जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
कै. कमलाकांत राजे यांनी श्री गणेश या एकाच विषयावर दोनशेहून अधिक चित्रे काढली. त्यांचे गणेशाभोवती नाचणारे ऊंदिर किंवा बिळात गणेश उत्सव मनवणारे ऊंदिर हे बघून वॉल्टडिस्ने चा मिकी माऊस एकच प्रकारचा व कंटाळवाणा वाटतो !
आज २२ सप्टेंबर. स्मरणीय भूमिका करणार्या दुर्गा खोटे यांची पुण्यतिथी. त्यांचा जन्म १४ जानेवारी १९०५ रोजी झाला.
चित्रपट कलाकारांकडे पाहण्याचा दृष्टोकोन दूषीत होता त्या काळात दुर्गा खोटे यांना चित्रपटात येणे भाग पडले. मुलीने चित्रपटात काम करणे घरच्या लोकांना पसंत नव्हते. दुर्गा खोटे यांनी चित्रपटात अशा भूमिका केल्या की चित्रपटातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. चांगल्या घरातील महिलाही अभिनय क्षेत्रात येऊ शकतात असा एकप्रकारे संदेशच त्यांनी दिला.
सुरूवातीस त्यांनी छोट्या भूमिका केल्या आणि लवकरच त्यांना नायिकेची भूमिका मिळाली. प्रभात फिल्म्सचा १९३२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अयोध्येचा राजा या चित्रपटाने तर त्यांना ओळख करून दिली. मराठी आणि हिंदीमध्ये बनलेल्या या चित्रपटात त्यांनी राणी तारामतीची भूमिका केली.त्यावेळी स्टूडियो सिस्टमचा जमाना होता त्यावेळचे कलाकार ठरावीक पगारावर स्टूडियोमध्ये काम करायाचे. पण, आत्मविश्वासच्या जोरावर त्यांनी फ्रीलांस काम करण्यास सुरूवात करून ही पध्दत मोडीत काढली.
न्यू थियेटर्स, ईस्ट इंडिया फिल्म कंपनी, प्रकाश पिक्चर्स आदींसाठी त्यांनी काम केले. १९३० च्या शतकाच्या अखेरीस त्या निर्माता आणि दिग्दर्शक बनल्या आणि त्यांनी चरणों की दासी, भरत मिलाप अशा एकावर एक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली. या चित्रपटांनी त्यांचा गौरव केला.
चित्रपटांबरोबरच दुर्गा खोटे यांनी मराठी रंगभूमीवरही आपली कारकिर्द गाजवली. इंडियन पीपल्स थियेटर एसोसिएशन (इप्टा) च्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीसाठी भरीव कार्य केले. मुंबई मराठी साहित्य संघाच्या अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केले. शेक्सपीयर यांच्या मॅकबेथवर आधारीत राजमुकूट या नाटकातील त्यांचा अभिनय वाखणण्यांजोगा होता.
या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुगले आजम, बॉबी, बावर्ची अशा चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही स्मरणात आहेत.
त्यांनी लिहलेल्या आत्मकथेचा इंग्रजी अनुवाद 'दुर्गा खोटे' या नावाने प्रकाशित झाला आहे. दुर्गा खोटे यांचे २२ सप्टेंबर १९९१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- वेब दुनिया/ विकिपीडिया
ग्वाल्हेरला भरलेल्या त्रेचाळीसाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान कुसुमावतींना मिळाला. विदर्भातील प्रसिद्ध वकील रावबहादुर रामकृष्ण रावजी जयवंत ह्यांच्या त्या कन्या. तसेच सुप्रसिद्ध कवी आत्माराम रावजी देशपांडे ऊर्फ कवी अनिल यांच्या पत्नी.
डॉ. श्रीराम अभ्यंकर यांना गणिताचे बाळकडू त्यांचे वडील शंकर अभ्यंकर यांच्याकडून मिळालेले होते. त्यांचे वडील हे मध्य प्रदेशातील उज्जन व ग्वाल्हेर येथे गणिताचे प्राध्यापक होते. डॉ. श्रीराम अभ्यंकर यांचा पुण्याशी अतूट संबंध होता. अनेकदा ते येथे त्यांच्या बंगल्यात वास्तव्यास असत व येथे आले की, मुलांना गोळा करून गणित शिकवण्याचा मोह त्यांना कधीच आवरत नसे. इतके त्यांचे गणितावर व अध्यापनावर प्रेम होते.
प्रसिद्ध बासरीवादक, संगीतज्ञ, संहितालेखक, जाहिरातलेखक आणि इंग्रजी भाषेचे प्राध्यापक अजित सोमण यांचा जन्म ६ ऑगस्ट १९४७ रोजी झाला.
अजित सोमण यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या भाषांवर प्रभुत्व होते. तळेगाव येथील इंद्रायणी महाविद्यालय, तसेच स.प. महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे इंग्रजी तसेच रानडे इन्स्टिट्यूट येथे पत्रकारिता, तर सिम्बायोसिस येथे अजित सोमण यांनी Creative writing and Mass communication अशा विषयांचे अध्यापन केले.
पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात त्यांनी १५ वर्षांहून अधिक काळ अप्लाईड म्युझिक, म्युझिक ॲप्रीसिएशन हे विषय शिकवले. या अभ्यासक्रमासाठी पाठ्यपुस्तक म्हणून वापरल्या जाणाऱ्या 'संगीत' या पुस्तकाचे ते सहलेखक होते. सोमण यांनी लिहिलेल्या अनेक जिंगल्स व जाहिराती प्रसिद्ध झाल्या. "ऊंचे लोग ऊंची पसंद", "चवीनं खाणार त्याला केप्र देणार", " या वर्षी पु.लंची दिवाळी तुमच्या घरी ", "सकाळ घरात आला की, आजोबांपासून नातवापर्यंत सासूपासून सुनेपर्यंत सगळ्यांचा स्वार्थ एकदम जागा होतो", " प्रत्येक कुटुंबासाठी-कुटुंबातील प्रत्येकासाठी सकाळ" या काही त्यांच्या गाजलेल्या जाहिराती आहेत.
बासरी वादक म्हणून अजित सोमण यांनी अनेक मोठ्या कलाकारांबरोबर काम केले. सुधीर फडके, यशवंत देव, पं.हृदयनाथ मंगेशकर, श्रीधर फडके, आनंद मोडक, सुधीर मोघे, पं. बिरजू महाराज, पं. कालीचरण महोपात्र, पंडिता रोहिणी भाटे, प्रभा मराठे, डॉ.सुचेता चापेकर, मनीषा साठे, पार्वती दत्ता, रोशन दात्ये यांच्याबरोबर विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी बासरीची साथ केली. 'सखी मंद झाल्या तारका', 'ही वाट दूर जाते ' यांसारख्या अनेक प्रसिद्ध गाण्यांमध्ये किंवा इंडो जॅझ ग्रुपच्या अँटीग्रॅव्हिटी, बुगी फॉर हनुमान या मध्ये अजित सोमण यांनी बासरी वाजवली आहे. अजित सोमण यांनी अनेक लघुपटांसाठी पार्श्वसंगीत दिले आहे.
युजीसीच्या अंतर्गत तयार केलेल्या "राग रंजन" या मालिकेच्या आखणीपासून ते संहितालेखनापर्यंत सर्व काम अजित सोमण यांनी केले होते. या मालिकेला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. सोमणांच्या चाहत्यांत बिरजू महाराज, प्रभा मराठे, रोहिणी भाटे पार्वती दत्ता तसेच संगीत क्षेत्रातील अनेक नामवंतांचा समावेश होता. स्वरानंद, सुगम, आशा पब्लिसिटी अशा संस्थांचे अजित सोमण यांनी विश्वस्त अध्यक्ष म्हणून काम पाहिले. दिग्दर्शक अजित सातभाई यांनी अजित सोमण यांच्यावर एक लघुपट केला आहे. अनेक औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय, सांगीतिक लघुपटांसाठी तसेच अनेक दृकश्राव्य कार्यक्रमांसाठी सोमण यांनी संहिता लिहिल्या आहेत.
त्यांनी 'राऊ' सारख्या मालिकेसाठी आणि 'देवी अहिल्याबाई' या चित्रपटासाठी गीतलेखन केले. 'एक होता विदूषक' चित्रपटातील तराणा अजित सोमण यांनी लिहिला होता.
'टोकन नंबर', 'या आमुच्या हसऱ्या घरात' सारख्या मालिकांचे शीर्षकगीत व NDA चे स्फूर्तिगीत सोमण यांनी लिहिले होते. 'लाखाची गोष्ट', 'गुळाचा गणपती', 'गाभारा' या गाजलेल्या चित्रपटांची इंग्रजी उपशीर्षके सोमण यांची होती. अजित सोमण यांनी कथक नृत्यासाठी अनेक बॅले, ठुमऱ्या लिहिल्या आहेत. संगीत, जाहिरात, शिक्षण, साहित्य अशा क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करून ठसा उमटविणारे बासरीवादक अजित सोमण यांच्या स्मृत्यर्थ विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा सोमण परिवारातर्फे दरवर्षी स्वरशब्दप्रभू पुरस्काराने सन्मान करण्यात येत असतो. तसेच उदयोन्मुख कलाकाराला त्यांच्या नावाची शिष्यवृत्तीही देण्यात येते.
आजवर हा पुरस्कार सुधीर गाडगीळ, अरुण काकतकर, मनीषा साठे, रमाकांत परांजपे, सुधीर मोघे, श्रीधर फडके यांना मिळाला आहे. तसेच अजित सोमण यांच्या स्मृत्यर्थ ललित कला केंद्रातील सर्वोत्तम विद्यार्थी किंवा विद्यार्थीनीचा सोमण परिवारातर्फे दरवर्षी 'स्वरशब्दप्रभू’ शिष्यवृत्ती देऊन सन्मान करण्यात येतो. अजित सोमण यांचे २ फेब्रुवारी २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
घारे, (डॉ.) मुकुंद
सध्याच्या ओव्हर स्पेशलायझेशनच्या काळात आपापल्या क्षेत्रापुरता संकुचित विचार न करता त्या पलीकडे पाहणारे लोक सापडणे दुर्मिळच! निसर्ग, पर्यावरण, पाणी हे विषयही त्याला अपवाद नाहीत. अशी व्यापक दृष्टी असलेले पर्यावरण व जलअभ्यासक डॉ. मुकुंद घारे यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. भूशास्त्र, पाणी, नैसर्गिक साधनसंपत्ती, ग्रामीण समस्या आणि सध्याच्या सामाजिक स्थितीचे भान, अशा विविध गोष्टींचे नेमके आकलन हे घारे सरांचे वैशिष्टय़ होते.
त्यासाठी ते अनेक दिग्गजांसाठीसुद्धा गुरुतुल्य होते. कोकणातील खाणींविषयी भूशास्त्रीय सल्लागार, भूजलतज्ज्ञ तसेच ‘अफार्म’च्या माध्यमातून पाणलोट व ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अनेकांना ज्ञात आहे; पण त्याच्या पलीकडेही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. बोलणे, जगणे आणि विचारातील साधेपणा त्यांच्याकडे होता. त्यामुळे विविध विषयांतील तज्ज्ञांपासून ते सामान्य माणसापर्यंत त्यांचा उत्तम संवाद असायचा. त्यांची विविध समस्या आणि प्रश्नांची उकल करणारी मांडणीसुद्धा अशीच साधी, सरळ असायची. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एका तज्ज्ञाबरोबरचकार्यकर्तासुद्धा दडलेला होता आणि समाजातील सर्व घटकांशी त्यांचा थेट संवादही होता. त्यामुळे अनेक तज्ज्ञांमध्ये पाहायला मिळणारा समाजापासूनचा तुटलेपणा त्यांच्यामध्ये कधीच जाणवला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विविध घटकांशी ते इतक्या सहजतेने व मिसळून वावरू शकायचे. म्हणूनच ते ज्ञान, अनुभव व वयाने मोठे असले तरी त्यांचे कधी दडपण येत नसे. त्यांचे आणखी एक वेगळेपण म्हणजे विदारक वास्तवाची माहिती व नेमकी जाणीव झाल्यामुळे येणारी निराशा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कधी दिसली नाही. समस्या परखडपणे मांडतानाही ते आशावादी होते. विविध प्रश्न, मुद्दे जाणून घेण्यासाठी त्या त्या भागात जाणे वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत त्यांनी सुरूच ठेवले. अनेक तरुण विद्यार्थी घडविले. विषयाच्या माहितीबरोबरच त्यांना शहाणपणही दिले. त्यामुळेच त्यांचा सहवास म्हणजे शिकणे व शहाणेही होणे होते. सध्या पाणी, पर्यावरण, नैसर्गिक आपत्ती आणि शाश्वत विकास याबाबत अनेक समस्यांनी गंभीर रूप धारण केलेले असताना घारे सरांचे जाणे हे मोठे नुकसान आहे. त्यांनी दिलेले शहाणपण वापरणे आणि या प्रश्नांमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे हीच घारे सरांना खरी आदरांजली ठरेल!
--------------------------------------------------------------------------------------------
घारे, (डॉ.) मुकुंद
पाण्यासाठी पावसावरच अवलंबून राहणार्या शेतकर्यांना 'पाणी अडवा पाणी जिरवा'चा मंत्र देऊन याबाबतच्या समस्येवर ठोस उपाय देणारे डॉ. मुकुंद घारे.
फर्ग्युसन कॉलेजमधून १९६६ मध्ये डॉ. मुकुंद घारे यांनी भूशास्त्राची पदवी मिळवून पुराजीवशास्त्रात पीएच.डी. मिळवली. परंतु आपल्या शिक्षणाचा समाजाला फायदा व्हावा या हेतूने त्यांनी राज्यभर फिरून विविध विभागांच्या भूरचना, पर्यावरण, जलसाठे आदींचा अभ्यास केला. सुरुवातीच्या काळात भूशास्त्रज्ञ म्हणून खाणींसाठी सल्लागार म्हणून काम केल्यावर त्यांनी पाणी या मुख्य समस्येवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. राज्यात पडणारा पाऊस, त्यातून निर्माण होणारे भूजलसाठे आणि त्याचा शेतकर्यांना होऊ शकणारा फायदा याचा सखोल अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी इस्त्रायलमध्ये भूजलावर संशोधन केले. अखंड भटकंती आणि अभ्यासातून सापडलेला 'पाणी अडवा-पाणी जिरवा'चा मंत्र त्यांनी प्रभावीपणे विविध माध्यमांच्या साह्याने शेतकरी बांधवांपर्यंत नेला.
राज्यात पाणलोटाची चळवळ सुरू झाली. पाऊस कोठे अधिक प्रमाणात पडतो, तर कुठे कमी. काही भाग अतिवृष्टीचे, तर काही अवर्षणग्रस्त. अशा विषम स्थितीत पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे व्यवस्थापन करून शेतीसाठी वापरण्याचे तंत्र घारे यांनी शेतकर्यांना दाखवून दिले. त्यांच्या पुढाकारामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्यात अनेक कोरड्या पडलेल्या विहिरी पुन्हा भरू लागल्या. राज्यात गावोगावी शेकडो शिबिरे घेऊन त्यांनी या विषयातील कार्यकर्तेही घडवले. आज राज्यात पाणी, पर्यावरण आणि कृषीक्षेत्रात कार्य करणारे अनेक नामवंत कार्यकर्ते डॉ. घारे यांचेच शिष्य आहेत. डॉ. घारे यांनी हे काम सुरू केले, तेव्हा सरकारी पातळीवर पाणलोट क्षेत्रात विशेष पुढाकार घेण्यात आला नव्हता. मात्र, त्यांच्या कामाचे महत्त्व ओळखत राज्य सरकारनेही पाण्याबाबतच्या योजनांसाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून नेमले. 'अॅक्शन फॉर अॅग्रीकल्चर रिन्यूएशन इन महाराष्ट्र' (अफार्म) या संस्थेच्या माध्यमातून डॉ. घारे यांनी राज्यात जलव्यवस्थापनाचा जागर केला.
पाणी या विषयावर त्यांनी लिहिलेली पुस्तके सर्वसामान्यांपासून प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांसाठी जणू गाइड आहेत. हे सारे करताना सर्वसामान्यांशी असणारी बांधिलकी डॉ. घारे यांनी कायम ठेवली. अत्यंत साधे राहत आणि सर्वसामान्यांना समजेल असे बोलत त्यांनी पाणी आणि जमिनीचे विज्ञान तळागाळात रुजवले. म्हणूनच त्यांना या क्षेत्रात गुरूचे स्थान मिळाले.
वयाच्या ऐंशीव्या वर्षी ते कालवश झाले.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
चोडण येथील युवक उदय मांद्रेकर गेल्या सत्तावीस वर्षांपासून पक्षीप्रेमी, पर्यावरणप्रेमी, छायाचित्रकार, फिल्ममेकर्स यांना चोडण बेटाचे दर्शन करवून देण्याचे काम करतो. मांद्रेकर म्हणतात, आपल्याला यात कसलाच स्वार्थ नाही. परंतु जेव्हापासून आपल्याला या बेटाचे महत्व कळले आहे, तेव्हापासून एक जागरूक नागरिक या नात्याने आपण इथे येणाऱ्यांना पक्षी दर्शन करण्यास नेतो. त्यातून जे काही ही माणसं देतात, ते गोड मानून घेतो.
चतुरस्त्र लेखिका सरिता मंगेश पदकी यांचा जन्म १३ डिसेंबर १९२८ रोजी झाला.
चैत्रपुष्प (काव्यसंग्रह) बारा रामाचे देऊळ, घुम्मट (कथासंग्रह) बाधा, खून पाहावा करुन, सीता (नाटके) व ब्राझीलच्या झोपडपट्टीत राहणार्या करोलिना मारिया डि जीझस यांच्या आत्मनिवेदनाच्या काळोखाची लेख या अनुवादासह चार अनुवादित पुस्तके व भरपूर बालसाहित्य त्यांच्या नावावर आहे.
## Sarita Mangesh Padaki
mss
’पायोजी मैने रामरतन धन पायो’, ’ठुमक चलत रामचंद्र’, ’चलो मन गंगा जमुनातीर’ ही त्यांनी गायलेली काही अत्यंत लोकप्रिय गाणी आहेत. ’सुध मुद्रा, सुध बानी’ हे गायकासंबंधी सांगितलेले कलागुण त्यांच्यात प्रकर्षाने दिसत असत.
नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत कुसुमाग्रज अध्यासनाचा ‘कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार’ ज्येष्ठ कन्नड साहित्यिक जयंत कायकिणी यांना जाहीर झाला आहे. साहित्याच्या विविधांगी क्षेत्रातील त्यांचे योगदान पाहता ही निवड सार्थ असल्याचे स्पष्ट होते. शिक्षण आणि समाजसेवेचा वसा घेतलेल्या कुटुंबात जयंतराव लहानाचे मोठे झाले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत समुद्रकिनारी वसलेले निसर्गरम्य गोकर्ण हे त्यांचे जन्मगाव.
त्याच ठिकाणी बालपणही गेले. वडील गौरीश आणि आई शांता पेशाने शिक्षक. जयंत गुणवान विद्यार्थी म्हणून लौकिक मिळवीत होते. उच्च शिक्षणासाठी ते धारवाडला गेले. १९७६ मध्ये त्यांनी बायोकेमिस्ट्री विषयात एम.एससी.ची पदवी प्राप्त केली ती कर्नाटक विद्यापीठाच्या सुवर्णपदकासह. इथपर्यंतचा जयंत कायकिणींचा प्रवास कर्नाटकच्या सीमेपुरता मर्यादित होता. पण नोकरीव्यवसायानिमित्त सीमोल्लंघन केल्यावर शेजारील महाराष्ट्र त्यांनी आपलासा केला.
राजधानी मुंबईत येऊन प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल कंपनीत प्रॉडक्शन एक्झिक्युटिव्ह म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर जवळपास दोन दशकाहून अधिक काळ त्यांचे वास्तव्य मराठी भूमीतच होते. याच काळात स्वतंत्र व्यवसायी कॉपी रायटर म्हणून लिंटास व मुद्रा या जाहिरात क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्येही काम केले. मुंबईतील या प्रदीर्घ वास्तव्यामुळे कायकिणी यांचा मराठी व हिंदी भाषांशी जवळून संबंध आला. वेगवेगळी औषधे वा संबंधित रसायनांचे अभ्यासक म्हणून नाव कमावूनही ते मराठी मातीमध्ये चांगलेच रमले.
कुटुंबातूनच झालेल्या समाजसेवा व शिक्षणाच्या संस्कारामुळे त्यांना वाचनाची आवड होतीच; पण पुढील काळात मराठी प्रांतातील वास्तव्याच्या कालावधीत कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, ग्रेस आदी मराठी सारस्वतांच्या साहित्याचीही त्यांना भुरळ पडली ती कायमची. या साहित्यिकांच्या साहित्याने आपण प्रभावित झाल्याची प्रांजळ कबुली देताना त्या लेखकांच्या ऋणात राहणे ते पसंत करतात. मुंबई सोडल्यावर अमराठी प्रांतातील बेंगळूरूमध्ये वास्तव्यास जातानाही मराठी सारस्वतांच्या साहित्याची शिदोरी सोबत नेण्यास ते विसरले नाहीत. असे असले तरी अभिजात साहित्याचे त्यांनी अनुकरण केले नाही.
अस्सल देशी शब्दयोजना, विनोदाचा शिडकावा, उपरोधिक आणि मार्मिक विडंबन ही त्यांच्या लेखनशैलीची वैशिष्टय़े. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकरांच्या निर्वाणानंतर सांप्रत गोदातीरी ही उणीव प्रकर्षांने जाणवते. मुक्त विद्यापीठाने जयंत कायकिणींची कुसुमाग्रज पुरस्कारासाठी केलेली निवड म्हणूनच यथायोग्य वाटते. औषधे-रसायनांसंबंधित, सर्वसामान्यांना बोजड वाटणाऱ्या विषयात रस घेणाऱ्या या युवकाचा कन्नड साहित्यप्रवासही औत्सुक्याचा विषय ठरावा. कन्नड भाषेतील ‘रंगादिन्दोदिशत्रू दूरा’, ‘श्रावणा मध्यांना’, ‘निलीमाले’, ‘ओंदू जिलेबी’, ‘कोटितीर्थ’ हे काव्यसंग्रह, ‘गाला’, ‘बन्नाडा कालू’, ‘तूफान मेल’ यांसह सात कथासंग्रह, ‘इति मीना अमृता’, ‘अक्शा बुत्ती’ यांसह चार नाटकांचा त्यांच्या खाती समावेश आहे.
वीसहून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली आहेत. चार चित्रपटांसाठी पटकथा व संवादलेखन केले आहे. त्यांच्याच कल्पनेतून साकारलेल्या ‘नमस्कार’ या मालिकेचे कन्नड दूरदर्शनवर तब्बल दोनशे भाग प्रसारित झाले आहेत. कन्नड वाङ्मयाला वाहिलेल्या ‘भावना’ या मासिकाचे ते संपादक आहेत. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी कन्नड साहित्य अकादमीचा राज्य पुरस्कार मिळालेल्या या सारस्वताच्या शिरपेचात कुसुमाग्रज पुरस्कारामुळे आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti