जीएंची पत्रवेळा
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकयेणाऱ्या पिढीलाही जीए कळायला हवेत. काही साहित्य तुमचं भावनिक पोषण करतं. जीएंचं साहित्य त्यापैकीच एक. जीवनाच्या अनेक संचितापैकी जीएंचं असणं हे एक संचित आहे. जीएंचं साहित्य अनेकांच्या दृष्टीने मुदतठेव आहे, ज्याच्यामुळे आपलं आयुष्य सुखद आहे. भावणारे साहित्य लिहिणे आपल्या आवाक्यात जरी नसले तरी वाचण्यात व ऐकण्यात ते आपलंच असतं. माणसं येतात आणि जातात पण त्यांचं साहित्य मनात घर करतं. मनात घर करणाऱ्या गोष्टीच मनात तग धरतात. शब्दांच्यापलीकडे गेल्यानंतरच जीएंचं साहित्य व त्यातील सौंदर्य कळतं. काही गोष्टींची अनुभूती घ्यायची असते. काही गोष्टी फक्त जगायच्या असतात. जीएंचं साहित्य या प्रकारात मोडतं. माणसे जाताना केवळ आठवण मागे ठेवून जात नाहीत, तर विचार मागे ठेवून जातात, अस्तित्व मागे ठेवून जातात. माणसाला मरण असतं, विचारांना मरण नसतं. त्यांच्या साहित्यानं दुःखं सहन करण्याची प्रतिकारशक्ती वाढविली आहे, अनेक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. अनेकांना जगण्याची उमेद दिली आहे, वास्तवाची जाण करून दिली आहे. जीए म्हणजे एक साहित्यातलं अस्वस्थ करणारं नाव. अस्वस्थ साहित्य मनाला चटका लावतं, चिरकाल स्मरणात राहातं. पु.ल., वि. वा., जी. ए. हे साहित्यातील दीपस्तंभ आहेत. दुर्बोधतेततही जसा ग्रेस असतो तसं अस्वस्थतेत जीए असतात.