जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
जगदाळे, संजय
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावर एन. श्रीनिवासन यांची वर्णी लागल्याने सचिवपदाच्या शर्यतीसाठी बरीच नावे चर्चेत आली होती. त्यामध्ये रणजिब बिस्वाल हे बाजी मारतील असे वाटत असले तरी अमिताभ चौधरी यांनी त्यांच्याविरोधात अर्ज दाखल करण्याचे ठरविले होते.तथापि, बीसीसीआयमधील वरिष्ठ पदांवरील व्यक्ती निवडणूक होऊ नये, यासाठी आग्रही होते. त्यामुळे बिस्वाल आणि चौधरी यांचा पत्ता कट झाला.
बीसीसीआयच्या धुरीणांना यावेळी अनुभवी, पण वाद-विवादात न पडणारी आणि आपले सारे काही ऐकणारी व्यक्ती हवी होती. त्यावेळी बीसीसीआयच्या वरिष्ठ पदांवरील व्यक्तींपुढे एकच नाव आले आणि त्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले, ते नाव म्हणजे संजय जगदाळे. बीसीसीआयच्या कारभाराचा असलेला अनुभव आणि स्वच्छ प्रतिमा असल्यामुळे जगदाळे यांच्या नावाला कोणीही विरोध केला नाही आणि बिनविरोधपणे जगदाळे बीसीसीआयच्या सचिव पदावर विराजमान झाले. १९६८-८३ या दरम्यान स्थानिक क्रिकेटमध्ये जगदाळे हे एक गुणी अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जायचे. या दरम्यान त्यांनी ५५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २,०७७ धावा केल्या, ज्यामध्ये दोन शतकांसह नऊ अर्धशतकांचा समावेश होता. त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये त्यांनी ८५ विकेट्स घेतल्या होत्या, ज्यामध्ये १३२ धावांत ६ बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. १९८३ नंतर क्रिकेट खेळायचे सोडल्यावर त्यांनी प्रशासकाची भूमिका वठवली. त्यानंतर १९९० मध्ये त्यांची ज्युनिअर निवड समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आणि त्यांनी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, ऋषीकेश कानिटकर, मुरली कार्तिक, एस. श्रीराम आणि नमन ओझासारखे गुणवान खेळाडू शोधून काढले. त्यांनी हेरून काढलेले खेळाडू आणि त्यांचे काम पाहून २००० साली त्यांना मध्य विभागातून राष्ट्रीय निवड समितीमध्ये स्थान देण्यात आले. चंदू बोर्डे यांच्या निवड समितीमध्ये त्यांची २०००-२००१ साली पहिल्यांदा निवड झाली, त्यानंतर ब्रिजेश पटेल, सय्यद किरमाणी यांच्या अध्यक्षतेखालीही त्यांनी निवड समितीचे काम पाहिले. २००० ते २००३ पर्यंत ते भारतीय निवड समितीमध्ये होते. त्यानंतर पुन्हा एकदा किरण मोरे आणि दिलीप वेंगसरकर यांच्या अध्यक्षतेखालीही त्यांनी निवड समितीमध्ये काम केले. २००७ साली त्यांच्यावर संघव्यवस्थापकाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली. २००७ च्या विश्वचषकासाठी गेलेल्या भारतीय संघाचे जगदाळे हे व्यवस्थापक होते. २००७ नंतर मात्र त्यांची बीसीसीआयला आठवण झाली ती थेट २०११ साली. कारण बिस्वाल आणि चौधरी यांच्यामधील भांडणामुळे बीसीसीआयची प्रतिमा डागाळण्याची शक्यता होती. जगदाळेंचा स्वभाव मितभाषी असला तरी त्यांच्याकडे असलेला राष्ट्रीय निवड समितीचा दांडगा अनुभव, त्याचबरोबर प्रशासकीय कामांचा अनुभव, शांतपणे सुसंवाद साधण्याची शैली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वच्छ प्रतिमा या साऱ्या गोष्टींमुळे जगदाळे यांची सचिवपदी निवड करताना बीसीसीआयच्या वरिष्ठ पदांवरील व्यक्तींना जास्त वेळ घ्यावा लागला नाही. आता नुकताच मी या पदावर विराजमान झालो आहे. आव्हाने बरीच आहेत, याची मला पूर्णपणे कल्पना आहे. ही फार मोठी जबाबदारी आहे, याचीही मला पूर्णपणे जाणीव आहे, असे जगदाळे यांनी सचिवपदी नियुक्त झाल्यावर सांगितले होते. त्यामुळे ही महत्त्वपूर्ण जबाबदारी ते कसे पार पाडतात, यावरच साऱ्यांचे लक्ष असेल.
ठाणे शहरातील ख्यातनाम चित्रकारांपैकी एक नाव म्हणजे केशव निवृत्ती कासार. चित्रकलेतील आपल्या वेगळ्या शैलीनं समस्त कला वर्तुळात आपला वेगळा ठसा केशव कासार यांनी उमटवला. पॉटरी, सिरॅमिक, लॅंडस्केप, पेंटींग, टेराकोटा, शिल्पकला ही त्यांची वैशिष्ट्ये होत.<
मिशी ठेवणार्या एका कालाकराने हॉलीवूडमधे प्रवेश केला. तीन वर्षात ऑस्कर नामांकन व तीन गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळवले. पहिल्या हॉलीवुडपटात उत्कृष्ट दिग्दर्शकाबरोबर व प्रसिद्द नटासोबत काम करून त्याने आपली भूमिका अजरामर केली. हाताने पत्र लिहीण्याच्या व पोस्टमने पत्र पोचवण्याच्या काळात, त्याला आलेल्या प्रेमपत्रांची व मागण्यांची संख्या होती एक महिन्यात ३०००! सुरुवातीची कारकीर्द इजिप्त मधे अरेबिक चित्रपटात घडवलेला व पुढे इंग्रजी येत असल्याच्या गुणावर हॉलिवुड्चा झालेला हा थोर कलाकार म्हणजे ‘ओमर शरीफ’. तरुणींच्या दिलाची धडकन ‘ओमर शरीफ’.
अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून अशोक केळकरांनी लिंग्विस्टिक्स विथ ॲन्थ्रॉपॉलॉजी या विषयात पीएच.डी.केली आहे. ते भाषाविज्ञानामध्ये एम.फिल. आणि पीएच.डी. करणार्याक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत. आंतरराष्ट्रीय भाषातज्ज्ञ प्रा. अशोक केळकर यांना त्यांच्या कामगिरीबद्दल साहित्य अकादमी, पद्मश्री आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
डॉ. राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन आणि पुरुषोत्तम त्रिकमदास यांच्यासह अनेक नेत्यांनी गुप्त काँग्रेस रेडिओला मदत केली. रेडिओ प्रसारणाने गांधी आणि भारतातील इतर प्रमुख नेते यांच्याकडून संदेश पाठविला. अधिकार्यांना रोखण्यासाठी,आयोजकांनी स्टेशन जवळजवळ दररोज स्थानांतरित केले. या रेडिओ स्टेशनवरून इंग्रजांनी सेन्सर केलेल्या सगळ्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचविण्यात येत असत. गांधीजींना अटक झालेली आहे, काँग्रेसचे इतर लोक जेलमध्ये आहेत, मेरठमध्ये सैनिकांनी उठाव केला त्यामध्ये 300 सैनिक मारले गेले. अशा अनेक बातम्या त्यावेळी या सिक्रेट रेडिओने लोकांपर्यंत पोहोचवल्या.
नरहर गणेश कमतनुरकर हे नाटककार व कथालेखक होते.
रेसच्या नादाच्या दुष्परिमाणांवरील “श्री” या नाटकासह चार नाटके, तीन कथासंग्रह व “मराठ्यांची मुलगी” ही ऐतिहासिक कादंबरी त्यांनी लिहिली.
१३ डिसेंबर १९६९ रोजी त्यांचे निधन झाले.
## Narhar Ganesh Kamatanurkar
आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न दुर्बिणीने करणारा खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला.
गॅलिलिओ यांनी दुर्बिणीतून असंख्य गोष्टी अभ्यासल्या. शुक्राच्या कला पाहिल्या. गुरू आणि गुरूभोवती फिरणारे चार चंद्र पाहिले. खरे तर गॅलिलिओला नेपच्यूनच्या शोधाचा मानही मिळाला असता. गुरूजवळ तेव्हा नेपच्यून होता. पण सूर्यमालिकेत असे काही अज्ञात ग्रह असतील असा विचारही तेव्हा शिवला नव्हता. इतकेच कशाला, पृथ्वी सूर्याभोवती फिरते यावरच कोणाचा विश्वास नव्हता. त्यामुळे सूर्याभोवती फिरणारा ग्रह अस्तित्वात असण्याचा प्रश्नच नव्हता. आपल्या या निरीक्षणांवर आधारित ‘स्टारी मेसेंजर’ नावाचे पुस्तक १६१० मध्ये गॅलिलिओ यांनी प्रसिद्ध केले. शुक्राला कला कशा काय असतात? गुरूभोवती छोटे गोल फिरू शकतात? मग सूर्याभोवती पृथ्वी आणि इतर ग्रह का फिरू शकणार नाहीत? असे प्रश्न त्यामध्ये उपस्थित केले होते. कोपर्निकसने मांडलेल्या सूर्यकेंद्री सिद्धांतात तथ्य असले पाहिजे, असे गॅलिलिओ यांना वाटू लागले. १६१५ च्या दरम्यान त्यांनी या सिद्धांताला उघडपणे पाठिंबा द्यायला सुरुवात केली आणि इथेच समाज आणि व्यक्ती हा संघर्ष सुरू झाला.
समाजाची वैचारिक धारणा प्रस्थापितावर विश्वास ठेवणारी असते. नव्या कल्पना, नवे विचार जर प्रस्थापितांविरुद्ध असतील तर ते समाजाला मुळीच खपत नाही. शास्त्रीयच नव्हे तर शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही हे घडते. नव्या विचारांना हाणून पाडण्यासाठी मग धर्म आणि धर्मग्रंथांचा आधार घेतला जातो. या गोष्टी धर्ममार्तंडांना सोयीच्या असतात. कारण याआधारे सामान्य जनतेला नवविचारांपासून दूर ठेवता येते. कॅथॉलिक चर्चने गॅलिलिओला पाखंडी ठरवले आणि त्याने सूर्यकेंद्री सिद्धांताचा प्रचार करू नये असे फर्मान काढले. 1624 नंतर आलेला पोप आपल्या विचारांना अनुकूल आहे असे वाटल्यावरून गॅलिलिओने पुन्हा एक पुस्तक लिहिले. पण पुस्तकाचा कल सूर्यकेंद्री रचनेकडे झुकतो आहे असे वाटल्यावरून पुन्हा एकदा त्याच्या पुस्तकावर बंदी आणली गेली. ६९ वर्षांच्या गॅलिलिओ यांना दम देण्यात आला. पाखंडी मताचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले. त्यांना तुरुंगात डांबण्यात आले आणि तेसुद्धा मरेपर्यंत. पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही हे त्याच्याकडून बळजबरीने वदवून घेण्यात आले. गॅलिलिओ यांच्या वरचे आरोप ३१ ऑक्टोबर १९९२ या दिवशी चर्चने अधिकृतपणे मागे घेतले. वास्तववादी विचार मान्य करण्याची घोषणा करण्यास ३५० वर्षांपेक्षा जास्त काळ लागला आणि तेही गॅलिलिओच्या त्यागानंतर. केवळ विचाराने आणि तर्काने या विश्वाचे नियम उलगडून दाखवता येतात या अॅओरिस्टॉटल यांच्या मतांना धक्का देणारा आणि या तत्त्वज्ञानाला विरोध करणारा माणूस म्हणून गॅलिलिओ यांनी केलेले कार्य फार महत्त्वाचे आहे. प्रयोग आणि निरीक्षण याचे महत्त्व गॅलिलिओ यांनी सिद्ध केले. केवळ विरोधासाठी विरोध केला नाही. जड वस्तू आणि हलकी वस्तू एकाच उंचीवरून खाली सोडल्या तर कोणती वस्तू अगोदर खाली पडेल? जड वस्तू खाली पडेल हे आपल्याला विचाराने सुचणारे परंतु धादांत चुकीचे उत्तर असते. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने वस्तू खाली खेचल्या जातात. त्यांचा वेग वाढत जातो, पण वेगातील ही वाढ त्या वस्तूंच्या आकारावर किंवा वस्तुमानावर अवलंबून नसते हे सिद्ध करायला फार मोठा आटापिटा करावा लागत नाही. साध्या प्रयोगाने गॅलिलिओ यांनी हे सिद्ध केले. आपल्याला सत्य वाटणा-या गोष्टींची सत्यता प्रयोगाने पडताळून पाहण्याची मानसिकता निर्माण करणे हे गॅलिलिओचे मोठे योगदान आहे. वयाच्या १९ व्या वर्षी गॅलिलिओ यांनी लंबकासंबंधीचा गैरसमज दूर करून खरा नियम जगासमोर आणला.
त्याचा आंदोलनकाळ त्याने नाडीच्या ठोक्याच्या साहाय्याने मोजला आणि लंबकाचा आंदोलनकाळ त्याच्या आयामावर अवलंबून नसून लांबीवर अवलंबून आहे हे प्रयोगाने सिद्ध केले. गॅलिलिओ हे चांगले साहित्यिकही होते. गद्य साहित्याबरोबर त्यांच्या कविताही प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांनी कवितांसाठी दाँते अॅबलेहोरीची अकरा शब्दांची एक ओळ ही शैली वापरली होती. ‘डिव्हाइन कॉमेडी’ या सुप्रसिद्ध महाकाव्यात दाँतेनी ही शैली योजिली आहे. गॅलिलिओंनी अनेक सुनीतं रचली. गॅलिलिओ यांचं सर्व वैज्ञानिक लेखन अनुवादित स्वरूपात इंग्रजीत उपलब्ध आहे. मात्र त्यांचं साहित्यिक लेखन- विशेषत: काव्य विसावं शतक संपेपर्यंत तरी इंग्रजीत उपलब्ध नव्हतं. गमतीची गोष्ट म्हणजे गॅलिलिओंचं अगदी पोपनी बंदी घातलेलं सगळे वैज्ञानिक लेखन सतरावं शतक संपण्यापूर्वीच अनुवादरूपानं इंग्रजीत उपलब्ध झालं होतं. पण त्यांच्या कवितांचे अनुवाद इंग्रजीत प्रसिद्ध व्हायला एकविसावं शतक उजाडावं लागलं. जून २००० मध्ये गिओव्हानी पी. बिग्नामी यांनी गॅलिलिओंच्या काव्याचा केलेला इंग्रजी अनुवाद ‘अगेन्स्ट टू डॉनिंग ऑफ द गाऊन’ या शीर्षकानं इंग्रजीत प्रसिद्ध झाला. गॅलिलिओ यांचे ८ जानेवारी १६४२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत वर्ध्याचे अविनाश जोशी डॉक्टर झाले. मानसोपचारतज्ज्ञ म्हणून सेवा देत असताना त्यांना पालक आणि मुलांच्या समस्या जाणवल्या. त्यावर उपाय म्हणून त्यांनी गतिमंदांसाठी 'मे फ्लॉवर' शाळेचे नंदनवन फुलविले. विशेष शाळा सुरु केली. शेकडो आयुष्ये सावरली. समाजात 'बुद्धी' विषयी जनजागृती व्हावी म्हणून 'म्युझियम ऑफ ब्रेन अॅण्ड माइंड' हा उपक्रम सुरु केला. मानसिक रुग्णांच्या वैवाहिक आयुष्याचा डाव अर्ध्यावरती मोडू नये, म्हणून त्यांनी आता ऑनलाइन मॅरेज ब्युरो सुरु केला आहे...
'मे फ्लॉवर्स' चे नंदनवन
व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर हे मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक होते. बापूराव हे केशवराव भोसले ह्यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे अध्वर्यू होते.
पंकज मलीक ह्यांनी सुरुवातीच्या बंगाली आणि हिंदी चित्रपटांना संगीत दिले. त्यांचा जन्म १० मे १९०५ रोजी झाला.हे रवीन्द्र संगीतात विशारद होते. रवीन्द्र संगीताला शान्तिनिकेतन मधून लोकांच्या पर्यत पोहचवण्याचे श्रेय मा.पंकज मलिक यांनाच जाते. मा. रवीन्द्र टागोर यांचे मा.पंकज मलिक हे लाडके होते. मा.रवीन्द्र टागोर यांची एक कविता दिनेर शेषे घुमेर देशे ला मा.पंकज मलिक यांनी संगीत दिले होते. ते मा.रवीन्द्र टागोर यांना आवडले व त्यांनी हे गाणे मा.पंकज मलिक यांना पी सी बरुआ यांचा चित्रपट मुक्ति मध्ये वापरण्यास परवानगी दिली. मा.पंकज मलिक यांनी प्रथम न्यू थिएटर्ससाठी मूकपट व बोलपटात संगीत सहाय्य केले. रवींद्र संगीताचा खुबीने केलेला वापर व वाद्यवृंदाचा घसघशीत वापर हा त्यांचा विशेष होता. ते दशक म्हणजे सर्वकाही पंकज मलिक असेच होते. हिंदी गीतांमध्ये "टांगा ऱ्हीदम‘ आणण्याचा पहिला यशस्वी प्रयोग मा. मलिक यांनीच केला. त्यानंतर तोच धागा इतर संगीतकारांनी पकडला. त्यांच्या ‘डॉक्टर’ ह्या चित्रपटातील गाणी सुमधुर आहेत. तो चित्रपट तर स्वतः पंकज मलिक ह्यांनी आपल्या संयत सुरेख अभिनयाने सजवला होता. या सिनेमामध्ये पंकज मलिक यांनी संगीत दिलेले व गायले ‘चले पवन की चाल’ या गाण्यामध्ये घोड्यांच्या टापांचा अतिशय सुंदर उपयोग त्यांनी केला होता. व ‘आई बहार आज आई बहार’ किंवा ‘कबतक निरास की अंधियारी’ ही गीते कमालीची सुंदर आहेत. मा.सैगल यांची 'सोजा राजकुमारी' किंवा 'मैं क्या जानू' ही अजरामर गाणी मा.पंकज मलिक यांनी संगीतबद्ध केलेली होती. मा.पंकज मलीक यांना भारत सरकारने पद्मश्री व दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव केला होता. मा. पंकज मलिक हे कलकत्ता आकाशवाणीला पहिल्या पासून जोडलेले होते. मा.पंकज मलिक यांचे १९ फेब्रुवारी १९७८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
पंकज मलिक या श्रेष्ठ संगीत दिग्दर्शकावर एक चरित्रपट मा. सई परांजपे बनवला होता त्या बद्दल बोलताना मा. सई परांजपे म्हणतात, मा.पंकज मलिक या श्रेष्ठ संगीत दिग्दर्शकावर एक चरित्रपट मी प्रस्ताव मांडला. त्या वर्षी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला होता, तेव्हा माझ्या प्रस्तावाला लगेचच मान्यता मिळाली. पण स्वत: पंकज मलिक या सिनेमासाठी मुळीच राजी नव्हते. किंबहुना, ते मुळात कुणाला भेटायलाच तयार नव्हते. त्यांना मनापासून हा सोपस्कार नको होता. भाव खाण्याचा त्यात लवलेश नव्हता. पण एकदा कशीबशी त्यांची भेट घेऊन, त्यांना रूपरेषा समजावून त्यांचे मन मी वळवू शकले. पुढचे सोपे होते. एकदा ‘हो’ म्हटल्यावर मग हवे ते सहकार्य आनंदाने द्यायला ते तयार झाले. त्यांचे घर केवळ शूटिंगसाठी नव्हे, तर ‘अड्डा’ म्हणून आमचे हक्काचे ठिकाण झाले. पंकजदा मला नेहमी ‘माय डियर सिस्टऽर’ अशी छान हाक मारीत. ते हाडाचे कलावंत होते. नट होते. झकासपैकी ‘शोमन’ होते. त्यामुळे त्यांच्या मुलाखती, त्यांचे किस्से बहारदार होत. मधे मधे ते गाणे गुणगुणत, एखादी नक्कल करीत, एखादा संवाद रंगवून सांगत. त्यांच्या गच्चीवर चित्रित केलेला एक प्रसंग : दादा कट्टय़ावर रेलून बसले होते. आठवणी सांगत होते. जवळच त्यांची पत्नी ऊन द्यायला कापडावर काही वाळवण पसरत होती. कॅमेरा चालू होता. बोलता बोलता दादा ‘दो नैना मतवाले’ हे त्यांचे प्रसिद्ध गाणे गाऊ लागले. आपल्या पत्नीकडे पाहत.. अगदी ‘आशिकाना अंदाजसे’! साठेक वर्षीय दीदींनी मग लटक्या रागाने असा काही मुरका मारला की बस्स! नॅशनल फिल्म अर्काइव्हज्कडून आम्ही पंकजदांच्या काही गाण्यांचे दुर्मीळ भाग मिळवले. ‘चलो पवनकी चाल’ इ. जुन्या गीतांचे चित्रण पाहणे-ऐकणे हा थरारक अनुभव होता. रायचंद बोराल हे प्रख्यात संगीत दिग्दर्शक न्यू थिएटरच्या संगीत विभागाचे प्रमुख होते. त्यांना बॉलीवूडच्या संगीताचे जनक मानतात. त्यांचा आणि दादांचा फार पूर्वीपासूनचा सहप्रवास. दोघांनी उभरत्या बंगाली सिनेसृष्टीत मोलाची कामगिरी केली होती. इतिहास घडवला होता. तेव्हा त्यांचे अनुभवाचे बोल पंकजदांच्या चरित्रपटासाठी अत्यावश्यक होते. पण अनेक वर्षांपासून दोघांमध्ये बेबनाव झाला होता. बातचीत बंद होती. तेव्हा या सिनेमात बोरालांच्या सहभागाविषयी ‘दुहेरी’ विरोध होता. मोठय़ा प्रयासाने दोघांची मने वळवून अखेर या धुरंधर संगीतकाराची सुंदर मुलाखत डबाबंद केली. हेमंतकुमारांच्या बाबतीतही तोच प्रकार. दोघांचा वर्षांनुवर्षे अबोला आणि म्हणून विरोध. पण एव्हाना मी समजूत घालण्यात तरबेज झाले होते. तेव्हा हाही तिढा मी सोडवला. मग हेमंतकुमार पंकज मलिक यांच्या योगदानाबद्दल अप्रतिम बोलले. एवढेच नाही, तर दादांनी बसवलेले एक गीतही गायले.पंकज मलिक नंतर जेव्हा राष्ट्रपतींच्या हस्ते फाळके पुरस्कार घ्यायला पुढे झाले तेव्हा पाश्र्वसंगीत म्हणून मी त्यांचेच ‘आई बहार आई, आई बहार’ हे सदाबहार गाणे साऊंड ट्रॅकवर लावले. हा सिनेमा खरोखरच चांगला झाला होता. त्याला केवढे ऐतिहासिक आणि संग्राह्य़ मोल होते. अवघा काळ बोलका झाला होता. पण दुर्दैव! त्याचा दूरदर्शनवर आज मागमूसही उरलेला नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti