वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात.
पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात.
त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी 'मी' येतो. याच 'मी'पणाच्या अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा समज आहे.
कृष्णाचं आवडतं वाद्य बासरी. एकदा कृष्णाच्या सगळ्या सख्या, गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या,आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो, त्याच्या आजूबाजूला वावरतो,पण तो आम्हाला साधा भावही देत नाही. तू तर एवढी साधी; ना रूप ना काही.पण तो तुला सतत ओठांशी धरून असतो.
तू अशी काय जादू केली आहेस त्याच्यावर? बासरी हसली आणि म्हणाली, 'तुम्ही माझ्यासारख्या व्हा,मग कृष्ण तुम्हालाही जवळ घेईल.'
अर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पाहिलं. बासरी पुढे म्हणाली, 'मी अगदी सरळ आहे; ना एखादी गाठ, ना एखादं वळण. मी पोकळ आहे. त्या पोकळीतून माझ्यातला अहंकार गळून पडलाय. माझ्या अंगावरच्या सहा छिंद्रातून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे रिपू मी काढून टाकले आहेत.
मला स्वत:चा आवाजही नाही. माझ्या सख्यानं फुंकर मारली तरच मी बोलते. तो जशी फुंकर मारतो तशी मी बोलते.'
गोपी निरुत्तर झाल्या.
अहंकार रहित शरीर ही श्रीहरीची बासरी होय.
ज्योत्स्ना प्रकाशनाच्या विकास परांजपे ह्यांच्या फेसबुक वॉल वरुन
घालीन लोटांगण ही नामदेवांची एक सुंदर रचना आहे. त्याला 'त्वमेव माता...' ही संस्कृत रचना (बहुधा शंकराचार्यांची) कोणी चिकटवली व का हे कोडे मला सुटले नाही. मी आजपर्यंत अनेकांना विचारले. उत्तर मिळत नाही. कोण सांगू शकेल काय ?
या माझ्या प्रश्नावर माझा मित्र रवी अभ्यंकर याने संदर्भासह विस्तृत माहिती पुरवली ती पुढे देत आहे.
रविला भेटलो की ‘लोटांगण’ नाही घातले तरी ‘प्रेमे आलिंगीन’ नक्की !!!
-- रवी उवाच
विकास,
'घालीन लोटांगण' हे कॉकटेल काव्य आहे, ह्यातली पाच कडवी कुठल्या तरी भक्ताने इथून तिथून जमवून त्यांचं मिश्रण केलं आहे.
(१) पहिलं कडवं 'घालीन लोटांगण' हे तू लिहिल्याप्रमाणे नामदेवांचं आहे. त्याला बिचाऱ्याला कल्पना नसेल पुढे त्याच्या काव्याला किती ठिगळं लागणार आहेत त्याची.
(२) दुसरं कडवं 'त्वमेव माता च पिता त्वमेव' हे गणपती किंवा कुठल्या देवाला उद्देशून नसून तो गुरुस्तोत्राचा भाग आहे. शंकराचार्यांनी श्रीगुरुस्तोत्रं लिहिलं, ज्यात आपल्याला माहिती असलेला 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्रविष्णु' श्लोक समाविष्ट आहे.
(३) तिसरं कडवं 'कायेन वाचा' हे श्रीमद्भागवतपुराणातलं आहे. एकूण अठरा पुराणांपैकी हे एक, व्यासांनी लिहिलेलं. कायेन वाचा हा श्लोक स्कंध ११, अध्याय २ ह्यामध्ये ३६ वा श्लोक आहे.
(४) चौथं कडवं 'अच्युतम केशवं' हे 'अच्युताष्टकम्' ह्या शंकराचार्यांच्या काव्यातून घेतलं आहे. मजा म्हणजे काव्याचं नाव जरी 'अच्युताष्टकम्' आहे तरी त्यात नऊ श्लोक आहेत.
(५) पाचवं आणि शेवटचं कडवं 'हरे राम हरे राम' सर्वात सोपं. ते 'कलिसन्तरण' ह्या उपनिषदातलं आहे. ह्या उपनिषदाची सुरुवात 'ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यंकरवावहै । तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।' आपल्या सर्वांनाच माहिती आहे.
तर अशी ही प्रार्थना जी आपण गणपतीसमोर म्हणतो, त्यातलं एकही कडवं गणपतीला उद्देशून नाही.
-- रवी अभ्यंकर
ज्योत्स्ना प्रकाशनाच्या विकास परांजपे ह्यांच्या फेसबुक वॉल वरुन
पिंक . अलीकडेच प्रदर्शित झालेला हिन्दी सिनेमा . दाहक वास्तवावर आधारित तितकाच वास्तव सिनेमा . आपण व्यक्ति म्हणून , समाज म्हणून जर असन्वेदनशील झालो तर एक संवेदनशील विषय किती ज्वलंत बनू शकतो , नव्हेबनलाच आहे , याचा आरसा म्हणजे हा सिनेमा . करमणूक म्हणून जायचे असेल तर या सिनेमाला जाण्याचा विचार सुद्धा मनात आणू नये असा हा सिनेमा . पण आपल्या आयुष्यात एक व्यक्ति म्हणून , एक समाजाचा घटक म्हणून , एकवडील म्हणून , एक मित्र म्हणून , एक मैत्रीण म्हणून , एक समाज - धुरीण म्हणून , एक सहकारी म्हणून कसे वागतो आणि कसे वागले पाहिजे याबाबत एकदम झनझनित अंजन घालणारा असाच हा सिनेमा आहे . एकदम अस्वस्थ करणारा .
त्यासाठी या सिनेमाच्या निर्मितीशी संबंधीत सर्वांचे मनापासून अभिनंदन केले पाहिजे . पण निव्वळ अभिनंदन करून आपल्या सगळ्यांच्याच नेहमीच्या सवयीने सोडून देण्यासारखी ही गोष्ट नाहीच .
हा सिनेमा पाहिल्यापासून माझ्या मनात एकच विचार सतत येत आहे कि सभ्यतेच्या साऱ्या गोष्टी आज अशा पध्दतीने परत एकदा तपासून घेण्याची आज वेळ आली आहे . जर आपल्या लेकी- सुनान्बाबत आपण इतके नादान पणे वागणारअसू , तर आपल्यात आणि " लड़के है , जवानी में तो ऐसा एखाद बर्ताव हो जाता है " असं म्हणणारया आपल्या देशातील एका राजकीय नेत्यांत आणि तशा मनोव्रुत्तीच्या इतरांत काय फरक राहिला ?
असा फरक राहिला पाहीजे आणि तो प्रकर्षाने सतत जाणवत राहिला पाहीजे असं अगदी मनापासून वाटणार्या सर्वानी हा सिनेमा पाहिलाच पाहिजे . आणि त्याचबरोबर या सिनेमातील तीन तरूण मुलिन्वर जो प्रसंग येतो , तसा प्रसंगकोणावरही येणार नाही याचीही व्यवस्था आपण सगळेच मिळून कार्यरत ठेवणे आवश्यक आहे . ( नुसती सुरू करणे नाही ; सुरू ठेवणे अत्यावश्यक . )
अर्थात असा विचार , असा व्यवहार केवळ या सिनेमातील घटने बाबत नाही तर आपल्या आयुष्याच्या अनेक पैलूंबाबत करण्याची वेळ आली आहे . आपला देश आर्थिक महासत्ता बनेल किंवा बनणार नाही . पण आर्थिक महासत्ता होणे हाकाही सर्व व्यथा दूर करणारा सार्वकालिक रामबाण उपाय नाही . एकीकडे सांस्कृतिक सम्रुध्धीच्या परंपरेच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे एक देश म्हणून Human Development Index मधे जागतिक क्रमवारीत खालच्या पातळीवरअसायचे हे एक देश म्हणून शरमेचीच बाब आहे . अर्थात त्यासाठी फक्त सरकारला दोषी मानने सर्वथैव गैर आहे .
मग याबाबतीत कसे वागावे लागेल याचे आदर्श उदाहरण म्हणजे " PINK " सिनेमातील अमिताभ बच्चन यांनी रंगवलेली दीपक सेहगल ही व्यक्तिरेखा . आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटनांची नोंद कशी घेतली पाहिजे , संबंधितव्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यात गैरवाजवी ढवळाढवळ न करता त्यांना कसे सहाय्यकारी झाले पाहिजे , तटस्थता आणि समरसता यात संतुलन कसे राखले पाहीजे , त्याचवेळी असॆ सामाजिक आयुष्य आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यातीलजबाबदार्या यांचा तोल कसा सांभाळत राहीले पाहीजे , कायद्यासमोर दोषी व्यक्तींना उघडे पाडत असतानाच एकंदरीतच प्रचलित पध्दतीत कसे - काय - का बदल झाले पाहिजेत याचे दिशा - दिग्दर्शन करणे ( मग ते या सिनेमा प्रमाणेतिरकस , खोचक , कुचकट पणे ही का असेना ) याचे काळानुसार , प्रसन्गानुरूप , स्थितिसापेक्ष असॆ हे उत्कृष्ट उदाहरण आहे .
या अर्थाने या सिनेमाच्या शेवटी तीन मुलिन्चा वकील म्हणून खटल्यातील Closing Remarks म्हणून अमिताभ बच्चन यांच्या तोंडी जो संवाद आहे तो फार महत्वाचा आहे . तो संवाद असा " No Means No . No हा केवळ एक शब्दनाहि . नाहीच . ते ऐक संपूर्ण वाक्य आहे . त्याला आणखी वेगळ्या व्याख्येची , माहितीची , स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही . "
तसे या आशयाचे मुद्दे कायद्याचा अभ्यास करतांना शिकवले जातात . विशेषतः Criminal LAW शिकताना . वाढत्या वैयक्तिक वयात , आयुष्यात त्याचे नानाविध पैलू लक्षात येत राहतात .
अगदी गुंतवणूक क्षेत्राबाबत ही .
तसेही या सिनेमाचे नाव " पिंक " आणि गुंतवणूक क्षेत्राविषयी जास्त विस्ताराने देणाऱ्या आर्थिक नियतकालिकांना म्हणतात " पिंक पेपर्स " .
असो .
आणि मग तसा विचार करत असताना गुंतवणूक आणि हा सिनेमा यांची सांगड घालणारे काही मुद्दे मनात उमटू , उमलू लागले .
यातला पहिला पैलू म्हणजे NO MEANS NO हे वाक्य . आपल्या गुंतवणूकीचे तंत्र आणि मंत्र मनात घोटवत असताना आपण मोहाला , लोभाला , पुर्वग्रहाना हे म्हणतो का ? कोणतीही परिस्थिती असली तरी आपल्या गुंतवणूकीच्यासातत्याला तात्पुरतीही सोडचिठ्ठी देण्यास पुरेशा क्रुतिशील ठामपणे NO MEANS NO म्हणायला शिकणार् ना ?
यालाही काही वेगळे स्पष्टीकरण देण्याची थोडीही आवश्यकता नाही .
याचा असाच ऐक पैलू म्हणजे गुंतवणूक ही सदासर्वकाळ सर्वान्चीच गरज असते . महिला आणि अल्पवयीन यान्च्याबाबत तर असतेच असते . हल्लीच्या काळात महिला त्यांच्या स्वतःच्या गुंतवणुकीबाबत ही खबरदारी , जबाबदारी , काळजीस्वतःच घेउ शकतात . जिथे ही परिस्थिती नसेल तिथे ही भूमिका घरातील इतरांनी निष्ठापूर्वक , नेकिने पार पाडली पाहिजे . घरातील अल्पवयीन व्यकिन्बाबत तर ही गोष्ट घडलीच पाहिजे . जिथे हे होत नसेल तिथे हे त्यांच्या परिचितानीस्वयन्स्फुर्तिने केले पाहिजे . निदान त्याची आवश्यकता आणि प्रक्रिया लक्षात आणून तरी दिली पाहिजे . कारण त्याबाबतची माहिती सर्वाना च असतेच असॆ नाही . आणि अगदी असली तरी काहीवेळा परिस्थितीच्या रेटयात ते सुचतेच असॆनाही . जसे या सिनेमात तीन मुलिन्बाबत अमिताभ बच्चन एक वकील म्हणून करतो . हा संदर्भ केवळ ध्वन्यार्थाने नाही तर सर्वार्थाने लक्षात घेतले कि या सिनेमातील एक संवाद ( जी कायदेशीर तरतूद आहे ) आहे कि " Non - Bailable Warrant असले तरी महिला आणि बालकांना bail मिळतो , मिळू शकतो ." मात्र ही प्रक्रिया योग्य तर्हेने आणि वेळीच सुरू करावी लागते . कारण यातूनच त्यांची निर्भरता निर्माण होत असते . हे आर्थिक , भावनिक , सामाजिक आशाअनेक छ्टांनी खरे आहे .
पिंक हा सिनेमा आणि गुंतवणूक क्षेत्र यांची सांगड घालताना मला जाणवलेला तिसरा पैलूं म्हणजे या दोन्ही गोष्टींचा एक समान संदेश हा आहे कि जर आपण बरोबर असू , निर्दोष असू तर आजूबाजूच्यानी , ज्यांचा तुमच्या परिस्थितीशीएरवी काहीही संबध नाही , केलेल्या टिप्पणीकडे फार लक्ष देण्याची जरासुध्धा आवश्यकता नाहि . त्यामुळे विचलित होण्याची तर बिलकूल गरज नाही . उलट त्यामुळे स्वतःच्या मनाशी स्वतःच्या मताची , तत्वान्ची , आचरणची तपासणी ,उजळणी करून घ्यावी . या सिनेमात ऐक प्रसंग आहे ज्यात अमिताभ बच्चन तापसी पन्नू च्या overcoat चे hood तिच्या डोक्यावरून काढतो . ते दोघं मॉर्निंग वॉक ला गेलेले असतात . ती नेहमीच्या प्रमाणे चालत असते . तिला पाहून "अरे ही तर ती कोर्ट केस वाली " असॆ एक जण म्हणतो . ते ऐकून सिनेमातील मिनल अरोरा ( तापसी पन्नों ) पटकन हुड डोक्यावर घेतें . अमिताभ बच्चन तें पटकन तिच्या डोक्यावरुन काढतात . हे अनेक अर्थांनी महत्वाचे आहे . निर्दोषव्यक्तीचा स्वाभिमान - आत्म सन्मान म्हणून तर ते महत्वाचे आहेच , पण तितकेच ते कार्यपद्धतीचे निर्देशक आहे . सातत्याने केलेली गुंतवणूक विपरीत परिस्थितीत तुमच्यावर छत्र धरते आणि त्यामुळे सामाजिक टीका - टिप्पणी पासूनस्वतःला लपवण्याची वेळ येत नाही .
या सिनेमात न्यायाधीश महाराजांचे नाव " सत्यजित दत्त " आहे हेही यासंदर्भात काहीवेळा अतिशय सूचक वाटायला लागते .
पिंक हा सिनेमा पाहताना जाणवलेली अजून एक गोष्ट म्हणजे या सिनेमात अन्द्रिया या भूमिकेतून तिने केलेले एक वक्तव्य . ती कोर्टात सांगते कि " पुर्वान्चल ( North - East ) मधील मुलींबद्दल निष्कारण वेगळ्या आणि वाईट नजरेनेपाहिले जाते . " गेल्या काही काळात दिल्लीत त्यांच्या बाबत ज्या घटना घडत आहेत त्या हीच गोष्ट सिध्द करत आहेत . काही वर्षांपूर्वी आलेल्या शाहरुखखानच्या " चक दे इंडिया " मधे हॉटेल मधे घडणाऱ्या प्रसंगातही याची झलक होतीचकी ! अशा मुळे त्या निरागस व्यक्तींच्या मनात आपण काय प्रतिमा निर्माण करत असतो ! गेली सहा वर्षे ऑफीस टूर मुळे माझे अनेकदा पुर्वान्चल मधे जाणे होत असते . तेन्व्हाही हे मला प्रकर्षाने जाणवत असते . त्या सात राज्यांच्यावाढत्या विकासाचा भार प्रामुख्याने तिथल्या महिला वाहात असतात हे प्रत्येकाने सतत स्मरणात ठेवणे आवश्यक आहे . मोजक्याच उठवळ , उच्रुन्खल , नादान , हलकट माणसांमुळे संपूर्ण सज्जन सरळमार्गी समाजाला वेठीस धरण कधीचयोग्य नाहि . हा केवळ त्या भूभागातील मुलींना भेडसावत असलेला प्रश्न नाही . हा आपल्या संपूर्ण देशाच्या चारित्र्याचा प्रश्न आहे . विदेशी पर्यटकांना येणारा काहीवेळा अनुभव हा याच मालिकेतील कडी आहे . याला पायबन्द जसाकायद्याने बसेल , तसाच आणि तितकाच आपल्या सगळ्यांच्याच सततच्या सतर्कतेतून बसेल . अशीच संवेदनशीलता काश्मिर बाबतही हवी हे ओघानेच आले .
हा प्रश्न जसा सामाजिक आहे आणि असतो ; तसाच आणि तितकाच आर्थिक , राजकीय ही असतो हे लक्षात घेतले कि त्याची आपल्या गुंतवणूकीच्या धोरणाबाबतीत असणारी समर्पकता वेगळी सांगण्याची आवश्यकता उरत नाही .
अशा अनेक अर्थांनी , अनेक क्षेत्रात , अनेकदा . . . .
No MEANS No .
-- चंद्रशेखर टिळक
C - 402 . राज पार्क
मढवि बंगल्या जवळ, राजाजी पथ .
डोम्बिवलि ( पूर्व ) ४२१२०१ .
मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
E-Mail . . . tilakc@nsdl.co.in
२३ सप्टेंबर २०१६
( गुंतवणूक तुमची माझी ; भाग तेरावा )
मला नेहमी असं वाटायचं की जाम पैसा आला म्हणजे मनुष्य श्रीमंत होतो...
नंतर नंतर माझ्या लक्षात आलं पैसा आला की तो "पैसेवाला" नक्की होतो पण "श्रीमंत" होतोच असं नाहीये...
श्रीमंत या शब्दाची व्याख्या खुप मोठी आहे. वेदांमध्ये जी "श्री" नावाची देवता आहे ती लक्ष्मीपेक्षा थोडी निराळी आहे...
श्री या संज्ञेत पैसा,यश, सौंदर्य, श्रेष्ठत्व, अधिकार, प्रतिष्ठा, उद्योगशीलता, सुस्वभावीपणा वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्यात अनुस्युत आहेत...
फक्त पैसा नव्हे. हे लक्षात आल्यावर मी आसपासच्या काही मंडळींचं निरिक्षण केलं आणि माझ्या लक्षात आलं की खरोखरंच यार पैसेवाला आणि श्रीमंत या दोन अत्यंत निरनिराळ्या कन्सेप्ट्स आहेत...
गंमत म्हणजे प्रत्येक श्रीमंत हा पैसेवाला होताच पण प्रत्येक पैसेवाला हा श्रीमंत नव्हता...
अनेक पैसेवाले असे आहेत की ज्यांना पैशाची "फिकीर नाही"...
अलोट आणि मुबलक पैसा आल्यावर त्या पैशाला शिस्तीचं वळण न लावल्यामुळे तो पैसा घरात लाथेलोटेसारखा असला तरी त्याला नियोजन नाही...
बेफिकीरी, व्यसनाधिनता, उधळपट्टी, वागणूकीत अहंकार, बेशिस्त अनेक पैसेवाल्यांकडे पदोपदी दिसली मला...
सगळीकडे झगमगाट होता पण त्या झगमगाटामागे दिखावा आणि माज होता...
"मी किती महागाची स्कॉच पितो बघ" हे सांगण्यामागे ब्रॅन्डच्या कौतुकापेक्षा, पैशाच्या लेबलला जास्त व्हॅल्यु होती...
ही खरेदी आणि बेफिकीरी घरातल्या इंटॆरिअरपासुन लहानशा खरेदीपर्यंत जिथेतिथे दिसते...
सुसंस्कृतपणा खुप कमी पैशेवाल्यांकडे आहे. मुलं काय शिकतायत? यापेक्षा सगळ्यात भारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये घातलंय याचंच वारेमाप कौतुक...
वाचनसंस्कृती, अभ्यासूपणा, विचारशीलता, सुसंस्कृतपणा याचा जिथेतिथे अभाव दिसत होता...
पण याउलट माझ्या परिचयातील कित्येक श्रीमंत मंडळी ही खुपच निराळी आहेत.
कुणाकडे स्वच्छतेची प्रचंड आवड तर कुणाकडे नेटकं आणि सुबक इंटेरिअर (अजिबात झकपक नाही), कुणाला पुस्तकांचं कलेक्शन करुन त्याची सुबक लायब्ररी करण्याचा छंद तर कुणाला Antic मूर्त्या आणि चित्रं जमवायचा छंद...
कुणाला समाजसेवेची आवड तर कुणाला शेतीची हौस. आणि गंमत म्हणजे सर्व श्रीमंत हे अतिशय Down to earth आणि सुसंस्कृत विचारांचे आहेत...
प्रत्येकाने संपत्तीचं उत्तम, Long Term नियोजन केलेलं आहे. रितसर कागदपत्रे, त्यांच्या फायली तयार आहेत. सरकारी करांचा भरणा व्यवस्थित केलेला असतो. कुठेही कसलाही Show Off नाही आणि बडेजाव तर त्याहून नाही...
स्वत: केलेल्या समाजसेवेचं कौतुक तर अजिबात नाही.
कोट्याधीशाकडच्या पार्ट्यांसोबत गरीबाकडच्या सत्यनारायणालाही आवर्जुन जातात.. कुठेही कसलाही भेदभाव नाही, Attitude तर औषधालाही नाही...
उत्तम मोजकं आणि छान खाणं, भरपूर व्यायाम, सौंदर्याची निगा, मोजके पण सिलेक्टेड दागिने, अदबशीर बोलणं, वागणं... म्हणजे वेदातल्या "श्री" या संकल्पनेला अनुरुप असं परिपूर्ण श्रीमंत व्यक्तिमत्व ते हेच हो...
आणि मग माझ्या लक्षात आलं की एकतर भरपूर मेहनत करुन, कष्ट करुन, उद्योग करुन किंवा मग लांड्यालबाड्या करुन, वाडवडीलार्जित जमिनी विकून "पैसेवाला" होता येणं कुणालाही सहज शक्य आहे पण "श्रीमंत" होणं हे एक कष्टसाध्य पण छान व सुंदर "मिशन" आहे...
पैसेवाल्यांना श्रीमंत होणं अशक्य आहे असं मी अजिबात म्हणणार नाही.
तो एक प्रवास आहे, विचारपुर्वक करण्याचा... तो करायलाच हवा. तुमचं पैसेवालं असणं हे सगळ्यांच्या दृष्टीने जितकं हास्यास्पद आहे तितकंच श्रीमंत होणं कौतुकास्पद आहे हे लक्षात घ्या...
तुम्ही खूप श्रीमंत व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना...!!!
जय हो...!!!
हा लेख मी लिहीलेला नसून माझ्या वाचनात आला व आवडला म्हणुन पोस्ट करत आहे.
ग्रंथ दर्शन
दिवाळी म्हणजे दिव्यांचा-प्रकाशाचा उत्सव! अंधाराकडून प्रकाशाकडे व अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याची प्रेरणा देणारा दिपोत्सव! हल्लीच्या शिक्षणाने मार्क मिळतात, कधी-कधी नोकरी मिळते त्यातून बऱ्याचदा चांगले पैसेही मिळतात मात्र सन्मानाने व सर्वार्थाने जगण्याचं ज्ञान मिळतंच असं नाही. ते मिळण्याची सोय आणि व्यवस्थाही नाही. म्हणूनच ते ज्ञान आपल्याकडे दुर्मिळही आहे. बऱ्याचदा अज्ञानातच सुखही असतं. किती चांगलं किती वाईट ते माहित नाही, पण असतं, अज्ञानातही सुख असतं. कधी जगाविषयीचं अज्ञान असतं तर खूपदा स्वतःविषयीचंही असतं. मी कोण? मी कशासाठी आलोय? मी कशासाठी काय करतोय? काही थांग-पत्ता नसतो. बस्स, काहीतरी करायचं असतं आणि कसंतरी जगायचं असतं! यातून मार्ग काढण्यासाठी-त्या मार्गावर प्रकाश दाखवण्यासाठीच बहुदा दिपोत्सवाची योजना असावी!
प्रत्येकालाच वाटतं दु:खाकडून आनंदाकडे, गरीबीकडून श्रीमंतीकडे, असमाधानाकडून समाधानाकडे जावं. आनंद आणि दु:ख हे बाहेरील घटकांवर व घटनांवर अवलंबून असतात की, आपल्या मानसिकतेवर की या दोन्हींवर हे जाणून घेतलं तर हा प्रवास सोपा होऊन जातो. याशिवाय आनंदाचेही अनेक प्रकार. स्वतःसाठी घाम गाळून मिळवलेला आनंद, इतरांसोबत वाटून घेतलेला आनंद, काहीही न करता फुकटात मिळालेला आनंद आणि इतरांच्या दु:खावर शेकून घेतलेला आनंद. फटाक्यांच्या आवाजाने इतरांच्या कानठळ्या बसवणारा व धुरामधून प्रचंड प्रमाणात प्रदुषण करून मिळणारा आनंद आणि अंधारातून लुकलुकत्या पणत्यांना बघून मिळणारा निरागस-निखळ आनंद. यातून खरा आनंद शोधण्यासाठी सारासार विवेकबुद्धी व ज्ञानचक्षुच कामी येणार.
श्रीमंतीचा ध्यास असावाच! परंतु कसली श्रीमंती? मनाची, विचारांची, कर्तृत्वाची की नुसतीच कागदी पैशांमध्ये मोजता येणारी? कारण पैसा आला म्हणजे सुख-शांती व समाधान येईलच याची काही शास्वती नाही. त्याने फार-फार तर व्यवहार चालू शकेल तो आवश्यक आहेच, परंतु ज्यासाठी हा खटाटोप चालतो त्या इतर बाबींचं काय? कारण शेवटी आनंद-सुख व समाधानसुद्धा मनाची अवस्थाच आहे आणि ती काही पैशाने किंवा इतर कशाने विकत घेता येत नाही.
लाख घडोत चुका मात्र जाणिव थोडी हवी. कमी-अधिक प्रमाणात प्रत्येकाकडून चुका होतात. कधी जाणून-बुजून तर कधी अजाणतेपणी व नकळत. चुकांचा साक्षात्कार झाल्यावर त्यात सतत सुधारणा करून वाटचाल केली तर सत्कृत्यांकडे जाण्याचा मार्ग सोपा होईल. त्यातूनच चुकांचे प्रमाणही आपोआपच कमी होत जाईल. प्रयत्नांमधून चुका वजा केल्या तर उरतं ते यश व प्रगती.
व्यसनं शारीरिक असतात तशी मानसिकही. हल्ली मानसिक व्यसनंच जास्त. नकारात्मकता, वैफल्य, निष्क्रियता अशी एक ना अनेक. सर्वच व्यसनं दुहेरी नुकसान करतात. एक तर ती तुमची शारीरिक-मानसिक झीज करतात आणि दुसरं म्हणजे प्रगतीच्या मार्गात धोंडा बनून राहतात. म्हणूनच प्रयत्नपूर्वक कोणत्याही व्यसनांपासून दूर राहण्याचा व आळसाकडून उद्योगीपणाकडे जाण्याचा संकल्प या दिव्यांच्या साक्षीने करू या. कारण आजच्या काळात शारीरिक-मानसिक आरोग्य हीच मोठी धन-संपत्ती झालेली आहे.
अज्ञानातूनच अंधश्रद्धेचा जन्म होतो त्याने मग अवघं जीवनच अंध:कारमय होऊन जातं. तर ज्ञान-विज्ञानाच्या प्रकाशाने संपूर्ण विश्वच मानवी जीवनाच्या कल्याणाने आणि प्रगतीने न्हाऊन-उजळून निघतं.
म्हणूनच या दिवाळीला आनंद-सुख-शांती-समाधान-ज्ञान-विज्ञान यांचा खरा-खुरा दिपोत्सव म्हणूनच साजरा करू या! मना-मनातील व जना-जनातील या आगळ्या-वेगळ्या दीपोत्सवासाठी खूप-खूप शुभेच्छा!
श्री.नरेंद्र जोशी ठाणे
एका वेगळ्याच.. हटके पद्धतीने बनवलेला.. हा हळदीचा गणपती….
१५ कारणे का वापरावे पिकांसाठी ह्युमिक अँसिड
सेंद्रिय शेतीचे महत्त्व आता सर्वांनाच समजले आहे. परंतु हि शेती अधिक कार्यक्षम पद्धतीने कशी करु शकतो हे शेतक-याने जाणुन घेणे खुप महत्वाचे आहे. सेंद्रिय शेती अधिक फायदेशिर करण्यासाठी शेतीसाठी लागणारे आवश्यक घटकांचा म्हणजेच माती, पाणी, हवा यांचा अधिक प्रभावीपणे वापर कसा करता येईल ते पहाणे गरजेचे आहे. यासर्व घटकांचा पुरेपुर वापर करण्यासाठी ह्युमस /ह्युमिक अँसिडचा वापर करणे आवश्यक आहे. ह्युमिक अँसिडचा वापर करणे प्रत्येक शेतक-यासाठी अनिवार्यच झाले आहे.
ह्युमस /ह्युमिक अँसिड?
ह्युमस म्हणजे सेंद्रिय घटक म्हणजेच पालापाचोळा, जनावरांची विष्टा, शेतातील इतर सेंद्रिय पदार्थ यांच्या विघटनातुन तयार होणारा पदार्थ आहे. हा पदार्थ म्हणजे अनेक सेंद्रिय घटकांचे मिश्रण असुन हे पिकांच्य सर्वांगिण वाढीसाठी अतिशय आवश्यक आहे.
ह्युमिक अँसिडचे गुणधर्म
ह्युमिक अँसिड हे खत नसुन यात अतिशय अल्प प्रमाणात सुक्ष्म व मुख्य अन्नद्रव्ये असुन मातीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारणारे भुसुधारक आहे.हे मानवनिर्मीत नसुन पुर्णपणे नैसर्गिक पदार्थ आहे.ह्युमिक अँसिडमध्ये कार्बनचे प्रमाण अधिक असुन हायट्रोजन अतिशय अल्प प्रमाणात असतो. तसेच त्यात ४% पर्यंत नत्र असते.ह्युमिक अँसिड हे मुख्य करुन पावडर, दाणेदार स्वरुपात तसेच द्रवरुपातही वापरता येते.
ह्युमिक अँसिडचे फायदे –
ह्युमिक अँसिडमुळे मातीची रचना सुधारते तसेच पिकाची नत्र, स्फुरद, पालाश शोषण्याची क्षमता ही सुधारते.मातीचा सामु स्थिर ठेवण्यास फायदेशिरनत्र स्थिरिकरण क्षमतेला चालना देऊन मातीतील नत्राची कमतरता भरुन काढते.ह्याचाच परिणाम त्या मातीतील पीक सशक्त व टवटवीत रहाण्यास फायदेशिर ठरते.ह्युमिक अँसिडचा वापर केल्यास पिकांसाठी आवश्यक असणा-या बुरशींची वाढ होऊन ह्या बुरशीमुळे मातीपासुन उद्भवणारे रोगांपासुन संरक्षण मिळण्यास मदत होते.ह्युमसयुक्त मातीमधील जलधारण क्षमता साधारण मातीच्या सातपट अधिक असते म्हणुनच दुष्काळयुक्त भागात ह्युमिक अँसिडचा वापर खुप महत्वाचा आहे.जमिन हलकी होउन त्यात हवा खेळती राहते व मुळांची वाढ चांगली होते.याच्या वापरामुळे जमिनीतील स्फुरद, कल्शिअम, लोह यांचे उपलब्ध रुप तयार होते व पिकास हि अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरुपात मिळतात.बीजप्रक्रिया म्हणुन वापर केल्यास बियांची उगवण चांगली होण्यास मदत होते.ह्युमिक अँसिडच्या वापरामुळे जिवाणुंना कार्बन पुरविला जातो व त्यामुळे जिवाणुंची संख्या वाढते.सोडियम व इतर विषारी रसायनांपासुन मातीवर होणारे दुष्परिणाम थांबवण्यास हे अतिशय उपयोगी पडते.युरिया तसेच इतर रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिन नापिक होण्यापासुन वाचवते.रासायनिक खतांची कार्यक्षमता ३०% पर्यंत वाढवते त्यामुळे खतांचा खर्च कमी येतो.सर्वात महत्वाचे म्हणजे पिकांच्या पांढ-या मुळींची वाढ जलद होते.हे पुर्णपणे सेंद्रिय असल्यामुळे याच्या अतिवापरामुळे कोणताही दुष्परिणाम होत नाही.
-- वसंत चरमळ
‘संस्कृतमध्ये फुलपाखराला वेगळा (स्वतंत्र) शब्द नाहीं’ असें दुर्गा भागवत यांनी म्हटल्याचा उल्लेख करून मांदळे यांनी संस्कृतवर टीका केलेली आहे. ती किती योग्य आहे, हें पाहूं या.
आपटे यांचा कोश ( कोष ) गेल्या १२५ वर्षांहून अधिक काळ उपलब्ध आहेच. मांदळे यांनी प्रश्न मांडला आहे तो, डेक्कन कॉलेजनें हातीं घेतलेल्या प्रकल्पाचा. खरें तर, एखाद्या प्रकल्पाचा , per se त्या भाषेशी व भाषिक संस्कृतीशी काय संबंध ?
तरीही, शब्दकोश या विषयात आपण थोडेसें जाऊं या.
पण त्या delay चा आणि मांदळे यांनी mention केलेल्या संस्कृत भाषेच्या श्रेष्ठत्वाच्या (‘तथाकथित’ ) ‘मिथका’चा संबंध काय, हें मात्र मांदळे यांनी स्पष्ट केलेलें नाहीं.
त्यामुळे, भाषिक संदर्भात त्यांचा हा मुद्दा गैरलागू ठरतो.
(पुढे चालू )
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
परिशिष्ट – (१)
फुलपाखरू आणि संस्कृत (व इतर भाषा )
[ ‘संस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदान’ या शीर्षकाच्या प्रा.शेषराव मोरे यांच्या लोकसत्तामधील लेखावरील,
श्री. किशोर मांदळे यांच्या प्रतिक्रियेतील एक मुद्दा ]
पण, आपटे यांच्या ‘संस्कृत-इंग्लिश डिक्शनरी’मध्ये चित्रपतंग हा शब्द नाहीं. कदाचित तो कांहीं कारणानें राहून गेला असेल.
तसेंही,‘चित्रपतंग’ म्हणजे एका विशिष्ट टाइपचा ‘पतंग’च. त्यामुळे, पतंग व चित्रपतंग या दोन्ही शब्दांमध्ये समन्वयच आहे.
पाखरू हा शब्द ‘पक्षालु’ या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे.
[ पण, फुलपाखरू हा शब्द त्यामानानें आधुनिक वाटतो. यादवकालीन (ज्ञानेश्वरकालीन ) मराठीत हाच शब्द आहे की कांहीं अन्य, तें बघायाला हवें ] .
पण , अशी उदाहरणें आपल्याला अन्य भाषांमध्येही सापडतात. मराठीच घ्या. फुलपाखरू म्हणजे एक विशिष्ट प्रकारचें पाखरू. मधमाशी म्हणजे एक विशिष्ट प्रकारची माशी. गांधिलमाशी म्हणजेही एक अन्य प्रकारची माशीच. इंग्रजीतील butterfly म्हणजे एक विशिष्ट तर्हेची Fly (माशी). संस्कृतमध्ये व संस्कृतोद्भव मराठीसमान प्रादेशिक भाषांमध्ये , भुंग्याला , भ्रमर, मधुकर, मधुप, वगैरे एकाहून-अधिक भिन्नभिन्न शब्द आहेत. मराठीत भुंगा, हिंदीत भौंरा, असे additional (derived) शब्दही आहेतच. पण इंग्रजीत त्याला Bee असेंच म्हणतात, त्याला वेगळा शब्द नाहीं. खरें तर, भुंगा म्हणजे एक विशिष्ट प्रकारची Bee च आहे.
तसेच ‘प्रजापति’ शब्दाचेंही आहे.
- पंजाबीत फुलपाखराला ‘तितली’ म्हणतात.
- ‘डोगरी’ भाषेतही फुलपाखराला तितलीच म्हणतात.
(या दोन भाषांतील शब्दांवर हिंदीचा प्रभाव स्पष्ट दिसतो).
- सिंधीमध्ये फुलपाखराला ‘पतंग’ किंवा ‘पोपटु’ / ‘पोपट’ म्हणतात.
(पोपट हा शब्द मराठीजनांना माहीत आहे ; मात्र त्याचा मराठीत अर्थ आहे ‘पॅरट्’. गुजरातीमध्येही हाच अर्थ आहे. (संस्कृतमधील, ‘शुक’ ). मात्र. पॅरट काय अन् फुलपाखरू काय, दोन्हीही ‘उडणारे जीव’च आहेत.
-उडियामध्ये ( बंगालीप्रामणेंच ) ‘प्रजापति’ म्हणतात.
-तमिळमध्ये फुलपाखराला म्हणतात ‘पत्तामपूची’ ( Pattaampoochee ).
Pattaam : Honour ; Silky or Beautiful . Poochee : Insect.
(‘पूची’ या शब्दाचें संस्कृत ‘पुच्छ’ या शब्दाशी साम्य आहे ; पण त्यापासून पूची शब्द आला असेल काय, याची कल्पना नाहीं . तमिळ शब्दाची इटिमॉलॉजी पाहिल्यावरच तें कळूं शकेल).
- कन्नडमध्ये फुलपाखराला ‘पात्रिहित्ती’ म्हणतात. ‘पात्रि’ शब्दाचा उगम संस्कृत ‘पात्र’पासून असूं शकेल. ( संस्कृतमधील ‘पात्र’ चा एक अर्थ आहे : Worthy ) .
-तेलगुमध्ये फुलपाखराला ‘सीताकोकाचिलुक/ का’ असा शब्द आहे. (म्हणजे, ‘ए बर्ड हू वेअर्स ए साडी’).
इथें, संस्कृतचा प्रभाव दिसतो. सीता हा शब्द आपल्या सर्वांनाच परिचित आहे. कोका म्हणजे ‘चक्रवाक पक्षी’ , व ‘चिल्’ म्हणजे वस्त्र नेसणें. (सीता या शब्दाचा तेलगुमध्ये काय अर्थ आहे, कल्पना नाहीं, मात्र शब्द संस्कृत आहे ).
-मलयालम भाषेत फुलपाखराला ‘चित्रशलभम्’ म्हणतात. आपल्याला दिसून येतें की, हा पूर्णपणें संस्कृत शब्द आहे. ‘शलभ’ हा संस्कृत शब्द grass-hopper आणि moth यांच्यासाठी वापरला जातो.
*म्हणजेच, जसें चित्रपतंग तसेंच चित्रशलभ . पतंग किंवा शलभ या generic शब्दाला ‘चित्र’ हा शब्द लावून फुलपाखरासाठी शब्द बनलेला आहे.
एवढेंच नव्हे तर, अनेक भारतीय प्रादेशिक भाषांमधील , फुलपाखरासाठी असलेल्या शब्दांनाही संस्कृतचा आधार आहे.
- - -
परिशिष्ट – (२)
मतें, लेखन आणि पब्लिकेशन्समधील त्यांची प्रसिद्धी
[ ‘संस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदान’ या शीर्षकाच्या प्रा.शेषराव मोरे यांच्या लोकसत्तामधील लेखावरील,
श्री. हेमंत राजोपाध्ये यांच्या प्रतिक्रियेतील एक मुद्दा ]
‘... मराठी अभ्यासविश्वात ( या विषयाची ) सांगोपांग चर्चा होईल अशी अपेक्षा होती ’ .
(पहा लेखाचा भाग – ९ ).
हा मुद्दा मूळ विषयाशी डायरेक्टली संबंधित नाहीं, म्हणून मुद्दाम वेगळा, परिशिष्ट म्हणून, घेतलेला आहे.
यावरील माझें कांहीं विचार असे :
म्हणजेच, अनेक लोकांन या विषयात रस आहे.
कारण नाहीं. पण, या ज्या आठदहा प्रतिक्रिया लोकसत्तानें छापल्या आहेत, त्याव्यतिरिक्त अजून किती त्यांच्याकडे आल्या, ज्या ते छापू शकले नाहींत, हें आपल्याला माहीत नाहीं. त्यासाठी त्यांची कांहीं कारणें, (जसें की संपादकीय मंडळाची किंवा मालकांची पॉलिसी), किंवा अडचणी (जसें की स्पेस), असूं शकतात.
ह्याचा उल्लेख करण्याचा हेतू असा की, सर्वच वाचकांना लिहिण्याबाबत अशा अनेक अडचणी येत असतीलच. त्यामुळे, पेपरमध्ये न दिसलेल्या प्रतिक्रिया ह्या ‘लेटंट ’ आहेत, असें समजायला हरकत नाहीं.
+ + +
( समाप्त )
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
देव्हार्यात एकाच देवतेच्या दोन दोन तिन तिन मूर्ती नसाव्यात, फोटो सुद्धा डबल नसावेत, घरातील देव्हार्यामध्ये मृत व्यक्तींचा फोटो ठेवू नये. देव्हारा हा शक्यतो पूर्व भिंतीला असावा म्हणजे पूजा करताना आपले तोंड हे पूर्वेला येईल ,
देव्हारा नियमित पणे स्वच्छ करावा , देव हे वस्रावर असावेत , आपल्या घरी देव्हाऱ्यात कुलदेवतेची मूर्ती ,
प्रतिमा असावीच असावी . सर्वात मागे मध्यभागी कुलदेवता प्रतिमा आणि त्या समोर मध्यभागी गणपती
व गणपतीच्या डाव्या बाजूस देवी मूर्ती म्हणजे लक्ष्मी / अन्नपूर्णा / दुर्गा इत्यादी आणि
उजव्या बाजूस देव मूर्ती म्हणजे बाळकृष्ण इत्यादी...
देवघरात शंख असावा , पण तो छोटा पूजेचा शंख असावा , वाजविण्याचा मोठा शंख देव्हाऱ्यात ठेऊ नये , बाजूला ठेवावा .
देवाच्या डाव्या म्हणजे आपल्या उजव्या बाजूला शंख असावा आणि देवाच्या उजव्या म्हणजे आपल्या डाव्या बाजूस घंटी असावी ..
पूजेचे साहित्य —
अक्षता, हळद, कुंकू, गंध, फुले, तुळशी, दूर्व, बेल, उदबत्ती, निरांजन, कापूर,वस्त्र,फळं,नारळ, विडा, नैवेद्य व पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि साखर, मध नसेल तर थोडा गूळ)
वापरती भांडी –
तांब्या, भांडे,(पंचपात्र),पळी ताम्हण, अभिषेकपात्र,निरांजन, समई ( विषेश प्रसंगी ) घंटा.
पूजेचे साहित्य कसे असावे ?
सर्व पूजेची भांडी तांब्या , पितळेची – शक्य तर चांदीची असावी. स्टेनलेस स्टीलची अथवा प्लॅस्टिकची नसावी.
गंध –
चंदनाचे उगाळतात. त्यात कधी केशर घालतात. करंगळी जवळच्या बोटाने (अनामिकेने) देवाला गंध लावावे.
सहाणेवर गंध उगाळून तो प्रथम दुसऱ्या तबकडीत घेऊन गंध लावावा . देवासाठी गंध हातावर उगाळू नये .
अक्षता -
धुतलेल्या अखंड तांदुळांना थोडेसेच कुंकु लावून त्या अक्षता वाहाव्या.
शाळिग्राम आणि शंख यांना अक्षता वाहू नयेत.
शंख नेहमी पाण्याने भरून ठेवावा , दुसऱ्या दिवशी ते पाणी कृष्णावर / देवांवर स्नान म्हणून अर्पण करावे .
हळद – कुंकू याखेरीज गुलाल आणि बुक्काही (काळा/ पांढरा अबीर ) पूजा साहित्यात असावा.
गणपतीला शेंदूर, विठ्ठलाला बुक्का (काळा अबीर ) वाहण्याची वहिवाट आहे.
फुले –
ऋतुकालोद्भभव पुष्पे म्हणजे त्या त्या ऋतूत येणारी ताजी आणि सुवासिक फुले देवाला वाहावी.
जाई, जूई, कण्हेर, मोगरा, जास्वंदी चाफा, कमळे, पारिजातक, बकुळ, तर वगैरे फुले सर्व देवांना चालतात.
विष्णुला – चाफा, मोगरा, जाई, कुंद वगैरे फुले आवडतात.
शंकराला – पांढरा कण्हेर, कुंद, धोतरा इ. पांढरी फुले वाहतात.
गणपतीला – गुलाब, जास्वंद वगैरे तांबडी फुले प्रिय असतात. गणपतीला दूर्वा वाहातात. गणपतीला तुळस वाहण्याची प्रथा नाही.
गणपतीला रक्तचंदनाचे गंध आणि शेंदूर प्रिय असतो.
देवीला सर्व सुवासिक फुले चालतात.
पाने –
विष्णु, विठ्ठल, शाळिग्राम या देवतांना तुळस, शंकराला बेल तर गणपतीला दूर्वा वाहातात.
धूप –
देवाला उदबत्ती ओवाळून तिचा धूप देवावर दरवळेल अशी ठेवावी. सुगंध दरवळावा.
अगरबत्ती देव्हाऱ्याच्या आत मध्ये ठेवू नये , बाहेर बाजूला ठेवावी .
दिप –
निरांजन ओवाळून ते देवाच्या उजव्या बाजूस ठेवावे. देवाजवळील समईंची ज्योत दक्षिणेकडे करू नये.
समईत एक दोन पाच सात अशा ज्योती (वाती) असाव्या. तीन नसाव्या.
देवाच्या उजव्या म्हणजे आपल्या डाव्या बाजूस तुपाचा दिवा असावा आणि
देवाच्या डाव्या म्हणजे आपल्या उजव्या बाजूस तेलाचा दिवा असावा .
वाती या जोड वाती असाव्यात म्हा जे दोन वाती एकत्र करून केलेली एक वात ..
नैवैद्य –
रोजच्या पूजेत देवाना पंचामृताचा नैवैद्य दाखवितात.
दूध, पेढे, फळे आणि पक्वाने नैवेद्यात सर्व देवांना चालतात.
विशेष प्रसंगी गणपतीला मोदक किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य,
देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात.
फळे -
देवाला कच्ची फळें वाहू नयेत.
पक्व फळाचे देठ देवाकडे करून ठेवावीत.
तांबूल –
म्हणजे विड्यांची पाने आणि त्यावर सुपारी खारीक खोबरे बदाम इत्यादी ठेवावे.
पानाचे देठ देवाकडे करावेत. विड्यावर यथाशक्ती दक्षिणा ठेवावी.
तसेच ड्रायफ्रुट्स सुद्धा असल्यास उत्तम .
नमस्कार –
दोन्ही हात जोडून देवाला नमस्कार करावा. साष्टांग नमस्कार घालावा.
आरती –
देवाला आरती ओवाळताना देवावर प्रकाश पडेल अशी ओवाळावी.
आवाज सौम्य असावा , किंचाळू नये. आर्ततेने म्हंटली जाते ती आरती हे लक्षात घ्यावे .
प्रदक्षिणा –
देवाला प्रदक्षिणा घालावी. अथवा स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी.
गणपतीला एक, सूर्याला दोन , शंकराला तीन, विष्णूल चार, पिंपळाला सात,
आणि मारुतीला अकरा अशा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे.
हात जोडून आणि तोंडाने नामघोष करीत प्रदक्षिणा घालव्यात.
किंवा सर्वाना समान तीन किंवा पाच प्रदक्षिणा कराव्यात ..
प्रार्थना –
देवाला नमस्कार करून भक्तिभावाने प्रार्थना करावी. प्रार्थना आणि सर्व पूजा
एकाग्र चित्ताने शांतपणे मनःपूर्वक करावी. देवाजवळ व्यावहारिक गोष्टी मागू नयेत
किंवा त्याला सांकडे , नवस घालू नये. फक्त त्याची कृपा मागावी.
देवाच्या कृपेनेच सर्व गोष्टी यशस्वी होतात.
देवपूजेचे महत्त्व —
प्रत्येक माणासाला जीवनात सुख समाधान आणि शांती प्राप्त व्हावी म्हणून देवपूजा हे एक उत्तम साधन आहे.
हल्लीच्या संघर्षमय व तणावपुर्ण जीवनात आणि आपल्या दैनंदिन कार्यक्रमात देवपूजेसाठी
आपणाला जास्त वेळ मिळत नाही. तरीही वेळात वेळ काढून देवपूजा करणे आवश्यक आहे.
यथाशक्ती, यथाज्ञानाने व मिळतील त्या उपचारांनी मनोभावे देवपूजा केली तर मनाला शांती मिळते,
घरातील वातावरण पवित्र व प्रसन्न होते, आणि आपापली कामे करायला उत्साह मिळतो.
देवपूजा करणाऱ्यांना एक प्रकारचे विशेष सामर्थ्य येत असते, वाणीला तेज चढते,
अंगीकृत कार्याला यश येते आणि इतरांचाही उत्साह वाढतो , आनंद होतो.
देवपूजेमुळे शारीरिक, मानसिक आणि आचरणातील दोष दूर होतात.
आत्मिक बळ वाढते. आत्मा हाच खरा परमात्मा आहे.
तो संतुष्ट असला तरच जीवनाचे सार्थक होते.
आपल्य कुटुंबास देवघरातील देवांची पूजा एकजणच करतो.
बाकीचे कुटूंबीय स्नानानंतर देवाला फुले, अक्षता वाहून देवाला
नमस्कार करतात. आपल्या नित्यक्रमातुन थोडासा वेळ काढून
पूजेनंतर जप करावा. पोथी वाचावी. गीतेचा अध्याय, गुरुचरित्र,
गजानन विजय यासारख्या आपल्या आराध्य देवतेची कथा,
पोथी यांचे वाचन करावे. जेवढे शक्य असेल तेवढे करावे …
अधिकस्य अधीकम् फलम् .. असे म्हटलेच आहे.
अशा प्रकारे जप, पोथी-वाचन, देवदर्शन आणि व्रते, पूजा, स्तोत्रे,
प्रार्थना वगैरे उपानसनेचे प्रकार आहेत.
त्यांच्यामुळे मन प्रसन्न होऊन मनोरथ पूर्ण होतात.
देवपुजा करण्याचे प्रकार —
१ मानसपूजा
२ मुर्तीपूजा
मुर्तीपुजा करताना म्हणजे नेहमी प्रमाणे पूजा करताना
देवाची मुर्ती किंवा प्रतीमा किंवा सुपारी , नारळ किंवा टाक ह्यांची पूजा केली जाते.
ही पूजा करताना दोन प्रकारे करतात
१ पंचोपचार पूजा
व
२ षोडशोपचार पूजा
१ पंचोपचारी पूजा Panchopchari Puja –
यामध्ये पुढील उपचारांनी देवाची पूजा केली जाते :
(१) गंध (२) पुष्प (३) धूप (४) दीप (५) नैवेद्य
२ षोडशोपचार पूजा ShodShopchari Puja –
यामध्ये पुढील उपचारांनी देवाची पूजा केली जाते :
(१) आवाहन (२) आसन (३) पाद्य (४) अर्ध्य (५) आचमन
(६) स्नान (७) वस्त्र अथवा यज्ञोपवीत (८) गंध (९) पुष्प
(१०) धूप (११) दीप (१२) नैवेद्य (१३) फल (१४) तांबूल
(१५) दक्षिणा (१६) प्रदक्षिणा .
देवाला वरील सर्व उपचार करताना विशिष्ट मंत्र स्तोत्र येत असल्यास उत्तम ,
नसेल येत तर निदान त्या त्या देवतेचे नाम मंत्र तरी म्हणावे .
अभिषेक करताना त्या त्या देवतेचे स्तोत्र , मंत्र म्हणावेत .
उदा .- गणपती पूजा करताना गणेश स्तोत्र किंवा गणेश मंत्र ,
विष्णू पूजा करताना विष्णू स्तोत्र / व्यंकटेश स्तोत्र /
विष्णू सहस्त्र नाम स्तोत्र इत्यादी इत्यादी ..
आणि मानसपूजा हि सश्रद्ध अंतःकरणाने / मनाने करायची असते ..
वरील सर्व साहित्य व उपचार हे मनानेच देवाला अर्पण करायचे असते .
मानासपूजेमध्ये एकाग्रचित्त अंतःकरण आणि सश्रद्ध भाव असणे जरूरी आहे .
मानसपूजा हिच श्रेष्ठ सांगितली गेली आहे ..
@ संकलित माहिती....
Copyright © 2025 | Marathisrushti