(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • आरती निद्रादेवीची

    जयदेवी जयदेवी जय निद्रादेवी
    तुजविना करमेना मज होई लाही
    जयदेवी जयदेवी ......... !!

    तुझ्या प्राप्तीसाठी मी खाई अॅस्प्रो
    किंवा जाऊनी बैसे रॉक्सीत वा मेट्रो
    डोळ्यावर बांधुनी पाण्याच्या पट्ट्या
    तरीही झोपेचा झाला बोलबट्ट्या

    जयदेवी जयदेवी..... ।।१।।

    अर्धांगी गायी ते अंगाई गीत
    होईल त्यामाजी बिल्डिंग जागृत

    अखेरी वाचीत बसतो कविता
    तुझ्यासाठी खाव्या मी किती खस्ता
    जयदेव जयदेवी.... ।।२।।

    व्हिस्कीचे रिचवुनी पोटात पेले
    बेरके कवडे काहीही बोले
    परंतु तुजला दयेचा लेश
    तुजला लाजला शिव महेश
    जयदेवी जयदेवी .......।।३।।

    आता मात्र बाबा कमाल झाली
    निद्रेवाचून होई जीवाची लाही
    घेऊन हातात कवितेचे बाड
    माझेच बसलो करीत लाड
    जयदेवी जयदेवी ..... ।।४।।

    लागली लागली तुझी चाहूल
    तुझ्याविना माझा जीव व्याकूळ
    वाचीत वाचीत झोपून गेलो
    दिव्याची आठवण विसरून गेलो
    जयदेवी जयदेवी ..... ।।५।।

    -- द्वारकानाथ शं. वैद्य (जयंता)

  • आस…

    ओळीने चालल्या
    बगळ्यांच्या रांगा
    हा निरोप अमुचा
    त्या ढगांना सांगा

    तहान लागली
    धरतीच्या लेका
    थेंब पावसाचे
    जमिनीत टाका

    पुरे झाली आता
    दुष्काळाची सजा
    पाषाणहृदयी तू
    होऊ नको राजा

    झाडांना दे पाणी
    जनावरांना चारा
    धान्याची बरकत
    जीवांना निवारा
    ओळीने चालल्या...

    -- © विठ्ठल जाधव
    शिरूरकासार (बीड)
    सं. ९४२१४४२९९५

  • संस्कार

    काहीतरी आहे असे जे ....
    साथ होते साथ आहे!
    राख मी होईन तेव्हा ..... .
    जाईल! म्हटले जात आहे!

    वय तयाचे कोवळे .......
    म्हातारेही तितुकेच आहे!
    वाढले माझ्यासवे ते ....
    माझ्यात मुरले आत आहे !!!

    ......... मी मानसी

  • जादू

  • जीवन आनंद

    ह्या जीवनाच्या अस्तित्वाचे, ध्येय कोणते खरे ।
    उत्तर याचे कुणा मिळेना, आज पावतो बरे ।।

    संतसाधू आणि ज्ञानीजन, बहूत ते झाले ।
    समाधानी परि एक मताचे, उत्तर नाही दिले ।।

    खेळखेळणे उड्या मारणे, अन् खाणे पिणे ।
    बालपणीच्या आनंदाला, नव्हते काही उणे ।।

    विसरून जाता खेळ उड्या अन् , प्रेम करू लागलो ।
    यौवनाच्या उंबरठ्यावरी, बहरून गेलो ।।

    संसार करिता कळले आम्हा, जीवन दुजासाठी ।
    प्रौढवयाची वर्षे घालविली, समाज सेवेपोटी ।।

    वृद्धत्वाचा काळ येता, ओढ लाभली प्रभूची ।
    आहिक सुख त्याग करुनी, जीवन मुक्तीची ।।

    एक एक ती पायरी चढलो, जीवन शिडीवरी ।
    शोधीत होतो 'आनंद' तेथे, मिळेल काहीतरी ।।

    हर घडीला रूप निराळे, होते आनंदाचे ।
    गुंतले होते संबंध तेथे, तन मनाचे ।।

    ओढ प्रभूची लागली, जेंव्हां थकूनी गेला देह ।
    संसारातील सर्व सुखाचा, निघून गेला मोह ।।

    मृत्यूच्या जवळी जाता, विरून जाईल तमनम ।
    कोठून आला कोठे गेला, याची न येई जाण ।।

    आता त्याचा आनंद कोठे, असेल तो गुंतला ।
    देहमनाचे वेष्टन नव्हते, ज्या घटकेला ।।

    हा तर आहे केवळ ‘आनंद’ दुजा नसे काही ।
    ‘आत्मा’ ‘मुक्ती’ अशा परि यालाच नावे देई ।।

    --डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • जातानाचे शब्द

    हा अतिशय सुंदर लेख शेअर करतोय. लेखक माहित नाही.


    "मी असा काय गुन्हा केला ?" हे शब्द मा. प्रमोद महाजन यांनी, मा.गोपीनाथ मुंडे यांच्याजवळ, आपल्या अंत समयी उच्चारले होते. आपल्या सख्ख्या भावानेच गोळ्या घातल्यावर विचारांच्या कल्लोळातून त्यांना असे व्यक्त व्हावेसे वाटले होते.

    "अरे, अरे हे काय करताय ?" असे इंदिराजींनी अतिशय अविश्वासाने आपल्या मारेक-यांना विचारले होते. महात्मा गांधीजींचे जातानाचे शब्द होते, "हे राम" तर चाफेकर बंधू किंवा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी "वंदे मातरम" म्हणत मृत्यूचे स्वागत केले होते. तर "मी या स्वार्थी जगात आता राहू शकत नाही",असे म्हणून साने गुरुजींनी जीवनयात्रा संपवली आणि सात भाऊ असते तरी मातृभूमीसाठी दिले असते. आता माझे काम संपले असे ठामपणे सांगून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी प्रायोपवेशन केले.

    एखाद्याचे जातानाचे शब्द नेमके काय असतात याची आपल्याला अतिशय उत्सुकता लागून राहिलेली असते. एखादे वयोवृद्ध वडील गेल्यावर जेव्हा नातेवाईक भेटायला येतात तेव्हा "काय म्हणाले हो ते जाताना ?" असे हमखास विचारले जाते. अगदी बोलायला यायला लागल्यापासून आपण अगणित वाक्ये बोलतो पण आयुष्याच्या अंतकाळी जे बोलतो ते खरेखुरे असते. त्यात खोटेपणाचा, दांभिकपणाचा, "मी"पणाचा लवलेशसुद्धा नसतो.

    ब-याचवेळा आयुष्यातल्या चुकांची किंवा पापांची कबुलीही असू शकते. बालपण संपल्यानंतर इतका मनाचा निरागसपणा यापूर्वी कधीच अनुभवता आलेला नसतो. कदाचित समोर दिसत असलेल्या मृत्यूमुळे ख-याखु-या जीवनाची जाणीव, आयुष्य संपताना होत असावी.

    एक एकांकिका पाहिली होती. लेखकाने कल्पना अशी केली होती की, पराभव दिसायला लागल्यावर अडॉल्फ हिटलरने आपल्या नवपारिणित वधूसह आत्महत्या केली होती. मग ज्या रात्री त्याने आत्महत्या केली त्या रात्री त्याचा त्याच्या बायकोशी नेमका काय संवाद झाला असेल ? अतिशय कल्पकपणे दोघातले द्वंद्व त्यांनी उभे केले होते. पत्नीला जगायचे होते, सर्वसामान्य माणसाप्रमाणे संसार करायचा होता. पण हिटलरला शत्रूच्या हातात सापडायचे नव्हते. त्याला आपला अपमानास्पद मृत्यू नको होता. त्यामुळे आत्महत्येशिवाय त्याला दुसरा मार्ग दिसत नव्हता. आसक्ती आणि विरक्ती यातले नाट्य पाहताना दोघांनीही जीवनाच्या तत्त्वज्ञानावर केलेले भाष्य हा या एकांकिकेचा विषय होता. पत्नीच्या मनात मृत्यूच्या कल्पनेने आलेली थरारकता आणि त्यातून निर्माण झालेली अगतिकता ही मनाला स्पर्शून गेली आणि हे मृत्यू, मी मला हवा तसा जागलो, आता हवा तसा मरणार हा हिटलरच्या मनातील ठामपणा पाहताना थरारून गेलो.

    जगणे आणि मरणे यात फार मोठा वैचारिक खंदक असतो. तो पार करण्याची इच्छा फार कमी जणांची असते. आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाला त्या खंदकापर्यंत जाऊच नये असे वाटत असते. कारण जगण्याची आसक्ती प्रत्येकालाच असते. तिथे मृत्यूचे स्वागत कोण आणि कसे करणार ? सगळी कल्पना असते बरं का, की, आयुष्यात मी आणि माझे करत इतकी संपत्ती आणि इतक्या वस्तू गोळा केल्यात पण यातली एकही वस्तू मृत्यूबरोबर घेऊन जाता येणार नाही. वेगवेगळ्या फॅशनचे कितीही महागडे कपडे घातले तरी जन्माला येताना ××××आलोय आणि मरतानाही तसेच जायचंय. येताना दोघांमुळे आलोय आणि मेल्यावर चौघांच्या खांद्यांवरून जायचंय. आपण एकटे काहीच करू शकत नाही पण तरीही प्रत्येक हाव काही सुटत नाही. हे माझे, ते माझे, माझेही माझे आणि त्याचेही माझेच अशी आपली नेहमी भावना असते. ही भावना बोथट होते, जेव्हा मृत्यू समोर दिसायला लागतो. प्रत्येक चर्चमध्ये जशी कन्फेशन बॉक्स असते तशी काल्पनिक बॉक्स मृत्यूच्या जाणिवेने तयार होते. आयुष्यात जे बेफामपणे वागलो, बोललो ते आठवू लागते. आयुष्यावर चढलेली खोटेपणाची आणि दांभिकतेची पुटे ढासळू लागतात. लहान बाळाची निरागसता मनात येऊ लागते. राग-लोभाच्या आहारी जाऊन विस्कटून टाकलेली नाती पुन्हा गोळा करून आणाविशी वाटतात. खरे तर तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. जेव्हा जगायचे असते तेव्हा आपण जगलेलोच नसतो. आणि जगावेसे वाटू लागते तेव्हा मृत्यू समोर येऊन उभा ठाकलेला असतो.

    भाऊसाहेब पाटणकर यांचा सुरेख शेर आहे,

    दोस्तहो, दुनियेस धोका, मेलो तरी आम्ही दिला ।
    जाऊनी नरकात, पत्ता स्वर्गाचा आम्ही दिला ।।
    हाय रे दुर्दैव माझे, सर्वास कळले शेवटी ।
    सारे सन्मित्र माझे, तेथेच आले शेवटी ।।

    आपल्यासारख्या सर्व पापी माणसांचा सर्वात शेवटचा मुक्काम नरक आहे हे त्यांनी नर्मविनोदाने मोजक्या शब्दात पटवून दिले आहे.

    पण काही काही माणसे खरोखरच वेगळी असतात. त्यांना जगण्याचीही आसक्ती नसते आणि मरण्याचीही भीती वाटत नाही. ही माणसे ख-या अर्थाने जीवन जगतात आणि हस-या चेह-याने मृत्यूला सामोरे जातात. सामाजिक कार्यकर्ते ग. प्र. प्रधान यांनी मृत्यू हसत हसत स्वीकारला. आपला काळ जवळ आला आहे हे कळल्यावर त्यांनी आपला पुण्यातील राहता वाडा साधना ट्रस्ट या संस्थेला फुकट देऊन टाकला. आपल्या एका डॉक्टर विद्यार्थ्याच्या हॉस्पिटलच्या सर्वात वरच्या मजल्यावरच्या खोली भाड्याने घेतली आणि स्वतः डाळ भात बनवून मृत्यू येईपर्यंत जगत राहिले. खरे तर तो वाडा विकला असता तर त्यांना करोडो रुपये मिळाले असते. पण आयुष्यभर एक तत्त्वज्ञान उराशी बाळगून जगलेल्या प्रधान मास्तरांनी निस्वार्थीपणे त्यावर पाणी सोडले. पु. लं.नी तर आयुष्यात मिळालेल्या सर्व संपत्तीचा ट्रस्ट केला आणि समाजाकडून मिळालेली सर्व संपत्ती समाजाला परत देऊन टाकली. एक आदर्श जगणे यापेक्षा वेगळे काय असते ? सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून एकविसाव्या वर्षी जिवंत समाधी घेणारे ज्ञानेश्वर माऊली म्हणजे विरक्तीचे टोक ! त्यांच्या जीवनाचाही सोहळा होता आणि संजीवन समाधीचाही ! जीवनमृत्यूची व्याख्या त्यापलीकडे ती काय करायची ?

    अर्थात काही सामान्य माणसेसुद्धा असामान्य पद्धतीने जगतात आणि मृत्यूने आदर्श निर्माण करतात. मुंबईत राहणा-या वसंत त्र्यंबक निकुंभ यांनी पंधरा वर्षांपूर्वी दोन्ही हात पसरून मृत्यूचे स्वागत केले होते. आयुर्वेदाचा गाढा अभ्यास असलेले निकुंभ एखाद्या योग्यासारखे ८३ वर्षे जगले. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे त्यांची रोजची दिनचर्या होती. त्यामुळे त्यांच्या नखात रोग नव्हता. पण एके दिवशी त्यांनी विचार केला की आयुष्यातल्या सर्व जबाबदा-या पूर्ण झाल्या आहेत, लेकी, सुना नातवंडे सारे सुखी आहेत. मग आता जगून काय करायचे ? त्यांनी इच्छामरण घ्यायचे ठरवले. पत्नी जिवंत असताना हा असा निर्णय घेणे म्हणजे आक्रीतच !

    व्यवस्थित नियोजन करून एप्रिल महिन्यापासून हळूहळू एकेक खाद्यपदार्थाचा त्याग करत करत चार महिन्यांनी मृत्यूला त्यांनी बोलावून घेतले. या त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा सर्व नातेवाईकांनी खूप प्रयत्न केला पण ते आपल्या विचारांपासून ढळले नाहीत. तोंडी सांगून ऐकत नाहीत हे लक्षात आल्यावर सर्वांनी त्यांना पत्रे लिहिली आणि 'तुम्ही आम्हाला हवे आहात' असे सांगितले तर त्या प्रत्येकाला स्वहस्ताक्षरात त्यांनी लिहिलेली उत्तरे तत्त्वज्ञानाने भरलेली होती. ती आजही वाचायला मिळतात. ज्याने आयुष्य आणि मृत्यू यांच्यातली सीमारेषाच पूर्णपणे पुसून टाकली आहे त्या माणसाचे तत्त्वज्ञान वाचत राहावेसे वाटते. जग हे मिथ्या आहे हे संतांनीच सांगितले पाहिजे असे नव्हे तर आपले आपल्यालाही ते कळू शकते हे वसंत त्र्यंबक निकुंभ यांच्या पत्रावरून आपल्याला कळते.

    भिवंडीच्या धुंडिराज दीक्षित आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यूसुद्धा असाच आदर्शवत होता. दोघांनाही कर्करोगाचे निदान झाले आणि त्या दिवसापासून दोघांनीही औषधोपचार थांबवला. दीक्षितसर सेवानिवृत्त शिक्षक होते. त्यांनी आपल्या मुलांना सांगितले की कर्करोगावर औषध नाही हे मी मुलांना शिकवायचो. मग मीच औषधोपचारावर तुम्हाला खर्च करायला का लावू ? ते पैसे तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरा. आम्ही तृप्त आहोत, आम्हाला जाऊ द्या ! आणि खरोखरच त्या दाम्पत्याने कर्करोगाच्या वेदना शांतपणे सहन करत धीरोदात्तपणे जगाचा निरोप घेतला.

    ज्याला जन्म आहे त्याला मृत्यूसुद्धा आहेच ! जेवढ्या आनंदाने आपण जगण्याचा आनंद घेतो तेवढ्याच आनंदात मृत्यूचेसुद्धा स्वागत करायला हवे आणि आयुष्यभर असे जगायला हवे की मृत्यूसमयी अपराधीपणाची भावना फिरकता कामा नये...

  • ईश अस्तित्वाची ओढ

    उंच उंच जावूनी झाडे चुंबीत होती गगनाला ।
    चंद्र चांदणे, भव्य पर्वत आणिक नदी नाला ।।
    किती आनंद तो मनी जहाला बघूनी निसर्ग शोभा ।
    गुंग होऊनी नाचू लागलो सुटला चित्त ताबा ।।
    सुंदर वाटे रूप आपले बिंब बघता दर्पणी ।
    पोंच मिळते समाधानाची केवळ अंतर्मनातूनी ।।
    पूजा करीता तल्लीन होई मूर्ती बघूनी देवाची ।
    शक्तीमान ते रूप समजूनी विस्मृती होई स्वत:ची ।।
    निसर्ग, देह वा वस्तू असो, अस्तित्व ईश्वरी जेथे ।
    उचंबळती प्रेम भावना एकरूप होण्या त्याते ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • मिटलेलं पान

    तुटलेल्या नात्यांचे
    जरतारी पदर
    त्या ना मायेची उब
    प्रेमाची कदर
    गाठीगाठीत फक्त
    बोचरे आठव
    कशास मिरवायचे?
    भरजरी पाटव !……… १

    तो पाठीवर हात अन
    डोळ्यात पाणी
    ते तुडुंबलेलं मन
    श्वासात गाणी
    क्षणाक्षणाने दिलं
    जीवनाचं दान
    उघडेल का कोणी ते?
    मिटलेलं पान !………… २

    .....मी मानसी

  • चिंतन

    ज्याचे चिंतन आम्हीं करितो
    तोच 'शिव ' ध्यानस्थ भासतो
    स्वानुभवे चिंतन करुनी
    चिंतन शक्ति दाखवितो १

    जीवनाचे सारे सार्थक
    अन्तरभूत असे चिंतनांत
    चिंतन करुनी ईश्वराचे
    त्याच्याशी एकरुप होण्यात २

    सारे ब्रह्मांड तोच असूनी
    अंश रुपाने आम्हीं असतो
    जेव्हां विसरे बाह्य जगाला
    तेव्हांच तयात सामावितो ३

    चिंतन असे निश्चीत मार्ग
    प्रभुसंपर्क साधण्याचा
    लय लागूनी ध्यान लागतां
    आनंदीमय होण्याचा ४

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bbknagapurkar@gmail.com

  • बहिणीची एक ईच्छा

    विसरू नकोस मजला माझ्या भाऊराया
    नाते अतूट असते घे, हे समजुनिया

    आठव सारे बालपण कसे गेले खेळांत
    भांडत होतो, रुसत होतो सारे केले प्रेमांत
    ओवाळणीची तुझी सुपारी ठेवली मी जपुनी
    आठवण होता तुझी मजला काढून बघते पेटीतुनी
    जाणीव आहे मजला संसार जीवनाची
    कर्तव्ये पडली शिरावरी तुझाच संसाराची
    खूप प्रेम दे वाहिनीला संसार कर सुखाने
    काढून ठेव अल्पसे प्रेम देण्या मज त्या साठ्यातुनी
    वर्षातून एके दिवशी बांध राखी प्रेमाची स्वार्थी आहे रे मी काढते तुझाच आठवणी
    डॉ. भगवान नागापूरकर
    9004079850
    bknagapurkar@gmail.com