वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

जगातील ६० टक्के लोक किनाऱ्यापासून ६० कि. मी.च्या प्रदेशात राहतात. साहजिकच किनारी भागातील लोकांना पुरातन काळापासून हवा, वनस्पती व त्यांचे महत्त्व माहीत होते. खारफुटी- संदर्भात दंतकथा, इतिहास ज्ञात आहे. भारतापुरते बोलायचे तर चेन्नईजवळ चिदम्बरम् येथील नटराजाच्या देवळात एका खारफुटीच्या झाडाची ‘स्थल वृक्ष’ म्हणून एक मूर्ती स्थापन केली आहे. भाविक आजही तिला पूजतात. सुंदरबनात ‘बनबिबी’ नावाची देवता खारफुटीच्या जंगलाची देवता समजली जाते.
महाराष्ट्रातील किनाऱ्यालगतच्या भागात भरती व ओहोटीच्या पाण्याच्या पातळीच्या दरम्यानच्या भागात तसेच खाड्यांच्या मुखांशी असणाऱ्या दलदलयुक्त खाजण भूमीवर खाजण अथवाखारफुटी वनस्पती आहेत. खाजण वनातील झाडांना सुंद्री असे सामान्य नाव आहे. हा वृक्ष तिवरांच्या गटात मोडतो.
सुंदरी (लुकिंग ग्लास मॅग्रोव्ह, शास्त्रीय नाव: Heritiera littoralis) हा वृक्ष प्रामुख्याने बंगाल मधील सुंदरबनाच्या दलदलीत मोठ्या प्रमाणात आढळतो. पानाच्या खाली असलेल्या चंदेरी आवरणामुळे याचे इंग्लिश नाव पडले आहे.
सुंदरी हे या वृक्षाचे बंगाली नाव आहे.
सुंदरी वृक्षाची पाने साधारण वडाच्या पानाच्या आकाराची असतात. वरून हिरवी आणि खालच्या बाजूला चंदेरी व थोडी खरखरीत असतात. नर-मादी फुले एकाच झुपक्यात येतात आणि सर्व फुलांवर नाजूक लव असते. फुले घंटेच्या आकाराची ५ मिमी लांबीची, साधारण पिवळट हिरव्या रंगाची असतात. फळ टणक, होडीसारखे, गडद भुरकट रंगाचे आणि ४-८ सेंमी लांब असते.
जुन्या व संपूर्ण वाढ झालेल्या वृक्षास रिबनसारखी नागमोडी वळणाची आधारमुळे असतात. ही मुळे फारच भव्य दिसतात. आणि वृक्षास एक वेगळेच स्वरूप प्रदान करतात.
हा वृक्ष महाराष्ट्रात दुर्मीळ आहे. सिंधुदुर्गातील समुद्रकिनारी असलेला एकमेव सुंदरी वृक्ष एका देवराईत आहे. डुंगोबा राईत सुंदरीचे पन्नासएक वृक्ष असल्याची नोंद आहे. या वृक्षास येथे मोठ्या आधारमुळ्या तयार झाल्या आहेत. सुंदरीला या भागात समुद्रकांडोळ असे नाव आहे. मुंबईत राणीच्या बागेत एक सुंदरी वृक्ष होता, पण त्याची एक फांदी मोडल्यामुळे तो पूर्ण वृक्षच तोडला गेला. सुंदरी वृक्षाकडे बघताच त्याच्या देखण्या दर्शनाने ' सुंदरी ' नावाची सत्यता पटते. हा वृक्ष ४० - ४५ फुट वाढतो. गर्द हिरवी वडाच्या पानांच्या आकाराची पाने खालच्या बाजूने चंदेरी छटा मिटवितात आणि थोडी खरखरीत असतात. पाने अभिमानाने मिरवण्यासाठी भरपूर फांद्या चारही बाजूंनी डौलदारपणे झुलत असतात याची फुले मात्र साधी - सुधी छोट्याशा झुपक्यात येतात.
नर आणि मादी फुले वेगळी असतात पण एकाच झुपक्यात येतात. सर्व फुलांवर नाजूक लव असते.
महाराष्ट्रात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या समुद्र किनाऱ्यावर व मुंबई मध्ये ठाण्याच्या खाडीत हे वृक्ष आढळतात. त्यात प्राधान्याने रीझोफोरा, अविसिनीया, सोनेरेशिया इत्यादी वृक्ष आहेत.
रीझोफोरा हा ट्रॉपिकल मॅन्ग्रोव्ह वनातील वृक्ष आहे. Rhizophora mangle ही जात ज्यास्ती प्रमाणात दिसून येते. परंतु त्याच्या काही हायब्रीड जातीपण आहेत.
रीझोफोरा किंवा सर्वच खारण भागात वाढणाऱ्या वृक्षांनी आपल्या रचनेत बरेच बदल केलेले आहेत. कारण त्यांना समुद्राच्या खारट पाण्यात जिवंत राहायचे असते. त्यापैकी एक म्हणजे numatophores. हे त्या झाडांच्या मुळांचे विस्तार असतात. ह्यांच्यावर छोटी छिद्रे असतात ज्याच्यामुळे ही हवेतील ऑक्सिजन शोषून तो खारट पाण्या मद्धे असणाऱ्या मुळांना पुरवतात. आणि त्यांच्या मुळामद्धे एकप्रकारचा खारट पणा काढण्यासाठी नैसर्गिक पंप असतो.
हे वृक्ष समुद्राच्या मध्य भागात (Intertidal झोन) मध्ये असतात जिथे समुद्र साधारणपणे स्थिर असतो. मॅन्ग्रोव्ह प्रकारच्या वनस्पतीमध्ये त्यांचे बीज अंकुरणं वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यास विविपेरस अंकुरण म्हणतात. यामद्धे बीज फांद्यांवर उलटे असते व त्याचा शेपटीकडे भाग लांब , टोकदार व कठीण असतो. बीज वाळल्यावर ते तसेच उलटे समुद्राच्या चिखलात खोलवर रुतून बसते आणि नंतर त्याचे नवीन झाड तयार होते.
तिवरांची जंगले हा दुर्लक्षित विषय आहे. शिवाय त्याच्या वरची शास्त्रीय माहितीही फारशी मिळत नव्हती. अशा परिस्थितीत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील वनस्पती शास्त्र विभागात डॉ. जी. व्ही जोशी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संशोधक विध्यार्थानी १९७५ पासून संशोधन केले. ते जवळ जवळ २५ वर्षे चालले. त्यातून या खारफुटी वृक्षांची खूप शास्त्रीय माहिती मिळाली व तिला आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळाली.
खारफुटी जंगलांचे महत्व
खारफुटीची जंगलं असलीच पाहिजेत का?
अर्थातच. मुंबईत आपल्याकडे २००५ मध्ये २६ जुलै रोजी मिठी नदीने आपले पात्र ओलांडून केलेल्या पुराने हाहाकार माजवला. तो खारफुटीच्या नाशामुळेच होता. खारफुटींची मुळे जमिनीत खूप खोलवर जातात. ती गाळाला किंवा जमिनीला धरून ठेवतात. तशी ती वरही येतात. हवेतील प्राणवायू घेतात. पूर, वादळ, त्सुनामी आल्यास पाण्याचा लोंढा या वनस्पतीच्या मुळाशी, झाडात, तसंच पानात अडतो. जेणेकरून वाढलेली पातळी शहराकडे तितक्या वेगाने पोहोचत नाही. खारफुटी ही या सगळ्याला प्रतिबंधक आहे आणि तीच तोडली गेली. त्यामुळे सरळ पाणी आत आलं. त्यामुळे भविष्यात असे धोके टाळण्यासाठी खारफुटींचं जतन अत्यावश्यक आहे.
ठाणे येथील खारफुटीची जंगले नष्ट होण्यास प्रामुख्याने बिल्डर जबाबदार आहेत. कारण खार फुटीच्या झाडापासून त्यांना काहीच फायदा होत नाही पण तेथील झाडे नष्ट करून त्या जागेवर भर टाकून जमीन तयार करून तेथे गगनचुंबी इमारती बांधून अमाप पैसा मिळवता येतो हेच त्या मागील कारण आहे.
खारफुटी जंगलांना राखीव संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.
खारफुटीचे नष्ट होणारे अधिवास व कमी होत चाललेले त्यांचे महत्त्व यामुळे पर्यावरण मंत्रालयाने त्यांना ‘अतिमहत्त्वाच्या वनस्पती’चा दर्जा दिला व पुढे सागरी नियंत्रण कायदा, वन कायदा यामध्ये त्यांना समाविष्ट करून त्यांच्या संरक्षणाची कायदेशीर तरतूद केली. न्यायालयांनीसुद्धा वेळोवेळी कठोर धोरण अवलंबून खारफुटींच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले. तरीही गेल्या दोन दशकांत भारतात खारफुटींचा नाश झालेला आढळतो. या अनास्थेचे सर्वात मोठे कारण म्हणजे खारफुटीबद्दलचे अज्ञान. एक दृष्टिकोन असा आहे, की या मानवास कुठलाही उपयोग नसलेल्या व रोगराई पसरविणाऱ्या टाकाऊ वनस्पती आहेत. तर याच्या विरोधात काही पर्यावरणवाद्यांनी त्यांचे असे गुणगान केले, की यासम याच.
खारफुटीचे आणखी काही उपयोग
समुद्रात होणारं तेल, कचरा, रसायनाचे प्रदूषण खारफुटी शोषून घेते. या वनस्पतीमध्ये प्रदूषण शोषण्याची ताकद खूप जास्त आहे. तिच्या मुळाशी खूप मोठ्या प्रमाणावर सेंद्रीय गोष्टी साठतात. मासे, खेकडे, कीटकांचे ही वनस्पती म्हणजे नैसर्गिक अन्न आहे. वनस्पतीच्या मुळाशी कित्येक प्रकारचे मासे, खेकडे अंडीसुद्धा घालतात. तर, काही जलचर, कीटक ती खाण्यासाठी येतात. पूर्वी ठाण्यात खूप मच्छिमार असण्याचे कारण हेच होते. खारफुटीमुळे मासे येत होते. पूर्वी लोक जळाऊ लाकूड म्हणूनही वाळलेल्या वनस्पतीचा वापर करत होते. मोठ्या वृक्षांचा फर्निचरसाठी वापर होतो. ते टिंबर वुड म्हणून ओळखले जाते. मेस्वाक वनस्पती म्हणजे खारफुटी सदृश झाड आहे, दंतमंजनात तिचा उपयोग होतो. मधुमेहासाठी खारफुटीपासून औषधे करतात. संधीवात, गॅसेसवर हा उपचार आहे. तिच्यात औषधी गुण मोठ्या प्रमाणावर आहे. जगात यावर खूप संशोधन केलं जातंय.
आंतरराष्ट्रीय खारफुटी वने दिन - २६ जुलै रोजी पाळला जातो.
या बरोबरच हि लेखमाला येथे संपवत आहे. यामद्धे आपण महाराट्रातील प्रत्येक प्रकारच्या जंगलातील महत्वाच्या वृक्षांची ओळख करून घेतली आहे.अजूनही
वनस्पती शास्त्रात बऱ्याच चमत्कारिक गोष्टी आहेत. त्याबद्दल आपण नंतर बोलू (लिहू).
-- डॉ. दिलीप कुलकर्णी.
संदर्भ:
BY CITY BELL ON FEBRUARY 23, 2022
खारफुटीची जंगले - Loksatta 04-Jun-2017
मराठी विकिपेडिया
गूगल वरील बरेच लेख.
सर्व फोटो गूगलच्या सौजन्याने
September 29, 2022
श्रीमंतीची लालसेची खिल्ली उडविण्यासाठी ‘लक्ष्मीघर’ या पात्राची फजिती या नाटकात सादर होते. तसेच धैयधराच्या मनातील भामिनी बद्दलचा राग लक्षात घेवून प्रत्यक्षात ‘भामिनी’च ‘वनमाला’ हे नाव धारण करते व धैर्यधरास जिंकते. इथे पराक्रमी नायकास कर्तबगार परंतु श्रीमंतीस दुय्यम स्थान देणारी नायिका भेटते.
March 12, 2022
गेली चार वर्ष आपटे आजींची सुप्रसिद्ध बटाटा वडा, भजी मिळणारी गाडी बंद होती. १९७१ ते १९८८ च्या अर्ध्या वर्षापर्यंत मी(आई वडील भावंडांसहित) ठाण्याचा रहिवासी. ठाण्यात उत्कृष्ट चविष्ट आणि स्वादिष्ट कुठे काय मिळतं याची खडानखडा माहिती आमच्या अट्टल खवैय्या मित्रांच्या कंपुला असायची. त्यामुळे कुणाच्याही, कुठे काही चविष्ट खाण्यात आलं की ते सगळ्यांना सांगितलं जायचं आणि आमच्या स्वाऱ्या धडकायच्या तिथे.
November 14, 2023
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये दे. ना. चौधरी यांनी लिहिलेला हा लेख
माझा जन्म जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील भालोद गावचा. घरची परिस्थिती तशी बेताचीच. वडिलांना शेतीच्या उत्पन्नातून चरितार्थ चालवणे जिकीरीचे होऊ लागल्यावर त्यांनी शैक्षणिक साहित्य विक्रीचे दुकान टाकले. जिद्द, चिकाटी व त्याच्या जोडीला सचोटी यामुळे त्यांच्या उद्योगाचा विस्तार वाढला. अशा वातावरणातच माझा १९३० मध्ये जन्म झाला. व्हर्नाक्युलर (म्हणजे सातवीची) परीक्षा पास झाल्यावर वडिलांची अशी इच्छा होती की, जळगावच्या जवळ असलेल्या ममुराबाद येथील शेतकी फार्मवर नोकरीसाठी जावे. त्यांचा तसा आग्रह होता. तसे नोकरीबाबतचे पत्र देखील मला मिळाले होते. परंतु माझी इच्छा पुढे शिक्षण चालू ठेवण्याची होती. म्हणून मी नोकरी न स्विकारता एस.एस.सी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्या काळात वाहातुकीची साधने उपलब्ध नव्हती.
त्यामुळे डोक्यावर पेटी घेऊन मी माझ्या गावापासून ८ कि.मी. अंतरावरील भुसावळला पोहोचलो. तिथून जळगावला. एस.एस.सी. च्या परीक्षेसाठी रेल्वेने गेलो. शिक्षणासाठी संघर्षमय जीवनाचा शेवट इथेच संपत नाही. कॉलेजची शिक्षण घेण्याची माझी खूप इच्छा होती. तथापि वडील गावाचे मुलकी पाटील असल्यामुळे व त्यांचा संपर्क महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी येत असल्यामुळे त्यांना असे वाटत होते की, आपल्या मुलाने महसूल विभागात नोकरी धरावी. म्हणजे त्याला पुढे परिक्षा देऊन मामलेदार होता येईल व प्रांत ऑफिसरची जागा त्याला मिळू शकेल. कारण मामलेदार व प्रांत ऑफिसर म्हणजेच केवळ 'साहेब' अशी त्यावेळी ग्रामीण भागातील लोकांची समजूत होती. आणि तेच खरे अधिकारी समजले जात होते. कारण ग्रामीण भागातील लोकांचा केवळ या अधिकाऱ्यांशीच संबंध येतो त्यामुळे त्यांना ते देवासमान मानतात. त्यांचे बोलणे म्हणजे जणू देववाणीच समजतात. त्यामुळे वडील कॉलेज शिक्षणाला परवानगी देईनात कर्मधर्मसंयोगाने त्यावेळी श्री. डमरी (नंतर वित्त विभागात सचिव होते.) नाशिकला कलेक्टर होते. त्यांचा व वडिलांचा संबंध येत असे. वडिलांनी त्यांना सल्ला विचारला. त्यांनी मला नाशिकला एच.पी.टी. कॉलेजमध्ये शिकायला ठेवा, असा वडिलांकडे आग्रह धरला. एवढेच नव्हे तर माझे नाशिकमधील ते गार्डियन म्हणून राहणार असे वडिलांना सांगितले. मला पुणे किंवा नाशिकला कॉलेज शिक्षणासाठी जाता आले नाही.
माझे काका नडियाद (गुजरात) येथे इंजिनियर होते. त्यांनी मला कॉलेज शिक्षणासाठी नडियादला येण्याचा आग्रह धरला. वडिलांचा विरोध सहन करून मी गुजराथ विद्यापीठातून बी. ए. ची पदवी मिळवली. लगेच माझा विवाह झाला. त्यानंतर नोकरी करून एल.एल.बी. ची पदवी मिळवली. अकाऊंटस् मध्ये क्लार्कची नोकरी करीतच माझं वकिली शिक्षण पूर्ण झाले. मी वकिली सुरू केली. वकिलीतून बऱ्यापैकी पैसे मिळू लागलेत. परंतु जळगावसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहात असल्यामुळे आजारपणासाठी अथवा अन्य कारणासाठी जळगावला येणाऱ्या असंख्य नातेवाईकांमुळे माझे घर रेल्वेचे वेटिंग रूम झाले व माझ्या पत्नीला दवाखान्यात नातेवाईकांना डबे पोहोचविणे, आल्यागेलेल्यांसाठी चहा करीत बसणे हाच मुख्य व्यवसाय झाला. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ लागली. हे मला आवडले नाही. म्हणून मी सरकारी नोकरी स्विकारली व अकोल्यात असिस्टंट चॅरिटी कमिशनर म्हणून रुजू झालो. थोड्याच दिवसात डेप्युटी चॅरिटी कमिशनर म्हणून रुजू झालो. थोड्याच दिवसात डेप्युटी चॅरिटी कमिशनर म्हणून पुणे व मुंबईत काम केले. त्याचवेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या असिस्टंट ड्राफ्टसमन कम अवर सचिव व डेप्युटी ड्राफ्टसमन कम डेप्युटी सेक्रेटरी या मंत्रालयातील विधी व न्याय विभागासाठी जाहिरात आली. मी सुरुवातीला अवर सचिव म्हणून रुजू झालो. परंतु लगेच ४ महिन्यात उपसचिव पदासाठी झालेल्या निवडीमुळे उपसचिव झालो. पुढे ४ वर्षांत मला सहसचिवाचे पदी बढती मिळाली. पुन्हा पुढील ४ वर्षांनंतर माझी सचिवपदी पदोन्नती झाली. पुढील दोन वर्षात मी प्रधान सचिव झालो तर त्यापुढील २ वर्षानंतर सेवानिवृत्त झालो. त्यानंतर शासनाने प्रधान सचिव, पार्लमेंटरी अफेअर्स या विभगात माझी प्रधान सचिव म्हणून पुर्ननियुक्ती केली. शासनाने तिथून माझा सेवा कालावधी संपायच्या आतच राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त केले. राज्य निवडणूक आयुक्त म्हणून निवृत्त झाल्यावर महाराष्ट्र शासनाने मला महाराष्ट्र राज्य लॉ कमिशनचे चेअरमन म्हणून ३१ मे २००५ पासून नियुक्त केले. मी तिथून निवृत्त झालो. विधि आयोगाचे प्रामुख्याने काम म्हणजे आयोगाने राज्याचे विद्यमान कायदे व संविधानाच्या सातव्या परिशिष्टातील समवर्ती सूचीत मोडणारे कायदे तपासणे, त्याखाली केलेले नियम व अधिनियम हे संविधानातील तरतुदींशी सुसंगत आहेत का हे तपासणे, न्यायालयातील खटले वेगाने निकाली काढले जाण्यासाठी सुसंगत आहेत का हे तपासणे, न्यायालयातील खटले वेगाने निकाली काढले जाण्यासाठी न्यायदान पद्धतीत सुधारणा सुचविणे, संपुष्टात आलेले कायदे तपासून आवश्यक असल्यास ते निरसित करणेविषयी सुचविणे, समान विषयासंबंधीचे कायद्यांच्या एकत्रीकरणाबाबत शिफारस करणे, एखाद्या विषयावर नवीन विधिविधान करण्यासाठी शिफारस करणे, वगैरे बाबींचा त्यात समावेश होतो.
जीवनात वेगवेगळ्या टप्प्यावर माणसं मिळत जातात व ते आपल्या जीवनाला कलाटणी देऊन जातात. शाळेत असताना मी अतिशय व्रात्य होतो परंतु त्यावेळी श्री.एल.एन. सरांच्या मार्गदर्शनाखाली केलेला इंग्रजी विषयाचा अभ्यास आणि त्या विषयाबद्दल माझ्यात निर्माण केलेली आवड माझ्या पुढील शिक्षणासाठी उपयुक्त ठरली. त्यांचे मला मार्गदर्शन लाभले नसते तर माझे पुढील शिक्षण घेण्याचे स्वप्न हे पहाटे पडलेले स्वप्न न होता मध्यरात्री पडलेले स्वप्न ठरले असते. त्यांनी मला जीवन कसे जगावे, त्यात प्रामाणिकपण असावा व सतत इतरांना मदत करीत राहावे ही शिकवण दिली व तसे वर्तन ठेवण्याचा सल्ला दिला. तर वकिली करीत असताना मला वकील म्हणून घडविण्यात श्री. डी. डी. चौधरी या प्रथितयश वकिलांचा मोठा हात आहे. त्यामुळे मला वकिली करताना खूपच मदत झाली. तर मंत्रालयात विधी व न्याय विभागात रुजू झाल्यावर यशस्वी प्रारूपकार कसे होता येईल याचे धडे व मार्गदर्शन माझे वरिष्ठ अधिकारी श्री. धुरंधर व श्री. धोत्रे यांचे लाभले. त्याचा मला आयुष्यभर उपयोग होत राहिला. एवढंच नव्हे तर शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर विविध नियुक्त्या झाल्यात त्या प्रत्येक ठिकाणी मला त्या प्रेरकच ठरल्यात. माझ्या आयुष्यात मला लोकांचे सतत प्रेमच मिळत राहिले. म्हणूनच मी वयाची ८८ वर्षे आनंदाने पार करून अजूनही उत्साहाने कार्यरत आहे. शासकीय सेवेत असताना विशेषत्वाने बॅ. अंतुले, श्री. शंकरराव चव्हाण, श्री. शरद पवार, श्री. सुधाकरराव नाईक, श्री. विलासराव देशमुख व श्री. सुशीलकुमार शिंदे या मुख्यमंत्र्यांनी प्रोत्साहन दिले व माझा कामातील उत्साह वाढवत ठेवला. तसेच विधी व न्यायमंत्री बॅ. रामराव आदिक यांचेही भरपूर सहकार्य लाभले.
माझ्या यशस्वी जीवनाचा पाया हा माझ्या पत्नीने रचलेला आहे. तिची मला मिळालेली आयुष्यभराची साथ ही केवळ भावनिकच नसून कणखर व्यक्तिमत्त्वाची लाभली व त्यामुळेच मला माझे शिक्षण पूर्ण करता आले. संस्काराच्या मंदिराला रूप देऊन घर उभं करणारी ही गृहकर्तव्यदक्ष गृहिणी म्हणजे माझी खरी मार्गदर्शिकाच आहे. आपल्यावर बेतलेल्या प्रतिकूल परिस्थितीतही आक्रसून न जाता येणाऱ्या प्रत्येक क्षणाला उत्साहाने सामोरे जाऊन भूतकाळात जास्त न रमता भविष्याकडे नजर ठेवून वर्तमानाला जास्त महत्त्व देणारी ही समयसूचक गृहिणी म्हणजे लेवा परिवारातील एक आदर्श महिला आहे. तिने मुलांवर बालवयात केलेले सुसंस्कार आणि घडविलेला बौद्धिक विकास यामुळेच मी यशस्वी झालो. ती म्हणजे माझ्या यशोदायी जीवनाची प्रेरणा आहे. माझ्या मुलांचा, सूनांचा सहवास हा आनंददायी आहे. कदाचित माझ्या ठणठणीत प्रकृतीचे तेच रहस्य असू शकते.
या यशस्वी जीवनात शासकीय सेवेत असताना कटु अनुभव देखील आलेत. मला पुर्ननियुक्ती मिळाल्यावर काहींना ते आवडले नाही. मला मात्र वेदना झाल्यात. पण मी मनात काही ठेवीत नसतो. मी विसरलो. कारण आयुष्य हे नदीच्या प्रवाहाप्रमाणे प्रवाही आहे. त्या कटु आठवणी विसरूनच मार्गक्रमणा चालू ठेवली.
डेप्युटी ड्राफ्टसमन असताना मला शासनाने (केंद्र व राज्य शासनाच्या शिफारशीनंतर) लंडनला 'Course for Govt. Legal Officers from Overseas, London' साठी पाठविण्यात आले. हा अनुभव भावी जीवनात खूप उपयुक्त ठरला. ऑल इंडिया कॉन्फरन्स ऑफ इंटेलक्युअलस् यांच्यामार्फत The great son of the soil हा पुरस्कार मला नवी दिल्लीला A Prominent social worker म्हणून दिला होता.
आपल्या जीवनाच्या प्रवासात आईवडील, शिक्षक, कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री यांचा जसा हातभार लागत असतो तसाच मी ज्या लेवा पाटीदार समाजात जन्माला आलो त्या समाजातील धुरीणांचा मी आभारी आहे. आमचा समाज बहुसंख्येने खानदेशात राहात असला तरी नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेला आहे. अशा समाजाला एकत्र आणून सामाजिक जाण निर्माण करून समजा सेवा करण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीने लेवा पाटीदार महासंघ स्थापन केला. त्या महासंघाचा मी पहिला अध्यक्ष म्हणून कार्यरत होतो. माझ्या या समाजकार्याची जाण ठेवून ठिकठिकाणच्या शाखांनी माझा बहुमान केला व मला 'समाजभूषण' म्हणून गौरविले.
मी साईबाबांचा निस्सीम भक्त आहे. मी १ डिसेंबर १९५९ पासून दरवर्षी १ डिसेंबरला कायम न चुकता शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शन, पूजा व आरतीसाठी जात असतो.
काळ बदलतो तशा वृत्ती बदलतात आयुष्यात जी मानसिकता जपली तशी आताच्या पिढीत दिसत नाही. शासकीय सेवेत सेवाभावी वृत्ती हरपत चालली आहे. हे बघून मात्र खूप वाईट वाटते.
-दे. ना. चौधरी
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
August 30, 2022
चष्मा ही आजच्या युगातील अनेकांची एक अत्यंत गरजेची वस्तू ठरली आहे. फक्त प्रौढांच्याच नव्हे, तर अनेक तरुणांच्याही ! दृष्टिदोषावर मात करणाऱ्या या अतिशय उपयुक्त साधनालाही स्वतःचा इतिहास आहे. या इतिहासातल्या विविध टप्प्यांचा आढावा घेणारा हा लेख…
February 2, 2024
हा दिवस २००० साली प्रथम साजरा करण्यात आला. याची सुरूवात जर्मन ब्रेन ट्यूमर असोसिएशन डॉइश हिरंटुमरहिलफ यांनी केली होती. या संघटनेची स्थापना १९९८ साली झाली. यामध्ये १४ देशांमधील ५०० हून अधिक सदस्य आहेत. याच असोसिएशनने ८ जूनला ब्रेन ट्यूमर डे जाहीर केला. तेव्हापासून या आजाराविषयी जागरुकता आणण्यासाठी ८ जूनला हा दिवस साजरा केला जातो.
June 8, 2021
पाचूच्या बेटावरील ज्या 11 मानवी सिंहांनी राष्ट्राची पहिलीवहिली कसोटी 1981-82च्या हंगामात इंग्लंडविरुद्ध खेळली त्यांमध्ये 18 वर्षांच्या अर्जुना रणतुंगाचा समावेश होता. श्रीलंका संघाने खेळलेल्या 100व्या कसोटीत अर्जुना होता, त्याचा ‘त्या’ दहामधील कोणताही सहकारी आता मात्र संघात नव्हता.
August 9, 2010
दशकोंपासून ज्या अंतराळ विज्ञानावर जगातील मोजक्या महाशक्तींची मक्तेदारी होती, त्याच विज्ञानाचा इतिहास भारताच्या एका छोट्याशा प्रयोगाने रातोरात बदलून टाकला आहे. चंद्राच्या ज्या भयानक, अंधार्या आणि गोठवून टाकणार्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवायला अख्खं जग घाबरत होतं, तिथे भारताने काहीतरी असं करून दाखवलंय ज्याची कल्पना अमेरिकेच्या नासानेही केली नव्हती.
June 9, 2026
जगात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काहीतरी नवीन करण्याची धडपड असते. आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्नही तेवढेच करतात. पण प्रत्येक व्यक्तीला अपेक्षित यश मिळणार असे नसते तर कधीकधी अपयशाला ही सामोरे जावे लागते, पण त्या अपयशाला खचून न जाता जिद्द चिकाटीने आपल्या यशाची नौका पैलतीरी नेली पाहीजे.
July 8, 2019
डिझेलचे तांत्रिक नाव ‘हाय स्पीड डिझेल’ (एच.एस.डी.) असे आहे व ते रुडॉल्फ डिझेल या जर्मन संशोधकाच्या नावावरून आले आहे. वेगवान वाहनासाठी वापरले जात असल्यामुळे ‘हाय स्पीड’ हे नाव पडले. त्यामुळेच मोटार पंपासारख्या शेतकी कामासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनाच्या तुलनात्मक कमी गतीच्या इंजिनात वेगळ्या डिझेल तेलाचा वापर होतो व त्याला लाइट डिझेल ऑइल (एल.डी.ऑ.) असे संबोधतात.
February 27, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti