जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म २९ डिसेंबर १९०० रोजी झाला. दीनानाथांच्या पूर्वजांचे मूळ आडनाव नवाथे, वतनी नाव देसाई, अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण त्यांच्या अंगी होते. निकोप प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान आणि पक्की स्वरस्थाने हीदेखील देवाने दिलेली देणगी होती. बाबा (रघुनाथ मामा) माशेलकर हे दीनानाथांचे पहिले गानगुरू. त्यानंतर रामकृष्णबुवा वझे, गणपतीबुवा भिलवडीकर, भाटेबुवा, निसार हुसेन, कथ्यक नर्तक सुखदेव प्रसाद आदींकडून त्यांनी गाणं मिळवले. त्या काळात सुमारे पाच हजार दुर्मिळ रागरागिण्यांचा, चिजांचा संग्रह त्यांच्याकडे होता. त्यांचे गायन म्हणजे चमत्कृती आणि माधुर्य यांचा मिलाफ होता. अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण त्यांच्या अंगी होते. निकोप प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान आणि पक्की स्वरस्थाने हीदेखील देवाने दिलेली देणगी होती. बाबा माशेलकर हे दीनानाथांचे पहिले गानगुरू. त्यानंतर रामकृष्णबुवा वझे, गणपतीबुवा भिलवडीकर, भाटेबुवा, निसार हुसेन, कथ्यक नर्तक सुखदेव प्रसाद आदींकडून त्यांनी गाणं मिळवलं. त्या काळात सुमारे पाच हजार दुर्मिळ रागरागिण्यांचा, चिजांचा संग्रह त्यांच्याकडे होता. त्यांचे गायन म्हणजे चमत्कृती आणि माधुर्य यांचा मिलाफ होता. १९१४ मध्ये बालगंधर्वांनी स्वत:ची गंधर्व नाटक मंडळी सुरू केल्यावर किर्लोस्कर नाटक मंडळींत दीनानाथांचा प्रवेश झाला. १९१५ मध्ये ‘ताजेवफा’ या हिंदी नाटकात कमलेची पहिली स्वतंत्र भूमिका त्यांनी केली. तेथे मा.दीनानाथ चार वर्षे होते. १९१८ मध्ये त्यांनी एका ध्येयवादी, नावीन्याची आवड असलेली साहित्यप्रेमी अशा ’बलवंत संगीत मंडळी’ नावाच्या नाटक कंपनीची स्थापना केली. ‘भावबंधन’ या नाटकातील लतिका, ‘पुण्यप्रभाव’मधील कालिंदी, ‘उग्रमंगल’मधील पद्मावती, ‘रणदुंदुभी’ मधील तेजस्विनी, ‘राजसंन्यास’मधील शिवांगी या भूमिका दीनानाथांनी आपल्या गायनाभिनयाने विशेष गाजविल्या. ‘उग्रमंगल’ नाटकात ‘छोडो छोडो बिहारी’ या ठुमरीवर ते नृत्य करीत. हा ठुमरी नाच हे त्या काळी रंगभूमीवरचे फार मोठे आकर्षण ठरले होते. ‘मानापमान’मध्ये धैर्यधर, ‘ब्रह्मकुमारी’मध्ये तपोधन इ. पुरुष भूमिकाही केल्या. दीनानाथांच्या ’बलवंत संगीत मंडळी’ने महाराष्ट्रभर फिरत राहून नाट्य संगीत गावोगाव पोचविले, आफ्रिकेचा दौरा आखला आणि हिंदी नाटकांची गुजराती रूपे करून बसविली. नाट्यगीतांप्रमाणे शास्त्रोक्त संगीतही मा.दीनानाथ उत्तम प्रकारे, स्वतःच्या स्वतंत्र व कल्पक वळणाने गात असत. त्यांनी नाट्यसंगीतात पंजाबी ढंग प्रथम आणला, असे मानले जाते. त्यांनी मैफली गाजवल्या, संगीत समारोहांत स्वतःचे स्थान सिद्ध केले. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून निराळे. सुंदर गाणे रसिकांना ऐकवले. मा.रामकृष्णबुवा वझे ह्यांचे ते गंडाबंद शागीर्द होत; तथापि इतर अनेकांची गायकी आत्मसात करून त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली घडवली. श्रीमत् शंकराचार्यांनी दीनानाथांना ‘संगीत रत्न’ म्हणून गौरवले. सारंगीवादन, कथ्थक नृत्य, संस्कृत साहित्य, शिकार हे त्यांचे आवडते छंद होते. १९३४ मध्ये ’बलवंत पिक्चर कॉर्पोरेशन’ काढून त्यांनी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. कृष्णार्जुन युद्ध हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यात त्यांनी अर्जुनाची भूमिका केली. त्यांची ‘सुहास्य तुझे मनासि मोही’ यासारखी या चित्रपटातील गाणी अतिशय लोकप्रिय झाली. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका मा.लता मंगेशकर, मा.आशा भोसले, मा.मीना खडीकर, मा.उषा मंगेशकर व मा.हृदयनाथ मंगेशकर ही मा.दीनानाथ व त्यांच्या द्वितीय पत्नी श्रीमती (ऊर्फ माई) यांची अपत्ये होत. या सर्वांच्या गळ्यात ‘दीनानाथांचा सूर’ आहे. मा.दीनानाथांना श्री.कृ. कोल्हटकरांनी मास्टर ही उपाधी बहाल केली, आणि तेव्हापासून ते मास्टर दीनानाथ मंगेशकर झाले. मा.दीनानाथ मंगेशकर हे एक उत्तम ज्योतिषी होते. १९२२ साली इंदूर असताना त्यांना ज्योतिषविद्येचा पहिला पाठ शंकरशास्त्री घाटपांडे या तेथील प्रसिद्ध ज्योतिषीबुवांकडून मिळाला होता. दीनानाथांनी ‘ज्योतिष आणि संगीत’ या विषयावरील ग्रंथ लिहायला घेतला होता. गायनाचा व ग्रहांचा शास्त्रशुद्ध संबंध कसा आहे, कोणता ग्रह कोणत्या स्वराचा स्वामी, त्याचप्रमाणे राग-रागिण्यांचे रंग, वर्णने, स्वरांच्या रंगांवरून त्यांचा निसर्गातील-सूर्यकिरणांतील रंगांशी, वेळेशी कसा संबंध लागतो आणि म्हणून अमूक वेळेला अमूक राग गाणे’ ही कल्पना कशी सिद्ध होते, यांवर त्या ग्रंथात माहिती असणार होती. सूर्योदयाचे आणि सूर्यास्ताचे राग-स्वर कसे तेच आहेत वगैरे छाननी त्यांनी या ग्रंथात केली होती. दुर्दैवाने ते लिखाण छापून प्रसिद्ध होण्यापूर्वीच गहाळ झाले. प्रसिद्ध क्रिकेटपटू सी. के. नायडू हे मास्टर दीनानाथांचे खास मित्र. मास्टर दीनानाथ हे सी. के. नायडू यांची क्रिकेटची मॅच बघायला यायचे, तर नायडू हे मास्टर दीनानाथांची नाटके पाहायला येत. मा. मास्टर दीनानाथ यांचे २४ एप्रिल १९४२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.मराठी विश्वकोष
पिंगाली वेंकय्या.. हे नाव फारसे कुणाला माहीत नाही. भारताच्या राष्ट्रध्वजाची कल्पना मांडली ती याच पिंगाली वेंकय्या यांनी. त्यांचा जन्म २ ऑगस्ट, १८७६ रोजी झाला. ध्वज कोणत्या रंगाचा असावा, त्यात किती आणि कोणते रंग असावेत, त्याचा आकार कसा असावा याचा सखोल अभ्यास करून त्यांनी तिरंगा साकारला. ते केवळ तिरंग्याचे निर्माते नव्हते तर जपानी भाषेचे शिक्षक, सिद्धहस्त लेखक आणि जिओफिजिसिस्टही होते.चिल्लापल्ली येथे प्राथमिक, तर मासुलीपटनम येथील हिंदू हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी ते कोलंबोला रवाना झाले.
देशभक्तीने भारावलेल्या पिंगाली यांनी वयाच्या १९ व्या वर्षी बोअर युद्धासाठी आपले नाव नोंदवले आणि ते सैन्यात भरती झाले. त्यानंतर आफ्रिकेत असताना त्यांची महात्मा गांधीजींशी भेट झाली आणि त्यांचे ऋणानुबंध जुळले. ते पुढे ५० वर्षे टिकून होते. भारतात परतल्यावर बंगलोर आणि मद्रास येथे त्यांनी रेल्वे गार्ड म्हणून काम केले आणि मग बेल्लारी येथील शासकीय सेवेत प्लेग अधिकारी म्हणून ते रुजू झाले. पण त्यांची देशभक्तीची आस त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षणाच्या ओढीने त्यांनी थेट लोहरमधील अँग्लोवेदिक महाविद्यालय गाठले आणि प्राध्यापक गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जपानी भाषा आणि इतिहासाचे शिक्षण घेतले.
उत्तर भारतातील पाच वर्षांच्या वास्तव्यात ते राजकारणात सक्रिय झाले. ब्रिटिशांना देशातून हद्दपार करण्यासाठी क्रांतिकारकांच्या मदतीने ते योजना आखू लागले. १९०६ मध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत पिंगालींमध्ये दडलेला क्रांतिकारक दादाभाई नौरोजी यांनी हेरला. या ठिकाणीच पिंगाली यांची मुनगलाच्या राजाशी भेट झाली. त्यानंतर १९०६ ते १९११ ही पाच वर्षे मुनगला या ठिकाणी त्यांनी शेतीविषयक संशोधन केले. त्यांच्या या संशोधनामुळे आणि कंबोडिया कॉटनच्या शोधामुळे ते पट्टी वेंकय्या म्हणून ओळखले जाऊ लागले. ब्रिटिशांनाही त्यांच्या या संशोधनाचे कौतुक वाटले आणि त्यामुळेच पिंगाली यांना रॉयल अॅग्रिकल्चरल सोसायटी ऑफ ब्रिटनचे सन्माननीय सदस्यत्व देऊ केले.
सरतेशेवटी पिंगाली मासुलीपट्टममध्ये परतले आणि त्यांनी स्वत:ला नॅशनल स्कूलच्या विकासासाठी वाहून घेतले. या ठिकाणी प्राथमिक सैन्यप्रशिक्षण, घोडेस्वारी, इतिहास आणि शेतीविषयी प्रशिक्षण देण्यात येत असे. ते केवळ पुस्तकी ज्ञानाने समाधानी होणारे नव्हते. त्यांच्या दैनंदिन आचरणातून त्यांचा उदारमतवादीपणा दिसत असे. १९१४ मध्ये आपल्या शेतावर ‘स्वेच्छापुरम’ ही संस्था स्थापन केली.
१९१६-१९२१ या कालावधीत पिंगाली यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक आगळा पैलू सर्वाच्या दृष्टीस पडला. सुमारे ३० ध्वजांचा अभ्यास करून पिंगाली यांनी भारतीय ध्वजाची कल्पना मांडली. आपल्या तिरंग्याच्या सध्याच्या रूपाचे डिझाईन तयार करण्याचे श्रेय पिंगाली यांना दिले जात असले तरी भारतीय ध्वजाची पाळेपुळे ‘वंदे मातरम्’ चळवळीपर्यंत जातात. १ ऑगस्ट १९०६ रोजी कलकत्त्यातील पारसी बगान स्क्वेअर (ग्रीन पार्क) येथे पहिले ध्वजारोहण झाले. हा ध्वजही तीन रंगांत होता. वरील भागात लाल, मध्ये पिवळा आणि खालच्या बाजूला हिरवा, अशी या झेंडय़ाची रंगसंगती होती. लाल भागात पांढऱ्या रंगाची आठ कमळाची फुले कोरलेली होती. पिवळ्या भागात निळ्या रंगाने देवनागरी लिपीत ‘बंदे मातरम्’ असे लिहिले होते. मदाम कामा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९०७ मध्ये पॅरिसमध्ये ध्वजारोहण केले होते. या झेंडय़ाची रंगसंगतीही पहिल्या ध्वजाप्रमाणेच होती. फरक एवढाच की, पहिल्या पट्टीमध्ये केवळ एकच कमळ होते आणि सप्तर्षी दर्शविणारे सात तारे होते.
बर्लिनच्या समाजवादी बैठकीत हा ध्वज फडकविण्यात आला. १९१७ मध्ये जेव्हा राजकीय चळवळीने वेग घेतला, त्यावेळी अॅनी बेझंट आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ध्वजारोहण केले होते. या ध्वजाच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात युनियन जॅकचा शिक्का होता. त्याचप्रमाणे पांढऱ्या आकाराचे अर्धवर्तुळ आणि ताऱ्याचे चिन्ह होते. त्यावेळच्या जनतेचे उद्दिष्ट दाखविणे हा त्यामागचा संकेत होता आणि सत्ता मिळविण्याची इच्छा प्रदर्शित करण्यासाठी युनियन जॅकचा शिक्का होता. पण त्या ध्वजावरील युनियन जॅकचे अस्तित्त्व ही राजकीय तडजोड असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे या ध्वजाचा स्वीकार करण्यात आला नाही. १९२१ मध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधीजींकडे आले आणि त्याचवेळी तिरंग्याचे पहिले रूप जनतेसमोर आले.
१९२१ ते १९३१ ही दहा वर्षे पिंगाली यांच्यादृष्टीनेच नव्हे तर आंध्र प्रदेशमधील स्वातंत्र्य चळवळीचा महत्त्वाचा कालावधी ठरला. ३१ मार्च आणि १ एप्रिल १९२१ या दोन दिवशी बेझवाडा येथे एआयसीसीच्या (ऑल इंडिया कॉँग्रेस कमिटीने) ऐतिहासिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याच वेळी पिंगाली वेंकय्या ध्वज घेऊन गांधीजींकडे गेले. भारतातील दोन प्रमुख धर्म दर्शविणारे लाल आणि हिरवा असे दोन रंग यात होते. अशाप्रकारे राष्ट्रध्वज अस्तित्वात आला, पण ऑल इंडिया कॉँग्रेस कमिटीने तो अधिकृतपणे स्वीकारला नव्हता.
गांधीजींनी तो स्वीकारल्यानंतर पुढील प्रत्येक कॉँग्रेस बैठकीमध्ये हा ध्वज फडकविण्यात येत असे. सामान्य माणसाच्या प्रगतीचे प्रतीक असलेल्या चरख्याचा या ध्वजामध्ये अंतर्भाव करण्यात यावा, अशी सूचना जालंधरचे हंसराज यांनी केली. त्यानंतर गांधीजींनी इतर अल्पसंख्यांकांचे अस्तित्व दर्शविणारी पांढरी पट्टी या ध्वजात समाविष्ट केली. १९३१ पर्यंत त्याला लोकमान्यता मिळाली नव्हती. ध्वजामधील रंगांचा अर्थ समजण्यावरूनही त्यावेळी जातीय तणाव निर्माण झाला होता. १९३१ मध्ये कराची येथे भरलेल्या कॉँग्रेसमध्ये यावरील अंतिम तोडगा काढण्यात आला. शौर्य दर्शविणारा भगवा, सत्य आणि शांती दर्शविणारा पांढरा आणि समृद्धी व विश्वास दर्शविणारा हिरवा असा या तीन रंगी ध्वजाचा अर्थ लावण्यात आला. चरखा आणि सूत यांच्याऐवजी ध्वजाच्या मध्यभागी अशोकचक्राचा समावेश करण्यात आला.
राष्ट्रध्वजातील तीन रंगांचा अर्थ समजावताना सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सांगितले की, राजकीय नेत्यांनी व्यावहारीक सुखांचा त्याग करणे हे भगवा रंग दर्शवतो, सत्याची वाट दाखवणे हे पांढरा रंग सांगतो तर हिरवा रंग आपले जमिनीशी असलेले नाते दर्शवितो आणि अशोकचक्र हे धर्माचे प्रतीक आहे.
पिंगाली वेंकय्या यांचे ४ जुलै, १९६३ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / संजय पेठे
महाराष्ट्राच्या विधानसभेत पाचव्यांदा निवडून जातानाच केज मतदारसंघातील आमदार विमल मुंदडा जगण्याशी लढाई देत होत्या. आजारपणामुळे केवळ उमेदवारी अर्ज भरण्यापुरतेच त्यांचे दर्शन झाले. त्यानंतर त्या जवळजवळ दुप्पट मतांनी निवडून आल्या, पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे पत्र घेण्यासही त्या जाऊ शकल्या नाहीत.
सतत पाच वेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या मुंदडा यांच्या निधनाने त्यांच्या मतदारसंघातीलच नव्हे, तर त्यांच्या मोठय़ा सामाजिक परिवारातील सर्वानाच दु:ख होणे स्वाभाविक आहे. मतदारसंघाशी नाळ जुळणे याचा अर्थ विमल मुंदडा यांना समजला होता. सत्ताविसाव्या वर्षी त्यांनी पहिली निवडणूक लढवली, तेव्हा त्या भाजपचे मुंडे यांच्या गटात होत्या. दोन वेळा भाजपकडून त्यांना विजय मिळाला, परंतु मंत्रिपद मिळाले नाही. त्यानंतर तीन वेळा त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाल्या. या काळात १९९९ पासून २००९ पर्यंत त्या मंत्रिमंडळात राहिल्या.
मतदारसंघातील प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असत. परंतु त्याहीपलीकडे आपल्या मतदारांचा जो विश्वास त्यांनी कमावला होता, तो कोणत्याही राजकीय व्यक्तीला हेवा वाटण्यासारखा होता. वसुंधरा महिला सहकारी बँक आणि वसुंधरा सेवा प्रतिष्ठान या संस्थांची त्यांनी उभारणी केली. मंत्रिपदाच्या काळात राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.
व्यक्तिगत जीवनातील अनेक धक्के सहन करता करता त्यांनी सामाजिक क्षेत्रातील कार्य मात्र जोमाने सुरू ठेवले होते. राजकीय जीवनात येणाऱ्या अनेक छोटय़ा मोठय़ा वादळांना तोंड देण्यासाठी आवश्यक असणारी खंबीरता त्यांच्यापाशी होती. सतत कार्यमग्न राहून मतदारांना आपलेसे करण्याची त्यांची हातोटी कौतुकास्पद होती. अनुसूचित जातीतून डॉक्टर झालेल्या त्या काळातील अगदी मोजक्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होता. वैद्यकीय व्यवसाय करण्याऐवजी राजकीय क्षेत्रात काम करायचे ठरवले आणि त्यात काम करता आले, याबद्दल त्या नेहमीच समाधान व्यक्त करीत. त्यांच्या निधनाने एका उमद्या राजकीय व्यक्तीचा अंत झाला आहे.
ताकवले, राम
भारतीय शिक्षण क्षेत्रात तीन दशकांच्या काळात ज्यांनी मूलभूत स्वरूपाची कामगिरी केली, अशा महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये डॉ. राम ताकवले यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. त्यांच्या या कामगिरीमुळेच नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या गोदावरी पुरस्कारासाठी त्यांची झालेली निवड सर्वथा योग्य आहे. देशातल्या महत्त्वाच्या विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून त्यांनी केलेली कामगिरी जेवढी मोलाची आहे, तेवढेच शिक्षणाच्या भावी विकासाच्या दृष्टीने त्यांनी केलेले चिंतनही महत्त्वाचे आहे.
ग्रामीण भागातून आलेल्या ताकवले यांनी कष्टाने आपले शिक्षण पूर्ण केले. पुणे विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊन मॉस्को विद्यापीठाची डॉक्टरेट त्यांनी मिळविली. पदार्थविज्ञानाच्या क्षेत्रात उच्च पदवी मिळवल्यानंतर त्यांनी अध्यापनाचे क्षेत्र निवडले आणि त्यातच ते रममाण झाले. विद्यापीठातील उच्चशिक्षणाच्या क्षेत्राशी त्यांचा संबंधही अगदी लवकर आला आणि त्यामुळे ते पुणे विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागात अध्यापक म्हणून रुजू झाले. विद्यार्थ्यांमध्ये अतिशय प्रिय असलेल्या ताकवले सरांनी विद्यादानाचे कार्य करत असतानाच संशोधनाच्या क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी त्यांची निवड झाली, तेव्हा भारतीय विद्यापीठांमधील विज्ञान शिक्षणासंबंधी केलेले वक्तव्य शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाच्या लक्षात राहणारे होते. विद्यापीठांमधून नुसते शिक्षण मिळता कामा नये, तर ती संशोधनाची देशातील महत्त्वाची केंद्रे बनली पाहिजेत, असा आग्रह त्यांनी त्या वेळी बोलून दाखवला होता. हा आग्रह त्यांनी त्यांच्याच कारकीर्दीत प्रत्यक्षात आणला. पुणे विद्यापीठातील विज्ञान विषयांशी संबंधित अशा सगळय़ाच विभागांना राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर जाण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य केले. पुणे विद्यापीठाचा या क्षेत्रातील नावलौकिक वाढण्यास त्यांची कारकीर्द कारणीभूत ठरली, तशीच नाशिकच्या यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी मुक्त शिक्षणाच्या क्षेत्रात केलेले कार्य अधोरेखित करण्यासारखे झाले. या त्यांच्या कामगिरीमुळेच दिल्लीच्या इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांना आमंत्रित करण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर त्या विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाच्या भावी विकासाच्या दिशेने त्यांनी केलेले कार्य लक्षणीय आहे. अतिशय सौम्य प्रकृतीच्या ताकवले सरांनी शिक्षणाच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर केल्या जाणाऱ्या विविध प्रयोगांचा बारकाईने अभ्यास केला. त्या बदलांना सामोरे जाताना भारतीय शिक्षण व्यवस्थेची होणारी तारांबळ ते स्वत: अनुभवत होते. माहिती आणि ज्ञानाच्या क्षेत्रात घडत असलेल्या क्रांतीचे डॉ. ताकवले हे एक महत्त्वाचे साक्षीदार आहेत. त्यामुळेच या बदलांना आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये सामावून घेण्यासाठी त्यांनी अनेक नव्या योजना आखल्या, त्या केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयापर्यंत पोहोचवल्या, त्यांचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळेच काही वर्षांत शिक्षणाच्या बाबतीत अनेक नवे प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. गरिबातल्या गरीब विद्यार्थ्यांलाही शिक्षणाच्या सगळय़ा संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि त्याला जगात सध्या उपलब्ध असलेल्या सर्व साधनांचा लाभ घेता यायला हवा, असा आग्रह त्यांनी सातत्याने धरला. विद्यापीठीय शिक्षण पद्धतीत संशोधनाचे महत्त्व तीन दशकांच्या काळातच वाढत गेले आणि त्यासाठी पुढाकार घेतलेल्यांमध्ये डॉ. राम ताकवले यांचे नाव ओघानेच घेतले जाते. शिक्षणाचा जगण्याशी आणि मानवी जीवनाशी असलेला संबंध स्पष्ट करताना डॉ. ताकवले यांनी व्यवहार आणि ज्ञान यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. अर्थार्जनासाठी आवश्यक असलेले ज्ञान विद्यापीठीय शिक्षण पद्धतीत देता येण्यासाठी आवश्यक असलेल्या गरजा आणि शिक्षणक्रम यांचा अन्योन्यसंबंध निर्माण करणे आवश्यक होते. उद्योग आणि व्यापाराच्या क्षेत्रात ज्या कौशल्यांची गरज आहे, ती कौशल्ये शिक्षणातून कशी देता येतील, हा व्यावहारिक विचार करत असतानाच संशोधनातून मानवी ज्ञानाची लालसा अधिकाधिक जागृत कशी करता येईल, यासंबंधीही त्यांनी मूलभूत स्वरूपाचा विचार केला. त्यांना मिळणाऱ्या गोदावरी पुरस्कारामुळे त्यांच्या या क्रांतदर्शी कारकीर्दीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
शारीरिक अपंगत्व सहन करणे महाकठीण असले तरी त्याने हरायचे नसते... जिद्द आणि उमेदीच्या जोरावर देशविदेशातील क्रीडास्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची बाजी मारणारे नागपूरचे विजय मुनीश्वर यांनी हे दाखवून दिले. पॅरालिम्पिकमध्ये पॉवर लिफ्टिंग प्रकारात त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावले. अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, टेबल टेनिस यांत त्यांनी अनेक खेळाडू घडविले. त्यांच्या कर्तृत्त्वाची दखल घेत सरकारने त्यांना “अर्जुन पुरस्कारा” ने व राज्य सरकारने “उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक” पुरस्काराने सन्मानित केले आहे. सध्या ते पॅरालिम्पिक कमिटीच्या उपाध्यक्षपदावर असून पॉवरलिफ्टिंगचे मुख्य कोच आहेत.
''पॉवर'' फुल प्रशिक्षक
आशा काळे या मराठी नाट्यसृष्टीतल्या एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत. त्यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९४८ रोजी गडहिंग्लज येथे झाला. आशा काळे मूळच्या कोल्हापूरच्या. त्यांचा जन्म गडहिंग्लजचा. आशा काळे यांचे वडील रावसाहेब काळे हे वनाधिकारी होते. शासकीय नोकरी असल्याने बदली ठरलेली. आई, वडील, मोठा भाऊ, धाकटी बहीण असे त्यांचे कुटुंब. रत्नागिरी, पाली, भोर, पुणे, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी त्यांचे बालपण गेले. शाळाही त्यामुळे वेगवेगळ्या झाल्या. लहानपणापासून त्यांना नाटक किंवा चित्रपटाची आवड नव्हतीच. नृत्याची विशेष आवड असल्याने बाळासाहेब गोखले आणि हजारीलाल यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय नृत्याचे (भरतनाटय़म्, कथ्थक) धडे घेतले. आठ-दहा वर्षांच्या असताना त्यांचे नृत्याचे कार्यक्रमही होत असत. आईचे मामा अभिनेते प्रकाश इनामदार यांचे वडील आप्पासाहेब इनामदार हे यांच्या ‘कलासंघ’ संस्थेतही त्यांनी काम केले. १९६२ मध्ये भारत-चीन युद्धाच्या वेळी देशाच्या संरक्षण निधीसाठी मदत म्हणून व्ही. शांताराम, बाबुराव पेंढारकर यांनी ‘शिवसंभव’ या नाटकाची निर्मिती केली होती. या नाटकात निजामशहाच्या दरबारातील एका प्रसंगात नर्तकीच्या भूमिकेसाठी ते मुलीचा शोध घेत होते. त्यांच्या वडिलांचा आणि पेंढारकर यांचा परिचय होता. पेंढारकर त्यांच्या घरी आले आणि आमच्या नाटकात तुमची मुलगी काम करेल का? असे विचारले. आशा भोसले यांनी गायलेल्या ‘गुलाबी ऑंखे है तेरी’ या ठुमरीवर नृत्य करायचे होते. आई-वडिलांनी परवानगी दिल्यामुळे नाटकात नर्तकी म्हणून आशा काळे यांनी काम केले. स्वत: बाबुराव पेंढारकर, बाळ कोल्हटकर आदी ज्येष्ठ कलाकार नाटकात होते.
त्यावेळी त्या १४ वर्षांच्या होत्या. त्या नाटकाचे पुढे १५ ते २० प्रयोग केले. त्यांची नृत्य आणि अभिनय कला बाबुराव पेंढारकर यांनी पाहिली आणि ‘नाटय़ मंदिर’ संस्थेच्या ‘सीमेवरून परत जा’ या नाटकातील भूमिकेसाठी विचारणा केली. आशा काळे यांचे पहिले व्यावसायिक नाटक, 'सीमेवरून परत. याचे दिग्दर्शक आत्माराम भेंडे होते. पुढे बाळ कोल्हटकर यांचे ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ हे नाटक त्यांनी केले आणि या नाटकाने त्यांना ‘ताई’ अशी ओळख मिळाली.
आशा काळे यांनी वेगवेगळ्या नाटय़संस्थांच्या अनेक नाटकांमधून कामे केली. यात प्रामुख्याने ‘कलावैभव’, ‘अभिजात’, ‘नाटय़संपदा’, ‘सुयोग’ आदींचा समावेश आहे. ‘गहिरे रंग’, ‘गुंतता हृदय हे’, ‘घर श्रीमंतांचे’, ‘देव दीनाघरी धावला’, ‘लहानपण देगा देवा’, ‘वर्षांव’, ‘विषवृक्षाची छाया’, ‘महाराणी पद्मिनी’ आणि अन्य काही त्यांची गाजलेली नाटके. ‘दुर्वाची जुडी’ चे ८४५, ‘गुंतता हृदय हे’ चे ८७५ प्रयोग त्यांनी केले. रंगभूमीवरून पुढे मराठी रुपेरी पडद्यावर त्यांचा प्रवेश झाला. भालजी पेंढारकरांचा ‘तांबडी माती’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘गनिमी कावा’, ‘घर गंगेच्या काठी’, ‘कैवारी’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘सासुरवाशीण’, ‘थोरली जाऊ’, ‘ज्योतिबाचा नवस’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘कुलस्वमिनी अंबाबाई’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘माहेरची माणसे’ ‘सतीची पुण्याई’, ‘सतीचं वाण’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. त्यांचे बहुतांश सर्व चित्रपटांनी रौप्यमहोत्सव साजरा केला. राज्य शासनाच्या व्ही. शांताराम, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासह त्यांना अन्य अनेक पुरस्कार आजवर मिळाले आहेत.
‘महाराणी पद्मिनी’ नाटकाच्या वेळचा एक किस्सा सांगताना त्या म्हणतात, दारव्हेकर मास्तरांनी तालमीच्या वेळी एक कागद दिला. त्यावर ‘शांतारामचा ससा आषाढात मेला, हे ऐकून सान्यांची शकू फार कष्टी झाली’ हे वाक्य लिहिलेले होते. खरे तर नाटकाचा आणि या वाक्याचा काहीच संबंध नव्हता. पण दारव्हेकर मास्तरांनी दिले म्हणून कोणताही प्रश्न न विचारता ते वाक्य पाठ केले. दुसऱ्या दिवशी त्यांना वाक्य पाठ केल्याचे सांगितले. तर हसून आणि लटक्या रागाने ते म्हणाले, अगं ते वाक्य पाठ करण्यासाठी दिले नव्हते. तुझे शब्दोच्चार शुद्ध व स्पष्ट होण्यासाठी ते तुला दिले होते. ‘शांताराम’ मधील ‘श’चा उच्चार शहामृगाच्या ‘श’चा, ‘आषाढातल्या’ ‘ष’चा उच्चार पोटफोडय़ा ‘ष’चा. श, स, ष यातील फरक कळावा म्हणून ते वाक्य तुला दिले होते. आणि तुम्हाला सांगते त्या नाटकातील माझ्या ‘अश्रु पुसू शकेल अशा पुरुषासमोर स्त्रीने रडायचे असते’ या वाक्यावर प्रेक्षकांकडून मला कडाडून टाळी मिळायची. दारव्हेकर मास्तरांचे ते मार्गदर्शन मोलाचे ठरले. या सगळ्याचे मूळ कुठे तरी माझ्या लहानपणातही रुजले गेले. संध्याकाळी घरी आल्यानंतर दिवेलागणीच्या वेळेस घरातील लहान मुलांनी रामरक्षा किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणण्याची आमच्याकडे पद्धत होती. ते स्तोत्रपठण मी तोंडातल्या तोंडात, पुटपुटत केले किंवा घाईघाईत म्हटले तर आई मला ओरडायची आणि अगं मोठय़ाने म्हण, स्पष्ट उच्चार कर असे सांगायची. आईच्या त्या ओरडण्याचाही पुढे फायदा झाला.
नियतीचा आणखी एक योगायोग सांगताना त्या म्हणतात, बाबुराव पेंढारकर यांचे मित्र आणि सिने फोटोग्राफर पांडुरंग नाईक ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ या नाटकाच्या एका प्रयोगाला आले होते.
चित्रपट आणि नाटकांधील सोशीक, सहनशील मुलगी, सून, आई अशा भूमिका हीच त्यांची ओळख झाली. या पठडीतून बाहेर पडावेसे वाटले नाही का? यावर त्या म्हणाल्या, हो तसा प्रयत्न केला. ‘हा खेळ सावल्यांचा’ हा चित्रपट आणि ‘गहिरे रंग’, ‘महाराणी पद्मिनी’ या नाटकातील भूमिका पठडीपेक्षा वेगळ्या होत्या. सोशीक व सहनशील भूमिकांप्रमाणेच या वेगळ्या भूमिकेतही रसिकांनी मला स्वीकारले. माझे कौतुक झाले. या भूमिकाही गाजल्या. वेगवेगळे कंगोरे असलेल्या विविध भूमिका करायला मी तयार असले तरीही माझ्या ‘चेहऱ्या’मुळे सोशीक, सहनशील, सोज्वळ, सुसंस्कृत आणि कौटुंबिक प्रकारच्या भूमिकाच माझ्या जास्त प्रमाणात वाटय़ाला आल्या. अर्थात त्याचे मला अजिबात वाईट वाटत नाही. जे घडायचे ते घडले. पण या सर्व भूमिका मी अक्षरश: जगले. त्या जिवंत केल्या. त्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांनाही मी तेव्हा आणि आजही ‘आपली’ वाटते. आई, ताई, मुलगी, सून असावी तर ‘आशा काळे’सारखी असे प्रेक्षकांना वाटायचे. माझ्या अभिनयाला मिळालेली ही दाद माझ्यासाठी नक्कीच आनंददायी आणि अभिमानास्पद आहे. पुढे फोटोग्राफर पांडुरंग नाईक यांचे चिरंजीव माधव नाईक यांच्याबरोबर आशा काळे यांचा विवाह झाला. माधव नाईक हे लघुपट निर्माते-दिग्दर्शक आहेत. लग्नानंतर त्यांचे नाव गौरी माधव नाईक असे असले तरी त्या आशा काळे या नावानेच प्रसिद्ध आहेत. आशा काळे या सामाजिक कार्य आवडीने करत असतात. त्या अनेक वृद्धाश्रम, मूकबधिर, मतिमंद मुलांच्या शाळा येथे जातात. कर्करोगाच्या शेवटच्या पायरीवर असलेल्या रुग्णांना भेटतात. आशा काळे ‘भारती विद्यापीठा’च्या संचालक मंडळावर आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
माहेरची माणसे चित्रपट.
https://www.youtube.com/watch?v=VqdxHNHxRDA
संसार चित्रपट
https://www.youtube.com/watch?v=pbKOK2XH-R8
नटसम्राट हा चित्रपट गेल्यावर्षी १ जानेवारीला नाना पाटेकरांच्या वाढदिवशी प्रदर्शीत झाला होता.
नटसम्राट ! ऐसा चित्रपट होणे नाही.
यशाच्या अत्तुच्य शिखरावर पोहोचल्यानंतर, वृद्धापकाळात तेच यश एक शाप ठरावे अशी गाथा असलेल्या कलाकाराची भूमिका वठावणे हे एक शिवधनुष्य पेलण्याइतके अवघड आहे. नाना पाटेकरांनी साकारलेले गणपतराव वयाच्या साठीत कलेच्या ४० वर्ष सेवेतून निवृत्त होतात. एक असा नट ज्याने हॅम्लेट, सिजर, ओथेल्लो आणि अशी बरीच मात्तबर पात्रे साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. नाना पाटेकर कलाकार म्हणून महान आहेच. पण आज महेश वामन मांजरेकर यांच्यातला दिग्दर्शक जिंकला असे वाटते. एखादी महान कथा हाताळणे म्हणजे शिवधनुष्य! त्यातूनच नाना पाटेकर यांचा सारखा कलाकार ! लहानपणी डॉ.लागूं चे नाटक पहिले होते. तत्कालीन कलाकार हे फक्त कलेला वाहून घेणारे होते. त्यांना व्यवहारज्ञान नव्हतेच. मग ते काल्पनिक गणपतराव बेलवलकर असोत, किंवा बालगंधर्व , दादासाहेब फाळके या सर्व लोकांनी जी कला लोकांसमोर सादर केली याची तोड नाही.असो ! एक सर्वोत्कृष्ठ चित्रपट सहकुटुंब पाहून वर्षाची सुरुवात छान झाली.
खूप खूप आपल्या रडवतो हा चित्रपट !
अगदी नाना च्या सर्वश्रेष्ठ संवादफेकीपासुन ते विक्रम गोखले सोबतच्या अभिनयाच्या लाजवाब जुगलबंदीपर्यंत सगळचं कसं काळजात खोलवर रुतणारं... वैभवकाळ पुरेपुर भोगुन समाधानानं रंगमंचावरुन निवृत्त झालेला नटसम्राट खर्याा आयुष्यात मात्र नशीबाच्या पायाखाली तुडवल्या जाताना बघवतं नाही... अन जे दिसतं ते अश्रु भरल्या डोळ्यांनी! विक्रमजी गोखले आणि नाना पाटेकर कित्येक फ्रेम मधे अक्षरशः रडवतात.. त्यांचं दुःख काळजाला भिडतं. विक्रमजींच्या घरातला प्रसंग केवळ अभिनयाची शाळाच म्हणुन पहावादिग्गज कलाकारांनी पूर्वी सजवलेला नटसम्राट नाना पाटेकर वेगळ्याच उंचीवर नेतात, नट, बाप, आजोबा, प्रेमळ पती आणि शेवटी बेघर वृद्ध सगळी रुपं नाना पाटेकर यांनी लीलया रंगवली आहेत. केवळ असाच्या असा नाटकातून उचलून आणलेला चित्रपट नाही. नाटकाच्या तीन भिंतींच्या मर्यादा येथे नाहीत इतपतच हा विचार मर्यादीत नाही. केवळ दृश्यात्मक बदल असेदेखील नाही. एक चित्रपट म्हणून हे कथानक नव्याने मांडायची ही संधी आहे हे लेखक, पटकथालेखक आणि दिग्दर्शकाला व्यवस्थित कळले आहे. आणि या सर्वाचे भान कलाकारांना आहे. थोडक्यात सगळं जुळून आलंय असेच म्हणावे लागेल. विस्तारीत कथेतील संवाद आणि मूळ कथेतील प्रसिद्ध संवाद यांचा मेळ व्यवस्थित घातला आहे.
"कट्यार" मधे एक पुढील आशयाचं वाक्य आहे "कलाकाराला दाद केवळ टाळ्यांनीच मिळते असं नव्हे तर निःशब्द शांतता अन पाणावलेले डोळे ही त्याहून उच्च दाद होय"
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
१९२६ साली नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत त्यांनी शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले.या संस्थेने पुढे पूर्व प्राथमिक अध्यापन मंदिर सुरु केले. यातून मराठी आणि गुजराती दोन्ही भाषांच्या हजाराहून अधिक शिक्षक शिक्षकांचे प्रशिक्षण केले. मराठी शिक्षणपत्रिका त्यांनीच सुरु केली.ताराबाईनी १९३३ जूनचा शिक्षणपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित केला.
बेने इस्रयली नाटककार, कीर्तनसंहिता लेखक सॉलोमन शालोम आपटेकर यांचा जन्म ३ ऑगस्ट १९६३ रोजी झाला.
“एस्तेर राज्ञीचरित्र”, “दानिएकलचे मानसिक धैर्य” या दोन कीर्तनांची रचना आर्या, दिंडी, साकी, अभंग, पदे या वृत्तांनी युक्त आहे.
संगीत दानिएल व संगीत योसेफ ही नाटके त्यांनी लिहिली.
Soloman Shalom Aptekar
श्रीनाथ त्रिपाठी उर्फ एस.एन.त्रिपाठी यांची धार्मिक आणि पौराणिक चित्रपट अधिक संख्येने वाट्याला येऊन देखील सातत्याने श्रवणीय गाणी देणारे संगीतकार म्हणून ओळख होती.
त्यांचा जन्म १४ मार्च १९१३ रोजी झाला. पौराणिक चित्रपट संगीताचा बादशाह म्हणून ते प्रसिद्ध होते.
एस.एन.त्रिपाठी यांचे आजोबा पंडित गणेशदत्त त्रिपाठी काशी येथील संस्कृत विद्यापीठाचे प्राचार्य, तर वडील पंडित दामोदरदत्त त्रिपाठी हे काशीच्याच सरकारी विद्यापीठाचे प्राचार्य. त्यामुळे श्री नाथजींचं शालेय शिक्षण वाराणसी येथे, बी.एस्सी. झाल्यावर अलाहाबाद विद्यापीठातून संगीतविशारद एन.व्ही. भातखंडें यांच्या विद्यालयातून, संगीत प्रवीण प्रयाग संगीत समितीतून तर लाइट क्लासिकल शिक्षण लखनौ येथील मैना देवींकडे झालं. या शिदोरीवर त्यांनी थेट मुंबई गाठली अन बॉम्बे टॉकीजला येऊन मिळाले. व्हायोलनिस्ट म्हणून पगार होता १००/-.
त्यांना गायक म्हणून संधी मिळाली ती ‘जीवननैया’ मध्ये. ‘ऐरी दैया लचक लचक चलो..’ हे पहिलं गाणं. चित्रपटाचे दिग्दर्शक फ्रँझ ऑस्टिन. बाँबे टॉकीज सोडल्यावर पहिला ब्रेक मिळाला संगीत दिग्दर्शनासाठी तो १९४१च्या ‘चंदन’साठी. पहिलं गाणं- ‘नन्हासा दिल देती हूँ..’ हे राजकुमारीबरोबर त्यांनी स्वत: गायलेलं युगलगीत होतं. पण पहिले यश मिळालं १९४३च्या ‘पनघट’मध्ये. प्रथम अभिनय केला ‘रामभक्त हनुमान’मध्ये हनुमानाच्या भूमिकेमध्ये! दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा १९५७चा ‘राम हनुमान युद्ध’.
मुळात शास्त्रीय संगीताची बैठक असलेल्या त्रिपाठींनी स्वत: दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील ‘रानी रूपमती’ (१९५९) आणि ‘संगीतसम्राट तानसेन’ (१९६२) हे महत्त्वाचे चित्रपट. त्यांतील शास्त्रीय संगीताला नौशाद सारख्यांनी देखील दाद दिली. जसा नौशाद यांचा ‘बैजू बावरा’ तसा त्रिपाठींचा ‘तानसेन’. त्यात शास्त्रीय संगीत गायकांनादेखील त्यांनी आग्रहाने गायला बोलावलं. ‘रानी रूपमती’तदेखील त्यांनी तसा प्रयोग केला.
एस.एन.त्रिपाठी यांनी आपल्या प्रदीर्ध कारकिर्दीत अनेक प्रकारे चित्रपट विश्वात काम केले. संगीत दिग्दर्शक, गायक, नट, कथा आणि पटकथा लेखक आणि निर्माते म्हणून काम केले.
एस.एन.त्रिपाठी यांची पौराणिक चित्रपटांमधे मात्र मक्तेदारी कुणीच मोडू शकलं नाही. पौराणिक चित्रपट हे तसे पाहिले तर लो बजेटचे. त्यामुळे त्यांचा दर्जाही दुय्यम समजला जायचा. पण तरीही एकेकाळी अशा चित्रपटांची लाटच होती. बी ग्रेडच्या चित्रपटांचं संगीत देऊन एखादा खचून जाईल, पण एस.एन.त्रिपाठी यांनी या चित्रपटांवर आपली अनोखी मोहोर उमटवली. आणि ती ही संगीताच्या सुवर्णयुगात, म्हणजेच एकोणीसशे पन्नासच्या दशकात!
‘सप्तसूर तीनग्राम..’ (मन्ना डे), ‘सुधबिसर गयी आज..’ (मन्नाडे-रफी), ‘अब आयी बरखा बहार.’ (मन्नाडे-रफी), ‘टूट गयी रे मनकी बीना..’ (पंढरीनाथ कोल्हापुरे- पूर्णा सेठ), ‘सखी कैसे धरू मैं धीर..’ (लता मंगेशकर), ‘दीपक जलाओ, ज्योती जगाओ..’ (रफी), ‘प्रथमशांतरस जाके..’ (मन्नाडे, मूळ तानसेनची रचना), ‘हे नटराज..’ (महेंद्र कपूर- कमल बारोट, मूळ रचना तानसेन) ही गाणी असलेला ‘संगीतसम्राट तानसेन’ हा कृष्णधवल चित्रपट. त्यातील एक गाणं ‘घिर घिर के आयो रे मेघा.’ हे रंगीत चित्रित केलं होतं. (जसं ‘मुगल-ए-आझम’ १९६० मधील ‘प्यार किया तो डरना क्या..’ हे नौशादचं गाणं. पन्नास वर्षांनी संपूर्ण ‘मुघल-ए-आझम’ डिजिटली कलर्ड झाला. तर ‘संगीतसम्राट तानसेन’ विस्मृतीत गेला.)
‘रानी रूपमती’ या रूपमती आणि सुलतान बाजबहादूर यांची प्रेमकहाणी मांडणाऱ्या चित्रपटातदेखील अव्वल शास्त्रीय बाज असलेली गाणी होती- ‘बात चलत नई चुनरी रंग डारी..’ (कृष्णराव चोणकर- रफी), ‘उडम् जा माया कमलसे..’ (मन्नाडे), ‘सुन बगीयां में बुलबुल बोले..’ (लता मंगेशकर). या चित्रपटातीलच ‘आ लौट के आजा मेरे मीत..’, ‘संगीतसम्राट तानसेन’मधील ‘झूमती चली हवा..’ अथवा ‘पिया मिलन की आस रे..’ (लता- पिया मिलन की आस- १९६१) या त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील गाण्यांचं संगीत देताना शास्त्रीय बाज सांभाळला होता. कदाचित ही त्यांची शास्त्रीय संगीताची बैठकच तत्कालीन सामाजिक आधुनिक चित्रपटांसाठी मर्यादा ठरली असावी.
१९४१ ते १९८५ अशी पंचेचाळीस वर्षांची कारकीर्द (‘चंदन’ ते ‘महासती तुलसी’) असूनही तसे चित्रपट अभावानेच मिळाले. उत्तम गुणवत्तेला योग्य कोंदण लाभणं, हा नशिबाचा भाग. जे लक्ष्मी-प्यारेंना लाभलं. ‘सती-सावित्री’, ‘हरिश्चंद्र तारामती’, ‘संत ज्ञानेश्वर’, ‘पारसमणी’, ‘आया तूफान’ वगैरे चित्रपटांबरोबर ताराचंद बडजात्यांचा ‘दोस्ती’ मिळणं हे नशीब. त्या संधीची उत्तम गुणवत्तेशी सांगड घालून त्यांनी कुठल्या कुठे झेप घेतली.
अशी कित्येक लोकप्रिय गाणी देणारे त्रिपाठी चित्रपटाच्या ग्रेडची पर्वा न करता या क्षेत्रात भरपूर रमले. सव्वाशे ते दीडशे चित्रपटात विविध भूमिका त्यांनी केल्या. ९० वर चित्रपटांचं संगीत, २३ चित्रपटांचं दिग्दर्शन, त्यातील काही स्वनिर्मित, कथा-पटकथा-संवादलेखक, गायक, अभिनेता अशा विविध भूमिकांतून वावरले.
एस.एन.त्रिपाठी यांचे २८ मार्च १९८८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ प्रभाकर बोकील
संगीतकार एस.एन.त्रिपाठी यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=aXX-84r5Eg4
https://www.youtube.com/watch?v=jRcgvNN5L80&list=PLoYmSmY92nUwKTlCcsqskIxMoktpV987A&index=3
https://www.youtube.com/watch?v=ThuSY1LVJnw
Copyright © 2025 | Marathisrushti