जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
भारतातील अणुसंशोधन आणि अवकाश संशोधनाचे जनक डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म मुंबई येथे ३० ऑक्टोबर १९०९ रोजी झाला. केंब्रीज विद्यापीठात भाभांचे उच्च शिक्षण झाले. भोर आणि रुदर फोर्ड या दोन शास्त्रज्ञांच्या हाताखाली शिक्षण घ्यायची संधी त्यावेळेस त्यांना मिळाली.
मराठी चित्रपट सृष्टीत 'तांबड्या माती'तील साधा माणूस भालजी पेंढारकर यांचा जन्म २ मे १८९९ रोजी झाला.
भालजी पेंढारकर कोल्हापूरच्याच गुरुवर्य विभूते यांच्या प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिकले. भालजी हुशार पण अभ्यासात लक्ष नसे. नाटकांचे वेड होतंच. मेळेही लिहित. परिणामी मॅट्रिक नापास झाले. आई रागावल्यावर हेही भडकून पुण्याला गेले. घरोघर सकाळी ‘केसरी’ टाकायचे. वयाच्या अठराव्या वर्षी सैन्यात दाखल झाले. पंजाब व आसपासचा भाग भटकून पाहिला. ते सोडून पुढे पुण्याच्याच ‘लक्ष्मी’ व ‘अपोलो’ या सिनेमागृहात मॅनेजर म्हणून काम केले.
बोलपट सुरू होण्याआधीचा तो काळ, त्या काळात नाटकांची चलती होती. भालजींना लिहिण्याचं वेड. त्यांनी ‘राष्ट्रसंसार’, ‘क्रांती’, ‘अजिंक्यतारा’, ‘आसुरी लालसा’, ‘कायदेभंग’ अशी राष्ट्रप्रेमाने भारलेली नाटके लिहिली. नाटके लिहिण्याचा हा अनुभव त्यांना लवकरच उपयोगी पडला. १९३२ साली ‘सरस्वती सिनेटोन’च्या ‘श्यामसुंदर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याचप्रमाणे कथा-पटकथा-संवाद-गीते अशी सारी जबाबदारी भालजींवर सोपविण्यात आली. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्यमहोत्सवाचा पहिला मान ‘श्यामसुंदर’ला मिळाला. मुंबईच्या ‘वेस्टएन्ड’ (नाझ) या चित्रपटगृहात तो सलग २७ आठवडे पडद्यावर झळकत होता. ‘श्यामसुंदर’ची याशिवाय इतरही अनेक वैशिष्ट्यं होती. भारतातला तो पहिला ‘बाल चित्रपट’. शिवाय मराठीबरोबर त्याची हिन्दी व बंगाली आवृत्तीही काढण्यात आली होती.
शाहू मोडक यांचा हा पहिला चित्रपट आणि मुख्य म्हणजे पुण्यात निर्माण झालेला हा पहिला बोलपट होता. त्यानंतर भालजींनी कोल्हापूर सिनेटोन (आकाशवाणी, कालियामर्दन), श्याम सिनेटोन (पार्थकुमार), सरस्वती सिनेटोन (सावित्री, राजा गोपीचंद), शालिनी सिनेटोन (कान्होपात्रा), अरुण पिक्चर्स (नेताजी पालकर, गोरखनाथ) फेमस अरुण (सूनबाई) या चित्रसंस्थांच्या चित्रपटांचे दिग्दर्शन व कथा-पटकथा-संवाद व गीते ही सारी जबाबदारी सांभाळली. १९४५च्या सुमारास भालजींनी छत्रपतींच्या मालकीचा ‘कोल्हापूर सिनेटोन’ हा स्टुडिओ विकत घेऊन त्याचे ‘जयप्रभा स्टुडिओ’ (जयसिंग व प्रभाकर यांच्या नावावरून) असे नामकरण केले.
भालजींचा हा स्टुडिओ एखाद्या आश्रमासारखा होता. सगळीकडे स्वच्छता, टापटीप व प्रसन्न वातावरण होते. पण शिस्त मात्र कडक होती. स्टुडिओच्या आवारात कागदाचा कपटा व सिगारेटचं पाकीट, सिगरेट-विडीचे उरलेले तुकडे काहीच दिसत नसत. त्याकरिता ठिकठिकाणी पेट्या होत्या. त्यातच कचरा टाकला पाहिजे, असा नियम होता. स्टुडिओत सुमारे साडेतीनशे माणसे नोकरीला असूनही कुठेही गडबड गोंधळ नसे. भालजींना सारे ‘बाबा’ म्हणत. ते स्टुडिओत असो वा नसो त्यांचा दराराच एवढा होता की लोक उगाचच इकडे तिकडे चकाट्या पिटताना कधी दिसत नसत. स्टुडिओत ठिकठिकाणी नियम व सूचनांचे फलक लावलेले होते. काही ठिकाणी तर सुविचारांचेही फलक दिसत. चित्रपटाच्या वेळी काम नसले तरी सर्वांना स्टुडिओत यावेच लागे.
सकाळी साडेदहा वाजता सर्वांना स्टुडिओत यावे लागे. कामाची सुरुवात चौकात भगव्या ध्वजासमोर प्रार्थनेने व्हायची. बाबा स्वत: प्रार्थनेला सुरुवात करीत. त्यांच्या मागून सारेजण म्हणत. कधीकधी बाबांचे सहायक जयशंकर दानवे प्रार्थना म्हणत.
सकाळची प्रार्थना
‘कृषिवलांची वीरवरांची देवांची जननी पतिव्रतांची सद्धर्माची महत् जन्मभूमी’
अशी होती तर संध्याकाळी परत प्रार्थनेनंतर काम थांबे.
संध्याकाळी ‘मारूनि मेले अमर जाहले स्वतंत्रतेसाठी प्रणाम त्यांना तुला दंडवत माते कोटी कोटी’ या प्रार्थनेने दिवस संपे.
भालजींच्या प्रत्येक चित्रपटाची सुरुवात ‘बहुत असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ या महाराष्ट्रगीताने होत असे. बाबांचा पोषाख म्हणजे अत्यंत साधा पांढरा सफेद बिनकॉलरचा सदरा, पांढरी हाफपॅन्ट व कोल्हापूरी चपला. विशेष प्रसंगी ते भगवी टोपी घालत.
चित्रपटासाठीसुद्धा नाटकातल्यासारखी नटांची खच्चून तालीम करून घेणारे भालजी हे बहुतेक शेवटचे दिग्दर्शक म्हणावे लागतील. तालीम हॉलमधले भालजी म्हणजे एक प्रकारे शिक्षकच असायचे. बोलावं कसं, चालावं कसं, उभं रहावं कसं याबरोबरच एखाद्या भूमिकेतील हालचाल कशी असायला पाहिजे हे सारं ते करून दाखवत व करून घेत. अभिनय उत्तम व्हावा यावर त्यांचा कटाक्ष असे. चुकल्यावर भल्याभल्यांना ते छडी मारत. पण त्यांचं मारणं प्रेमाचं असे. कलाकारांच्या अभिनयाच्या आवाका आजमावून त्याप्रमाणे ते समजावून सांगत. वेळ प्रसंगी थोडी मोकळीकही देत.
भालजींचे बहुतेक चित्रपट ऐतिहासिक होते. शिवाजीचं किंवा संभाजींचं काम करणार्या अभिनेत्याला ते सांगत- ‘हा छत्रपतींचा पोषाख अंगावर असताना तू कुणालाही, अगदी मलासुद्धा वाकून नमस्कार करायचा नाहीस. तुला कोणी नमस्कार केला तर फक्त गळ्यातल्या माळेला हात लावून ‘जगदंब जगदंब’ एवढंच म्हणायचं. आता तू छत्रपती आहेस!’ बाबांची शिवभक्ती आणि निष्ठा एवढी जाज्वल्य होती की चित्रपटातला छत्रपतींचा पोषाखही त्यांना वंदनीय वाटायचा. त्याक्षणी ते शिवमय असायचे.
भालजींच्या चित्रपटात संगीताला फारसं महत्त्व कधीच नसे. भालजी स्वत: गीतलेखक. संगीताची त्यांना उत्तम जाण. पूर्वी नाटकात अभिनयाबरोबर गाणीही त्यांनी म्हटली होती. काही दिवस अल्लादियाखांची शागिर्दीही केलेली. तिथे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले असे असतांनासुद्धा भालजींच्या चित्रपटात संगीताला महत्त्व नव्हतं. याचं कारण भालजींचा चित्रपट निर्मितीमागचा हेतू अगदी स्पष्ट होता.
स्वातंत्र्यपूर्वी काढलेल्या चित्रपटांच्या निर्मितीचा उद्देश म्हणजे पारतंत्र्यात असलेल्या मातृभूमीतील जनतेची अस्मिता जागृत करून मरगळलेल्या महाराष्ट्राला परकीय सत्तेविरूद्ध झुंजण्याची स्फूर्ती देणं तर स्वातंत्र्यानंतरही स्वराज्य मिळाले तरी सुराज्य करण्यासाठी बळकट मनगट आणि उरात अभंग आवेश असणारी नवी पिढी निर्माण व्हावी या हेतूने त्यांनी चित्रपटनिर्मिती सुरूच ठेवली.
याविशिष्ट हेतूने चित्रपट काढण्याचा प्रक्रियेतूनच भालजींचं खास वैशिष्ठ्य असलेल्या ‘खटकेबाज संवादा’चा जन्म झाला. त्यांच्या अनेक चित्रपटातील खटकेबाज संवाद त्यांच्या चमकदार लेखणीची चुणूक दाखवतात. त्यांचे संवाद तालासुरात असतात. त्यांना वजन असतं. चित्रपटातील कित्येक प्रसंगांना तर भालजींच्या संवादामुळे रंगत आली आहे, उठाव आला आहे. प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारे धारदार संवाद हे त्यांच्या चित्रपटांचं प्रमुख आकर्षण असायचं. समाजातील दुबळेपणा, लाचारी पराधीनता, लाळघोटेपणा, स्वकीयांचा घात, फंदफितुरी या अशा कित्येक दुर्गुणांवर आपल्या कडक संवादातून फटकार्यादसारखे कोरडे त्यांनी ओढले आहेत. याबरोबरच सुविचारांची पखरणही त्यांच्या संवादात असे. चित्रपट मग तो ऐतिहासिक असो, ग्रामीण असो वा सामाजिक असो... भालजींनी त्यांच्या संवादातून काही ना काही संदेश प्रेक्षकांना दिलाच आहे!
बाबांची शिष्यपरंपरा फार मोठी आहे. शाहू मोडकला तर त्यांनी ‘श्यामसुंदर’मधून बालनट म्हणून आणले. त्याचप्रमाणे मा. विठ्ठल, ललिता पवार, चंद्रकांत, सूर्यकांत, जयशंकर दानवे, सुलोचना, राजकपूर ही बाबांचीच शिष्यमंडळी. बाबांच्या तालमीत अभिनयाबरोबरच शिस्त व स्वाभिमानाचीही दीक्षा मिळत असे. कारण बाबांच्या स्वभावाचा तो मानबिंदू होता. गांधी वधोत्तर झालेल्या जाळपोळीच्या वणव्यात बाबांचा जयप्रभा स्टुडिओ लोकांच्या रागामुळे आगीत जळून खाक झाला. कारण काय? तर गांधींचा मारेकरी हिंदुमहासभेचा कार्यकर्ता आणि बाबा हे हिंदूमहासभेचे कट्टर अनुयायी. बाबा त्यावेळी पन्हाळ्याला होते. जयप्रभा स्टुडिओ जळाल्याचं दु:ख भालजींना वेगळ्याच कारणासाठी झालं. एकतर साडेतीनशे कामगारांवर बेकारीची कुर्हायड कोसळली आणि दुसरं म्हणजे भालजीचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज.
महाराजांवर भारताबाहेरच्या विशेषत: पोर्तुगीत फ्रेंच व इटालियन इतिहास संशोधकांनी जे काही लिहिलंय त्यांची इत्यंभूत माहिती राजाराम कॉलेजचे प्राचार्य, इतिहासाचे प्राध्यापक व अभ्यासक व भालजींचे मित्र डॉ. बाळकृष्ण यांनी परिश्रमपूर्वक व गोळा केली होती. त्यावर संशोध करून प्रबंध लिहिला होता. भालजी तो प्रसिद्धही करणार होते. तो प्रबंध त्या आगीत जळून भस्मसात झाला. या गोष्टींचे भालजींना अतोनात दु:ख झालं.
जळितात नष्ट झालेला ‘मीठभाकर’ त्यांनी पुन्हा नव्याने काढला. त्यानंतर शिलंगणाचे सोने (१९४९), मी दारू सोडली (१९५०), शिवा रामोशी (१९५१), छत्रपती शिवाजी (१९५२), मायबहिणी (१९५२), माझी जमीन (१९५३), महाराणी येसूबाई (१९५४), येरे माझ्या मागल्या (१९५५), पावनखिंड (१९५६), नायकिणीचा सज्जा (१९५७), आकाशगंगा (१९६५), तांबडी माती (१९६९), गनिमी कावा (१९८१), शाबास सूनबाई (१९८६) अशा अनेक चित्रपटांची निर्मिती करून दिग्दर्शनही केले. १९८६ साली ‘शाबास सूनबाई’ हा चित्रपट करताना त्यांचं वय ८६ होतं. दृष्टी जवळजवळ अधू होती. परंतु कलाकारांचे संवाद ऐकून ते दिग्दर्शन करीत. त्या वयातही ते सेटवर सतत उभे राहात. चित्रपटसृष्टीत आयुष्य घालवून बाबा सन्मान वा सत्कार स्वीकारण्यापासून दूर राहिले. उतारवयात मात्र त्यांच्यावर अनेक पुरस्कारांची खैरात झाली.
चतुरंग प्रतिष्ठानचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा ग. दि. माडगूळकर पुरस्कार, कोल्हापूरचा हुकुमतपनाह पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले. पण भालजी पडले विरक्त कर्मयोगी. त्यांनी या सर्व पुरस्कारांची रोख रक्कम त्या त्या संस्थेला किंवा गरजू व योग्य व्यक्तीला देऊन टाकली. भालजी ही व्यक्ती मान-सन्मानाच्या पलिकडची होती. १९९२ साली त्यांना चित्रपटातील व्यक्तीला देण्यात येणारा सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो. पण वयोवृद्ध भालजींकरिता हा नियम बाजूला ठेवून राष्ट्रपतींच्या प्रतिनिधीने कोल्हापूरात येऊन हा पुरस्कार दिला.
संस्कार, ध्येय, समाजप्रबोधन यापासून आजची चित्रपटसृष्टी फार दूर गेली आहे. मात्र आपल्या चित्रपटातून समाजाच्या अन्त:करणात देव, देश आणि धर्म याची ज्योत सदैव तेवत ठेवणारे भालजी पेंढारकर बदलत्या काळाच्या ओघात निश्चि तच वंदनीय आहेत! मा.भालजी पेंढारकरांचे २६ नोव्हेंबर १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ - मधू पोतदार
आज १६ आक्टोबर
आज ड्रीमगर्ल हेमामालिनी यांचा वाढदिवस
जन्म. १६ आक्टोबर १९४८
हेमामालिनी यांचे पूर्ण नाव हेमामालिनी चक्रवर्ती. मा.हेमामालिनी यांची आई जया चक्रवर्ती ह्या तमिळ चित्रपटाच्या निर्मात्या होत्या, त्यामुळे घरी आधीपासूनच चित्रनगरीशी जुळवून घेणारे वातावरण होते. आपल्या चार दशकाहूनही अधिक काळापासून सिनेसृष्टीत यशस्वी कलाकार म्हणून आणि कित्येक सुपरह हिट चित्रपट देणाऱ्या हेमामालिनी यांना सुद्धा सुरवातीच्या काळात निर्माते आणि निर्देशक यांनी म्हंटले होते कि त्यांच्यात स्टार अपील नाही. तमिळ दिग्दर्शक श्रीधर यांनी तिला चित्रपटात घेण्यासाठी नकार दिला होता. हेमामालीनी यांना पहिला ब्रेंक मिळाला तो राजकपूर सोबतच चित्रपट ‘सपनो का सौदागर’ या चित्रपटात त्यांना ‘ड्रीमगर्ल’ म्हणून प्रचारित करण्यात आले होते, फिल्म बॉक्स ऑफिस वर फारशी यशस्वी ठरली नाही पण हेमा मालिनी यांचे कौतुक झाले आणि दर्शकांनी त्यांना पसंद केले होते. त्यानंतरच्या काही चित्रपटांनमध्ये सुद्धा त्यांना ड्रीमगर्ल म्हणून समोर आणल्या गेले होते आणि आश्चर्य बघा कि नंतर १९७७ मध्ये त्यांना घेऊन प्रमोद चक्रवर्ती यांनी ड्रीमगर्ल नावाचा सिनेमाच पडद्यावर आणला आणि तो गाजला सुद्धा होता. त्यांचा पहिला हिट सिनेमा होता ‘जॉनी मेरा नाम’, देव आनंद सोबतच्या त्या चित्रपटाने त्यांचे करियर उचलून धरले. आणि लोकांनी त्या जोडीची खूप प्रशंसा केली होती. त्यानंतर आलेल्या रमेश सिप्पी यांच्या ‘अंदाज’ या चित्रपटातल्या अभिनयाने हेमा मालिनी यांनी दर्शकांना मंत्रमुग्ध करून टाकले होते. रमेश सिप्पी यांचाच चित्रपट ‘सीता और गीता’ मध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि ती फिल्म त्यांच्या करियर मध्ये निर्णायक ठरली होती. या चित्रपटानंतर त्या प्रसिध्यीचा शिखरावर पोहचल्या होत्या. या चित्रपटातील अतिशय सुंदर अभिनयामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा एकमेव फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. सुरवातीला ‘सपनो का सौदागर’ या चित्रपटासाठी वैजयंतीमाला यांची निवड झाली होती पण त्यांनी वेळेवर त्यांच्या विवाहामुळे त्या चित्रपटात काम करायला आपली असमर्थता दाखवली आणि त्याऐवजी हेमामालिनी यांना संधी मिळाली होती. तसेच ज्या चित्रपटाने त्यांना प्रसिद्ध्यीच्या शिखरावर पोहचवले होते त्या ‘सीता और गीता’ मध्ये रमेश सिप्पी यांना मुमताज यांना घ्यायचे होते. पण काही कारणास्तव त्या या चित्रपटात काम करू शकल्या नाही आणि पर्यायाने तो चित्रपट हेमा मालिनी यांना मिळाला आणि मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले होते. वैजयंतीमाला यांच्या निवृती नंतर शास्त्रीय नृत्यांगना असलेली अभिनेत्री ची जागा हेमा मालिनी यांनी भरून काढली. १९७० साली आलेल्या ‘शरारत’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा धर्मेंद्र सोबत काम केले होते आणि १९७९ मध्ये त्यांनी धर्मेंद्र यांच्या सोबतच लग्न केले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत धर्मेंद्र सोबत एकूण २८ चित्रपटांमध्ये काम केले होते. सहसा विवाहानंतर अभिनेत्रीची कारकीर्द संपुष्टात येते, पण हेमा मालिनी यांनी जिद्दीने आणि आपल्या परिश्रमाने विवाहानंतर सुद्धा बरेच यशस्वी चित्रपट दिलेत. जसे ‘क्रांती’, ‘नसीब’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘रजिया सुलतान’, एक नई पहेली’, ‘अंधा कानून’ आणि ‘अलिबाबा और चालीस चोर’ आणखी बरेच. उतरार्धात सुद्धा त्यांनी आपला चित्रपटाचा प्रवास सुरूच ठेवला ‘बागबान’ या भूमिकेबद्दल त्यांना फिल्मफेअर पुरस्काराच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासाठी नॉमिनेट करण्यात आले होते. ‘वीरजारा’ मधील भूमिकेबद्दल पण त्यांची बरीच प्रशंसा झाली होती. त्यांनी आतापर्यंत सीता औऱ गीता, शोले, संन्यासी, धर्मात्मा, प्रतिज्ञा, सत्ते पे सत्ता, बागबान यांसारखे १५० चित्रपट केले आहेत. ड्रीम गर्ल अशी हेमामालिनी यांची ओळख आहे. भरतनाट्यम मध्ये निपुण असलेल्या मा.हेमामालिनी जगभर अनेक ठिकाणी आपल्या नृत्यांचे कार्यक्रम पण केले आहेत. सोबतच त्यांनी ‘दिल आशना है’ या शाहरुख खान आणि दिव्या भारती अभिनित चित्रपटाचे दिग्दर्शन पण केले होते. राजकारणात पण त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्या भारतीय जनता पार्टी च्या जनरल सेक्रेटरी होत्या आणि सध्या मथुरा येथील भा.ज.पच्या खासदार आहेत. भरतनाट्यममध्ये विशारद असलेल्या हेमामालिनी यांनी १९६८ मध्ये ‘सपनो का सौदागर’ या चित्रपटातून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मा.हेमामालिनी यांना आपल्या समूहातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट /विकीपीडीया
नीलम प्रभू या अनेक वर्षे आकाशवाणीत कार्यरत होत्या. १९६० च्या दशकात रेडिओ हे मनोरंजनाचे एकमेव साधन असताना त्यांनी आकाशवाणीवर नभोनाट्यातून आपले संवादकौशल्य सादर करायला सुरुवात केली.त्यांचा सहभाग असलेली ‘प्रपंच’ ही कौटुंबिक श्रुतिका महाराष्ट्रात चांगलीच गाजली होती. त्यात त्यांनी मीना वहिनी अर्थात टेकाडे वहिनींची भूमिका केली होती. लहान मुलीची भूमिका असो की मध्यमवयीन गृहिणीची भूमिका असो, की वृद्ध महिलेची असो प्रत्येक भूमिकेला देव या त्या पट्टीचा आवाज देत. ‘आम्ही तिघी’ या नाट्यात त्यांनी आपल्या आवाजाचा करीश्मा दाखवला होता.
ज्येष्ठ डॉक्टर सुभाष रामकृष्ण म्हसकर यांनी ‘इतिहास वैद्यकशास्त्राचा’ हा ज्ञानाचा ठेवा पुस्तकरूपाने वाचकांना उपलब्ध करून दिला. म्हसकर यांच्या घराण्यात गेली शंभर वर्षे डॉक्टरी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे. एका शतकात आत्तापर्यंतच्या पाच पिढ्यांमध्ये एका घराण्यात ५४ यशस्वी डॉक्टर्स निपजले ही एक विक्रमी घटना म्हणता येईल.
एकापेक्षा अधिक परिचितांचे आकस्मिक मृत्यू एकाच दिवशी घडावेत हा कुयोग अलीकडच्या काळात परवाच्या मंगळवारी दुसऱ्यांदा घडून आला. दीनदयाळ शोध संस्थानचे संस्थापक नानाजी देशमुख आणि रा. स्व. संघाचे भूतपूर्व बौद्धिक विभाग प्रमुख डॉ. श्रीपती शास्त्री गेले तेव्हा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात पहिल्यांदा, आणि ज्येष्ठ गायक कै. सुधीर फडके यांच्या पत्नी ललिता फडके आणि ज्येष्ठ पत्रकार वि. ना. देवधर यांचे निधन झाले तेव्हा दुसऱ्यांदा.
देवधर लोकसत्ता परिवाराला जवळचे होते, कारण ज्येष्ठ सहसंपादक या नात्याने त्यांनी आपल्या वृत्तपत्र कारकीर्दीतली काही वर्षे ‘लोकसत्ता’त व्यतीत केली होती. देवधर तसे मूळचे पुण्याचे, शालेय शिक्षण सुरू असतानाच त्यांचा वृत्तपत्र व्यवसायाशी संबंध आला तो वृत्तपत्राचे गठ्ठे पोचवण्याच्या निमित्ताने. लेखनाची आवड असल्याने आणि श्री. म. माटे यांच्याकडे लेखनिक म्हणून उमेदवारी केली असल्याने लेखणीला आणि भाषेला जे वळण लागले होते, त्याच्याच आधाराने देवधर बातमीदारीत आले. ‘दैनिक भारत’ आणि ‘केसरी’त त्यांनी बातमीदारी सुरू केली आणि त्याच अनुभवावर मुंबईतून ‘महाराष्ट्र टाइम्स’ सुरू होताच देवधर तिथे रुजू झाले.
आर्थिक आणि राजकीय विश्लेषण ही देवधरांच्या बातमीदारीतली खासियत राहिल्याने काही काळ मुंबईत विधिमंडळाचे आणि नंतर दिल्लीत संसदेचे रिपोर्टिग त्यांनी केले. ‘राजधानीतून’ हे त्यांचे दिल्लीच्या बातमीदारीविषयीचे लेखन गाजले. त्याने दिल्लीच्या बातमीदारीचा एक नवा पायंडा पाडला. देवधर राजकीय विश्लेषण जेवढे निष्पक्षपणे आणि मार्मिक करीत, तेवढेच ते पडद्यामागच्या घटनांवर, बातमीमागच्या बातमीवर तिरकस आणि खोचक शैलीत लिहीत. ‘भेळ-शहाळी’ हे त्यांचे सदर त्यामुळेच अनेकांच्या स्मरणात राहिले. आणीबाणी उठताच देवधर ‘महाराष्ट्र टाइम्स’ सोडून पुण्याच्या ‘तरुण भारत’मध्ये संपादक म्हणून रुजू झाले.
अवघ्या पाच वर्षांच्या तिथल्या कारकीर्दीत त्यांनी आपल्या समर्थ लेखणीने जनसामान्यांवर ‘तरुण भारत’चा वेगळाच ठसा उमटवला. देवधर हिंदुत्ववादी होते, पण त्यांचे हिंदुत्व हिंदुत्ववादी विचारधारेबाहेरच्या वाचकालाही मोहित करीत राहिले. देवधर हिंदुत्वाच्या विचारधारेत वाढले, आपल्या विचारांशी, निष्ठांशी आयुष्यभर घट्ट राहिले, त्या विचारधारेतल्या मुखंडांनी त्यांची अवहेलनाही केली. स्वाभाविकपणेच त्यांच्याशी मतभेदही झाले, पण तरीही त्यांनी ध्येयवादावरची अतूट निष्ठा मात्र ढळू दिली नाही. विचारधारेचे, चळवळीचे पुरस्कर्तेपण त्यांनी जपले, पण ते जपताना बातमीचे, लेखणीचे पावित्र्य कुठेही कमी होऊ दिले नाही. सरकारी सवलती उपटणे, बातमीच्या पाटय़ा टाकणे, गोट गाठणे, कार्बन कॉपी जर्नालिझम करणे या वाटांना देवधरांची पत्रकारिता जाणे शक्यच नव्हते.
अभ्यासू वृत्ती जोपासत, व्यासंगाची सवय राखत, बातमीचे पावित्र्य जपत देवधरांनी, पत्रकारिता धर्माचे पालन केले. पत्रकार संघटनांमध्येही देवधरांनी काम केले. देवधरांची पत्रकारिता गतिमान होती, अष्टावधानी होती. निवृत्तीनंतरही देवधर पत्रकारितेतच सक्रिय राहिले आणि अन्य वृत्तपत्रांकरिता स्तंभलेखन, अग्रलेख लेखन करीत राहिले. प्रकृतीने साथ दिली असती तर पत्रकारितेच्या अध्यापनाबरोबरच नव्या पिढीतील पत्रकारही ज्ञानी, कृतिशील आणि बहुआयामी बनावेत यासाठी ते कार्यरत राहिलेले दिसले असते.
यशवंतराव चव्हाणांच्या एका पत्रकार परिषदेत केवळ त्यांना आलेल्या दूरध्वनीवरून देवधरांनी शोधून काढलेली यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री होणार असल्याची बातमी, त्यांच्या निरीक्षण, विश्लेषण क्षमतेचे कौशल्य दाखवणारी ठरली होती. ती बातमी देणारे ते पहिलेच मराठी पत्रकार ठरले होते. पत्रकार परिषदेदरम्यान आलेला तो दूरध्वनी सुरू असताना देवधरांनी टिपलेले चव्हाणांच्या मुद्रेवरचे भाव, चव्हाणांनी दूरध्वनीवरूनच दिलेली मोघम उत्तरे, त्यांची देहबोली, त्यांच्या बोलण्यात आलेला ‘संरक्षण’ हा एकमेव शब्द यावरूनच देवधरांनी बेधडकपणे यशवंतराव संरक्षणमंत्री होऊ घातले असल्याचा अंदाज वर्तवला होता आणि तो अचूक ठरला होता. अशी अचूक निष्कर्षशक्ती असणाऱ्या देवधरांनी नुकतेच ८१ व्या वर्षांत पदार्पण केले होते.
प्रकृती साथ देत नव्हती, पण प्रकृती अशी एकाएकी दगा देईल असेही वाटत नव्हते, अशा क्षणीच त्यांचे जाणे झाले आहे. ते खचितच धक्का देणारे आहे.
बरकत राय मलिक उर्फ वर्मा मलिक यांचा जन्म १३ एप्रिल १९२५ रोजी फरीदाबाद पाकिस्तानचा येथे झाला.
खूप लहान वयात त्यांनी कविता लिहण्यास सुरवात केली, फाळणीनंतर ते दिल्लीत स्थाईक झाले.
संगीत निर्देशक हंसराज बहल यांचे भाऊ वर्मा मलिक यांचे मित्र होते त्याच्या मुळे ते मुंबईला आले. पंजाबी चित्रपटापासून वर्मा मलिक यांनी सुरवात केली. बहल यांनी वर्मा को पंजाबी चित्रपट 'लच्छी' ची गाणी लिहण्यास दिले. मा.वर्मा पंजाबी चित्रपटाचे हिट गीतकार झाले. याच वेळी त्यांच्या मित्रांनी त्यांचे नाव बदलण्यास सांगीतले बरकत राय मलिक हे वर्मा मलिक नावाने ओळखू लागले.
वर्मा मलिक यांनी चाळीस पंजाबी चित्रपटासाठी गाणी लिहिली, तीन चित्रपटासाठी संवाद लिहिले व तीन चित्रपटासाठी निर्देशन केले. हिन्दी चित्रपट 'दिल और मोहब्बत' साठी 'आंखों की तलाशी दे दे मेरे दिल की हो गयी चोरी' हे गाणे लोकप्रिय झाले. पण ते प्रसिद्ध झाले नाहीत.
मनोज कुमार वर्मा मलिक यांना ओळखत होते. त्यांनी आपल्या चित्रपटासाठी रात अकेली, साए दो हुस्न भी हो व इश्क भी हो तो फिर, इकतारा बोले तुन तुन, ही गाणी वर्मा मलिक यांच्या कडून लिहून घेतली. मनोज कुमार यांनी इकतारा बोले तुन तुन, 'यादगार' चित्रपटासाठी वापरले, ते गाणे गाजल्यामुळे मा.वर्मा हे प्रसिद्धीच्या झोकात आले. रेखा यांचा पहिला चित्रपट 'सावन भादों' मधील वर्मा यांनी लिहिलेले 'कान में झुमका चाल में ठुमका कमर पे चोटी लटके हो गया दिल का पुर्जा पुर्जा लगे पचासी झटके' हे गाणे अजून लोकांच्या ओठावर आहे.
या नंतर 'पहचान', 'बेईमान', 'अनहोनी', 'धर्मा', 'कसौटी', 'विक्टोरिया न. २०३', 'नागिन', 'चोरी मेरा काम', 'रोटी कपड़ा और मकान', 'संतान', 'एक से बढ़कर एक', अश्या अनेक चित्रपटासाठी मा.वर्मा यांनी गाणी लिहिली. 'पहचान' चित्रपटातील गाणे सबसे बड़ा नादान वही है व 'बेइमान' चित्रपटासाठी जय बोलो बेइमान की जय बोलो या साठी त्यांना दोन वेळा फ़िल्मफेयर पुरस्कार मिळाला. 'सावन भादो' साठी ओमी यांनी वर्मा मलिक यांना गाणी लिहिण्यास सांगीतली. 'सावन भादों' ची गाणी हिट झाली. वारीस या चित्रपटातले 'मेरे प्यार की उमर हो इतनी सनम ' किंवा 'नागिन' यातील 'तेरे इश्क का मुझपें हुआँ ये असर है ' हि गाणी तर 'बेईमान' या चित्रपटातले, 'ये राखी बंधन है ऐसा', 'जैसे चंदा और किरण का, जैसे बद्री और पवन का, जैसे धरती और गगन का...' हम बोलेगा तो बोलोगे कि बोलता है एक मेमसाब है साथ में साब भी है मेमसाब सुंदर सुंदर है साब भी खूबसूरत है नेपाळी गुरख्याच्या भूमिकेतील प्राण यांच्या वर चित्रित झालेलं हे गीत चित्रपटाचं विषेश आकर्षण आहे. नेपाळी व्यक्ती हिंदी गीत गात असल्यानं 'स' अक्षराच्या जागी 'श'च्या उच्चाराची तसेच 'बोलना' क्रियापदावर कसरत करण्याची वर्मा मलिक यांनी कल्पकता केली होती.
आजही हिंदी भाषीकाच्या लग्नाच्या वरातीत 'आज मेरे यार की शादी है' व बिदाईला 'बाबुल की दुआएं लेती जा' ही गाणी ही गाणी वाजवली किंवा गायली जातात. ही दोन्ही गाणी वर्मा मलिक यांची.
वर्मा मलिक यांचे १५ मार्च २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
https://youtu.be/HIuYg2XBZMY
वसंत गोविंद पोतदार यांना संगीत दिग्दर्शक सी.रामचंद्र यांनी १९६२ साली स्वतःचे साहाय्यक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले. पु.ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोतदार यांनी ‘वंदे मातरम्’च्या क्रांतिगाथेवर भारतभर हिंडून एकपात्री प्रयोग केले.
सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांची ओळख महाराष्ट्रातील व्यासंगी-प्राच्यविद्यापंडित व मराठी कोशसाहित्यकार, महामहोपाध्याय अशी होती.डॉ. श्री. व्यं. केतकर यांच्या ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश मंडळा’त सहसंपादक म्हणून त्यांची १९२१ मध्ये नियुक्ती झाली. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १८९४ पुणे येथे झाला. महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील वेदविद्या खंडाच्या संपादनकार्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. महाराष्ट्रात ऋग्वेदविषयक अध्ययनाचा पाया घालून त्यांनी संपूर्ण ऋक्संहितेचे मराठी भाषांतर प्रथम प्रकाशित केले (१९२८). ‘भारतीय चरित्रकोश मंडळ’ या संस्थेचे ते संस्थापक व अध्यक्ष आहेत. ह्या संस्थेतर्फे त्यांनी भारतवर्षातील प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन काळातील प्रसिद्ध व्यक्तींचे तीन कोश संपादून ते प्रसिद्ध केले (१९३२, १९३७, १९४६). त्यातील भारत वर्षीय प्राचीन चरित्रकोशाच्या सुधारलेल्या हिंदी आवृत्तीस (१९६४) अहिंदी प्रांतांत प्रकाशित झालेला सर्वोत्कृष्ट हिंदी ग्रंथ म्हणून मध्य प्रदेश सरकारचे पारितोषिक मिळाले (१९६७). अथर्ववेदाचे मराठी भाषांतरही त्यांनी केले आहे. यांशिवाय पतंजलीच्या महाभाष्याचा महाभाष्यशब्दकोश, पाणिनीच्या अष्टाध्यायीचा व गणपाठाचा शब्दकोश हे ही ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले आहेत. प्राचीन भारतीय स्थलकोश ते संपादित असून त्याचा प्रथम खंड प्रकाशित झाला आहे (१९६९). पुरीच्या श्री शंकराचार्यांकडून ‘महामहोपाध्याय’ (१९५७) व चिदंबरम्च्या शंकराचार्यांकडून ‘विद्यानिधि’ अशा उपाध्याही त्यांना प्राप्त झाल्या आहेत. एक मान्यवर संस्कृत पंडित म्हणून राष्ट्रपतींचे संस्कृत सन्मानपत्र त्यांना मिळाले (१९६५). त्यांच्या विद्वत्कार्याच्या गौरवार्थ रिव्ह्यू ऑफ इंडॉलॉजिकल रिसर्च इन लास्ट सेव्हंटी फाइव्ह यीअर्स हा इंग्रजी ग्रंथ राष्ट्रपतींच्याच हस्ते त्यांना अर्पण करण्यात आला (१९६७). पुणे विद्यापीठाने डी. लिट्. ही सन्मानपदवी त्यांस दिली (१९६९). १९७१ मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा गौरव केला. प्राच्यविद्यांच्या प्रसारार्थ त्यांनी केलेले ज्ञानकार्य चिरंतन स्वरूपाचे असून ते सर्व अभ्यासकांना प्रेरक ठरणारे आहे. सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांचे ६ जानेवारी १९८४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ विश्व कोष
श्री. शेखर देसाई हे ठाणे येथील ठाणे भारत सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti