जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
हिराबाई रेडिओवर प्रथम गायल्या, त्या १९२९ मध्ये. रेडिओ सुरू होऊन त्यावेळी अवघी दोन वर्षे झाली होती. त्यानंतर त्यांचे कार्यक्रम सातत्याने रेडिओवर होऊ लागले. १९२९ पासून ते १९७३ मध्ये हिराबाई गायनातून निवृत्त हाईपर्यंत, म्हणजे जवळ जवळ ४५ वर्षे त्या रेडिओवरून गायल्या. पूर्वी त्या मुख्यत: मुंबई केंद्रावरून गात असत.
बरवे यांचे जीवनकार्य लक्षात राहाते, ते अशा सुटय़ा-सुटय़ा चित्रमालिकांतून नव्हे, तर त्यांच्या एकंदर चित्रविचारातून! याच चित्रविचाराने, ‘अमूर्त’ म्हणजे काहीतरी पलीकडचे आणि गूढ नव्हे, नेहमी दिसणाऱ्या वस्तूंचा संबंधदेखील ‘अमूर्त’ असू शकतो, असा विश्वास अनेकांना दिला. याच चित्रविचारातून, ‘कशाचे चित्र काढू?’ हा प्रश्न अनेक कलाविद्यार्थ्यांसाठी कायमचा सुटला!
मास्टर दत्ताराम म्हणजेच दत्ताराम वळवईकर. साहित्यसंघाच्या’कौन्तेय’, ’दुसरा पेशवा’, ’भाऊबंदकी’ , ’वैजयंती’ , ’राजकुमार’ यांसारख्या नाटकांत नटवर्य नानासाहेब फाटक, दुर्गा खोटे, मामा पेंडसे यांसारख्या बुजुर्ग अभिनेत्यांबरोबर तोडीस तोड भूमिका करून दत्तारामांनी ‘नटवर्य’ हे बिरुद मिळवले. पुढे ‘ललितकलादर्श’ च्या’दुरितांचे तिमिर जावो’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘पडछाया’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या.
सरहद्द गांधी या नावाने प्रसिद्ध असलेले खान अब्दुल गफारखान ज्यांना बादशाह खान म्हणूनही ओळखले जाते, हे वायव्य सरहद्द प्रांतातील सर्वात प्रभावशाली स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांचा जन्म ३ जून १८९० रोजी झाला. भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते. गफारखानांनी १९२९ मध्ये 'खुदा ई खिदमतगार' नावाची संघटना उभारली होती. भारत सरकारने १९८७ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरवले गेले. बादशाह खान उर्फ खान अब्दुल गफार खान हे या प्रदेशातील एका उमराव कुटुंबात जन्माला आलेले. सर्व पठाण-पख्तुन-अफगाण विशेष (बादशाह खान यांचे वास्तव्य असलेल्या प्रदेशातील लोकांना, अफगाण किंवा पठाण असे संबोधले जायचे. परंतु ते स्वत: असे म्हणत, की आम्ही पख्तुन आहोत, तीच आमची खरी ओळख आहे.) अंगात सहज आलेले. जवळजवळ सव्वासहा फूट उंची, पिळदार शरीर, तडफदार चेहरा, तेजस्वी डोळे. तशीच लढाऊ वृत्ती आणि धडाडी. केव्हाही मरायला वा मारायला सज्ज.अशा व्यक्तीला आणि त्या उग्र, धगधगत्या वातावरणात अहिंसेचा विचार सुचावा, हेच आश्चर्य. त्याहून महद् आश्चर्य म्हणजे, तो विचार एक लाखाहून अधिक पठाणांना पटवून देण्यात त्यांना आलेले यश. बादशाह खान यांचा जेव्हा जन्म झाला, तेव्हा या प्रदेशावर इंग्रजी साम्राज्याचा अंमल होता. इंग्रजांचे साम्राज्य बंदूक आणि डावपेच, दहशत आणि कारस्थान यावर उभे राहिलेले. पठाण टोळ्यांना अर्थातच, अशी परकीय राजवट चालणे शक्य नाही. पहिल्या महायुद्धाच्या अगोदरपासून इंग्रज राजवट अधिकाधिक क्रूर होऊ लागली होती. तिकडे पठाणी टोळ्या इंग्रजांना आव्हान देत होत्या. भारतातही स्वातंत्र्य भावना पसरू लागली होती. मोहनदास करमचंद गांधी नावाच्या मध्यमवयीन वकिलाने दक्षिण आफ्रिकेत गौरवर्णीय, वंशद्वेष्ट्या सत्तेच्या विरोधात आंदोलन पुकारलेले होते; परंतु ते आंदोलन होते, सत्याग्रहाचे. अहिंसेने चाललेले. गोपाळकृष्ण गोखलेंनी दक्षिण आफ्रिकेत जाऊन गांधीजींना भारतात पाचारण केले होते. गांधीजी भारतात आले, तेव्हा त्यांना ‘महात्मा’ हे बिरुद लावले गेलेले नव्हते. गांधीजींनी त्यांचे ‘अहिंसेचे’, ‘सत्याचे’, ‘आत्मशुद्धी’चे प्रयोग सुरू केले आणि अवघा देश फिरून त्यांनी लोक कसे जीवन जगतात, देशाची स्थिती कशी आहे, याचा प्रत्यक्ष शोध-वेध घेतला. गांधीजी जेव्हा हा शोध घेत होते, त्याच वेळेस बादशाह खान हे पख्तुनिस्तानमध्ये त्यांच्या स्वतंत्र विचारांनी अहिंसेच्या विचाराकडे वळू लागले होते. बंदुकीने, म्हणजेच हिंसेने प्रश्न सोडवला जाऊ शकत नाही, डोळ्याचा बदला शत्रूचा डोळा फोडून घेतला तर क्रमात अवघे जग आंधळे होईल. अहिंसेने संघर्ष केला तर कदाचित लगेच विजय प्राप्त होणार नाही; पण पराभव तर नक्कीच होणार नाही आणि अंतिम विजय नक्कीच होईल, असा विचार त्यांनी मांडायला सुरुवात केली होती. परंतु पख्तुन, पठाण, अफगाण लोकांना बंदुकीचा, शस्त्रांचा, संघर्षाचा त्याग करायला सांगणे म्हणजे त्यांच्या संस्कृतीचा, जीवनशैलीचा आणि ‘पुरुषार्था’चाच त्याग करायला सांगण्यासारखे होते. बादशाह खान यांनी अहिंसक सेना स्थापन केली. त्या सेनेचे नाव ‘खुदाई खिदमतगार’ म्हणजेच, ‘ईश्वराचे सेवक’. बादशाह खान यांच्या या सेनेत एक लाखाहून अधिक ‘सैनिक’ सामील झाले. बादशाह खान ‘फ्रंटियर’वर म्हणजे, तत्कालीन ब्रिटिश इंडियाच्या सीमेवर राहून पख्तुनिस्तानात हे अहिंसेचे काम करत होते. म्हणून ते पुढे ‘फ्रंटियर गांधी’ किंवा ‘सरहद्द गांधी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ते गांधीजींचे अनुयायी नव्हते, तर एकाच विचाराने प्रेरित झालेले सहकारी होते. गांधीजी तर म्हणत असत की, त्या प्रांतात अहिंसेचे व्रत स्वीकारणे व अमलात आणणे, हे भारतात सत्याग्रही होण्यापेक्षा कठीण आहे! गांधीजींच्या आणि बादशाह खान यांच्यात २१ वर्षांचे अंतर होते. गांधीजी मोठे आणि बादशाह खान त्यांना सहकारी मानण्यापेक्षा गुरुस्थानी मानत. आयुष्याचा प्रत्येक क्षण लोकसेवेसाठी खर्च व्हायला हवा, असे व्रत दोघांनी घेतले होते. दोन्ही ‘गांधींचा’ फाळणीला विरोध होता आणि हिंदू-मुस्लिम-शीख-ख्रिश्चन-पारशी हे सर्व एकाच मानवजातीचे आहेत आणि त्यांच्यात भेदाभेद, गैरसमज व शत्रुत्व असणे हे अनैसर्गिक आहे, असे त्यांचे मत होते. ‘इस्लाम’ धर्म हा शांतता, प्रेम आणि बंधुत्वाचा आहे आणि इस्लामच्या नावावर हिंसा करणे, विद्वेष करणे, हे तर महंमद पैगंबराच्या शिकवणुकीचा अवमान करणे आहे, असे त्यांचे मत होते. बादशाह खान यांच्या ‘खुदाई खिदमतगार’मध्ये एक लाखाहून अधिक अहिंसाव्रती सामील व्हावे, यावरूनच इस्लामचा शांतता व प्रेमाचा संदेश त्या प्रांतातील जहाल इस्लामपंथीयांना पटला होता, हे सिद्ध होते. गांधीजी आणि बादशाह खान दोघांना फाळणी मंजूर नव्हती; कारण धर्माच्या आधारावर देश तोडला जात होता आणि धर्मद्वेषातून हिंसेचा आगडोंब उसळू लागला होता. गांधीजींची १९४८ मध्ये ३० जानेवारीला हत्या झाली, तीसुद्धा त्याच विद्वेषाच्या वातावरणात. बादशाह खान यांचा गुरू, सहकारी, मित्र, सहाध्यायी, मार्गदर्शक गेला आणि गांधीवादी विचारांचा झेंडा बादशाह खान यांच्याकडे आला. पाकिस्तानला बादशहा खान यांचे तत्त्वज्ञान आणि ‘खुदाई खिदमतगार’चे कार्य मंजूर असणे शक्यच नव्हते. त्यांच्या दृष्टिकोनातून तो देशद्रोह-धर्मद्रोह-पाकिस्तानद्रोह होता. साहजिकच पाकिस्तानने त्यांच्यावर निर्बंध घातले आणि ब्रिटिशांनी जितका काळ त्यांना तुरुंगात डांबले नव्हते, तितका काळ पाकिस्तानने डांबले. गांधीजींच्या हत्येनंतर आपली प्रतिक्रिया देताना आइन्स्टाइन म्हणाले होते की, या भूतलावर असा एक माणूस होऊन गेला, असे पुढील पिढ्यांना कोणी सांगितले, तर त्यावर त्यांचा विश्वासही बसणार नाही. नेमके तेच विधान फ्रंटियर गांधींना अधिक प्रकर्षाने लागू आहे. सत्याग्रह आणि अहिंसा ही ‘शस्त्रे’ घेऊन बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याला आव्हान देण्याचा ‘वेडेपणा’ सुचणा-या गांधीजींच्या आणि फ्रंटियर गांधींच्या चरित्राचा वेध कसा घेणार? पण, त्यांनी असे लाखो वेडे तयार केले. कॅनडियन-अमेरिकन चित्रपट दिग्दर्शिका टेरी मॅक्लुहान यांनी खान अब्दुल गफार खान उर्फ बादशाह खान उर्फ सरहद्द गांधी यांच्या जीवनावरील चित्तथरारक डॉक्युमेंटरी उर्फ चरित्रपट बनविला. मा.खान अब्दुल गफारखान यांचे निधन २० जानेवारी १९८८ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
केशवराव भोसले यांनी वयाच्या अवघ्या ४ थ्या वर्षी त्यांनी स्वदेश हितचिंतक नाटक मंडळीत प्रवेश घेतला होती. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १८९० रोजी झाला. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी सिद्धारूढ स्वामींच्या आशीर्वादाने हुबळीमध्ये ललितकलादर्श नाटक मंडळी स्थापन केली. ह्या नाटक मंडळींचे पहिले नाटक संगीत सौभद्र १९०८ मध्ये गणेशपीठ, हुबळी येथे सदर केले गेले. त्यानंतर हे नाटक महाराष्ट्रातही सादर केले गेले. केशवरावांनी संस्कृत नाटक शाकुंतलमध्ये सुद्धा काम केले. त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षा नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथे झाला.
वेल्वेट कापडाचा पडदा प्रथमच मराठी रंगभूमीवर वापरण्यात आला होता. केशवराव हे कलाप्रेमी आणि चतुर होते. त्यांनी वेळोवेळी केलेल्या अनेक गोष्टींचा वापर लोकांना खूप आवडला. उदा - संगीत सौभद्र मधील तुळशी वृंदावन, फिडेल वाद्याचा उपयोग इ.
केशवराव प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले जेव्हा त्यांनी १९२१ साली संयुक्त मानापमान नाटकात बालगंधर्व यांच्याबरोबर काम केले. संगीत शारदा या नाटकातील मूर्तिमंत भीती उभी ह्या पदाने त्यांना प्रसिद्धी दिली. मामा वारेरकर यांच्या संगीत संन्याशाचा संसार ह्या नाटकातील केशवरावांची भूमिका अविस्मरणीय होती.
राजश्री शाहू महाराज यांच्या विनंतीनुसार त्यांनी संगीत मृच्छकटिक ह्या नाटकाचा प्रयोग कोल्हापूर महालाच्या प्रांगणात सदर केला. संगीत नाटकांमधील त्यांच्या अथक योगदानामुळे त्यांना संगीतसूर्य म्हणून नावाजले गेले. त्या आधी म्हणजे १९१३ साली गेझेट ऑफ इंडियाचे संपादक गोर्डन यांनी केशवरावांचा महावस्त्र आणि सुवर्णपदक देवून गौरव केला होता.
१९२१ सालची संगीत शाह शिवाजी नाटकातील शिवाजी महाराजांची भूमिका हि त्यांच्या आयुष्यातील शेवटची भूमिका होती. केशवराव भोसले यांचे ४ ऑक्टोबर १९२१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.विकिपिडीया
पारंपारिक चौकटीच्या बाहेर जाऊन आधुनिक पद्धतीने शिक्षणाची क्रांती घडवली. त्यांची आपल्या कामावर अत्यंत निष्ठा होती. या शाळेत त्यांनी मुलांना आंघोळीपासून सर्व स्वच्छता शिकवली. अनुताईंनी वारली आदिवासींच्या मुलींना शिक्षण दिले.
बॉलिवूडचे मोठे घराणे म्हणून ओळखल्या जाणा-या कपूर घराण्यातील राज कपूर यांचे पुत्र ऋषी कपूर. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ रोजी झाला. आपल्या पहिल्याच चित्रपटात एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत, आपल्या वडिलांच्या लहानपणची भूमिका करताना तो निळ्या डोळ्यांचा, गोंडस मुलगा ,गोल चेहरा आणि चेहऱ्यावरचे स्मितहास्य .... दिलेली भूमिका त्याने फक्त व्यवस्थितपणे पार पडलीच नाही तर त्यात आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली. त्या भूमिकेबद्दल त्याला उत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आणि लगेच ३ वर्षानंतर आपल्या अभिनेता म्हणून आलेल्या पहिल्याच चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेताचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. चित्रपटातील प्रतिष्ठीत कुटुंबात जन्म घेतल्यामुळे अभिनयाचे संस्कार बालपणापासूनच होते पण त्या चित्रपटसृष्टीत जर यशस्वी होण्यासाठी स्वताच्या अभिनयाची क्षमता लागते हे ऋषीकपूर यांनी सुरवातीलाच ओळखले होते. आपल्या पहिल्या चित्रपटात ‘बॉबी’ मध्ये डिम्पल कपाडिया सोबत पदार्पण केल्याबरोबरच कितीतरी महिलांच्या गळ्यातला ताईत झालेला हा अभिनेता कायम ‘लवर बॉय’ म्हणून प्रस्थापीत झाला.
आपल्या सुरवातीच्या काळात रोमांटिक हीरो म्हणून लोकांच्या हृदयात जागा बनविणाऱ्या या अभिनेत्याने त्याचा नंतरच्या काळात विविध प्रकारच्या भूमिका करून स्वताला अष्टपैलू अभिनेता म्हणून प्रस्थापित केले. ते , रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांच्यापेक्षा यशस्वी झाले. ‘बॉबी’ बद्दल बोलताना ऋषीकपूर सांगतात कि बऱ्याच लोकांना आजपर्यंत असेच वाटायचे कि ऋषीकपूरला पदार्पण करण्यासाठी हा चित्रपट बनविण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात ‘मेरा नाम जोकर’ च्या अपयशामुळे खचून गेलेल्या राजकपूर यांना एका नवीन प्रेमकहाणी वर चित्रपट बनविण्याचा होता पण त्यावेळेचा रोमांटीक हिरो राजेश खन्ना यांना चित्रपटासाठी निवड करण्यासाठी त्यांच्या जवळ पुरेसा निधी नव्हता. मग पैसे वाचविण्यासाठी त्यांनी घरचाच कलाकार निवडला आणि नंतर आपण सर्व जाणतोच कि मेरा नाम जोकर चा गेलेला पैसा वसूल करणारा हा सिनेमा ठरला. या चित्रपटासाठी पहिल्यांदा राजकपूर यांनी आपले सुरवातीपासुनाचे संगीतकार शंकर जयकिशन यांना डावलून लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना अनुबंधित केले होते. तो विषय वेगळा कधी त्या विषयावर पण पोस्ट करेल.
१९७३ च्या बॉबी पासून २००० पर्यंत ऋषीकपूर हे नायकाची रोमांटिक भूमीका करीत होते. या दरम्यान त्यांनी ९२ चित्रपटात काम केले, त्यापैकी ५१ चित्रपटात ते एकटेच नायक होते तर ४१ बहुनायक चित्रपट होते. या दरम्यान त्यांनी जवळपास सर्वच अभिनेत्रीसोबत नायक म्हणून काम केले होते. १२ चित्रपटात एकत्र काम करणाऱ्या अभिनेत्री नीतू सिंग यांच्यासोबत त्यांनी विवाह केला. २००० पर्यंत रोमांटिक भूमिका केल्यानंतर त्यांनी सहायक अभिनेता म्हणून भूमिका साकारायला सुरुवात केली तर त्याच्या अभिनयाचे वैविध्य दिसून आले. मग ती ‘नमस्ते लंडन’ चि वडिलांची भूमिका, ‘औरंगझेब’ मधील लाचखाऊ पोलीस अधिकारी, ‘हाउसफुल्ल 2’ मधील विनोदी, स्टूडेंट ऑफ द ईयर मधील डीन, अग्निपथ मधील ‘रौफ लाला’ किंवा ‘D-Day’ मधील डॉन. या वरूनच दिसून येते कि आपल्या अभिनयासाठी समर्पित ऋषीकपूर यांनी आपल्या सुरवातीच्या काळा प्रमाणेच आपल्या दुसर्या डावात सुद्धा तेवढीच मेहनत घेतली. इतक्या सर्व यशस्वी चित्रपटातून भूमिका करीत असताना पण त्यांनी आपल्या कुटुंबीयांकडे तेवढेच लक्ष दिले. ते कधीही सायंकाळी ६ नंतर शूटिंग करीत नाही. ऋषी कपूर यांची बहुतांश गाणी सुपरहिट झाली होती.
प्रत्येकाच्या तोंडात त्यांची गाणी असायची. त्यांच्या साठी आघाडीच्या सर्व गायकांनी पार्श्वगायन केले होते पण शैलेंद्र सिंग यांचा आवाज त्यांना सर्वात जवळचा वाटायचा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ऋषीकपूर यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=buak7IIvWxY
https://www.youtube.com/watch?v=1ldwcYP4PjQ
https://www.youtube.com/watch?v=VLmVJmi3CtA
विकासाची दृष्टी असणारे आणि त्यासाठी अथक वेळ देणारे शिस्तीचे नेते म्हणून त्यांनी ओळख आहे. सर्वाचेच ऐकायचे हा त्यांचा स्वभाव असला तरी कुणाचे आणि कोणते काम करायचे याबाबत मात्र ते कमालीचे जागरूक असल्याचे मानले जाते.
रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी झाला.
महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते १७ मार्च १८८४ रोजी कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले. राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थिदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला. त्यांना २ एप्रिल १८९४ रोजी राज्याधिकार प्राप्त झाला. तत्पूर्वी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे आणि राधाबाई (आक्कासाहेब) व आऊबाई या दोन कन्या झाल्या. त्यांनी प्रशासन-यंत्रणेनची पुनर्ररचना करून भास्करराव जाधव, दाजीराव विचारे, आ.ब.लठ्ठे यांसारख्या बहुजन समाजातील कर्तबगार व गुणी व्यक्तींना अधिकारावर नेमण्यास सुरुवात केली. १८९७-९८ साली प्रथम दुष्काळ व नंतर प्लेग अशी संकटे कोसळली. तरुण शाहूंनी धैर्याने त्यांवर मात केली. १९०२ साली सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणानिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला. तेथील भौतिक प्रगतीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला; त्यामुळे त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले. कोल्हापुरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला. कोल्हापुरातील ब्रह्मवर्गाने शाहूंचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र म्हटले आणि त्यांना वेदमंत्राचा अधिकार नाकारला. यातून वेदोक्ताच्या संघर्षाचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले. लो. टिळकांनी ब्रह्मवर्गाची बाजू घेतल्याने प्रकरण इरेस पडले. शाहूंनी वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या राजोपाध्यांची व शंकराचार्यांची वतने जप्त केली. ब्रह्मवर्गाने हे प्रकरण व्हाइसरॉयपर्यंत नेले; पण शेवटी शाहूंचीच सरशी झाली. कोल्हापुरातील ब्रह्मवर्गास त्यांच्याशी समेट करावा लागला, पण महाराष्ट्रातील ब्रह्मवर्ग शेवटपर्यंत त्यांच्या विरोधातच राहिला. कुलकर्णी-वतन बरखास्ती, सत्यशोधक जलशांना शाहूंचा पाठिंबा या बाबींमुळे तर हा विरोध वाढतच गेला.
वेदोक्त प्रकरणातील अनुभवावरून, भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्चवर्णियांची धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही, अशी शाहूंची धारणा झाली होती. परिणामी ते म. फुल्यांच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले. त्यांनी उघडपणे त्यांचे अनुयायीत्व स्वीकारले नसले, तरी सत्यशोधक तत्त्वांना त्यांचा पाठिंबा होता. त्यांच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन झाले. पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदिक स्कूल' ची स्थापना केली आणि मराठ्यांसाठी स्वतंत्र ‘क्षात्रजगद्गुरू' पद निर्माण करून त्यावर सदाशिवराव पाटील या उच्चविद्याविभूषित तरुणास नेमले. धार्मिक व सामाजिक क्षेत्रांत हा एक अभिनव प्रयोग होता.
शाहूंनी आर्यसमाज व थिऑसॉफिकल सोसायटी या संस्थांनाही आश्रय दिला. वेदांवरील श्रद्धा व जातिभेदाला विरोध, या आर्यसमाजाच्या तत्त्वांमुळे त्यांनी स्वत:ला ‘आर्यसमाजी' म्हणून घोषित केले; तथापि त्याच्या ते आहारी गेले नाहीत. अर्यसमाजाच्या गुरुकुलाची स्थापना झाली. पुढे राजाराम कॉलेज आर्यसमाजाकडे चालविण्यासाठी दिले गेले.
बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता.
खेड्यापाड्यांतील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून शाहूंनी कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर इ. जातिजमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. शिवाय नासिक, पुणे, नगर, नागपूर इ. अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने अनेक वसतिगृहे सुरू झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या. मागासलेल्या जातींत शिक्षणाबद्दल फारशी आस्था नसल्याने व त्याचे कारण शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी लाभण्याची शक्यता नसल्याने शाहूंनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानातील ५०% शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला. राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे शाहू हे हिंदुस्थानातील पहिले राज्यकर्ते ठरले. अस्पृश्यतेचे उच्चाटन हे शाहूंनी आपले जीवितकर्तव्य मानले. संस्थानातील शाळा, पाणवठे, विहिरी, दवाखाने, कचेऱ्या इ. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास त्यांनी कायद्याने प्रतिबंध केला. त्यासाठी अनेक वटहुकूम जारी केले. त्यांनी अस्पृश्यांना सरकारी नोकरीत घेतले. समाजातील तलाठ्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागा दिल्या. त्यांच्यापैकी अनेकांना माहूत, हूलस्वार, पोलीस, स्वत:चे मोटारचालक म्हणून नेमले. महार-वतन खालसा करून महारांची वेठबिगारीतून आणि गुन्हेगार मानल्या गेलेल्या जातींची ‘हजेरी' पद्धतीतून मुक्तता केली. फासेपारधी, कोरवी, माकडवाले यांसारख्या भटक्या व विमुक्त जातींना जवळ करून त्यांचे जीवन स्थिर केले. त्यांना आपले रक्षक म्हणून नेमले. खेड्यापाड्यांतील बलुतेदारांनाही त्यांच्या बलुतेपद्धतीतून मुक्त करून त्यांना समाजातील सर्व उद्योगधंदे खुले केले. जोगिणी व देवदासी प्रथेस प्रतिबंध करणार कायदा जारी केला. याच सुमारास शाहूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली. बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत बाबासाहेबांबरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा ‘खरा पुढारी' मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव केला. अस्पृश्यतेबरोबरच जातिभेदाशी शाहूंनी अखेरपर्यंत संघर्ष केला. आंतरजातीय विवाह हा जातिभेदावर रामबाण उपाय वाटून त्यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. स्वत: पुढाकार घेऊन अनेक आंतरजातीय (धनगर-मराठा) विवाह घडवून आणले. तसेच बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा जारी केला. घटस्फोटास व विधवापुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली. कुटुंबात होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळांपासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदाही त्यांनी मंजूर केला. मागासलेल्या वर्गांतील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली. सामाजिक सुधारणांबरोबरच शाहूंनी शेतीस व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडींचे प्रयोग केले. कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यांसारख्या बाजारपेठा वसविल्या. त्यामुळे कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध पावली. शाहूंनी कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला. ‘शाहू मिल' ची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगास त्यांनी चालना दिली. शाहूंनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात संस्थानचा कायापालट करणार उपक्रम ठरला. संस्थानी मुलखातील हे सर्वांत मोठे धरण बांधून त्यांनी आपले संस्थान सुजलाम्-सुफलाम् करून टाकले. शाहूंनी ‘सहकारी संस्थांचा कायदा' करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.
शाहूंनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली. अल्दियाखॉं, हैदरबक्षखॉं, भूर्जीखॉं, सुरश्री केसरबाई, गानचंद्रिका अंजनीबाई मालपेकर अशा अनेक गायक-गायिकांनी शाहूंच्या आश्रयाने अखिल भारतीय कीर्ती संपादन केली. त्यांनी अनेक नाटक कंपन्यांना व गुणी कलावंतांना आश्रय दिला. बालगंधर्व व संगीतसूर्य केशवराव भोसले हे थोर कलावंत शहूंनीच महाराष्ट्राला दिले. संगीत व नाट्यकलेच्या जोपासनेसाठी त्यांनी कोल्हापुरात भव्य पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह) बांधले. त्याच्या शेजारीच खुल्या नाट्यगृहाचीही सोय केली. शाहूंच्या दरबारात आबालाल रहिमानसारखा महान चित्रकार कलावंत होऊन गेला. बाबूराव पेंटर, दत्तोबा दळवी प्रभृती चित्रकारांना त्यांचे प्रोत्साहन मिळाले. मल्लविद्येच्या प्रांतात शाहूंनी संस्थानासह सर्व देशांतील मल्लांना उदार आश्रय दिला. रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर कोल्हापुरात कुस्तीचे मैदान बांधले. त्यांच्या कारकीर्दीत कोल्हापूर ही ‘मल्लविद्येची पंढरी' बनली. खुद्द शाहू हे मल्लांचे मल्ल म्हणून प्रसिद्ध होते. यांशिवाय त्यांनी कोल्हापुरात साठमारी हा हत्तीचा खेळ सुरू केला. शिकार तर त्यांचा आवडीचा छंद होता. पट्टीचा शिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता.
शाहूंच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना ‘राजर्षी' पदवी बहाल केली (१९१९). त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. अखेरच्या दिवसांत द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनाने ते खचून गेले.
शाहू महाराज यांचे ६ मे १९२२ रोजी निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
शाहिर साबळे यांच्या लोकधारेतून पुढे आलेल्या संतोष पवार यांनी आपली घोडदौड ‘यदा कदाचित’ पासून चालू केली.
Copyright © 2025 | Marathisrushti