(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अमेरिकेतील ऋतुचक्र – भाग १

    पेनसिल्वेनीयातल्या पोकोनो पर्वतराजीतून जाणार्‍या, “माझ्या” यु.एस. रुट नंबर ६ वर, तीन वर्षे ये जा करता करता, नजरेस पडलेले निसर्गाचे ऋतुचक्र.

    मार्चच्या अखेरी पासून ते एप्रिलच्या सुरुवाती पर्यंत वसंताची चाहूल लागायला लागते. साठलेले बर्फाचे ढीग वितळून पाण्याचे छोटे छोटे ओहोळ उतारावरून रस्त्याच्या कडेने वाहू लागलेले असतात. बर्फाने आच्छादलेली जमीन उघडी वागडी व्हायला लागलेली असते. सुकलेल्या पाचोळ्याचा तपकिरी रंग बर्फाच्या आवरणाखालून डोकं वर काढायला लागलेला असतो; पोपडे पडलेल्या भिंतीखालचा जुना रंग दिसावा तसा. जागोजागी वितळलेल्या बर्फाखाली, सुकलेल्या गवताचे पिवळे तुकडे इतस्तत: दिसत असतात. झाडांच्या फांद्या देखील अंगावरचं बर्फ झटकून पुन्हा तरतरीत होत असतात.

    हळूहळू पिवळ्या गवतावर हिरव्या छटा चढायला लागतात. झाडांच्या बुंध्यांच्या पायथ्याशी, झुडपांच्या काटक्यांचे जंगल माजलेले असते. या उघड्या, बोडक्या, सुकलेल्या तपकिरी काटक्या, एकाएकी टोकाकडे हिरवट पिवळ्या व्हायला लागतात. काही ठिकाणी जुनाट काटक्यांच्या टोकाला नवीन पिवळ्या पोपटी नाजुक वेलांट्या उमलतात. हा पिवळा रंग अगदी डोळ्यात भरण्याएवढा गर्द असतो. आणि हे रंगायतन इतक्या अचानक होतं की काल परवापर्यंत रुक्ष, तपकिरी, वठल्यासारखी वाटणारी झुडपं, एकाएकी सजीव आणि तजेलदार दिसायला लागतात. अशातच एके दिवशी अचानक, पोपटी रंगाचे शिंतोडे पडल्यासारखी छोटी छोटी पाने अवतरतात.

    झाडांच्या टोकांच्या बारीक फांद्या लाल गुलाबी कळ्यांनी (buds) मोहरून जातात. कळ्यांनी लगडलेल्या झाडांच्या दाट गर्दीमुळे, डोंगरांवर गुलाबी छटा दिसायला लागते. गुलाबी रंगाने रंगून गेलेल्या फांद्यांची टोकं आणि झाडांच्या पायतळींच्या झुडपांचा पोपटी रंग यामुळे झाडांनी गुलाबी फेटे आणि पोपटी मोजे असा मजेशीर पोशाख केल्यासारखं वाटायला लागतं. ‘वीपींग विलो’ च्या झाडाचे लोंबणारे झुपके पोपटी होतात. सर्व झाडांमधे या झाडावर वसंताचा स्पर्श प्रथम जाणवतो. वितळलेल्या बर्फामुळे बर्‍याच झाडांचे बुंधे आणि फांद्या, शेवाळाने माखून गेलेल्या असतात.

    डोंगरकड्यांच्या दगडांच्या मधून आलेलं गवत देखील हिरवटसर व्हायला लागलेलं असतं. दगडांच्या पुढे आलेल्या टोकांखाली, जिथे थिजलेल्या बर्फाचे लोलक झाले होते, ते वितळून नुसताच पाण्याचा ओलावा राहिलेला असतो आणि त्यात शेवाळाची हिरवट झाक डोकवायला लागलेली असते.

    हळू हळू रान रंगू लागतं. रुक्ष करड्या तपकिरी रंगाचा एकसुरीपणा जाऊन, हिरव्या, पोपटी रंगाच्या विविध छटा जागो जागी दिसू लागतात. झाडांच्या फांद्यांवर पिवळ्या गुलाबी रंगाची झाक गडद होऊन किरमिजी रंगाची होते. वर्षभर हिरवे रहाणारे सूचिपर्ण वृक्ष, आपले गडद हिरवे पिसारे फुलवून, नेहमीच्याच दिमाखात उभे असतात. त्यांच्या आगे मागे, नवीन पालवी फुटणारी पानगळीची झाडं, आपल्या नव्या नवलाईचं कौतुक अंगाखांद्यावर लेवून उभी असतात. झाडांच्या या सरमिसळीकडे पाहून, पिढीजात श्रीमंतांच्या वडिलोपार्जित वाड्यांच्या आसपास, नवीनच हातात पैसे खुळखुळू लागलेल्या चाकरमान्यांनी रंगीबेरंगी अपार्टमेंट कॉम्प्लेक्स उठवावेत तसं वाटतं. म्हातार्‍या आजी आजोबांचं सुनसान घर एकदम मुला नातवंडांनी भरून जावं, लेकी सुनांनी नव्या कोर्‍या साड्या नेसून लगबग करावी आणि नातवंडांनी घरभर गोंधळ घालावा तसे डोंगर गजबजून जातात.

    एप्रिल मे मधे इथे भरपूर पाऊस पडतो. पण पाऊस आपल्या मान्सूनसारखा धुवाधार नाही. मधून मधून सरी तेवढ्या येऊन जातात. या सीझनमधे चेरी ब्लॉसम, क्रॅब अ‍ॅपल, मॅग्नोलिया, डॉगवूड वगैरे झाडांवर फुलांचा बहर येतो. या झाडांवर तोपर्यंत पानांचा मागमूस नसतो. नुसत्या फांद्या, काटक्या आणि फुलांची लयलूट ! पण हा बहर जेमतेम २-३ आठवडे टिकतो. हळू हळू फुलं सुकून पडायला लागतात आणि फुलांच्या भरगच्च संभारात जिथे जिथे मोकळी जागा होईल तिथे तिथे हिरवी पाने दिसायला लागतात. फुलांची आणि पानांची जणू रस्सीखेच सुरू असते. शेवटी हिरवाई वरचढ ठरू लागते. झाडाझुडपात दिमाखात डुलणारी फुले जमिनीवर लोळण घेऊ लागतात. पुढचे काही दिवस झाडांच्या पायतळी ह्या गळून पडलेल्या फुलांचे गालिचे पडून राहिलेले असतात. एकदा हे गालिचे वार्‍यावर उडून गेले किंवा पाचोळ्याचा भाग होऊन मातीत एकजीव होऊन गेले की सारे संपले. त्यानंतर पुढचे ५-६ महिने, नुसत्या हिरव्या पानांचा भार वागवत झाडं उभी रहातात. जणू एखाद्या करमणुकीच्या कार्यक्रमात, मोठ्या माणसांच्या आधी लहान पोराटोरांचे कार्यक्रम उरकून घेतले जावेत, तसे पानांचं साम्राज्य पसरायच्या आधी, फुलांची रंगी बेरंगी होळी उरकून घेतली जाते.

      August 3, 2015


  • संत गाडगेबाबा

    ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे आधुनिक सत्पुरुष!

    गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे, लहानाचे मोठे झाले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.

    १८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारू व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकर्‍यांना शिकविला.

    दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.

    समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यानांच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वैदर्भीय बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.

    त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.

    महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्‍या,कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्‍या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.

      December 20, 2016


  • LGBTQI जनांसाठी नवी आशा

    सुप्रीम कोर्टानें आज एक स्वागतार्ह व आशादायक गोष्ट केली , आणि ती म्हणजे ‘LGBTQI’ जनांबद्दलच्या आपल्याच आधीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यांचें ठरवलें.

      September 12, 2018


  • वारी पंढरपुरी

    विठ्ठल विठ्ठल । भक्तांची माऊली ।माय ती साऊली । पांडुरंग ।।१।। पांडुरंगा भेटी । भक्त करी वारी ।हाती झेंडा धरी । विठ्ठलाचा ।।२।।

      July 13, 2019


  • व्हिएतनाम : इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि आधुनिकतेचा अनोखा मिलाफ

    दक्षिण-पूर्व आशियातील अनेक देश पर्यटनासाठी लोकप्रिय आहेत, पण त्यापैकी व्हिएतनाम हा देश विशेष वेगळेपण घेऊन उभा आहे. येथे एकीकडे हिरवीगार भातशेती, उंचसखल डोंगररांगा, मोहक समुद्रकिनारे तर दुसरीकडे आधुनिक शहरे, गजबजलेली बाजारपेठ आणि रंगीबेरंगी संस्कृती पर्यटकांना आकर्षित करतात. भारतीय प्रवाशांसाठी व्हिएतनाम हा तुलनेने किफायतशीर, जवळचा आणि सहज व्हिसा मिळणारा देश असल्यामुळे गेल्या काही वर्षांत येथे येणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

      February 5, 2026


  • झेंडूची फुले

    माझे फुले आणि आरोग्य हे पुस्तक २००७ साली प्रकाशीत झालेले आहे. या पुस्तकातील माहीती व लोकांनी सांगितलेले अनुभव देत आहे.

      September 4, 2017


  • पाकिस्तान, पैसा आणि पचका – दौरा आता आवरा !

    पाकिस्तानमधील परिस्थिती पाहुण्या खेळाडूंनी जिवंतपणे परत घरी पोहचण्यासारखी नसल्याने पाकिस्तानमध्ये खेळायला आजकाल कोणताही आंतरराष्ट्रीय संघ तयार नसतो. त्रयस्थ भूमीवर सामने खेळविणे हा त्यावरील एक उपाय होता पण त्रयस्थ ठिकाणे ही निकाल-निश्चितीची निश्चित सुविधा असलेली ठिकाणे बनलेली आहेत. भारत सरकारने भारतीय क्रिकेट संघाला शारजामधील कोणत्याही सामन्यात सहभागी होण्यास बंदी घातली आहे ती या कारणामुळेच. (ही गोष्ट अनेकांना माहित नसेल. आठवा. शारजात आपण शेवटचे कधी खेळलो?)

      August 30, 2010


  • ।। सद्गुरु संत श्री बाळुमामा ।।

    ।। सद्गुरु संत श्री बाळुमामा ।।

    गुरुतत्त्व कधी, कुठे, कसे आणि कोणत्या स्वरुपात प्रकट होईल हे सांगता येत नाही. घरच्या बकऱ्या, मेंढ्या जंगलात चरायला नेणारा धनगर कुटुंबातील लहानगा मुलगा अंगभूत कर्तृत्वाने पुढे मोठा होऊन जगाच्या कल्याणासाठी धनगर समाजातील रूढी व अनिष्ट विकृतीच्या मार्गाने जाऊ पाहणाऱ्या समाजाला सन्मार्गावर आणले. ३ ऑक्टोबर १८९२ रोजी बेळगावनजीक चिक्कोडी तालुक्यातील “अक्कोळ” या खेडेगावात गुरुतत्त्व अवतरले. मायाप्पा-सत्यवा या पतीपत्नीचे अवघे आयुष्य समृद्ध झाले. सध्याच्या कागल-निपाणी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या “आप्पाची वाडी" या खेडेगावातील “सत्यवा” हिला बालपणपासून पंढरीच्या विठूरायाची ओढ होती. घरचे वातावरण आध्यात्मिक होते. सत्यवा नित्यनेमाने एकादाशीचे व्रत करीत असे आणि विठ्ठल भजनात दंग राहत असे. पुढे सत्यवाचा विवाह मायाप्पासोबत झाला. धनगर कुटुंबात “सून" म्हणून दाखल झालेली सत्यवा लवकरच सासरच्या रीतिभातीमध्ये रुळली आणि भैरु, बाळू आणि भीमाप्पा या तीन लेकरांना जन्मास घालून तिच्या संसाराला पूर्णत्वही देती झाली.

    थोरला आणि धाकला लेक चारचौघांसारखे असले तरी मधला बाळू मात्र त्याच्या विचित्र वर्तनाने अवतीभवतीच्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असे. मातापिता-भावंडे-गणगोत-सवंगडी अन ग्रामस्थां पासून फटकून असलेला, कुणाच्या आल्या-गेल्यात नसलेला, एकांतवास प्रिय मानणारा आणि सदोदित स्वतःमध्येच मग्न राहणारा बाळू घरच्यांसाठी आणि गावकऱ्यांसाठीही चिंतेचा विषय बनला होता. त्याला लोक खुळ म्हणायचे.

    आपला गुलगा इतर मुलांसारखा वागावा, राहावा यासाठी मायाप्पांनी त्यास गावातील चंदूलाल शेटजी जैन यांच्याकडे नोकरीस ठेवले. शेटजींच्या घरच्या बकऱ्या जंगलात चरावयास नेण्याचे काम बाळूवर सोपवण्यात आले. बाळू त्याचे काम व्यवस्थित करीत अतला तरी अनेकदा बाभळीच्या इतस्तहा पसरलेल्या झाडाची गादी करून त्यावर झोपत असे. बाभळीच्याच काटेरी जाळीदार कुंपणाला तो खुशाल टेकून बसत असे आणि इतकेच नव्हे तर त्यावर आरामात बसून “ही माझी खुर्ची आहे" असे सांगत असे. तिथून गुरुण दमदाटी करून उठवल्यास जवळच्याच एवाद्या झाडावर चढून उंच ठिकाणी बसत असे आणि "हे माझे शिखर आहे" असे सांगत असे.

    “बाळु" मधील ईश्वरी अंशाची जाणीव त्याला स्वत:ला जरी पुरेपूर असली तरी इतर कुणाला असणे निव्वळ अशक्य होते. कधी कधी मनस्वी बाळू अनाकलनीय वर्तन करीत असे. स्वतःवर आसुडाचे फटकारे मारणे, तर कधी अल्लड, खेळकर, गमत्या स्वभावाने बघ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणे यामुळे हे एकलकोंडे, मनस्वी पोर गावकऱ्यांसाठी एकाच वेळी चेष्टेचा आणि कौतुकाचाही विषय होते. चंदूलाल शेटजींच्या गोठ्यातील एका कोपऱ्यामध्ये बाळू निवांत पडून रहात असे. शेटजींनी दिलेल्या फुटक्या थाळीत जेवत असे आणि जेवून झाले की, थाळी घासून पुसून स्वच्छ करुन ठेवत असे.

    एकदा सहजच गोठ्यामध्ये गेलेल्या शेठजींच्या आईला बाळूच्या थाळीतून तेजस्वी प्रकाश परावर्तित होत असल्याचे दिसून आले. कुतूहलाने ती थाळी उचलती झाली तेव्हा थाळीच्या मध्यभागी पडलेल्या भोकातून तिला थाळीच्या पलीकडे तिच्या बस्तीचे (जैन मंदिराचे) दर्शन घडले. बाळु हा लग्न झाल्यावर सुधारेल म्हणून दरम्यान, मायाप्पा आणि सत्यावा यांनी बाळूचे लग्न लावून दिले. बाळू वरकरणी संसारात रमला असला तरीही त्याच्या अंतर्यामीचे गूज काहीतरी वेगळेच सांगत होते याचे कारण आता बाळूचा प्रवास "बाळूमामा” होण्यापर्यंतची वेळ नजीक येऊन ठेपली होती. योग्य त्या वेळी बाळूमामांना गुरुप्रात्पी झाली. श्री मुळे महाराजांच्या चरणकमलांचे दर्शन घडले आणि त्याच वेळी बाळूमामांच्या अतर्क्य- अवधूतस्वरूपी वागण्याला सांप्रदायिक शिस्तीची झालर लाभली. बाळूमामांची गुरुपरंपरा श्रीदत्त - श्रीनृसिंहसरस्वती - श्री स्वामी नारायण महाराज - श्रीमैनी महाराज (पाटगाव) आणि मुळे महाराज अशी होती. श्रीगुरुंचा अनुग्रह लाभल्यावर बाळूमामांचे आध्यात्मिक जीवन विलक्षण तेजाने झळाळून उठले. स्वस्वरूपाची ओळख झाली.

    दिवसरात्र भजनामध्ये रममाण होणे, विविध तीर्थक्षेत्री भेट देणे, अन्नदान करून भोजनाच्या पंक्ती उठवणे, दर्शनार्थींना त्यांच्या अडी अडचणींवर मार्गदर्शन करणे, नामजपाचा महिमा सर्वदूर पसरविणे भोळ्याभाबड्या भक्तांमधील अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती आणि रुढी-परंपरेमागील अवैज्ञानिक दृष्टिकोन यावर बाळूमामा लोकांना जागृत करीत असे. सामाजिक दंभाविषयी त्यांना विलक्षण तिटकारा होता. दरम्यान, बाळूमामांचे सांसारिक जीवन संपुष्टात आले. तेव्हापासून पंचक्रोशीतील गावांपासून दूर अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्र भेटीला बाळूमामा जात असे.

    बाळूमामांच्या सहज बोलण्यातून-वागण्यातून अनेक लीला घडत असे. त्यांच्या हातून कळत-नकळत घडलेल्या अनेक चमत्कारांमुळे अनेकांचे जीवन ध्यान्य झाले. कित्येकांचे आयुष्य बहरास आले. कित्येकांच्या भौतिक समस्या दुर. मात्र “जे काही घडत आहे ते सारे विधिलिखित आहे, आपण केवळ निमित्त मात्र आहोत.” असे बाळूमामा सांगत असत. त्यांनी कोणत्याही यशाचे श्रेय स्वतःकडे कधीच घेतले नाही.

    स्वच्छ धोतर, पूर्ण वाह्यांचा शर्ट, डोक्यावर रुमाल, पायात चामडी चपला, हातात धनगरी काठी, सडपातळ उंचपुरी देहयष्टी, सावळा वर्ण असलेले बाळूमामा कानडी व मराठी भाषा अस्खलीतपाणे बोलत, तर खेडूत मंडळींशी खेडवळ भाषेत बोलत असत. नीटनेटकी राहणी, गमतशीर बोलणे, भजन-कीर्तनाची आवड ही विशेष ओळख असलेले बाळूमामा प्रत्येकालाच आपलेसे वाटत. त्यांना वाचासिद्धी आणि योगसिद्धी प्राप्त होती. बाळूमामांनी त्यांच्यातील देवत्व कधी उघड केले नाही. बाह्य वर्तनावरून त्यांच्यातील सिद्ध सत्पुरुषाचा अंदाज बांधणे कठीण जात असे. माणसाने माणससारखं वागावं ही त्यांची शिकवण होती. “अखंड नामस्मरण" आणि "रामकृष्णहरी " चा जप हा साधासोपा मूलमंत्र प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये रुजविणारे संतश्रेष्ठ बाळूमामा ४ सप्टेंबर १९६६ रोजी आदमापूर येथे त्यांनी देह विसर्जित करते झाले.

    –श्री संतोष शामराव जोशी

    साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष २ रे, अंक १२ वा, (अंक २४)

      September 29, 2022


  • जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन. (‘प्रेस फ्रिडम डे’)

    दरवर्षी ३ मे हा दिवस प्रेस स्वातंत्र्य दिन किंवा जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन (‘प्रेस फ्रिडम डे’) म्हणून साजरा केला जातो.

      May 3, 2022


  • किचन क्लिनीक – बोरे

    किचन क्लिनीक – बोरे

    शबरीने श्रीरामांना स्वत: चाखून अर्पण केलेली ही बोरे श्रीरामांनी अगदी आवडीने खाल्ली होती.
    खरोखरच हि बोरे फारच रूचकर लागतात व विशेष करून उन्हाळयात मिळणारे हे रान फळ आहे.

    ह्याचा मध्यम आकाराचा वृक्ष असतो जो काटेरी असतो व त्याला छोटी छोटी काटेरी पाने असतात.

    कच्ची बोरे हि चवीला तुरट आंबट उष्ण असून ती शरीरात कफ पित्त दोष वाढवितात.तर पिकलेले बोर हे उष्ण असून वात पित्त दोष वाढवितात.

    आता हि बोरे फक्त काहीच ऋतू मध्ये उपलब्ध असल्याने ती सुकवून ठेवतात व वापरतात.

    ह्यांच देखील उपयोग घरगुती उपचारात केला जातो.कसा ते पाहुया:

    १)अंगावर पित्त उठत असल्यास व खाज येत असल्यास बोराचा रस किंवा गराची चटणी अंगावर लावावी.

    २)वारंवार तहान लागणे,घसा कोरडा पडणे,जीभ सुकणे ह्यावर पिकलेली गोड बोरे खावीत.

    ३)उमासे,कोरड्या उल्ट्या येत असल्यास बोरे खावीत.

    ४)जुलाब होणे,भुक न लागणे ह्यावर सुक्या बोराचे कढण डाळींबाचे दाणे,काळी मिरी,सैंधव घालून खावे.

    ५)वारंवार उचकी लागत असल्यास आंबट गोड बोरे खावी तसेच बोराच्या बीचे वरचे आवरण फोडून त्यातील गर उगाळून त्यात २ चमचे तुप+ १ चमचा मध घालून चाटण करून चाटावे.

    बोरे खायचा अतिरेक केल्यास पित्ताचा त्रास होतो.कच्ची बोरे तर कधीच खाऊ नये.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      December 21, 2016