(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कवी आणि गीतकार दासू वैद्य

    दासोपंत हरिहरराव वैद्य उर्फ दासू वैद्य यांनी कवितांप्रमाणेच नभोनाट्य, एकांकिका, बालसाहित्य आणि चित्रपट गीतलेखन या प्रांतातही विपुल लेखन केले आहे. कवी आणि गीतकार दासू वैद्य यांचा जन्म १० डिसेंबर १९६७ रोजी झाला. त्यांनी काही एकांकिकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. 'दासू' ची कविता आजूबाजूच्या जीवनात अधिक रमते. विसंगती आणि विरोध ही त्यांच्या कवितेची शक्तिस्थाने आहेत. साहित्यिक, सांस्कृतिक वातावरण नसलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड गावी दासूंचे बालपण गेले. तिथे कुस्तीचे फड रंगत होते, तरीही निसर्गाशी जोडले राहिल्याने कविता बहरली. शाळेत असताना ग्रामीण जीवन जवळून अनुभवता आले. गणितासारख्या विषयाशी त्याकाळात कधी जमले नाही तरी लहानपणापासून सगळ्या कविता तोंडपाठ असायच्या.

    "आई-वडील व भावाने तुला जे काय करायचे आहे ते कर अशी मुभा दिली, त्यामुळे चौकटीत राहून स्वैराचारासारखे मिळवत गेलो," असेही दासू यांनी स्वतः बाबत सांगितले आहे. दासू वैद्य यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून मराठी या विषयात एम.ए. तसेच डिप्लोमा इन ड्रामा शिक्षण घेतले. यु.जी.सी. तर्फे त्यांना रिसर्च फेलोशिप देखील मिळाली होती. तर एम.फिलसाठी 'भारत सासणे यांच्या दीर्घकथा' तर पीएच.डी.साठी 'भारत सासणे यांचे साहित्य' हे विषय निवडून सदर विषयांवर त्यांनी प्रबंध लेखन केलेले होते. काहीकाळ बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्यपद देखील त्यांनी भूषविलेले आहे. वृत्तपत्र विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद पुरस्कृत 'शिक्षक प्रतिभा पुरस्कार-२००९' त्यांना प्रदान करण्यात आलेला होता.

    १९८७ पासून मराठीतील वाड्मयीन नियतकालिकांमधून सातत्याने ते कविता लेखन करत आहेत. मौज, अनुष्टुभ, प्रतिष्ठान, युगवाणी, अभिरुची, साक्षात, ललित, अक्षर चळवळ, कवितारती, शब्दवेध, अभिधानंतर, महाराष्ट्र टाईम्स, मिळून साऱ्याजणी, शब्दालय, साधना इत्यादी अनेक वाड्मयीन अंकांमधून आजवर त्यांच्या कविता प्रकाशीत झालेल्या आहेत. पॉप्युलर प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेला 'तूर्तास' हा त्यांचा पहिलाच कविता संग्रह. मान्यवर समीक्षक व रसिक वाचकांनी गौरविलेल्या या पहिल्याच काव्यसंग्रहाला प्रतिष्ठेचे समजले जाणारे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्या पुरस्कारांमध्ये रा.ना.पवार प्रतिष्ठान, सोलापूरचा काव्य पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषदेचा 'मराठी कविता राजधानी पुरस्कार', बुलडाणा साहित्य संघाचा ना.घ.देशपांडे साहित्य पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजीचा इंदिरा संत काव्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठाचा विशाखा पुरस्कार या पुरस्कारांचा समावेश आहे.

    विशेष म्हणजे ललित मासिकाच्या लक्ष्यवेधी पुस्तकात व अंतर्नाद मासिकाने निवडलेल्या शंभर वर्षांतील पन्नास पुस्तकांत 'तूर्तास' या कविता संग्रहाची निवड झालेलीं आहे. दासू वैद्य यांना मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या हस्तलिखित कवितांसाठीच्या 'कवी प्रफुल्ल दत्त काव्य पुरस्कार', ललित लेखनासाठीच्या लोकमत उत्कृष्ट लेखन पुरस्कार, समग्र लेखनासाठीच्या कै.नरहर कुरुंदकर स्मृती पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी देखील गौरविण्यात आलेले आहे. पॉप्युलर प्रकाशन प्रस्तुत 'चौघांच्या कविता' या कार्यक्रमाचे त्यांनी महाराष्ट्रभर सादरीकरण केलेले आहे. दासू वैद्य हे केवळ कविता लेखनच करतात असे नाही तर कवितांचा इंग्रजी, मल्याळम, हिंदी इत्यादी भाषांमधून प्रभावीपणे अनुवाद देखील करतात.

    दासू वैद्य यांनी बालसाहित्यामध्ये देखील आपले भरीव असे योगदान दिलेले आहे. 'भुर्रर्र' या त्यांच्या बालकथा संग्रहाला महाराष्ट्र बालसभा, कोल्हापूरचा २००७ सालचा उत्कृष्ट बालकथा संग्रह पुरस्कार मिळालेला असून 'क-कवितेचा' या बालकविता संग्रहाला सौ.शशिकला आगाशे स्मृती बालवाड्मय पुरस्कार, बुलडाणा व मासिक ऋग्वेद बालसाहित्य पुरस्कार, आजरा, जि.कोल्हापूर असे दोन पुरस्कार मिळालेले आहेत. महावीर जोंधळे यांच्या 'आसवं गाळती कासवं' या बालकादंबरीचे त्यांनी नाट्यरुपांतर करून त्याचे महाराष्ट्रात यशस्वीरीत्या व्यावसायिक प्रयोग केलेले आहेत. तर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या इयत्ता सहावीच्या 'सुगम भारती' क्रमिक पाठ्यपुस्तकात 'पक्ष्यांना घर हवे' या बालनाट्याचा समावेश करण्यात आलेला आहे.

    महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी, अनेक पुरस्कारांच्या निवड समितीवर, कविता विभागासाठी तसेच विविध विद्यापीठांच्या युवक महोत्सवात नाटक, कविता या कला प्रकारांसाठी परीक्षक व तज्ञ म्हणून त्यांची वेळोवेळी नियुक्ती करण्यात आलेली आहे. कुद्रेमनी, ता.जि. बेळगांव (कर्नाटक) येथे पार पडलेल्या पाचव्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद देखील त्यांनी यशस्वीपणे भूषविलेले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून, साहित्य अकादमीच्या महोत्सवांमध्ये त्याचप्रमाणे आकाशवाणी व दूरदर्शनवरून अनेकवेळा कविता वाचन करण्याची संधी त्याला लाभलेली आहे. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी व्याख्याने तसेच विविध चर्चासत्रांमध्ये व कवितांच्या कार्यशाळेमध्ये त्यांनी हिरीरीने आपला सहभाग नोंदविलेला आहे. आकाशवाणीच्या अखिल भारतीय नभोनाट्य स्पर्धेत त्यांच्या 'वाळवी' या नभोनाट्याला लेखनासाठीचा पुरस्कार मिळालेला असून या नभोनाट्याचा इतर भारतीय भाषांमधून अनुवाद देखील त्यांनी केलेला आहे.

    मदुराई येथे झालेल्या राष्ट्रीय युवक महोत्सवात नाट्यविभागाचे सुवर्णपदक त्यांनी पटकावलेले आहे. महाराष्ट्रातील प्रतिष्टीत एकांकिका स्पर्धांमधून 'एक लेखक लिहिणार आहे..' 'आम्हाला बांधायचय मंदिर..' या सारख्या एकांकिकांसाठी व 'च्यानल झीरो' या पथनाट्यासाठी लेखन, दिग्दर्शनाची अनेक पारितोषिके त्यांना मिळालेली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत देखील दिग्दर्शनासाठी पारितोषिक त्यांना मिळालेले आहे. एवढेच नव्हे तर साक्षरता अभियानांतर्गत पथनाट्य लेखन व सादरीकरण देखील केलेले आहे. त्यांच्या मरून पडलेला पांडुरंग, एकदा मी, भीती मेंदूत आरपार या सारख्या अनेक कवितांचा, 'तूर्तास' या कविता संग्रहाचा तसेच 'देता आधार का करू अंधार' या एकांकिकेचा पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. त्यांनी घेतलेल्या अनेक मान्यवरांच्या वाड्मयीन मुलाखती विविध अंकांमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत.

    दासू वैद्य यांनी आजवर अनेक चित्रपट, जाहिरातपट व मालिकांसाठी लेखन केलेले आहे. 'बिनधास्त' या मराठी चित्रपटाच्या गीतलेखनासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा कै.ग.दि.माडगुळकर उत्कृष्ट गीतलेखन पुरस्कार तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पुरस्कार मिळालेला आहे. 'भेट' या मराठी चित्रपटाच्या गीतलेखनासाठी झी-गौरव पुरस्कार मिळालेला असून या व 'सावरखेड एक गांव' या चित्रपटाच्या गीतलेखनासाठी म. टा. सन्मानासाठी त्यांना नामांकन मिळालेले आहे. 'सोनियाचा उंबरा' या मालिकेच्या शीर्षक गीतासाठी म. टा. सन्मान पुरस्कार तर 'पदरी आलं आभाळ'च्या शीर्षक गीतासाठी लक्स सह्याद्री माणिक सन्मान देखील त्यांना मिळालेला आहे.

    'गाभ्रीचा पाऊस', 'खाली डोकं वरती पाय' तसेच 'तुकाराम', सावरखेड एक गाव अशा चित्रपटांसाठी गीतलेखन त्यांनी केलेले आहे. ई टीव्ही, झी टीव्हीवरील 'पिंपळपान', 'टिकल ते पॉलिटिकल', 'एक होता राजा', 'आपली माणसं', 'रंग माझा वेगळा', 'घर श्रीमंताचं' इत्यादी मालिकांसाठी पटकथा तसेच शीर्षकगीत लेखन करण्याची त्यांना संधी मिळालेली आहे. तर 'लेक वाचवा' अभियानासाठी अभियानगीत लिहून सामाजिक उपक्रमांत देखील त्यांनी आपले योगदान दिलेले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • अभ्यासू, समर्पित आणि शिस्तीचा कलावंत विक्रम गोखले

    सध्या नव्या नाटकाच्या तालमीलाही सगळे नट एकाच वेळी उपलब्ध असत नाहीत. त्यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४५ रोजी झाला. त्यामुळे दिग्दर्शक प्रत्येकाला त्याच्या सवडीनुसार स्वतंत्र तालीम देऊन नाटक (कसेबसे) उभे करतो. अशा जमान्यात नाटकाचा सखोल आणि सर्वागीण विचार संभवणे अवघडच; परंतु काही मोजके नट याला अपवाद आहेत. त्यापैकी एक : विक्रम गोखले!

    विजया मेहता यांच्या तालमीत तयार झालेल्या शिष्यांमध्ये विक्रम गोखले हे एक बिनीचे शिलेदार. नाटकाचा सर्वस्पर्शी विचार कसा करावा, याचे बाळकडू त्यांना बाईंकडून मिळाले. ‘बॅरिस्टर’ ही त्याची उत्तम फलश्रुती.

    विक्रम गोखले यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले (तेव्हाच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. १९१३ साली दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या 'मोहिनी भस्मासुर' नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती. विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी ७० हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या होत्या. मा.विक्रम गोखले यांनी घराणेशाहीच्या जोरावर अभिनय क्षेत्रात हडेलहप्पी करण्याचा मार्ग न पत्करता अभ्यासपूर्वक त्यातले सूक्ष्म कंगोरे आत्मसात केले.

    जाणीवपूर्वक भूमिका निवडून त्यांना आपल्या निरीक्षणशक्तीची, आकलन आणि विश्लेषणाची जोड देऊन त्यांवर आपला असा ठसा उमटवला. मग ती भूमिका ‘माहेरची साडी’सारख्या सिनेमातली का असेना. रंगभूमी, चित्रपट, चित्रवाणी या प्रत्येक माध्यमाची निकड त्यांनी सहजगत्या आत्मसात केली. त्यांच्या या चोखंदळपणामुळेच ते कला क्षेत्रातले संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे धनी होऊ शकले. ते कलेचा साकल्याने विचार करणारे, नव्या पिढीला प्रशिक्षण देणारे, त्या संदर्भात बांधीलकी जपणारे एक कर्ते रंगधर्मी आहेत. म्हणूनच रंगभूमीवर सध्या सुरू असलेल्या त्यांच्या ‘के दिल अभी भरा नहीं’ या नाटकाचे प्रयोग डोळ्याला इजा झालेली असतानाही त्यांनी थांबवले नाहीत.

    दुसरीकडे सामाजिक बांधीलकीचा वसाही त्यांनी जपलेला आहे. कमलाबाई गोखले पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अपंग सैनिक आणि समाजातील उपेक्षितांसाठी गेली कित्येक वर्षे ते सक्रिय कार्य करतात. विक्रम गोखले यांना आधुनिक मराठी रंगभूमीचे प्रणेते विष्णुदास भावे यांच्या नावे दिल्या जाणारा पुरस्कार मिळाला आहे. मा.चंद्रकांत गोखले यांनाही भावे पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • “गंधर्व भूषण” जयराम शिलेदार

    आज ६ नोव्हेंबर..आज “गंधर्व भूषण” जयराम शिलेदार यांची पुण्यतिथी.
    जयराम शिलेदार यांचा जन्म ६ डिसेंबर १९१६ रोजी झाला.
    जयराम शिलेदार म्हणजे संगीतनाट्य इतिहासातील सोनेरी पान. चित्रपट आणि नाटक या दोन्ही क्षेत्रांत सारखीच चमकदार कामगिरी करणाऱ्या थोड्या कलावंतांमध्ये "गंधर्वभूषण‘ जयराम शिलेदार यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. घरचा सराफीचा व्यवसाय चांगला चालत होता. आजोबांच्या हातून घडलेल्या तोडे, बाजूबंद, पैंजणादी अलंकारांना आजूबाजूच्या संस्थानांतील राजघराण्यांतून मागणी असे. संगीताच्या सुरांशी या घराचा काहीही संबंध नव्हता. पण तत्कालीन प्रथेप्रमाणं प्रतिष्ठेचा प्रघात म्हणून कर्णेवाला ग्रामोफोन आणि गाजलेल्या कलाकारांच्या ध्वनिमुद्रिका घरात आल्या. खोडकर जयराम सतत खेळत असे. पण ग्रामोफोनच्या कुतूहलाने जयरामाचे पाय घरात रेंगाळू लागले. रेकॉर्ड्स ऐकत त्यांचं अनुकरण करता करता छोटय़ा जयरामला सूर गवसला. निसर्गत: उत्तम आवाज, गळ्याला चांगली फिरत, प्रभावी आकलनशक्ती यामुळं त्याला संगीताचा चांगलाच नाद लागला. सर्वाना जयरामचे गाणे आवडू लागले. गल्लीतल्या गणेशोत्सवात हौशी मंडळींनी ‘स्वयंवर’ नाटक बसवायचा घाट घातला. गाणाऱ्यांची वानवा असल्याने पदं कटाप करून गद्य नाटक करायचं ठरलं. ग्रामीण बोलीमुळे ‘सयेंवर’ नाटक तुफान विनोदी वाटू लागलं. उपस्थित प्रेक्षक हुर्यो करू लागले की शिलेदारांच्या जयरामला रंगमंचावर ढकललं जाई.. ‘कंचंबी कृष्नाचं गान गाऊन सोड.’ पण नाटकाशी संबंध नसलेलं ‘राधेकृष्ण बोल मुखसे’ हे पद जयराम यांनी सुरू करताच उधळलेले प्रेक्षक शांत झाले आणि आवडीनं पद ऐकू लागत. त्यांनी टाळ्या व ‘वन्स मोअर’ने जयरामला डोक्यावर घेतले. बाल जयरामने गद्य ‘स्वयंवर’ संगीत करण्याची ही घटना म्हणजे भावी काळात संगीत रंगभूमीची धुरा वाहण्याचं अवघड कार्य त्यांच्या हातून होणार याची नांदी होती. .

    सातवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर जयराम शिलेदार यांना शाळेचा कंटाळा आला. लिहिता-वाचता आलं, हिशेब करता आला की शाळेत जायलाच पाहिजे हे बंधन सैल होई. वडिलोपार्जित सराफी व्यवसायात जयराम यांनी यावं असं आजोबांना वाटत असे. पण त्यात जयराम यांचं मन अजिबात रमलं नाही. मग एका वकिलाकडं कारकुनी करायला त्यांना पाठवलं गेलं. तिथंही त्यांचे गाणं गुणगुणणं चालूच होते. ‘सयेंवर’च्या चमत्कारानंतर आजोबांनाही वाटू लागलं, की हा पोरगा नाटकातच नाव काढील; तर आपणच त्याला नाटक मंडळीत भरती करू. त्या काळात ही गोष्ट आगळीच म्हणावी लागेल. बेळगावात मुक्कामाला आलेल्या रघुवीर सावकारांच्या रंगदेवता हिंदी-उर्दू-मराठी थिएट्रिकल कंपनीत आजोबांनी जयराम यांना दाखल केलं. पूर्वीच्या नाटक मंडळ्या म्हणजे नाटय़विद्यालयेच असत. भावी कलाकारांना संगीत आणि नाटय़ाचं पद्धतशीर शिक्षण देण्यात तिथं कसूर होत नसे. सुरुवातीचं नमन म्हणण्यासाठी स्त्रीवेश धारण करून हात जोडून उभं राहण्याचं काम त्यांनी सहा महिने केलं. मग छोटय़ा भूमिका करत एका वर्षांत जयराम यांनी धैर्यधराच्या भूमिकेपर्यंत झपाटय़ानं मजल मारली. त्यावेळी त्यांचं वय होतं अठरा र्वष. मूकपटाचं बोलपटात रूपांतर झाल्यावर नाटकाचा प्रेक्षक चित्रपटांकडं वळला. नाटक मंडळ्या बंद पडू लागल्या. रंगदेवता नाटक मंडळी बंद होताच त्यांनी ‘राजाराम संगीत मंडळी’, ‘नवजीवन संगीत नाटक मंडळी’ या संस्थांत कामं केली. राजाराम संगीत मंडळीत त्यांना चिंतुबुवा गुरव, गणपतराव बोडस यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. किर्लोस्कर मंडळीच्या पठडीचं शिक्षण मिळाल्याने जयराम यांची कामगिरी उठावदार होऊ लागली. नंतर त्यांना गंधर्व नाटक मंडळीचं बोलावणं आलं. त्यांच्या दृष्टीनं हा भाग्ययोग होता. बालगंधर्व म्हणजे त्यांचं परमदैवत. गंधर्वाच्या सुरांनी मोहून गंधर्व-गायकी आत्मसात करणारे अनेक होते, पण मा.जयराम शिलेदार वेगळेपण हे- की त्यांनी गंधर्ववृत्तीचं अनुसरण केलं. संगीत नाटक कसं पेश करावं, त्यासाठी जीवन कसं झोकून द्यावं, हे त्यांना गंधर्वाकडून शिकायला मिळालं. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी संगीत नाटकाची पताका फडकवीत ठेवली. वयाच्या १६ व्या वर्षी रंगदेवता रघुवीर सावकारांच्या कंपनीत त्यांनी नाट्यकलेचा श्रीगणेशा केला. नंतर गंधर्व नाटक मंडळींमध्ये नटसम्राट बालगंधर्वांबरोबर नायकाची भूमिका करण्याची संधी मिळाली. चित्रपटात ललिता पवार, सुमती गुप्ते, तर नाटकात हिराबाई बडोदेकर, शांता आपटे, मीनाक्षी, जयमाला शिलेदार यांच्याबरोबर त्यांची कारकीर्द गाजली. गणपतराव बोडस, चिंतामणराव कोल्हटकर, केशवराव दाते यांचे मार्गदर्शन मिळाले. पुढे "मराठी रंगभूमी‘सारखी संस्था उभी केली. ४५ हून अधिक संगीत नाटकांचे सहा हजारहून अधिक प्रयोग केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संगीत नाटकाची पताका फडकवत ठेवली.
    राम जोशी यांच्यात जीवनावर आधारीत व्हीठ. शांताराम आणि बाबुराव पेंटर यांनी दिग्द र्शीत केलेला 'लोक शाहीर राम जोशी' हा चित्रपट १९४७ साली प्रदर्शित झाला. त्या चित्रपटामध्यें जयराम शिलेदार यांनी राम जोशी यांची तर हंसा वाडकर यांनी बयाची भूमिका साकारली होती.
    'जिवाचा सखा'मधील त्यांची भूमिकाही विशेष गाजली. १९४७ मध्ये डॉ. भालेराव यांच्या नाटय़महोत्सवातील 'धरणीधर' या नाटकामध्ये त्यांनी जयराम शिलेदार यांच्यासमवेत जयमाला यांनी पहिल्यांदा काम केले. तर 'शाकुंतल' नाटकामध्ये त्या शिलेदार यांच्या नायिका होत्या. १० ऑक्टोबर १९४९ रोजी जयराम शिलेदार, नारायणराव जाधव आणि प्रमिला जाधव यांनी मराठी रंगभूमी संस्थेची स्थापना केली. २३ जानेवारी १९५० रोजी जयराम शिलेदार यांच्याशी विवाहबद्ध होऊन त्या जयमाला शिलेदार झाल्या. जयमाला आणि जयराम शिलेदार यांचा संगीत नाटक हाच प्राण आणि सर्वस्व होते. संगीत रंगभूमीसाठी त्यांनी अपार कष्ट केले, पण त्याचा गाजावाजा कधीही केला नाही. संगीत रंगभूमीची सेवा ही त्यांनी निर्मोहीपणे केलेली नटराजाची सेवा होती. संगीत सौभद्र, सुवर्ण तुला, संशय कल्लोळ, स्वयंवर, एकच प्याला, शाकुंतल, मृच्छकटिक, मानापमान, ही एककाळ लोकप्रियतेचा कळस गाठलेली नाटके या दोघांनी सातत्याने रंगभूमीवर सुरू ठेवली. नव्या युगात संगीत रंगभूमीचा प्रेक्षकवर्ग कमी झाल्यामुळे, ही नाटके चालणार नाहीत, हा समजही त्यांनी खोटा ठरवला. कोल्हापूर, सांगली, सोलापूर या शहरात संगीत रंगभूमीचे महोत्सव होत. काही महोत्सवाच्या सर्व नाटकांची तिकीट विक्री पूर्ण झाल्यावर, रसिकांना नाट्यगृहात बसायलाही जागा उरत नसे. तेव्हा अनेक रसिकांनी जमिनीवर बसून संगीत नाटकांचा आनंद लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. संगीत नाटक रसिकांनी या दोन्ही शिलेदारांवर अफाट प्रेम केले. हे प्रेम आणि संगीत रसिकांचा प्रतिसाद हेच त्यांचे खरे भांडवल होते. रसिकांची प्रशंसा हाच आपला सन्मान, असे हे दोघेही कृतज्ञपणे सांगत असत. 'मराठी रंगभूमी' ही संगीतनाट्य संस्था स्थापन करून त्यांनी अनेकांची कारकीर्द घडविली. जयराम शिलेदार यांच्या निधनानंतर "गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्ट' ही संस्था स्थापन करून मा.जयमालाबाईंनी कलावंतांना घडवायचे कार्य केले होते. मा.जयराम शिलेदार यांचे ६ नोव्हेंबर १९९२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • संगीतरचनाकार केशवराव भोळे

    मराठी व शास्त्रीय संगीत समीक्षा प्रसिद्ध संगीतसमीक्षक, संगीतरचनाकार, संगीतदिग्दर्शक आणि नाटक, चित्रपट, क्रिकेट इ. विषयांचे चिकित्सक अभ्यासक व लेखक केशवराव भोळे यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मराठी भावसंगीताचे जनक, नाट्यसंगीत विचाराला योग्य दिशा देणारे व्यक्तिमत्त्व अशीही केशवरावांची ख्याती आहे.

  • सुप्रसिध्द संतूरवादक पं. उल्हास बापट

    अभिजात संगीतात तंतूवाद्य वादकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पं. उल्हास बापट हे त्यांपैकीच एक होते.

    त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९५० रोजी झाला. शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय आणि सुगम अशा संगीतातील सर्वच अंगांना आपल्या कौशल्यपूर्ण वादनाने एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा समर्थ संतूर वादक होता. त्यांनी संतूरची पूर्णत: स्वतंत्र वादनशैली विकसित केली होती. पं. उल्हास बापट यांचे वडील पोलीस उपायुक्त यशवंत गणेश बापट, हे एक उत्तम गायक होते. वयाच्या पाचव्या वर्षी मुलाचा संगीताकडे असलेला कल त्यांच्या लक्षात आला आणि पंडित उल्हास बापट यांना पंडित रमाकांत म्हापसेकर यांच्याकडे तबल्याच्या शिकवणीसाठी पाठविले गेले. या बालवयातील संगीतशिक्षणामुळे उल्हास बापट यांना तालाचे उत्तम ज्ञान झाले, आणि ते पुढील आयुष्यात सातत्याने उपयोगी पडले. पुरसे तबला शिक्षण झाल्यावर उल्हास बापट आपल्या वडिलांकडे कंठसंगीत शिकले. त्याच काळात ते प्रसिद्ध सरोद वादक श्रीमती झरीन दारूवाला यांच्या संपर्कात आले. झरीन दारूवाला यांच्यानंतर त्यांनी के.जी. गिंडे आणि वामनराव सडोलीकर यांना गुरू केले आणि त्यांच्याकडे असलेल्या रागशास्त्र, बंदिशी आणि खयाल गायन यांच्या माहितीच्या अफाट साठ्यातले थोडेफार हस्तगत केले. दोन घराण्यांच्या गायकीचा केलेल्या अभ्यासातून त्यांना संगीतातील सौंदर्याचा साक्षात्कार झाला. गायन शिकताना पंडित उल्हास बापट यांना, संतूर या वाद्यात गोडी निर्माण झाली, आणि त्यांनी संतूरवादनात प्रावीण्य मिळविण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले. संतूरची 'क्रोमॅटिक ट्युनिंग ही त्यांनी स्वत: संशोधन केलेली पद्धत होती.

    संतूर वाजवताना साधारणत: जो राग वाजवायचा त्या रागाचे स्वर एका बाजूस लावून घेण्याची पद्धत प्रचलित होती पण पं उल्हास बापट यांनी एक सर्वस्वी भिन्न अशी पद्धत शोधली. या 'क्रोमॅटिक पद्धतीनुसार अनावश्यक स्वर कौशल्याने वगळून केवळ रागात समाविष्ट असलेले स्वर वाजवण्याचे नैपुण्य त्यांनी संपादन केले जे निश्चितच कौतुकास्पद आहे. संतूरवर 'मींड' काढण्याचीही त्यांची खास पद्धत असे. त्यामुळे ते रागमाला (अनेक राग अंतर्भूत असलेली रागांची मालिका) तसेच अनेक भावगीतेही 'क्रोमॅटिक पद्धतीनुसार अतिशय परिणामकारक रित्या सादर करत असत. प.उल्हास बापट यांच्या संतूरमधून श्रावणधारा झिरपत असत. तिन्ही सांजा, केतकीच्या बनी, मी मज हरपून, श्रावणात घननीळा, समईच्या शुभ्र कळ्या, रिमझिम झरती, स्वर आले दुरुनी, या चिमण्यांनो, पैल तो गे, मालवून टाक दीप अशा अनेक गीतांचे संतूरवादन त्यांच्या 'संतूरच्या भावविश्वात' या CD द्वारे आपल्याला अनुभवता येते. या गीतांकडे त्यांनी 'बंदिश' म्हणून पाहिले व त्यानुसार त्या गीतांचा स्वरविस्तार केला. आर.डी बर्मन यांच्या बरोबर अनेक वर्ष काम केले होते. पंचमदाचे लाडके संतुर वादक होते. पंचमदांच्या अनेक अजरामर गाण्यांच्या संगीतात उल्हास बापट यांच्या संतूरचे सूर गुंजले. तसेच पंडित उल्हास बापट यांनी अनेक हिंदी मराठी गीतांना संतूर सुरांनी सजवलं होते. इजाजत मधील मेरा कुछ सामान, जैत रे जैत मधील मी रात टाकली, शिवाय तळव्यावर मेंदीचा अशा कितीतरी गाण्यांसाठी पं. उल्हास बापट यांनी संतूर वाजविले आहे. पं.उल्हास बापट यांनी बाहुलीचं लगीन,चुलीवरची खीर अशी काही बालगीतं संगीतबद्ध केली होती.

    पंडित नारायण मणी यांच्याबरोबर उल्हास बापट यांच्या ध्वनिमुद्रित संतूरवादनाचे ’इन कस्टडी ॲन्ड कॉन्व्हरसेशन्स’ नावाचे दोन आल्बम प्रकाशित झाले आहेत. पं.उल्हास बापट यांनी त्यांच्या "सहज स्वरांतून मनातलं" हे आत्म चरित्रपर पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात संतूर आणि तबला वादनाबरोबरच त्यांचे भाषेवर ही उत्तम प्रभुत्व आढळून येते. शास्त्रीय संगीत, तसेच चित्रपट सृष्टीशी जवळचा संबंध असल्यामुळे, त्यांच्या गाठीला अनेक आठवणी होत्या. त्या त्यांनी ,मिश्किलपणे आणि रंगतदार करून पुस्तकात सादर केल्या आहेत.

    दि. ४ जानेवारी २०१८ रोजी त्यांचे निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    पं.उल्हास बापट यांचे संतूर वादन
    https://www.youtube.com/watch?v=HdIsFM9hwiE
    http://gaana.com/artist/pt-ulhas-bapat-1

  • प्रसिद्ध चित्रपटनिर्माते– दिग्दर्शक मृणाल सेन

    मृणाल सेन यांचे मूळ नाव माणिकबाबू; पण ‘मृणालदा’ या नावानेच ते चित्रपटसृष्टीत ओळखले जातात. त्यांचा जन्म १४ मे १९२३ रोजी फरिदपूर (बांगला देश) येथे झाला. मृणाल सेन यांच्या मातोश्री सूरजूबाला सेन स्वातंत्र्य चळवळीच्या मोठमोठय़ा सभांतून देशभक्तीपर गीत गायच्या. बिपिनचंद्र पाल यांचं त्यांच्यावर मुलीसारखं प्रेम होतं. मृणाल सेन यांचे वडील दिनेशचंद्र सेन हे वकील होते. ते कमाईतला मोठा हिस्सा क्रांतिकारकांना शस्त्रांसाठी पैसा पुरवायला द्यायचे. चित्तरंजनदास, नेताजी बोस अशी दिग्गज मंडळी फरीदपुरात त्यांच्याकडेच उतरायची. अशा वातावरणाचा योग्य तो परिणाम होऊन वयाच्या सातव्या वर्षी मृणालकांती दिनेशचंद्र सेनने पोलिसांच्या तोंडावर ‘वंदे मातरम’ नारा घुमवला आणि काही तास पोलीस ठाण्याची हवा चाखली..

    त्यांचे माध्यमिक शिक्षण फरिदपूर येथे झाले. पुढे कोलकात्यामधील स्कॉटिश कॉलेजात त्यांनी भौतिकशास्त्राचे अध्ययन केले. या काळात त्यांचा संबंध कम्युनिस्ट पक्षाशी व पक्षाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांशी आला. मात्र ते पक्षाचे सदस्य झाले नाहीत. तसेच ‘इप्टा’ (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) या संघटनेशी ते संबंधित होते (१९४३–४७). दरम्यान चित्रपटाच्या सौंदर्यशास्त्रावरील ब्लादिमीर नेल्सन यांचे सिनेमा अॅतज ग्राफिक्स आर्ट हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले. तेव्हापासून त्यांची चित्रपटविषयक आस्था आणि रुची वाढीस लागली. सुरुवातीला काही काळ पत्रकारिता व वैद्यकीय प्रतिनिधीची नोकरी केल्यानंतर कोलकात्यामधील एका चित्रपट स्टुडिओत ध्वनितंत्रज्ञ म्हणून त्यांनी काम केले. येथपासूनच त्यांच्या चित्रपटकारकीर्दीस सुरुवात झाली.

    मृणाल सेन यांनी १९५५ मध्ये रात भोरे (द डॉन ) हा पहिला बंगाली चित्रपट दिग्दर्शित केला; मात्र तो यशस्वी ठरला नाही. त्यानंतरच्या नील आकाशेर नीचे (अंडर द ब्लू स्काय, १९५८) या चित्रपटाने ते सर्वसामान्य लोकांमध्ये परिचित झाले; तर त्यांचा बैशे श्रावण (१९६०) हा चित्रपट व्हेनिस चित्रपटमहोत्सवात दाखवला गेल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली. पुढील काळात पुनश्च५ (ओव्हर अगेन, १९६१), प्रतिनिधी (द रेप्रिझेन्टेटिव्ह, १९६४), आकाशकुसुम (अप इन द क्लाउड्स, १९६५) आणि माटीर मानिष (मॅन ऑफ द सॉइल, १९६६) हे चित्रपट त्यांनी निर्माण केले. त्यानंतर शासकीय अनुदानातून कमी खर्चात बनविलेल्या भुवन शोम (१९६९) या हिंदी चित्रपटाने त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर मानाचे स्थान मिळवून दिले.

    मृणाल सेन यांचे नेटके कलात्मक दिग्दर्शन, उत्पल दत्त व सुहासिनी मुळ्ये यांचा प्रमुख भूमिकांतला उत्कृष्ट अभिनय, हलकाफुलका निरागस विनोद, अर्थगर्भ संहिता, अमिताभ बच्चन यांनी सूत्रधार म्हणून दिलेला उसना आवाज अशा अनेक गुणवैशिष्ट्यांमुळे हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीत युगप्रवर्तक ठरला. ह्या चित्रपटापासून भारतातील वास्तवदर्शी चित्रपटचळवळीला चालना मिळाली, तसेच सेन यांच्या कारकीर्दीला नवे वळण लाभले. पुढील काळात सेन यांनी राजकीय पार्शभूमी असलेले सामाजिक आशयाचे चित्रपट बनविण्यास सुरुवात केली. त्यामुळे मार्क्सवादी कलावंत अशी त्यांची ख्याती झाली. या काळातील कोलकात्यामधील राजकीय अस्थिरतेस व अनागोंदीच्या स्थितीस मध्यमवर्गीय समाजाची उदासीन, निष्क्रिय वृत्ती कारणीभूत असल्याची त्यांची भूमिका होती. त्याचे प्रभावी दर्शन त्यांनी कोलकाता शहरावरील शोकात्म चित्रपटांतून घडवले. उदा., इंटरव्ह्यू (१९७१), कोलकाता ७१ (१९७२) आणि पदातिक (द गूरिला फायटर, १९७३) इत्यादी. हे चित्रपट व त्यांमागील त्यांची मध्यमवर्गीय समाजाला दोषी ठरवण्याची भूमिका त्या काळात काहीशी वादग्रस्त ठरली.

    १९७९ नंतर त्यांच्या चित्रपटाचा रोख बदलला. चित्रपटातील सामाजिक वास्तवाच्या चित्रणाऐवजी मानवी अंतर्मनाच्या चित्रणाकडे ते वळले. आपल्या एकूण कारकीर्दीत त्यांनी सु. २८ चित्रपट, १४ लघुपट व ५ अनुबोधपट निर्माण केले. सेन यांनी चित्रपटमाध्यमाचा वापर कुशलतेने व समर्थपणे केला. केवळ एकाच पठडीतील साचेबद्ध चित्रपट न बनविता त्यांनी सातत्याने नवनवीन प्रयोग केले. त्यांच्या चित्रपटांतून अस्तित्ववाद, मार्क्सवाद, जर्मन अभिव्यक्तिवाद, इटालियन नववास्तववाद अशा विविध विचारसरणी व शैली यांचा प्रत्यय येतो. त्यांच्या चित्रपटांचे शेवट हे प्रेक्षकांना अंतर्मुख व्हावयास भाग पाडणारे, अगदी अनपेक्षित आणि वेगळे असतात.

    चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी औपरोधिक विनोदाच्या साहाय्याने ग्रामीण भारताचे वास्तववादी दर्शन घडविले. कोलकाता शहरावरील शोकात्म चित्रपटांमध्ये त्यांनी नवीन चित्रीकरणशैलीचा प्रयोग करून तुकड्यातुकड्यांतून आविष्कृत होणाऱ्या निवेदनपध्दतीचा वापर केला. मध्यमवर्गीयांची नैतिकतेबद्दल असणारी मनोवृत्ती आणि तिच्या विविध सूक्ष्म पैलूंचे दर्शन त्यांनी इक दिन प्रतिदिन (अँड क्वाएट रोल्स द डे, १९७९) आणि खारिज (द केस इज क्लोज्ड, १९८२) या चित्रपटांतून घडविले. त्यांच्या अस्तित्ववादी आशयसूत्र असलेल्या खंडहर (द रुइन्स, १९८३) या चित्रपटाची पटकथा इंग्रजीत पुस्तकरूपात उपलब्ध आहे (१९८४). कोरस (१९७४) या त्यांच्या चित्रपटात पाश्चिमात्य प्रभावाखालील उद्योगजगताचे अतिवास्तववादी शैलीत चित्रण आहे, तर मृगया (१९७६) या हिंदी चित्रपटात ब्रिटिश राजवटीच्या वर्चस्वाखालील आदिवासी जमातीचे चित्रण आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्तीने साकारलेली आदिवासी नायकाची भूमिका राष्ट्रीय पारितोषिक विजेती ठरली. त्यांनी बंगालीशिवाय अन्य भाषांतही चित्रपट निर्माण केले.

    त्यांत भुवन शोम व एक अधुरी कहानी (१९७२) हे हिंदी चित्रपट; माटीर मानिष हा ओडिया चित्रपट; ओका ऊरी कथा (अ व्हिलेज स्टोरी, १९७७) हा तेलुगू चित्रपट आदींचा समावेश होतो. अशा बहुभाषिक चित्रपटांमुळे राष्ट्रीय पातळीवर दिग्दर्शक म्हणून त्यांची प्रतिमा प्रस्थापित झाली. सामान्य प्रेक्षकांना रुचणारे राजकीय विषयांवरचे बुध्दिवादी चित्रपट काढल्याने त्यांना भारतीय चित्रपटांच्या इतिहासात मानाचे स्थान प्राप्त झाले. अशा नव्या वळणाच्या राजकीय चित्रपटांच्या प्रवाहाचे ते प्रवर्तक मानले जातात.

    मृणाल सेन यांच्या अनेक चित्रपटांना आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये विविध पारितोषिके मिळाली. कान्स, बर्लिन, व्हेनिस, मॉस्को, कार्लोव्ही व्हेरी, माँट्रिऑल, शिकागो, कैरो इ. चित्रपटमहोत्सवांतून त्यांचे चित्रपट गौरविण्यात आले. भुवन शोम, इक दिन प्रतिदिन आणि अकालेर सान्धने (इन सर्च ऑफ फॅमिन, १९८०) या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाची पारितोषिके मिळाली. तसेच भारत सरकारतर्फे पद्मभूषण (१९८१), भारतीय चित्रपटसृष्टीतील दादासाहेब फाळके हा सर्वोच्च पुरस्कार (२००४) हे त्यांना लाभलेले अन्य पुरस्कार होत.

    ते संसदेच्या सभागृहाचे सन्माननीय सदस्यही होते (१९९८–२००३). फ्रान्स सरकारने त्यांना कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स या फ्रान्समधील सर्वोच्च पुरस्काराने गौरविले (१९८५). रशियन सरकारनेही ऑर्डर ऑफ फ्रेंडशिप या किताबाने त्यांना सन्मानित केले (२००१). अनेक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही मानद पदवी बहाल केली.

    त्यांनी ऑलवेज बीइंग बॉर्न हे आत्मचरित्र लिहिले (२००४). त्यांना विविध आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांतून जीवन गौरव पुरस्कार देण्यात आले (२००८; २००९; २०१२). आपल्या समुहाकडून मा.मृणाल सेन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / मराठी विश्वकोश

  • संत कान्होपात्रा

    मंगळवेढे येथील शामा नायकिणीचे पोटी हिचा जन्म झाला, सौंदर्य व गोड गळा यामुळे आपला व्यवसाय मुलगी आणखी पुढे नेईल असे तिच्या आईला वाटे. पण कान्होपात्राचा ओढा ईश्वरभक्तीकडे होता. विठ्ठल भजनात ती रंगून जात असे. तिने रचलेले अभंग प्रसिद्ध आहेत. कान्होपात्राच्या सौंदर्यामुळे तिच्यावर संकटे आली पण दरवेळी विठ्ठलकृपेने ती बचावली.

    शेवटी बिदरच्या बादशहाकडून बोलावणे आल्यावर पांडुरंगाच्या चरणी देह ठेवून आपली इहलोकीची यात्रा संपवली.
    ## Sant Kanhopatra
  • मराठी हिंदुस्तानी संगीत परंपरेतले गायक, संगीतकार भास्करबुवा बखले

    बडोद्यातील कीर्तनकार पिंगळेबुवा यांच्याकडे भास्करबुवानी गायनकलेचा श्रीगणेशा केला. त्यांचा जन्म १७ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला. पुढे ख्यातनाम बीनकार बंदे अलीखाँ यांनी बखलेंची शिकवणी घेतली. फैजमहंमदखाँ, नथ्थनखाँ आग्रेवाले यांच्याकडे भास्करबुवांचे पुढचे शिक्षण झाले. या सगळ्या अथक मेहनतीनंतर भास्करबुवा बखले यांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर या घराण्यांच्या गायकींवर प्रभुत्व मिळवले. नाट्यगीत, ठुमरी, भजन, टप्पा, पंजाबी लोकसंगीत, लावणी, गझल, ध्रुपद धमार, आणि ख्यालगायन या सगळ्यांवर भास्करबुवांची विलक्षण हुकमत होती. संगीतकलेवरील त्यांचे प्रभुत्व पाहून लोक त्यांना देवगंधर्व म्हणू लागले.

    शास्त्रीय संगीतावर आधारित चिजांच्या चाली मराठी आणून भास्करबुवांनी मराठी नाट्यगीते संगीतबद्ध केली. किर्लोस्कर व गंधर्व नाटक कंपन्यांत त्यांनी संगीत विषयाचे प्रमुख गुरू म्हणून काम केले. बालगंधर्व, मास्टर कृष्णराव, गोविंदराव टेंबे आदींनी भास्करबुवा बखले यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. जालंधर, सियालकोट, कराची, म्हैसूर येथील मैफिली भास्करबुवांनी गाजवल्या.
    त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीतर्फे 'रामराज्यवियोग' या नाटकात मंथरेची, संगीत सौभद्र या नाटकात नारदाची आणि संगीत शाकुंतलात शकुंतलेची भूमिकाही साकारल्या होत्या. त्यांनी व गोविंदराव टेंबे यांनी संगीत मानापमान व संगीत स्वयंवर नाटकांच्या पदांच्या चाली बांधल्या होत्या. याशिवाय भास्करबुवा बखले यांनी संगीत द्रौपदी व संगीत विद्याहरण या नाटकांचे संगीत दिग्दर्शनही केले होते. दुर्दैवाने भास्करबुवांच्या आवाजातली एकही कलाकृति ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध नाही.

    १९११ साली भास्करबुवांनी भारत गायन समाज ही संस्था हिंदुस्तानी संगीत पद्धतीच्या प्रसारार्थ स्थापली. गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले यांनी स्थापन केलेल्या पुणे भारत गायन समाज संस्थेच्या भास्कर संगीत विद्यालयातर्फे शास्त्रीय संगीताचे शिक्षण दिले जाते. संस्थेच्या संगीत अभ्यासक्रमाला १९६२ मध्ये राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक संगीत विद्यालये ही भास्कर संगीत विद्यालयाशी संलग्न आहेत. त्यांनी ग्वाल्हेर घराण्याच्या संगीताबद्दल लिहिलेले अर्धेमुर्धे पुस्तक भास्कबुवांच्या शैला दातार या नातसुनेने पूर्ण करून प्रकाशित केले आहे. पुण्याचा भारत गायन समाज दरवर्षी भास्करबुवांच्या स्मृतिदिनी संगीत समारोह आयोजित करतो.

    भास्करबुवांच्या स्मरणार्थ १९२६ मध्ये स्थापन झालेला मुंबईतील कल्याण गायन समाज, वर्षभर विविध संगीत सभा तर घेतोच, शिवाय त्यांच्या वर्षदिनी देवगंधर्व संगीत महोत्सव भरवतो. चंदीगडमधील प्राचीन कला केंद्र दरवर्षी अखिल भारतीय भास्करराव नृत्य व संगीत संमेलन आयोजित करते. पुणे विद्यापीठ पंडित बी.ए.ला संगीतात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला भास्करबुवा बखले पुरस्कार देते. भास्करबुवा बखले यांचे ८ एप्रिल १९२२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ- इंटरनेट

  • अभिनेता विलियम जोसेफ लारा

    मॉडेलिंगपासून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने टार्झनमध्ये मुख्य भूमिका साकारली. 1996 ते 1997 मध्ये बीच ऑन एयर झालेल्या टार्झन सीरीजच्या 22 एपिसोडमध्ये ज्यो ने प्रेक्षकांवर छाप सोडली. ज्यो ने टार्झनसह अमेरिकन साइबॉर्ग स्टील वॉरिअर, स्टील फ्रंटियर, वॉरहेड आणि टीव्ही मालिका वेवॉच आणि कोनान द ॲ‍डव्हेंचरमध्ये काम केले होते. 2018मध्ये आलेल्या समर ऑफ 67मध्ये तो झळकला होता. ज्यो ने ग्वेनसोबत लग्न केले होते. दोघेही ब्रेंटवुडमध्ये आपल्या दोन मुलींसोबत रहात होते.

  • `ज्ञानकोशकार’ डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर

    `ज्ञानकोशकार’ म्हणून डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या नावामागे उपाधी लागली असली तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पांडित्य आणि विक्षिप्तपणा यांचे अजब मिश्रण होते. श्रीधर व्यंकटेश केतकर हे एक लेखक, समाजशास्त्रज्ञ व विचारवंत म्हणून जेवढे ज्ञात आहेत, त्यापेक्षा ‘ज्ञानकोशकार केतकर’ म्हणून अधिक सुपरिचित आहेत. त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १८८४ रोजी झाला.समाजप्रबोधनासाठी जीवनभर अत्यंत निर्धारपूर्वक झटलेले व ‘भारतीय जातिसंस्थेचा इतिहास’ या आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तकाने देशाबरोबरच पाश्चारत्त्य जगातही मान्यता पावलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर. एक समाजशास्त्रज्ञ, विचारवंत आणि लेखक म्हणून ते लोकप्रिय ठरले हे खरे, पण ‘ज्ञानकोशकार केतकर’ म्हणून ते विशेष प्रसिद्ध झाले.

    डॉ. केतकर यांनी मनाचा निश्चरय करून ज्ञानकोशाचे कार्य पूर्ण करायचेच असा निर्धार जेव्हा केला, तेव्हा सुप्रसिद्ध इतिहास संशोधक वि. का. राजवाडे यांनी आपल्या मनातील रास्त शंका केतकरांपुढे मांडीत म्हटले, ‘हे काम एवढे अवाढव्य आहे की, त्यासाठी एखाद्याची पुरी हयात खर्च होईल.’ डॉ. केतकर यावर स्मितहास्य करीत म्हणाले,‘ प्रयत्न तरी करून पाहूया.’ आणि डॉ. केतकर यांनी आपल्या प्रचंड मेहनतीने हे अपूर्व व असामान्य काम बारा वर्षांत पूर्ण केले व याकामी आपणास सहकारी संपादक म्हणून य. रा. दाते, चिं. ग. कर्वे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले हेही अत्यंत प्रांजळपणे कबूल केले. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे कोकणातील दाभोळजवळील अंजनवेल हे मूळ गाव. त्यांचे वडील पोस्ट खात्यात पोस्टमास्तर होते. वडीलांचे छत्र लहानपणीच नाहीसे झाल्यामुळे आईच्या मदतीने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. प्राथमिक दुसर्याा इयत्तेपासून प्रवेश मिळेपर्यंत त्यांचे शिक्षण उमरावतीस झाले. तिसरीहून चौथीत जाताना त्यांनी ‘हायस्कूल एंट्रंस’ ही परीक्षा देऊन पहिल्याप्रथमच आपली शालेय चमक दाखवली. नववीत असताना गंमत म्हणून ते दहावीच्या परीक्षेला बसले व अनेक विषयांत उत्तम गुण मिळवून शिक्षकांच्या कौतुकास पात्र ठरले. पुढे व्हर्नाक्युलर स्कॉलरशिप’ च्या परीक्षेत बसून दुसर्यात क्रमांकावर उत्तीर्ण झाले.

    शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या केतकर यांनी अनेक हालअपेष्टांना तोंड देत ते उच्चविभूषित झाले. शिवाय शालेय जीवनात जोपासलेल्या वाचन, कविता करणे, इतिहास, वाङ्‌मय, राजकारण, रोमन कायदा यांत विशेष रस घेणे यांचा फायदा त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात झाला. ते इंग्लंडमध्ये सांपत्तिक स्थिती हलाखीची असूनही उच्च शिक्षण घेताना कसे जीवन जगले व शिक्षणाची हौस पूर्ण केली हे समजून घेणे उचित ठरेल. इंग्लंडमध्ये ‘हिंदुइझम’ या तेथे प्रसिद्ध झालेल्या आपल्या ग्रंथावर आणि ‘अथिनियम’ किंवा ‘राजस्थान’ या नियतकालिकात समालोचन करून किंवा लेख लिहून ते आपला उदरनिर्वाह चालवित. पण या पैशांतून भागत नसे. तेव्हा ते दिवसातून एकदाच जेवण घेत. जेवणाला पुरेसे पैसे नसल्यामुळे लंडनमध्ये स्वस्तात स्वस्त जेवण कुठे मिळेल याचे ते ‘तज्ज्ञ’ बनले. ते स्वस्त जेवण जेवण्यास ये-जा करण्यासाठी खिशात आवश्यक पैसे नसल्याने लंडनमध्ये पायी फिरण्याची ‘खास मौज’ ते अनुभवीत. पण आपले हे दैन्य त्यांनी इतरांना दाखवून दिले तर नाहीच, पण त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये याची खबरदारीही त्यांनी घेतली.

    ऑक्टोबर १९१२ मध्ये उच्चविद्याविभूषित होऊन ते जेव्हा हिंदुस्थानात परतले तेव्हा त्यांच्या जीवनातील खर्याा कार्यास सुरवात झाली. त्याकाळी अनेक हिंदुस्थानी लोक पाश्चाेत्य पदवी संपादून मायदेशी येत व बड्या पगाराची नोकरी मिळवून ऐषारामी जीवन जगत. पण डॉ. केतकर यांनी अनुकरण केले ते रँग्लर अप्पासाहेब परांजपे यांचे. त्यांनी त्यागपूर्वक जीवन जगण्याचा निर्धार केला होता. १९१३-१४ च्या दरम्यान त्यांनी कलकत्ता विद्यापीठात पदवीधर विद्यार्थ्यांना राजकारण व अर्थशास्त्र शिकविण्याचे काम स्वीकारले खरे, पण त्यांच्या सत्य बाण्यामुळे त्यांना नोकरीचा त्याग करावा लागला. येथील वास्तव्यात त्यांनी ‘इंडियन इकॉनॉमिक्स’ हे पुस्तक लिहिले, पण त्यातील सत्यांशामुळे ते विरोधाचे धनी बनले. ‘हिंदू लॉ’ या दुसर्याय पुस्तकात त्यांनी अर्थकारण व समाजनियमन या दोन क्षेत्रांतील विचारांना चालना दिली. शिवाय सामाजिक, राजकीय विषयांवर अभ्यासपूर्ण लेख लिहून समाजमन जागृत करण्याचे काम केले. या वेळपर्यंत त्यांची परिपक्व झालेली परिस्थिती आणि कर्तबगार व्यक्तींचे प्रयत्न यांची सांगड पडली की त्यातून मोठी कार्ये उभी राहत असतात याची पूर्ण जाणीव झाली आणि त्यांनी ‘ज्ञानकोशा’च्या भव्य दिव्य कार्यात स्वतःला अक्षरशः झोकून दिले. तोपर्यंत तेलगू, बंगाली, हिंदी, गुजराथी, ऊर्दू यांसारख्या भारतीय भाषांत ज्ञानकोश तयार झाले होते.

    केतकरांनी ‘मराठी’ ज्ञानकोशाचा ध्यास घेतला. १९१५ च्या ऑगस्टमध्ये त्यांनी सर्वप्रथम ज्ञानकोशाची कल्पना मांडली व आर्थिक अडचणींवर मात करीत असंख्यांचे असंतोष मनात साठवित व असंख्यांचे सहकार्य घेत बारा वर्षांनी त्यांनी हा ज्ञानकोश तयार केला. त्यांच्या या अद्वितिय कार्याची पावती देत त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या ‘श्रीधर व्यंकटेश केतकर’ या नावाऐवजी त्यांना ‘श्रीधर व्यंकटेश ज्ञानकोशे’ असे संबोधून त्यांचा गौरव केला. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे १० एप्रिल १९३७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट