विसरण्यातच लपला आहे, आनंद जीवनाचा
आठवणीचे द्वार उघडता, डोंगर दिसे दु:खाचा...१
दृष्य वस्तूचे मिळता ज्ञान, असे जे बाह्य जगीं
आकर्षण त्याचे वाटत असते, सदैव आम्हां लागी....२
वस्तूच्या त्या होवूनी आठवणी, सुख देई आम्हांला
क्षणिक असती सारे सुख, दु:ख उभे पाठीला...३
उपाय त्यावरी एकची आहे, विसरून जाणे आठवणी
विसरूनी जातां त्या सुखाला, दु:खी होई न कुणी...४
एकाग्र मनाची स्थिती म्हणजे, दुसरे काही नसे
जाता विसरूनी स्वत:लाही, जगास विसरत असे ... ५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
छत्रपती शिवाजी महाराज
विचारावे कोणी मला
आणि मी सांगावे
माझा आदर्श कोण ?
छत्रपती शिवाजी महाराज
आणखी कोण ?
इतिहासातील आवडती तुझी
थोर व्यक्ती कोण ?
देवतुल्य शिवराय आणखी कोण ?
इतिहास भिनलाय
माझ्या नसानसात
मराठ्यांच्या शौर्याचा
त्यांच्या चातुर्याचा आणि
धर्मावरील प्रेमाचा...
शिवराय नसते तर ?
मी ही नसतो नाही ?
हा प्रश्न नाही तर
एक विचार आहे...
महाराष्टाला ज्याने
अस्मिता दिली
हिंदुत्वाला ज्याने
संजीवनी दिली
हिंदूंना ज्याने
अभिमान दिला
ते माझे राजे
छत्रपती शिवाजी महाराज...
मी त्यांना रोज मनात स्मरावे
हृदयात जपावे आणि
वर्तनात उतरून दाखवावे
त्यांच्या जयंती दिनी
फक्त करावी याची उजळणी...
हीच आहे माझी त्यांच्या
पवित्र चरणी
पुष्पांजली...
कवी - निलेश बामणे
आयुष्याच्या वाटेवर अचानक एक दगड आला ठेच लागूनी पायाला देह तिचा कोसळून पडला ज्यावर होता विश्वास खूप तोच टाळून निघून गेला अश्रू आले अलगद गाली पापण्यांतून सडा गेला आजवर त्यांनी जे काही होतं जपलेलं सारं क्षणात होतं तिथे पसरलेलं प्रेमळ त्या संसाराचा पाया पार खचून गेला
अजुनही एकांतात
कधी तिला आठवते
कोवळ्या त्या मनाचे
सुंदर गोड स्वप्न ते...
त्याला पाहुन
तिचं मन झुरलं होतं
कळलं नव्हतं तिला
पण ह्रुदय हरवलं होतं
बसल्या बसल्या बोटानं
वहीत रेषा ओढत होती
स्वतःच्या नावापुढे
त्याच नाव जोडत होती
झुरलेल मन तिचं
शब्द शोधत होतं
भावनां व्यक्त करण्यास
बळ शोधत होतं
ओठांवरच्या शब्दांना
कंठ नाहीच फूटला
हळुहळू मोगऱ्याचा
तो बहरही ओसरला
अल्पायुषी भावना ती
अशी न झुरता मेली
रेंगाळलेल्या पावलांनी
बोहल्यावर ती चढली
दूर राहिलेल्या वाटेसाठी
मन नाही अडखळलं
वास्तवाच्या हिरवळीवर
अगदी आनंदान रमलं...
अजूनही एकांतात
कधी तिला आठवते
पडलेले गोड स्वप्न ते
हसुन झटकून टाकते.
- डॉ.सुभाष कटकदौंड
पोस्टाची खिडकी
टपालासाठी
रेल्वे ची खिडकी
तिकिटासाठी
सिनेमाची खिडकी
हाऊसफुल्ल साठी
नाटकाची खिडकी
श्री. सौ. साठी
खिडक्याच खिडक्या
त्यांना काय तोटा
कुठे जाल तिथे पडेल
त्यांच्याशी गाठ
सापडेल का कुठे?
कल्पवृक्षाची खिडकी?
सापडलीच तर
एकच वाटते खंत
पाळी येईल तेव्हा
ती होऊ नये बंद!
-- विनायक अत्रे.
मनी वाटते नाम तुझे, सदैव मुखी यावे,
कर्तव्या माजी एकाग्र असतां, कसे बरे हे व्हावे ?
कोडे हे उकलून घ्यावे......।। धृ ।।
श्वास चालतो रात्रदिनीं,
लक्ष्य न घेई खेचूनी,
ऊर्जा मिळते देहातूनी,
परि मनास बंधन नसावे....१,
कोडे हे उकलून घ्यावे
एकचि कार्य एके क्षणी,
एकाग्रता येई दिसूनी,
अवसर मिळे मग कोठूनी,
त्याच घडीला कसे नाम घ्यावे......२,
कोडे हे उकलून घ्यावे,
संसाराचे ‘जू’ मानेवर,
ओढण्यासांगे ईश्वर,
मार्ग सारे असता खडतर,
कसे त्यास वळवावे पाहावे......३,
कोडे हे उकलून घ्यावे.
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
विश्व सारे निर्मिलेस,काय असावे तुझ्या मनात,
हेतू असावा का निरलस,
खेद वाटे आज अंतरात,---!!!
ग्रह गोल ब्रम्हांड तारे,
निसर्ग चराचर वारे,
आज दिसती सारे भोगत, सातत्याने जणू दिनरात,--!!!
प्रदूषणे पृथ्वीला घेरत, मनुष्यप्राण्यात फक्त स्वार्थ, अहंकार कधी न जात,
सांग ठेवले काय दुनियेत,--?
लतावेली, झाडेझुडपे,
सगळे दुःखी प्राणिजात,
समस्या सगळ्या या वेढत,
अशात तू काय मिळवलेस,--?
पसारा सभोवार असत,
जिकडे तिकडे फक्त उध्वस्त, सृष्टीची फक्त वाट लागत,
कोणते समाधान मिळवतोस,!-
सौंदर्य देखणे निर्मिलेस,
त्यास क्षणभंगुरतेचा शाप,
कोणी न देई कोणास हात,
मर्म जीवनात काय ठेवलेस,--!!
© हिमगौरी कर्वे.
काही बाण खूप खोलवर, जिव्हारी लागतात
भरलेल्या भासूनही जखमा विव्हळत रहातात
काही क्षण अश्वत्थाम्याची जखम होतात
आयुष्य सरल्यावरही वेदनांना जिवंत ठेवतात
एकाकीपण झाकायला आपल्या सावल्या पसरत जातात
नि शरमेची टांगती शवं सारायला हात तोकडे पडतात
हातांनी झाकला तरी चेहेरा स्वतःला खिजवत रहातो
स्वत:पासून पळायचं असूनही पाय थिजवून ठेवतो
वास्तवाची नग्नता रहाते सारं आभाळ व्यापून
'सुखी माणसाचा सदरा' विरविरतो लक्तरं होऊन
हर एक सकाळी जिवंत असणं असावं का हे वरदान
का लिखिताच्या अभिशापाने असावं फर्मावलेलं दंडविधान
जळजळता अनाहूत, कलंक भाळी लेवून
जीवनाला सामोरं जाणं मान वर करुन
भार शिक्षेच्या कवचकुंडलांचा अंगावर धारुन
खूप आतून यावा लागतो निर्धार हुंकार होऊन!
सोनं होणं नशीबी नसलं तरीही
आगीतून जाणं क्रमप्राप्त होतं
आपल्या सजेचा खलिता गळ्यात टांगून
पाय ओढत रहाणं आपल्याला भाग असतं
वावटळीने विखुरलेल्या मनाची जुळव चिवटपणाने करतो
आश्वासित आत्म्याला तो, माझ्या अस्तित्वाचा पुनः शोध असतो
खंतेच्या खळग्यांवर आठवणींचे दगड ठेवून
कालच्या काळोखाकडे मी जेव्हा पाठ फिरवतो
उद्याच्या उष:कालाच्या किरणांवर चालत रहाणं
हा एकच मार्ग तेव्हा मला खुला असतो
-यतीन सामंत
Copyright © 2025 | Marathisrushti