विसरून जा भूतकाळ तो,
नजर ठेवूनी भविष्यावरी,
वर्तमानी राहून प्रवाही,
जीवन सारे यशस्वी करी ।।१।।
व्यर्थ होतील प्रयत्न तुझे,
उगाळता गत आठवणी,
खीळ पडेल उत्साहाते,
अपयश आले हे जाणूनी ।।२।।
ज्ञान जगाचे मिळूनी तुला,
जन्म जहाला आजच खरा,
अनुभवी नव बालक तूं,
वाहून नेई जीवन धुरा ।।३।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
फाटलेलं कापड सुई-दोऱ्याने सहज शिवता येतं,
पण फाटलेलं नातं मात्र इतकं सहज जुळत नाही.
सुई प्रत्येक टाका घेताना स्वतः टोचणी सहन करते,
आणि दोरा मुकपणे प्रत्येक फट अलगद भरून काढत राहतो.
नात्यांनाही अशीच एक सुई हवी असते
चुकांची टोचणी स्वीकारणारी,
आणि असा एक दोरा
विश्वासाचा, प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा.
रागाच्या एका क्षणात नाती तुटतात,
पण ती पुन्हा जोडण्यासाठी
संयमाचे असंख्य टाके घालावे लागतात.
शिवलेलं कापड पुन्हा वापरता येतं,
पण शिवणांच्या खुणा कायम राहतात.
नात्यांचंही तसंच असतं...
माफ करता येतं,
पण मनावर उमटलेले ओरखडे सहज पुसले जात नाहीत.
म्हणून शब्द जपून बोला,
अहंकाराला थोडं दूर ठेवा.
कारण सुई-दोरा बाजारात सहज मिळतो,
पण मनापासून जपलेली नाती
पुन्हा पुन्हा मिळत नाहीत.
सुईची टोचणी क्षणभराची असते,
पण तुटलेल्या विश्वासाची वेदना आयुष्यभराची असते.
म्हणून...
नाती शिवताना सुईची टोचणी लागली तरी चालेल,
फक्त विश्वासाचा दोरा कधी तुटू देऊ नका.
कारण दोरा तुटला की,
नाती पुन्हा जुळली तरी
मनाच्या घडीत एक शिवण कायमची राहते...
*नाती जपणं म्हणजे जिंकणं नव्हे,
तर प्रत्येक वेळी थोडंसं स्वतःला विसरून
एकमेकांना पुन्हा पुन्हा स्वीकारणं होय.*
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
नवा चित्रपट बघण्या गेलो, कुटुंबासह चित्र मंदिरी
चित्रगृह ते भरले असतां, प्रवेश मिळाला कसातरी....१,
चित्रपट तो बघत असतां, आश्चर्य वाटले जल्लोशाचे
टाळ्या, शिट्या देवून प्रेक्षक, कौतूक करी नटनट्यांचे....२
वास्तवतेला सोडूनी, रटाळपणे वाहत होते,
वैताग येवूनी त्या चित्राचा, सोडून आलो मधेच मी ते....३,
घरी येवूनी शांत जाहलो, आठवू लागलो बालपण
अशीच होती छायाचित्रे, ज्यांत आमचे रमले मन....४
जीवनामधल्या चक्रामध्ये, बदल फारसा होत नसतो
वयातल्या पायरीप्रमाणे, दृष्टीमध्ये फरक घढतो....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
आपल्याच आत्म्याचा आहे प्रतिबिंब गणवेश आपला
नसतो झाकण्या तो आपल्या शरिराची नग्नता !! धृ !!
शिकत असता शाळेत घालायचो मी गणवेश रोजच
मिरवायचो दाखवत उडालेली शाई त्यावर !! 1 !!
कवी होताच चढला कवीचा गणवेश अंगावर
झाला मग वर्षाव फक्त कौतुकांचा माझ्यावर !! 2 !!
पुर्वी होता गणवेश माझ्याच अंगावर गरिबीचा
काढताच तो चढला माज मलाच श्रीमंतीचा !! 3 !!
वाटले चढवावेच अंगावरी गणवेश दुसर्यांचे
सावरलेच पाहता मन मग त्याखालील काटे !! 4 !!
झाकतात अंग हल्ली रोज नवनवीन गणवेश माझे
उतरविता ते दिसते मला ही नग्न शरीर माझे !! 5 !!
कवी – निलेश बामणे
92-7 तुषार हिल वेल्फेअर सो. श्रीकृष्ण नगर, संतोष नगर,
जन. अ.कु.वैद्य मार्ग, गोरेगांव ( पूर्व ) ,
मुंबई- 65.
मो. 9029338268
मला एकटे, जगण्याचा सराव नाही
जीवनाचा अर्थ अजुनी कळला नाही
सर्वांच्या, बोटास धरुनी मी चाललो
तोल सांभाळणे अजुनी जमले नाही
भोगले भाळीचे, सारेच दिव्य होते
ऋण! जन्मदात्यांचे विसरलो नाही
हात संस्कारांचे लाभले सदा तारणारे
त्या स्पर्शाला! कधीही भुललो नाही
श्रमलो भिजलो साऱ्या ऋतुचक्रातुनी
वेदनांची, कधीच फिकीर केली नाही
वर्दळ सुखदुःखांची अविश्रांत जीवनी
जगतांना, मी कधीच कुरकुरलो नाही
शिकवण! ठेविले अनंते तैसेची रहावे
उमजुनी सारे, जगण्यास टाळले नाही
फुलुनी, उमलावे, गंधुनीया दरवळावे
या सद्गुणां, अजूनही विसरलो नाही
भाग्यवन्त! मजसी लाभला सत्संग
त्या सत्संगा, कदापि मी भुललो नाही
-- वि.ग.सातपुते ( भावकवी)
9766544908
१५ - १ - २०२२.
भारतीय संस्कृती जगातील इतर संस्कृतींच्या तुलनेत अधिक प्रगल्भ आणि आधुनिक जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता ठेवणारी आहे. भारतीय संस्कृतीतील अनेक परंपरांचे आजही अनुकरण केले जात आहे.
काळजाचं पाणी झालं
जेव्हा ती माझ्याशी बोलली
मी तुझ्यावर प्रेम करते
माझ्यावर तु करशील का ?
सांग सख्या माझ्यासाठी
सर्वस्व तुझे देशील का ?
मी ही तीला हो म्हणालो
आय लव्ह यू टू म्हणालो
प्रेमाच्या आणाभाका घेत
प्रेमाचा प्रवास सुरू झाला
प्रेमाच्या वर्षावामध्ये
देह चिंबं भिजू लागला
दिवसामागुन दिवस गेले
रात्रीमागुन रात्र गेली
प्रेमाच्या नशेमध्ये दोन जीव
जगापासुन अलीप्त झाले
काळजाचं पाणी झालं
जेव्हा ती बोलू लागली
तीच्या माझ्या ब्रेकअप ची
चर्चा आज सुरू झाली
ऐक सख्या माझ्यासाठी
तु मला विसरशील का ?
मी तीला नाही म्हणालो
आय लव्ह यू टू म्हणालो
ती म्हणाली नाही आता
प्रेम आपले विसरून जा
दुस-यासाठी मी आता
संसार माझा थाटला
दिवसामागुन दिवस गेले
रात्रीमागुन रात्र सरली
प्रेमाच्या आठवणीमध्ये
दोन जीव विभक्त झाले..
– उमेश तोडकर
खिळ्यांचे जगही असेच असते,
चुकांमधून सुधारत असते !
लहान खिळ्यांना चुका म्हणतात,
चुकता चुका खिळे होतात !
चुकांचे सुद्धा किती प्रकार,
टेकस, छोटेखिळे विविध आकार !
लहान खिळ्यांना चुका म्हणण्याचे कारण काय?
खिळे बनवितांना चुका झाल्या काय?
चुकल्या चुका, नादावले खिळे,
चुका आणि खिळ्यांच्या नशिबी हातोडे !
रुसल्या चुका, रुसले खिळे,
लाकडात शिरण्या नाही रुचे !
किती वर्ष असे लपून राहायचे?
मुक्त श्वास घेण्या कधी बाहेरे यायचे?
आमचे जीवन असेच सरायचे,
चाकोरीच्या बाहेर कधीच नाही जायचे !
हातोड्यांचे घाव सोसतो आम्हीं,
स्वत:चा कार्यभाग उरकता तुम्हीं !
-- जगदीश पटवर्धन
आजकाल generation gap जरा कमी झालाय
कालचे अहो बाबा आजचा अरे बाबा झालाय ...
कालचे बाबा रागावणारे guardian असायचे
आज काल समजावणारा friend झालाय
बाबा काल घरातला पोलीस असायचे
आज partner इन crime झालाय
कालचे बाबा शाळेत यायचे तर धडकी भरायची
आज स्कूल मध्ये जाताना hi फाईव्ह देताय
कालचे बाबा हळदीच्या दुधासाठी रागवायचे
आजचा बाबा कोल्ड ड्रिंक share करता झालाय
आजारी मुलीसाठी काल पण
बाबा ३ वेळा फोन करायचेच
आजचा बाबा मीटिंग्स cancel करायला शिकलाय
कालचे बाबा मुलाच्या लग्नानंतर
देव दर्शनाची तयारी करायचे
आज बाबाने मुलासाठी हनिमून package बुक केलाय
काळ बदलतोच पण नातं नाही बदलत
बाबांच्या कठोर वागण्यात काल पण प्रेम दिसायचं
आजचा बाबाही नकळतच जरा जास्त हळवा झालाय
बाबा कालही हिरो होते आजही आहेच
कालपण बाबा great च होते
आजचा बाबा मात्र favourite झालाय ....!!!
-- सौजन्य : अारती गोसावी
शांत झोप झाल्याने मेंदू ताजा-तवाना राहतो. नियमित कामात मन चांगले लागते. कामावर लक्ष्य केंद्रीत होते. कामं चांगले होतात. म्हणून झोपेची काळजी घेणे आवश्यक आहे. झोप चांगली लागावी म्हणून काही व्यायाम, औषधे सुचवली जातात. झोपेमुळे शरीराचे कार्य चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ६ ते ९ तास झोपणे आवश्यक असल्याचे अनेक मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर सांगतात. स्लीप हायजिन’ पाळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti