वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जसा देश तसा वेश, जशी प्रकृती तसा आहार या सूत्रानुसार, प्रकृतीनुसार आहार घ्यावा, तसा कामाप्रमाणे, आणि प्रदेशानुसार आपला आहार आपण बदलावा.
आपल्या परंपरेप्रमाणे जो आहार आपण लहानपणापासून घेत आलोय, तो आहार शक्यतो, प्रदेश बदलला नाही तर, बदलू नये.
जसे लहानपणी जेव्हा पहिला घास भाकरीचा असेल तर भाकरी पचवण्याची ताकद तेव्हा पासूनच वाढवली जाते.
जर पहिला घास पावाचा असेल, तर पाव सहज पचू लागतो.
जर पहिला घास इडली डोश्याचा असेल तर आंबवलेले पदार्थ सुपाच्य होतात. फार त्रास देणार नाहीत.
तसे पहिल्यापासून मांसाहार करायची सवय असेल तर तो कसा पचवायचा, हे शरीराला माहीत असते.
म्हणजे नाॅनव्हेज खाणे बंद करायची आवश्यकता नाही. आयुर्वेदात मांसाहार करूच नका, असे म्हटलेले नाही. मांसाहाराचे वर्णन करणारा एक स्वतंत्र अध्यायच वर्णन केला आहे.
वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस पचायला कसे असते, चवीला कसे असते, कच्चे खाल्ले तर काय होईल, शिजवून खाल्ले तर काय होईल, पचले नाही तर काय लक्षणे दिसतील, ते पचवण्यासाठी काय बदल केले पाहिजेत, अमुक पदार्थाबरोबर खाल्ले तर काय होईल, कोणत्या पदार्थाबरोबर आवर्जून खावे, अमुक मांस कोणता परिणाम घडवणारे असते, इ. वर्णन केले आहे. तयार केलेल्या नवीन पदार्थांचे गुण काय असतील याचेही वर्णन आहे.
हे पण सांगितले आहे की आहे कि मांसाहार रज आणि तम गुण वाढवतो. जेव्हा रज आणि तम गुण वाढणे आवश्यक असेल तेव्हा तो वाढविण्यासाठी मांसाहार केलाच पाहिजे.
जसे, देशाच्या रक्षणासाठी आपला जीवही अर्पण करणार् या जवानाना, त्यांचे शरीरबल वाढवणे, मनोबल वाढवणे, प्रसंगी शत्रूचा म्हणजे चालत्या बोलत्या, आपल्याच सारख्या एका माणसाचा जीवही घेणे, आवश्यक असते. काही वेळा ही क्रूरता अंगी मुरवावी लागते.
पण कोणाला ?
ज्याच्या हातात सतत बंदुक असते, ज्याला सतत हिंसेसंबंधी विचार करावे लागतात त्याला.
दोन वेळा मस्त जेवून, मोबाईलवर लढाईचा गेम खेळणार् यला, आणि पांघरूण घेऊन, निवांत घरी झोपणार् याला नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
23.09.2016
जुन्या काळची गोष्ट आहे. एक हौशी पर्यटक होता. गावोगावी फिरणे, दर्शनीय वास्तू पाहणे, हा त्याचा आवडता छंद होता.
नैना लाल किडवाई यांचा जन्म १४ एप्रिल १९५७ रोजी एका पंजाबी कुटुंबात झाला. किडवाई यांचे वडील सुरिंदर लाल एका विमा कंपनीचे सीईओ होते. किडवाई यांची आई थापर ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक करमचंद थापर यांची मुलगी होत्या.
अमेरिकेतील आहारतज्ज्ञांनी काही दिवसांपूर्वी शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक कोलेस्टरॉलची मर्यादा पुन्हा नव्यानं ठरवण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. वॉशिंग्टन पोस्टसह अन्य नामांकित वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अमेरिकन आहारतज्ज्ञांनी ४० वर्षांपूर्वी कोलेस्टरॉलच्या चांगल्या-वाईट व्याख्या ज्या ठरवल्या होत्या त्याचाही पुनर्विचार केला जाणार आहे. पाच वर्षांपूर्वी पोषक आहारतज्ज्ञांच्या एका समितीने ‘न्यूट्रिशन आॅफ कर्न्सन’ अर्थात काळजीयुक्त पोषणाची चर्चा गुड आणि बॅड कोलेस्टरॉलच्या संदर्भात केली होती. आणि हा सारा विषय अमेरिकेत सामाजिक स्वास्थ्याच्या चिंतेचा विषय म्हणून गांभीर्यानं चर्चेत आला होता. आता मात्र एक नवी समिती म्हणतेय की धडधाकट प्रौढ व्यक्तींमध्ये कोलेस्टरॉल हा काही चिंतेचा विषय ठरत नाही, त्याचा थेट संबंध लगेच हृदयविकाराशी जोडू नये..ही बातमी अमेरिकेतली असली, तरी या गुड आणि बॅड कोलेस्टरॉलच्या व्याख्यांचा जगभरातल्या माणसांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. तेल-तूप खाण्याच्या सवयींवर आणि आहाराच्या पद्धतींवर तर आपल्याकडेही कोलेस्टरॉलची तलवार टांगलेली दिसतेच..या साऱ्याचा कसा विचार करायचा?
या संदर्भातलीच ही एक विशेष चर्चा..
कोलेस्टरॉल या शब्दाची केवढी धास्ती अनेकांच्या मनात. तेल-तूप खाताना सतत त्या धास्तीचीच तलवार डोक्यावर. आपल्या आहाराचा विचार असा पाश्चिमात्य पद्धतीनं का करता? त्यांचे चष्मे का वापरता? ते चष्मे बदलले की इकडे लोकांच्या मनातली धास्ती, भीती, भय सारंच बदलतं. आहाराशी खेळ होतो तो वेगळाच.
आयुर्वेद सांगतो, आपण जिथे राहतो त्या प्रदेशातील धान्य, तेल, फळ इ. नियमित वापरावे. हा युनिव्हर्सल नियम अवलंबावा. आपला पारंपरिक आहार शक्यतो बदलू नये. उत्तर प्रदेशचे भैया कोणते तेल वापरतात? मोहरी / सरसू / राई. कारण त्या थंड हवेला मोहरीसारखे उष्ण तेल आवश्यक आहे. पण मुंबईत राहून मोहरीचे तेल खाल्ले तर पित्त वाढणार. मी मनसे सांगतोय. यात मनसेचा संबंध नाही.
कोकणातल्या जवळजवळ प्रत्येक तिसऱ्या घरात गावठी घरच्या नारळाचे तेल असतेच. एवढी खोबरेलाची मुबलकता आहे. परंपरेने जेवणामध्ये खोबरेल तेल वापरले जात होते. मग रोग का वाढले?
उत्तम वंगण, उत्तम एनर्जी सोर्स, उत्तम उपलब्धता, उत्तम निर्मितीमूल्य, एवढी संपत्ती असूनही उपभोगशून्यस्वामी कसा बनला? कोणी एवढं विरक्त बनवलं त्याला?
उत्तर काय असेल?
आजची औषधनिर्माण व्यवस्था. द्राक्ष -ऊस-साखर यांच्या उत्पादकांप्रमाणे खोबरेल तेलाला कोणी गॉडफादर नाही. प्रत्येकाच्या घरात तयार होणारे खोबरेल जर त्यांनी जेवणामध्ये वापरायचे ठरवले तर इतर तेलांची विक्र ी खूप प्रमाणात घटेल! म्हणजेच तेलसम्राटांच्या लॉबीला धक्का! त्यामुळे सुरू झाली जीवघेणी स्पर्धा! हो, जीवघेणीच. कारण, आरोग्याच्या मुळावरच घाव होता हा! पद्धतशीरपणे खोबरेल तेलाला हृदयरोग आणि कोलेस्टरॉलच्या दहशतीत मारले जातेय. आणि भोग भोगतोय तो सामान्य माणूस!
जे आरोग्य पूर्वी होतं ते सगळं बंद करून पाश्चात्त्य तज्ज्ञांच्या विचारांना भुलून (घाबरून) स्वत्व गमावलं की काय होतं, ते आता अनुभवता येतंय.
काहीजण सन्माननीय अपवाद आहेत. काही बालरोगतज्ज्ञदेखील आता अगदी जन्मलेल्या बाळांना खोबरेल तेलाचे काही थेंब किंवा गावठी गायीचे तूप भरवायला सांगत आहेत. आईच्या दुधात असलेले सोडियम मोनोक्लोनीक अॅसिड हे प्रथीन खोबरेल तेलातही असतं म्हणे! ही जमेची बाजू आहे.
पाश्चात्त्य कुकरी शोमध्ये सॅलेड्स, भाज्या इ.वर वरून आॅलिव्ह आॅइल घेताना आपण बघतो. म्हणून आपण आॅलिव्ह आॅइल घ्यायचं नाही. कारण आॅलिव्ह आपल्याकडे पिकत नाहीत. अशावेळी आपल्या भागात पिकणारे तेल उपयोगी ठरते. त्यातही खोबरेल तेल. पण हे तेल कच्चे वापरायचे. ही आपली पद्धत आहे. (आपली-तुपली/पाश्चात्त्य-पौर्वात्य हा भेद का? असा व्रात्यपणा मी का करतोय? ‘स्वत्वाची’ जाणीव होण्यासाठी!)
पण आपण तसं करत नाही. भलतंच करतोय. मग आता काय करायचं? गाडी रिव्हर्स घ्यायची? चुकीच्या रस्त्याने जर गाडी गेली असेल, पुढे वळायला जागाच नसेल तर गाडी मागे घेण्याला पर्याय नसतो.
आरोग्याची गाडी चुकीच्या रस्त्याने चालली आहे. अगदी १८० अंशात!
चपलेचा अंगठा तुटला तर चप्पलच बदलून टाका, तसंच गुडघ्यासारखा एखादा अवयव काम करेनासा झाला तर तो दुरुस्त करण्याऐवजी सरळ बदलूनच टाका असं सांगणारी आजची ‘वैद्यकीय’ यंत्रणा. अशा यंत्रणेकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार? आणि गाडी मागे घ्यायला कमीपणा कसला? या मागे जाण्यातच खरंतर पुढे जाणं दडलेलं आहे.
म्हणून तेलांचा विचार करतानाही तेच. जेवणात पूर्वीसारखे कच्चे गावठी खोबरेल तेल वापरायला सुरुवात करूया. आणि निरोगी राहूया.
आज डॉक्टर मंडळी कोलेस्टरॉलच्या भीतीने जेवणातील तेल कमी किंवा बंदच करायला सांगतात. वाताच्या चिकित्सेतील सर्वात महत्त्वाचे औषध जर तेल म्हणजे स्नेह आहे आणि तोच जर ‘जेवणातून’ काढून टाकला तर वाताचा कोरडेपणा, रूक्षपणा कधीच कमी होणार नाही. कोरडेपणा, रूक्षपणा, वेदना कमी होण्यासाठी ‘जेवणात स्नेह’ हा हवाच! ‘स्नेह’ जेवणात आणि जीवनातसुद्धा !
कोणी कोणते तेल वापरावे ?
आपण ज्या प्रदेशात राहतो तेथील वातावरण, जमीन, पाणी इ. आपल्या प्रकृतीला अनुकूल असते. त्या जमिनीमध्ये जे पिकते, उगवते तेच वापरावे.
जसे कोकणात खोबरेल, शेंगतेल, तीळतेल श्रेष्ठ आहे. कोकणात करडईचे, स्थानिक तेल खावं. जे पिकत नाही ते खाऊ नये.
तेल शक्यतो कच्चेच वापरावे किंवा फार गरम करू नये (जसे चायनीज बनवताना वाफा येईपर्र्यंत तेल तापवतात. हा दोष आहे.) आपण गरम गरम भाकरीवर, चटणीमध्ये कालवून वा तेल-मीठ-मसाला-भात कालवून घेताना कच्चेच तेल वापरावे. पापड भाजून वरून तेल, मसाला, कांदा, टोमॅटो घालून खाल्ला तरी चालेल.
तूप
तूप चवीला गोड नसेल, पण गुणांनी गोड. आणि जे गुणांनी गोड असते ते शुगर वाढवेलच असे नाही.
तूप हे एकमेव द्रव्य असे आहे जे भूक शिल्लक ठेवून पोषण करते. नाहीतर बाकीचे गोड पदार्थ खाल्ले की भूक कमी होत जाते. तसं तुपाचं होत नाही.
‘खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी’, ‘तूप खाल्ल्याशिवाय रूप दिसत नाही’ अशा म्हणीदेखील व्यवहारात रूढ आहेत. चांदोमामा चांदोमामा भागलास का, तूप रोटी खाऊन जा.. आठवतंय ना हे बडबडगीत....
जर तूप वाढले गेले नाही तर चांदोमामासुद्धा जेवत नाही, उपाशीच राहतो. हे शब्दांचे अर्थ समजण्याअगोदर शिकवले जातेय. (पण लिंबोणी, करवंदी, वाडा, चिरेबंदी, तूप, माशी याचे अर्थ कुठे माहीत असतात आता पोरांना?)
आई-आजी सांगत असे, भाकरी कोरडी खाऊ नये, पोटात दुखतं. लोणी, तूप, तेल काहीतरी लावून खावी ! आधी प्रॅक्टीकल मग थिएरी, हीच भारतीय परंपरा.
एवढे महत्त्व आपल्या भारतीय परंपरांमध्ये सांगितले गेले असूनदेखील अज्ञानामुळे, अनाभ्यासामुळे, शास्त्र माहीत नसल्यामुळे तुपासारख्या अमृतापासून आपण वंचित राहतोय. समर्थ याला करंटेपणा म्हणतात. आहे पण उपभोगायचे नाही. (लॉटरी लागलीय, पण तिकीट हरवून टाकायचे.) कोणाच्या तरी शब्दावर विश्वास ठेवत, तुपासारख्या अमृताला लाथाडून टाकायचे हा करंटेपणाच नव्हे काय?
घृत म्हणजेच तूप. तूप म्हणजे गायीचेच.
आणि गाय म्हणजे देशी, गावठी, भारतीय बनावटीचीच ! या भारतीय स्वदेशी वंशाच्या ए 2 दुधाची माहिती सध्या व्हॉट्सअॅपच्या अनेक गटातून फिरते आहे. तर त्यापुढचा टप्पा तूप. तुपाचे गुण काय वर्णावे?
भल्याभल्यांना माहीतच नाही, साजूक तूप म्हणजे काय !
पाच वेळा अग्निसंस्कारित असते हे नाजूक साजूक तूप.
१. दोहन संस्कार - दूध हातानी पिळून काढले जाते. (यंत्राने नाही. यंत्राने काढलेल्या निरशा दुधाचे तपमान बदलते.)
२. मंदाग्नीवर तापवणे - दूध जेवढे सावकाश आणि मंद अग्नीवर तापवले जाते, तेवढी साय जास्त जाड येते.
३. किण्वन - गोड दुधाचे रूपांतर आंबट दह्यात करणारी प्रक्रि या.
४. मंथन संस्कार - दह्याचे लाकडी रवीने, हाताने घुसळून लोणी आणि ताक वेगळे तयार करणारा संस्कार.
५. पुन:अग्नी - मंदाग्नीवर लोणी कढवून साजूक तूप करणे.
अशा पाच अग्निदिव्यातून शुद्ध होऊन बाहेर पडलेल्या साजूक तुपाचे परीक्षण केलेलेच नसावे. अन्य पाश्चात्त्य पद्धतीच्या अतिशीत संस्कारातून तयार झालेल्या बटरने कोलेस्टरॉल का वाढू नये? तेच मिक्सरवर केलेले ताक आणि हाताने दही घुसळून केलेले ताक यांच्या गुणातील फरक किती सांगावेत?
मी स्वत: एक प्रयोग केलाय. एकाच दिवशी, एकाच वेळी, एकच तपमान असलेल्या दुधाला विरजण लावून दुसऱ्या दिवशी अर्धे दही मिक्सरमध्ये घुसळले. उरलेले दही हातानी रवीच्या साहाय्याने घुसळले. मिक्सरमधील दही एकाच दिशेत, एकाच गतीत फिरले. फक्त चार मिनिटात लोणी ताकावर पसरले. आणि रवीने किमान सतरा ते अठरा मिनिटं घुसळावे लागले. दोन्ही तळहात घासले गेल्याने लालबुंद झाले. आणि लोण्याचा गोळा ताकावर डोलायला लागला. दोन्ही ठिकाणी तयार झालेले लोणी स्वच्छ पाण्याने धुवून पाण्यातच बुडवून ठेवले. तासाभराने या लोण्यांचे तूप कढवले. मिक्सर वापरून तयार केलेले तूप झाले बुळबुळीत आणि टिकले फक्त तीन महिने, तर स्वकष्टाने, घाम गाळून, माझे रक्त घुसळवून तयार केलेल्या लोण्याचे तूप तीन वर्षं टिकले. (नंतर खाऊन संपवले.)
कणीदार, रवाळ, करड्या रंगाची साय असलेले आणि वास तर अजूनही माझ्या नाकात दरवळतो आहे. असे नाजूकपणे केलेले साजूक तूप शंभर वर्षे टिकते, त्याला पुराण घृत म्हणतात. तेच एक हजार वर्षं ठेवले तर प्रपुराण घृत म्हणतात. याचे गुणधर्म वेगवेगळे वर्णन केलेले आहेत.
स्वत:ला शंभर वर्षे आयुष्य असणारे तूप खाणे बंद करा असे सांगत, एक दिवसाचे आयुष्य असणारी पालेभाजी खायचा आग्रह धरणाऱ्या डॉक्टरांवर आमचा जास्त विश्वास!
कलियुग. आणि दुसरं काय?
वापरलेल्या तेलाचे काय करायचे?
सतत एकाच तेलात तळल्याने, वारंवार गरम केल्याने तेल औषधी गुणांनी संपते. पण युक्तीने वापरल्यास औषधी बनू शकते. हेच कढईतील जळके तेल बाहेरून मालीश करण्यासाठी छान काम करते. माझ्या रुग्णांना कमीत कमी पैशात हे तेल कसे उपलब्ध होते? यासाठी हॉटेलमधील / वडापाव स्टॉलवरील तेल (किंवा घरातील सुद्धा) त्यात थोडा कापूर घालून वापरायला सांगतो.
काय आहेत फायदे?
मीठ, मोहरी, कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर, जिरे, आले, हळद, कढीपत्ता इ. औषधी द्रव्यांनी संस्कारित आणि सतत लोखंडी कढईत उकळत असलेले लोहसिद्ध तेल (खरपाकी स्नेह) असते. छान गुण दिसतो त्याचा. आणि इतरांनाही जरा चांगल्या नवीन तेलातील भजी, वडे मिळतात हा अतिरिक्त फायदा.
खोबरेल तेल
खोबरेल तेल म्हणजे कोकणातलं अमृत. गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे या भौगोलिक परिसराला कोकण म्हणूया. येथील एक महत्त्वाचे पीक म्हणजे नारळ. नारळ वापरल्याशिवाय कोकणी जेवण नव्हे, तर अन्य कोणतीच गोष्ट पूर्ण होणारच नाही. येथील ती परंपराच आहे. मग जेवणात असो किंवा देवाला मानाच्या ठेवायच्या नारळापासून, देवाला प्रसाद, पाहुण्यांची लग्न आदिची आमंत्रणे, ओटी भरणे, लग्नातले अहेर, मानपानापासून अगदी करणी, ओवाळणी, दृष्ट काढणे इ. अनेक कामांसाठी नारळ हा हवाच.
अमृतफळ अशासाठी म्हणतोय, या कल्पवृक्षात अलौकिक औषधी गुण दडलेले आहेत. केस चांगली वाढ होण्यासाठी, गळणारे केस कमी होण्यासाठी, कोंडा, खरबा इ. कमी होण्यासाठी नित्यनियमाने केसांच्या मुळांना खोबरेल तेलाएवढे चांगले औषध शोधूनही सापडणार नाही. त्यात कापूर पावडर टाकून केसांच्या मुळांना लावले की उवा, लिखांचा नायनाट होतो. शांत झोप येण्यासाठी डोके, तळपाय, डोळे यांना लावावे आणि कानात खोबरेल घालावे. अंघोळीपूर्वी पूर्ण अंगाला तेलाचे अभ्यंग करावे म्हणजे अंघोळीच्या थंड पाण्याने होणारा वातप्रकोप होत नाही.
हिवाळा, पावसाळ्यात जरा कोमट करून लावावे. उन्हाळ्यात तसेच वापरले तरी चालते. हल्लीच्या मराठी सिरियलमधूनदेखील डोक्याला मायेने खोबरेल तेल लावण्याचे प्रसंग मुद्दाम दाखवले जाताहेत, ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट.
तात्पर्य, रोज रात्री डोक्यावर खोबरेल तेल घालावेच. याला शिरोअभ्यंग म्हणतात.
रोज तेलाचे मालीश करावे असं म्हटलं तर जसं हाताला अत्तर लावतात तेवढंच तेल पूर्ण अंगाला पुरवून पुरवून लावणारी मंडळी आम्ही पाहतो. असे कंजुषी तेल वापरून बलाढ्य वात कमी होण्याची अपेक्षा कशी करता?
दरवाजाच्या बिजागरातून घर्षणाचा आवाज येत असेल तर तेलाचे काही थेंब सोडले तर आवाज थांबतो. आपले सांधेदेखील या बिजागरांप्रमाणेच काम करतात. त्यांना पण तेल हवे असते. शिवणाच्या मशीनलादेखील त्यातील अवयवांची झीज होऊ नये यासाठी आत तेल सोडण्यासाठी विशिष्ट ठिकाणी छिद्रे ठेवलेली असतात. अशी छिद्रे शरीरालादेखील आहेत. तोंड, कान, नाक, त्वचा, गुदद्वार, मूत्रमार्ग, प्रजनन पथ इ. यातून तेल आत सोडावे. म्हणजे या यंत्राची कार्यक्षमता वाढते. लोखंड गंजू नये म्हणून ‘आॅइलपेंट’ लावतातच ना ! मग शरीर गंजू नये म्हणून तेल लावायला हवेच. इंजिनमधले आॅइल संपू नये म्हणून डोळ्यात तेल घालून पाहिले जाते. डोळ्यात तेल घालून पहारा देणे हा वाक्प्रचार आहे हा! यासाठीच अंगाला रोज तेल लावायचा सल्ला खरे आयुर्वेदतज्ज्ञ देतात. अंगाला रोज किमान सात चमचे तेल जिरवावे.
दोन हात दोन चमचे!!! दोन पाय दोन चमचे
पोट छाती एक चमचा !!! पाठ कंबर एक चमचा
डोके आणि कान एक चमचा. याहून अधिक चालेल. पण कमी नको.
नित्यनियमाने केलेले अभ्यंग म्हणजेच तेल मालीश किती गुणकारी आहे ! भरपूर काम केल्यानंतर आलेला थकवा नाहीसा करणे, अंगावर म्हातारपण दिसू लागणे म्हणजेच त्वचेला सुरकुत्या पडणे, डोळ्यासाठी आरोग्यदायी, डोळे, शरीर तजेलदार दिसणे, शरीरसंघटन मजबूत होणे, चांगली शांत झोप येणे, त्वचेला लकाकी चकाकी दिसणे, जिमसारखं फक्त बाहेरून सिक्सपॅक न होता आतून निरोगी होणे, यासाठी एकच उपाय अभ्यंग आणि अभ्यंगच.
आज जर्मनी, रशिया इ. बाहेरील अनेक देशांत भारतीय वैद्यक परंपरेतील तेल लावण्यावर संशोधन करावेसे वाटत आहे, ते त्यांच्या पद्धतीने संशोधन करताहेतदेखील!
पण आमचे वैद्यक तज्ञ्ज्ञ म्हणतात, ‘छे हो, असं तेल लावून काय होणारे ? बाहेरून तेल लावणे म्हणजे वेस्ट आॅफ टाइम, वेस्ट आॅफ मनी आहे.’
राहून राहून एक आश्चर्य मात्र वाटते की, जर त्वचेला बाहेरून लावून आतमध्ये काही शोषलेच जात नसेल तर आज नव्याने उपलब्ध केलेली वेगवेगळी जेल, आॅईन्टमेंट, क्र ीम्स कशी काम करतात?
म्हणजे ‘ते’ तज्ज्ञ जे सांगतात ते सर्वच्या सर्व बरोबर आणि आयुर्वेदाच्या परंपरेतील वैद्य हजारो वर्षांपासून जे सांगतात ते म्हणजे कालबाह्य काय?
नारळ
कोकणात प्रत्येक जेवणात नारळ असतोच. कोकणातले आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तांदुळ! जिथे जिथे तांदुळ वापरला जातो तिथे तिथे नारळही वापरला जातो. आता हेच बघा ना! तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक आत सारण नारळाचे! घावने केले कि ओल्या नारळाची चटणी आणि नारळाचा रस! आंबोळ्या केल्या की ऊसळीचे वाटण नारळाशिवाय पूर्ण होणारच नाही. शेवया केल्या की नारळाचा रस हवाच!
तांदळाची गरम गरम भाकरी आणि सुक्या नारळाची चिंच गुळ घातलेली लसणाची चटणी. क्या बात है!
तांदळापासून बनवलेल्या पोह्यांवरसुध्दा नारळ. दडपेपोहे नारळाशिवाय कधी होतील का? आणि रात्रीचा शिळा भात, त्यावर घातलेले कच्चे खोबरेल, त्यात भर म्हणून वर नुकत्याच फोडलेल्या ओल्या नारळाचे खोवलेले खोबरे आणि मीठ मसाला व्वाह!
या चवीपुढे बिर्याणी गेली उडत.
तांदळाच्या पीठाच्या कढीपत्ता आणि लसूण घालून केलेली ऊकड. ती एका बोटाने खायची आणि या उकडीवर कच्चे खोबरेल कधी घेऊन बघितलंय? पाची बोटांनी खावीशी वाटते!
ओटी भरताना देखील नारळ आणि तांदुळ जणु काही एकत्रच खेळत असतात.
एवढे सख्य आजपर्यंत अन्य कोणत्याही पदार्थांमधे दिसलेले नाही. पोटात गेल्यावर एकमेकांना पचवून टाकतात ना! म्हणून एवढे सख्य !!!
असे अनेक पदार्थ ग्रंथात वर्णन केले आहेत, ज्यांना आजच्या भाषेत एकमेकांचे एण्टीडोट म्हटले तरी चालेल. जसे गरम गरम भातावर डाळीचे वरण, या वरणावर साजूक तूप- त्यावर ताजे कापलेले लिंबू, त्यावर चिमूटभर भुरभुरवलेले मीठ हे पदार्थ एकमेकांचे पचन करण्यास मदत करणारे आहेत.
-- वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
सखी पुरवणी दै. लोकमत दि. 1 मे 2017 मधे आलेला लेख.
इतरांचे आपल्याबद्दलचे मत,निरीक्षण सरळ दुर्लक्ष करावे या वैचारिक समृद्धीपर्यंत मी काही वर्षांपूर्वी पोहोचलो. माझ्यावरील संस्कार, माझे पालक, गुरुजन आणि माझा जीवनप्रवास यांच्याबद्दल कृतज्ञता हा सध्या स्थायीभाव केलाय! बाकीचे शांतपणे कुंपणापलीकडे ठेवतो मी.
आंतरराष्ट्रीय योग दिनापाठोपाठच भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने उचललेले कौतुकास्पद आणि अभिमानास्पद पाऊल म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी 'राष्ट्रीय आयुर्वेद दिवस' म्हणून घोषित करणे हे होय. आपल्या मातीतल्या या वैद्यकशास्त्राला स्वतंत्र असा दिन जाहीर होण्यास सुमारे सत्तर वर्षे वाट पाहावी लागणे ही अतिशय दुःखद घटना म्हणावी लागेल. त्यामुळे हा निर्णय घेतल्याबद्दल सर्वप्रथम मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपादजी नाईक या दोघांचेही मनःपूर्वक आभार. माझे मत फुकट गेले नाही याचा आधी एक देशभक्त म्हणून अभिमान होताच; आता एक वैद्य म्हणूनदेखील तो दुणावला हे निश्चित!!
पहिला वहिला 'राष्ट्रीय आयुर्वेद दिवस' साजरा झाला खरा; मात्र त्या अनुषंगाने काही आत्मपरीक्षण करावे अशी स्थिती असल्याने काही मुद्दे मांडत आहे. एकंदरीतच आयुष मंत्रालय, आयुर्वेदीय संघटना आणि व्यक्तिश: प्रत्येक वैद्य यांनी याचा गांभीर्याने आणि जबाबदारीने विचार करायला हरकत नाही असे वाटते.
१. योग दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर इतक्या यशस्वीपणे साजरा केल्यावर खरे तर आयुर्वेदाशी संबंधित दिवसदेखील केवळ राष्ट्रीय पातळीवर साजरा न करता; आंतरराष्ट्रीय पातळीवरच साजरा होण्याची आवश्यकता होती. आज जगभरात आयुर्वेदाबद्दल आदर आणि उत्सुकता आहे. या निमित्ताने आपण विविध दालने उघडू शकलो असतो. दुर्दैवाने तसे झाले नाही. पुढील वर्षीपासून तसे करण्याचा मनोरथ असेल का?!
२. ज्या प्रमाणात या दिनाचा प्रचार- प्रसार सर्वसामान्य जनतेपर्यंत व्हायला हवा होता; त्या प्रमाणात तो झालाच नाही. वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, सोशल मीडिया या माध्यमांतून याविषयीचे वातावरण तयार करण्यास आम्ही कमी पडलो. (योग दिनाला केली जाणारी वातावरण निर्मिती आठवा. त्या तुलनेत या दिवसाची माहिती किती सामान्य भारतीय नागरिकांना होती याचाही अंदाज घ्या.)
३. या दिनाच्या निमित्ताने 'आयुष' मंत्रालयाने काढलेल्या पत्रकात; आयुर्वेदातील महाविद्यालये, विविध शैक्षणिक संघटना इत्यादींनी 'Ayurveda for prevention and control of diabetes' या विषयावर आधारित कार्यक्रम करावे असे सुचवण्यात आले होते. आयुर्वेदाची स्वतंत्र परिभाषा आहे. आम्ही वैद्यगण ती परिभाषा लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा परिस्थितीत 'डायबेटिस' ऐवजी 'प्रमेह' वा 'मधुमेह' ही आयुर्वेदीय परिभाषा या निमित्ताने देशासमोर आणता आली असती. मात्र त्याला या पत्रकाने पद्धतशीर सुरुंग लावला.
४. काही संघटनांनी या निमित्ताने जागृतीपर कार्यक्रम हाती घेतले. त्यांचे अभिनंदन करायलाच हवे. मात्र इथेही दुही, कंपूशाही, श्रेयवाद या आयुर्वेदाला लाभलेल्या जुन्याच शापांनी डोके वर काढल्याचे स्पष्ट दिसून आले. आपल्या परिघाच्या बाहेरील गुणवान वैद्यांना सामील करून न घेण्याची प्रवृत्ती किती काळ चालणार याचे उत्तर परमेश्वरच देऊ जाणे!!
५. बऱ्याच मोठ्या संख्येने आम्ही वैद्यगणदेखील या निमित्ताने काही शिबिरे वा तत्सम कार्यक्रम आयोजित करून आपले रुग्ण वा समाजातील अन्य व्यक्तींपर्यंत पोहचण्यात कमी पडलो. आपण या दिवसासाठी काय योगदान दिले याचे उत्तर प्रत्येक वैद्याने स्वतःला विचारावे; किमान १० जणांपर्यंत जरी या दिनाची जागरूकता आपण नेऊ शकलो असू तरी ते महत्वाचे योगदान आहे असे मी मानतो. यावर्षी उदासीन राहिलेल्यांनी मात्र पुढील वर्षीपासून तसे न होण्याची खात्री करावी लागेल. आपण आपला वाढदिवस जसा उत्साहात साजरा करतो; त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक जोशात हा दिवस साजरा व्हायला हवा.
६. बहुतांशी आयुर्वेद महाविद्यालयांना दिवाळीची सुट्टी असल्याने या दिवशी महाविद्यालयांतून म्हणावे त्या प्रमाणात विद्यार्थ्यांना सामील करून काही भरीव कार्यक्रम हातात घेता आले नाहीत. यावरही आपल्याला काहीतरी उत्तर शोधणे क्रमप्राप्त आहे.
७. स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन करून खरं तर मा. पंतप्रधानांनी अतिशय महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मंत्रालय स्थापन झाले; पुढे काय? धनत्रयोदशीच्याच दिवशी संदीप आचार्य यांनी लोकसत्तेत याविषयी एकल छोटा लेख लिहिला होता. या मंत्रालयाचे कारभार कागदी घोड्यांचेच असल्याचे लेखातून (आणि प्रत्यक्षातदेखील) दिसत आहे. जिथे अंग झाकायला कपडे नाहीत तिथे नेक टाय लावून फिरण्यात काय हशील? आज आयुष चिकित्सापद्धतींची नेमकी हीच गत आहे. यापूर्वीही मी नेहमीच वारंवार सांगितल्याप्रमाणे मोदी सरकार हे आयुष पदवीधरांची शेवटची आशा आहे. किमान त्यांनी तरी अपेक्षाभंग हा सुरुवातीलाच नमुद केल्याप्रमाणे; राष्ट्रीय आयुर्वेद दिन जाहीर केला गेला याचा प्रत्येक वैद्याप्रमाणेच मलाही अतोनात आनंद आहे. मात्र; अल्पसंतुष्ट असण्यापेक्षा आपण कुठे कमी पडलो याचा शोध घेऊन परिपूर्णतेकडे जाण्याचा प्रयत्न करणे केव्हाही श्रेयस्कर. इथे कोणावर टीका करण्याचा यत्किंचितही हेतू नाही. मात्र; ९५% गुण मिळवण्याची क्षमता असलेला विद्यार्थी सतत ३५-४०% गुणच मिळवत असेल तर 'पास तर होतोय ना' असं म्हणून त्याचे कोडकौतूक करून गालगुच्चे घ्यायचे की त्याने अजून प्रयत्न करायला हवेत म्हणून जरा कान पिळायचे? माझा उद्देश तितकाच आहे. आयुष मंत्रालयाकडून या गोष्टींचा विचार केला जाईल अशी आशा. बहुतांश वैद्य- वैद्येतर वाचकवर्ग या मतांबद्दल कोणतेही गैरसमज करून न घेता आपुलकीने त्यांचा विचार करेल अशी खात्री वाटते. त्यातही काहींची बुद्धी पटावरच्या उंटाप्रमाणे चाललीच तर मात्र नाईलाज आहे.
आयुर्वेद हे आपल्या मातीतले शास्त्र आहे. त्याला सर्वार्थाने सार्वभौमत्वाच्या सिंहासनावर पुनर्प्रस्थापित करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. चला; आपली जबाबदारी पार पाडुया!!
जय आयुर्वेद।
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

छत्रपती शिवाजी महाराज हे साहित्यकार, नाटककार, चित्रपट निर्माते, कलाकार, शिल्पकार, शाहीर यांच्या स्फूर्तीचे स्रोत आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक अजरामर कृती, केवळ मराठीतच नव्हे तर इतरही भाषांत प्रकाशित झाल्या आहेत व इथून पुढच्या काळात येत ही राहतील. पूर्वीच्या काळी पुस्तके, कादंबऱ्या, व्याख्याने ह्या माध्यमांद्वारे छत्रपती घराघरात पोहचवले गेलेत परंतु जसा काळ बदलला तशी ही माध्यमे देखील बदललीत, सध्या चित्रपट, वेब सिरीज, इंटरनेट या माध्यमांद्वारे छत्रपतींच्या आयुष्यावर आधारित बरेच सिनेमे व मालिका आल्यात व घराघरात लोकप्रिय देखील झाल्यात.
छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम हिंदुस्थानातील असंख्य भारतीयांचे श्रद्धास्थान व तसेच भावनिक विषय आहे, त्याचमुळे छत्रपतींवरील आधारित चित्रपट हे तिकीट बारीवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास साऱ्या जगभरात पोहोचत असला तरी, ज्यांनी महाराजांचा इतिहास वाचला आहे त्यांना हे असे सिनेमे पाहताना अनेक गोष्टी खटकतात किंवा खटकू शकतात. सत्यघटनेवर बेतलेल्या या सिनेमांना सिनेमॅटिक लिबर्टी घेणं योग्य आहे का हा मूळ मुद्दा आहे. कोणताही चित्रपट तयार करताना सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर केला तर त्यात काही गैर नाही, पण याच लिबर्टीच्या नावाखाली दिग्दर्शक सत्य घटना, त्याची मांडणी कशी काय बदलू शकतो हाही प्रश्न पडतो.
सध्या युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी पुढाकार घेऊन पुढे येऊ घातलेल्या काही छत्रपती वरील आधारित चित्रपटावर काही गंभीर आक्षेप घेतलेत व माझ्या लेखी ते योग्य देखील आहेत. इतिहासावर कोण्या एका व्यक्तीची मक्तेदारी नाही. त्यामुळे चित्रपटांच्या निमितानं पडद्यावर इतिहास जिवंत होणार असेल, तर चांगलंच आहे. परंतु, हा इतिहास सिनेमात मांडताना मूळ इतिहास दिग्दर्शक, लेखकानं जपणं महत्त्वाचं आहे. परंतु कोटींच्या कोटी उड्डाने घेण्यासाठी इतिहासात नसलेल्या गोष्टी किंवा आहेत त्या खूपच अतिरंजित करून अशा चित्रपटात दाखविल्या जातात. आपल्या इतिहासात भरपूर नाट्यमय घटना आहेत; त्यामुळे आपण त्यात आणखी चार गोष्टी घालून, त्याचा अतिरेक करण्याची गरज नाही. इतिहास हा आपल्यासाठी केवळ विषय नाही, तर भावभावनांशी जोडलेला आणि जगण्याचा मूळ पाया आहे. सध्याचे महाराष्ट्र सरकार व मा. राजसाहेब ठाकरे या सर्व चित्रपट सृष्टीच्या मागे भक्कम पणे उभे आहेत हे बऱ्याचदा दिसून आले आहे व ही खूपच उत्साहवर्धक बाब आहे, परंतु त्यांनी देखील या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहेत.
माझं तर मत असे आहे की, हे दिग्दर्शक आणि निर्माते छत्रपती वर आधारित चित्रपटातून कोटींच्या कोटी कमावणार असतील तर त्यांनी खर्च व अपेक्षित फायदा झाल्यानंतर उरलेली रक्कम हे गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी द्यावेत. आपण सर्व जन जाणतोच की छत्रपती हे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहेत त्यामुळे त्यावर आधारित चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करतो व ती केलीच पाहिजे आणि चित्रपट सुपरहिट होतात, परंतु सध्या दिग्दर्शक आणि निर्मात्यानी छत्रपतींचे विषय हाती घेऊन चित्रपट बनवून पैसे कमावण्याचे सोपे माध्यम तर केले नाहीय ना अशी शंका घेण्यास वाव आहे.
शेवटी एकच सांगायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज ही एक भावना आहे. ती "जपा" आणि "टिकवा". महाराष्ट्र धर्म घडवा...
-- श्री. राहुल अविनाश कळंके
वैजापूर, जि. संभाजीनगर
राज्यात पोलीसांच्या सशस्त्र मानवंदनेचा बहुमान असलेली केवळ दोन मंदिरे आहेत. पैकी पंढरपूरचे विठ्ठल देवस्थान हे पहिले आणि त्यानंतर रोह्यातील ग्रामदैवत असलेले धावीर महाराज हे दुसरे मंदिर होय. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी या मंदिरातून ग्रामप्रदक्षिणेसाठी निघणाऱ्या पालखीला पोलीसांकडून सशस्त्र मानवंदना दिली जाते.
मतदान केले नाही तर सगळ्या सोयी बरखास्त होतात, याचा एकदा अनुभव घेतला, की लोक अगदी मसणातून उठून मतदान करायला येतील. पाच राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका आणि त्याचवेळी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या झालेल्या निवडणुकांचे तुलनात्मक विश्लेषण केल्यास मतदानाची अनिवार्यता किती गरजेची आहे, हे स्पष्ट झाल्याशिवाय राहत नाही.
आम्ही व्यंगचित्रकार खरंतर `अल्पसंख्यांक’च! १३२ कोटीच्या देशात जेमतेम १४० व्यावसायिक व्यंगचित्रकार आहेत. मराठी व्यंगचित्रकारांची प्रतिभा, विनोदबुद्धी, कल्पकता वाखाणण्यासारखी असूनही आजकालच्या माध्यमांच्या रेट्यामुळे ही कलाच लुप्त होईल की काय ? अशी भीती वाटू लागली आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti