकपणे दोघातले द्वंद्व त्यांनी उभे केले होते. पत्नीला जगायचे होते, सर्वसामान्य माणसाप्रमाणे संसार करायचा होता. पण हिटलरला शत्रूच्या हातात सापडायचे नव्हते. त्याला आपला अपमानास्पद मृत्यू नको होता. त्यामुळे आत्महत्येशिवाय त्याला दुसरा मार्ग दिसत नव्हता. आसक्ती आणि विरक्ती यातले नाट्य पाहताना दोघांनीही जीवनाच्या तत्त्वज्ञानावर केलेले भाष्य हा या एकांकिकेचा विषय होता. पत्नीच्या मनात मृत्यूच्या कल्पनेने आलेली थरारकता आणि त्यातून निर्माण झालेली अगतिकता ही मनाला स्पर्शून गेली आणि हे मृत्यू, मी मला हवा तसा जागलो, आता हवा तसा मरणार हा हिटलरच्या मनातील ठामपणा पाहताना थरारून गेलो.
जगणे आणि मरणे यात फार मोठा वैचारिक खंदक असतो. तो पार करण्याची इच्छा फार कमी जणांची असते. आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाला त्या खंदकापर्यंत जाऊच नये असे वाटत असते. कारण जगण्याची आसक्ती प्रत्येकालाच असते. तिथे मृत्यूचे स्वागत कोण आणि कसे करणार ? सगळी कल्पना असते बरं का, की, आयुष्यात मी आणि माझे करत इतकी संपत्ती आणि इतक्या वस्तू गोळा केल्यात पण यातली एकही वस्तू मृत्यूबरोबर घेऊन जाता येणार नाही. वेगवेगळ्या फॅशनचे कितीही महागडे कपडे घातले तरी जन्माला येताना ××××आलोय आणि मरतानाही तसेच जायचंय. येताना दोघांमुळे आलोय आणि मेल्यावर चौघांच्या खांद्यांवरून जायचंय. आपण एकटे काहीच करू शकत नाही पण तरीही प्रत्येक हाव काही सुटत नाही. हे माझे, ते माझे, माझेही माझे आणि त्याचेही माझेच अशी आपली नेहमी भावना असते. ही भावना बोथट होते, जेव्हा मृत्यू समोर दिसायला लागतो. प्रत्येक चर्चमध्ये जशी कन्फेशन बॉक्स असते तशी काल्पनिक बॉक्स मृत्यूच्या जाणिवेने तयार होते. आयुष्यात जे बेफामपणे वागलो, बोललो ते आठवू लागते. आयुष्यावर चढलेली खोटेपणाची आणि दांभिकतेची पुटे ढासळू लागतात. लहान बाळाची निरागसता मनात येऊ लागते. राग-लोभाच्या आहारी जाऊन विस्कटून टाकलेली नाती पुन्हा गोळा करून आणाविशी वाटतात. खरे तर तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. जेव्हा जगायचे असते तेव्हा आपण जगलेलोच नसतो. आणि जगावेसे वाटू लागते तेव्हा मृत्यू समोर येऊन उभा ठाकलेला असतो.
भाऊसाहेब पाटणकर यांचा सुरेख शेर आहे,
दोस्तहो, दुनियेस धोका, मेलो तरी आम्ही दिला ।
जाऊनी नरकात, पत्ता स्वर्गाचा आम्ही दिला ।।
हाय रे दुर्दैव माझे, सर्वास कळले शेवटी ।
सारे सन्मित्र माझे, तेथेच आले शेवटी ।।
आपल्यासारख्या सर्व पापी माणसांचा सर्वात शेवटचा मुक्काम नरक आहे हे त्यांनी नर्मविनोदाने मोजक्या शब्दात पटवून दिले आहे.
पण काही काही माणसे खरोखरच वेगळी असतात. त्यांना जगण्याचीही आसक्ती नसते आणि मरण्याचीही भीती वाटत नाही. ही माणसे ख-या अर्थाने जीवन जगतात आणि हस-या चेह-याने मृत्यूला सामोरे जातात. सामाजिक कार्यकर्ते ग. प्र. प्रधान यांनी मृत्यू हसत हसत स्वीकारला. आपला काळ जवळ आला आहे हे कळल्यावर त्यांनी आपला पुण्यातील राहता वाडा साधना ट्रस्ट या संस्थेला फुकट देऊन टाकला. आपल्या एका डॉक्टर विद्यार्थ्याच्या हॉस्पिटलच्या सर्वात वरच्या मजल्यावरच्या खोली भाड्याने घेतली आणि स्वतः डाळ भात बनवून मृत्यू येईपर्यंत जगत राहिले. खरे तर तो वाडा विकला असता तर त्यांना करोडो रुपये मिळाले असते. पण आयुष्यभर एक तत्त्वज्ञान उराशी बाळगून जगलेल्या प्रधान मास्तरांनी निस्वार्थीपणे त्यावर पाणी सोडले. पु. लं.नी तर आयुष्यात मिळालेल्या सर्व संपत्तीचा ट्रस्ट केला आणि समाजाकडून मिळालेली सर्व संपत्ती समाजाला परत देऊन टाकली. एक आदर्श जगणे यापेक्षा वेगळे काय असते ? सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून एकविसाव्या वर्षी जिवंत समाधी घेणारे ज्ञानेश्वर माऊली म्हणजे विरक्तीचे टोक ! त्यांच्या जीवनाचाही सोहळा होता आणि संजीवन समाधीचाही ! जीवनमृत्यूची व्याख्या त्यापलीकडे ती काय करायची ?
अर्थात काही सामान्य माणसेसुद्धा असामान्य पद्धतीने जगतात आणि मृत्यूने आदर्श निर्माण करतात. मुंबईत राहणा-या वसंत त्र्यंबक निकुंभ यांनी पंधरा वर्षांपूर्वी दोन्ही हात पसरून मृत्यूचे स्वागत केले होते. आयुर्वेदाचा गाढा अभ्यास असलेले निकुंभ एखाद्या योग्यासारखे ८३ वर्षे जगले. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे त्यांची रोजची दिनचर्या होती. त्यामुळे त्यांच्या नखात रोग नव्हता. पण एके दिवशी त्यांनी विचार केला की आयुष्यातल्या सर्व जबाबदा-या पूर्ण झाल्या आहेत, लेकी, सुना नातवंडे सारे सुखी आहेत. मग आता जगून काय करायचे ? त्यांनी इच्छामरण घ्यायचे ठरवले. पत्नी जिवंत असताना हा असा निर्णय घेणे म्हणजे आक्रीतच !
व्यवस्थित नियोजन करून एप्रिल महिन्यापासून हळूहळू एकेक खाद्यपदार्थाचा त्याग करत करत चार महिन्यांनी मृत्यूला त्यांनी बोलावून घेतले. या त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा सर्व नातेवाईकांनी खूप प्रयत्न केला पण ते आपल्या विचारांपासून ढळले नाहीत. तोंडी सांगून ऐकत नाहीत हे लक्षात आल्यावर सर्वांनी त्यांना पत्रे लिहिली आणि 'तुम्ही आम्हाला हवे आहात' असे सांगितले तर त्या प्रत्येकाला स्वहस्ताक्षरात त्यांनी लिहिलेली उत्तरे तत्त्वज्ञानाने भरलेली होती. ती आजही वाचायला मिळतात. ज्याने आयुष्य आणि मृत्यू यांच्यातली सीमारेषाच पूर्णपणे पुसून टाकली आहे त्या माणसाचे तत्त्वज्ञान वाचत राहावेसे वाटते. जग हे मिथ्या आहे हे संतांनीच सांगितले पाहिजे असे नव्हे तर आपले आपल्यालाही ते कळू शकते हे वसंत त्र्यंबक निकुंभ यांच्या पत्रावरून आपल्याला कळते.
भिवंडीच्या धुंडिराज दीक्षित आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यूसुद्धा असाच आदर्शवत होता. दोघांनाही कर्करोगाचे निदान झाले आणि त्या दिवसापासून दोघांनीही औषधोपचार थांबवला. दीक्षितसर सेवानिवृत्त शिक्षक होते. त्यांनी आपल्या मुलांना सांगितले की कर्करोगावर औषध नाही हे मी मुलांना शिकवायचो. मग मीच औषधोपचारावर तुम्हाला खर्च करायला का लावू ? ते पैसे तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरा. आम्ही तृप्त आहोत, आम्हाला जाऊ द्या ! आणि खरोखरच त्या दाम्पत्याने कर्करोगाच्या वेदना शांतपणे सहन करत धीरोदात्तपणे जगाचा निरोप घेतला.
ज्याला जन्म आहे त्याला मृत्यूसुद्धा आहेच ! जेवढ्या आनंदाने आपण जगण्याचा आनंद घेतो तेवढ्याच आनंदात मृत्यूचेसुद्धा स्वागत करायला हवे आणि आयुष्यभर असे जगायला हवे की मृत्यूसमयी अपराधीपणाची भावना फिरकता कामा नये...
ढ्यांग ढ्यांग इलेक्शन-मृदंग गुंजला
मीबी मंग तिकिटाचा चंग बांधला
वाटप-रांगेत धरी जोर चांगला
लांगुलचालन करून जोड सांधला
संप्रदाय ‘थोरां’चा नमुन वंदला
पवित्र ‘मंदिरीं’ कृपाप्रसाद लाभला
अखेरीस कँडिडेट-टिळा लागला
धुंदीला नच पारावार राहिला
प्रचंड फंड ज्यासाठी आजवर दिला
पक्षानें आज खरा पांग फेडला. १
‘सीट’ नको-तीच, तरी ती सुमंगला
‘यंदा यशवंत तूं’, संदेश पोंचला
खांद्यावर झेंडा पक्षीय बांधला
उच्चनाद करत युद्ध-शंख फुंकला
दक्ष पूर्ण, लक्ष ‘मंद’ आजुबाजुला
‘भांग’ चढे , ‘खचित जय असेल आपला’
वृद्धिंगत करिन पक्ष-यशद-शृंखला.
पण फडात ‘दंगली’त नविन मामला
षंढ विरोधकगण, नव-डाव मांडला
माझ्याविरुद्ध ‘फ्रंट्’ एकत्र बांधला
उमेदवार फक्त-एक उभा ठाकला
दंड थोपटुन लढावयास पातला.
कुत्र्यांचा घोळका कितीक भुंकला
माशी-थवा जरी कितीक शिंकला
कितिक जरी अरिनें धरबंध सोडला
द्वंद्वाचा निश्चय मी ठाम ठेवला
प्रतिद्वंद्व्या, बघच रंगढंग आगळा
जंगजंग पछाडले , मी नसे बुळा
रंक न मी, खूप money, गाडी-बंगला
चीत कराया पुंडां , सज्ज मम व्हिला. २
लढतीचा मी गुलाल उंच उधळला
संत न मी, पंथ स्वीकरी बुराभला
गुंडझुंड-संगतीत खेळ मांडला
संच-मंच-वृंद एकसंध जुंपला
तंत्रबद्ध जंत्री-आधार घेतला
मंत्रघोष यंत्रवत् ‘जय-जय’ निनादला
शिणती गात्रें, तरि विश्राम लांबला
गुंग रात्रिही , नसे प्रचार थांबला
धनसंचय उधळाया संगं आणला
बांध फोडला, न हात तंग ठेवला
साम-दाम-दंड-भेद योग्य मानला
डाव बघुन, जन-तांडा दंग जाहला. ३
क्लांत जरि, न शांतता, संघर्ष वाढला
मोजणीत जय नि पराजय हिंदोळला
आस-निराशेचा थांबे न जरि झुला
मुगुट मनीं धरलेला, मी न सोडला.
रिझल्ट अखेरिस, तो भूकंप थोरला !
हाय हाय ! जय खूपच लांब राहिला !
दंतओष्ठ खात गड बुलंद लढवला
झुंज शर्थिची, परि बलदंड जिंकला
मंथर मतदार, दिली वंचना मला
संपलेंच स्वप्न , पंथ बंद , खुंटला
गंतव्याचा प्रवास विफल, थांबला
भरण्यांआधीच सुयश-कुंभ सांडला. ४
‘कमिशन’नें उंच जधिं निकाल टांगला,
ब्रह्मांडच आठवलें तत्क्षणीं मला !
तोंच, चंगळींत जो आकंठ डुंबला
चाटुकार-संघ, सांगतां न, पांगला
गजबज-संबंध नुरे, ओस चौफुला
‘हॉल’ हा सबंध खायला-उठे ‘दिला’
एकांतच फक्त हा सन्मित्र राहिला
शब्दहीन होतसे आक्रंद मोकळा
रुदन जरि न, नेत्रानें थेंब सिंचला
हुंदका फुटे न, मी तुरन्त दाबला. ५
सुन्न करी ऐसा रिझल्ट जन्मला
अनंत-उदासी-कुठार-घाव घातला
‘सोंग’ कोणतें पुढें , महत्व ना मला
सिंह कसा कोल्ह्यांशी ‘जंग’ हारला ?
टांग मारतां नशीब, जीव आंबला
मात्र अंक प्रथम, नाट्यपूर्ण संपला.
खंक जाहलो पुरा, न खंत ही मला
मानभंग होइ म्हणुन प्राण खंगला
यत्न व्यर्थ सर्वसर्व , गर्व भंगला
हन्त हन्त ! अंत मी असा न कल्पला. ६
*
द्यूत-आरंभाआधीच काढ अर्गला
ऐक, श्रेष्ठ-गुरु अनुभव सांगतो सला
पंडित प्रकांड नको हें कथायला -
राजकारणाचा कर बंद चोचला.
दु:खांमधिं जीव जे सांडत सुखातला
‘पढतमूर्ख’, बोंबलुन ‘किताब’ त्यांजला
मतमतांत संचरि तव गल्बला-खुळा
जाण परी, पॉलिटिक्स ही बुरी बला
अंग बद्ध, पंख बंद, पंक-नद खुला
लांघण्यास लागतो ‘महंत’ ‘पोचला’
सज्जन तूं, उंचसखल-वक्र कां वळा ?
परवडेल कधि नच धंदा असा तुला
फुकट आत्महत्या ही, धुंड नच हिला
बंधु, शांत संथ पथ नि:शंक तुज भला. ७
चुकलो मी, चुनावीय घाट घातला
तूंतरि हरव न आनंद अंतरातला . ८
- - -
मंग : मग
फड : कुस्त्यांच फड
दंगल : कुस्यांची ‘दंगल’ (स्पर्धा)
जधिं : जेंव्हां
जंग : लढाई
दिला : दिलाला, मनाला, हृदयाला
सला : सलाह्, सल्ला
पंक : चिखल
किताब : ख़िताब, पदवी
चुनाव : इलेक्शन, निवडणूक
संगं : संगें, साथीनें, सोबतीनें
आस : आशा
कमिशन : इलेक्शन कमिशन
बुरी बला : वाईट, त्रासदायक अशी गोष्ट / बाब.
अर्गला : कडी
-- सुभाष स. नाईक
कोण उठविते प्रात:समयी निद्रेमधूनी,
न ऐकीली कधीही हाक तयाची कानी,
चाळविली न निद्रा शरिरा स्पर्श करूनी,
नित्य जागवी तरीही तीच वेळ साधूनी,
निद्रेसाठी जाण्यापूर्वी प्रभू वंदन केले
प्रात:काळी ध्यान करावे हेच मनी योजीले,
नाम प्रभूचे घेता घेता डोळे मिटले,
निद्रेच्या आधीन जाता जग परि विसरले
तोच अचानक जाग येवूनी बघे जगाला
कुणी नव्हते जवळी माझ्या त्या घटकेला,
तनमन निद्रेमध्ये असता जागे राही कुणी,
पूर्ण करी ते संकल्प मनीचा अंतरयामी राहूनी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
विठूचे पद मजला लाभावे
देह मातिचा बनण्यां कांचन, अन्य कशास हवे ?
नच माहित, मेघांच्या मागे विठ्ठल दिसतो कां कुणां ?
असती कां क्षितिजापल्याड श्रिठ्ठलवस्तीच्या खुणा ?
विठू भक्तहृदयीं वसतो, पण, ठाम मला ठावें ।।
अगणित जैसे तारे गगनीं, देवदेवता अनंत जगतीं
त्या सार्यांचें वंदन-अर्चन-पूजेनें जन मागत मुक्ती
मात्र माझियासाठी सारी विठूचीच नांवें ।।
क्षणभंगुर ही दुनिया चंचल, पळभर येथें थांबायाचें
त्या थांब्यावर, अखंड तोंडीं नाम चिरस्थिर-विठुरायाचें
नच गंगा, अंतीं ओठांना विठुनामच लागावें ।।
-- सुभाष स.नाईक
पंढरीचा राणा
Copyright © 2025 | Marathisrushti