जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
`डोंबिवली फास्ट’मुळे माधव आपटे म्हणून घराघरात पोहोचलेले मराठी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
March 10, 2019
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर उभा राहतो एक कणखर लढवय्या, ज्यांनी आपल्या धारदार शब्दांनी, ओजस्वी वाणीने महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पहाणार्या द्वेष्ट्यांना सळो की पळो करुन सोडलं.अत्रेंचा हजरजबाबीपणा, वाकचातुर्य आणि लोकांना तासनतास एकाच जागेवर खिळवून ठेवण्याची हातोटी काय असेल आणि होती, या प्रसंगामुळे अधोरेखीत होतं.
June 13, 2013
राष्ट्रीय संस्कृत पंडित असणार्या कविश्वर श्रीदत्तात्रेय धुंडिराज कविश्वर यांनी निंबाकाचार्यांच्या ब्रह्मसूत्रावरील टीकेचे वेदान्त पारिजात सौरभ चे संशोधनाचे काम पाहिले होते.
माधवाचार्यांच्या सर्वच दर्शनसंग्रहवर विस्तृत टीका लिहिली. कामकोटी पीठाने सुवर्णपदक मिळवुन देत द्वारकेच्या श्री. शंकराचार्य ह्यांनी महामहोपाध्याय ही पदवी देऊन तर भारत सरकारकडून राष्ट्रीय संस्कृत पंडित हे सन्मानपत्र देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान केला होता .
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
अधिक माहितीसाठी पहा ..
January 3, 2015
कार्यकर्ता आणि ज्येष्ठ विचारवंत यांचा अपवादात्मक असा संगम वसंत पळशीकर यांच्या व्यक्तिमत्त्वात झाला आहे.
त्यांचा जन्म हैदराबादमधला. महात्मा गांधींच्या चळवळीतील वडिलांच्या संस्कारात ते वाढले. इंटरनंतर शिक्षण सोडून ते सामाजिक कार्याकडे वळले. गांधींजींच्या विचारांचा चिकित्सक स्वीकार त्यांनी केला. आचार्य विनोबा भावे, अण्णासाहेब सहसबुद्धे, साने गुरुजी, रावसाहेब आणि अच्युतराव पटवर्धन, बाबा आमटे यांच्या कार्यात वेळोवेळी सहभागी होत त्यांनी स्वत:ला अधिक समृद्ध केले. भूदान आंदोलन, आनंदवन, ओरिसातील कोरापूर येथे सर्वसेवासंघाच्या कामात त्यांचा सक्रिय वाटा होता.
सन १९५९ मध्ये ते महाराष्ट्रात परतले आणि प्रबोधनाच्या कामाला त्यांनी वाहून घेतले. मात्र हे काम ते प्राध्यापकीय अलिप्तपणे नव्हे, तर व्रत म्हणून पार पाडत आले आहेत. समाज प्रबोधन पत्रिका, नवभारत यांच्यासारख्या वैचारिक नियतकालिकांचे संपादन त्यांनी दीर्घकाळ केले, तसेच कार्यकर्त्यांची शिबिरे, वैचारिक परिषदा-संमेलने यांतही तेवढ्याच कळकळीने मार्गदर्शन केले. देशभरातील परिवर्तनवादी गट, प्रयोगशील संस्था यांना त्यांच्या मांडणीचा लाभ होत आला आहे.
संथ, अनाक्रमक शैली, पण ठाम युक्तिवाद हे त्यांचे वैशिष्ट्य. एकांगीपणा, साचेबद्ध गृहितांवर आधारित भोवतालच्या घटितांचा अर्थ लावण्याची खटपट, सखोल चिकित्सेपेक्षा दुसर्याला निरुत्तर करण्यातील आनंद यापासून त्यांचे लेखन आणि संवाद कायम दूर राहिला. त्यामुळेच त्यांची मांडणी अंतिमत: पटो वा न पटो, त्यातून विचाराला चालना देणारी, आपल्या समजांचा पुनर्विचार करण्यास भाग पाडणारी निरीक्षणे मिळत नाहीत असे कधी होत नाही. राजकारण, समाजकारण, शिक्षण, साहित्य-कला, विज्ञान, संस्कृती, स्त्री-पुरुष संबंध, चिरंजीवी विकास यासारख्या क्षेत्रांत त्यांनी मूलगामी लेखन केले आहे. समग्रतेचे भान हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. विचारांशी सुसंगत अशीच त्यांची जीवनशैलीही आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांना सच्चेपणा लाभला आहे.
समाजाच्या धारणेच्या, उन्नयनाच्या दृष्टीने किती मोलाचा विचार दिला, ही एखाद्याला 'विचारवंत' संबोधायचे की नाही याची एक कसोटी आहे, असे त्यांनी लिहून ठेवले आहे. या कसोटीला खुद्द पळशीकर उतरतात, असाच निवाडा त्यांचे वाचक करतील. गेली काही वर्षे प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्यांच्या लेखनात खंड पडला असला, तरी चिंतनात नाही.
महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने मराठी भाषा दिनी वसंत पळशीकर यांचा 'जीवन गौरव' पुरस्काराने केलेला सन्मान हा विचारी मराठीजनांसाठी कृतज्ञता सोहळाच होता.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
August 9, 2017
पुण्याच्या नॅशनल फिल्म अर्काइव्हज्मध्ये डायरेक्टरच्या ऑफिसात, शास्त्रीय संगीत ऐकत कामात बुडून गेलेले विजय जाधव हे खरच एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. जाधवांनी एनएफएआयच्या डायरेक्टर पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संस्थेने ‘सरकारी’ कात कधी टाकली हे कळलेच नाही. लहान वयातच मोठी जबाबदारी मिळूनही, ती सक्षमपणे संभाळण्याची किमया त्यांनी केलीच, शिवाय फक्त कलाकारांचा राबता असलेली संस्था नकळतच सामान्य सिनेप्रेमींसाठी कायमची खुली करून दिली.
July 26, 2011
मिलिंद तुळाणकर हे सुमारे ३५ हून अधिक वर्षं जलतरंग वाजवत आहेत. जलतरंग हे प्राचीन भारतीय वाद्य असून ते वाजविणाऱ्या व्यक्ती दुर्मीळ आहेत. ‘ही ६४ कलांमधील एक कला आहे. या वाद्याला जलवाद्य किंवा ‘जलतंत्री वीणा’ असेही म्हणतात. यात कमीतकमी १२, तर जास्तीत जास्त २६ भांडी असतात.
March 1, 2024
मराठी रंगभूमीचा तो सोनेरी काळ सोन्याचा करणाऱ्या ज्योत्स्नाबाई भोळे ह्यांचा मला स्नेहार्द्र सहवास लाभला, पुण्याच्या आपटे रोडवरील स्वरवंदना ह्या त्यांच्या निवासस्थानी माझे जाणे होते ! आजही त्यांची गाणी रेडिओवर जेव्हां ऐकू येतात, तेव्हां कान आपोआप तिकडे वळतात !
त्यांचे चिरंजीव श्रीमान सुहास भोळे हे माझ्या वडिलांचे, पुण्यातील भांडारकर रोडवरील बाल शिक्षण मंदिर शाळेच्या चिंचोरे गुरुजींचे तेव्हाचे विद्यार्थी होते. माझे वडील सुहास भोळे ह्यांची शिकवणी घ्यायला स्वरवंदनामध्ये जायचे. त्या अनेक आठवणी ज्योत्स्नाबाई ह्यांच्या मनात शेवटपर्यंत जाग्या होत्या. गप्पांच्या ओघात, त्या मला सगळ्या आठवणी सांगायच्या. मुलाच्या शिकवणीच्या वेळी, घरात, गाणं, नाटक, ह्याविषयी कसलीही चर्चा चालायची नाही, तंबोरा, पेटी ह्याचे आवाजही नसायचे. त्यां नेहेमी म्हणायच्या, "उपेंद्र, तुझे वडील, चिंचोरे गुरुजी पक्के हाडाचे शिक्षक होते, त्याकाळी आमचे कुलवधू नाटक खूप जोरात होते, खूप दौरे व्हायचे. पुण्यातल्या प्रत्येक प्रयोगाला आम्ही गुरुजींना आमंत्रण द्यायचो, पण ते म्हणायचे, "अहो, मी शिक्षक आहे, शिकवणे एवढेच माझे काम आहे, नाटकाला कसा येऊ?" हं, एकदा मात्र, नगरला आमचा प्रयोग होता, तेव्हां चिंचोरे गुरुजी, त्यांचे गावी नगरमध्ये होते, त्यादिवशी मात्र, गुरुजी प्रयोगाला आवर्जून आले, इतकंच काय, प्रयोग संपल्यावर, विंगेत येऊन चिंचोरे गुरुजींनी आमचं कौतुकही केलं" !
मी त्यांना एकदा म्हणालो, "अहो, आपले चिरंजीव सुहास, स्कॉलरशिप परिक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यावर, आपण माझ्या वडिलांना चांदीच्या भांड्यातून पेढे दिले होते, ते चांदीचे भांडे आजही आमच्या घरी उपयोगात येते, विशेष म्हणजे दरवर्षी गुढी उभारतांना काठीवर आपण दिलेले ते चांदीचे भांडे ठेवले जाते आणि त्याभोवती रेशमी वस्त्र नेसवले जाते"! मी सांगितलेली ती आठवण ऐकून ज्योत्स्नाबाई पुन्हा जुन्या आठवणीत शिरल्या !
ज्योत्स्नाबाई ह्यांचे जावई ब्रिगेडियर विजय खांडेकर हे सुद्धा माझ्या वडिलांचे विद्यार्थी, मला त्यांचाही सहवास मिळाला होता, हे माझे अहोभाग्य !
मा. दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा पुरस्कार ज्योत्स्नाबाई ह्यांना जाहीर झाला, त्यादिवशीही आमची गप्पांची मैफल त्यांचे घरी वरच्या मजल्यावरजमली होती !
आज अकरा मे, वंदनीय ज्योत्स्नाबाईंची आज जयंती आहे, त्यांचे पवित्र स्मरण कायम मनात आहे, "बोला अमृत बोला" गाणं म्हणणाऱ्या ज्योत्स्नाबाई नेहेमीच अमृतमय बोलायच्या,
-- उपेंद्र चिंचोरे
May 11, 2016
आपलं सगळं आयुष्य नाटकाला वाहिलेला, सर्वार्थाने रंगभूमी कलाकार म्हणजे मास्टर कृष्णराव. त्यांचा जन्म २० जानेवारी १८९८ रोजी झाला. त्यांना सुरुवातीचे संगीत शिक्षण बाबूराव फडके यांचेकडून मिळाले. कृष्णरावांचे वडील पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते 'संत सखू' नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांचा परिचय सवाई गंधर्वांशीझाला व त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्वांचे मार्गदर्शन लाभले. १९१० साली मास्टर कृष्णरावांनी पं. भास्करबुवा बखले यांचे शिष्यत्व स्वीकारले. आपल्या गुरूंच्या आग्रहास्तव मास्टर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते बालगंधर्वांबरोबर मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र', 'एकच प्याला' यांसारख्या अनेक नाटकांत स्त्री-भूमिकाही केल्या.
गुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम कृष्णरावांकडे आली. 'सावित्री', 'मेनका', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना कृष्णराव त्यातील अभिनेत्यांना मार्गदर्शन करत असत. बालगंधर्वही त्यांना गुरुस्थानी मानायचे. नंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा' यांमधील गाणी त्यांतील भाव, गेयता व शब्दसौंदर्यासाठी वाखाणली गेली. मा.कृष्णरावांनी 'धर्मात्मा', 'माणूस', 'गोपाळकृष्ण' यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या व इतर अनेक चित्रपटांतील गाणी खूप गाजली. त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या गाजलेल्या 'अमरज्योती' चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी 'भक्तीचा मळा' व 'मेरी अमानत' चित्रपटांत भूमिकाही केल्या. संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्टर कृष्णरावांनी १९२२ ते १९५२ दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच ठुमरी, नाट्यगीत,भजन व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी रचलेले 'झिंजोटी' रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे 'वंदे मातरम्' वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर. पी. एम. ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली.
अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील, गायन व वादन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे १९४० ते १९७१ या काळात लिहिलेले 'रागसंग्रह' नामक सात खंड त्यांत समाविष्ट आहेत. वंदे मातरम हे गीत, ते बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरमला अनेकानेक विविध चाली लावून, त्यांतल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी पंडित नेहरूंची भेट घेऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्नं केला. पण नेहरूंनी आधीच जन गण मन निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली.मसापतर्फे दर विषम वर्षी एका संगीतविषयक समीक्षकास मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार देण्यात येतो. मा.मास्टर कृष्णराव यांचे २० ऑक्टोबर १९७४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ ग्लोबल मराठी
January 20, 2018
“गंधर्व भूषण” जयराम शिलेदार म्हणजे संगीतनाट्य इतिहासातील सोनेरी पान. चित्रपट आणि नाटक या दोन्ही क्षेत्रांत सारखीच चमकदार कामगिरी करणाऱ्या थोड्या कलावंतांमध्ये "गंधर्वभूषण‘ जयराम शिलेदार यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते.
जयराम शिलेदार यांचा जन्म ६ डिसेंबर १९१६ रोजी झाला. घरचा सराफीचा व्यवसाय चांगला चालत होता. आजोबांच्या हातून घडलेल्या तोडे, बाजूबंद, पैंजणादी अलंकारांना आजूबाजूच्या संस्थानांतील राजघराण्यांतून मागणी असे. संगीताच्या सुरांशी या घराचा काहीही संबंध नव्हता. पण तत्कालीन प्रथेप्रमाणं प्रतिष्ठेचा प्रघात म्हणून कर्णेवाला ग्रामोफोन आणि गाजलेल्या कलाकारांच्या ध्वनिमुद्रिका घरात आल्या. खोडकर जयराम सतत खेळत असे. पण ग्रामोफोनच्या कुतूहलाने जयरामाचे पाय घरात रेंगाळू लागले. रेकॉर्ड्स ऐकत त्यांचं अनुकरण करता करता छोटय़ा जयरामला सूर गवसला.
निसर्गत: उत्तम आवाज, गळ्याला चांगली फिरत, प्रभावी आकलनशक्ती यामुळं त्याला संगीताचा चांगलाच नाद लागला. सर्वाना जयरामचे गाणे आवडू लागले. गल्लीतल्या गणेशोत्सवात हौशी मंडळींनी ‘स्वयंवर’ नाटक बसवायचा घाट घातला. गाणाऱ्यांची वानवा असल्याने पदं कटाप करून गद्य नाटक करायचं ठरलं. ग्रामीण बोलीमुळे ‘सयेंवर’ नाटक तुफान विनोदी वाटू लागलं. उपस्थित प्रेक्षक हुर्यो करू लागले की शिलेदारांच्या जयरामला रंगमंचावर ढकललं जाई.. ‘कंचंबी कृष्नाचं गान गाऊन सोड.’ पण नाटकाशी संबंध नसलेलं ‘राधेकृष्ण बोल मुखसे’ हे पद जयराम यांनी सुरू करताच उधळलेले प्रेक्षक शांत झाले आणि आवडीनं पद ऐकू लागत. त्यांनी टाळ्या व ‘वन्स मोअर’ने जयरामला डोक्यावर घेतले. बाल जयरामने गद्य ‘स्वयंवर’ संगीत करण्याची ही घटना म्हणजे भावी काळात संगीत रंगभूमीची धुरा वाहण्याचं अवघड कार्य त्यांच्या हातून होणार याची नांदी होती. .
सातवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर जयराम शिलेदार यांना शाळेचा कंटाळा आला. लिहिता-वाचता आलं, हिशेब करता आला की शाळेत जायलाच पाहिजे हे बंधन सैल होई. वडिलोपार्जित सराफी व्यवसायात जयराम यांनी यावं असं आजोबांना वाटत असे. पण त्यात जयराम यांचं मन अजिबात रमलं नाही. मग एका वकिलाकडं कारकुनी करायला त्यांना पाठवलं गेलं. तिथंही त्यांचे गाणं गुणगुणणं चालूच होते. ‘सयेंवर’च्या चमत्कारानंतर आजोबांनाही वाटू लागलं, की हा पोरगा नाटकातच नाव काढील; तर आपणच त्याला नाटक मंडळीत भरती करू. त्या काळात ही गोष्ट आगळीच म्हणावी लागेल.
बेळगावात मुक्कामाला आलेल्या रघुवीर सावकारांच्या रंगदेवता हिंदी-उर्दू-मराठी थिएट्रिकल कंपनीत आजोबांनी जयराम यांना दाखल केलं. पूर्वीच्या नाटक मंडळ्या म्हणजे नाटय़विद्यालयेच असत. भावी कलाकारांना संगीत आणि नाटय़ाचं पद्धतशीर शिक्षण देण्यात तिथं कसूर होत नसे. सुरुवातीचं नमन म्हणण्यासाठी स्त्रीवेश धारण करून हात जोडून उभं राहण्याचं काम त्यांनी सहा महिने केलं. मग छोटय़ा भूमिका करत एका वर्षांत जयराम यांनी धैर्यधराच्या भूमिकेपर्यंत झपाटय़ानं मजल मारली. त्यावेळी त्यांचं वय होतं अठरा वर्ष..
मूकपटाचं बोलपटात रूपांतर झाल्यावर नाटकाचा प्रेक्षक चित्रपटांकडं वळला. नाटक मंडळ्या बंद पडू लागल्या. रंगदेवता नाटक मंडळी बंद होताच त्यांनी ‘राजाराम संगीत मंडळी’, ‘नवजीवन संगीत नाटक मंडळी’ या संस्थांत कामं केली. राजाराम संगीत मंडळीत त्यांना चिंतुबुवा गुरव, गणपतराव बोडस यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. किर्लोस्कर मंडळीच्या पठडीचं शिक्षण मिळाल्याने जयराम यांची कामगिरी उठावदार होऊ लागली. नंतर त्यांना गंधर्व नाटक मंडळीचं बोलावणं आलं. त्यांच्या दृष्टीनं हा भाग्ययोग होता. बालगंधर्व म्हणजे त्यांचं परमदैवत. गंधर्वाच्या सुरांनी मोहून गंधर्व-गायकी आत्मसात करणारे अनेक होते, पण जयराम शिलेदार वेगळेपण हे- की त्यांनी गंधर्ववृत्तीचं अनुसरण केलं. संगीत नाटक कसं पेश करावं, त्यासाठी जीवन कसं झोकून द्यावं, हे त्यांना गंधर्वाकडून शिकायला मिळालं. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी संगीत नाटकाची पताका फडकवीत ठेवली.
वयाच्या १६ व्या वर्षी रंगदेवता रघुवीर सावकारांच्या कंपनीत त्यांनी नाट्यकलेचा श्रीगणेशा केला. नंतर गंधर्व नाटक मंडळींमध्ये नटसम्राट बालगंधर्वांबरोबर नायकाची भूमिका करण्याची संधी मिळाली. चित्रपटात ललिता पवार, सुमती गुप्ते, तर नाटकात हिराबाई बडोदेकर, शांता आपटे, मीनाक्षी, जयमाला शिलेदार यांच्याबरोबर त्यांची कारकीर्द गाजली. गणपतराव बोडस, चिंतामणराव कोल्हटकर, केशवराव दाते यांचे मार्गदर्शन मिळाले. पुढे "मराठी रंगभूमी‘सारखी संस्था उभी केली. ४५ हून अधिक संगीत नाटकांचे सहा हजारहून अधिक प्रयोग केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संगीत नाटकाची पताका फडकवत ठेवली.
राम जोशी यांच्यात जीवनावर आधारीत व्ही. शांताराम आणि बाबुराव पेंटर यांनी दिग्दर्शीत केलेला 'लोक शाहीर राम जोशी' हा चित्रपट १९४७ साली प्रदर्शित झाला. त्या चित्रपटामध्यें जयराम शिलेदार यांनी राम जोशी यांची तर हंसा वाडकर यांनी बयाची भूमिका साकारली होती.
'जिवाचा सखा'मधील त्यांची भूमिकाही विशेष गाजली. १९४७ मध्ये डॉ. भालेराव यांच्या नाटय़महोत्सवातील 'धरणीधर' या नाटकामध्ये त्यांनी जयराम शिलेदार यांच्यासमवेत जयमाला यांनी पहिल्यांदा काम केले. तर 'शाकुंतल' नाटकामध्ये त्या शिलेदार यांच्या नायिका होत्या. १० ऑक्टोबर १९४९ रोजी जयराम शिलेदार, नारायणराव जाधव आणि प्रमिला जाधव यांनी मराठी रंगभूमी संस्थेची स्थापना केली. २३ जानेवारी १९५० रोजी जयराम शिलेदार यांच्याशी विवाहबद्ध होऊन त्या जयमाला शिलेदार झाल्या.
जयमाला आणि जयराम शिलेदार यांचा संगीत नाटक हाच प्राण आणि सर्वस्व होते. संगीत रंगभूमीसाठी त्यांनी अपार कष्ट केले, पण त्याचा गाजावाजा कधीही केला नाही. संगीत रंगभूमीची सेवा ही त्यांनी निर्मोहीपणे केलेली नटराजाची सेवा होती. संगीत सौभद्र, सुवर्ण तुला, संशय कल्लोळ, स्वयंवर, एकच प्याला, शाकुंतल, मृच्छकटिक, मानापमान, ही एककाळ लोकप्रियतेचा कळस गाठलेली नाटके या दोघांनी सातत्याने रंगभूमीवर सुरू ठेवली. नव्या युगात संगीत रंगभूमीचा प्रेक्षकवर्ग कमी झाल्यामुळे, ही नाटके चालणार नाहीत, हा समजही त्यांनी खोटा ठरवला.
कोल्हापूर, सांगली, सोलापूर या शहरात संगीत रंगभूमीचे महोत्सव होत. काही महोत्सवाच्या सर्व नाटकांची तिकीट विक्री पूर्ण झाल्यावर, रसिकांना नाट्यगृहात बसायलाही जागा उरत नसे. तेव्हा अनेक रसिकांनी जमिनीवर बसून संगीत नाटकांचा आनंद लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. संगीत नाटक रसिकांनी या दोन्ही शिलेदारांवर अफाट प्रेम केले. हे प्रेम आणि संगीत रसिकांचा प्रतिसाद हेच त्यांचे खरे भांडवल होते. रसिकांची प्रशंसा हाच आपला सन्मान, असे हे दोघेही कृतज्ञपणे सांगत असत.
'मराठी रंगभूमी' ही संगीतनाट्य संस्था स्थापन करून त्यांनी अनेकांची कारकीर्द घडविली. जयराम शिलेदार यांच्या निधनानंतर "गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्ट' ही संस्था स्थापन करून जयमालाबाईंनी कलावंतांना घडवायचे कार्य केले होते.
जयराम शिलेदार यांचे ६ नोव्हेंबर १९९२ रोजी निधन झाले.
जयराम शिलेदार यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
“गंधर्व भूषण” जयराम शिलेदार (6-Nov-2016)
“गंधर्व भूषण” जयराम शिलेदार (6-Nov-2017)
गंधर्वभूषण जयराम शिलेदार (6-Dec-2017)
गंधर्वभूषण जयराम शिलेदार (10-Nov-2019)
‘गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार (12-Jun-2019)
आज “गंधर्वभूषण‘ जयराम शिलेदार यांची जयंती (6-Dec-2016)
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
April 30, 2022
आज ११ नोव्हेंबर..आज यशवंत दत्त यांची पुण्यतिथी.
आई - वडील यांच्याकडून आलेला अभिनयाचा वारसा, उपजत अभिनयकौशल्य या बळावर यशवंत दत्त या माणसाने मराठी नाटक आणि चित्रपट यांत आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला. मराठीनंतर त्याला हिंदीतही चांगली संधी चालून आली होती. नकला हा यशवंत दत्त यांचा स्थायीभाव होता. शाळेत असल्यापासून ते शिक्षकांच्या इतक्यात हुबेहूब नकला करत असत, अर्थात, पुढे नकला करण्याची सवय त्यांच्या कामी आली. "थंडर्स' नावाच्या ऑर्केस्ट्रात ते काम करत असत. निवेदन आणि नकला करून ते प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले होते. यशवंत दत्त या हरहुन्नरी अभिनेत्याची ती सुरवात होती. यशवंत दत्त यांच्या आई - वडिलांनी चित्रपटात व नाटकांत कामे केली होती. वडिलांनी तर "गरिबांचे राज्य' या नावाचा चित्रपट काढला होता; पण दुर्दैवाने या चित्रपटात त्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला. यशवंत दत्त यांना गरिबीचे चटके सोसावे लागले. आपल्याला आलेल्या आर्थिक अपयशामुळे वडिलांचा यशवंत दत्त यांनी नाटक व चित्रपटसृष्टीत जाण्यास विरोध होता; पण अखेर त्यांनी यशवंत दत्त यांना परवानगी दिली आणि मार्गदर्शनही केले. घरच्या गरिबीवर मात करताना यशवंत दत्त यांनी उडप्याच्या हॉटेलात नोकरी केली, पानाच्या गादीवर काम केले, अखेर "फिलिप्स' मध्ये ते कामगार म्हणून रुजू झाले. यशवंत दत्त यांनी आपल्या अभिनयक्षमतेच्या जोरावर या कंपनीला विविध एकांकिका आणि नाट्यस्पर्धांतून विविध प्रकारची बक्षिसे मिळवली. यशवंत दत्त यांच्यामुळे फिलिप्स कंपनीचे नाव कलाक्षेत्रात गाजत होते. राज्य नाट्यस्पर्धेत "अडीच घरं वजिराला' हे नाटक पुणे केंद्रातून निवडले गेले, मग मुंबईच्या नाट्यसंस्थांकडून त्यांना बोलवणी येऊ लागली. दत्ता भट यांच्यासारख्या नामवंत अभिनेत्याने त्यांना आपल्याबरोबर काम करण्यासाठी बोलावले. "गरिबी हटाव' या नाटकात यशवंत दत्त यांनी चुणूक दाखवून दिली. नंतर यशवंत दत्त यांची तीन नाटकं आली. यशवंत दत्त यांना नाव मिळवून दिले ते "नाथ हा माझा' या नाटकाने. या नाटकातील सुभानराव यशवंत दत्त यांनी इतका मस्त उभा केला, की लोकांची त्यांना प्रचंड दाद मिळत असे. हे नाटक अचानक बंद पडले, पुन्हा काही काळाने ते परतले ते "वेडा वृंदावन' या नाकातून. त्यानंतर सुरू झाला यशवंत दत्त यांचा चित्रपटक्षेत्रातील प्रवास. "सुगंधी कट्टा', "दगा'मध्ये त्यांनी खलनायक, नायक रंगवला. मराठी चित्रपटसृष्टीला तेव्हा एका चांगल्या नायकाची गरज होती, ती पोकळी यशवंत दत्त यांनी भरून काढली. "भैरू पैलवान की जय', "दौलत', "फटाकडी', "आपली माणसं', "आयत्या बिळात नागोबा', "पैजेचा विडा' आदी चित्रपटांतून त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या. "शापित'मध्ये केलेल्या भूमिकेची दखल देशपातळीवर घेतली गेली.
चित्रपटात काम करून प्रसिद्धी मिळत असताना त्यांनी नाटक करणे सोडले नाही. प्रत्येक नटाला मोह पडावा अशी भूमिका म्हणजे "नटसम्राट'मधील गणपतराव बेलवलकरांची..“ती वयाच्या चाळीसाव्या वर्षी इतकी सहजगत्या साकारली की प्रेक्षकांनी या व्यक्तीरेखेला अक्षरश: डोक्यावर घेतले. त्यानंतर यशवंत दत्त यांनी “गगनभेदी” नाटक केले. त्यानंतर त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाचे नाटक म्हणजे “वादळ माणसाळतंय”. वसंत कानेटकर यांनी बाबा आमटे यांच्या आयुष्यावर लिहिलेले हे नाटक यशवंत दत्त यांनी अत्यंत प्रभावीरित्या केले. त्यानंतर सुध्दा वसंत कानेटकर यांच्याच “सोनचाफा” आणि जयवंत दळवींच्या “कालचक्र” या दोन्ही नाटकांमध्ये यशवंत दत्त यांनी अभिनय केला.त्याचप्रमाणे “सरकारनामा” चित्रपटातून त्यांनी रंगवलेला खलनायक अगदी हुबेहूब रंगवून प्रेक्षकांकडून दाद मिळवली; ती आजही अनेकांच्या स्मरणात आहे. यशवंत दत्त यांनी "शापित" तसंच "संसार" या चित्रपटातून साकारलेल्या भुमिकांना "राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
नाटक, चित्रपट यामध्ये मग्न असलेल्या यशवंत दत्त यांच्यामध्ये एक हळुवार कवी लपलेला होता. यशवंत दत्त यांनी मराठी चित्रपट आणि रंगभूमीला दिलेलं योगदान अतुलनीय आहे. मा.यशवंत दत्त यांचे ११ नोव्हेंबर १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 11, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti