आता दुनियेत| होती खूप हाल|
सुकलेत गाल| शोषितांचे||१||
पाहिले अनेक|दु:खी जीव येथे|
चित्त माझे तेथे|पांडूरंगा||२||
करतो मी पूजा|मनी तुझा ध्यान|
नाही मला भान|देवा आता||३||
थोडी जनसेवा| हातून घडावी|
साथ रे मिळावी| देवराया||४||
भाव पामराचा| समजून घ्यावा|
आशिष असावा| देवा तुझा||५||
पुसू देत डोळे| भरवू दे घास|
जगण्याची आस| वाढो त्यांची||६||
अनाथांचे हास्य| फ़ुलवेन आता|
बनुनी त्यांचा पिता| देतो ग्वाही||७||
-- महेंद्रकुमार ईश्वरलाल पटले(ऋतुराज)
दि. २२/०९/२०१९
जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार
आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार ।।धृ।।
ढग काळे काळे
जमवितोस सगळे
गर्जती वादळे
कडाडूनी विजा, पर्जन्य होई भयंकर ।।१।।
जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार
आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार
तळपते ऊन
दग्ध होई जीवन
जाई वाळून
तेज वाढूनी सूर्याचे, दाह करी फार ।।२।।
जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार
आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार
कड्याक्याची थंडी
भरुनी हुडहुडी
देहाला सिकूडी
गारठूनी जाती, ज्याना नसे घर ।।३।।
जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार
आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार
सुख तुंची देतो
दुःख तूंची देतो
लक्ष्य तूं वेधतो
चमत्काराविणा कसे, आस्तित्व भासणार ।।४।।
जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार
आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
शेतकरी राजा
आहे जगाचा आधार
भुकेचा भार
त्याच्यावरी ..... १
पुण्यवान राजा
खळगी भरवी पोटाची
सार्या जगताची
एकटाच ..... २
गाळूनी घाम
त्यानं फुलवलं रानं
पिकविलं सोनं
शेतामध्ये .... ३
शेताच्या बांधाला
खातो चटणी भाकर
लागते साखर
घामामध्ये ....४
धरणीचा लेक
करी काळ्याईची सेवा
पिकवितो मेवा
जगासाठी. .... ५
करी परोपकार
ह्या सार्या जगावरी
स्वर्ग भूवरी
उतरितो ..... ६
-- कवीराज - महेश पुंड
सतत नाम घेण्यासाठीं, बुद्धी दे रे मजला
आठवण तुझी ठेवण्याची, वृत्ती दे रे मनाला ......।।धृ।।
श्वासात प्राण म्हणूनी, अस्तित्व तुझेच जाणी
श्वास घेण्याची शक्ती, तुझ्याचमुळे असती
जीवनातील चैतन्य, तुजमुळेच मिळते सर्वांना.....१
सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला
अन्नामधले जीवन सत्व, तूच ते महान तत्व
सुंदर अशी सृष्टी, बघण्या ते दिली दृष्टी
आस्वाद घेण्या जगताचा, जागृत ठेवी भावनेला...२
सतत नाम घेण्यासाठी, बुद्धी दे रे मजला
निनादाच्या लहरी, तन्मयतेने श्रवण करी
आभार मान्यता मति, परि शब्दही कमी पडती
जगणेच कठीण वाटते, क्षणभर तुजविण कुणाला...३
सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला
जाणून तव उपकार, मानावे सदैव आभार
ही भावना येते मनी, जावे तुझ्यात समावूनी
रोम रोमातूनी माझ्या, नामाच्या दे गतिला....४
सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
खरेदी केला सुंदर पक्षी, दाम देवूनी योग्य असे ते ।
नक्षीदार पिंजरा घेवूनी, शोभिवान केले घरातें ।।
प्रात:काळी उठोनी बघतां, चकित होवूनी गेलो मनीं ।
पक्षानें मान टाकली, पडला होता तळात मरूनी ।।
क्षणभर मनी खंत वाटली, राग आला स्वकृत्याचा ।
अकारण हौस म्हणूनी, खरेदी केला पक्षी याचा ।।
किती बरे निच मन हे निराशा तयाला धन हानीची ।
पक्षानेतर प्राण गमविला, विषण्णता परि दुय्यम याची ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
काळ येतां वृद्धपणाचा, विरक्तींची येई भावना ।
निरोप घेण्या जगताचा, तयार करीत असे मना ।।१।।
वेड्यापरी आकर्षण होते, सर्व जगातील वस्तूंवरी ।
नाशवंत त्या, माहित असूनी, प्रेम करितो जीवन भरी ।।२।।
जीवनांतील ढळत्या वेळीं, जेव्हां वळूनी बघतो मागें ।
मृगजळासाठीं धावत होतो, जाणून घेण्या सुखाची अंगे ।।३।।
प्रयत्न केले जरी बहूत, हातीं न लागे काहीं ।
पूर्ण कल्पना येई मनीं, जगण्यात आंता तथ्य नाहीं ।।४।।
उर्वरीत आयुष्याची रेखा, मर्यादेतच आखूनी काढी ।
समज येतां प्रभूचे सारे, समर्पण करीत जग सोडी ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bbknagapurkar@gmail.com
सहवासाचे सुख जेवढे, वियोगाचे दुःखही तेवढे ।
बांधल्या प्रेम बंधन गाठीं, तुटता विसरुन जाती ।।
लपुन बसती दुःख खुणा, समज न येई त्याची कुणा ।
उडून जातां शाल सुखाची, व्यक्त होई मग दुःखे जीवाची ।।
कशास करितो प्रेम असे ते, सहवासाने वाढत जाते ।
फुग्यापरी जातां फूटूनी, दुःख सारे जीवनीं आणिते ।।
दाखव प्रेम त्याच ठिकाणी, बघणार नाही वियोग कुणी ।
केवळ प्रभूचा सहवास, तेच असे वियोगरहीत ।।
प्रेम वाढते प्रभूसहवासे, निस्वार्थी भक्ती त्यांत वसे ।
समरस होता एक रुपानें, वियोग मिटतो क्षणाक्षणाणे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त सहा वर्षांपूर्वी, १ मे २०१० रोजी लिहिलेलें हें काव्य आजही कालानुरूपच (रेलिव्हंट) वाटतें.
१.
सुवर्णमहोत्सव हा
सुवर्णाक्षरांनी लिहा
क्रमांक पहिला' फलक वाहा
असूं देत क्रम नऊ-दहा.
'महाराष्ट्र हें राज्य महा'
फलद्रूप होईल मंत्र हा
अनंत वाट पहा ।।
२.
नंभर-नंबरी सोनें नच हें , फक्त मुलामा वरचा
घोडा-पहिला, कधीच झाला शर्यतीत शेवटचा
मस्तक उन्नत, समारंभ शत, वाद्यघोष उन्मत्त
इमल्याचा या खचतो पाया, कुणां खबर ना खंत ।।
३.
संदर्भ : उष:काल होतां-होतां काळरात्र झाली
अरे पुन्हां आयुष्याच्या पेटवा मशाली ।
(कवी - सुरेश भट)
उष:काल होणें नच , ना संपणार रात्र
चुडे पेटवाया , आशा नुरे नाममात्र
महाराष्ट्रीं दिवा ना समई, काजवा न तारे
वाट उजेडाची बघतां जीव चालला रे !
४.
कालचा अभिमान उज्ज्वल, आज पण अंधारलें
फोल, तरिही ढोल हा - 'भवितव्य फारच चांगलें'!
उंचवाया मान अमुची झुंजला राजा शिवा
लढत राजे आज-उद्याचे कापण्यां अमुचे गळे ।।
५
वाचत भ्रामक प्रगतीपाढा , प्या कटु दुर्गतिकाढा
कळे न तरि - पळतोहे परि गर्तेत चालला गाडा ।।
६ -
राष्ट्राचें-महाराष्ट्राचें नच आतां काहिं खरें
आम्ही बापडे, बांधु झापडें ; आम्हां तेंच बरें ।।
७
सगळी पानें गळती , तरिही पुनश्च रानें फुलती
जरि हत झाली आशा, तरि जागेल पुन्हां खचितच ती
आज जरी महाराष्ट्र-प्रगतिची खात्री नाहीं आम्हां
तरि ठाउक, अवसेमागुन येतिल पुनवेच्या राती ।।
- सुभाष स. नाईक
गोष्टी ऐकायला कोणी नाही
म्हणुन आई माझी रूसली
माझ्याकडे पाहून तेंव्हा
अगदी उदास कोरडं हसली.
नंतर माहित नाही कसे
तिने हात पाय गाळले
खचली ती अन् तिने
कायमचे अंथरुण धरले.
जणु तिची जगण्याची
ईच्छाच होती मेली
मरणाकडे डोळे लावून
वाट पहात राहिली.
एका रात्री बाबा येऊन
माझ्या अगदी जवळ बसले
अस्वस्थ मला बघून
त्यांचे डोळे दूःखाने भरले.
दूसऱ्या दिवशी संध्याकाळी
बाबा नजर चुकवून आले
अन् कोणालाही न सांगता
आईला ते घेऊन गेले.
स्वर्गात आता आई तू
अगदी सुखात असशील
तुझ्या जवळच्या छान गोष्टी
सर्वांना सांगत असशील.
एकांतात बसतो ग मी
पुसत डोळ्यातलं पाणी
तुझी ती प्रेमळ हाक
अजुन ही येते ग काणी.
माहित आहे ग आई मला
तू आता येणार नाहीस
आणि वेळ आल्याशिवाय
मला घेऊन जाणार नाहीस.
कोण कोणासाठी आणि
किती दिवस ग रडतो
आई, तुझ्या गोष्टी आठवत
मी ही आता जगतो.
- डॉ.सुभाष कटकदौंड
Copyright © 2025 | Marathisrushti