वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आपल्याकडे प्रत्येक प्रथेमागे, सणामागे काही ना काही सामाजिक आणि शास्त्रीय कारणे ही आहेतच. दीप अमावास्येच्या दुसऱ्या दिवशीपासून महाराष्ट्रात श्रावण सुरु होतो. ऊन-पावसाचा खेळ. अंधार देखील लवकर पडू लागतो. कदाचित म्हणूनच पूर्वी दीप अमावास्येच्या निमित्ताने घरातील सर्व दिवे बाहेर काढून त्या योगे त्यांची स्वच्छता व्हावी असे अध्यारूत असावे.
July 20, 2017
सोरटी सोमनाथच्या मंदिराचा रक्तरन्जीत इतिहास आणि आता उभे असलेले मंदीर भारताचे गौरव स्थान आहे. प्रत्येक भारतीयांनी अवश्य भेट द्यावी असे पर्यटन स्थळ आहे. एखादे धार्मिक स्थान हजारो वर्षे अनेक स्वाऱ्यामध्ये नेस्तनाबूत होते, परंतु त्यानंतर प्रत्येक वेळा फिनिक्स पक्षासारखे राखेतून उभे राहते असे एकमेव स्थान आहे सोरटी सोमनाथ. सौराष्ट्राच्या पश्चिम किनारयावर वेरावळ पासून २० किमी वर वसलेल्या, बारा ज्योतिर्लिंगांमधील प्रथम क्रमांकावर असलेल्या या स्थानाचा इतिहास रक्तरंजित आहे.
December 22, 2018

August 18, 2015
जेव्हा-जेव्हा विकासाबद्दल चर्चा होते, मग तो एखाद्या खेड्याचा असो अथवा एखाद्या देशाचा प्रत्येक वेळी उपलब्ध साधनसंपत्ती, दळणवळणाच्या सुविधा आणि इतर पायाभूत सुविधांचाच प्रामुख्याने उल्लेख होतो. अर्थात विकासाच्या संदर्भात या सगळ््या गोष्टींचे महत्त्व नाकारता येत नाहीच; परंतु यापेक्षाही अधिक महत्त्वाची बाब म्हणजे विकासाची मानसिकता! ही मानसिकता असेल तर साधनसंपत्तीची उपलब्धता नसणे ही अडचण ठरत नाही आणि ही मानसिकता नसेल तर कितीही अनुकूल परिस्थिती असली तरी विकासाच्या केवळ गप्पाच होऊ शकतात.
January 7, 2007
स्टेशनवर शिरतानाच प्रवाशांना जी पहिली व्यक्ती भेटते ती म्हणजे लाल शर्ट व त्यावर पितळी बिल्ला असलेला हमाल. त्यांचं दुसरं नाव आहे 'कुली'; परंतु ते नाव त्यांना आवडत नाही म्हणून त्यांच्या संस्थेनं हमालांना ‘पोर्टर' ते म्हणावं अशी सातत्यानं मागणी केलेली आहे.
'कुली' या शब्दाचा हिंदीतील अर्थ 'दिवसभर काबाडकष्ट करणारा कामकरी' असा आहे. गुजरातमध्ये त्या नावाने एक जमात आहे. उर्दू, तुर्की भाषांत गुलामांचं नाव 'कुली' असे, तर चीन देशामध्ये 'अतिशय कष्टाचं काम करणारी दुर्लक्षित जमात' असा उल्लेख आहे.
१६ व्या शतकात संपूर्ण अशिया, आफ्रिका या खंडांत हजारोंच्या संख्येनं विविध कामांवर कुली मेहनतीची कामं करीत. चिनी कुलींच्या मदतीनं अमेरिका व कॅनडात संपूर्ण रेल्वे बांधणी पूर्ण होऊ शकली. ब्रिटिशांनी त्यांचा उपयोग चहा व रबराच्या मळ्यांत केला होता.
भारतात रेल्वे सुरू झाली आणि पाठोपाठ जड बोजे उचलण्यासाठी स्टेशना-स्टेशनांवर हमालांचं आगमन झालं. भारतात ब्रिटिश व त्यांचं अनुकरण करणारे उच्चभ्रू भारतीय प्रवासी हे रेल्वेच्या प्रवासात घरातील असंख्य वस्तू नेत असत. होल्डॉल, पोत्यात घातलेली स्वयंपाकाची भांडी, पाणी नेण्याकरता फिरकीचे तांबे नाहीतर खुजे, अनेक कप्पी डबे, भल्याथोरल्या पत्र्याच्या ट्रंका, हे सामान वाहून नेण्यासाठी हमालांची गरज असे. पुढे जसजशी प्रवाशांची गर्दी वाढू लागली, तसतशी डब्यात बसण्यासाठी जागा मिळविणं अशक्यप्राय झालं आणि ती समस्या हमाल मंडळी मोठ्या शिताफीनं सोडवू लागली. गाडीच्या डब्यांची संख्या वाढू लागली तेव्हा आपला डबा शोधणं शिकलेल्या माणसालासुद्धा कठीण जाऊ लागलं. धार्मिक यात्रा वाढल्या, प्रवासी कंपन्या आल्या आणि हमालांचं भाग्य फळफळलं. विशेषत: मधल्या स्टेशनातून गाडीच्या डब्यात शिरण्यासाठी हमालांची नितांत गरज भासू लागली. यार्डातून गाडी मुख्य स्टेशनात शिरतानाच रिकाम्या गाडीच्या डब्या-डब्यातून 'लाल डगलेवाले जागांचा ताबा घेऊ लागले. जो प्रवासी जास्त पैसे देणार त्याच्या सेवेसाठी हमालांची गर्दी होऊ लागली. हमाल ही स्टेशनवरची एक अति महत्त्वाची व्यक्ती बनू लागली.
गाडी स्टेशनामध्ये शिरते न शिरते तोच हमाल डब्याचा ताबा घेऊ लागले. आणि बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना सामानासकट घोडागाडी, टॅक्सी, ऑटारिक्षापर्यंत नेऊन सोडू लागले. फार पूर्वी तर प्रवाशाचं घर किंवा हॉटेल स्टेशनच्या आसपास असल्यास हमाल अगदी थेट निवासस्थानापर्यंत सामान पोहोचविण्यासही मदत करू लागले. कामाची व्याप्ती इतकी वाढत गेली, की लाल डगलेवाल्यांची संख्या अपुरी पडू लागली. बेकायदेशीर हमालांची दुसरी फौज तयार होऊ लागली. बेकायदा हमालांना रेल्वेची मान्यता नव्हती. त्यांच्याजवळ क्रमांक असलेला बिल्ला नसे. लाल डगलेवाल्या बिल्लाधारी हमालांची शिफारस रेल्वेच्या प्रत्येक उद्घोषणेतून केली जाई. अधिकृत हमालांकडून सामानाच्या पळवापळवीचा प्रसंग घडल्यास त्यांना क्रमांकावरून पकडणं शक्य होत असे, परंतु पुढेपुढे हमालांची गरज इतकी वाढली, की अधिकृत व अनधिकृत अशा दोघांनाही पुरेसं काम आणि दाम मिळत होता.
गाड्यांचे क्रमांक, डब्यांची जागा, गाडी किती उशिरानं येणार, यांचं ज्ञान हमालाइतकं दुसऱ्या कोणाला असणं शक्यच नाही. तिकिटावर नमूद केलेल्या डब्याजवळ सर्व सामानासह हमाल जाणार याविषयी मनात कधीही शंका बाळगण्याचं कारण नाही. गाडीला उशीर असेल तर तो सामान ठेवून कुठेतरी गायब होतो, पण गाडीचं इंजिन स्टेशनमध्ये शिरताना तो वेळेवर आपल्याजवळ येणार हे शंभर टक्के नक्की असतं. हमाली ठरविणं, त्यांच्याशी भाव करणं ही मात्र एक कला आहे, त्याचे उपजत ज्ञान पट्टीच्या प्रवाशाकडेच असतं. बहुसंख्य प्रवासी शेवटी घासाघीस करीत त्याच्यापासून लवकर मोकळे होतात. तुमचं सामान पळविण्यात त्याला कधीही स्वारस्थ नसतं. तुमच्याकडून भरकन पैसे घेऊन तो दुसरं गि-हाईक शोधण्याच्या मार्गी लागतो.
रेल्वेबोर्ड हमालांकरता काही शिबिरं भरवीत असतं. असं एक शिबीर अलाहाबाद स्टेशनावर साठ हमालांकरता घेण्यात आलं होतं. गावातील सर्व धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांची माहिती त्यांना देण्यात आली, जी त्यांनी आपल्या प्रवाशांना द्यावी हा त्यामागे उद्देश होता. त्या माहितीचा फायदा घेऊन प्रवासी त्या वेळात भेट देण्याबाबत मनातल्या मनात काही स्थळं पक्की करू शकतो. प्रवाशांनादेखील गावातील हॉटेल्सची उत्तम माहिती हमालांकडून मिळते.
लहानपणापासून शाळेत 'हमाल' या विषयावर बरेचदा निबंध लिहावयास सांगत. त्यात हमाल म्हणजे लुच्चा, फसविणारा अशी प्रतिमा उभी केली जात असे. काही वेळा पोटापाण्याकरता ते दादागिरी करतात, पैशांबाबत फसवतात ते हे खरंही आहे, पण असं असलं तरी त्यांच्याही अनेक समस्या आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत बोजे उचलण्याचं काम केल्यावर त्यांना कसेबसे महिना ५ ते ६ हजार रुपये मिळतात. काही वेळा चाळीस किलो वजनदेखील उचलून घेऊन जावं लागतं. जेवण करण्यासाठी धड जागा नसते. रिकाम्या प्लॅटफॉर्मवरील नळाजवळ डबा खायचा. इंजिनांची व गाड्यांची ये-जा चालूच असताना जिथे डबा खाल्ला तिथेच कुठेतरी वामकुक्षी करायची, हे प्राक्तन हमालांना चुकत नसतं.
काही हमाल रात्रपाळी करतात. स्टेशनवरील या हमालांच्या गटावर मुकादम असतात. हे मुकादम हिशोब ठेवतात, हमालांसाठी पतपेढी चालवितात.
स्टेशनजवळील मंदिरात वा मशिदीत ते आपले सण साजरे करतात.
नवी दिल्ली, हावरा स्टेशन, येथे हमालांची संख्या हजारावर असून, अनेक नवीन गाड्या सुरू झाल्यानं या जागा हमालीच्या धंद्यास उपयुक्त आहेत. प्रत्येक राज्यातील राजधानी एक्सप्रेस दिल्ली मुक्कामी येतात, त्यामुळे हमालांचा धंदा चांगला होतो; परंतु छत्रपती शिवाजी टर्मिनस (व्ही.टी.) स्टेशनवरील हमालांची परिस्थिती मात्र हलाखीची आहे. दूर पल्ल्याच्या अनेक गाड्या आता दादर व कुर्ला टर्मिनस येथून सुटत असल्यानं या स्टेशनवरून सुटणाऱ्या गाड्या कमी झाल्या आहेत आणि त्यामुळे इथल्या हमालांची मिळकतही कमी झाली आहे.
गर्दीच्या समुद्रातून वाट काढत प्रवाशांना गाडीच्या डब्यापर्यंत पोहोचविण्याचं कौशल्य असणाऱ्या, उन्हा-पावसात राबणाऱ्या या समाजघटकाच्या आर्थिक व आरोग्यसमस्येकडे मात्र सर्वजण दुर्लक्ष करतात. ते रेल्वेचे कर्मचारी म्हणून गणले जात नसल्याने नोकरीचे कोणतेही फायदे त्यांना मिळत नाहीत. फक्त वर्षातून एकदा गावी जाण्यासाठी साध्या आरक्षण नसलेल्या डब्यातून प्रवास करण्याचा पास त्यांना मिळतो.
आता काळ बदलला आहे. स्ट्रोल बॅग्जमुळे (चाकं असलेल्या) प्रवासी आपलं सामान स्वत:च खेचून नेतात. पर्यायानं सर्वच हमालांना एकसारखं काम व पैसे मिळतील याची शाश्वती नसते. यावर उपाय म्हणून सर्व हमालांना मिळणारी मिळकत एकत्र केली जाते. तत्पूर्वी, त्यांतील ४० टक्के रक्कम स्वत:ची मिळकत म्हणून बाजूला ठेवली जाते व नंतर बाकीची रक्कम सर्वांमध्ये विभागली जाते. या कामाकरता एक मुकादम नेमलेला असतो. हे सर्व लोक पैशांच्या व्यवहाराबाबत प्रामाणिक असतात. मुंबई सेंट्रल स्टेशनवर असा उपक्रम राबविला जातो. मुंबईतील बरेचसे हमाल वारकरी संप्रदायाचे आहेत. ते स्टेशन परिसरात अनेक उत्सव साजरे करतात. सर्वच हमाल अशिक्षित आहेत असं नाही, तर काही जण पदवीधरदेखील आहेत. त्यांना नोकरी मिळत नाही म्हणून ते स्टेशनवर हमाली करतात व पुढे रेल्वेशी रोजचा संबंध आल्यानं एखादे वेळी रेल्वेत नोकरी मिळेल या आशेवरही ते हमालीचं काम करतात. पाठीचा मणका, गुडघे, विविध सांधे यांच्या आजारानं त्यांतील अनेक जण ग्रस्त असतात, पण वैद्यकीय सेवेसाठी त्यांची रेल्वे हॉस्पिटलमध्ये सोय होत नाही. बरेच वेळा त्यांना स्वत:चेच पैसे खर्चावे लागतात. एकंदरीत हमालांच्या समस्यांकडे गांभीर्याने कोणाचेच लक्ष नाही. पत्र्याच्या ट्रंका, होल्डॉल, पाच कप्पी पितळी डबे, फिरकीचे तांबे, खुजे, इतिहासजमा झाले आहेत आणि काही वर्षांत लाल डगलेवाला हमाल काळाच्या पडद्याआड जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. असं झालं, तर भारतीय रेल्वेचा एकेकाळचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ अस्तंगत होईल.
लाल डगल्याच्या रेल्वे हमालाचा होणारा कायापालट रेल्वेहमाल वा कुली' म्हणजे डोक्यावर, खांद्यांवर सामानाचे ओझे उचलणारा प्रवाशांचा आज्ञाधारक सेवक हे त्याचे रूप हळूहळू पालटणार असून, त्याला ‘सामान सहाय्यक' असे नाव असेल व त्याच्या दिमतीला विमानतळासारख्या ट्रॉलीज असतील. त्याला नवीन त-हेचे कपडे दिले जातील, ज्यांवर विविध कंपन्यांच्या जाहिराती असतील. पंतप्रधान मोदींच्या मते आज क्रिकेटच्या स्टंपवर, खेळाडूंच्या टी-शर्टवर जाहिरात असते, तर या साहाय्यकांनाही तसेच कपडे द्यावे. त्यांमधून रेल्वेला उत्पन्न मिळेल आणि हे 'सामान सहाय्यक' स्टेशनवर प्रवाशांच्या दिमतीला हजर राहतील; शेवटी या 'सामान सहायकां'चा दरही ठरवावाच लागेल, कारण प्रवासी हुज्जतीला कंटाळतो.
-डॉ. अविनाश वैद्य
August 2, 2022
प्रशासनाच्या दफ्तर दिरंगाईचा समाचार घेणाऱ्या मागील ‘प्रहार’ला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. खूप एसएमएस आले, बऱ्याच लोकांनी प्रत्यक्ष फोनवर अभिनंदन केले. काही फोन तर जिथे देशोन्नतीचे अंक पोहचत नाहीत, अशा भागातून आले.
January 20, 2008
पालेभाज्यांचा पार अगदीच चोथा करून टाकलात हो,
आम्ही डोक्यावर घेऊन नाचत होतो, आज एकदम पायाखाली ?
आपण अगदी टोकाचे अतिरंजित लिहित आहात,
खरं वाटत नाही.
पालेभाज्यामधे जीवनमूल्यच नाहीत ? असे कसे म्हणू शकता ?
आम्ही तर रोज पालेभाज्या खातोय.
नाॅनव्हेज बंद केलेत, एकवेळ समजू शकतो. पण आता पालेभाज्यापण बंद. मग खायचे तरी काय ?
कालच्या आरोग्यटीपेवरील काही व्यक्त काही अव्यक्त टीका ....
आपण आपल्या धारणाच बदलून टाकल्या आहेत. म्हणजे जे मूलतः भारतीय विचार होते, ते कालबाह्य म्हणून टाकून दिले आणि ज्या लोकांना संस्कृती म्हणजे काय ? जेवावे कसे, हे माहिती नव्हते, त्यांना हे सर्व आपण भारतीयांनी शिकवले. आज त्यांचा अनुनय आपण करतोय ? ते सांगतात, त्यावर पूर्णसत्य म्हणून विश्वास ठेवतोय. कालाय तस्मै नमः । दुसरं काय ?
या लेख मालेतून आपण भारतीय आरोग्य ( आजच्या काळात किती श्रेष्ठ आहे हे ) जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, हे आपण आधीच ठरवलेले आहे. त्यादृष्टीने सर्व लेखन चाललेले आपल्या लक्षात येत असेल.
आज आमची धारणा अशी झाली आहे, की जे जे पाश्चात्य ते ते चांगले. पण हे आमच्या लक्षात येत नाही, की त्यांच्या धारणा, जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन, हा भारतीय जीवनपद्धतीपेक्षा कितीतरी भिन्न आहे.
आजच्या शिक्षणपद्धतीमधला हा दोष आहे की आमचे ते सर्व वाईट आणि पाश्चात्यांचे सर्व योग्य असे शिकवले जाते. हे पण पटणारे नाही काही जणांना.
टाय बांधला की माणूस सुसंस्कृत, सुशिक्षित वाटतो. हे खरंही असेल पण तो खरंच तसा होतो का ? मग शेंबुड सुद्धा पुसता येत नाही अशा शाळेत जाणाऱ्या पोरांना टाय बांधायची आवश्यकताच काय आहे ? ( टायचा उपयोग शेंबुड पुसण्यापेक्षा आणखी चांगला काय असू शकेल ? ) केवळ दिसण्यापेक्षा आतून तसे भारतीय असणे आवश्यक वाटते.
मी मोदींची भलावण करतोय असं नाही, पण टाय न लावतादेखील भारतीय पोशाखात आपले व्यक्तिमत्व खुलवता येऊ शकते. विचार भारतीय असला की सगळं शक्य असतं.
पण काय भुललासी वरलीया रंगा... ही आमची स्थिती झाली आहे. भारताबद्दलचे प्रेम सोडता येत नाही आणि पाश्चात्य संस्कृतीचा मोह टाळता येत नाही. न घर का ना घाट का अशी अवस्था आपली झाली आहे.
त्याची कित्ती उदाहरणे सांगू. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती पाश्चात्य विचारांनी वागतोय, सहज हिशोब करीत बसलो होतो, तेव्हा असे लक्षात आले की तब्बल 127 ठिकाणी आम्ही आमच्या मूळ परंपरा, रितीरिवाज, भाषा, पोशाख, चालीरिती बदललेल्या आहेत, ज्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत चालला आहे.
म्हणून मी सुरवातीलाच म्हटले, मूळ भारतीय आरोग्यापासून आपण खूप लांब चाललो आहोत.
पालेभाज्यांच्या पार्श्वभूमीवर डोक्यात येणारे उलटसुलट विचार आजच्या ग्लोबलायझेशनच्या फास्ट ट्रॅक युगात रूचणारे नाहीत, पटणारे मुळीच नाहीत पण काय योग्य होते, आणि आपण काय करीत होतो, ज्यामुळे आपले शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य चांगले राहात होते.
कुठेही शास्त्रीय आधार न सोडता, व्यवहारात काय चालले आहे, याचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न आहे.
मी संपूर्णपणे भारतीय बनण्याचे ठरवलेले आहे. आत्ता सुरवात झालेली आहे. वेळ गेलेली नाही. आजपासून अजून पन्नास वर्षे शिल्लक आहेत.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
20.10.2016
October 20, 2016
तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे “. ही ओळ जेंव्हा आरतीप्रभूंनी लिहिली तेंव्हा त्यांनी मारवा ऐकला होता की नाही, याची कल्पना नाही. परंतु मारवा रागाचा “स्वभाव” मात्र या ओळीतून चपखलपणे दिसून येतो, हे नक्की. या रागात सुखाची सावली नाही किंवा बरेचवेळा असेच वाटते, काही आशा ठेवायला तरी जागा आहे का? महाभारतातील अश्वत्थाम्याची कपाळावरील चिरंतन जखम जशी सतत वाहती असते त्याप्रमाणे या रागात सतत वेदनेचा सूर कायम स्त्रवत असतो
November 27, 2018
सुरासम्पुर्णकलशंरुधिराप्लुतमेवच।
दधानाहस्तपद्माभ्यांकुष्मांडाशुभदास्तुमे।।
पूर्वी अवकाशात अंधार होता. काहीच दिसत नव्हते. अशावेळी मंद, हलकं स्मितहास्य करित मातादेवीने ब्रह्मांडाची निर्मीती केली. म्हणून सृष्टीचे आदीस्वरुप दुर्गामातेला मानले जाते. कुष्मांडा या नावाने तिची पुजा करतात. दाहीदिशांवर मातेचा प्रभाव आहे. सूर्याप्रमाणे तिचे तेज असल्याने ब्रह्मांडातील सर्वजीवमात्रांबर, प्रत्येक वस्तुंवर कुष्मांडामातेचे तेज पडते. तिच्या पुजनाने रोगमुक्ती होते. यश,बळ,शोकमुक्तता,आरोग्य प्राप्त होते. या मातेच्या रुपात मातृत्व ओसंडून वाहते. म्हणूनच अत्यल्प साधनेतूनही कुष्मांडा माता प्रसन्न होते.
आष्टभुजा धारण केलेल्या मातेने सातपैकी एका हातामध्ये कमंडलु,मगधनुष्य,बाण,अमृतपूर्णकलश,चक्र,गदा आणि आठव्या हातात जपमाळ आहे. शुक्रवारी चौथी माळ आली. अबोली,तेरडा,अशोक,तिळाची फुले या पासून बनविलेली माळही घटाला अर्पण केली जाते. वास्तविक शुक्राचा रंग तसा पांढरा आहे.पण हा रंग आपण सोमवारी ऊपयोगात आणतो. शुक्र हा प्रेमाचा आणि भोग-विलासाचा कारक असून शुक्राचा प्रभाव आपल्या जीवनसाथीवर असतो. प्रेमाचा रंग आणि शुक्राचा रंग अनुक्रमे लाल अधिक पांढरा यांपासून गुलाबी रंग बनतो. ह्यादिवशी हा रंग कपड्यांच्या माध्यमातून वापरल्यास शुक्राची कृपा होऊन माणसाचे जीवन ऐश-आरामात व्यतीत होते. संपत्तीची वृध्दी होते. गुप्तरोगादीसमस्या दूर होण्यास मदत होते.
यादिवशी ५ वर्षाच्या कन्येच्या रुपात माता असते. तिला रोहिणी असे नामा भिदान आहे. अशा कन्येची देवी स्वरुप मानून पूजा केल्या सराज्य पदप्राप्ती होते. यादिवशी तिला लोण्याचा नैवेद्य दाखविला जातो.
-शुभंभवतु
-- प्रा.गजाननशेपाळ
October 15, 2018
प्रज्ञावंत, बुद्धिवंतांना राजकारणात स्थान मिळणार नाही आणि त्यामुळे त्यांच्या प्रज्ञेचा देशाला लाभ मिळू शकणार नाही, हे हेरून, राज्यसभेवर राष्ट्रपतींद्वारा साहित्य, विज्ञान, कला आणि सामाजिक सेवा या क्षेत्रांतील १२ नामवंतांची नियुक्ती करण्याचे प्रावधान, द्रष्ट्या घटनाकारांनी घटनेत करून ठेवले; मात्र गेल्या काही वर्षांपासून बाजारबसव्या राजकारण्यांनी घटनेतील या प्रावधानाचाही बाजार मांडला आहे.
June 18, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti