कोण दिसे हा पाण्यामध्ये,असावा माझाच भाईबंद,
चोच बांकदार, रूप देखणे,
मनाने दिसतोय स्वच्छंद,
गुबगुबीत पांढरी पाठ,
कोरीव वर काळ्या रेघा,
नजर शोधक पाण्यात, भक्ष्यच भागवेल भुका ,
सुळकन जो वर येईल,
मटकावेन आधी त्याला,--!!!
कळणारही नाही याला,
कधी गिळले मी माशाला,-?
डोळे तीक्ष्णमाझे,
नजरही अगदी करडी,
पाण्यातील या पक्ष्याची,
मात्र भासे मज बेगडी,--!!!!
हिमगौरी कर्वे.
आशिर्वाद श्री जगदंबेचा, सहवास तुझ्या स्फूर्तीचा
रचिली ओवीबद्ध कथामाला, ती अर्पितो मी तुजला II १II
विचारांच्या उठल्या लहरी, शब्द जुळता काव्या परी
कविता रूप धारण करी, ती अर्पितो मी तुजला II२ II
प्रभूचा असावा सहवास, हीच अंतर्मनातील आंस
विचारांची घालूनी शब्दरास ती अर्पितो मी तुजला II३ II
प्रभू नसे जन्ममरण व्यथा, अवतारास संबोधूनी जन्मकथा
भावनेस व्यक्त करी कविता, ती अर्पितो मी तुजला II४ II
II शुभं भवतू II
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
-- डॉ. भगवान नागापूरकर
अभिमन्यू
व्हॅलेंटाईन डे दिवस प्रेमाचा
प्रेमाच्या दिवशी प्रेमानेच साजरा करण्याचा...
हा दिवस म्हणजे त्याचा स्मृतीदिन
ज्याने आपल्या प्रेयसीला आपल्या रक्ताने
विक्रम केला पन्नास हजार शब्दांचे
प्रेमपत्र लिहिण्याचा...
तो विक्रम आता कधिही मोडणार नाही
कारण कोणताही प्रियकर यापुढे
आपल्या प्रेयसीवर पाचशे शब्दही
लिहू शकणार नाही...कारण
त्याने विक्रम केला आहे फक्त
तिच्या देहात गुंतण्याचा...
जगभरात हा दिवस आहे प्रत्येकाचे
प्रत्येकावरील प्रेम व्यक्त करण्याचा...
आपल्या देशात मात्र हा दिवस आहे
प्रेमाचाच दिवस करण्याचा...
प्रेम सर्वव्यापी आहे पण आज
प्रेमाची व्याख्या मात्र संकुचित झालेली आहे
माणसाच्या मनासारखी !
त्यामुळे हा दिवस त्यानेच साजरा करावा
ज्याला खरा अर्थ माहीत आहे प्रेमाचा...
प्रेम गुलाबी आहे हेच लक्षात ठेवावे प्रत्येकाने !
ह्या दिवशी त्याला रंग देऊ नये रक्ताचा...
प्रेम हे फक्त देण्यासाठी असते
ते ओरबडण्यासाठी नसते...
दिवस हे लक्षात घेण्याचा...
हा दिवस आहे आपल्या प्रेमावर
प्रेमाने निदान चार शब्द लिहिण्याचा...
या दिवशी गुलाबी रंगात रंगण्यात
काहीच वाईट नाही
फक्त गरज आहे ती आपल्या हृद्यातील
गुलाबी रंग नव्याने शोधण्याचा...
या दिवशी प्रेम व्यक्त करा
पण प्रेमाने प्रेमाशी !
ते स्विकारणे न स्विकारणे
प्रेमावर सोडा प्रेमाने !
धडा देत निस्वार्थीपणाचा...
या प्रेमाच्या दिवशी सर्वानाच
आपले प्रेम मिळत नाही पण
तरीही हा दिवस हक्क हेरावून घेत नाही
कोणाचा कोणावर प्रेम करण्याचा...
हा दिवस कित्येक प्रेमी जिवांना
उर्जा देतो पुढचे कित्येक दिवस
प्रेमात रंगण्याची आणि आदेश देतो
प्रेम समजून घेण्याचा...
या दिवशी मला माझे प्रेम
कधीच मिळाले नाही
म्हणून काय झाले...
मला अधिकार तर मिळाला
जगावर प्रेम करण्याचा...
©कवी- निलेश दत्ताराम बामणे ( एन.डी.)
अस्तित्व तुझे सभोवार
सर्वत्र तुझाच स्पर्शभास
वात्सल्य तुझे लडिवाळ
माते तुझाच अंतरी ध्यास.....
तुझ्याच कुशीत स्वर्गसुख
पान्हा, तुझा अमृती घास
तव आशीष कवचकुंडले
आठवे तुझे रूप निरागस.....
सत्य! तुच जननी सृष्टिची
निरपेक्ष तुझाच गे सहवास
आज अंतरी अस्तिव तुझे
मज सावरिते क्षणाक्षणास....
साक्षात, तुच गे देवदेवता
तुझ्या, उदरी ईश्वरीय वास
मातृत्व! एक ब्रह्म शुचिता
लाभते जन्मी भाग्यवंतास....
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २४१
१९/९/२०२२
माझे मन आहे चण्याची पुडी
जड विचारांची तळाशी बुडी
भरले आहेत चणे फुटाणे
तेच चव साधती साधेपणे
मावत नाही काजू अक्रोड
कशास हवी ती डोकेफोड ?
लांब ठेविले बदाम मनुके
यास्तव मन हे हलके फुलके
चणा वाटतो आपलाच सहज
बाकी भासती किंमती ऐवज
नको बेदाणे खारीक पिस्ते
तेच घडविती विवाद नस्ते
चघळत बसतो एक चणा
मुरवत त्यातील साधेपणा .
-अजित देशमुख .
नभांगणी मेघ जमू लागले,
बघतां बघतां, बरसू लागले, तुझ्यासाठी रे नयन,
असे सतत तरसू लागले,--!!!
धरणी संजीवनात नहाते,
अंगांग तिचे जसे भिजे,
प्रेमवर्षावी तुझ्या बघ,
पंचप्राण तसे आसुसले,--!!!
वाऱ्यावादळांनी होई जसे, रोमांचित तन धरणीचे,
तसेच तुझे येणे भास
कणकण उठती शहाऱ्यांचे-!!!
धरणीचे स्वरूपच हिरवे,
तरो -ताजेपण तिचे,
काया होत टवटवीत,
तसेच हिरवेपण भरले,--!!!
माझे स्त्रीत्व,; तुझे येणे,
तुझे माझे एकरूप होणे,
धरणीचे पावसात भिजणे,
मग तिला राहील काय उणे,--?
उपजही जशी बदले,
धरणी कृतार्थ किती रे,
तिचे लेकुरवाळेपण
बनते जणू परिपक्व रे,--!!!
© हिमगौरी कर्वे.
जगाला कधीच
न पडणारी कोडी
मला पडलीच नसती ...
ती कोडी सोडविण्यात
माझ्या आयुष्याची वर्षे
खर्ची पडलीच नसती...
भूत भविष्य वर्तमानाची भुते
माझ्या मानगुटीवर
कधी बसलीच नसती...
देवाच्या अस्तित्वाचा शोध
घेण्याची गरज मला
वेड्यागत भासलीच नसती...
माझी नजर फक्त सुखावर असती
तर दुःखाची धग मला
कधी लागलीच नसती ...
प्रेमातील वासना आणि
वासनेतील मुक्ती शोधली नसती
तर मला खरे प्रेम शोधण्याची
गरज कधी जाणवलीच नसती....
भल्या भल्यानां न सुटणारी कोडी
मला सहज सुटलीच नसती
निरर्थक जीवनातील निरर्थकता
मला कधी पटलीचं नसती...
भविष्याच्या उदरात शिरण्याची
माझी हिंमत झालीच नसती
भविष्यातील कोडी मला
स्पष्ट दिसलीच नसती...
माझ्या सभोवताली स्वैराचार
बोकाळला असताना
माझी समाधी लागलीच नसती ...
मी अज्ञानी असतो तर जगाला
उत्तरे देण्याची वेळ
माझ्यावर आलीच नसती...
माझ्या मेंदूत सारी
ज्ञानाची भंडारे नसती
तर अज्ञानात माझ्या भोवती
सुखे नांदली असती...
©कवी - निलेश बामणे
कृष्ण कमळ-
Copyright © 2025 | Marathisrushti