प्रेम आणि आसक्ती
यातील फरक जेव्हा
कळला तेव्हा
एक गोष्ट लक्षात आली...
आधी प्रेम की आधी आसक्ती
हा क्रम व्यक्तीसापेक्ष असतो..
तरीपण आपण प्रेमही करतो
आणि आसक्तीही....
परंतु आसक्तीची सक्ती
कधी होते हे कळतच नाही
आणि प्रेम
बेवारशी होते.....
-- सतीश चाफेकर.
काय म्हणू ग तुजला देवकी भाग्यवान की अभागी
ईश्वर तुझीया उदरी येवूनी सुख न लाभले तुजलागी //
जन्मोजन्मीचे पुण्यसाचुनी मात्रत्व लाभे स्त्रिजन्माला
तु तर असता जननी प्रभूची तुजविण श्रेष्ठ म्हणू कुणाला //
राज वैभवी वरात निघता कारागृही तुज घेवून गेले
अवताराची चाहूल असूनी दुःखी सारे जीवन गेले //
कंसाने तव मुले मारीली निष्ठूर होऊनी स्वार्थापोटी
तु गिळून घेशी दुःखे सारी आगमन प्रभूचे होण्यासाठी //
ईश्वर येता तव उदरी भाग्यवान तू ठरलीस
जनकल्याणा त्यागूनी त्याला सर्व श्रेष्ठपदी गेलीस //
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
तो तर देत नसतो कांहीं,
घ्यावे लागते खेचूनी ।
शक्ती लावूनी खेचा सारे,
देईल परि ढील सोडूनी ।।१।।
जरी असला दयेचा सागर,
केवळ मागणें मान्य नसे ।
तुटून तुमचे प्रयत्न होता,
ओजळीने तो देत दिसे ।।२।।
व्यर्थ घालवी जीवन कांही,
स्वार्थीपणाच्या मागणी पायी ।
वेडे ठराल तुम्हींच परि,
काळ मात्र कधी थांबत नाही ।।३।।
धडपड करा, लुटून घ्या
सांघिकतेच्या भूमिकेतूनी ।
जाच न होई दुजास त्याचा,
हीच भावना उरी बाळगूनी ।।४।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
आता जगणे अंगवळणी पडले
जगी मी डोळे झाकुनी चालतो
टाळुनीयाच वेडीवाकडी वळणे
सन्मार्गावरी, सावरूनी चालतो
शब्दाशब्दांचे अर्थ सहज जाणतो
जर दिला शब्द कुणा तो पाळतो
ऋतुऋतूंचा, जरी असे बेभरोसा
कालचक्र भाळीचे, निमूट झेलतो
जरी उध्वस्त स्वप्ने सारी अंतरीची
गुच्छ आशांचे मी हळुवार गुंफीतो
हृदयांतरी सुगंधाच्याच अत्तरकुपी
माझ्याच भावगीतातुनी मी हुंगतो
लोचनी सांजळलेली तिन्हीसांजा
त्या सोज्वळ निरांजनी मी नाहतो
अंतरात नित्य प्रतीक्षा आकांक्षांची
बाहू पसरूनी मुक्तीची वाट पाहतो
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १३५
१५ - १० - २०२१.
दुःख असे मानव निर्मित
जाणती हे सगळे
परि दुःखात शोक करिती
हे कुणा न कळे
आपण कर्म केलेले
आपणचि भोगतो
फळ कर्माचे आलेले
तेच आपण चाखतो
आहे तुजसी हे ज्ञान
माहीत सर्वाना
खंत द्यावी सोडून
नको दाखवूं भावना
इतरांसाठीं आहे
ती भावना उदरीं
सहानुभूती पाहे
इतर जनांचे पदरी
शोक भावना दाखवी
तुझ्या दुःखाची
नसतां तुज निर्दयी ठरवी
हीच भीति जनाची
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
येरे मना, येरे मना
नको जावू दूर, दूर, दूर
येथे नाही रे आता
जीवाला हुर, हुर, हुर.....।।धृ।।
सोडूनी दे रे, ते तुझे
नवे, नवे बहाणे
सोडूनी दे रे ते तुझे
आज इथे अन उद्या तिथे
झुळझुळणाऱ्या वारुसंगे
नकोस उधळू दूर, दूर, दूर....।।१।।
चल पाहू या रे
विवेकी सुंदर गांव
चल घेवूया या रे
शांती सुखाचा श्वास
करू निर्धारी ते
दुःख पहाडी दूर, दूर, दूर....।।२।।
येईल रे येथे सारे
मंगलतेचे वारे
असेल येथे सारे
स्वर्गसुख ते सारे
सोडूनी ये सत्वर
स्वार्थ तुझा दूर, दूर, दूर....।।३।।
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २७९
१/११/२०२२
शत्रु तुमचा तुम्हींच असूनी तुम्हींच कारण दुःखाचे ।
सर्व दुःखाच्या निर्मितीपाठीं हात असती केवळ तुमचे ।।
बी पेरतां तसेंच उगवते साधे तत्व निसर्गाचे ।
निर्मित असतो वातावरण क्रोध अहंकार मोहमायाचे ।।
कसे मिळेल प्रेम तुम्हांला घृणा जेंव्हां तुम्हीं दाखविता ।
क्रोध करुन इतरांवरी मिळेल तुम्हांस कशी शांतता ।।
शिवीगाळ स्वभाव असतां आदरभाव कसा मिळे ।
शत्रुत्वाचे नाते ठेवतां सलोख्याचा सांधा ढळे ।।
इच्छा मात्र असते सुखाची सदैव मिळावा आनंद ।
शक्य होण्या वातावरणी हवा प्रेमळ सुसंवाद ।।
वागतां कसे या वरती आवलंबून सारे असे ।
वाईट वागण्याचे बी पेरुनी चांगले उगवेल कसे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
वाऱ्यावरती हलती तरुलता,पाने,फळे त्यातून बहरती,
निसर्गाची किमया सारी,
मानवा तू शिकणार कधी,-!!!
सारी संपत्ती निसर्गाची,
तुझा देह ही केवळ माती,
का एवढी अहंता बाळगी,
मातीमोल सारे,मिळता गती,-!!
मी, माझे, माझे करत राहशी,
वृत्ती का नसावी समाधानी,--?
धरातली नच तुझे काही, ---
तुज याची जाणीव नाही,--!!!
त्याग शिकवतो निसर्ग केवळ,
दातृत्व त्याचे मोठे किती,
कळले ज्याला तो कधीही,
स्वतःची न गाणार महती,--!
काय देशी तू झाडांना,
कचरा म्हणुनी खतपाणी,
झाड काय देते तुज,
विचार कर ध्यानीमनी,--!!!
ओरबाडशी तू त्यांना,
सरळ सरळ घाव घालीशी,
जे हवे ते तोडून नेशी,
निर्घृणता ही कायमची,--!!!
तरीही देती थंड सावली,
तक्रार त्यांची कुठलीच नाही,
अत्याचार त्यांच्यावर करशी,
बळी जाशी ना तूच शेवटी,--!!!
हिमगौरी कर्वे.©
हे शशिधरा तूं प्रेमळ सखा साऱ्या विश्वाचा
सौंदर्याचे प्रतिक असूनी राजा तूं नभाचा
लागूं नये तूज दुष्ट म्हणूनी काजळ लावी तुला
काही वेडे त्यास समजती तू डागाळला
डाग कसला तुम्ही मानतां प्रेमामध्ये तो
दोन मनांतील पवित्र नाते हे आम्हीं विसरतो
समजूं शकतो नीती बंधन समाज रचनेचे
बळजबरीच्या कृत्यास तुम्ही म्हणावे पापाचे
गुरू पत्नीशीं प्रेम करिता लौकिक गेला तो
दोघांची साथ ती मिळतां गुन्हा कसा होतो ?
एक दिशेने प्रेम साधतां अर्धवट राही
दोघांमधली मनाची ओढ ती समाधान देई
'नीती मार्गे' कुणी म्हणतील चंद्रकृत्य चुकले
प्रेमाच्या परि अथांग सागरी तळांत ते बुडाले
डॉ. डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
माकडांची एकदा, भरली शाळा |
मास्तर झाला, चिपांजी काळा || १ ||
वानर चेले शिकू लागले |
धडे सगळे गिरवू लागले || २ ||
पट पट मारू कोलांटी उडी |
नाही तर बसेल, वेताची छडी || ३ ||
भरभर म्हणू, हूप हूप हूप |
शेपटीला लागेल शेरभर तूप || ४ ||
दास आपण राजा रामाचे |
खेळ खेळू पराक्रमाचे || ५ ||
जेवणाच्या सुट्टीत खाऊ या शेंगा |
तोवर करू खूप खूप दंगा || ६ ||
एकटे दुकटे फिरायचे नाही |
टोळक्या बाहेर जायचे नाही || ७ ||
जो कोण मारेल शाळेला बुट्टी |
होईल त्याची हकालपट्टी || ८ ||
नाक खाजवून चिडवलं तर |
मुलं उडवतील आपली टर || ९ ||
पुरे झाला आता नकलांचा खेळ |
संपली आजची शाळेची वेळ || १० ||
माझी ही कविता पुणे आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झाली असून, माझ्या काव्यसंग्रहात प्रसिद्ध झाली आहे,
© कवी उपेंद्र चिंचोरे
25 may 16
Copyright © 2025 | Marathisrushti