(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • भरत सासणे

    ‘‘माणसाचा शोध, त्याच्या नात्यांच्या जाळ्याचा शोध, हे माझे आकर्षण आहे. इथली माती, इथली परंपरा, जीवनपद्धती, बुद्धिवाद्यांना वाटते तितकी सोपी नाही. इथे विसंगतीत सुसंगत एकात्मता आहे. ही रहस्यांची दालने आहेत. हाडामांसाचा माणूस स्त्री आणि पुरुष, त्यांचे परस्परांशी असलेले गूढ संबंध, त्यांची संदर्भसुसंगत जीवनपद्धती या सर्वाचे माझ्या लेखनाला मोठे आकर्षण आहे.

    त्यातूनच प्रेरणा मिळते. माणूस शोधणे ही माझ्यातल्या लेखकाची प्रतिज्ञा आहे. ते जमेल असे वाटते, बघू या.’’ दोनेकच पुस्तके प्रकाशित असताना ललित मासिकाच्या १९८८ सालातील विशेषांकामध्ये कथेविषयीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पाचारण करण्यात आलेल्या या लेखकाची भविष्यातील लेखनघोडदौड ठरलेली होती. कारण माणूस अंतर्बाह्य़ शोधण्याची प्रतिज्ञा दीर्घ कथांद्वारे जमवून दाखविण्याची किमया भारत सासणे यांनी आजही कायम ठेवलेली आहे.

    शतकभरापासून कायम पिछाडीवर पडलेल्या आणि साहित्यमरतडांकडून अवहेलना वाटेला आलेल्या कथा या साहित्यप्रकाराला मर्यादा निश्चित असली, तरी मराठी ललित साहित्य जगतात नवकथेच्या कालखंडापासून ते आजच्या टेक्नोसॅव्ही जगापर्यंत वाचनव्यवहार म्हणून जो काही भाग अस्तित्वात आहे, त्यात कथांचे स्थान अढळ आहे. एके काळी गाडगीळ, गोखले, भावे, माडगुळकर, मोकाशी लेखक पंचकांनी कथांची मोहिनी विस्तारली. जी.ए.कुलकर्णी यांनी त्याच वेळी आपल्या कथेची वेगळी यक्षनगरी उभारली. त्यानंतरही अनेक दिग्गजांनी आपल्या लेखन कारकीर्दीचा काही काळ कथांना विभागून दिला. या दिग्गजांमध्ये सातत्याने दीर्घकथा या फॉर्मशी खेळत आणि त्यातील सर्व शक्यता सूक्ष्म पातळीवर आजमावणारी कथा घेऊन येणारे लेखक म्हणजे भारत सासणे.

    बीड जिल्ह्य़ाचे माजी जिल्हाधिकारी म्हणूनही नावाजलेल्या सासणे यांनी गेली तीन दशके कविता, एकांकिका, नाटके, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध साहित्यक्षेत्रांत सारख्याच ताकदीने आपली जादुई लेखणी चालविली. मात्र साहित्य जगतात त्यांची कथाकार म्हणून जी ओळख आहे, ती आभाळाएवढी नक्कीच आहे. धुळे शहरामध्ये बालपण घालविलेल्या सासणे यांनी आपल्या लहानपणीच्या भोवतालाचे ठसे लेखनात उमलून आल्याचे नुकतेच कुठेतरी शब्दबद्ध केले आहे.

    जॉन आणि अंजिरी पक्षीपासून त्यांच्या प्रत्येक संग्रहात उत्तरोत्तर माणसाचा शोध गहिरा होत गेला आहे. डफ, उंट, कॅम्प, दुश्चिन्ह आणि चाफ्याचं झाड, रात्र, क्षितिजावरची रात्र, उपसंहार, ठकाजी रामाच्या स्मरणातील रात्र, दु:ख, लग्न, दूर तेथे, दूर तेव्हा, रंगराजाचा अजगर आणि कितीही वाढवत न्यावीत आणि न संपावीत, अशी सासण्यांच्या कथारत्नांची नावे त्यांच्या लेखनाच्या चाहत्यांकडून सांगितली जातील. सूक्ष्म तपशील, खोलवरची चिंतनशीलता, वाचकाला बोट धरून आपल्या विलक्षण सुख-दु:खांच्या जगात नेऊन सोडण्याची हातोटी, तरल काव्यात्मकता आणि तत्त्वज्ञानात्मक आशय ही त्यांच्या कथेची बलस्थाने आहेत. त्यांच्या जमलेल्या कथामफिलीतून दरवर्षी मोजक्याच कथारत्नांद्वारे परिघाबाहेरच्या आणि कल्पनातीत आयुष्यांचे पट सादर होत असतात.

    चिरतरुण दु:खांचे बुरूजदर्शन घडविणाऱ्या या यक्षनगरीच्या सम्राटाला साहित्यातील असाधारण कामगिरीबद्दल जाहीर झालेला लाभसेटवार पुरस्कार त्यांच्या कथांना मिळालेला यथोचित सन्मान म्हणावा लागेल.

  • लेखक, निर्माते आणि वितरक शरद पिळगावकर

    शरद पिळगावकर यांचे गाव 'पिळगाव'. शरद पिळगावकर मुंबईत छोटामोठा ऑर्केस्ट्रा चालवायचे. यात ते स्वतःही गायचे आणि सचिनची आईदेखील. सचिन यांच्या जन्मानंतर पिळगावकरांचं संगीत क्षेत्रातील बस्तान चांगलंच बसत आलं होतं. चित्रपटसृष्टीमध्ये शरद पिळगावकरांची ब-यापैकी ओळख होवू लागली. कलागुणांना उत्तेजन देणारे आणि कलेचे व्यासंगी असलेल्या पिळगावकरांनी आपल्या मुलातील असलेली चुणुक ओळखली नसती तरच नवल. राजा परांजपे या आपल्या मित्राला त्यांनी सचिनबद्दल सहज म्हणुन सांगुन पाहिलं.

    'हा माझा मार्ग एकला' ची तयारी तेव्हा सुरू होती. साडेचार वर्षाच्या सचिनला यात महत्त्वाची बालकलाकाराची भुमिका मिळाली, आणि या भुमिकेसाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही. शरद पिळगावकरांनी जेव्हा मराठीत चित्रपट करायचे ठरवले तेव्हा गाणी एन. दत्ताच करतील, असा निश्चय केला होता. त्याप्रमाणे पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक राजदत्त यांनी कथा ऐकवताच त्याला तात्काळ होकार दिला आणि अपराध हा माईल स्टोन चित्रपट निर्माण झाला,'अपराध मीच केला' हे नाटक शरद पिळगावकर यांनी मधुसुधन कालेलकरांना सुचविले होते, ज्याचा विषय होता 'कमांडर नानावटी खटला'.

    सव्वा शेर, चोरावर मोर जागृती, अपराध व अष्टविनायक हे त्यांचे गाजलेले चित्रपट. त्यातील अष्टविनायक हा तर लोकांना आवडलेला सर्वात चित्रपट. सांगली जिल्ह्यातल्या एका गणेश भक्त असलेल्या उद्योगपतीच्या जीवनात १९७५ साली घडलेल्या घटनेवर हा चित्रपट आधारित असल्याच चित्रपटाच्या सुरुवातीला सांगण्यात आलेलं आहे. शरद पिळगावकर यांचे चिरंजीव सचिन पिळगावकर हे आज सुद्धा मराठीतील आघाडीचे कलाकार आहेत. शरद पिळगावकर यांचे १७ जून १९८३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • विजय जाधव

    पुण्याच्या नॅशनल फिल्म अर्काइव्हज्मध्ये डायरेक्टरच्या ऑफिसात, शास्त्रीय संगीत ऐकत कामात बुडून गेलेले विजय जाधव हे खरच एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. जाधवांनी एनएफएआयच्या डायरेक्टर पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संस्थेने ‘सरकारी’ कात कधी टाकली हे कळलेच नाही. लहान वयातच मोठी जबाबदारी मिळूनही, ती सक्षमपणे संभाळण्याची किमया त्यांनी केलीच, शिवाय फक्त कलाकारांचा राबता असलेली संस्था नकळतच सामान्य सिनेप्रेमींसाठी कायमची खुली करून दिली.

  • प्रतिभावान संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकी

    प्रतिभावान संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकींचे मूळ आडनाव नवाथे. पण मंगेशाला अभिषेक करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आला अन् ते अभिषेकी बनले.

    त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. पण ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊनही त्यांचे मित्र मात्र समाजाच्या सर्व थरांतले होते.

    नाव जितेंद्र पण मंगेशीतले सर्वजण त्यांना ‘गंपू’ म्हणून हाक मारायचे. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घ्यायला सुरवात केली. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथाश्रमात राहून, वारावर जेवून, माधुकरी मागून ते शिकले.

    त्यांनी एकूण २१ गुरु केले व प्रत्येक गुरुकडून नेमकं तेवढंच घेतलं. ते सारे संस्कार आत्मसात करून आपली स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. संगीताची आराधना करत असताना त्यांनी त्यांच्या शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. ते संस्कृतचे पदवीधर होते. त्यांचे वाचन अफाट होते. संस्कृतपासून ते उर्दु शेरोशायरी पर्यंतचे कितीतरी साहित्य त्यांना मुखोद्गत होते.

    सुस्पष्ट उच्चार,लयकारी व सरगम यांनी नटलेली ख्यालगायकी आणि विशेष कटाक्ष ठेऊन मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायनाचं मर्म होतं. गोवा कला अकादमीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्वाचा गुणधर्म.

    अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे. विद्याधर गोखल्यांच्या नंतरच्या काळात मराठी रंगभूमीला आलेली मरगळ दूर करून रंगभूमी पुन्हा टवटवित झाली ती १९६४ साली आलेल्या वसंत कानेटकर लिखित आणि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित संगीत मत्स्यगंधा या नाटकामुळे. या नाटकातल्या पदांचं संगीत अभिषेकींचे होतं. त्यांनी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. ‘मत्स्यगंधा’ नाटकातील सुरूवातीची नांदी ही पंडितजींची शब्दरचना व चाल होय.

    एकाच गाण्यात अनेक राग व ताल हा एक वेगळा प्रयोग त्यांनी ‘कटयार’ मधील ‘सुरत पियाकी’ या रागमालेत केलेला दिसतो. ‘घेई छंद मकरंद’ या पदासाठी दोन घराण्यातील गायन शैली तर दिग्दर्शन ही एक ईश्वरी देणगीच आहे हे ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या पदावरून प्रत्ययास येते. हे पद म्हणजे नाटयसंगीतातील पसायदान होय. ‘काटा रूते कुणाला’ ‘रती रंगी’ ‘कैवल्याच्या’ ‘हे सुरांनो’ ‘हे बंध रेशमाचे’ ‘साद देती हिमशिखरे’ इ.अनेक प्रासादिक रचना त्यांनी केल्या.

    पंडितजींनी ‘मत्स्यगंधा’ ते ‘महानंदा’ मराठी संगीत नाटकांचे ‘अभिषेकी युग’ त्यांनी तयार केले व गाजवले आणि मोठी क्रांती घडवून आणली. तर १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या लेकुरे उदंड झाली या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्राया नाट्य प्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला. या नाटकात सगळ्यात पहिल्यांदा रेकॉर्डेड साऊंड ट्रॅक्स वापरले गेले. हे संगीत काळाच्या पुढे जाणारं होतं.

    अभिषेकींनी जसं स्वत: संगीत दिलं तसं दुसर्‍यांच्या संगीत दिग्दर्शनातही ते गायले. आकाशवाणीसाठी केलेल्या बिल्हण या संगीतिकेत पु.लं.च्या संगीत दिग्दर्शनात ते गायले. यातली गीते मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली होती. आकाशवाणी वर असतांना त्यांनी अनेक कोकणी गाण्यांनाही संगीत दिलं. पंडीतजीनी कोकणी नाटकात कामे केली होती. पं. अभिषेकी बोरकर संपादित ‘पोरजेचो आवज’ या नियतकालिकात लेखन करीत असत. ‘वैशाख वणवा’ या चित्रपटासाठी चित्रपटाचे लेखन पं.महादेवशास्त्री जोशी यांच्या सांगण्यावरून केले होते. पंडीतजीनी ‘गोमू माहेरला जाते हो नाखवा’ हे कोकणी नाखवा गीत गायले होते. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेले हे त्यांचे एकमेव चित्रपट गीत. नाटयसंगीत भक्तीगीत अभंग भावगीत हिन्दी भजन यांना लावलेल्या चालींची संख्या १०० ते १५०च्या दरम्यान जाते. जवळजवळ १७ नाटकांचे दिग्दर्शन केले.

    पं. अभिषेकी १९७० साली पं.रविशंकर यांचे बरोबर प्रथम अमेरिकेस गेले. तेथे विद्यादानाचे काम केले. त्यामध्ये संगीत देवनागरी लीपी भारतीय भाषा हेही शिकवीले. दोन वर्षांनी स्वतंत्रपणे अमेरिकेत कार्यक्रम केले. भारतात व परदेशात पंडितजींनी अनेक संगीत मैफिली गाजविल्या.

    पंडीतजी गवैये तसे खवैयेही होते. एखादी गोष्ट आवडली की ते त्याचा मनमुराद आनंद लुटत. एकदा तर त्यांनी ४० ते ५० पाणीपुर्‍या खाल्या होत्या असे सांगतात, त्यांच्यात पहेलवानी मस्तीसुद्धा होती.

    १९९५ मध्ये पंडितजींनी नाटय संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. ‘गोवा कला अकादमी’च्या व ‘संगीत नाटक अकादमी’च्या जनरल कौन्सिलचे ते मेंबर होते.

    जितेंद्र अभिषेकी यांचे ७ नोव्हेंबर १९९८ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    https://www.youtube.com/watch?v=2AJq1VvaCGw

    https://www.youtube.com/watch?v=BZVAfYiqsjk

    https://www.youtube.com/watch?v=tZol6tvKek8&list=RDEMRmOnePfCSRghjwOefhLJTw&index=2

    https://www.youtube.com/watch?v=mB9uW1I28EM&index=4&list=RDEMRmOnePfCSRghjwOefhLJTw

    https://www.youtube.com/watch?v=kmGeigOguMg&index=8&list=RDEMRmOnePfCSRghjwOefhLJTw

    https://www.youtube.com/watch?v=t0XLyce4HQM&index=9&list=RDEMRmOnePfCSRghjwOefhLJTw

    https://www.youtube.com/watch?v=er5W9FLyPKA

  • नम्रता शिरोडकर

    नम्रता शिरोडकरने १९९८ साली “जब प्यार किसी से होता है”, या चित्रपटातील एका छोट्याश्या भुमिकेतून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्याशिवाय ‘मेरे दो अनमोल रतन’, ‘हीरो हिन्दुस्तानी’, ‘कच्चे धागे’, ‘वास्तव’, ‘आगाज़’, ‘हेरा फेरी’, ‘अस्तित्व’, ‘पुकार’, ‘अलबेला’, ‘तेरा मेरा साथ रहे’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘मसीहा’, ‘तहज़ीब’, ‘रोक सको तो रोक लो’, ‘चरस’, ‘ब्राइड एंड प्रीजुडिस’; यासह अनेक भारतीय चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत

  • मराठीतील रुबाबदार नायक अरुण सरनाईक

    एका परिपूर्ण अभिनेत्याकडे ज्या काही गोष्टी लागतात, त्या सर्वांचा अंतर्भाव अरुण सरनाईक यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये पाहायला मिळाला होता. त्यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९३५ रोजी झाला. अरुण सरनाईक यांचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीतज्ज्ञ होते तर त्याचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक. गाण्याचं हे अंग त्यांना या जोडीकडूनच मिळालं. त्यामुळे अभिनयात नावारूपास येण्यापूर्वीच त्यांनी पेटी, तबल्यात मातब्बरी मिळवली होती. मो. ग. रांगणेकर हे "भटाला दिली ओसरी' हे नाटक बसवीत होते. या नाटकात अरुणनं काम केलं. याच वेळी एक उत्कृष्ट संधी मा.अरुण सरनाईक यांच्या कडे चालून आली. विख्यात दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या डोक्यापत "शाहीर प्रभाकर' हा चित्रपट करण्याचं घोळत होतं. यातील शीर्षक व्यक्तिरेखा अरुण सरनाईक यांनी साकारावी, असं त्यांच्या मनात होतं. परंतु, हा चित्रपट काही कारणांमुळे बनला नाही आणि अरुण सरनाईक यांचे चित्रपटसृष्टीतील पदार्पण काही काळ लांबलं. प्रख्यात लेखक-दिग्दर्शक अनंत माने यांनी "शाहीर परशुराम' चित्रपटात अरुण सरनाईक यांना एक दुय्यम भूमिका दिली. "रंगल्या रात्री अशा' या चित्रपटानं किमया केली आणि अरुण सरनाईक यांचा अरुणोदय झाला. या चित्रपटानं सरनाईकांना मोठा "फॅन फॉलोअर' मिळाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे या काळातले मोठे चाहते ठरले. या चित्रपटासाठी प्रख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखॉं यांनी तबलावादन केलं होतं. प्रत्यक्ष चित्रपटात तबल्यावरील सरनाईकांची सफाई पाहून अल्लारखॉंनी त्यांचं कौतुक केलं होतं. त्यापुढं जात शिवसेनाप्रमुखांनी या कलावंताचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचं भाकीत केलं आणि नंतर ते खरं ठरलं. बुलंद आवाज, अभिनय आणि संवादफेकीच्या जोरावर हा कलावंत बघताबघता इतरांच्या पुढं गेला. त्या काळातला चित्रपट हा ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या कथानकांच्या उंबरठ्यावर होता. सरनाईकांनी या दोन्ही प्रकारांमध्ये मातब्बरी मिळवली. सुरुवातीच्या काळातच त्यांनी भूमिकांची प्रयोगशीलता जपली. राजा ठाकूर दिग्दर्शित "पाहू रे किती वाट' या चित्रपटात ते डॉ. चारुदत्त या नायकाच्या व्यक्तिरेखेत झलकले तर "सुभद्राहरण' या चित्रपटात त्यांनी थेट दुर्योधनाचा खलनायक साकारला. सरनाईकांची कारकीर्द उंचावली जाण्यास कारणीभूत ठरलेले चित्रपट म्हणजे "एक गाव बारा भानगडी', "केला इशारा जाता जाता', "सवाल माझा ऐका', "सिंहासन' आदी चित्रपट. "सवाल माझा ऐका'मधील त्यांचा ढोलकीवाला जयवंत आजही रसिकांच्या लक्षात आहे. असाच ढोलकीवाला त्यांनी "केला इशारा जाता जाता' या चित्रपटातही साकारला होता. "पाच नाजूक बोटे' या चित्रपटात सरनाईकांनी सज्जन आणि दुर्जन भावांची दुहेरी भूमिका मोठ्या ताकदीनं सादर केली. "मुंबईचा जावई'मधील सरनाईकांचा नाट्यवेडा अविनाश लक्षणीय ठरला. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित "सिंहासन' मधील मुख्यमंत्र्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी आवश्यसक असलेले भावदर्शन सरनाईकांनी या व्यक्तिरेखेत एकवटले होते. सरनाईकांमधील संगीताचा आविष्कार पडद्यावर आणण्यास कारणीभूत ठरले ते संगीतकार राम कदम. "डोंगरची मैना' आणि "गणगौळण' या दोन चित्रपटात कदम यांनी सरनाईकांना पार्श्वीगायनाची संधी दिली. "घरकुल' या चित्रपटासाठी सी. रामचंद्र यांनी त्यांच्याकडून "पप्पा सांगा कुणाचे' हे अजरामर गीत गाऊन घेतलं. त्यानंतर काही वर्षांनी आलेल्या "चंदनाची चोळी अंग अंग जाळी' या चित्रपटामधील "एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावाणी फुलला गं...' हे गाणंही सरनाईकांमधील श्रेष्ठ गायकावर शिक्कामोर्तब करणारं ठरलं. चित्रीकरणातून वेळ मिळाला की कुष्ठरुग्णांसाठी काम करणाऱ्या "आनंदग्राम'मध्ये ते स्वतःला झोकून द्यायचे. अरुण सरनाईक यांचे २१ जून १९८४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- मंदार जोशी / इंटरनेट

  • केशव बाबूराव लेले

    शिल्पकार र.कृ. फडके यांनी सुरू केलेल्या व केशव लेले यांच्या अशा प्रदर्शनांनी महाराष्ट्रातील जनसामान्यांची यथार्थदर्शी वास्तववादी कलेप्रती असलेली अभिरुची वाढवली. त्यातूनच कलेच्या विविध शैलींतील प्रगल्भतेऐवजी आजही महाराष्ट्रात याच प्रकारच्या यथार्थदर्शी कलेचा प्रभाव आढळून येतो.

  • ज्येष्ठ दिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर

    प्रभाकर पेंढारकर हे चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचे सुपुत्र असलेल्या पेंढारकर यांनी अनेक दर्जदार चित्रपटांची निर्मिती केली.

  • `ज्ञानकोशकार’ डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर

    `ज्ञानकोशकार’ म्हणून डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या नावामागे उपाधी लागली असली तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पांडित्य आणि विक्षिप्तपणा यांचे अजब मिश्रण होते. श्रीधर व्यंकटेश केतकर हे एक लेखक, समाजशास्त्रज्ञ व विचारवंत म्हणून जेवढे ज्ञात आहेत, त्यापेक्षा ‘ज्ञानकोशकार केतकर’ म्हणून अधिक सुपरिचित आहेत. त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १८८४ रोजी झाला.समाजप्रबोधनासाठी जीवनभर अत्यंत निर्धारपूर्वक झटलेले व ‘भारतीय जातिसंस्थेचा इतिहास’ या आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तकाने देशाबरोबरच पाश्चारत्त्य जगातही मान्यता पावलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर. एक समाजशास्त्रज्ञ, विचारवंत आणि लेखक म्हणून ते लोकप्रिय ठरले हे खरे, पण ‘ज्ञानकोशकार केतकर’ म्हणून ते विशेष प्रसिद्ध झाले.

    डॉ. केतकर यांनी मनाचा निश्चरय करून ज्ञानकोशाचे कार्य पूर्ण करायचेच असा निर्धार जेव्हा केला, तेव्हा सुप्रसिद्ध इतिहास संशोधक वि. का. राजवाडे यांनी आपल्या मनातील रास्त शंका केतकरांपुढे मांडीत म्हटले, ‘हे काम एवढे अवाढव्य आहे की, त्यासाठी एखाद्याची पुरी हयात खर्च होईल.’ डॉ. केतकर यावर स्मितहास्य करीत म्हणाले,‘ प्रयत्न तरी करून पाहूया.’ आणि डॉ. केतकर यांनी आपल्या प्रचंड मेहनतीने हे अपूर्व व असामान्य काम बारा वर्षांत पूर्ण केले व याकामी आपणास सहकारी संपादक म्हणून य. रा. दाते, चिं. ग. कर्वे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले हेही अत्यंत प्रांजळपणे कबूल केले. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे कोकणातील दाभोळजवळील अंजनवेल हे मूळ गाव. त्यांचे वडील पोस्ट खात्यात पोस्टमास्तर होते. वडीलांचे छत्र लहानपणीच नाहीसे झाल्यामुळे आईच्या मदतीने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. प्राथमिक दुसर्याा इयत्तेपासून प्रवेश मिळेपर्यंत त्यांचे शिक्षण उमरावतीस झाले. तिसरीहून चौथीत जाताना त्यांनी ‘हायस्कूल एंट्रंस’ ही परीक्षा देऊन पहिल्याप्रथमच आपली शालेय चमक दाखवली. नववीत असताना गंमत म्हणून ते दहावीच्या परीक्षेला बसले व अनेक विषयांत उत्तम गुण मिळवून शिक्षकांच्या कौतुकास पात्र ठरले. पुढे व्हर्नाक्युलर स्कॉलरशिप’ च्या परीक्षेत बसून दुसर्यात क्रमांकावर उत्तीर्ण झाले.

    शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या केतकर यांनी अनेक हालअपेष्टांना तोंड देत ते उच्चविभूषित झाले. शिवाय शालेय जीवनात जोपासलेल्या वाचन, कविता करणे, इतिहास, वाङ्‌मय, राजकारण, रोमन कायदा यांत विशेष रस घेणे यांचा फायदा त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात झाला. ते इंग्लंडमध्ये सांपत्तिक स्थिती हलाखीची असूनही उच्च शिक्षण घेताना कसे जीवन जगले व शिक्षणाची हौस पूर्ण केली हे समजून घेणे उचित ठरेल. इंग्लंडमध्ये ‘हिंदुइझम’ या तेथे प्रसिद्ध झालेल्या आपल्या ग्रंथावर आणि ‘अथिनियम’ किंवा ‘राजस्थान’ या नियतकालिकात समालोचन करून किंवा लेख लिहून ते आपला उदरनिर्वाह चालवित. पण या पैशांतून भागत नसे. तेव्हा ते दिवसातून एकदाच जेवण घेत. जेवणाला पुरेसे पैसे नसल्यामुळे लंडनमध्ये स्वस्तात स्वस्त जेवण कुठे मिळेल याचे ते ‘तज्ज्ञ’ बनले. ते स्वस्त जेवण जेवण्यास ये-जा करण्यासाठी खिशात आवश्यक पैसे नसल्याने लंडनमध्ये पायी फिरण्याची ‘खास मौज’ ते अनुभवीत. पण आपले हे दैन्य त्यांनी इतरांना दाखवून दिले तर नाहीच, पण त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये याची खबरदारीही त्यांनी घेतली.

    ऑक्टोबर १९१२ मध्ये उच्चविद्याविभूषित होऊन ते जेव्हा हिंदुस्थानात परतले तेव्हा त्यांच्या जीवनातील खर्याा कार्यास सुरवात झाली. त्याकाळी अनेक हिंदुस्थानी लोक पाश्चाेत्य पदवी संपादून मायदेशी येत व बड्या पगाराची नोकरी मिळवून ऐषारामी जीवन जगत. पण डॉ. केतकर यांनी अनुकरण केले ते रँग्लर अप्पासाहेब परांजपे यांचे. त्यांनी त्यागपूर्वक जीवन जगण्याचा निर्धार केला होता. १९१३-१४ च्या दरम्यान त्यांनी कलकत्ता विद्यापीठात पदवीधर विद्यार्थ्यांना राजकारण व अर्थशास्त्र शिकविण्याचे काम स्वीकारले खरे, पण त्यांच्या सत्य बाण्यामुळे त्यांना नोकरीचा त्याग करावा लागला. येथील वास्तव्यात त्यांनी ‘इंडियन इकॉनॉमिक्स’ हे पुस्तक लिहिले, पण त्यातील सत्यांशामुळे ते विरोधाचे धनी बनले. ‘हिंदू लॉ’ या दुसर्याय पुस्तकात त्यांनी अर्थकारण व समाजनियमन या दोन क्षेत्रांतील विचारांना चालना दिली. शिवाय सामाजिक, राजकीय विषयांवर अभ्यासपूर्ण लेख लिहून समाजमन जागृत करण्याचे काम केले. या वेळपर्यंत त्यांची परिपक्व झालेली परिस्थिती आणि कर्तबगार व्यक्तींचे प्रयत्न यांची सांगड पडली की त्यातून मोठी कार्ये उभी राहत असतात याची पूर्ण जाणीव झाली आणि त्यांनी ‘ज्ञानकोशा’च्या भव्य दिव्य कार्यात स्वतःला अक्षरशः झोकून दिले. तोपर्यंत तेलगू, बंगाली, हिंदी, गुजराथी, ऊर्दू यांसारख्या भारतीय भाषांत ज्ञानकोश तयार झाले होते.

    केतकरांनी ‘मराठी’ ज्ञानकोशाचा ध्यास घेतला. १९१५ च्या ऑगस्टमध्ये त्यांनी सर्वप्रथम ज्ञानकोशाची कल्पना मांडली व आर्थिक अडचणींवर मात करीत असंख्यांचे असंतोष मनात साठवित व असंख्यांचे सहकार्य घेत बारा वर्षांनी त्यांनी हा ज्ञानकोश तयार केला. त्यांच्या या अद्वितिय कार्याची पावती देत त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या ‘श्रीधर व्यंकटेश केतकर’ या नावाऐवजी त्यांना ‘श्रीधर व्यंकटेश ज्ञानकोशे’ असे संबोधून त्यांचा गौरव केला. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे १० एप्रिल १९३७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • मराठी लोकशाहीर अमर शेख

    *आज २० ऑक्टोबर *
    आज ख्यातनाम मराठी लोकशाहीर मा.अमर शेख यांची जयंती
    जन्म:- २० ऑक्टोबर १९१६
    मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. बार्शी येथील गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणीकामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरूंगातही जावे लागले. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिराचुकवत ते कोल्हापूरला आले व मास्टरविनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. येथेच त्यांचे मित्रांनी ‘ अमर शेख’ असे नामकरण केले. राष्ट्रीय चळवळीत ते १९३०-३२ च्या सुमारास सामील झाले. पुढे ज्योती म्हणजे पूर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.स्वतः एक श्रमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी युक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ति-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रूपयांचा निधी देशासाठी गोळा केला. उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचारकार्यात या गुणांचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला. त्यांच्या या गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा आणि मलिका यांच्यातही दिसून येतो. कवितेची अंतर्लय व रचना यमकप्रचुर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती. रौद्र रसाचा आविष्कारही त्यांच्या काही कवनांतून त्यांनी घडविला. त्यांच्या बऱ्याचशा रचना प्रासंगिक असल्या, तरी त्यांत विचारभावनांचे थरारते चैतन्य जाणवते. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनस्वी लोकशाहीर होते. त्यांची कविता जनतेच्या ओठांवर रूजली, फुलली आणि ती लोकगंगेने जगविली. प्र. के. अत्रे, मं. वि. राजाध्यक्ष यांनी मुक्तकंठाने या शाहिराचा गौरव केला आहे. अत्रे त्यांना ‘ महाराष्ट्राचा मायकोव्ह्‌स्की ’ म्हणत. त्यांना सर्वांत प्रिय असलेली पदवी होती लोकशाहीर; कारण आपले सारे आयुष्यच त्यांनी जनताजनार्दनाला अर्पण केले होते. कविता हा या लोकशाहिराचा बहिश्चर प्राण होता आणि सामान्यांतल्या सामान्याचे उत्थान हा त्यांच्या आत्म्याचा आवाज होता.
    कलश (१९५८) आणि धरतीमाता (१९६३) हे त्यांचे काव्यसंग्रह, अमरगीत (१९५१) हा गीतसंग्रह आणि पहिला बळी (१९५१) हे त्यांनी लिहिलेले नाटक. त्यांनी रचलेल्या पोवाड्यांत छ. शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांच्या पोवाड्यांचा समावेश आहे. युगदीप व वख्त की आवाज ह्या मासिकांचे त्यांनी संपादन केले. प्रपंच आणि महात्मा ज्योतिबा फुले ह्या चित्रपटांतून आणि झगडा या नाटकातून त्यांनी प्रभावी आणि ढंगदार भूमिका केल्या. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात साम्यवादी पक्षाशी झालेल्या मतभेदांच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांनी तो पक्ष सोडला. लोककलांचे जतन, संवर्धन व संशोधन व्हावे तसेच शाहिरी व लोक-कलेचा वारसा वृद्घिंगत व्हावा या उद्देशांनी मुंबई विदयापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘शाहीर अमर शेख ’ अध्यासन सुरू करण्यात आले आहे मा.अमर शेख यांचे २९ ऑगस्ट १९६९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.अमर शेख यांना आदरांजली.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.मराठी विश्वकोश