जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
जेष्ठ पत्रकार, स्तंभलेखक, मानवाधिकार कार्यकर्ता, लेखक अशी ओळख असलेल्या कुलदीप नय्यर यांनी देशातल्या नामवंत वृत्तपत्रांसाठी लेखन केले होते. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२३ रोजी पंजाब प्रांतातील सियालकोटमध्ये झाला. लाहोरच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण आणि नंतर तेथील लॉ कॉलेजमधून त्यांनी एल.एल.बी.पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. वकिलीचे शिक्षण घेऊन भारतात परतलेले नय्यर यांनी क्लार्क न होण्याचा निश्चय केल्यामुळे त्यांना काही काळ बेरोजगार राहावे लागले होते. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या मेडिल स्कूल ऑफ जर्नालिझममधून त्यांनी शिष्यवृत्तीवर पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी उर्दु वृत्तपत्र ‘अंजाम’मध्ये बातमीदारी सुरू केली. यथावकाश इंग्रजी वृत्तपत्रांची कास त्यांनी धरली. स्टेट्मन या इंग्रजी वृत्तपत्रात पत्रकारिता केल्यानंतर ते ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये रुजू झाले आणि संपादकपदही भूषवले. ‘इंडियन एक्स्प्रेस’चे संपादक या नात्यानेच नय्यर यांनी आणीबाणीविरोधात आवाज उठवला. नय्यर यांनीआणीबाणीच्या वेळी तुरुंगवासही भोगला होता. मानव हक्क चळवळीचे कार्यकर्ते असणारे नय्यर १९९६ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या भारतीय शिष्टमंडळाचे सदस्य होते. त्यांची १९९० मध्ये ग्रेट ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तपदीही नियुक्ती करण्यात आली होती. नय्यर यांनी १४ विविध भाषांमधील सुमारे ८० हून अधिक वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केलं. डेक्कन हेराल्ड, द डेली स्टाल, द संडे गार्डियन, द न्यूज, द स्टेट्समन, पाकिस्तानमधील द एक्सप्रेस ट्रिब्युन, डॉन आदी वृत्तपत्रांमध्ये नय्यर यांनी लेखन केलं आहे. विविध राजकीय, सामाजिक विषयावरील १५ पुस्तकांचं लेखन नय्यर यांनी केलं आहे. कुलदीप नय्यर यांची १९९७ साली राज्यसभेवर खासदार म्हणूनही नियुक्ती झाली होती. ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाने २०१५ साली पत्रकारितेतील त्यांच्या देदीप्यमान कार्याचा यथोचित गौरव रामनाथ गोयंका उत्कृष्ट पत्रकारितेचा जीवनगौरव पुरस्कार देऊन केला होता.
कुलदीप नय्यर यांची काही पुस्तके -
बियाँड द लाइन्स, इंडिया - द क्रिटिकल इयर्स, डिस्टंट नेबर्स, सप्रेशन ऑफ जजेस, इंडिया आफ्टर नेहरू, द जजमेंट - इनसाइड स्टोरी ऑफ द इमर्जन्सी इन इंडिया, वॉल अॅट वाघा, विदाऊट फिअर: द लाइफ अँड ट्रायल ऑफ भगत सिंग
कुलदीप नय्यर यांचे २३ ऑगस्ट २०१९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कोलंबसने आपल्या चार मोहिमांमधून शोधून काढलेली भूमी हा काही भारतीय प्रदेश नाही हे पहिल्या मोहिमेतच त्याच्या लक्षात आले. पुढे या खंडाचे नाव अमेरिका असे झाले.
त्याकाळी सुमारे आठ कोटींचं साहित्य स्क्रॅप करण्याऐवजी त्यांनी तेच साहित्य दुसऱ्या कारला असेंबल करण्याचं ठरवलं. त्यांनी ते करुन दाखवलं. हणमंत गायकवाड यांच्या चाणाक्ष बुद्धीची चुणूक टाटा प्रशासनाला आली.
संगीतकार हंसराज बेहल यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१६ रोजी अंबाला येथे झाला. हंसराज बेहल यांच्या घरी कोणत्याही प्रकारचे संगीताला पोषक वातावरण नसताना फक्त संगीताची ओढ होती म्हणून त्यांनी अंबाला इथे आचार्य चिरंजीवलाल यांच्याकडे संगीताचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. त्यानंतर काही काळ संगीत शिकवणे, स्टेज प्रोग्राम करणे, काही गाण्यांचे रेकोर्डिंग करणे यामध्ये काही काळ त्यांनी व्यतीत केला. हा सारा अनुभव गाठीशी घेऊन १९४४ साली ते मुंबईत आले. तिथे त्यांचे एक नातेवाईक चुन्नीलाल बेहल यांनी त्यांची ओळख पृथ्वीराज कपूर यांच्याशी करून दिली. या ओळखीमुळे हंसराज बेहल यांना त्यांचा पहिला स्वतंत्र संगीत दिग्दर्शनासाठी चित्रपट मिळाला. तो होता दिग्दर्शक ए.बी. इराणी यांचा “पुजारी”. या चित्रपटात बेबी मुमताज (म्हणजेच मधुबाला) हिने गायलेले एक गाणे खूप गाजले ते म्हणजे “भगवान मेरे ग्यान का दीपक जला दे”.
१९४७ साली “दुनिया इक सराय” या चित्रपटात त्यांनी मीनाकुमारी कडून सुध्दा काही गाणी गाऊन घेतली. त्यातले हे एक “सावन बीत गयो, माई री”. मा.हंसराज बेहल यांच्याकडे सुरवातीच्या काळातील काही गाणी जसे “दिल-ए-नौशादको जीने की हसरत हो गई तुमसे” गायल्यानंतर मा.हंसराज बेहल यांनी लता मंगेशकर यांना आपल्या मूळ मोकळ्या आवाजात गायचा सल्ला दिला आणि त्यांच्याकडून मेहनतीने तशी गाणी गाऊन घेतली. बॉलीवूड मध्ये मा.हंसराज बेहल हे “मास्टरजी” या टोपणनावाने प्रसिध्द होते.
मोहम्मद रफी मास्टरजींकडे गायले तेव्हा त्यांनी रफी साहेबांना मोकळ्या आवाजातच गायला लावले. मास्टरजींनी अनेक नवीन लोकांना संधी दिली. त्यात एक नाव आहे मधुबाला झवेरी. तसेच गीतकार वर्मा मलिक आणि गीतकार नक्श लायल्पुरी यांना सुध्दा मास्टरजींनी पहिली संधी दिली. पण मास्टरजींची सर्वात मोठी फाईंड म्हणजे आशा भोसले. मास्टरजींच्याच “चुनरिया” चित्रपटातील एका कोरस मध्ये गाणाऱ्या आशाजींचा आवाज मास्टरजींनी बरोबर हेरला. आणि आपल्या पुढच्या चित्रपटात मध्ये त्यांना गायची संधी दिली. त्यांचे पहिले गाणे “है मौजमें अपने बेगने, दो चार इधर दो चार उधर”. त्यानंतर आशाजींना आपल्या चित्रपटात गाऊन घेण्यासाठी चढाओढ सुरु झाली.
हंसराज बेहल यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कलेची, संगीताची निस्सीम सेवा केली. आपल्या भावासोबत त्यांनी एन. सी. फिल्म नावाची एक कंपनी बनवून काही चित्रपटांची निर्मिती सुध्दा केली. “लाल परी”, “मस्त कलंदर”, “राजधानी”, “चंगेज खान” यासारखे काही चित्रपट त्यांनी बनवले. संगीताचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. “जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देस है मेरा” या गाण्यासाठी त्यांना सर्वोच्च राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. मा.हंसराज बेहल यांनी हिंदी चित्रपटसंगीताला आपल्या पंजाबी ढंगाच्या संगीताने नुसतेच नटवले नाही तर अनेक संगीतात अलौकिक देणग्या दिल्या. मा.हंसराज बेहल यांचे २० मे १९८४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
हंसराज बहेल यांच्याबद्दल आणखी एक माहिती जाता जाता..........
आपल्या कामाबद्दल आणि शांत मनमिळाऊ स्वभावाने अगदी लाखात एक असे गणले जाणारे मा.हंसराजजी आणखी एका बाबतीत लाखात एक होते. म्हणजेच त्यांचे हृद्य हे शरीराच्या उजव्या बाजूला होते. सर्वसाधारणपणे माणसाचे हृद्य हे डाव्या बाजूला असते पण उजव्या बाजूला हृद्य असणे हे लाखात एकाचेच असते. अर्थात ही गोष्ट त्यांच्या डॉ. कडून कळलेली आहे. (चेंबुरचे डॉ. रवी साठे).
संदर्भ.इंटरनेट/ misalpav.com
हंसराज बहेल यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=1VrSAH4BbIU
https://www.youtube.com/watch?v=GVYS2Hv-xLg
https://www.youtube.com/watch?v=uhAObadBSkA
टूनटून यांचे खरे नाव उमा देवी खत्री होते. त्यांचा जन्म १ जानेवारी १९२३ रोजी झाला. १९४०-४५ चा काळ होता, रम्य अशा दिवसातली ती सकाळची वेळ होती, संगीकार नौशादजी आपल्या आशियाना या घरात हार्मोनियमवर गाण्याचे स्वर काळ्या पांढरीच्या शृंगारात बसवत होते. इतक्यात त्यांच्या दारावर थाप पडली. पाठोपाठ आणखी थापा पडल्या. डोअर बेल न वाजवता दारावर कोण सलग थापा मारतंय हे बघण्यासाठी त्यांनी दरवाजा उघडला आणि समोर कोणीच नव्हते, ते दार बंद करणार इतक्यात बाजूला लपलेली एक १२- १३ वर्षांची धिटूकली समोर आली. तिने त्यांच्या पायाला मिठीच मारली ! ते तिच्याशी बोलण्याआधी तिने भोकाड पसरले, ते तिला घरात घेऊन आले. तिची विचारपूस केली तेंव्हा ती बोलती झाली. ती म्हणाली, "मला तुम्ही गायनाची संधी दिली नाही तर मी इथल्याच समुद्रात जीव देईन !" गावात असताना रेडीओवर गाणी ऐकून ऐकून तिने एकलव्यी बाण्याने रियाझ केलेला, इतकीच काय ती तिची गायनाची तयारी पण तिचा आवाज मधुर असल्याने तिचा स्वतःवर विश्वास होता अन तिच्या डोक्यात सतत नौशादजींचे वेड असे.
या शिदोरीवर तिने घर सोडून वयाच्या १३ व्या वर्षी थेट मुंबई गाठली होती. नौशाददेखील युपीच्या लखनौचेच असल्यामुळे त्यांना तिची काळजीही वाटत होती. नौशादजीनी तिच्या अशा या पार्श्वभूमीमुळे काही दिवस काम दिले नाही अन एके दिवशी तिची ऑडीशन घेतली आणि ते अचंबित झाले ! या मुलीचे नाव उमा देवी होय ....गाण्याचे वेड डोक्यात घेऊन आलेल्या उमादेवीच्या आयुष्यात पुढे अनेक चढउतार येऊन ती एक हसण्याजोगी बाब होणार आहे याचा तिला तिळमात्र अंदाज नव्हता. त्या दिवशी नौशादजींनी तिला ऐकले अन तिला पार्श्वगायनासाठी तत्काळ निवडले. तिची वर्णी इतरत्र लागू नये म्हणून नौशादजींनी ए. आर. कारदार यांना गळ घातली, नौशाद म्हणजे त्या काळाचे सर्वात मोठे संगीतकार असल्याने त्यांचा शब्व्द डावलणे अशक्य होते. तत्काळ उमादेवीची निवड शैलीदार सोनेरी आवाजाची गायिका म्हणून ए. आर.कारदार प्रॉडक्शन हाऊससाठी झाली, तिच्याशी करार केला गेला, तिचे मासिक वेतन ५०० रुपये ठरवले गेले. पण एक अट होती तिने ३ वर्षे दुसरया प्रॉडक्शन हाऊससाठी गायचे नाही.
त्यांना गाण्यासाठी लगेच सिनेमे मिळाले दर्द, दिल्लगी, चांदनी रात, नाटक पैकी 'दर्द' मधील शकील बदायुनी यांनी लिहिलेलं' अफसाना लिख रही हुं' ने तिला रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आणले सुरैयाबरोबरचे 'बेताब है दिले दर्द' ने तिला आणखी प्रसिद्धी मिळाली. दर्द नंतर मेहबूब खानच्या 'अनोखी अदा' मधलं 'काहे जिया डोले' आणि 'दिल को लगाके हमने कुछ भी न हमने पाया. 'हे गाणंही हिट झालं. पण उमादेवी मात्र करारात बांधल्या गेल्या असल्यामुळे इतर संधींना मुकत गेल्या अन त्यांना हळूहळू गायकीसाठी इतर प्रॉडक्शन हाऊसची दारे जवळजवळ बंद झाली अन तिचे करारबद्ध प्रॉडक्शन हाऊसच शेवटी बंद पडले. अन उमा देवी गायिकेच्या भूमिकेतून स्ट्रगलरच्या फेऱ्यात अडकली. त्या कामासाठी फिरू लागल्या. त्या गव्हाळ वर्णाच्या, थोडीशी जाड अंगाची, किंचित बसक्या चणीची होत्या, दिसायला लाखात एक वगैरे अशी काही नव्हत्या पण ती अगदी जेमतेम सौंदर्यवती होती अशी बाब होती. गायकीत नाव झाले तरी हरकत नाही पण अपयशाचा शिक्का घेऊन गावाकडे तिला परत जायचे नव्हते. त्यामुळे गाण्यातील संधींनी तोंड फिरवल्यामुळे तिने अभिनयासाठी प्रयत्न सुरु केले, एखादा रोल मिळतो का यासाठी ती वेगवेगळ्या प्रॉडक्शन हाऊसचे उंबरठे झिझावू लागल्या. त्याचा गायकीचा प्रवास थांबला, नायिका होण्याचे स्वप्न भंगले अन ती बॉलीवूडची पहिली महिला कॉमेडीयन म्हणून नावारूपाला आली.
१९५० मध्ये नौशाद यांचीच निर्मिती असलेला बाबुल हा सिनेमा सेट वर आला. या सिनेमातील नर्गिसच्या मैत्रिणीच्या - मुन्शीजीच्या मुलीच्या विनोदी भूमिकेसाठी तिला विचारणा झाली प्रेक्षकांनी या सिनेमातील उमादेवीच्या पात्रावरही प्रचंड कौतुकाचा वर्षाव केला, या पात्राचं नाव होतं टूनटून! हे नाव पुढे उमादेवीला आयुष्यभर चिकटले. त्यांची गायिका ही मूळ ओळख या सिनेमाने पुसून काढली अन टूनटून हे नाव जन्मास आले. जॉनी वॉकर, मेहमूद, धुमाळ, आगा, मुक्री, केष्टो मुखर्जी, भगवानदादा अशा अनेक कॉमेडीयन्स सोबत त्यांनी सिनेमे केले पण कधी कुणाशी नाव जोडू दिले नाही. टूनटून यांचा समाजावर इतका प्रभाव पडला की टूनटून या शब्दाचा अर्थच जाडी मुलगी असा होऊन गेला. टूनटूनने केलेल्या गुरुदत्तच्या आर-पार, मिस्टर और मिसेस फिफ्टी फाईव मधील आणि आबरू, एक राज, प्यासा, शराफत, दिल और मोहब्बत मधील भूमिका विशेष गाजल्या. १९५० ते १९६०च्या दशकातील ५० सिनेमात त्यांनी काम केलं. मा. उमादेवी उर्फ टूनटून यांचे २४ नोव्हेंबर २००३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. समीर गायकवाड / इंटरनेट
उमादेवी उर्फ टूनटून यांनी गायलेली काही गाणी
मेरी प्यारी पतंग
अफसाना लिख रही हुं
दिलवाले
रामानंद सागर यांचा जन्म लाहोर जिल्ह्य़ातील असलगुरूके या गावी झाला. त्यांचा मूळ परिवार पेशावर येथील. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९१७ रोजी झाला. पेशावर सोडून ते काश्मीर येथे स्थायिक झाले. त्यांचे पणजोबा लाला शंकरदास चोप्रा, मूळचे श्रीमंत- आजोबा लाला गंगाराम यांनी आयात निर्मात व्यवसायांत अथक परिश्रम घेऊन एवढे उच्चस्थान प्राप्त केले की, समाजातील लोक त्यांना नगरश्रेष्ठ म्हणून संबोधत. रामानंद यांचे मूळ नाव चंद्रमौली होते, ते त्यांचे मामा सागर यांना दत्तक गेले. दत्तक विधानानंतर त्यांचे नाव रामानंद ठेवले गेले. मामाच्या घरी गरिबी असल्यामुळे लहान वयात ट्रक क्लिनर, ऑफिस कार्यालयात शिपायाचे काम अशी विविध कामे त्यांनी केली. मुळात साहित्याची आवड असल्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षी ‘प्रितम प्रतीक्षा’ हे काव्य काश्मीर येथील प्रताप कॉलेजच्या मासिकासाठी लिहिले. पंजाब युनिव्हर्सिटीने त्यांना ‘मुन्शी फझल’ असा पर्शियन किताब व सुवर्णपदक बहाल केले.
१९३३ पासून साहित्य-काव्य-लेखन कार्यात ते मग्न झाले. वृत्तपत्रांतून स्तंभ लेखनाचे काम मिळाले. त्यांच्या लेखणीतील एक निराळी जादू लोकांना प्रभावित करू लागली. पंजाबमधील ‘मिलाप’ या वृत्तदैनिक पत्रिकेमध्ये पत्रकार म्हणून नियुक्ती झाली. ३२ कथा, ३ प्रदीर्घ कथा, २ नाटके, कादंबरी, दूरदर्शन मालिकांसाठी लिखाण केले.
१९४२ मध्ये त्यांना क्षयरोगाने पछाडले. त्यातून ते संपूर्ण बरे झाले. स्वत:च्या अनुभवावरून ‘एका क्षयरोग्याची डायरी’ हे लिखाण केले. आयुष्याला वेगळं वळण मिळावं म्हणून कुटुंबासह ते मुंबईला आले. बरेच दिवस मुंबईत त्यांचा जम बसत नव्हता. त्या हालाखीच्या दिवसांत त्यांनी ‘और इन्सान मर गया’ हे उर्दू, हिंदी भाषेत अप्रतिम वास्तव चित्रण सादर केले. या पुस्तकाला अमाप लोकप्रियता लाभली. १९४२ मध्ये प्रकाशित झालेला दिलीपकुमारचा प्रथम चित्रपट ‘ज्वारभाटा’ याचे कथा लेखन केले. तेव्हापासून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत लेखननिर्मितीला सुरुवात केली आणि भारतीय चित्रपटसृष्टीत एखाद्या तळपत्या ताऱ्यासारखे ते चमकत राहिले. त्या आधी लाहोर येथे तयार केलेल्या ‘रायडर ऑफ द रेल रोड’ या मूकचित्रपट निर्मितीच्या वेळी क्लॅपर बायचे कामही त्यांनी केले.
कुठलेही काम करण्यात कमीपणा मानायचा नाही असा त्यांचा स्वभाव होता. १९४९ मध्ये आर के निर्मित ‘बरसात’ चित्रपटाचे कथानक संवादलेखन केल्यामुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. त्या आधी पृथ्वी थिएटरच्या नाटकासाठी त्यांनी लेखन केले होते. १९५० मध्ये सागर आर्टस्’ या चित्रपटसंस्थेची स्थापना केली. १९५१ मध्ये ‘मेहमान’, ‘बाझूबंद’, १९५० मध्ये ‘बडी बहू’, १९५३ मध्ये ‘संगदिल’, १९५५ मध्ये ‘इन्सानियत’, १९५८ मध्ये ‘पैगाम’, ‘राजकुमार’, ‘कोहिनूर’ या चित्रपटासाठी लेखन केले. तसेच १२ दूरदर्शन मालिका चित्रित केल्या. १९६० ते १९६४ या कालावधीत ‘घुंघट’, ‘जिन्दगी’ या चित्रपटासाठी लेखन, दिग्दर्शक, प्रोडय़ुसर म्हणून काम केले. मद्रास येथील जेमिनी या चित्रपटसंस्थेला आर्थिक सहाय्य केले होते. १९८६ सालापर्यंतच २५ चित्रपटांची निर्मिती केली. २९ चित्रपटांसाठी कथानक लेखन केले- त्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले.
‘आरझू’, ‘ललकार’, ‘चरस’, ‘बगावत’ या चित्रपटांनी सुवर्ण महोत्सवाचे यश प्राप्त केले. २५ चित्रपटांना सिल्व्हर ज्युबिलीचे यश लाभले. सागर आर्टस्च्या जवळपास २५ यशस्वी चित्रपटांचे सरासरी एकत्रित यश एकटय़ा ‘रामायण’ व ‘श्रीकृष्ण’ मालिकेला मिळाले. दूरदर्शनच्या माध्यमातून डॉक्टर रामानंद सागर यांनी निदर्शनास आणून या माध्यमातून ते उत्कृष्ट वापर करून जनसामान्यांपर्यंत पोहोचू शकतात व ज्ञान, मनोरंजन पुरवू शकतात हे दाखवून दिले. चित्रपटांमधून व्यावसायिक यश मिळविल्यानंतर १९८७ मध्ये रामानंद सागर छोटय़ा पडद्याकडे वळले व त्यांना धार्मिक मालिकेचे युगप्रवर्तक अशी संज्ञा प्राप्त झाली.
१९८५ ते २००२ या कालावधीत सुमारे २००० तासांचे चित्रीकरण त्यांनी दूरदर्शन मालिकांसाठी केले. ‘रामायण’ या मालिकेचे डॉ. रामानंद सागर यांनी भारतीय आध्यात्मिक संस्कृतीचे सृजनात्मक पद्धतीने सादरीकरण करून सर्वसामान्य जनमानसात मानाचे स्थान मिळविले. रामायणाची संकल्पना कल्पनेने सादर करून, लेखन, दिग्दर्शन, निर्माता या नात्याने तिन्ही आघाडय़ा यशस्वीरीत्या सांभाळून धार्मिक मालिकेचे युगप्रवर्तक अशी संज्ञा त्यांना प्राप्त झाली. तद्नंतर ‘श्रीकृष्ण’ ही महामालिका दूरदर्शनसाठी केली. ‘रामायण’, ‘अलिफ लैला’, ‘जय गंगा मय्या’ या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत.
फ्रान्स, जपान, लंडन बी. बी. सी.वर त्यांच्या कथांचे वाचनही झाले. भारत सरकारने २००१ मध्ये त्यांना पद्मश्री किताब देऊन गौरविले. त्याआधी १९९७ मध्ये डॉक्टर ऑफ लिटरेचर (डि.लिट.) जम्मू युनिव्हर्सिटी, ‘साहित्य वाचस्पती’ हिंदी साहित्य संमेलन प्रयाग-अलाहाबाद यांनी पदवी प्रदान करून गौरविले. रामानंद सागर यांचे १२ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ शरद मेहेत्रे.
‘प्राचीन मराठी साहित्यातील स्त्रीचे दर्शन’ या त्यांच्या पुस्तकाला राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार मिळाला होता. परभणीला २००५ साली झालेल्या अखिल भारतीय बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
फक्रुद्दीन अली अहमद यांचे शिक्षण उत्तर-प्रदेश व दिल्ली येथे झाल्या वर ते १९२३ ला इंग्लैंडला गेले. त्यांचा जन्म १३ मे १९०५ रोजी झाला. तिथे कैम्ब्रिज मधून उच्च शिक्षण घेतले. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून. १९६७ आणि १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील बारपेटा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
फक्रुद्दीन अली अहमद हे भारताचे पाचवे राष्ट्रपती २९ ऑगस्ट १९७४ साली झाले. फक्रुद्दीन अली अहमद हे राष्ट्रपती पदावर असताना त्यांचे ११ फेब्रुवारी १९७७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
उमाजी खंडोबाचा भक्त होते. त्यांच्या पत्रावर ‘खंडोबा प्रसन्न’ असे शीर्षक दिसते. त्यांचा भाऊ आमृता याने सत्तू बेरडाच्या नेतृत्वाखाली इंग्रजांचा भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला (१८२४-२५). या लुटीमध्ये उमाजींची भूमिका महत्त्वाची होती.
विश्वजनाथ वामन बापट ऊर्फ वसंत बापट तरुण वयातच भारताच्या स्वांतत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. त्यांचा जन्म २५ जुलै १९२२ रोजी झाला.
१९४२ च्या चलेजाव चळवळीत त्यांचा सहभाग होता.
ऑगस्ट १९४३ पासून जानेवारी १९४५ पर्यंत ते तुरुंगात होते. तुरुंगातून सुटल्यावर मा.वसंत बापट 'नॅशनल कॉलेज (वांद्रे) आणि 'रामनारायण रुईया कॉलेज' ह्या मुंबईतील महाविद्यालयांत मराठी व संस्कृत ह्या विषयांचे प्राध्यापक झाले. लहानपणापासून बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि साने गुरुजींच्या सहवासाचे संस्कार झाले. शेवटपर्यंत ते राष्ट्रसेवा दलाशी संलग्नद होते.
'बिजली' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. 'अकरावी दिशा', 'सकीना' आणि 'मानसी' हे त्यांचे ’बिजली’नंतरचे काव्यसंग्रह होते. त्यांनी लहान मुलांसाठीही कविता लिहिल्या. वसंत बापट १९८३ ते १९८८ या काळात साधना नियतकालिकाचे संपादक होते. पौराणिक व ऐतिहासिक कथानकांवरची त्यांची नृत्यनाट्येही प्रभावी ठरली. ’केवळ माझा सह्यकडा' ही त्यांची कविता सर्वतोमुखी झाली. 'गगन सदन तेजोमय' सारखे अप्रतिम प्रार्थना गीत त्यांनी लिहिले.
कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मेघहृदयाच्या रूपाने मराठीत आणली. त्यांची ’सकीना’ उर्दूचा खास लहेजा घेऊन प्रकटली आणि, ’तुला न ठेवील सदा सलामत जर या मालिक दुनियेचा, कसा सकीना यकीन यावा कमाल त्यांच्या किमयेचा’ सांगून गेली. १९९९ मध्ये मुंबई येथे झालेल्या ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. युगोस्लोव्हियातील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनात भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणूनही ते सहभागी झाले.
चंगा मंगा, अबडक तबडक, आम्ही गरगर गिरकी, फिरकी, फुलराणीच्या कविता आणि परीच्या राज्यात हे त्यांचे बालकवितासंग्रह आहेत, तर बालगोविंद हे बालनाट्य त्यांनी लिहिले. वसंत बापट यांचे १७ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti