वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हिताकारणे बोलणे सत्य आहे | हिताकारणे सर्व शोधूनि पाहे |
हिताकारणे ब्ंाड पाखांड वारी | तुटे वाद संवाद तो हीतकारी ||111||
जनी सांगता ऐकता जन्म गेला | परी वादवेवाद तैसाचि ठेला |
उठे संशयो वाद हा दंभधारी | तुटे वाद संवाद तो हीतकारी ||112||
जनी हीत पंडीत सांडीत गेले | अहंतागुणे ब्रहमराक्षस जाले |
तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे | मना सर्व जाणीव सांडूनि राहे ||113||
फुकाचे मुखी बोलता काय वेचे | दिसेंदीस अभ्यंतरी गर्व सांचे |
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे | विचारे तुझा तूंचि शोधून पाहे ||114||
तुटे वाद संवाद तेथे करावा | विवेके अहंभाव हा पालटावा |
जनी बोलण्यासारिखे आचरावे | क्रियापालटे भक्तीपंथेचि जावे ||115||
बहू श्रापिता कष्टला अंबऋषी | तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी |
दिला क्षीरसिंधू तया ddऊपमानी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||116||
धुरू लेकरू बापुडे दैन्यवाणे | कृपा भाकिता दीधली भेटि जेणे |
चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||117||
गजेंदू महासंकटी वाट पाहे | तयाकारणे श्रीहरी धांवताहे |
उडी घातली जाहला जीवदानी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||118||
अजामेळ पापी तया अंत आला | कृपाळूपणे तो जनी मुक्त केला |
अनाथासि आधार हा चक्रपाणी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||119||
विधीकारणे जाहला मत्स्य वेगी | धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी |
जना रक्षणाकारणे नीच योनी | नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||120||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
January 12, 2016
एके काळची काश्मिरची राजधानी .
श्रीनगर ही काश्मिरची राजधानी होण्याअगोदरची नितांतसुंदर राजधानी !
समृध्दी , सौंदर्य , सौहार्द , सात्विकता यांचे मूर्तिमंत प्रतीक !
May 4, 2023
तिबेट या जगाच्या छपरावर ७-८ दिवस घालवून आमची तिबेटचा निरोप घेण्याची वेळ झाली तेव्हा लक्षात आले की प्रत्येक ट्रीप मध्ये निदान एकतरी स्थानिक कला परदेशवासीयांना दाखवली जाते. कधी नाच असतो कधी आपल्याकडच्या डोंबाऱ्यांच्या कसरतींसारख्या कसरतींचे खेळ असतात, प्राचीन काळच्या राहणीमानाची कल्पना देण्यासाठी एका छोट्याश्या खेड्यात भेट देण्याचा कार्यक्रम असतो. पण असले तिबेटच्या मुक्कामात काहीच नव्हते.तेंव्हा ही सहल कोणत्याही स्थानिक रहिवाशांच्या भेटीशिवायच संपणार असे वाटू लागले. प्रत्येक देशाची पद्धत वेगळी असे जरी मानले तरी मनाला चुटपुट लागून राहिली होती.
तिबेटमध्ये पोताला राजवाडा, जोखांग, सेरासारखी धार्मिक स्थळे फिरून झाल्यावर आम्ही जगातील सर्वाधिक उंचीवरून धावणाऱ्या आगगाडीचा प्रवास केला तेव्हा वाटले की या सहलीतील जे काही पहावयाचे होते त्याचा आनंद लुटून झाला आहे. पण पुढेही बरीच गंमत बाकी होती हे कुठे ठाऊक होते? १६००० फूट उंचीवरचा 'तंगूला' चा बोगदा पार करून सपाट परमॅफ्रॉस्ट एरिया वरून गाडी धावू लागली, तेव्हा वाटलेला थरार आजही जाणवतोय. गाडीची नागमोडी वळणे, तिचे पुढचे व मागचे एंजिन बंद काचेच्या खिडकीतूनही बघायला मिळण्याइतके वक्राकार पूल, प्रचंड विस्तारलेला सपाट बर्फाचा चिखल, पुलाला आधार देणाऱ्या मोठमोठ्या कमानी, त्याखालून पळणारे प्राणी सगळे आजही स्पष्ट आठवते आहे. कधी डोंगराच्या कडेखांद्यावरून तर कधी पोटातून धावणाऱ्या रेल्वेत बसून आम्ही तिबेट-चायना सीमारेषेवरील ९००० फूट उंचीवरच्या गोलमूड येथे १४ तासांनी उतरलो.
गोलमूडला आम्ही फक्त एक रात्र राहून पुढे सिल्क रूट - रेशीम रस्त्याने-चीनमधील 'झिनिंग' गावी जाणार होतो. हाही जवळपास १२ तासांचाप्रवास होता. इथून पुढे विरळ हवामानाचा त्रास होणार नव्हता. बसमोठी, आरामदायक होती. आम्हाला गोलमूडपासून सोबत करणारी गाईड बाई पण एकदम मस्त जॉली होती. सिल्करूट या शब्दाचे आकर्षण लहानपणी पाहिलेल्या "काबुलीवाला" या सिनेमापासूनच होते. हिमालयाच्या पलिकडून उंटावर बसून निरनिराळ्या गोष्टी भारतात विक्रीला आणणारा काबुलीवाला त्यावेळी खूपच ग्रेट वाटायचा. काबूल प्रत्यक्ष कुठे आहे हे तरी तेव्हा कुठे माहीत होते? पण त्याचे भारतातील छोट्या मुलीवर असलेले प्रेम, तिला पाहून आपल्या मुलीची येणारी आठवण, सगळे त्या वयात मन हेलावून टाकत होते यात शंकाच नाही. नंतर फक्त पुस्तकातूनच सिल्करूटचा संबंध आला होता. आता मात्र आम्ही त्यावरून प्रवास करणार होतो याचे खूप औत्सुक्य वाटत होते.
बसमधून आमचा प्रवास झिनिंगकडे सुरू झाला. गोलमूड मागे पडले, डोंगराच्या चढ उतारावरून आमची बस धावत होती. थोडीशी झाडी, कधी एका बाजूला डोंगर व दुसरीकडे दरी तर कधी दोन डोंगरातली खिंड पहाता पहाता आम्ही कधी वालुकामय प्रदेशात येऊन पोहोचलो कळलेच नाही. आता आमच्या बसचा ताकल्माकन वाळवंटाच्या कडेकडेने सिल्करूटवरून प्रवास सुरू झाला. नजर पोहोचेल तिथवर वाळूच्या लाटा दिसत होत्या. फक्त वाळू आणि वाळूच. सोनेरी वर्णाची, उन्हात सोन्याचा गालीचा अंथरल्यासारखी दिसणारी वाळू डोळा भरून पहात होतो.
गाईडला माहिती सांगण्यासारखे फारसे नव्हते तरीही ती या वाळवंटाचा आकार, त्याचे गोबीच्या प्रसिद्ध वाळवंटाशी असणारे नाते, या वाळवंटाला कोणकोणत्या देशांच्या सीमा जोडलेल्या आहेत वगैरे बरेच काही सांगत होती. जगातील सर्व वाळवंटाच्या यादीत याचा नंबर आकारमानाने १८ वा लागतो. या वाळवंटात पाणी असणारी ठिकाणे फारच कमी आहेत त्यामुळे जरी हा 'रेशीमरस्त्याचा' नेहमी वापरात असणारा भाग असला तरी मुक्काम करण्यासाठी पाण्याची सोय नसल्याने हा प्रवास उंटावरून करणे व्यापाऱ्यांना फार फार अवघड पडत असे. पूर्वी वाळवंट तुडवत, कधी रस्ता चुकत उंटावरून प्रवास करून ताकल्माकन वाळवंटामधून व्यापारी इराण, तुर्कस्तानामधून माल विकण्यासाठी चीनमध्ये येत. या प्रवासाला खूप कालावधी लागे. चीनने बांधलेल्या अनेक महामार्गांपैकी झीनिंग मार्गे जाणारा गोलमूड ते बीजिंग असा G109 हा रेशीमरस्त्यावरचा महत्वाचा महामार्ग म्हणजे ल्हासा बिजींग रेल्वे प्रमाणेच व्यापाऱ्यांसाठी एक वरदानच ठरले आहे. हा नवीन मार्ग २००३ साली तयार झाला.
गोलमूड सुटले, डोंगर संपले व सरळसोट रस्ता सुरू झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नजर जाईल तिथवर वाळवंट पसरले होते. पिवळसर तपकिरी रंगाची वाळूच वाळू सर्वत्र दिसत होती. मोठी झाडे तर सोडाच, पण अगदी फूट-दीड फूटी काटेरी खुरटी झुडुपेही अभावानेच. पिवळसर तपकिरी वाळूतून काळपट रेघ ओढावी तसा सरळसोट सुनसान रस्ता दूरपर्यंत दिसत होता. आजूबाजूला ना घरे, ना झाडे, आमची एकमेव बस सोडली तर ना इतर कोणतीही वहाने. वाळवंटामध्ये दूरपर्यंत वाळूच्या लाटा दिसत होत्या. लाटांच्या उंचवट्यावर उभरणारी काळपट धारदार कड उन्हात चमकत होती. क्वचितच दिसणारी अत्यंत अरुंद पानांची काटेरी झुडुपे वाळू बसल्यामुळे तपकिरीच दिसत होती. रस्त्याच्या कडेकडेने नेहमी दिसणारे दिव्यांचे खांबही नव्हते. खूप वेळ असा बसचा प्रवास झाल्यावर अचानकच बस थांबली. बसेस नेहमी प्रवाशांच्या सोयीसाठी जिथे छोटेसे का होईना उपहारगृह आहे, निदान 'शू सेंटर' तरी आहे, अशा ठिकाणी थांबतात. इथे अशी कोणतीच सोय नसताना बस का थांबली असावी तेच कळेना.
"बस बिघडली की काय?"
"अगोबाई, आता काय करायचे?"
"आजूबाजूला बघितलत का हो, काहीसुद्धा दिसत नाही. चिटपाखरू सुद्धा नाही बघा."
वेगवेगळ्या भाषेत पण एकाच अर्थाचे संवाद एकदम सुरू झाले.
"हा आपला टॉयलेट स्टॉप आहे." ही गाईडची घोषणा ऐकून सर्वजण चकितच झाले.
"अगोबाई, फक्त वाळवंटच दिसतंय, झाडंझुडुपंही नाहीत की आडोसाही नाही."
"हा काय टॉयलेट स्टॉप आहे?" आमची आपापसातली कुजबूज आता स्पष्ट होऊ लागली.
"बसच्या डाव्या बाजूस जेंटस तर उजव्या बाजूस लेडीज जातील."
गाईड बाईंनी जाहीर केले. ऊन रणरणत होते, डोळे उन्हाने पूर्णपणे उघडवतही नव्हते. गोलमूडहून निघून बराच वेळ झाला होता, परत केव्हा आणि कुठे थांबणार होतो हे माहीत नव्हते. यामुळे उतरणे भागच होते. सगळे आपापल्या' अदृश्य विश्रांती गृहा (Rest Room) कडे वळले. स्त्रिया सगळ्या एकमेकींकडे पाहू लागल्या कारण सगळा उघड्यावरचाच मामला, ज्याची कोणालाच सवय नव्हती! तेवढ्यात गाईडबाई एक भली मोठी छत्री घेऊन पुरुषांच्या बाजूला उतरल्या, सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या असताना तिने आत्तापर्यंत आमच्या अजिबात लक्षात न आलेल्या रस्त्याच्या खालून जाणाऱ्या ४ फुटी (स्टॉर्म वॉटर ड्रेन) पाईपचे तोंड उघडलेली छत्री लाऊन झाकून टाकले आणि ओरडून समस्त स्त्रीवर्गाला त्या पाईपचा वापर स्वच्छता गृहासारखा करायला लावला. थोडीशी तरी आडोशाची जागा निर्माण झालेली पाहून सर्वचजणी एकदम रिलॅक्स झाल्या. अडचणीवर सांधी युक्ती वापरून माणूस कशी मात करू शकतो याचे उत्कृष्ट शिक्षण अनपेक्षितपणे मिळाले. बस मार्गस्थ झाली तरी बराच वेळ याच 'शिक्षणा'ची गंमत आठवत होती.
दुपारच्या जेवणासाठी आम्ही वाळवंटात असलेल्या एका छोट्या वस्तीवर थांबलो. वस्ती अगदी ५-१० घरांचीच होती. एकमजली २-३ खोल्यांची छोटी छोटी कौलारू घरं. केवळ पर्यटकांचे आदरातिथ्य करून होणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असणारी कुटुंब. अत्यंत अगत्यशील, हसरी. २-४ स्त्रिया अन् पुरुषांचा चमू आमची बस थांबण्याची वाटच पहात होता. आमचे स्वागत करून त्यांनी आम्हाला जेवणघरात नेले. ४-५ घरात मिळून एकाच कुटुंबातील सदस्य रहात असावेत असे वाटावे एवढे सगळ्यांच्यात साम्य होते. तिबेटी व चिनी अशा दोनही प्रदेशांची सरमिसळ त्यांच्या वेषभूषेत आणि केशभूषेत झालेली दिसत होती. प्रथम आले चिनी व्हेज क्लियर सूप व ब्रेड. उन्हाळ्याचे दिवस होते त्यात आम्ही भर दुपारी तिथे होतो तरी हवा खूप थंड होती. त्या थंड हवेत गरम गरम सूप एकदम चविष्ट वाटले. त्यानंतर भात, सागो व उकडून मीठ, सॉया सॉस घातलेली स्पिनॅचची भाजी आली. मांसाहारी लोकांसाठी एक चिकन व फिशची डिश आली. मी शाकाहारी असल्याने बटाट्याच्या किसासारखी जिरे, चवीपुरते मीठ, मिरच्यांचे तुकडे व जाड्याभरड्या शेंगदाण्याच्या कुटाने सजविलेली भाजी आली. हा पदार्थ फार म्हणजे फारच चविष्ट होता. बटाटा नक्कीच नव्हता, पण भाजी कशाची असावी याचा अंदाज येईना. कच्ची पपई असावी का, याची खात्री करून घेण्यासाठी बल्लवाचार्यांना पाचारण केले, तेव्हा ती कलिंगडाच्या पांढऱ्या भागाच्या किसाची चिनी पद्धतीने मोठ्या गॅसवर वोकमध्ये भराभर परतून केलेली भाजी होती असे कळाले. हाती उपलब्ध असणाऱ्या सामुग्रीतून तयार झालेला पाककलेचा उत्कृष्ट नमुना अनपेक्षितपणे चाखायला मिळाला. आजही मी ती भाजी करते तेव्हां त्या रेस्टॉरंटची आठवण येते.
पोटभर जेवून, परत कधीही भेटण्याची शक्यता नसणाऱ्या बल्लवाचार्यांना व आमची सरबराई करणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना “अन्नदाता सुखी भव" असा मनापासून आशीर्वाद देत आम्ही मार्गस्थ झालो. आता अगदी टळटळीत ऊन होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूस असणाऱ्या सँड ड्यून्सकडे नजर टाकवत नव्हती. वातावरणात थोडीशी सुस्ती पसरली होती. सगळेजण आहारले होते. बसमध्ये मंद संगीत वाजत होते. तोच दूरवर रस्त्याच्या डाव्या बाजूस वाळवंटात थोडीशी काळपट रेषा दिसू लागली. अधून मधून येणाऱ्या वाऱ्यामुळे वाळूचे कण उडत होते. वाटले, अशीच एखादी वावटळ असावी व वाळूचे नवीन थर तयार होत असावेत. पण हळूहळू ती रेघ स्पष्ट होऊ लागली. काहीतरी धावत असल्याचा भास होऊ लागला. आमची बस पण धावत होती. त्यामुळे समोरून येणारे आकार थोड्या वेळात स्पष्ट झाले. गोलमूडच्या दिशेने निघालेले दोन वाशिंडांचे उंट व त्यावरील स्वार दिसू लागले. अचानक उंटांचा काफिला बघायला मिळाला व 'काबुलीवाला' चित्रपट आठवला.
हळूहळू मधून मधून ५-६ घरांची वस्ती लागू लागली. पक्की घरं कसली, चार बाजूंनी पडदे लावलेले ५-६ तंबूच होते ते. अशा ५-६ तंबूंच्या वस्तीभोवती एक कापडी कुंपण रस्त्यापासून व वाळवंटापासून वस्तीला वेगळेपण देत होते. अथांग पसरलेल्या वाळवंटात ही कुटुंबे आपला चरितार्थ कसा चालवत असतील, त्यांची दिनचर्या कशी असेल याचा विचार मनात येत होता. आपल्यासारख्या सिमेंटच्या जंगलात रहाणाऱ्या लोकांना त्यांच्या आयुष्याची कल्पनाही करता येणार नाही. त्या तंबूच्या दारात उभे राहून रंगीबेरंगी पोलकी, त्याखाली घोट्यापर्यंत येणारे तसेच रंगीत स्कर्ट व दोन वेण्यांच्या वरून गोंड्या गोंड्याचा स्कार्फ बांधलेल्या स्त्रिया, जुनाट कळकट कोट पँटीतले म्हातारे व टी शर्ट व सैलसर विजारी घातलेले पुरुष बसचा आवाज़ ऐकून कुंपणाबाहेर येऊन आम्हाला हात हलवून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देत होते. क्वचित गोरी गुबगुबीत मुलेही दिसत होती. ४-६ शेरडं मात्र त्यांच्या राखणीला असणाऱ्या कुत्र्यांसह प्रत्येक वस्तीत होतीच. हळूहळू दिवस कलू लागला. संध्याकाळची कळा सगळ्या वातावरणावर पसरली. बसमधली मंडळी ताजीतवानी झाली.
-- अनामिका बोरकर
December 4, 2022
प्रकाशन दिनांक :- 11/01/2004
देशाची प्रगती (जर झाली असेलच तर) कुणामुळे झाली हा कदाचित वादाचा मुद्दा होऊ शकेल; नव्हे तो वादाचाच मुद्दा आहे. परंतु प्रगतीची काही मोजकी क्षेत्रे वगळली तर इतर सर्व क्षेत्रात देशाची जी सर्वांगीण अधोगती झाली त्यासाठी मात्र भ्रष्ट राजकारणी आणि नोकरशहाच जबाबदार आहेत. हे केवळ आमचे मत नाही तर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीच तशी स्पष्ट कबुली दिली आहे.
January 11, 2004
मार्टिन क्रो हे न्यूझीलंडचे कप्तान असताना त्यांनी १६ कसोटी सामन्यांपैकी २ सामने जिंकले परंतु एकदिवसीय सामन्यांमध्ये ते कप्तान म्हणून जास्त यशस्वी झाले त्यांनी ४४ सामन्यांपैकी २१ सामने जिंकले.
August 28, 2021
दचकलात ना प्रश्न वाचून? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे का? तर त्याचे उत्तर, होय हा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर, नाही हेच आहे. श्री गणेश शिवपुत्र नाहीत. भगवान श्री गणेशांनी शंकर-पार्वतीच्या घरी अनेक अवतार घेतले असल्याने तसा उल्लेख आपल्याला सापडेल पण ते पूर्णवास्तव नाही.
September 12, 2019

पृथ्वीवर सर्वत्र विजांचंं प्रमाण मोठं होतं. त्याबरोबरच अंतराळातून अशनींचा मोठा माराही होत होता. या सर्व कारणांमुळे जगभर अनेक ठिकाणी वणवे लागत होते. या परिस्थितीला अंटार्क्टिकाही अपवाद असण्याचं कारण नव्हतं.
January 4, 2022
रेल्वेमधला तिकीट तपासणीस अर्थात टी.सी. हा एक स्वतंत्र विषयाचा मामला आहे. या टी.सी.नावाच्या व्यक्तीबद्दल प्रवाशांच्या मनात नेहमीच थोडीशी भीती असते आणि आतून सुप्त राग खदखदत असतो. 'प्रसंगी दंडाची रक्कम यांच्या हातांत पैसे दाबून टाळता येते', 'ते लाचखाऊ असतात' असाही एक अपसमज जनसामान्यांमध्ये ठसलेला असतो.
प्रवाशांवर वचक ठेवणारे आणि स्वत:विषयीचे समज-गैरसमज सोबत घेऊन काम करणारे हे टी.सी. (मेल, एक्सप्रेस गाड्यांचे) नेहमी वकिलांसारख्या काळ्या कोटात असतात. स्टेशनच्या मुख्य दरवाजावरील व लोकलवरील टी.सी. मात्र बऱ्याच वेळा साध्या कपड्यात असतात. अचानक धाडीची मोहीम असेल, त्यावेळी प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी अनेक टी.सी. साध्या कपड्यांत शांतपणे उभे असतात. प्रवासी उतरताच त्यांना घेराव घालून ते आपले काम पार पाडतात. मुंबईत पूर्वी लोकलगाडीत चढणाऱ्या टी.सी.ना 'मामा' म्हटलं जाई.
या तिकीट तपासनिसांची मुख्य कामं अशी असतात:
१. प्रवाशांची तिकिटं तपासून ती योग्य आहेत किंवा नाही ते पाहणं.
२. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडणं, त्यांच्याकडून दंड वसूल करणं, व पैसे नसल्यास रेल्वे पोलिसांच्या मदतीनं त्यांना तुरुंगात टाकणं. असे प्रवासी शोधून काढणं हे कौशल्याचं काम तर असतंच, परंतु यामध्ये काही वेळा मारामारीच्या प्रसंगांनाही तोंड द्यावं लागतं.
३. जमा झालेली रक्कम, तिकिटं, पासेस, कार्यालयात सुपुर्द करायचे असतात.
४. रेल्वेतील जुने, नवे असे लाखो कर्मचारी पासवर प्रवास करीत असतात.
ते सर्व व्यवस्थितपणे पडताळून पाहावं लागतं.
५. शाळा, कॉलेजेसमधील विद्यार्थ्यांना पासवर मिळणारी सूट, ५ वर्षांखालील मुलामुलींचं अर्धं तिकीट यांवर नजर ठेवावी लागते.
६. मेल व एक्सप्रेस गाड्यांतील प्रवासी आरक्षण यादीप्रमाणे आहेत किंवा नाहीत हे पाहणं, रिकाम्या अनारक्षित (बर्थवर) प्रवाशांची भाड्याचे पैसे भरून घेऊन सोय करून देणं, ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखपत्रांवरील वय तपासून घेणं.
७. लोकसभा-सदस्य प्रवास करत असताना त्यांचा वेगळा फॉर्म भरून घेणं.
८. अनेकदा तिकिटं काढलेल्या दिवसानंतर तिकिटांच्या दरात वाढ होते. त्यावेळी जास्तीचे पैसे प्रवाशांकडून गोळा करावे लागतात आणि हे काम तर तिकीट तपासनिसांची परीक्षा पाहणारं असतं.
९. साधू, भटकी मुलं, गरीब स्त्रिया व मुलं अनेकदा तिकीट न काढता जागा अडवितात, त्यांना गाडीतून बाहेर करावं लागतं.
१०. जागेवरून प्रवाशांत होणारे तंटे ताबडतोब मिटविणं.
११. प्लॅटफॉर्म तिकिटं तपासणं.
१२. स्त्रियांसाठीच्या डब्यांत तिकिटांची तपासणी.
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये या तिकीट तपासनिसांना झोपण्यासाठी एक बर्थ ठेवलेला असतो; परंतु या प्रवासात मध्यरात्री, भल्या पहाटे वाटेतील येणाऱ्या स्टेशनांवर एखादा प्रवासी उतरणार असेल तर त्याला उठवण्याची (जागेवरून त्यांच्या उतरण्याच्या स्टेशनावर उतरवण्याची जबाबदारी टी.सी.वरच असते. प्रत्येक स्टेशनवर नव्यानं चढणाऱ्या प्रवाशांची सोय पाहणं हेही टी.सी.लाच बघावं लागतं.
बारा ते चौदा तासांची ड्युटी व त्यात स्वत:च्या घरी जाण्यास होणारा विलंब, यांमुळे त्यांना घराकडे लक्ष देता येत नाही. राजकारणी लोक प्रवासात असताना त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते असतात. अशाप्रसंगी लक्ष पुरविताना टी.सी. मंडळींची अगदी दुहेरी पातळीवर दमछाक होते; कारण, ते कार्यकर्ते सर्व नियम धाब्यावर बसवितात व त्यांच्याविषयी इतर प्रवासी तक्रारी करतात. रेल्वे खातं हे आपल्याला वेळी अवेळी होणाऱ्या झोपण्याच्या गैरसोईबद्दल व शिव्या खाण्यासाठी पगार देत' अशी टी.सी. कर्मचाऱ्यांची तक्रार असते.
मनुष्यस्वभावाप्रमाणे व परिस्थितीनुसार काही तिकीटतपासनीस संधीचा फायदा घेऊन खाबुगिरी करीतही असतील, परंतु बरेच टी.सी. कामात दक्ष असल्यामुळे दर महिन्याला विनातिकिटाच्या दंडातून कोट्यवधी रुपये जमा करतात. २०१४ या वर्षात व्ही.टी. स्टेशनवरील धर्मेंद्रकुमार या तिकीटतपासनिसानं एका महिन्यात १२ लाख रुपये एवढी रक्कम निव्वळ दंडामधून वसूल केली होती. हा एक विक्रम आहे. तरीही, मनुष्यस्वभावातील फसविण्याची वृत्ती वाढतच आहे व रेल्वेला आपली टी.सी.ची फौज वाढवावी लागते आहे.
डॉ. अविनाश वैद्य
July 23, 2022
साहाजिकच जगभर एकाकी अवस्था आणि त्याचे स्वास्थ्यावर होऊ शकणारे संभाव्य परिणाम यांवर संशोधन सुरु झाले आहे. जास्त कालावधीसाठी एकाकी असलेल्या व्यक्तींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर जास्त परिणाम झालेले आढळतात, अगदी सिगारेटच्या व्यसनाइतके अथवा लठ्ठपणाच्या दुष्परिणामां इतके !
June 25, 2021
यशस्विता ही एखाद्या हिर्यासारखी आहे. हिर्याला विविध पैलू असतात, व वेगवेगळ्या दिशांनी बघितल्यावर त्याची खरी चमक उमगते, खरी किंमत कळते. यशस्वितेचंही तसंच आहे.
भाग – १ :
‘यशस्वी कोण’ असा प्रश्न जर आपल्याला कुणी विचारला तर एखादा खेळाडू, उद्योगपती, कलावंत, ख्यातनाम शास्त्रज्ञ वा समाजात काहीतरी चळवळ उभारू पहाणारा पुढारी, यांच्याकडे आपण बोट दाखवू. पण, यश म्हणजे काय, असं जर कुणी विचारलं तर पटकन सांगता येणार नाही. कारण यश ही बहुधा सामाजिक बाब मानली जाते. समाजानं दिलेला मान, आदर, लोकप्रियता, बक्षिसं, पदकं, इत्यादींच्या स्वरूपात व्यक्तीला ते मिळतं. परंतु, यशाला वैयक्तिक बाजू असतेच की ! ती समजण्यासाठी यशस्वी माणसांनाच प्रश्न विचारला की, ‘काय हो, तुम्ही स्वत:ला यशस्वी समजता का ?’, तर कदाचित बरीच यशस्वी माणसे निश्चित उत्तर देऊ शकणार नाहीत. ती बहुधा असं म्हणतील की, ‘अजून नाही’, किंवा ‘माझ्या मनात काही तरी अजून करायचं आहे’, किंवा ‘माझ्या मतें मी अजून पूर्णत्वाला पोचलेलो नाही’, इत्यादि.
याचा अर्थ आपण एवढाच घेऊ या की, यश ही काही एकसंध बाब नव्हे. तिला सामाजिक, वैयक्तिक, झालंच तर, आर्थिक, कौटुंबिक इत्यादि अनेक पैलू आहेत, व या सर्वांना भाषेच्या दारिद्र्यामुळे एकच नाव आहे. तूर्तास आपल्यापुरता आपण, ‘यश म्हणजे, ज्या हेतूनं काम करायला हाती घेतो, ते काम समाधानकारकपणे पार पाडणं’ हा अर्थ घेऊ या.
हे ईप्सित साध्य व्हायला कायकाय आवश्यक आहे ? असा समज आहे की, एकतर नशिबाची साथ हवी, किंवा थोडा ‘चक्रमपणा’ (दीवानगी, ध्यास, एककल्लीपणा,झपाटलेपणा) हवा, किंवा तुमच्यात असामान्य कौशल्य हवं, किंवा तुम्ही ज्याची भरभराट होत रहाणार आहे अशा क्षेत्रात असायला हवं.
आता, ह्या गृहीतकामधे, या स्टेटमेंटमधे कितपत तथ्य आहे, हे पाहू या.
आपण गृहीत धरतो की, कर्तृत्ववान माणसाच्या यशापाठी नशिबाचा काहीतरी वाटा असतोच. आपला असा समज असतो की, उद्योगपतीला धंदा वाढवण्यासाठी जी योग्य वेळ आवश्यक असते ती मिळते ; क्रिकेटपटूच्या घरी क्रिकेटला पोषक वातावरण असतं, झालंच तर त्याची वर्णी लावायला नातेवाइकांचं पाठबळ त्याला लाभतं ; एखाद्या प्रथम-श्रेणीच्या विद्यार्थ्याला जन्मजात अशी कुशाग्र बुद्धिमत्ता व
उत्तम गुरु मिळालेले असतात ; एखादा मॅनेजर वरच्या जागेवर पोचतो कारण त्याच्या प्रमोशनच्या वेळेला खुर्ची रिकामी झालेली असते ; खुशमस्कर्या स्वभाव तसंच बॉसवर इंप्रेशन मारण्याची कला त्याला उपयोगी पडलेली असते.
पण असं म्हणणं कितपत योग्य आहे ? खरं तर, ह्या सर्व केसेसमधे, ‘यशासाठी केवळ एकच घटक आणि तो म्हणजे नशीब’, असं कुणीच म्हणू शकणार नाही. कारण, एखादी गोष्ट यशस्वी होण्यामागे अनेक ‘जर-तर’ असतात. उदा. विद्यार्थ्याचे परीक्षेतील उत्तम मार्क. एकतर, त्यातल्या त्यात जो विषय चांगला समजला असेल त्यावर प्रश्न यायला हवेत, पेपर तपासणारे निरीक्षक काटेकोर मार्क देणारे नसावेत, विद्यार्थ्याची तब्येत व मूड उत्तम हवा, कुटुंबातील वातावरण त्या वेळेला आनंदी हवं, इत्यादि. या सर्व गोष्टी जमून आल्या तरच परीक्षेत चांगलं यश मिळू शकेल. एखाद्या माणसाला ह्या सर्वच गोष्टी अनुकूल असतील तर त्यात नशिबाचा वाटा किती ; आणि त्याचे परिश्रम, विषयाची समज, परिस्थितीचा व एकूण घटनांचा त्याचा अंदाज इत्यादींचा वाटा किती ?
मला असं वाटतं की, जे घटक आपल्या हातात नाहीत त्यांच्या बाबतीत नशिबाचा वाटा आहे असं फारतर म्हणता येईल ; पण इतर बाबींमधे त्या व्यक्तीचे प्रयत्न, निर्णय, आकलन इत्यादींचा त्याच्या यशात मोठा वाटा आहे.
कबूल, की काहींचं आयुष्य एखाद्या फटक्यासरशी उजळतं. एखादा माणूस जिथे काम करतो तिथल्या फर्मच्या मालकाच्या मुलीबरोबर त्याचं लग्न जमतं, लग्न होतं व ती फर्मच त्याच्या हातात येते. किंवा, शेअर्सचे भाव वाढून लक्षावधी रुपये एखाद्याच्या हातात येतात.
नशिबाला दुसरी बाजूही असते. अत्यंत हुशार व मेहनती मनुष्य आहे. त्याने पेट्रोल वाचवण्याबाबत कष्टाने शोध लावला आहे, पण त्याच्या शोधाला मान्यता, पैसा मिळायच्या आधीच पेट्रोलचे भाव उतरले आहेत ; परीक्षेत विद्यार्थ्याला उत्तम यश मिळूनही बोर्डाच्या चुकीमुळे ‘नापास’ असा शिक्का बसला आहे, व त्यामुळे प्रचंड मानसिक धक्का त्या विद्यार्थ्याला सहन करावा लागत आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
मला असं वाटतं की, काही माणसं जरा जास्त नशीबवान असतात, काही जरा कमी. बहुतेकांच्या आयुष्यात यशापयशाचे प्रसंग सारख्याच प्रमाणात असावेत. ‘ही जी थोडीशी काही नशीबवान माणसं आहेत ती केवळ नशिबाच्या जोरावर कीर्तीमान होतात व झाली आहेत, आणि बाकी सगळे नशिबाच्या अभावामुळे पाठीमागे राहिले आहेत’, असं म्हणणं बरोबर ठरणार नाही. अर्थात् , आपल्या सर्वांनाच असं समजणं दिलासा देणारं असतं की, ‘आपल्यातही काही कमी क्षमता नाही पण नशिबाची साथ हवी तेवढी नसल्यामुळे पाहिजे तितके यश आपल्या पदरी पडत नाही’.
खरी मेख ही आहे की, नशीब काही आपल्याला दार ठोठावून सांगत नाही की ‘माझे स्वागत करा’ . माणसाला वेळोवेळी अनेक संधी उपलब्ध होत असतात. काहींची त्याला कल्पना असते, तर काही त्याला हुडकून काढाव्या लागतात. कोणत्या संधी स्वीकारायच्या हे त्याची निर्णयशक्ती, परिस्थितीबाबतचे आकलन, यशापयशाची भीती तसेच त्याबद्दलचे अंदाज, यावर असतं. यशस्वी माणसं संधी आल्या तर निष्क्रियपणे बघ्याची भूमिका न घेता, निश्चय, आखणी व स्वत:ची खास स्टाइल वापरून तिचं रूपांतर प्रयत्नात करतात ; एवढंच नाही तर कधी कधी संधी स्वत: निर्माण करतात.
बहुधा आपण माणसं निर्णय घेतांना एक मध्यम-मार्ग अनुसरत असतो. म्हणजे असं की एखादी नवीन नोकरी मिळत असेल तर तिच्यामुळे कुटुंबाचे स्थलांतर करावं लागेल का ? मुलांचं शिक्षण तिथे कसं असेल ? हवापाणी कसं काय आहे ? मुख्य म्हणजे कष्ट किती करावे लागतील ? स्थैर्य कितपत आहे ? इत्यादि अनेक प्रश्न विचारात घेतले जातात व मग निर्णय होतो. म्हणजेच कुटुंब-आरोग्य, सुरक्षितता, चैन, मानमरातब ह्या सर्वांचा जमेल तेवढ्या प्रमाणात धस लावला जातो. त्यात काही चूक आहे असं जरी म्हणता आलं नाही, तरी, एक गोष्ट मात्र खरी आहे, की , ध्येयनिष्ठ माणसं एका विवक्षित गोष्टीचा ध्यास घेतात, एक ध्येयाकडे त्यांचं लक्ष केंद्रित झालेलं असतं , त्यांनी अग्रक्रम (priorities) बहुतेक निश्चित केलेले असतात, प्रसंगी इतर बाबींकडे ते दुर्लक्ष करतात. वरील, नोकरीचं उदाहरण घेऊ या. एखाद्या नोकरीत नवीन शिकण्याची संधी असते, एखाद्या विशिष्ठ प्रकारचं तंत्रज्ञान आत्मसात करता येतं, त्याच्या जोरावर पुढं पाऊल टाकता येतं. एखाद माणूस असा विचार करेल की, आज मला हे शिक्षण कठीण जाणार असलं तर ते पुढच्या करीयरसाठी आवश्यक आहे ; मग मी ते, कितीही कष्ट पडले तरी करेनच. दुसरा एखादा असं म्हणू शकेल की, सध्याची नोकरी तशी बरी आहे, सगळं व्यवस्थित चाललंय. दुसरीकडे नवीन काम शिकता येईल हें खरं, पण असं तर होतच रहाणार, नवीन नवीन तंत्रज्ञानं, कामं, निर्माण होतच रहाणार. मला त्याच्यासाठी इतकी किंमत मोजावी लागणार असेल तर इथेच रहाणं बरं. थोड्याच वर्षांत प्रमोशन ड्यू आहे, इत्यादि. आता, ह्या दोन उमेदवारांमधला पहिला आहे तो माझ्या मते व्यवसायात अधिक यशस्वी होईल. कारण, त्याचा अग्रक्रम व ध्येय त्याने ‘ठामपणे’ ठरवलेलं आहे. आणि त्यासाठी, तो चाकोरीबद्ध निर्णय घेत नाही. या दृष्टीनं, कीर्तिवान् माणसं सर्वसामान्य माणसांपेक्षा एककल्ली, धडपडी व चाकोरीबाहेरचं वागतात. म्हणून त्यांना ‘चक्रम’ (दीवाने, झपाटलेले, एककल्ली) म्हणायचं, इतकाच त्याचा अर्थ.
खेळाडू, कलावंत, शास्त्रज्ञ, समाजसुधारक, किंबहुना प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असणार्या सर्वच व्यक्ती आपल्या यशाचं श्रेय आपल्या गुणवत्तेला देतात. त्यांच्या प्रत्येक यशस्वी प्रयत्नामागे त्यांची हुशारी असतेच ; परंतु इतरांच्यापुढे जाण्यासाठी कठोर परिश्रम व योग्य प्रशिक्षणाचीही तितकीच आवश्यकता असत नाही का ? एवढंच नाही, तर योग्य अशा मानसिक दृष्टिकोनाचीही जरूरी असते. त्यानुसार ती व्यक्ती आपल्या प्रयत्नांची आखणी (स्ट्रॅटेजी) करते. उदा. काही वर्षांपूर्वी वर्ल्ड-कप क्रिकेटमधे श्रीलंकेला सर्वप्रथम मिळालेलं यश, (अर्थात् , त्यांनी पहिल्यांदा तो कप जिंकला). आखणी करतांना यशाची व्याख्या केली जाते. म्हणजेच, काय साधायचं आहे हे निश्चितपणे ठरवलं जातं, वेळोवेळी खेळ चाळू असतांना यशापयशाचे जे चढउतार होत असतात त्यांचं निदान व चिकित्सा केली जाते. याचा परिणाम एकूण वाटचालीवर होत असतोच. आपल्याला माहीतच आहे की, त्यापूर्वी श्रीलंकेच्या क्रिकेट संघाची प्रतिमा दुय्यम किंवा कनिष्ठच होती. मग त्यांना ते उत्तुंग यश कसं मिळालं असेल ? मेहनत व गुणवत्ता,
याबरोबरच त्यांचा दृष्टिकोण. तो म्हणजे, प्रचंड आत्मविश्वास, धडाकेबाज खेळ, दबावाला भीक न घालण्याची वृत्ती, वरचे खेळाडू लवकर आऊट झाले तरीही पुढल्या खेळाडूनं खेळ चालू ठेवण्याची ऊर्मी, इत्यादि कारणीभूत नाही असं कोण म्हणेल ?
अगदी एकाच व्यवसायातल्या व्यक्ती घेतल्या तरी, सर्वांमधे सारखंच टॅलंट असत नाही. कोणाकडे कमी तर कोणाकडे जास्त. प्रश्न असा उपस्थित होतो की, टॅलंट कमी असलं तर मग कठोर परिश्रम, प्रशिक्षण असल्या गोष्टींमधे वेळ दवडणं कितपत योग्य आहे ? याचं उत्तर हे आहे की, आधी मेहनत करा आणि पहा काय परिणाम होतो ते. टॅलंट असलं तरी परिश्रमांनीच ते चकाकतं. योग्य प्रशिक्षणाशिवाय नैसर्गिक कौशल्याला पूर्णता येणार नाही. जितकी गुणवत्ता जास्त तितका श्रमांचा मोबदला अधिक मिळतो हेही सत्य आहे. परंतु अजिबात काही न करता नुसत्या टॅलंटवर अवलंबून राहिलं तर कदाचित काहींच मिळणार नाही.
काही उद्योग-व्यवसाय हे वाढणारे, फोफावणारे असतात, (उदा. आय्. टी. इंडस्ट्री), तर काही त्यामानाने कमी वाढीची असतात, (उदा. स्टील इंडस्ट्री). त्यामुळे, यश मिळण्यासाठी, वाढणार्या-क्षेत्रात असणं महत्वाचं ठरतं.
एखाद्या विवक्षित क्षेत्रातही काही काळ भरभराटीचा असतो. तुम्ही त्यावेळी तिथे असलात तर तुम्हालाही त्याचा लाभ मिळतो. उदा. लश्करी अधिकार्यासाठी, शांततेच्या काळापेक्षा युद्धकाळात उदय होण्याची संधी जास्त असते. दुसरं म्हणजे, एखादं क्षेत्र एखाद्या विशिष्ठ गुणवत्तेला, विकासाची उत्तम संधी उपलब्ध करून देत असतं. उदा. जाहिरात क्षेत्रात सर्जनशीलता (क्रिएटिव्हिटी) फायद्याची ठरते.
भरभराटीच्या क्षेत्रात असणं हा योगायोगाचा किंवा जाणीवपूर्वक केलेल्या निवडीचा भाग असू शकतो. म्हणजे असं की, तुम्ही काही न ठरवता एखाद्या क्षेत्रात पाऊल टाकता, आणि ते वाढायला सुरुवात होते. किंवा, तुम्हाला अंदाज असतो की अमुक अमुक क्षेत्रांची झपाट्यानं वाढ होणार आहे. मग तुम्ही कसोशीनं त्यात जाता, प्रयत्न करता. हे ठीक आहे ; पण प्रश्न असा आहे की, तुमची गुणवत्ता, कौशल्य विशेष उपयोगात येत नाही अशा क्षेत्रात तुम्ही जर काम करत आहात, अगर क्षेत्राला आवश्यक असणारी गुणवत्ता तुमच्यापाशी नाही, तर अशा वेळी तुम्हाला यश मिळू शकेल का ? उदा. आय्. टी. क्षेत्रात जायची इच्छा आहे, पण सॉफ्टवेअर लिहिणं जमत नाही. याचं उत्तर असं आहे की, योग्य अशा क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी अनेक मार्ग विचारात घ्यावे लागतात. तुम्हाला सॉफ्टवेअर विकत घेता येईल, किंवा दुसर्याकडून लिहवून घेणं जमेल. शिवाय, एका कामामधे कौशल्य आहे, याचा अर्थ, दुसर्या कामामधे अजिबात नाही, असा होत नाही. समजा, सॉफ्टवेअर लिहायचं नसलं, तरी त्याच व्यवसायातलं दुसरं एखादं काम चांगलं जमू शकेल (उदा. प्रॉडक्ट मॅनेजमेंट). तसा प्रयत्न करून बघायला, किंवा निदान तसा विचार करायला काय हरकत आहे ? शाळेत गणित विषय उत्तम असणारा मुलगा मोठेपणी प्रोफेसर होऊ शकेल, पण त्याचबरोबर तो फर्ममधे एक्झिक्युटिव्ह म्हणूनही नाव काढू शकेल.
वैयक्तिक दृष्ट्या मला हे पटत नाही की, यश मिळवण्यासाठी तुम्ही भाग्यवान, ‘चक्रम’ (ध्यास घेऊन झपाटलेले, दिवाणे झालेले), किंवा अतिहुशार, अथवा विवक्षित क्षेत्रात असायला हवं. पण असा सर्वसाधारण ग्रह आहे म्हणून हे मुद्दे मांडायचा प्रयत्न केला. यशामधे या सर्व गोष्टींचा वाटा असू शकतो , एखाद्या व्यक्तीच्या भरभराटीमधे ह्यातला एखादा घटक अधिक जबाबदार असतो ; तर दुसर्या अनेक केसेसमधे यातला कुठलाच घटक ठळकपणे नजरेस पडत नाही. एखाद्या केसमधे यशामागलं समीकरण अगदी साधं असतं तर दुसर्या एखाद्या केसमधे तेच अतिशय गुंतागुंतीचं असतं. एखादं क्षेत्र झपाट्यानं वाढलं आणि त्याबरोबर एखादा माणूस भराभर वर चढत गेला, इतकं कारण एखाद्या केसमधे पुरेसं आहे ; तर काही वेळा वर उल्लेखलेली कारणंसुद्धा पुरेशी नसतात, तर त्यांच्याही पलिकडे आणखी काही घटक कारणीभूत झालेले बघायला मिळतात. अनेक अपयशांमधून जात असतां स्वत:ला नैराश्य (डिप्रेशन) येऊ न देण्याचा खेळकरपणा ; किंवा, जर व्यवसायात (उदा. व्यवस्थापन) अनेकांकडून काम करून घ्यायचं आहे तर माणसाची पारख, टीम-बिल्डिंग, लीडरशिप, हे गुण सुद्धा वरील कारणांबरोबर हातमिळवणी करतात.
थोडक्यात सांगायचं म्हणजे, यशाचा काही विशिष्ठ फॉर्म्युला नसतो. आपण जर यशवंत लोकांची, त्यांच्या यशाबद्दल, कामगिरीबद्दल मतं विचारली, तर प्रत्येकाचं ऍनॉलिसिस वेगळं असतं, आणि मुख्य म्हणजे कामाची जी एक स्वतंत्र शैली असते, व ती त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर वा थोड्याफार प्रमाणात व्यवसायावर अवलंबून असते. वेगवेगळ्या व्यवसायात तर असंख्य शैली आणि अप्रोच. कुणाची सतत काम करत रहाणं याची ऊर्मी, तर आणखी कुणाचा आत्मविश्वास, कुणाचा कामचा उरक, तर कुणाचा मनाचा कणखरपणा.
इतक्या विविध शैली, दृष्टिकोन, आणि यशाचे मार्ग असूनही, त्यांच्यातून काही समान सूत्रे निघतात.
हे सर्व गुण यशस्वी व्यक्तींमधे दिसून येतात. कामात दिरंगाई, धरसोडवृत्ती हे दुर्गुण यशाला आपलंसं होऊ देत नाहीत.
ही माणसं कृतिप्रिय असतात. स्वस्थ बसून रहाणं आणि काय घडतंय ते निष्क्रियपणे पहाणं, हे त्यांना पटत नाही; काहीतरी ठरवून ते स्टेप घेतात, मग दुसरी, तिसरी, इत्यादि.
ह्या व्यक्ती स्वत:शी प्रामाणिक असतात. याचा अर्थ असा की, आपल्याला काय करायचं आहे, हे त्यांना ठाऊक असतं. ते योग्य आहे, एवढंच नव्हे तर, कां, कसं योग्य आहे, ते कशा प्रकारे साध्य करायचं आहे, याचं पक्कं भान त्यांना असतं. म्हणजे, त्यांचा वैचारिक गोंधळ होत नाही, किंवा ते कुणाचा सल्ला मानत नाहीत, असं नाही; पण स्वत:ची ओळख चांगल्याप्रकारे असल्यामुळे त्यांच्या विचारांना दिशा असते, विचार एकत्रित होऊन त्यांचा सुसंगत मिलाफ झालेला असतो. म्हणूनच, मार्गावर ज्या अडचणी येतात, त्यांच्यावर ते मात करू शकतात.
आज ना उद्या आपण लक्ष्य साध्य करू, अशी त्यांची सकारात्मक विचारधारा असते.
सृजनशीलता म्हणजे, रुळलेल्या विचारांपेक्षा वेगळा विचार, चौकटीबाहेरचा विचार, या व्यक्ती करतात.
आलेली संधी ते उचलून धरतातच, तिचा फायदा घेतातच ; पण ते स्वत:ही संधी निर्माण करतात.
एकदा एखाद्या कामात यश मिळालं की यश मिळवण्याची प्रक्रिया संपत नाही. जसं गिर्यारोहकांना एक शिखर चढल्यावर दुसरं एखादं अधिक-उंच शिखर चढायचं असतं, तसं धडपड्या माणसाला वेगवेगळ्या प्रांतांत काम करून दाखवायचं असतं. यश म्हणजे अशी वस्तू नव्हे. (उदा. प्रमोशन, नफा, परीक्षा, इत्यादि) , की एकदा मिळवली की संपलं.
यशस्विता ही एक प्रेरकशक्ती आहे, जीवनशैली आहे. ही प्रेरणा सतत मिळत राहिली तर यश आपोआप मिळतं.
भाग – २ :
आता आणखी काही गोष्टी पाहू. यशाला अनेक पैलू आहेत, पण त्यातले सामाजिक व व्यक्तिगत पैलू महत्वाचे आहेत.
एखादा माणूस यशस्वी आहे असे आपण म्हणतो, म्हणजेच त्याला समाजाने मान्यता दिलेली असते.
याचाच अर्थ असा की, यशस्वितेसाठी समाजाची, किंवा समाजातील एखाद्या विशिष्ठ घटकाची, मान्यता प्राप्त असायला हवी. बरं, कुणा सोम्यागोम्याची मान्यता मिळून व्यक्तीला ते चालत नाही. व्यक्तीला आपल्या पीयर-ग्रूप (Peer-Group) चीच मान्यता लागते. म्हणजेच, समाजाचा जो घटक त्या व्यक्तीला महत्वाचा वाटतो, त्या घटकाकडूनच मिळालेली मान्यता त्या व्यक्तीला अपेक्षित असते. एखादा दरोडेखोर किंवा ‘सुपार्या’ घेणारा गुंड यांना समाज ‘यशस्वी’ म्हणत नाही ; आणि , समाज काय म्हणतो याची त्यांना पर्वाही नसते. ‘बदनाम हुए तो क्या, नाम तो हुआ’ असे एका शेरमधे म्हटले आहे, त्याप्रमाणे त्या दरोडेखोराचे वा गुंडाचे ‘नाव’ मात्र होते, व ती व्यक्ती दरोडेखोरांच्या-गुंडांच्या गोतावळ्यात ‘यशस्वी’ म्हणून गणलीही जाते. आय्. आर्. ए. (आयरिश रिपब्लिकन आर्मी) , पी.एल्. ओ. (पॅलेस्टाइन लिबरेशन ऑरगनायझेशन) , अल् कायदा , लश्करे तय्यबा , जैश-ए-मुहम्मद वगैरे संघटनांमधील पुढारी,
ती-ती विशिष्ठ विचारधारा अनुसरणार्या व्यक्तींना ‘यशस्वी’ वाटले तर नवल नव्हे. (अशा संघटनांनी अवलंबलेल्या मार्गाचे मला मुळीच समर्थन करायचे नाही. परंतु, यशस्वितेचा मापदंड समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी कसा वेगवेगळा असू शकतो, एवढेच इथे दाखवायचे आहे). थोडक्यात काय की, व्यक्तीच्या ‘peer-group’ च्या नजरेत जे ‘यशस्वी’ ठरेल, ती त्या व्यक्तीच्या दृष्टीने ‘यशस्विता’ होय.
सर्वसाधारणपणे पैसा, नाव, अधिकाराची जागा वगैरे मिळालं, की ती व्यक्ती यशस्वी झाली असे समाज म्हणतो. पण हा लौकिक अर्थ झाला. यशस्विता ही याहून अधिक कॉम्प्लेक्स, गुंतागुंतीची अशी गोष्ट आहे. समाजाला दिसणार्या लौकिक यशस्वितेहून, व्यक्तीला स्वत:ला अभिप्रेत यशस्विता ही भिन्न असू शकते. आपण जरासं या ‘आस्पेक्ट’ च्या आत विविध बाजूंनी डोकावून पाहू या, व ही गोष्ट समजून
घेऊ या.
एका राजस्थानी गृहस्थाची मुलाखत टी.व्ही.वर पाहिल्याचे मला स्मरते. त्याला विचारले गेले होते की, आय्. ए. एस्. म्हणून असलेले मोठे पद सोडून तुम्ही सामाजिक कार्यात पडला आहात, तर आता आपण यशस्वी आहोत असे तुम्हाला वाटते काय ? त्याचे उत्तर अर्थपूर्ण आहे. तो म्हणाला की, ‘लौकिक अर्थानं मी यशस्वी नाही असं कुणाला वाटेलही ; पण मला स्वत:ला जे काही करावं असं तीव्रतेनं वाटत होतं, ते मी आज करतो आहे याचं मला समाधान आहे ; म्हणजेच माझ्या दृष्टीनं मी यशस्वी आहे’. त्याचं हे स्पष्टीकरण पुरेसं बोलकं आहे, असं मला वाटतं.
वरील उदाहरणावरून हे स्पष्ट होईल की, आपण स्वत:साठी काय लक्ष्य ठेवतो, व तिथे पोचतो किंवा नाही (ते अचीव्ह करतो किंवा नाही) , यावर आपल्या स्वत:च्या नजरेत आपली यशस्विता असते. हे बघा, एक साधारण मुलगा आहे, फारसा हुशार नाही. त्याच्या घरच्या आर्थिक परिस्थितीनुसार, ‘कारकुनाची नोकरी मिळवणं’ हे तो स्वत:चं लक्ष्य ठरवतो ; तशी नोकरी त्याला मिळते, व तो स्वत:ला यशस्वी समजतो. याउलट, दुसरा एक अति हुशार मुलगा आहे. तो स्वत:चं लक्ष्य ठरवतो, ‘स्कॉलरशिप मिळवून परदेशीं उच्च शिक्षणासाठी जाणे’. पण ते त्याला जमत नाही, तो देशातच शिकतो व अधिकारी होतो. पण तो स्वत:ला अयशस्वी समजतो, कारण त्याचे स्वत:चे परदेशी-शिक्षणाचे त्याचे ध्येय साध्य झालेले नसते.
प्रत्येक व्यक्ती जीवनात वेगवेगळ्या भूमिका (roles) पार पाडत असते. त्या सर्व दृष्टिकोनांतून यशस्वितेचा निकष एकच (same) असेल, असे नव्हे.
- एक उदाहरण पाहू. स्वातंत्र्यपूर्व काळातील एक माणूस एक स्वातंत्र्यसैनिक म्हणून आपले आयुष्य वेचतो, देशासाठी वारंवार तुरुंगात जातो, एक त्यागी नेता, एक सेनानी म्हणून पुढे येतो. समाजाच्या दृष्टीने तो एक यशस्वी सेनानी असतो. पण पती म्हणून, पिता म्हणून, त्याच्या कुटुंबियांच्या, त्याच्याकडून काही भिन्न अपेक्षा असतात. त्या तो पूर्ण करू शकत नाही. इथे,
नेता म्हणून आणि पती वा पिता म्हणून, इतर व्यक्तींकडून त्या माणसाच्या यशस्वी असण्याबद्दलचे निकष नुसते भिन्नभिन्नच आहेत असे नाही, तर ते एकमेकांविरुद्धचेही (conflicting) असू शकतात. त्या व्यक्तीने स्वत: आपल्या ‘स्वातंत्र्यसैनिक’ या भूमिकेला प्राधान्य दिलेले असल्यामुळे, तो त्या दृष्टीने स्वत:च्या नजरेत यशस्वी झालेला आहे. परंतु, जर त्याची मुले त्याच्यापासून दुरावली, तर ‘एक पिता म्हणून आपण असफल आहोत’, असेच त्याला वाटते.
- दुसरं एक उदाहरण पाहू या. एक राजा आहे. एक राजा म्हणून समाजाची त्याच्याकडून एक अपेक्षा असते, व तिची पूर्तता केल्यास समाज त्याला यशस्वी म्हणतो. पण, एक माणूस म्हणून, त्याला स्वत:ला काय हवे आहे ? उत्तररामचरित्रातील श्रीराम हा एक धोब्याच्या कथनामुळे असा निर्णय घेतो की समाजापुढे राजाचा आदर्श असायला हवा, राजावर कलंक नको; आणि म्हणून तो सीतेचा त्याग करतो. पती म्हणून, सीतेचा त्याग करतांना रामाला आनंद झाला असं नव्हे, उलट दु:खच झालं. पण, त्यानं आपल्या ‘आदर्श-राजा’ या भूमिकेला प्राधान्य दिलं, आणि त्या भूमिकेत तो यशस्वी झाला. याउलट, इसवी सन १९३६ मधे इंग्लंडचा राजा एडवर्ड तृतीय (नंतरचा ड्यूक ऑफ विंडसर) हा, अमेरिकन डायव्होर्सी मिसेस सिम्सन हिच्यावरील प्रेमाखातर राज्यावरून पायउतार झाला (abdicated). इथे, त्याने, समाज काय म्हणेल याची पर्वा केली नाही. ‘नाममात्र राजा’
म्हणून रहाण्यापेक्षा, स्वत:च्या व्यक्तिगत जीवनाला त्यानं प्राधान्य दिलं, व स्वत:च्या नजरेत तोयशस्वी झाला.
थोडक्यात म्हणजे, ईप्सित साधल्यावर मिळणारं मनाचं समाधान हेंच कुणाही व्यक्तीच्या दृष्टीनं यशाचं गमक आहे.
वर म्हटलंच आहे की, यश ही अंतिम पायरी नव्हे. याचाच अर्थ असा की, यशासाठी व्यक्तीने ठरवलेले निकष कालानुसार बदलू शकतात. एक लक्ष्य गाठलं की, माणूस दुसरं एखादं लक्ष्य ठरवतो. मग ते
त्याच रस्यावरील अधिक उंच शिखर असो, किंवा एखाद्या पूर्णपणे भिन्न विषयाशी निगडित असो.
किंवा, एखादं लक्ष्य गाठण्यात अयशस्वी झाल्यास माणूस स्वत:साठी कमी उंचीचं किंवा भिन्न दिशेचं लक्ष्य ठरवू शकतो. जीवनमार्गात असे यशापयशाचे अनेक मुक्काम येतच रहातात. थांबायचं की पुढे चालायचं हे जो-तो ठरवत जात असतो. एक लक्ष्य गाठण्यात माणूस यशस्वी झाला तरी दुसर्या एखाद्या ऍक्टिव्हिटीमधे तो अयशस्वी होऊ शकतो ; तसेच एखाद्या गोष्टीत अयशस्वी झालेली व्यक्ती दुसर्या एखाद्या गोष्टीत, किंवा नंतरच्या काळात, यशस्वी होऊ शकते. यश-अपयश, अपयश-यश, असं हे चक्र आहे. अपयशानंतर माणूस जर हताश-हतबल झाला नाही, हिंमत हरला नाही, त्याने जर प्रयत्न चालूच ठेवले, तर भविष्यकाळात तो यशस्वी होऊ शकतो. नव्हे ; होणारच.
महाभारतातील पांडवाचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे. द्यूतात युधिष्ठिर म्हणजेच पर्यायानं पांडव हरले, अपयशी झाले. परिणामीं द्रौपदीची विटंबना झाली, व पांडवांना वनवास अन् अज्ञातवास भोगावा लागला. अज्ञातवासातील कष्ट व अपमान यांची कल्पनासुद्धा करणे आपल्याला कठीण आहे. राज्ञी द्रौपदी ही दासी होऊन राहिली, वीरवर भीम हा बल्लव म्हणजे आचारी, तर अतुल धनुर्धर अर्जुन हा बुहन्नला म्हणजे तृतीयपंथी बनून राहिला. काय हे जीवन !! पण पांडवांनी धीर सोडला नाही, ते तावून-सुलाखून या दिव्यातून बाहेर पडले. पुढे कुरुक्षेत्रावरील युद्धात काय झाले, ते सर्वविदित आहे. तिथे पांडव यशस्वी झाले.
थोडक्यात काय, यशस्विता समाजाभिमुख आहे तशीच व्यक्तिगत-दृष्टिकोनावर अवलंबून आहे, व ती कालसापेक्षही आहे. पण मुख्य म्हणजे, यशस्विता माणसाच्या मनातच सामावलेली आहे.
यशस्विता ही एक प्रेरकशक्ती आहे, जीवनशैली आहे, जगायची ऊर्मी आहे. स्वत:च्या क्षमता वाढवून, त्यांचा कस लावून, जे काम आपण करतो ते जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे झालं पाहिजे, ही प्रेरणा ती आपल्याला देते. अशी प्रेरण सतत मिळत राहिली तर यश आपोआप मिळतं, मिळत रहातं.
-- डॉ. स्नेहलता नाईक.
August 28, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti