(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • न्याय देवते

    कुठे तु गेलीस न्याय देवते,

    जगास सोडूनी याच क्षणी ।

    अन्यायाची कशी मिळेल मग,

    दाद आम्हाला या जीवनी ।। १ ।।

    परिस्थितीचे पडता फेरे,

    गोंधळूनी गेलीस आज खरी ।

    उघड्या नजरे बघत होती,

    सत्य लपवितो कुणीतरी ।।२।।

    दबाव येता चोहबाजूनी,

    मुस्कटदाबी होती कशी ।

    शब्दांना परि ध्वनी न मिळता,

    मनी विरताती, येती जशी ।।३।।

    बळी कुणाच्या पडली तू गे,

    मार्ग रोखीले तुझे कसे ते ।

    अपयश येता सत्यालाही,

    म्हणू कसा तूज ‘न्याय देवते’ ।।४।।

    आज न आले यश जरी,

    न्याय येईल उफाळूनी ।

    अंतिम विजय हा सत्याचा,

    जाणीव आहे ह्याची मनी ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • फुंकर

    काल कालच्या काळामध्ये,
    कलून पडला असा कसा?
    भाव भावनांच्या लगोरिमध्ये,
    रडत बसला ढसा-ढसा !!

    भुत-भविष्य तुला न कळती,
    स्व कुशीत निजलास कसा?
    कोळ्याच्या जाळ्यात अडकुनी,
    तडफड करसी, जणु तू मासा !!

    दवबिंदूंचा पडता सडा अंगणी,
    तव चुंबन घेता थेट सूर्या,
    नव ध्येय अन् उम्मेदिने,
    रूप हिरा चे लाभे तया !!

    कुंभार तू तुझ्या जीवनाचा,
    शिल्प घडवण्या हो स्तब्द जरा,
    योग्य वेळ पाहुनी,
    डाव आयुष्याचा साध, मर्द गड्या!!

    – श्र्वेता संकपाळ.

  • अवमूल्यन

    उत्साहाने करित होता, सारे कांहीं इतरांसाठी
    क्षीण होवूनी जाता शरीर, आधार तयाला झाली काठी...१,

    धनाचा तो प्रवाह वाहतां, गंगाजळीचे पाणी पाजले
    दुजाकरिता त्याग करूनी, समाधानी ते इतरा केले....२,

    धन संपत्तीचे झरे आटतां, प्रेमळपणाचे शब्द राहीले
    कालक्रमणाच्या ओघामधल्या, दुर्बलतेस कुणी न जाणले...३,

    अपेक्षा ती सदैव असते, मिळत रहावा सहयोग
    अवमूल्यन ते केले जाते, दुर्लक्ष करूनी दुर्बल अंग...४

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • स्वप्न आणि जागेपण

    एक ती झोप स्वप्न बघत राही
    शिणवून शरीर ताप जीवास सुख देई

    स्वप्न जाई विसरुन जाग येता मनां
    जागे मन स्वप्नांत भासवी वेगळेपणा

    एकाच मनाच्या दिसे ह्या दोन भुमिका
    भिन्नता त्यांत भासे जाऊन दोन टोकां

    स्वप्न आणि जागेपण देहाच्या दोन स्थिती
    नाण्याच्या बाजू दोन एकमेका न मिळती

    डॉ. भगवान नागापूरकर
    २४- १११२८३

  • दुर्बल मन नको

    सारेच आहेत दुबळे
    कुणाते नसे शक्ति
    वेळ येतां दुर्बल ठरे
    जे सबळ समजती ।।१।।

    विचार मनी येतां
    दुसरा शक्तिशाली
    समजोनी जावे तेव्हां
    हार तुमची झाली ।।२।।

    मनाची सबलता
    हेच शक्तीचे मापन
    काय कामाचा देह
    दुर्बल असतां मन ।।३।।

    सुदृढ देह व मन
    यांची मिळून जोडी
    जीवनातील यश
    तुमच्या पदरीं पाडी ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

  • रात्र सामोरी येतां

    रात्र सामोरी येतां,
    मन कसे कोमेजते,
    मावळतां दिन सारा,
    काळोख घेऊनी येते,
    दिवसाचे तास संपती,
    असे बघतां-बघतां,
    स्मृतींच्या इंगळ्या डसती,
    *संधिप्रकाश* ओसरतां,
    काळजाचे धागे तुटतां,
    जिवां हुरहूर लागे,---
    फक्त "काहूर" तेवढे,
    मनांत होते जागे,--!!
    अंधाराची सोबत न्यारी,
    कुणां अश्रू ना दिसे,
    आपुल्याच,--रात्री वाटती,--
    कसे ऋण" फेडायाचे,?
    सुख--दु:खांचे,हिशोब सारे,
    नकळत आपुले मन मांडते,
    सरशी' कुणाची होते हे,
    सांगावयास न लागे,--!!
    *झुंजूमुंजू*होतांना पण,
    पक्षी किलबिलाट करती,
    अनोखी त्यांची जिद्द पाहुनी,
    जगण्याच्या 'उर्मी' उसळती,
    आकाशी दिनकर उगवतां,
    उर्जास्त्रोत' कसा मिळे,
    तेजस्वी'"" प्रकाशापुढे मन,
    झुकून अगदी,वंदन' करे,--
    प्रकाश आणि अंधार हे,
    सृष्टीचेच भाग असती,
    अंधारातुनी *प्रकाशा*कडे,
    ते कसा मार्ग दाखवती,--!!!

    ©️ हिमगौरी कर्वे.

  • चाहूल चैतन्याची

    सांजाळलेल्या या सांजवेळी
    सुंदर, शाममनोहारी लोचनी
    घुमवित येता मंत्रमुग्ध पावरी
    भुलूनीया सारे बावरते अवनी....
    स्पंदनी अवीट, मधुर सुरावट
    आत्मरंगी अनुपम येते उमलूनी
    तो लाघवी, लडिवाळ सावळा
    झरतो, हृदयी स्वरतालातुनी.....
    भक्तीतुनी विर्घळता आसक्ती
    मोहमाया सारी जाते वितळुनी
    होता अगम्य साक्षात्कार ईश्वरी
    चाहूल चैतन्याची चराचरातुनी...
    शुचितसोज्वळी सुरम्य सुंदरम
    ब्रह्मरूप हरिहराचे या नंदनवनी
    महासागर कृपावंती स्वानंदाचा
    निर्मोही त्यात जावे तृप्त डुंबूनी

    -वि.ग.सातपुते.(भावकवी)

    रचना क्र. १४८
    ३१/१०/२०२३

    9766544908

  • दिन दिन दिवाळी…!

    दिन दिन दिवाळी
    शब्द कानी पडती
    आली आली दिवाळी !

    खमंग रुचकर स्वाद
    काय पदार्थांच्या लगबगी
    बनविण्या गृहिणी सजती !

    नटण्याची हौस किती
    चारचौघीत उठून दिसण्या
    पैठणी झुलती अंगावरी !

    मुलींची लगबग रांगोळीसाठी
    तर्हे तर्हेचे रंग किती?
    रंगसंगती किचकट भारी !

    घाई कंदिलासाठी मुलांची
    पंचकोनी का षटकोनी
    पारंपरिकच बरा दिसे !

    गोवत्स द्वादशी दिन
    गोवत्साचे पूजन
    वसुबारस म्हणती त्यास !

    धनत्रयोदशी धनलक्ष्मी दिनी
    श्रीहरीगुरुग्रामी श्रद्धावान श्रीयंत्राचे
    प्रतिवर्षी पूजन करती !

    नरकचतुर्दशी अभ्यंगस्नान
    सुगंधी उटणे लाऊन
    भल्या पहाटेस अंघोळ !

    अश्विन अमावास्या लक्ष्मीपूजन
    लगबग दुकानदारांची करण्या
    चोपडा पूजन सर्वत्र !

    बलिप्रतिपदा दीपावली पडावा
    घेण्या आहेर मोठा
    नव्या नवरीच्या हेका !

    भाऊबीज दिवस भावाबहिणीचा
    प्रेमाच्या ‘भेटी’ गाठीचा
    दिवाळीचा दिवस समारोपाचा !

    जगदीश पटवर्धन

  • काळाची चाहूल

    जो जो येईल पाया खालती,
    तुडविला जातो त्याचक्षणी
    कुणी मरावे अथवा जगावे,
    सारे प्रभूवर अवलंबूनी....१,

    भक्ष्य शोधण्या किटक चाले,
    तसाच फिरतो प्राणी देखील
    जगण्यासाठी फिरत असता,
    मृत्यूची येते त्याला चाहूल...२,

    चालत असतो काळ सदैव,
    दाही दिशांनी घिरट्या घालीत
    झडप घाली अचानक तो,
    जो जो येई त्याच्या टापूत...३,

    जरी दिसे मारक कुणीतरी,
    करवूनी घेतो काळच सारे
    विश्वाचा खेळ खेळविण्या,
    जन्म-मृत्यूचे चक्र फिरे....४

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • माणसांची अलोट गर्दी

    माणसांची अलोट गर्दी
    अनोळख्या ओळखी,
    आयुष्याच्या पटावरी
    भेटतील माणसं वेगवेगळी..
    कोण कुठे कसा राहतो
    दूर दूर असतील घरटी,
    बंध जुळतात जेव्हा
    ओळख होईल तेव्हा थोडी..
    कुठे जास्त कुठे कमी
    माणसं आयुष्यात येती,
    नियतीचे सूत्र सारे अनामिक
    कुणी जवळ कुणी दूर जाती..
    आयुष्याच्या पटावरी
    जमा खर्च आलेख होई,
    प्रारब्ध न चुके कुणाला
    कोण कधी जीवनात येई..
    जीवन हा खुला रंगमंच
    माणसांची अनोखी गर्दी,
    मुखवटे हजार भवती सारे
    जवळ असतील थोडे काही ..
    आयुष्य एक गणित सारे
    कुठे कशी ओळख होई,
    असतील ऋणानुबंध कुठले
    तर कोण आयुष्य व्यापून जाई..
    ओळख अशीच अवचित होते
    कोण भेटे कुठल्या टप्यावरी,
    पुसून जातील ओळखी जरी
    परी आठवणी हृदयात साठती..

    -- स्वाती ठोंबरे.