(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अभिनेता शंतनू मोघे

    अभिनेता शंतनू मोघे यांचा जन्म २८ जुलैला झाला.

    तरुण आणि दमदार कलाकारांच्या यादीत अभिनेता शंतनू मोघे यांचं नाव आग्रहाने घेता येईल.

    शंतनू मोघे हे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे चिरंजीव होत. शंतनु महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईतून पुण्यात आले. त्यांनी अभियांत्रिकीला प्रवेश घेतला होता. सिंहगड कॉलेजमध्ये शिकत असताना तिथल्या कला गृप मध्ये सामील झाले. मग पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक, कॉलेज फेस्टिवल आदी मध्ये सहभागी झाले. अभिनयाची आवड लहानपणापासून होती. श्रीकांत मोघे हे मोठे अभिनेते म्हणून घराघरांत पोहोचलेलं एक व्यक्तिमत्व होते कायम त्यांना काम करताना बघत मोठे झाले. तर काका सुधीर मोघे हे मनामनांत पोहोचलेले मोठे कवी. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मुंबईत आले. पण काही दिवस चांगलं काम काही मिळत नव्हतं. नंतर मग दोन वर्ष नोकरी करत ऑडिशन देत गेले. मग हळूहळू चांगल्या संधी मिळू लागल्या आणि ह्या क्षेत्रात पूर्ण वेळ काम सुरू केले. या सुखांनो या ही त्यांची पहिली व्यावसायिक सीरियल होती. पुढे शंतनू यांनी अनेक मराठी नाटकात आणि चित्रपटात अभिनय केले आहेत.

    ‘स्वराज्यरक्षक संभाजी’या मालिकेत त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका खूपच गाजली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेनंतर अभिनेता शंतनू मोघे प्रेक्षकांना पुन्हा एकदा चरित्र भूमिका साकारताना दिसले होते. विप्र एंटरटेनमेंट आणि दिशादिपा फिल्म्स निर्मित 'श्री राम समर्थ' सिनेमात शंतनू मोघे यांनी समर्थ रामदास स्वामींच्या भूमिकेत दिसले. आता शंतनू मोघे पुन्हा एकदा मालिकाविश्वात दिसत आहेत. स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेत अविनाश देशमुख म्हणून त्यांचा प्रवेश झाला आहे.

    शंतनू यांना चरीत्रपटापेक्षा वेब सिरीजमध्ये काम करण्यास आवडते. शंतनु यांनी 'झी ५' वरील 'पॉयझन' या वेब सिरीजमध्ये काम केले आहे. शंतनू मोघे आणि प्रिया मराठे मराठीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. २०१२ मध्ये शंतनू मोघे यांनी अभिनेत्री प्रिया मराठे सोबत लग्न केले आहे.दोघेही मनोरंजन क्षेत्राशी संबंधित असून आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत त्यांनी आपली एक ओळख निर्माण केली आहे. प्रियाने नाटक, मालिक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांद्वारे प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मन जिंकून घेत तिने स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. प्रियाने सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत सावित्रीबाई देशमुख उर्फ रायबागण ही ऐतिहासिक भूमिका साकारली होती.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • ताराबाई मोडक

    (१८९२-१९७३)

    ठाणे जिल्हातील निसर्गरम्य आदिवासी परिसरात ग्रामिण बालशिक्षणाचे यशस्वी प्रयोग करणार्‍या शिक्षणसंशोधक. राज्य विधानसभेच्या सदस्य. त्यांचे कार्य असंख्य कार्यकर्त्यांना व सेवाभावी संस्थाना प्रेरणादायी ठरले. अनेक बालपुस्तकांचे, नियतकालिकांचे लेखन व संपादन त्यांनी केले. बालशिक्षिकांचे प्रबोधन. शिक्षिकांचे प्रशिक्षण, संशोधन हे त्यांच्या कामाचे इतर पैलू होते. अंगणवाडी, कुरणशाळा, विकारवाडी अशा नवनवीन कल्पना त्यांनी रूजवल्या.

  • श्रीकांत माने

    माने, श्रीकांत

    सार्वजनिक क्षेत्रामध्ये उच्च पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये सामाजिक भान आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार यांचे प्रमाण कमी होत चालले असताना आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या आणि प्रामाणिक सेवेच्या जोरावर कर्तृत्वाचा मोठा आलेख निर्माण करणारे वीजमंडळातील अभियंत्यांचे नेते श्रीकांत माने यांचे निधन संवेदनशील मनांना चटका लावून जाणारे आहे.

    त्यांच्या निधनाने वीजमंडळातील अभियंत्यांना सन्मानाचे स्थान मिळवून देणारे एक कुशल नेतृत्व केवळ काळाच्या पडद्याआड गेले असे नाही तर भ्रष्टाचाराने पोखरलेल्या राज्य वीज मंडळातील हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार निर्भीडपणे बाहेर काढणाऱ्या एका समर्पित अभियंत्याला देश मुकला आहे. माने हे मूळचे महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवरील संकेश्वरचे. गुलबर्गा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकी या शाखेत प्रथम श्रेणीमध्ये पदवी संपादन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य वीजमंडळात १९७६ साली ते कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीत रुजू झाले. सलग ३० वर्षांच्या कालावधीत त्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता या पदापर्यंत झेप घेतली. या प्रवासात त्यांनी वीजमंडळाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि अभियंत्यांच्या संघटनांसाठी जे योगदान दिले, ते विसरता येणार नाही. ते जेव्हा वीजमंडळाच्या सेवेत दाखल झाले, तेव्हा मंडळाच्या अभियंत्यांचे साध्या सन्मानाच्या वागणुकीपासून ते वेतनश्रेणीपर्यंत अनेक प्रश्न प्रलंबित होते. मंडळातील सबऑर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशन या संघटनेला माने यांचे कुशल नेतृत्व मिळाले आणि मंडळाच्या इतिहासात १९८२ मध्ये न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचा २७ दिवसांचा संप झाला. कधी भूमिगत राहून तर कधी हजारो अभियंत्यांच्या मोर्चाचे नेतृत्व करीत माने यांनी लढा दिला, त्यामुळेच कदाचित पुढे वीजमंडळातील अभियंत्यांना सन्मानाचे दिवस पाहता आले. माने यांनी वीज मंडळातील सिंगल फेज या अव्यवहार्य प्रकल्पाविरुद्ध दिलेल्या लढय़ामुळे मंडळाला आपले धोरण बदलणे भाग पडले. त्याहीपेक्षा त्यांनी मंडळात खरेदी केल्या जाणाऱ्या कोटय़वधी रुपयांच्या ट्रान्सफॉर्मर्स, कपॅसिटर्स, केबल्स यांच्या दर्जाविषयी जो लढा दिला, त्याचे मोलही नाकारता येणार नाही. निकृष्ट दर्जाची यंत्रसामग्री पुरविणाऱ्या ठेकेदारांनी राज्य वीजमंडळात काही बगलबच्च्यांना हाताशी धरून मंडळाला हजारो कोटी रुपयांचा चुना लावण्याचा धंदा वर्षांनुवर्षे सुरू ठेवला होता, त्याला कुलूप लावण्याचे काम माने यांनी केले. एका ट्रान्सफॉर्मरची चाचणी घेऊन शेकडो निकृष्ट दर्जाचे ट्रान्सफॉर्मर मंडळात दाखल करून घेण्याचे एक मोठे रॅकेटच त्यांनी जिवाची तमा न बाळगता उघडकीस आणले. त्यांनी या प्रकरणातून अंग बाहेर काढावे यासाठी भल्या मोठय़ा कंपन्यांनी कोटय़वधी रुपये कोऱ्या चेकद्वारे त्यांना देऊ केले. पण या नि:स्वार्थी अभियंत्याने त्याला लाथ मारून सर्वसामान्यांशी असणाऱ्या आपल्या निष्ठेला अधिक प्राधान्य दिले. या कार्याबद्दल त्यांच्या गळ्यात राष्ट्रीय सन्मान पडणे आवश्यक होते. तो मिळाला नसला तरी पुढे मंडळाला उपकरणांच्या दर्जानिश्चितीसाठी आपली पद्धत बदलावी लागली, ही मोठी देणगी त्यांनी सर्वसामान्यांना दिली आहे.

  • वसंत रांजणे

    वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकी गोलंदाजीला खेळपट्ट्या अनुकूल असण्याच्या काळात अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ख्यातनाम असलेले रांजणे यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रांजणे यांनी १९५६-५७ च्या मोसमात रणजी स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात त्यांनी सौराष्ट्राविरुद्ध एकाच डावात ३५ धावांमध्ये हॅटट्रिकसह नऊ बळी घेतले. द्रुतमध्यमगती गोलंदाज असलेल्या रांजणे यांनी या सामन्यात केवळ ७१ धावांमध्ये १३ बळी घेतले.

  • अविका गौर

    मला 'मिस युनिव्हर्स' व्हायचे आहे आणि एक दिवस हा किताब मी नक्की पटकाविणार... हा आहे आत्मविश्वास अविका गौरचा. ही अविका कोण, हे आता कुणाला सांगण्याची गरज आहे, असे वाटत नाही. किमान, 'इडियट बॉक्स'ची पूजा करणाऱ्या कोट्यवधी रसिकांना तर नाहीच नाही! दोन वर्षांपूर्वी कलर्स वाहिनीवर 'बालिका वधू' ही मालि . झाली तेव्हा बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांना प्रसिद्धीचे वलय प्राप्त करून दिले जात असल्याची ओरड केली जाऊ लागली. 'बालिका वधू'तील केंद्रभूत व्यक्तिरेखा ठरलेल्या 'आनंदी'ची भूमिका साकारणारी अविका काहीशी भांबावली. थोड्याच | दिवसांमध्ये मालिकेचा एकूण सूर लक्षात आला नि सुतावरून स्वर्ग काढणारे आक्रमण शमले. त्यानंतर मात्र 'आनंदी' केवळ 'बालिका वधू'च नाही, तर | दूरचित्रवाणीवरील संपूर्ण मालिकाविश्वाची लाडकी ठरली! 'आनंदी-जग्या' ही छोट्या पडद्यावरील 'हिट्' जोडी ठरू लागली. मालिकांमधून अभिनय करण्याचा आनंदीला (तिच्या व्यक्तिरेखेचा प्रभाव पाहा. अविकाऐवजी आनंदी असाच उल्लेख होतो!) पूर्वानुभव होता. पण, ती घराघरात पोचली 'आनंदी'मुळे. तिच्या शाळेतील मित्र-मैत्रिणींसह शिक्षकवर्गही आनंदी, बिंदनी, चुहिया, छोटी मिर्ची अशा टोपणनावांनीच तिला बोलावू लागले. अविकासुद्धा मिळू लागलेल्या प्रसिद्धीचा आनंद लुटू लागली. मात्र, तिने भान सोडले नाही. महत्त्वाचे अविव म्हणजे हे यश अविकाचे नसून 'आनंदी'चे आहे, हे जाणण्याएवढी परिपक्वता तिने लहान वयातच दाखवली. त्यामुळेच 'बालिका वधू'च्या यशामुळे ती हवेत गेली नाही! 'सकाळची शाळा. तेथूनच दुपारी दोन वाजता मालिकेच्या चित्रीकरणस्थळी. तीन वाजल्यापासून ‘शिफ्ट' सुरू. सर्वसाधारणपणे पाच ते सहा तासांचे चित्रीकरण. त्यानंतर घरी... असा दिनक्रम होता. चित्रीकरणाच्या ठिकाणीच गृहपाठ, टेस्ट वगैरे उरकून टाकायचे. प्रसंगी अर्धा-एक तास डुलकीदेखील काढून पुन्हा फ्रेश ! पुढील एक-दोन

    दिवसांच्या चित्रीकरणासाठीचे संवाद वगैरे आदल्या रात्रीच दिले जात होते. त्यामुळे ते पाठ करण्यासाठी वेळ भरपूर मिळत असे आणि चित्रीकरणाचा मुळीच ताण येत नव्हता,' असे अविका स्पष्ट करते. 'माझा स्वभाव खूप बडबडा. अविका नि आनंदी या दोन्हींमध्ये कमालीचे साम्य वाटले. त्यामुळेच 'आनंदी' जगताना फारसा त्रास झाला नाही,' असेही अविका सांगते. एव्हाना अविका स्टार झाली आहे. पोस्टर-वॉलपेपर्स, असंख्य छायाचित्रांच्या माध्यमातून ती इंटरनेटवर झळकते आहे. तसेच, 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळांद्वारे अविका 'चाहत्यां' शी मनमुक्त संवाद साधते. समवयीन चाहत्यांसाठी आविकाचे 'स्लॅम बुक' तयारच असते. स्वभावविशेष - निरागस, गोड आणि मेहनती. आवडते कार्यक्रम -शिनचॅन, टॉम अॅण्ड जेरी. आवडती सहकलावंत -दादीसा, म्हणजेच सुरेखा सिक्री. पण, त्यांची भीतीही खूप वाटते! 'बालिका वधू'तील अविकाचा अखेरचा भाग गेल्या आठवड्यात झाला. यापुढील कथानकात वापरता येतील, अशी ‘फ्लॅशबॅक'ची बरीच दृश्ये चित्रित केली गेली. आनंदी पाच वर्षांनी मोठी होऊन जमशेदपूरच्या प्रत्युषा बॅनर्जीच्या रूपातून ती पडद्यावर दिसेल. अविकाचा खरा अभिनयप्रवास आता सुरू झाला असून मॉर्निंग वॉक, पाठशाला अशा चित्रपटांसाठी ती यापूर्वीच करारबद्ध झाली आहे.

    नसिरुद्दीन शहा, शबाना आझमी यांच्यासारख्या कसलेल्या कलाकारांसमवेत काम करण्याची संधी. अविकाला मिळणार आहे. अनेकविध पुरस्कार सोहळ्यांसाठी तिला करारबद्ध केले जाईल नि स्मृती इराणीच्या 'तुलसी'नंतरची छोट्या पडद्यावरील सर्वांत लाडकी सून म्हणून अविकाचा यापुढेही उल्लेख होत राहील. मात्र, या चकाकत्या, मोहमयी दुनियेतच अडकून राहायचे, की खरोखरीच ‘मिस युनिव्हर्स'च्या निमित्ताने व्यक्तिमत्त्व, अनुभवाच्या कक्षा विश्वव्यापी करायच्या, याचे भान अविका आणि तिच्या कुटुंबीयांना नक्कीच आहे, असा विश्वास वाटतो. 'बालिका'चा निरोप घेताना अविका खास संदेशही देते - यापुढेही बालिका वधू पाहा नि बालविवाहाच्या विरोधात आवाज उठवा!

  • अनिल यादवराव निमगाडे

    अनिल यदाओराव निमगाडे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात 24 जानेवारी, 1972 रोजी झाला. अतिशय धार्मिक वृत्तीचे व आहाराने शुध्द शाकाहारी असलेले निमगाडे एक प्रतिष्ठीत क्रीडा अधिकारी आहेत.

  • पहिल्या स्त्री डॉक्टर रखमाबाई जनार्दन सावे

    Licentiate of the Royal College of Physicians and Surgeons’ ही पदवी मिळाल्यानंतर त्यांचं नांव इंग्लंडच्या ‘मेडिकल रजिस्टर’मध्ये सनदशीर दाखल झालं.रखमाबाईंना शिक्षणात आर्थिक मदत करणाऱ्या ‘डफरिन फंडा’तर्फे एकूण सात रुग्णालये उघडण्यात आली. पहिलं दिल्लीत निघालं. त्यानंतर मुंबईत ‘कामा हॉस्पिटल’, नंतर मग सुरत, बडोदा, मद्रास अशी पुढची रुग्णालयं चालू झाली. रखमाबाईंनी डॉक्टरी व्यवसायाची सुरुवात कामा हॉस्पिटलमध्ये केली. तिथे त्यांची नेमणूक ‘हाऊस सर्जन’ म्हणून झाली.

  • प्रसिद्ध चित्रपट निर्माते यश जोहर

    "कल हो ना हो '," कुछ कुछ होता है' यश जोहर,या ब्लॉकबस्टर चित्रपटचे निर्माते म्हणून प्रसिध्द होते. त्यांचा जन्म ६ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. त्याच्या चित्रपटात भव्य सेट्स आणि विदेशी ठिकाणी शुटींग केलेले चित्रपट ही त्याची खासियत होती. १९७७ साली यश जोहर यांनी त्यांच्या स्वत:च्या नावाने धर्म प्रॉडक्शन ही कंपनी सुरू केली. १९८० ते १९९० मध्ये त्यांनी अग्निपथ, सारखे चित्रपट दिले.

    यश जोहर यांचे २६ जुन २००४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • वसंत पळशीकर

    कार्यकर्ता आणि ज्येष्ठ विचारवंत यांचा अपवादात्मक असा संगम वसंत पळशीकर यांच्या व्यक्तिमत्त्वात झाला आहे.

    त्यांचा जन्म हैदराबादमधला. महात्मा गांधींच्या चळवळीतील वडिलांच्या संस्कारात ते वाढले. इंटरनंतर शिक्षण सोडून ते सामाजिक कार्याकडे वळले. गांधींजींच्या विचारांचा चिकित्सक स्वीकार त्यांनी केला. आचार्य विनोबा भावे, अण्णासाहेब सहसबुद्धे, साने गुरुजी, रावसाहेब आणि अच्युतराव पटवर्धन, बाबा आमटे यांच्या कार्यात वेळोवेळी सहभागी होत त्यांनी स्वत:ला अधिक समृद्ध केले. भूदान आंदोलन, आनंदवन, ओरिसातील कोरापूर येथे सर्वसेवासंघाच्या कामात त्यांचा सक्रिय वाटा होता.

    सन १९५९ मध्ये ते महाराष्ट्रात परतले आणि प्रबोधनाच्या कामाला त्यांनी वाहून घेतले. मात्र हे काम ते प्राध्यापकीय अलिप्तपणे नव्हे, तर व्रत म्हणून पार पाडत आले आहेत. समाज प्रबोधन पत्रिका, नवभारत यांच्यासारख्या वैचारिक नियतकालिकांचे संपादन त्यांनी दीर्घकाळ केले, तसेच कार्यकर्त्यांची शिबिरे, वैचारिक परिषदा-संमेलने यांतही तेवढ्याच कळकळीने मार्गदर्शन केले. देशभरातील परिवर्तनवादी गट, प्रयोगशील संस्था यांना त्यांच्या मांडणीचा लाभ होत आला आहे.

    संथ, अनाक्रमक शैली, पण ठाम युक्तिवाद हे त्यांचे वैशिष्ट्य. एकांगीपणा, साचेबद्ध गृहितांवर आधारित भोवतालच्या घटितांचा अर्थ लावण्याची खटपट, सखोल चिकित्सेपेक्षा दुसर्‍याला निरुत्तर करण्यातील आनंद यापासून त्यांचे लेखन आणि संवाद कायम दूर राहिला. त्यामुळेच त्यांची मांडणी अंतिमत: पटो वा न पटो, त्यातून विचाराला चालना देणारी, आपल्या समजांचा पुनर्विचार करण्यास भाग पाडणारी निरीक्षणे मिळत नाहीत असे कधी होत नाही. राजकारण, समाजकारण, शिक्षण, साहित्य-कला, विज्ञान, संस्कृती, स्त्री-पुरुष संबंध, चिरंजीवी विकास यासारख्या क्षेत्रांत त्यांनी मूलगामी लेखन केले आहे. समग्रतेचे भान हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. विचारांशी सुसंगत अशीच त्यांची जीवनशैलीही आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांना सच्चेपणा लाभला आहे.

    समाजाच्या धारणेच्या, उन्नयनाच्या दृष्टीने किती मोलाचा विचार दिला, ही एखाद्याला 'विचारवंत' संबोधायचे की नाही याची एक कसोटी आहे, असे त्यांनी लिहून ठेवले आहे. या कसोटीला खुद्द पळशीकर उतरतात, असाच निवाडा त्यांचे वाचक करतील. गेली काही वर्षे प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्यांच्या लेखनात खंड पडला असला, तरी चिंतनात नाही.

    महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने मराठी भाषा दिनी वसंत पळशीकर यांचा 'जीवन गौरव' पुरस्काराने केलेला सन्मान हा विचारी मराठीजनांसाठी कृतज्ञता सोहळाच होता.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • राजाभाऊ कुळकर्णी

    कुळकर्णी, राजाभाऊ

    विदर्भाच्या वाचनसंस्कृतीचा आधारस्तंभच राजाभाऊ कुळकर्णी यांच्या निधनाने निखळून पडला आहे. राजाभाऊंचे निधन वयाच्या ७६ व्या वर्षी झाले आणि त्यापैकी गेली ५५ वर्षे ते विदर्भात होते. १९५५ साली अहमदनगर जिल्ह्य़ातला ‘भा.ल.’ कुळकर्णी नावाचा एक नुकताच मिसरूड फुटलेला युवक शिवचरित्राच्या प्रचारासाठी विदर्भात आला आणि ‘भा.ल.’ ही त्याची ओळख विसरून आणि ‘राजाभाऊ’ हे नवे रूप घेऊन विदर्भाच्या भूमीत स्थिरावला.

    या साडेपाच दशकांच्या काळात राजाभाऊंची भूमिका विदर्भाच्या वाचनसंस्कृतीला वेगवेगळ्या मार्गाने विकसित करणारी आणि दिशा देणारी ठरली. ते केवळ पुस्तक विक्रेते नव्हते तर, अक्षरांच्या पाऊलवाटांवर अनेक नामवंतांसोबत नवोदितांनाही चालायला लावणारे मार्गदर्शक होते. पुस्तकविक्रीसोबत ते प्रकाशन व्यवसायात शिरले पण, रूढार्थाने ते केवळ साहित्य प्रकाशकच नव्हते तर, साहित्याच्या वाटा उजळून टाकणारा एक दीप म्हणून या काळात राजाभाऊ वावरले. त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांच्या यादीवर आणि ते लिहिणाऱ्या लेखकांच्या नावावर नुसती नजर जरी टाकली तरी राजाभाऊंचा साहित्यिक संपर्क आणि आवाका केवढा थक्क करणारा होता, हे सहज लक्षात येते. प्रकाशक म्हणून त्यांचा व्यवहारही वाचनसंस्कृतीला उत्तेजन देणारा, लेखकाचा सन्मान राखणारा आणि प्रकाशित झालेले अक्षरधन वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेणारा राहिला. वाचक जर खरेच भुकेला असेल तर, पुस्तके त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी राजाभाऊंनी अशा अनेकांना मराठीतील उत्तमोत्तम साहित्य हप्त्याने कसे उपलब्ध करून दिले, याविषयी आजही अतिशय आदराने बोलले जाते. दूरचित्रवाणीचा प्रचार आणि प्रसार भारतात सुरू झाल्यावर शाळकरी मुले पुस्तकांपासून लहान वयातच दुरावत आहेत, हे लक्षात आल्यावर राजाभाऊ कुळकर्णी यांनी साहित्य प्रसार केंद्राच्या वतीने शाळकरी विद्यार्थ्यांसाठी वाचनस्पध्रेचा सुरू केलेला उपक्रम वैदर्भीय वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी उपकारक ठरला. राजाभाऊंचे साहित्य प्रसार केंद्र केवळ पुस्तक विक्रीचे दुकान म्हणून नागपूर-विदर्भात परिचित नव्हते तर, साहित्यिक आणि वाचकांचा ते एक अड्डा आहे. ग्रेस आणि सुरेश भट, भास्कर लक्ष्मण भोळे आणि प्रा. वसंत वऱ्हाडपांडे, महेश एलकुंचवार आणि प्रा. राम शेवाळकर, बाबासाहेब पुरंदरे आणि अरविंद इनामदार, अशी नावे कोणत्याही जोडीने उच्चारली तरी ती परस्पर विरोधी विचारशैली आणि लेखनाची प्रतीके आहेत, मात्र असे सर्व भिन्न विचार-संस्कृतीचे लेखक, कवी, समीक्षक साहित्य प्रसार केंद्रात आपापल्या विचारांच्या झुली बाजूला ठेवून केवळ साहित्य या एका रंगात न्हाऊन निघाले असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. व्यक्तिगत पातळीवर राजाभाऊ अध्यात्मवादी होते आणि त्यांच्या विचारनिष्ठा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य प्रवाहाशी जोडल्या गेलेल्या होत्या. असे असले तरी साहित्याच्या व्यासपीठावर आणि सार्वजनिक जीवनात राजाभाऊंनी ते अध्यात्म आणि त्या संघनिष्ठांना डोके वर काढू दिले नाही. किंबहुना वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्याच्या प्रयत्नात या निष्ठा कोणत्याही प्रकारे आड येणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली. त्यामुळेच संघाशी नाळ जुळलेल्या राजाभाऊंचा साहित्यिक आणि सार्वजनिक परिवार मात्र सर्वपक्षीय, सर्वरंगीय, सर्वजातीय आणि सर्वधर्मीय असा सर्वसमावेशक राहिला. ज्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या आदेशाने राजाभाऊ कुळकर्णी विदर्भात आले, रुजले, फुलले आणि वैदर्भीय भावजीवनाचा अविभाज्य घटक झाले त्या बाबासाहेब पुरंदरे यांचे भाषण सुरू असतानाच पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात राजाभाऊ कुळकर्णीना हृदयविकाराने गाठावे आणि आयुष्यभर पुस्तकांचा ध्यास घेतलेल्या एखाद्याचा मृत्यू पुस्तक प्रकाशन समारंभात आणि त्याच्या आदर्श व्यक्तीसमोरच व्हावा, हेही एखाद्या साहित्यकृतीतच शोभावे.