जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
हिमाचल प्रदेशातील एकल महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अहनिर्श झटणार्या 'सुत्र' संस्थेचे संस्थापक सुभाष मेंढापुरकर.
हिमाचल प्रदेशातील निराधार, अविवाहित, विधवा, परित्यक्त्या, वृद्ध महिलांच्या पुनर्वसनासाठी 'सोशल अपलिफ्टमेंट थ्रू रुरल अॅक्शन' अर्थात 'सुत्र' या संस्थेची स्थापना करणारे मेंढापूरकर हे मूळचे सोलापूरचे. पुण्यात राहून त्यांनी मराठीत एमए आणि त्यानंतर टीआयएसएस मधून एमएसडब्ल्यू केल्यानंतर १९७७ साली एका प्रकल्पाच्या निमित्ताने ते हिमाचल प्रदेशात गेले. महिलांवर होणारे अत्याचार, कौटुंबिक हिंसा, दारू पिऊन महिलांना मारहाण असे प्रकार तेथे सर्रास सुरू होते. त्या परिस्थितीत गरज होती ती तेथील महिलांच्या सक्षमीकरणाची तसेच त्यांना संघटित करण्याची. मेंढापूरकरांनी हे आव्हान उचलले आणि वंचित महिलांना 'सुभाष भय्या'चा मोठा आधार मिळाला. सुरूवातीच्या काळात मेंढापूरकरांना गावकर्यांचा बराच रोष पत्कारावा लागला, पण ते मागे हटले नाहीत. महिला सक्षमीकरण, आथिर्क स्वावलंबन, बचतगट, आरोग्य सुविधा, विधवांच्या मुलांना शिष्यवृत्या अशा विविध पातळ्यांवर त्यांचे काम सुरू राहिले.
स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात आवाज उठवणारी पहिली संस्था म्हणून 'सुत्र'कडे पाहिले जाते. आज मात्र सामाजिक आणि आथिर्क संदर्भ बदलले असल्याचे मेंढापूरकरांना प्रकर्षाने जाणवते आहे. आजच्या राजकारण्यांना सभ्यतेचा आदर करण्याची सवय राहिलेली नाही. पूर्वी विरोधकांनाही इज्जत होती, पण आता सगळे चित्रच बदललेय असे ते सांगतात.
महाराष्ट्रात संस्था-संघटना खूप आहेत. पण मनापासून काम करण्याची त्यांची तयारी नाही. एकीकडे व्यावसायिक संस्था तर दुसरीकडे राजकारणाबाबत जागृती नसणार्या संघटना भरपूर झाल्या आहेत, हेही त्यांचे एक निरीक्षण. आत्ताच्या लोकांना राजकारणाचे मर्म कळत नसल्यामुळे त्यांना आपल्या कामाचे राजकारण करता येत नाही म्हणूनही ते मागे पडतात किंवा दुर्लक्षित राहतात असे त्यांचे मत बनले आहे. याला कारण म्हणजे १९८० नंतर महाराष्ट्रात विद्यार्थ्यांचा किंवा युवकांचा कोणताच लढा उभा राहिलेला नाही. त्यामुळे आत्ताची पिढी प्रगल्भ असली तरी राजकारणाचे भान, जाण त्यांना नाही असे ते सांगतात. पूर्वीच्या लोकशाहीत सर्वसामान्यांमध्ये संघर्ष करण्याची ताकद होती. आता लढ्यांमध्ये मध्यमवर्ग कुठेच दिसत नाही. लोकशाहीच्या लढ्यांची जागा हिंसेने, दंडुकेशाहीने घेतली आहे आणि लोकशाहीला ते सर्वात घातक ठरू शकते याची चिंता मेंढापूरकरांना सतावते आहे.
शेती करू इच्छिणार्या महिलांना जमीन द्या यासाठी सध्या त्यांचा लढा सुरू आहे. शेती करून महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतात असा विश्वास मेंढापूरकरांना असून त्यासाठी ते लढताहेत.
त्यांना 'सारडा समान संधी पुरस्कार' बहाल करण्यात आला आहे.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
पंडितराव नगरकर यांचा जन्म २६ डिसेंबर १९१० रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव गोविंद परशुराम नगरकर; परंतु पंडितराव याच नावाने प्रसिद्ध. जन्म अहमदनगर जिल्ह्यातील भातोडी-पारगाव येथे. शिक्षण मॅट्रिकपर्यंतच. लहानपणापासूनच पंडितरावांचा गायनाकडे कल होता. सुप्रसिद्ध गायक-नट विष्णुपंत पागनीस यांच्याकडे प्रथम आणि नंतर पुणे येथील भारत गायन समाजात त्यांनी शास्त्रोक्त गायनाचा अभ्यास केला. मित्रमंडळीच्या आणि चाहत्यांच्या वर्तुळात पंडितरावांनी गायिलेल्या गीतांचा बोलबाला झाल्यामुळे, १९३० साली ओडियन कंपनीने त्यांच्या काही गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. त्यांपैकी ‘जा के मथुरा’, ‘बोल हसरे बोल प्यारे’, ‘रामरंगी रंगले मन’ इ. गीतांच्या ध्वनिमुद्रिका बऱ्याच लोकप्रिय झाल्या. आकाशवाणीच्या मुंबई केंद्राशी त्यांचा संबंध सुरुवातीपासून होता. इंपीरिअल कंपनीच्या रुक्मिणीहरण (१९३४) या मराठी चित्रपटात त्यांनी काम केले. त्यावेळी त्यांचा परिचय सुलोचना पालकर या गायिकेशी झाला आणि तो दीर्घकाळ टिकून राहिला. त्यांचे दोन विवाह झाले होते. हरिभाऊ शुक्ल यांच्या मंगला नाटकात काम करून पंडितरावांनी नाट्यसृष्टीत प्रवेश केला. पुढे सुलोचना पालकर हिच्या सहकार्याने पंडितरावांनी १९३४ साली ‘सुलोचना संगीत मंडळी’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली व १९३७ पर्यंत कंपनीच्या नाट्यप्रयोगांत नायकाच्या भूमिका केल्या. संशयकल्लोळ तसेच खाडिलकर यांचे संगीत त्रिदंडी-संन्यास ही नाटके ‘सुलोचना संगीत मंडळी’ करीत असे. त्यांशिवाय मृच्छकटिक, मानापमान, सौभद्र, लग्नाची बेडी, ना. सी. फडक्यांचे संजीवन इ. नाटकेही या संस्थेने रंगमंचावर आणली होती. १९३७ मध्ये कंपनी बंद पडली. नंतर दामुअण्णा जोशी यांच्या ‘कला-विलास’ च्या देहूरोड या नाटकात पंडितरावांनी काम केले. त्यातील ‘मी गातो नाचतो’ हे पंडितरावांचे गाणे खूपच गाजले. शेवटी १९७६ मध्ये रांगणेकरांच्या पिकली पाने या गद्य नाटकात त्यांनी भूमिका केली व ही त्यांची शेवटचीच भूमिका ठरली.
व्ही. शांताराम यांनी १९५०-५१ साली त्यांच्या अमरभूपाळी या बोलपटातील होनाजीच्या भूमिकेसाठी पंडितरावांची निवड केली. त्या बोलपटात लता मंगेशकर आणि पंडितराव यांनी जोडीने गायिलेली ‘घनःश्याम सुंदरा’ ही भूपाळी अविस्मरणीय ठरली. मधुर आवाज, मार्दवता, तल्लीनता आणि भावमधुरता हे त्यांच्या गायनातले उल्लेखनीय गुण होते. मा. पंडितराव नगरकर यांचे २८ जुलै १९७७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.मराठी विश्वकोश
मा.पंडितराव नगरकर यांची गाणी
सांगा मुकुंद कुणि हा
गोल तुझ्या शरीराचा
घडीघडी अरे मनमोहना
घनश्याम सुंदरा श्रीधरा
ती पाहताच बाला
तू पाक सूरत कामिना
मम हृदयाची ललित रागिणी
मराठी असे आमुची
माझी बेगम आली
शुभमंगल या समया
आज ११ सप्टेंबर.. थोर गांधीवादी आणि भूदान चळवळीचे प्रवर्तक आचार्य विनोबा भावे याी जयंती.
विनोबाजींचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ रोजी झाला.
भगवद्गीतेचे सार सोप्या रसाळ शैलीत ‘गीताई’ आणि ‘मधुकर’ सारख्या ग्रंथांतून सांगणार्या विनोबांची भेट ७ जून १९१६ रोजी मोहनदास गांधी नावाच्या एका महात्म्याशी झाली आणि त्यांच्या आयष्यानेच एक नवे वळण घेतले. त्याक्षणापासून ब्रह्मचर्याची शपथ घेऊन त्यांनी जीवनसाधनेस सुरूवात केली. वाई मुक्कामी स्वामी केवलानंद सरस्वतींच्या चरणाशी उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, शांकरभाष्य व पतंलजोगाचे शिक्षण घेतले.
पुढे १९२१ मध्ये जमनालाल बजाजांनी साबरमतीच्या आश्रमाची शाखा वर्ध्याला काढली. तिचे संचालक म्हणून ८ एप्रिल १९२१ रोजी महात्माजींच्या १९४० त्या वैयक्तिक सत्याग्रहाचे गांधीजींनी निवडलेले पहिले ते सत्याग्रही होते.
विनोबांनी १९५१ ते ५३ हा भूदान यात्रेचा कालावधी वगळता सारे आयुष्य वर्ध्याच्या पवनार आश्रमात काढले.
भारत सरकारने त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देऊन सन्मान केला.
विनोबा भावे यांचे १५ नोव्हेंबर १९८२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कलेचं शिक्षण आणि सामाजिक भान या दोन्हीचं एकत्रीकरण करणार्या ठाण्यातल्या कलाकार म्हणजे रुपाली मदन.
गाडगीळ, बाळ
मराठी साहित्यातील एक समृद्ध प्रांत म्हणून विनोदाला नेहमीच महत्व मिळाले आहे. विनोदी साहित्याची मराठीतील परंपराही फार मोठी आणि संपन्न. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांपासून ते आचार्य अत्र्यांपर्यंत, आणि पु. ल. देशपांडय़ांपासून ते श्रीकांत बोजेवारांपर्यंत विनोदाच्या नाना तऱ्हा मराठी साहित्यात उमटल्या. ‘टवाळा आवडे विनोद’ अशी संभावना करणाऱ्या मराठी भाषेतच विनोदी वाङ्मयाला एवढा बहर आला आहे की, कुणाही परभाषेला (त्याबाबतीत तरी!) मराठीचा अक्षरश: हेवा वाटावा.
अशा एका परंपरेत योगदान देणाऱ्या बाळ गाडगीळ यांच्या निधनाने मराठी विनोदाला काही क्षण तरी गंभीर व्हावे लागले आहे. अर्थशास्त्र हा अभ्यासाचा विषय, आवड अध्यापनाची आणि वेड लेखनाचे अशा वेगळ्याच मुशीत तयार झालेल्या बाळ गाडगीळांनी मराठी साहित्यात आपल्या साहित्याने वेगळेपण जपले. गाडगीळ लिहायला लागले, तेव्हाही मराठी साहित्यात विनोदाचे झाड बहरलेले होते. पण पूर्वसूरींच्या खांद्यावर बसूनही समकालीन लेखकांचा कोणताही प्रभाव पडू न देता आपले वेगळेपण जपणारे गाडगीळ हे आगळे साहित्यिक होते. गॉगलच्या काचांचा चष्मा, नीटनेटके राहणीमान- चेहऱ्यावरून हा माणूस विनोदी लेखक असू शकेल, असे जराही वाटणार नाही. अशी जरब प्राचार्य किंवा उपकुलगुरू म्हणून काम करताना या अशा बाह्य़ व्यक्तिमत्त्वाचा आधार घेणाऱ्या बाळ गाडगीळ यांच्या स्वभावात मात्र एक प्रकारचा खटय़ाळपणा होता. फग्र्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून सात वर्षे आणि प्राचार्य म्हणून अकरा वर्षे काम करताना अध्यापनाच्या बरोबरीने व्यवस्थापनाचे कामही त्यांनी चोखपणे बजावले. सभोवतालच्या परिस्थितीचे बारीक निरीक्षण करण्याच्या क्षमतेचा वापर लेखनात करण्याची सिद्धहस्तता फार थोडय़ा लेखकांकडे असते. मध्यमवर्गीय जीवनशैलीतील अनेक वैचित्र्यपूर्ण विसंगती तीच जीवनशैली जगत असताना पाहण्याचे कसब गाडगीळांकडे होते. असे कसब आत्मसात केलेल्या आणि समाजाचे असे चित्रण करणाऱ्या लेखकांचीही मराठीमध्ये एक मोठी परंपरा आहे. मराठी विनोद मुख्यत: प्रासंगिक आणि माणसांची स्वभाववैशिष्टय़े टिपणारा असल्याचे सांगितले जाते. मनुष्य स्वभावाच्या अनेक पदरी कथा त्यामुळे विनोदी पद्धतीने साकारलेल्या आपल्याला दिसतात. गुदगुल्या करून हसवणारा विनोद मराठीत फारच कमी. मिश्किल शैली हे तर मराठीचे खास वैशिष्टय़. गाडगीळांचा विनोद पोट धरून हसायला लावणारा नाही, पण वाचताना मन प्रसन्न करणारा आणि गालातल्या गालात हसायला लावणारा असा हा विनोद गाडगीळांनी मनोभावे जपला, त्याची निगराणी केली आणि त्याला स्वाभाविकपणे फुलू दिले. ‘लोटांगण’ या त्यांच्या पहिल्याच विनोदी लेखसंग्रहाला १९६१ मध्ये राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. या पुरस्काराची मजा अशी की तो पु. ल. देशपांडे यांच्या ‘अपूर्वाई’ या पुस्तकाबरोबर विभागून देण्यात आला होता. पहिल्याच फटक्यात बाळ गाडगीळांनी अशी सिक्सर मारल्यामुळे त्यांचा त्यानंतरचा खेळ दिमाखदार होणे क्रमप्राप्त होते. ‘सिगरेट आणि वसंतऋतू’ या प्रवासवर्णनाबरोबरच ‘शिरसलामत’, ‘खिल्ली’, ‘कुणालाही थोडक्यात पाडून घेऊ’, ‘हसो हसो’, ‘दुसरा चिमणराव’ यासारख्या सुमारे तीस पुस्तकांचे धनी होण्याचे भाग्य बाळ गाडगीळांच्या वाटय़ाला आले. व्यक्तिचित्रे, नवनीती कथा, विनोदी कादंबरी, प्रवास वर्णने, बालवाङ्मय यासारख्या साहित्य प्रकारांबरोबरच गाडगीळांनी अन्य विषयांवरही विपुल लेखन केले. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दात आंबेडकर’ हा संपादित ग्रंथ, ‘विनोद तत्त्वज्ञान’ हा टीकाग्रंथ, ‘मिसिसिपीवरील मुशाफिरी’ हा मार्क ट्वेनच्या आत्मवृत्ताचा अनुवाद, ‘अर्थशास्त्राचे शिल्पकार’ हा अनुवादित ग्रंथ हे त्यातील काही निवडक. बाळ गाडगीळांचे मराठी भाषेबरोबरच इंग्रजीवरही प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी गंगाधर गाडगीळांच्या बरोबर आधुनिक मराठी कथांचे भाषांतरही पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले. राजेंद्र बनहट्टी यांच्या ‘अखेरचे आत्मचरित्र’ या लघुकादंबरीचा इंग्रजी अनुवाद त्यांनी केला. अध्यापन आणि लेखन हाच शेवटपर्यंत ध्यास असलेल्या बाळ गाडगीळ यांनी सिम्बायोसिससारख्या संस्थेत राहून आपल्या शैक्षणिक अनुभवाचा उपयोगही केला. बाळ गाडगीळांच्या निधनाने एक चांगला साहित्यिक, अध्यापक आणि प्रशासक निवर्तला आहे.
ज्येष्ठ गोमंतकीय कलासमीक्षक, चित्रकार, नाटककार व साहित्यिक गोपालकृष्ण भोबे यांचा जन्म ६ ऑगस्ट १९२० गोव्यातील बार्देश तालुक्यातील नेरूल येथे झाला.
जयशंकर दानवे यांनी सिनेसृष्टी उत्कृष्ट खलनायक व चरित्र अभिनेता म्हणून गाजवली तर नाट्यसृष्टीत ते उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शक व खलनायक म्हणून प्रसिद्धीस आले. राजकपूरना प्रथम “वाल्मिकी” चित्रपटात नारदाचा मेकअप करून हिंदी सिनेसृष्टीला शो मन देणारे अशी त्यांची ओळख होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी एकूण ६५ चित्रपट आणि १३४ नाटके केली.
१९६० मध्ये होंडा यांनी उत्तर अमेरिकेच्या बाजारात पाऊल टाकले. त्यांच्या माेटारसायकलने कितीतरी ग्रँड प्रिक्स, मोटोक्रॉस आणि इनड्युरो स्पर्धा जिंकल्या आहेत.
हिरवे तळकोकण’ लिहिणारे निसर्गकवी माधव केशव काटदरे हे अर्थातच कोकणातील होते. पण त्यांचे बरेचसे आयुष्य नोकरीनिमित्त मुंबईत गेले. माधव काटदरे यांनी केवळ निसर्गकविताच लिहिली, असे नाही. ऐतिहासिक कविताही त्यांनी विपुल लिहिली. छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहाराज, सवाई माधवराव, मस्तानी अशा विविध व्यक्तिरेखा त्यांनी काव्यबद्ध केल्या. याशिवाय शिशुगीते, विनोदी कविताही त्यांच्या लेखणीतून झरल्या.
मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी यांचा जन्म २ डिसेंबर १९१३ रोजी कोल्हापुर येथे झाला. शांतारामबापूं नंतर हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत यश मिळवणारा दिग्दर्शक म्हणून दत्ता धर्माधिकारी याचं नाव घ्यावं लागेल. दत्ताजींचं शिक्षण कोल्हापुरातच झालं. त्याच वेळी "पाध्येबुवा‘कडं त्यांनी शास्त्रोक्त गायनाच्या शिक्षणाचे धडेही गिरवले; पण त्यांचे वडील जगन्नाथराव वारल्यामुळं शिक्षण अर्धवट सोडून ते पुण्यात आले आणि नोकरी करायची म्हणून प्रभात स्टुडिओत त्यांनी "टाइमकीपर‘ची नोकरी स्वीकारली; पण त्यांचं मन त्यात रमत नव्हतं. त्यांना व्ही. शांताराम यांच्यासारखा मोठा दिग्दर्शक व्हायचं होतं. ते क्षेत्र त्यांना खुणावत होतं.
चराचरसृष्टीचा "टाइमकीपर‘ ब्रह्मदेव; त्यानं दत्ताजींच्या कुंडलीत शुभवेळेची नोंद केली; ते शांतारामबापूंचे व दामले-फत्तेलाल यांचे सहायक दिग्दर्शक झाले! आणि १९५० मध्ये त्यांनी "मायाबाजार‘ (हिंदी व मराठी) हा चित्रपट स्वतंत्रपणे दिग्दर्शित केला. सुलोचना, बेबी शकुंतला, उषा किरण (यांना दत्ताजींनी नायिकेची प्रथम संधी दिली), राजा गोसावी, शरद तळवलकर (यांनाही रजतपटावर प्रथम संधी दिली), सूर्यकांत, चंद्रकांत, राजा परांजपे, राजा नेने, जयश्री गडकर, रेखा, चित्रा आदी कलावंतांनीही त्यांच्या दिग्दर्शनाखाली आपल्या भूमिका उत्तम प्रकारे साकारल्या. मराठीबरोबरच हिंदीतले प्रथितयश मोतीलाल, सोहराब मोदी, नलिनी जयवंत, गीता बाली, निरुपा रॉय, मीनाकुमारी आदी कलाकारांनीही त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम केलं होतं.
"बाळा जो जो रे‘, "स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी‘, "भाग्यवान‘, "चिमणीपाखरं‘, "एक धागा सुखाचा‘, "अबोली‘, "सावधान‘, "सुहागन‘ (हिंदी) चित्रपटांबरोबरच "अखेर जमलं,‘ "आलिया भोगासी‘, "लग्नाला जातो मी‘, असे विनोदी चित्रपट काढून त्यांनी लोकांना खळखळून हसवलंही. याशिवाय "थांब लक्ष्मी कुंकू लावते‘, "विठू माझा लेकूरवाळा‘, "सतीचं वाण‘, "सतीची पुण्याई‘, "सुदर्शनचक्र‘, "भक्त पुंडलिक‘ इत्यादी धार्मिक व पौराणिक चित्रपट तितक्या च समर्थपणे त्यांनी दिग्दर्शित केले. "भाग्यवान‘, "दीप जलता रहे‘, "मुझे सीने से लगा लो‘, "दौलत का नशा‘ इत्यादी हिंदी चित्रपटांचंही दिग्दर्शन त्यांनी केलं. "दैवे लाभला चिंतामणी‘, "कुंकू जपून ठेव‘ इत्यादी यशस्वी नाटकं त्यांच्या नावावर जमा आहेत. "कुंकू जपून ठेव‘ या नाटकात नायिकेच्या वडिलांची भूमिका त्यांनी केली होती, तीही वयाच्या साठाव्या वर्षी. त्यांचा "महात्मा‘ हा चित्रपट पु. ल. देशपांडे यांच्या "भाग्यवान‘ नाटकावर आधारित होता आणि तो मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषांमध्ये निर्माण केला होता. एकच चित्रपट एकाच वेळी तीन भाषांमध्ये निर्माण करणारे दत्ताजी हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातले पहिले निर्माता-दिग्दर्शक होते. सर्व समीक्षकांनी या चित्रपटाचं यथोचित कौतुक केलं होतं. दत्ताजींचं हास्य ही त्यांना ईश्व-रानं दिलेली देणगी होती आणि कोणत्याही संकटात ते हास्य त्यांना सोडून गेलं नाही. साधेपणा हा त्यां चा गुण होता.
एवढंच नव्हे तर, संगीतकार वसंत पवार यांना हिंदी चित्रपटात त्यांनी संधी दिली व त्यांचा रुबाब वाढावा म्हणून त्यांना वूलनचा सूटही शिवून दिला होता. आपल्या "स्टाफ‘वर त्यांचं मनस्वी प्रेम होतं. त्यामुळंच एक चित्रपट पूर्ण झाल्यावर दुसरा चित्रपट सुरू होण्यापूर्वीच्या मध्यंतरीच्या काळातला पगारही ते देत असत! काही काम न करताही आपल्या या कुटुंबाला ते सहा-सहा महिने पोसत असत. स्वतः उत्तम दिग्दर्शक असूनही आपले सहकारी अनंत माने यांना आपल्या मराठी व हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी त्यांनी दिली होती. एखाद्या संतानं प्रेमळ मानवाचं रूप घेऊन तो या मायावी चित्रपटसृष्टीत वावरतोय, असं दत्ताजींना पाहून वाटायचं. दत्ता धर्माधिकारी यांचे ३० डिसेंबर १९८२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti