हल्ली का कोणास जाणे
सभोवताली पडत असतो
पाऊस बातम्यांचा
फक्त आत्महत्येच्या...
त्या बातम्यांचा तर होत
नाही ना परिणाम
रिकाम्या मेंदूवर
त्रासलेल्या माणसांच्या...
समस्या, दुःख, विरह
आणि वेदना कधी नव्हत्या
त्या तर सोबतीच होत्या
युगानुयुगे मानवाच्या...
नात्यातील गुंता भ्रम असतो
आणि प्रेम असते माया
आयुष्यात काहीच नसते
वजनाचे आपल्या जिवाच्या...
© कवी - निलेश बामणे ( ND.)
दिनांक - २ ऑक्टोबर २०२१
ज्यांच्या वाटेला अनेक चेहरे येतात,
त्यांना एका चेहऱ्याची ओढ नसते,
सहज मिळणाऱ्या सहवासामध्ये,
मनापासून जपणाऱ्यांची आठवण नसते.
ज्यांनी प्रत्येक दुःखात हात दिला,
त्यांच्याकडेच दुर्लक्ष होत जाते,
कारण पर्यायांच्या चमकत्या दुनियेत,
निस्वार्थ प्रेम हरवत जाते.
पण काळ सगळ्यांना शिकवतो,
गर्दी कायमची सोबत नसते,
लोक बदलतात, वाटा वळतात,
आणि माणसंही दूर निघून जातात.
मग उरतात काही आठवणी,
काही शब्द, काही हळवे क्षण,
आणि शोध सुरू होतो त्यांचा,
जे होते मनापासून आपले.
नाती ही पर्यायांनी नव्हे,
तर विश्वासाने जपायची असतात,
कारण जीव लावणारी माणसं
नशिबानेच भेटत असतात.
पर्यायांची गर्दी उद्या ओसरून जाईल,
वैभवाचाही रंग फिका पडेल,
पण प्रेमाने धरलेला एक हात,
शेवटपर्यंत साथ देत राहील.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
मनाची भाषा मनास उमगते
सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
कुठुन कुठुन नजरा जातात
शिरत राहतात
अंग बघायला
बायांनीही फँशन म्हणून ठेवलेले असतात
पाठीवर
हातावर
कधी छातीवरही
काही झरोके
ब्लाॅउज अन साडीच्या
मधला भागही शोधत राहते
अन
मोठाच बलात्कार करत असते नजर
एकही अंग उघडं नसलेल्या
अंगभर कपडे घातलेल्या बाईवर
ब्रा वा इतर अंतर्वस्त्राचे किनार वा काठ
ठळक दिसत राहतात त्याला वरुन कपड्यावरुन....
तेव्हा !
-- श्रीकांत पेटकर
चार कविता सुंदर रचिल्या, काव्य वाचन केले त्याचे
रसिक जनाची स्तुति ऐकूनी, स्वप्न रंगविले कालीदासाचे....१,
कॉलेजातील रंगमंचावरी, तल्लीन होवूनी भूमिका केली
टाळ्याचा तो कडकडाट ऐकूनी, नटसम्राटाची आठवण झाली....२,
जमले होते शंभर श्रोते, भाषण ज्यांचे समोर केले
श्रोत्या मधली स्फुर्ति बघूनी, गांधी नेहरूसम होवूं वाटले...३,
यश जेंव्हां पदरी पडते, भारावूनी जातो आम्ही त्यावेळी
कर्तृत्व शक्तीचे मूल्यमापन, करीत राहतो चूक सगळी...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
सखे सुखवित सुखा
शांत निजली यामिनी
नको जागवुस आता
पुनःपुन्हा स्पंदनांना
गंगौघी अमृतात
विरघळली अधरे
तृप्तवुनी अंतरीच्या
साऱ्याच संवेदनांना
निष्पाप, निरागस
अवीट आत्मसुखदा
अव्यक्त शब्दभावनांना
व्यक्त कसे करु सांगना
झाला श्रावण पावन,
मंत्रमुग्धली पावरी
राधामीरा आळविती
गीतात भक्तीभावनांना
--वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २९४
१६/११/२०२२
काढूनी झाडाच्या सालींचा आडोसा घेतला ज्या कुणीं
स्वांतंत्र्याच्या कल्पनेला बंधन पडले त्या क्षणीं ।।१।।
नग्नपणें फिरत होता श्र्वानासारखा चोहींकडे
सुसंस्कृतीची जाण येतां स्वच्छंदाला बाधा पडे ।।२।।
स्वतंत्र असूनी देखील पडते परिघ भोवती
जीवन जगण्या करितां बंधने ती कांहीं लागती ।।३।।
स्वांतत्र्याची तुमची व्याप्ती असावी दुजांना जाणूनी
दिव्य करण्याच्या ईर्षेने संस्कृतीस होइल हानी ।।४।।
ओंगळपणाचे चित्रण करती जे लेखक- कवि
आगळेपणाची भूमिका मनांत त्याच्या असावी ।।५।।
बाध न येतां बंधनाला भव्य असे करुं शकतात
चाकोरी मध्येंच राहूनी आकाशाला भिडूं शकतात ।।६।।।
निर्माण करुन गीतेला हजारों वर्ष ती झाली
तोच विषय पुन्हां घेउनी ज्ञानोबांनी बाजी मारली ।।७।।
सोडा तुम्हीं वेडा विचार स्वचछंदी त्या जगण्याचा
गढूळ होता वातावरण गुदमरेल जीव तुमचा ।।८।।
जेव्हां कुणी स्वातंत्र्य मागे त्याच्याही मर्यादा असती
दुजे त्याच्या पाठीमागचे एक पाऊल पुढे टाकती ।।९।।
दुसऱ्याचे हेच पाऊल पहिल्यास ठरे घातक
दुष्टचक्र स्वच्छंदाचे पोखरुन टाकील कित्येक ।।१०।।
तयार करित आहात बेतालपणाचा भस्मासूर
तुम्हांलाही नष्ट करील हात ठेउनी शिरावर ।।११।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
हा दुरावा साहवेना, संपवी क्षणभर स्वयें
एकदा स्वप्नांत तरि ये, एकदा तरि ज़वळ ये ।।
कां अशी गेलीस सखये प्रेमबंधन तोडुनी ?
कां अशी गेलीस सखये एकला मज सोडुनी ?
सात-जन्मीं-साथिचें तें वचन मजला आठवे ।।
काय झालें सांग, मजवर एकदम रुसलिस अशी
काय आलें सांग, जगतां त्यागुनी गेलिस कशी ?
जन्मभरचे पाश तुटणें , चांगलें ऐसें नव्हे !
तूं ज़री नाहींस पुढती, राहसी नयनीं तरी
तूं ज़री नाहींस ज़वळी, आठवण ज़वळी परी
राहते, राहील कायम स्मृति तुझी माझ्यासवें ।।
एकादा भेटून माझी तृप्ति नाहीं व्हायची
विकलता, त्या भेटिनें ज़ाईल वाढत हृदयिंची
रोज़ ये स्वप्नांत सखये, रोज़ मजला ज़वळ घे ।।
रोज़ ये स्वप्नांत सखये, रोज़ तूं स्वप्नांत ये ।।
- - -
( दिवंगत प्रियपत्नी डॉ. स्नेहलता हिच्या स्मृतीत )
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची //धृ//
बाळ चिमुकले गोजिरवाणे, त्यांना दाखविण्याची
धन दूज्याचे म्हणूनी घेतले
परके त्यासी नाही समजले
बालपणीं जे प्रेम जमविले
क्षणांत मजला तेच मिळाले
भासली नाहीं उणीव तेथे, आईच्या मायेची //१//
ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची
खट्याळ भाऊबहीण येथें
दिर नणंद तसेच तेथे
बहीण वहीनी एकच नाते
हट्ट पुरविण्या दुजे नव्हते
पदोपदीं करुन देई, आठवण भावंडाची //२//
ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची
संसार दुःखे स्वशिरीं घेऊनी
सुख वाटले सदैव त्यानीं
मान मिळे मज पुन्हां सत्वरी, त्यांच्या सेवेची //३//
ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची
सासरीं गेले सोडूनी बालपण
दुज्यासाठीं करण्या समर्पण
फुलणें फळणें खरे जीवन
हवे निसर्गा हेच ते धन
माहेर सासर एकची मिळूनी, ठरले मी भाग्याची //४//
ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची
डॉ. भगवान नागापूरकर
४९००४०७०८५०
Copyright © 2025 | Marathisrushti