वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अति सर्वत्र वर्ज्ययेत्।' अशी एक म्हण आहे. एखादी गोष्ट कितीही चांगली असली तरी तिचा अतिरेक वाईटच. याचे उत्तम उदाहरण म्हणजे व्हेगन डायट. १९४४ साली इंग्लंडमध्ये व्हेगन ही संकल्पना जन्माला आली. याचे प्रणेते डोनाल्ड वॉटसन यांच्यावर गांधींच्या अहिंसावादी तत्वज्ञानाचा प्रभाव होता. १९२० साली गांधींनी नैतिकतेच्या बळावर शाकाहाराचा पुरस्कार करायला हवा असे भाषण इंग्लंड येथील 'व्हेजिटेरियन सोसायटी'समोर दिल्यावर वॉटसन फारच प्रभावित झाले आणि शाकाहाराचा हा अतिरेक जन्माला आला. व्हेगन डायट म्हणजे प्राणिज अन्नपदार्थांचा संपूर्ण त्याग. ही आहारशैली पाळणारे लोक दूध, तूप, मध हे पदार्थदेखील खाण्यास वर्ज्य मानतात. हे पदार्थ मिळवताना हिंसा होते असा त्यांचा सिद्धांत.
यामुळे स्वाभाविकपणे वरील पदार्थांचे पर्याय शोधणे क्रमप्राप्त होते. मग दुधाला पर्याय म्हणून सोया, हेम्प, कोकोनट आणि अल्मन्ड मिल्क सुरु झाले तर लोण्याचा पर्याय (तूप ही संकल्पनाच माहिती नसल्याने) म्हणून व्हेगन मेयोनीज आले. चीझ वा पनीरच्या जागी टोफू आणि पोषक आहार म्हणून फळांचे रस पिणे सुरु झाले. आज या आहाराचा इतका बोलबाला आहे की जगातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर त्याची भलामण करताना दिसतात. जागोजागी व्हेगन सोसायटी जन्माला आल्या आहेत. हे लोक केवळ आपल्या आहारापुरते एकत्र आलेले नसून दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या शाकाहारी लोकांवर यथेच्छ घणाघात करत असतात. मांसाहाराबद्दल तर बघायलाच नको!!
नाण्याची दुसरी बाजू.
दूध आणि तूप हे शरीराला पोषण देणारे सर्वोत्तम पदार्थ आहेत असं आयुर्वेद सांगतो. 'घृतं वै आयु:।' अशी श्रुती आहे. आमच्याकडे पूजेचा प्रसाद पंचामृत तीर्थाशिवाय पूर्ण होत नाही याचे हेच कारण आहे. इथे भगवंतांची पूजादेखील 'गोपाल' या नावाने केली जाते. गोशाळांच्या माध्यमातून दूग्ध संकलन केले जात असताना वासरांवर कोणताही अन्याय अत्याचार होत नसून उलट त्यांचा पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ केला जातो हे तथ्य आहे. मधवरील आक्षेप अंशतः मान्य. म्हणूनच तो केवळ आपद्धर्म म्हणून 'औषधापुरता' वापरावा हा पर्याय असू शकतो.
आहारातून दूध तुपासारख्या शुक्रधातू आणि ओज वाढवणाऱ्या पदार्थाना दूर सारून जे व्हेगन पर्याय वापरले जातात ते प्रामुख्याने कडधान्यांपासून बनलेले असतात. कडधान्ये ही फोडणीशिवाय सतत वापरल्यास शुक्रधातू आणि ओज या दोहोंना घटवतात. यांच्यावरच आपले आरोग्य आणि आयुर्मान अवलंबून आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. याशिवाय व्हेगन आहारातून ज्या पोषणमूल्यांची पूर्तता होत नाही त्यांची पूर्तता करण्यासाठी 'सप्लिमेंट्स'चा सोप्पा मार्ग निवडून आत्मघात केला जातो. (या आधीचा लेख जरूर वाचा.) पाश्चात्यांचे अनुकरण करण्याच्या नादात व्हेगन डायटला आपल्या देशात सध्या प्रसिद्धी मिळू लागली आहे. याबाबत वेळेच सावध होणे गरजेचे आहे. जिथे परमेश्वरालादेखील लाडाने 'माखनचोर' असे म्हटले जाते; त्याच्या हातावर आवर्जून लोण्याचा मऊसर गोळा देण्याची प्रथा आहे. जिथे घराघरांना गोकुळाची उपमा दिली जाते आणि आपल्या तान्ह्या बालकांनाही कौतुकाने दुधातुपाने आणि लोण्याने पोसले जाते. अशा या हिंदुस्थानात व्हेगन डायटसारख्या प्रकारामागे धावणे म्हणजे कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणे आहे. प्राणीप्रेम जरूर असावे; भूतदया महत्वाचीच. पण त्याचा हा मार्ग नव्हे हे निश्चित!!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
April 10, 2017
शिवकालीन इतिहासामधे विशाळगडाला महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. इतिहासामधे विशाळगड, खेळणा, खिलगिला, खिलकिला, सक्करलाना अशी वेगवेगळी नावे या किल्ल्याला मिळालेली आहेत. देश आणि कोकण यांना जोडणार्या आंबा घाटा जवळ असलेला विशाळगड सह्रयाद्रीच्या मुख्य रांगेला लागूनच आहे.
February 13, 2011
२६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दोन्ही राष्ट्रीय सणांचं महत्त्व आणि गांभीर्यही आपण विसरत चाललो आहोत. शाळेतल्या शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना तर हे दोन्ही दिवस शिक्षेसारखे वाटतात. गेल्या २६ जानेवारीच्या आदल्या दिवशी शाळेचे मुख्याध्यापक दिसले. त्यांना नमस्कार केला.
August 12, 2023
परवा शेजारचे काका कौतुकाने सांगत होते, ‘आमचा सुरेश या वयात अध्यात्माकडे वळलाय. दर मंगळवारी पाच पाच तास रांगेत उभे राहून सिध्दिविनायकाचे दर्शन घेतो.’ मी जरा विचारात पडलो. सुरेश हा कॉलेजात जाणारा मुलगा. या वयात तो अध्यात्माकडे वळलाय याचे त्याच्या वडिलांना कौतुक. दुसरा भाग म्हणजे पाच तास रांगेत उभे राहिला म्हणजे अध्यात्म केले हा एक समज. रांगेत उभे राहुन दर्शन घेणे हा ज्याच्या त्याच्या श्रध्देचा भाग. पण अध्यात्म म्हणजे काय?
March 17, 2010
त्याचा रेकॉर्ड बघाल तर त्याने ३९ कसोटी सामन्याच्या ६६ इनिंग्समध्ये २२.८८ च्या सरासरीने १४४२ धावा केल्या त्यामध्ये त्याचे एकही शतक नाही परंतु तो कप्तान म्हणून ‘ आउटस्टँडिंग ‘ होता असे म्हटले जाते.
August 8, 2021
भगवान श्री विष्णूच्या नाभीकमलाचे वर्णन केल्यानंतर, त्यातून उत्पन्न झालेल्या भगवान ब्रह्मदे वांचे जन्मस्थान असलेल्या कमळाचे वर्णन केल्यानंतर, भगवंताच्या संपूर्ण उदराचे एकत्रित स्वरूपातील वर्णन आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात करीत आहेत. ते म्हणतात,
December 28, 2020
अनंत चतुर्दशीला विसर्जन करतात, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र अनंत चतुर्दशीला आणखी एक महत्त्व आहे. त्या दिवशी अनंताच्या दो-याची पूजा केली जाते. त्याला अनंताचं फूल वाहतात. अशा या व्रताला अनंताचं व्रत असं म्हणतात.
भाद्रपद शुद्ध चतुर्दशीस अनंताचं व्रत केलं जातं. कोणाला रस्त्यामध्ये, वाटेमध्ये अनंताचा दोरा सापडल्यास किंवा कोणी अनंत व्रताची पूजा मागून घेतलेली असेल किंवा अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हे व्रत मागून घेतलेले असेल तरच त्या त्या लोकांकडे अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताची पूजा केली जाते.
अनंताची पूजा होईपर्यंत गणपती विसर्जन करत नाहीत. माणूस जेव्हा त्याचे एखादे इप्सित साध्य करतो तेव्हा त्याच्या मनात त्याच्या कर्तृत्वाबद्दल अहंकाराची भावना उत्पन्न होते. असा अहंकार मनी भरलेला माणूस माणसाला ओळखू शकत नाही; परंतु जेव्हा हा अहंकार गळून पडतो तेव्हा मात्र साध्या साध्या गोष्टींमध्ये त्याला देव मिळू लागतो. असा परमेश्वर घराघरात पाहायला शिकणे म्हणजे अनंत दर्शन होय.
अनंत पूजेत प्रामुख्याने यमुना, शेष आणि अनंताचा दोरक म्हणजे दो-याची पूजा असते. यमुना हे मनावरील कामक्रोधांचा ताबा ठेवण्याचे प्रतीक आहे. शेष हे महासामर्थ्य शाली पण अहंकाररहित तत्त्वाचे प्रतीक आहे. अनंताचा दोरक हे संसारातील कालचक्राचे प्रतीक आहे. कालचक्राचे चौदा भाग दाखवण्यासाठी अनंताचा दोरकही चौदा धाग्यांचा असतो. या दिवशी चौदा या संख्येला महत्त्व अधिक असते. हे व्रत कोणाकडूनही घ्यायची गरज नसते. हे व्रत कोणीही सुरू करू शकतं. चौदा र्वष व्रत केल्यावर चौदाव्या वर्षी व्रताचे उद्यापन करावे.
या दिवशी मध्यान्हकाळी स्नान करून अनंताची पूजा करतात. शुद्ध पाण्याने भरलेला कलश घेऊन त्याला दोन पंचे गुंडाळतात. त्यावर दर्भाचा शेषनाग करून ठेवतात. कलशावरील पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शाळीग्राम मांडून षोडषोपचारे पूजा करतात.
त्याप्रमाणे चौदा गाठी मारलेला तांबडा रेशमाचा दोरक घेऊन त्याचीही पूजा करतात. या दो-याला अनंत असं म्हटलं जातं. तो पुरुषाने उजव्या हातात बांधावा. त्याचप्रमाणे मिळणारी अनंती पत्नीने उजव्या हातात बांधावी. त्यानंतर अनंताची कथा पठण करावी. रात्री मंत्रजागर करून ब्राह्मणास दक्षिणा देऊन पक्वान्नांचे वाण देतात. याप्रमाणे चौदा र्वष अनंत पूजन केलं जातं. या व्रतामुळे इच्छित हेतू सफल होतो, असं म्हणतात.
चौदाव्या वर्षी या व्रताचं उद्यापन केलं जातं. या व्रतासाठी दांपत्य भोजन देण्याची प्रथा आहे. निमंत्रित केलेल्या दाम्पत्यांना चौदा अनारशांचं वाण दिलं जातं. अनारसे देणे शक्य न झाल्यास चौदा पेढे किंवा लाडू द्यावेत. अनंताचा दोरक वास्तविक वर्षभर ठेवायचा असतो. परंतु शक्य नसल्यास एखाद्या चांदीच्या डबीत ठेवून ती डबी देव्हा-यात ठेऊन रोज तिला हळदीकुंकू वाहून नमस्कार करावा. पुढल्या वर्षी त्या दो-याने विसर्जन करावं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.प्रहार
September 14, 2016
श्रीस्वामी समर्थ महाराजांनी स्वत:स्थापिलेल्या या श्री नृसिंहभान देवस्थानातच भकतश्रेष्ठ चोळप्पांच्या इच्छेनुसार त्यांची समाधी झाली. आज हे स्थान समाधी मठ म्हणून ओळखल जाते. “आमचे नाव सुद्धा नरसिंहभान आहे बरे!” असे श्रीमहाराज एकास म्हणाले होते त्यामुळे पूर्वी नरसिंहभान देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या स्थानाला आज जर श्रीस्वामी समर्थ समाधी मठ म्हटले जाते, यात काही नवल नाही. धन्य ते चोळप्पा ज्यांच्या घरालगतच पूर्णसनातन परब्रह्म सगुणी विसावला.
December 25, 2023
सत्य घटना आहे ही . साधारण वीस ,बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट . भराभर पायऱ्या चढणारी मी एकदम सावध झाले . हळूच डावीकडे, उजवीकडे, पाठी मला कोणी बघत तर नाही ना ? कोणी ओळखीचे दिसले नाही, असे पाहून मी पटकन आत शिरले .
June 12, 2023
नतेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरं !नमत्सुरारिनिर्जरं
नताधिकापदुद्धरम् !!
सुरेश्वरं निधीश्वरं
गजेश्वरं गणेश्वरं !
महेश्वरं तमाश्रये
परात्परं निरंतरम् !!२!!
नतेतरातिभीकर - नत अर्थात वंदन करणारे. नतेतर अर्थात वंदन न करणारे म्हणजे अभक्त,दृष्ट, राक्षसी वृत्तीचे. त्यांच्यासाठी भीकर अर्थात भयानक असणारे ते, नतेतरातिभीकर.
नवोदितार्कभास्वर- नवोदित अर्थात नुकत्याच उगवलेल्या,अर्क अर्थात सूर्याप्रमाणे, भास्वर अर्थात तेजस्वी असणारे. नुकत्याच उगवलेल्या सूर्याप्रमाणे लाल रंग असणारे, तसा प्रकाशाचा, ज्ञानाचा, तेजाचा वर्षाव करणारे. तरीही सूर्याप्रमाणे दाहक नसलेले, प्रसन्न मनमोहक असणारे.
नमत्सुरारिनिर्जरं - सुरारी अर्थात सुरांचे म्हणजे देवांचे शत्रू, दैत्य. तर निर्जर म्हणजे देव. त्यांना कधीच जरा म्हणजे म्हातारपण येत नसल्याने त्यांना निर्जर असे म्हणतात. हे दोन्ही ज्यांना वंदन करतात ते नमत्सुरारिनिर्जर.
नताधिकापदुद्धर- विनम्र असलेल्या आपल्या भक्तांच्या मोठातल्या मोठ्या आपत्तींमधून अर्थात शास्त्रीय भाषेत या संसारदु:खातून उद्धार करणारे ते नताधिकापदुद्धर.
सुरेश्वर अर्थात सगळ्या देवांचे देव.
निधीश्वर अर्थात सर्वप्रकारच्या वैभवांचे स्वामी.
गजेश्वर अर्थात निर्गुण निराकार परब्रह्म. जे सगुण-साकार ते जग. त्याच्या विपरीत ते गज.ते निर्गुण निराकारत्व हेच मोरयाचे वैभव. त्यामुळे ते गजेश्वर
गणेश्वर अर्थात गणांचे ईश्वर. शास्त्रात व्यष्टी आणि समष्टी असे दोन स्तरांवर वर्णन असते.
व्यष्टी स्तरावर व्यक्तिगत स्वरुपात, शरीरातील विविध अवयवांच्या शक्तींना गण म्हणतात. तर समष्टी अर्थात वैश्विक पातळीवर सर्व देवी-देवतांना ईश्वर महेश्वरांना गण असे म्हणतात. या सगळ्यांवर भगवान गणेशांचा अधिकार चालत असल्याने त्यांना गणेश्वर असे म्हणतात.
महेश्वर अर्थात सगळ्यात मोठे ईश्वर. सर्वपूज्य, सर्वादिपूज्य परब्रह्म.
त्या परात्पर अर्थात श्रेष्ठाहून श्रेष्ठ भगवंताला मी निरंतर अर्थात सदैव शरण जातो. माझ्या सकल कल्याणार्थ त्यांच्या चरणांचा आश्रय घेतो.
-- -- प्रा. स्वानंद गजानन पुंड
January 2, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti