जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
पूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत पंजाबी, बंगाली व हिंदी भाषिक संगीतकारांची मांदियाळी असताना वसंत देसाईंचा सन्माननीय अपवाद वगळता बहुसंख्य मराठी संगीतकारांनी इंग्रजी आद्याक्षरांचा आसरा घेत मराठीपण लपविण्याचा प्रयत्न केला. के. दत्ता (कोरगावकर) सी. रामचंद्र (चितळकर) दत्ताराम(वाडकर), सुधीर (फडके) यांसारख्या मराठमोळ्या संगीतकारांनी आपली आडनावे खुबीने लपवीत या क्षेत्रात मुसंडी मारली. संगीतकार श्रीनिवास खळे यांनी के. दत्ता यांच्याकडे सहाय्यक संगीत दिग्दर्शकाचे काम केले होते. १९५४ साली के.दत्ता यांनी संगीत दिलेल्या 'रिश्ता' या चित्रपटातही लता मंगेशकर यांचे साजन से पहली बार, व तलत मेहमूद यांनी गायलेले 'वोही चांदनी है' ही गाणी त्या काळी गाजलेली होती. मा.के.दत्ता यांनी अनेक हिन्दी व मराठी चित्रपटाना संगीत दिले. काही चित्रपट, याद, बडी माँ, दामन, नादान, रिश्ता, चंद्रराव मोरे, सुखाचा शोध, गीता, गोरखनाथ, गोरा कुंभार, सूनबाई, महात्मा विदूर, हरिहर भक्ती, रायगडचा बंदी मा.के.दत्ता यांचे २३ डिसेंबर १९७९ रोजी निधन झाले.
संगीतकार दत्ता कोरगावकर उर्फ के.दत्ता यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
संगीतकार दत्ता कोरगावकर उर्फ के.दत्ता (7-Jan-2017)
संगीतकार दत्ता कोरगावकर उर्फ के.दत्ता (26-Dec-2017)
पोलीस कचेरीतील कारकुनाची नोकरी १९५० मध्ये सोडून देऊन पिराजीरावांनी पूर्ण वेळ शाहिरीला वाहून घेतले. छ. शहाजी महाराजांनी त्यांना ‘शाहीर विशारद’ हा किताब व तहहयात मानधन दिले.
असे हे आमचे गोविंद काका. बाबांना दिलेल्या शपथेला ध्यानात ठेऊन गोविंदकाकांचे कार्य आजही अविरत सुरु आहे. म्हणूनच लोक बिरादरीच्या सर्वात जुन्या कार्यकर्त्याला म्हणजेच आमच्या गोविंदकाकांना ‘बिरादरी’ चा सलाम!!
व्ही. शांताराम यांचे बंधू व छायालेखक व्ही. अवधूत यांच्या त्या मेहुणी. असे म्हणतात अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचे नाव तिच्या नावावरुन ठेवले होते. १९५८ साली आपले नाव कामिनी कदम करून हिंदी चित्रपट सृष्टीत तलाक या चित्रपटाद्वारे प्रवेश केला.
आंतरराष्ट्रीय पातळीवर भरवल्या जाणाऱ्या कोणत्याही स्पर्धा असोत, या स्पर्धामध्ये सर्वाधिक आकर्षणाचा आणि थरारकतेचा कोणता भाग असेल तर तो अॅथलेटिक्स आणि जिम्नॅस्टिक्सचा! अॅथलेटिक्समध्ये तर अगदी ‘पळा पळा कोण पळे पुढे तो’ अशी चुरस आणि त्यामागे असणारी जिद्द यांचे प्रदर्शन असते. गुआँगझूमध्ये सध्या चालू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये अॅथलेटिक्समध्ये दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रीजा श्रीधरन आणि कविता राऊत या दोघींनी पाठोपाठ येऊन अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवले.
प्रीजा श्रीधरन हिने ही स्पर्धा ३१ मिनिटे आणि ५०.४७ सेकंदांमध्ये जिंकली. तिच्यामागे अगदी सूतभरावरच असणारी कविता दुसरी आली आणि ती रौप्य पदकाची मानकरी ठरली. तिने हे अंतर ३१ मिनिटे आणि ५१.४४ सेकंदांत पार केले. म्हणजेच एका सेकंदापेक्षाही कमी वेळाने ती मागे पडली. कविताचा ही सर्वोत्तम वेळ आहे, असे म्हटले पाहिजे. गेल्याच महिन्यामध्ये नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत तिला एवढय़ाच अंतरासाठी ३३ मिनिटे आणि ५.२८ सेकंद एवढा वेळ लागला होता. त्या स्पर्धेत तिला कांस्यपदक मिळाले होते. त्या तिच्या यशाविषयी ‘लोकसत्ता’ने ‘सावरपाडय़ाची कविता’ हा अग्रलेख (११ ऑक्टोबर) लिहिला होता. प्रीजा आणि कविता यांच्यात पहिला आणि दुसरा क्रमांक हा अक्षरश: ‘फोटोफिनिश’ने ठरवण्यात आला. प्रीजाला सुवर्णपदक मिळाले आणि आपल्याला ते मिळाले नाही म्हणून कविताला नक्कीच वाईट वाटलेले नाही. प्रीजा श्रीधरन ही केरळची मुलगी. तिचा जन्म १३ मार्च १९८२ रोजी इडुक्की जिल्हय़ात मुल्लकाणममध्ये झाला. २००६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ती पाच हजार आणि दहा हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत पाचवी आली होती. थोडक्यात तिचे पदक हुकले होते. २००७ च्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत मात्र तिने रौप्यपदक मिळवले होते. २००८ च्या बीजिंग ऑलिंपिक स्पर्धेत ती पात्र ठरली, पण प्रत्यक्ष तिचा क्रमांक पंचविसावा आला होता. गुआँगझूमध्ये तिचा धावण्याचा वेग हा तिचा विक्रमी आहे, असे म्हटले तरी चालेल. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दहा हजार मीटर धावण्यासाठी तिने ३२ मिनिटे आणि ४९.४७ सेकंद एवढा वेळ घेतला होता. ती तिची सर्वोत्तम वेळ होय. राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत प्रीजा तापाने फणफणली होती. त्यामुळे तिला स्पर्धेपासून दूर राहावे लागले होते. आपल्या यशाचे श्रेय ती आपल्या आईला देते. तिच्या वडिलांच्या निधनानंतर तिला तिच्या आईने अगदी तळहातावरल्या फोडाप्रमाणे जपले होते. तिला एक भाऊ आहे आणि आई हे तिचे सर्वस्व आहे. तिने आपले पदक आई आणि तिचा भाऊ यांना अर्पण केले आहे. तिची आई आजही दुसऱ्यांच्या घरी काम करून आपला संसार चालवते. सुधा सिंग ही दुसरी सुवर्णपदक विजेती! अडथळय़ांच्या स्पर्धेत तिने तीन हजार मीटरसाठी नऊ मिनिटे आणि ५५.६७ सेकंद एवढा वेळ घेतला. गुआँगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत तिला मिळालेले यश हे अनपेक्षित आहे, असे तिनेच म्हटले आहे. या स्पर्धेतल्या चिनी स्पर्धकांमुळे आपल्या मनावर प्रचंड दडपण होते, असे ती म्हणाली आहे. सुधा ही उत्तर प्रदेशातल्या रायबरेलीची कन्या होय. तिने या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले असले तरी आपल्याबद्दल खेळाडूंची उपेक्षा वृत्ती आपल्याला बोचत होती, असे तिचे म्हणणे आहे. कदाचित त्यामुळेच तिला या यशाचे अप्रूप वाटत असले पाहिजे. शेवटच्या चारशे मीटरमध्ये तिने ही बाजी मारली, अन्यथा तिचे पदक हुकण्याचीच शक्यता होती. कविता राऊत ही महाराष्ट्राची कन्या. तिचे वडील वनखात्यात कामाला आहेत. ती आदिवासी भागातून आलेली आहे. तीही गरिबाघरची लेक आहे. घराची जमीन शेणाने सारवण्यापासूनची सर्व कामे तिने केलेली आहेत आणि आताही ती करताना तिला ओशाळवाणे वाटणार नाही. नाशिक जिल्हय़ात हरसूल तालुक्यातील सावरपाडा या गावची ही कन्या. दहावीस किलोमीटर पाण्यासाठी वणवण करायची सवय असलेली ही मुलगी एवढय़ा मोठय़ा स्पर्धेत यशस्वी होईल, अशी महिन्याभरापूर्वी कुणी अपेक्षाही केली नसती. पण तिच्या पदरी राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेचे यश होते. तिला मिळालेले कांस्यपदक तिला अधिक उंची गाठण्यासाठी खुणावत होते! ५ मे १९८५ रोजी जन्मलेली कविता लागोपाठच्या दोन महिन्यांत दोन पदकांची मानकरी ठरली आहे आणि याच क्रमाने पाहिले तर या तिघी २०१२ मध्ये लंडनला होणाऱ्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत यशस्वी होतील, अशी आशा करायला हरकत नाही. या तिघींमधला एक समान दुवा हा, की त्या सामान्य परिस्थितीतून पुढे आल्या आणि त्या ग्रामीण भागात वाढल्या आहेत. त्या जिंकतील आणि त्यांनी जिंकावे यासाठी अर्थातच समाजाने आणि सरकारने त्यांची जिद्द टिकावी यासाठी प्रयत्न करायला हवेत. सरकारने त्यांना आतापासूनच धावण्यायोग्य वातावरण निर्माण केले तरी खूपच साहय़ होईल.
-----------------------------------------------
राऊत, कविता
सावरपाडा एक्स्प्रेस अर्थात कविता राऊत. भारताचा तिरंगा जागतिक स्तरावर रोवणा-या कविताने हे सारं अल्पावधीत कमावलेलं नाही. कित्येक वर्षांची तपश्चर्या यामागे आहे. धावणं तिच्या नसानसात आहे. तिने लहानपणासूनच काही गोष्टी ठरवून ठेवलेल्या होत्या. त्याप्रमाणेच तिची पावलं पडताहेत. पायाला भिंगरी लावून पळणारी कविता घरात मात्र अतिशय शांत आहे... सांगताहेत रामदास काशिनाथ राऊत.
मला आजही ते दिवस लख्खपणे आठवताहेत. तेव्हा कविता ठाणापाडा आश्रमशाळेत होती. सणाच्या दिवशीही तिचं दर्शन आम्हाला दुर्लभ होतं. एकुलत्या एका मुलीसाठी मी डब्यात काही गोडधोड घेऊन जात असे. मी पोहोचलो की ती डबा उघडण्याआधी सुमित्राची, तिच्या आईची चौकशी करीत असे. त्यावेळी डोळे भरून यायचे. घरी असल्यावर कविता हाताला धरून शेतात जात असे. तिने लहानपणी कधीही उचलून घेण्याचा हट्ट केला नाही की तालुक्याच्या गावी बाजारला जाताना पायी चालण्याचा कंटाळा केला नाही. त्यातूनच की काय तिला भविष्य खुणावताना दिसलं असावं. झोळीतून उतरल्यावर बोट धरून चालायला ती शिकली असेल, पण आज सगळ्या जगाच्या पुढे पळूनही तिने माझं बोट सोडलेलं नाही. खेळता खेळता कविता कधी मोठी झाली ते कळलंच नाही. शाळेसाठी स्वत: तयारी करताना ना दप्तर ना खाऊसाठी पैसे. तिला परिस्थितीची जाणीव होती. सात किलोमीटर अनवाणी शाळेत जाणं, लहान भावांचा सांभाळ करून घरातील सर्व कामं करणं हे सारं ती प्रेमानं करायची. तिने कोणत्याही कामाला कधी नाक मुरडलं नाही. ठाणापाडा आश्रमात दाखल झाल्यावर तिचं जग आश्रमापुरतंच मर्यादित राहिलं. तिने हरसुल किंवा इतर तालुक्याचं ठिकाण कधी पाहिलं नाही. या आश्रमशाळेत प्रवेश घेतल्यानंतर ननाशी येथे प्रथमच १०० मीटरमध्ये विभागीय पातळीवर तिने प्रथम क्रमांक पटकावला. हे तिचं पहिलंवहिलं घसघशीत यश, त्यानंतर मात्र आयुष्यात तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही.
ठाणापाडा आश्रमशाळेत मुख्याध्यापक खंडु भोये यांनी तिला प्रत्येक स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केलं. पुढे कविताने सातवीसाठी हरसूल केबीएच विद्यालयात प्रवेश घेतला. येथे तिने पुन्हा प्रशिक्षक केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णपदकाची कमाई करून शाळेचं नाव उंचावलं. सुटीमध्ये घरी आल्यावर कविता विहिरीवर पाणी आणण्यास स्वत: जात असे. यशाची हवा तिच्या डोक्यात कधीच गेली नाही. तिचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले. ती सुमित्राला स्वयंपाकातही मदत करत असे. घरकामाला तिने कधी नाही म्हटलं नाही. यावरून मला एक आठवण झाली, कविताला स्वयंपाकाचं खूप वेड आहे. स्वयंपाकघरात लुडबुड करायलाही तिला आवडत असे. एकदा तिच्यावर जबाबदारी सोपवून सुमित्रा बाहेर गेली होती. चुलीवर डाळ शिजत ठेवलेली, पण लक्षात न राहून कविता खेळायला निघून गेली. इकडे डाळीचा कोळसा झाला. घरी आल्यावर सुमित्राने तिला खुप सुनावलं परंतु कविताने हूं की चू न करता सर्व ऐकून घेतलं. चूक झाल्यावर ती स्वीकाराणं हा तिचा गुण आहे. त्यानंतर मात्र कविताने पुन्हा अशी चूक कधीच केली नाही. एका वेळी एकच काम हा खाक्या तेव्हापासून तिने स्वीकारला.
विश्व हिंदु परिषदेच्या वसतीगृहात प्रवेश घेतल्यावर तिथल्या महिला व्यवस्थापक त्रैलोक्य यांनी कविताला पुढे जाण्यास मदत केली. या शाळेतर्फे कविता एका विभागीय स्पर्धेत सहभागी झाली. मात्र, योग्य प्रशिक्षण नसल्याने तिला या स्पर्धेच्या दोन दिवस आधी स्पोर्टस् ऑथॉरिटी ऑफ इंडिया(साई)च्या नाशिक केंद्रात आणलं गेलं. त्या स्पर्धेत कविताने एक पदक तर मिळवलंच पण तिला या केंद्राचे प्रशिक्षक विजेंदरसिंग यांच्या रूपाने गुरूही लाभले. तत्पूर्वी पुरेसं प्रशिक्षण नसतानाही तिने बंगलोरला झालेल्या शालेय स्तरावरील राष्ट्रीय स्पधेर्त एक सुवर्ण आणि एक कांस्यपदकाची कमाई केली होती. कविता मला नेहमी विचारायची की, बाबा मला मोठ्या स्पर्धेत कधी भाग घ्यायला मिळेल. तिची ही आकांक्षा लवकरच पूर्ण होणार होती.
भोसला मिलिटरी कॉलेजला गेल्यावर तेथे शहराच्या चमचमत्या विश्वात ही हरवून जाईल असं वाटलं होतं, मात्र तसं झालं नाही. तिला तिथे विजेंदर सिंग यांच्यासारखे प्रशिक्षक भेटले आणि तिचं आयुष्यच उजळून गेलं. विजेंदर तिचे प्रशिक्षकच नाही तर तिचे पालकही झाले. कविताच्या धावण्यात दम आहे, हे लक्षात आल्यावर विजेंदसिंग यांनी तिच्यावर लक्ष केंद्रित केलं. प्रारंभीच्या काळात शनिवार सायंकाळ ते सोमवार सकाळ या काळात प्रशिक्षणासाठी कविता हरसूलहून नाशिक गाठत असे, पण हे अवघड होऊ लागल्यावर तिला नाशिकच्या 'भोसला'मध्ये प्रवेश देऊन विजेंदरसिंग यांनी स्वत:च्या घरीच कविताच्या राहण्याची सोय केली. ती आज यशस्वीतेच्या शिखरावर आहे, त्यामागे विजेंदर यांचा हा पाठिंबा आहे. राष्ट्रकुल स्पर्धा गाजवण्यासाठी गेलेली कविता आम्हाला तब्बल तीन वर्षांनी दिसली. सरावासाठी ती बेंगलोरला होती त्यावेळी आम्ही केवळ मोबाइलवर संपर्क साधायचो. सुमित्राचे डोळे नेहमी तिच्या आठवणीने ओले व्हायचे. मी तिची समजू्त काढायचो. आपली मुलगी देशासाठी खेळतेय, तिला असं भावनेत अडकवू नको, असं तिला सांगायचो. मात्र एकांतात असल्यावर मलाही तिची फार आठवण यायची. लहानपणचे सारे दिवस डोळ्यात गोळा व्हायचे. त्यावेळी कधी वाटायचं, तिला म्हणावं 'कविता सारं सोडून दे बेटा अन् निघून ये परत', पण मग माझ्यातील पित्यापेक्षा माझ्यातील समाजसेवक प्रभावी ठरायचा. सुमित्राचा जीव मात्र वरखाली होत असे. मी तिला म्हणायचो की, हे दिवस लवकरच जातील. राष्ट्रकुलच्या वेळी कविताला खेळताना पाहण्याची हरसूलच्या ग्रामस्थांची फार इच्छा होती. त्यासाठी नितीन देवरगावकर यांनी लाइव्ह सोय करून दिली. तिचं यश पाहून गावकर्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि मी भरून पावलो. कविताच्या यशामागे तिच्या मेहनतीबरोबरच तिच्या आईचा त्यागही आहे. सावरपाडा येथे आई एकटीच राहते. लहान भाऊ शिक्षणासाठी बाहेर, वडील नोकरीनिमित बाहेर. आई शेतामध्ये एकटीच राबते म्हणून मला तिने राजीनामा देण्यास सांगितलं. तिचा तो हट्टाचा निर्णय ऐकून ती माझी मुलगी नाही तर मुलगाच आहे असं वाटलं. वाटलं, आता कविता खर्या अर्थाने मोठी झाली आहे. जेव्हा तिच्या लग्नाची गोष्ट येते तेव्हा वाटतं की तिनं लग्न तर करायला हवं, पण आम्ही तो निर्णय तिच्यावर सोपवला आहे. आम्ही तिच्या भावना समजू शकतो. ती म्हणते की, 'भारतासाठी मला मेडल आणायचंय. लग्न वगैरे नंतर करू. मी राष्ट्रकुलनंतर ऑलम्पिकमध्ये तिरंगा फडकवला तर मला लग्नापेक्षा अधिक आनंद होईल.' कविताच्या या विचारांचा मला अभिमान वाटतो.
शेख, फैयाज
काही व्यक्तींच्या अंगी चतुरस्र गुण असूनही त्यांना त्यांच्या योग्यतेचे दान पदरी पडायला उशीर लागतो. ज्येष्ठ अभिनेत्री फैय्याज शेख या अशांपैकीच एक! उत्तम गाणे, रूपसंपदा, अभिनय हे सर्व असूनही त्यांच्या या गुणसंपन्नतेचे म्हणावे तितके चीज झाले नाही.
आपण उत्तम गायिका-अभिनेत्री असूनही बऱ्याचदा आपल्या वाटय़ाला बदलीच भूमिका आल्या, याबद्दलची खंत त्यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात व्यक्त केली होती. नुकताच त्यांना महाराष्ट्र शासनाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मिळाला आणि त्यांच्या प्रदीर्घ कलासेवेची उशिरा का होईना, यथोचित दखल घेतली गेली. सोलापूरमध्ये आपल्या नाटय़कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या फैय्याज यांनी ‘गीत गायिले आसवांनी’ या नाटय़संपदेचे भावंड असलेल्या विजयश्री प्रॉडक्शनच्या नाटकाद्वारे मुंबईच्या नाटय़सृष्टीत पदार्पण केले. ‘अश्रूंची झाली फुले’, ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘मत्स्यगंधा’, ‘होनाजी बाळा’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘वेडय़ाचं घर उन्हात’, ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘गुंतता हृदय हे’, ‘पेइंग गेस्ट’ ते अलीकडच्या ‘मित्र’पर्यंत त्यांनी निरनिराळ्या पिढीतल्या आणि वेगवेगळ्या स्कूल्सच्या लेखक-दिग्दर्शकांकडे वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. संगीत नाटके, सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक, विनोदी अशा सर्वच प्रकारच्या नाटकांतून त्यांनी काम केल्याने त्यांच्यावर एकच एक असा कोणताच शिक्का बसला नाही. गाण्यातही त्यांनी गजल, ठुमरी, लावणी, नाटय़संगीत असा चौफेर प्रवास केला. गायिका बेगम अख्तर यांच्या गंडाबंद शागीर्द बनण्याची संधी त्यांना चालून आली होती. परंतु त्यावेळी त्यांची नाटय़-कारकीर्द ऐन बहरात असल्याने ती सोडून लखनौला बेगम अख्तरांकडे गाणे शिकायला जाणे त्यांना शक्य झाले नाही. मात्र जेव्हा जेव्हा त्या मुंबईत येत त्यावेळी फैय्याज यांना गाणे शिकवीत. ‘कटय़ार’मधील झरिना तसेच ‘वीज म्हणाली धरतीला’तील जुलेखा या भूमिकांवर तर त्यांनी आपली अमीट नाममुद्रा उमटवली होती. ‘गुंतता हृदय हे’मध्ये कल्याणी साकारणाऱ्या फैय्याज यांनी ‘महानंदा’ चित्रपटात मानूची भूमिका तितक्याच ताकदीने जिवंत केली होती. यातून त्यांच्या अभिनयाची रेंज कळून येते. त्यांना डबिंग मास्टरही म्हटले जाई. ‘जाणता राजा’मध्ये त्यांनी गाणे व निवेदन केले आहे. दादा कोंडके यांच्या ‘विच्छा’मध्ये साडेसातशे प्रयोगांत त्यांनी गाणी गायिली. ‘महानंदा’, ‘पैंजण’, ‘वजीर’, ‘दायरे’, ‘एक उनाड दिवस’ असे चित्रपटही त्यांनी केले. सी. रामचंद्र, वसंत देसाई, जयदेव, मदनमोहन, एस. डी. व आर. डी. बर्मन यांसारख्या संगीतकारांकडेही त्या गाणी गायल्या. पं. सी. आर. व्यास यांच्याकडे गाणे शिकलेल्या फैय्याजना पं. जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे यांच्यासोबत केलेल्या नाटकांमुळे त्यांच्याकडूनही भरपूर शिकायला मिळाले. पुलंबरोबरही त्यांनी ‘वटवट’मध्ये काम केले होते. या सगळ्या वाटचालीत त्यांना अनेक मानसन्मानही मिळाले. जुन्या-नव्या सर्वच पिढय़ांमध्ये सहजपणे मिसळणाऱ्या फैय्याज अजातशत्रू राहिल्या. आजही त्या त्याच तडफेने कलाक्षेत्रात कार्यरत आहेत.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नाव फैयाज शेख पण महाराष्ट्रातल्या कोणत्याही घरात सहजपणे सामावून जाईल, असे व्यक्तिमत्त्व. मोठे डोळे आणि चेहऱ्यावर कायमचे स्मित. गळा अतिशय सुरेल. गायक कलावंत म्हणूनच कारकीर्द गाजावयाची. पण कलावंत म्हणूनच सतत रंगभूमीवर उभे राहण्याचे भाग्य मिळाले. फैयाज हे नाव कुणाही मराठी माणसाने उच्चारले तरी डोळ्यासमोर ‘कटय़ार काळजात घुसली’ मधील झरीनाच उभी राहणार. या कलावतीला मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार घोषित होणे,
ही मराठी रंगभूमीसाठी आनंदाची बातमी ठरली. गद्य आणि संगीत नाटकांत तेवढय़ाच तडफेने भूमिका साकारणाऱ्या फैयाज यांची रंगभूमीवरील कारकीर्द साडेचार दशकांची आहे. १९६५ मध्ये त्यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवले. आजही त्या रंगभूमीवर अधूनमधून दर्शन देत असतात. या काळात त्यांनी केलेल्या एकूण प्रयोगांची संख्या चार हजारांच्या घरात जाणारी आहे. दौरे आणि कार्यक्रमांनी न थकणाऱ्या मोजक्या कलावंतांपैकी त्या आहेत. कटय़ार काळजात घुसली, हे त्यांचे गाजलेले नाटक तसेच ‘तो मी नव्हेच’, ‘अश्रुंची झाली फुले’, ‘मत्स्यगंधा’, ‘संशयकल्लोळ’ या नाटकातील त्यांच्या भूमिका स्मरणात राहणाऱ्या ठरल्या. ‘महानंदा’ या चित्रपटातील त्यांची प्रमुख भूमिका रसिकांच्या मनात घर करून राहिली आहे. किनारा, वादळ वारं, पेइंग गेस्ट, थँक्यू मिस्टर ग्लाड, सूर राहू दे, मी मालक या देहाचा, अंधार माझा सोबती, गुंतता हृदय हे, भटाला दिली ओसरी, वीज म्हणाली धरतीला, मैत्र अशा नाटकांमधील तर बावनखणी, संत तुकाराम, पंडितराज जगन्नाथ, होनाजी बाळा, संत गोरा कुंभार या संगीत नाटकांतील त्यांचे काम रसिकांना भावले. बालगंधर्वासारख्या संगीत सम्राटाने रंगभूमीला जो अभिजाततेचा दर्जा दिला, तो टिकवून ठेवण्यासाठी आजही जे प्रयत्न होत आहेत, त्यामध्ये फैयाज यांचाही वाटा आहे. आपल्या गळ्याने रसिकांवर मोहिनी घालणाऱ्या अभिनेत्रींपैकी त्या एक आहेत. संगीत रंगभूमीला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी केलेली कामगिरीही महत्त्वाचीच म्हटली पाहिजे. रंगभूमीवर स्त्रियांनी काम करण्यास समाजाने मान्यता देण्यास विसावे शतक उजाडावे लागले. कमलाबाई गोखले, कमळाबाई बडोदेकर यांच्यासारख्या कलावंतांनी रंगभूमीवर भूमिका करून जी सांस्कृतिक क्रांती केली, त्यामुळे तर नंतरच्या काळात महिलांना जीवनाच्या इतर प्रांतातही प्रवेश करणे सुलभ झाले. हिराबाई बडोदेकरांनी संगीत रंगभूमीवर संशयकल्लोळ या नाटकात पहिल्यांदा अभिजात संगीताचा आविष्कार केला. त्यानंतरच्या काळात स्त्रियांना संगीताच्या मैफलीत मध्यभागी बसून गायन सादर करण्याची समाजमान्यता मिळाली. हिराबाईंनी केलेल्या या क्रांतीला सगळ्याच कलावंतांनी सादर प्रणाम केला पाहिजे. फैयाज या अशा देदीप्यमान परंपरेशी आपले नाते सांगणाऱ्या कलावती आहेत. संगीत रंगभूमीवर काम करत असतानाच त्यांनी पाश्र्वगायनाच्या क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या आणि रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलेल्या वसंत सबनीसांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाटय़ासाठी आणि ‘जाणता राजा’ या महानाटय़ासाठी फैयाज यांनी पाश्र्वगायन केले होते. पाठराखीण आणि घरकुल या मराठी आणि बावर्ची, प्रेमपर्वत, अचानक, रंगबिरंगी, आलाप, गुंबीश, कलयुग का कृष्ण, धरतीपुत्र यांसारख्या हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गायलेली गीतेही रसिकमान्य झाली. एचएमव्हीने त्यांनी गायलेल्या ‘हुस्नेगजल’ या ध्वनिमुद्रिकेलाही रसिकांनी पसंतीची पावती दिली. कविवर्य ग. दि. माडगूळकर यांच्या ‘जोगिया’ या काव्यसंग्रहातील कवितांचे संगीतकार सी. रामचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले वाचन तर रसिक आजही आठवतात. सोलापूरचे पंचवाडकरबुवा यांच्याकडे संगीताचे शिक्षण सुरू केल्यानंतर पं. सी. आर. व्यास, पं. जितेंद्र अभिषेकी, वसंतराव कुळकर्णी, बेगम अख्तर यांच्याकडून त्यांना संगीताचे धडे मिळाले. मराठी रंगभूमीवर आपल्या कलेने रसिकांना सतत आनंद देणाऱ्या या कलावतीचे मनापासून अभिनंदन!
------------------------------------------------------------------------------------------------------
ज्येष्ठ गायिका अभिनेत्री फैयाज
सांगलीचा मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार नुकताच ज्येष्ठ गायिका अभिनेत्री फैयाज यांना जाहीर झाला आहे. त्यानिमित्
ताने या गुणी अभिनेत्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला वेध...
वीज म्हणाली धरतीला नाटकात जुलेखाची भूमिका करणा - या फैयाजबाईंच्या तोंडी एक गाणं होतं-
चार होत्या पक्षिणी त्या रात्र होती वादळी
चार स्वप्ने बांधणारी एक होती साखळी...
मात्र या चार पक्षिणींमधली एक राजहंसी होती, तर दोघी हंसी होत्या, चौथीला मात्र आपण कोण तेच ठाऊक नव्हतं. ती तना-मनाने त्यांच्याबरोबर होती. पण तोपर्यंत तिला आपल्या अस्तित्त्वाची ओळखच झालेली नव्हती. ती स्वत:ला त्यांची सावलीच समजत असे. अन् एके दिवशी अकल्पित घडतं...
बाण आला तो कोठुनी, जायबंदी हो गळा
सावलीला जाण आली, जात माझी कोकिळा...
फैयाजबाईंची कथा यापेक्षा वेगळी नाही. फरक एवढाच होता की, गाण्यातल्या कोकिळेला स्वत:ची जात शेवटपर्यंत कळली नव्हती. फैयाजबाईंना मात्र आपली कोकिळेची जात कधीच कळली होती. पण त्यांच्या आजुबाजूला कावळ्यांचा जमाव एवढा मोठा होता की, त्यांनी त्या कोकिळेला ऐन उमेदीत स्वतंत्रपणे गाण्याचं-उडण्याचं स्वातंत्र्य कधी दिलंच नाही.
वयाच्या अवघ्या सोळाव्या वषीर् फैयाजबाई मुंबईत आल्या. हैदराबादजवळ वरंगळला असलेली बाईंच्या वडिलांची चादरीची फॅक्टरी बंद पडली आणि कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी त्या सोलापूरहून मुंबईत आल्या. अभिनयाची उत्तम जाण आणि गाण्या-नृत्याची आवड हेच त्यांच्याजवळचं तेव्हा भांडवल होतं. त्या भांडवलावरतीच 'नाट्यसंपदा' या नाट्यसंस्थेने बाईंना पाचशे रुपयांच्या नोकरीवर बांधून घेतलं. बाई पगारातले चारशे रुपये गावी पाठवायच्या आणि शंभर रुपयात कसंबसं स्वत:चं भागवायच्या. बाईंची हीच नड 'नाट्यसंपदा'ने नेमकी हेरली आणि तब्बल पंधरा वर्ष बाईंना आपल्याच कंपूत अडकवून ठेवलं. मात्र, एवढ्या वर्षांत 'कट्यार काळजात घुसली'मधील झरिना, 'अश्रूंची झाली फुले'मधील नीलम अशा दोन-तीन महत्त्वाच्या भूमिका सोडल्या, तर बाईंना कुठल्याच फ्रेश भूमिका मिळाल्या नाहीत. पंधरा वर्षं त्यांना केवळ रिप्लेसमेंटच्या भूमिकाच दिल्या गेल्या.
मात्र, कोंबडं झाकलं, तरी सूर्य उगवायचा राहात नाही, याच न्यायाने फैयाजबाईंचा उदयकाळ व्हायचा राहिला नाही. त्यांच्या अभिनयगुणाची, गानकौशल्याची झलक दाखवण्यासाठी 'कट्यार'सारखं नाटक पुरेसं होतं. आणि बाईंनी या संधीचं सोनं केलं. यातल्या त्यांच्या झरिनाच्या भूमिकेचं आणि गाण्यांचं पं. रविशंकर, जयदेव, कुमार गंधर्व, सी. रामचंद अशा बड्या मंडळींनी दिलखुलास कौतुक केलं. अर्थात याचं श्रेय फैयाजबाईंनी कायम नाटकात खाँसाहेबांचं काम करणाऱ्या वसंतराव देशपांडे आणि नाटकाला संगीत देणाऱ्या पंडित जितेंद अभिषेकीबुवांनाच दिलं आहे. कारण त्यांच्यामुळेच ही नामवंत मंडळी नाटक बघायला आलेली होती.
पण या नाटकाने फैयाजबाईंचा जणू पुनर्जन्म झाला. तब्बल सतरा वर्षं या नाटकाचे अखंड प्रयोग सुरू होते. वसंतराव देशपांडेंचं निधन झालं, तेव्हाच त्याचे प्रयोग थांबले. पण तोपर्यंत मराठी व्यावसायिक रंगभूमीला आणि उतरती कळा लागलेल्या संगीत रंगभूमीला एक गुणवान गायक अभिनेत्री गवसली होती. त्यामुळेच नंतरच्या काळात फैयाजबाईंना त्यांच्या गाण्याचा कस लागेल, अशी वीज म्हणाली धरतीला, संत गोरा कुंभार, राजहंसी प्रीत अशी एकाहून एक सरस नाटकं मिळाली आणि बाईंनी वेळोवेळी आपलं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध केलं.
झरिनाच्या भूमिकेत त्यांनी दाखवलेल्या गाण्याच्या तयारीमुळे आणि त्यांच्या खास पत्तीदार आवाजामुळेच जयदेव, सी. रामचंद यांनी त्यांच्याकडून काही गाणी गाऊन घेतली. सी. रामचंदांनी तर ग. दि. माडगूळकरांना 'गीत गोपाल'ची निमिर्ती करायला सांगून त्यातही बाईंकडून काही गाणी गाऊन घेतली. परंतु गीत रामायणाच्या प्रभावळीत 'गीत गोपाल' झाकोळलं गेलं.
अर्थात, गाणं हे काही बाईंचं करियर नव्हतं. पण त्यांच्या विशिष्ट आवाजामुळे त्यांनी गाण्यातच करियर करावं, असं अनेकांना वाटायचं. त्यापैकीच एक म्हणजे ठुमरी-गझलसम्राज्ञी बेगम अख्तर. अख्तरीबाईंशी फैयाज यांची भेट वसंतराव देशपांडे यांनीच घडवली. मात्र या भेटीचं रूपांतर आपुलकीच्या नात्यात कधी झालं, ते फैयाज आणि अख्तरीबाईंनाही कळलं नाही. नंतर बेगम अख्तर जेव्हा जेव्हा मुंबईत येत, तेव्हा तेव्हा फैयाजबाईंना बोलावून घेत. आपल्या कार्यक्रमात त्यांना साथीला बसवत. आज फैयाजबाई बेगम अख्तर यांच्या गझला तेवढ्याच सशक्तपणे गातात, ते यामुळेच!
पण फैयाजबाईंनी आपलं गाणं आवडीच्या पातळीवरच ठेवलं. कारण एव्हाना नाटक, सिनेमा, दूरदर्शनमालिका अशा वेगवेगळ्या माध्यमांचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले झाले होते. 'महानंदा' चित्रपटाच्या निमित्ताने बाईंच्या दमदार अभिनयाची चुणूक रसिकांना पाहायला मिळालीच. पण पुलं, श्रीराम लागू, विक्रम गोखले यांच्याबरोबरही त्यांनी काम केलं.
त्याच लौकिकावर त्यांना नुकताच मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्कारामुळे बहुधा प्रथमच फैयाज यांच्या कर्तृत्वाची योग्य दखल घेतली गेलेली असावी. अन्यथा आजवर त्यांची वाटचाल एक होती पक्षिणी अशीच होती...
१९८० नंतरचा जवळपास दोन दशके मराठी चित्रपट उथळ पाण्यात गटांगळ्या खात होता. शांताराम नांदगावकर नेमके याच काळात गीतकार म्हणून वावरत होते. १९७९ साली ‘अष्टविनायक’ या चित्रपटात गाणी लिहून नांदगावकर खऱ्या अर्थानं ‘मेन स्ट्रिम’मध्ये आले.
मा. दत्तारामांनी हाताशी आलेली प्रत्येक भूमिका अशीच जिवंत केली. रंगभूमीकडे त्यांनी एक व्रत म्हणून पाहिले आणि व्रताचा सांभाळ देवव्रताच्या निःस्पृह प्रतिज्ञेप्रमाणे त्यांनी आयुष्यभर केला. त्या अर्थाने मास्टर दत्ताराम म्हणजे मराठी रंगभूमीवरचे देवव्रतच. मास्टर दत्ताराम यांनी ‘ मत्स्यगंधा ‘ या नाटकात केलेली देवव्रताची भूमिका विशेष गाजली.
संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांवर असामान्य प्रभुत्व, असलेले मदनमोहन मालवीय निष्णात कायदेपंडित आणि प्रसिद्ध वकील होते. अखिल भारतीय कांग्रेस पक्षाची स्थापना १८८५ रोजी झाली. त्यावेळी ते काँग्रेसचे सर्वात तरुण संस्थापक सदस्य होते. त्यांची विद्वतप्रचुरता लपून राहिली नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti