जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
विकास सबनीस हे गेली अठ्ठेचाळीस वर्षे अर्कचित्रं, व्यंगचित्रं काढत होते. तो त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. एखादी घटना घडली, एखादी व्यक्ती भेटली की, त्यांच्या मनात यातून कसं चित्र निर्माण होईल याचा विचार करून ते टिपणं काढून ठेवत असत.
December 28, 2021
लेखक, समीक्षक आणि लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रभाकर भानुदास मांडे यांचा जन्म १६ डिसेंबर १९३३ रोजी झाला.
लोककथा व लोकगीते यांचा विपुल संग्रह असणार्या मांडे यांनी “लोकसाहित्याचे अंत:प्रवाह, गावगाड्याबाहेर, सांकेतिक आणि गुप्त भाषा, परंपरा व स्वरुप, दलित साहित्याचे निराळेपण” या पुस्तकांसह “महानुभवीय पद्यपुराण, लोकरंगकला आणि नागर रंगभूमी अशी संपादने केली.
## Dr Padmakar Bhanudas Mande
July 26, 2017
त्यांच्या लेखनाचे विषय प्रामुख्याने भारतातील अधिसूचित जनजाती, आदिवासी , दलित , वंचित समुदाय हे होते.
August 6, 2021
बाबाराव मुसळे हे नाव मराठी साहित्य विश्वाला नवं नाही. १९८५ मध्ये 'हाल्या हाल्या दुधू दे' या कादंबरीने त्यांचं नाव एकदम प्रसिद्धीच्या झोतात आलं. या कादंबरीने ग्रामीण वास्तव आपल्या खास शैलीत टिपणारे कादंबरीकार म्हणून त्यांना लौकीक मिळवून दिला.
'हाल्या हाल्या दुधू दे' नंतर आलेल्या 'पखाल' कादंबरीलाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पु. ल. देशपांडे यांनी 'पखाल'चं विशेष कौतुक केलं होतं. दरम्यानच्या काळात बाबाराव मुसळे यांची 'झुंगु लुखू लुखू', 'मोहोरलेला चंद', 'नगरभोजन' हे कथासंग्रह आणि 'पाटीलकी', 'दंश' या कादंबर्या प्रकाशित होत राहिल्या तर 'वारुळ' या कादंबरीने पुन्हा एकदा मराठी साहित्यात हलचल निर्माण केली. मात्र एव्हाना वाचक त्यांच्या लेखनशैलीला सरावलेला असतानाच 'इथे पेटली माणूस गात्रे' या कवितासंग्रहाला 'सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील' हा मानाचा साहित्य पुरस्कार मिळाला आणि बाबाराव मुसळे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं.
खरंतर बाबाराव मुसळे यांच्यासाठी पुरस्कार आणि प्रसिद्धी नवी नाही. मात्र गेली अनेक वर्षं कादंबरी-कथा प्रांतात जोरकस मुशाफिरी करणार्या मुसळे यांचं कवीतिक अंग आजवर रसिकांना फारसे उमगलेलं नव्हतं. वास्तविक कादंबरी आणि कथालेखन करत असतानाच मुसळे यांचे कवितालेखनही समांतरपणे सुरू होते. त्यांची ही कविता नागर, ग्रामीण, दलित, आदिवासी असा विविध प्रवाहांना आपल्यात सामावून घेत आपल्या पद्धतीने व्यक्त होत होती. मात्र ती आजवर पुस्तकरूपाने प्रकाशात न आल्यामुळे वाचक तिच्यापासून अनभिज्ञ होते. परंतु 'काव्याग्रह प्रकाशन'च्या विष्णू जोशी यांनी मुसळे यांच्या कवितेला प्रकाशनाची वाट दाखवली आणि या कवितेने कवितेचा गाभारा लख्खपणे उजळून टाकला.
मुसळे यांच्या गद्य लेखनावर यशस्वीतेची मोहोर उमटलेली होतीच. परंतु त्यांच्या पहिल्याच कवितासंग्रहालाही मानाचा साहित्यिक पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांनी कवी म्हणूनही आता स्वत:ला सिद्ध केलं आहे. अर्थात हा त्यांच्या कवितेचा आणि त्यांनी त्या कवितेतून जो मानवतेचा धर्म जागवलाय त्याचा गौरव आहे. कारण त्यांची कविता केवळ स्वत:चं दु:ख जागवत नाही, ती समोरच्याचं दु:ख पाहूनही तेवढीच व्याकुळ होते. प्रसंगी पेटून उठते. एकूण मुसळे यांची कविता ही माणुसकीची कविता आहे आणि त्यांच्या कवितेचा झालेला गौरव हा माणुसकीचा गौरव आहे.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
August 9, 2017
डेगवेकर यांचे मूळ घराणे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील. डेगवेकर यांचा जन्मही इथलाच. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९३४ रोजी झाला. इंग्रजी तिसरीपर्यंतचे त्यांचे शिक्षण श्रीवर्धन येथेच झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले. गिरगाव येथील विल्सन हायस्कूल येथे त्यांचे पुढील शिक्षण झाले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ‘मॅट्रिक’ झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी छोटी-मोठी कामे केली. पुढे ‘सीटीओ’ (पोस्ट अॅाण्ड टेलिग्राफ)मध्ये त्यांना ‘फोनोग्राम ऑपरेटर’ म्हणून नोकरी लागली. ही नोकरी करत असतानाच के.सी. महाविद्यालयातून त्यांनी ‘इंटर’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. हरी डेगवेकर हे त्यांचे वडील. . त्यांना भजनाचे वेड होते. त्यामुळे घरात लहानपणापासूनच गाणी, भजने त्यांच्या कानावर पडत गेली आणि तोच संस्कार त्यांच्यावर झाला. लहानपणी वडिलांनी त्यांना छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमांतून अभंग म्हणण्यासाठी पाठविले. त्यामुळे स्टेजवर उभे राहण्याची, वावरण्याची त्यांची भीती लहानपणीच गेली. गणेशोत्सवात वेगवेगळ्या नाटकांतून त्यांनी कामेही केली. गिरगावातील गायवाडी येथील बंडोपंत रानडे यांच्याकडे ते काही काळ गाणेही शिकले. त्या वेळी काही संगीत नाटकांतूनही त्यांनी छोट्या-मोठ्या भूमिका केल्या होत्या.
चंडू डेगवेकर यांनी राज्य नाट्य स्पर्धेत मराठा मंदिर कला केंद्र या संस्थेने सादर केलेल्या आणि बाळ कोल्हटकर यांनी गाजविलेल्या ‘मुंबईची माणसे’ या नाटकातील ‘वसंत’ ही भूमिका साकारली. या भूमिकेसाठी त्यांना राज्य नाट्य स्पर्धेचे पारितोषिक व चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिक मिळाले. त्यांची ही भूमिका ‘नाटय़संपदा’ या संस्थेच्या तीन मालकांपैकी एक असलेल्या मोहन वाघ यांनी पाहिली आणि त्याणी डेग्वेकरांचे नाव नाटककार विद्याधर गोखले यांना सुचविले आणि मला गोखले यांच्या ‘मदनाची मंजिरी’ या नाटकातील ‘चक्रदेव’ ही भूमिका मिळाली आणि येथूनच त्यांच्या व्यावसायिक रंगभूमीवरील कारकीर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. १९६७ मध्ये ‘ललितकलादर्श’चे भालचंद्र पेंढारकर यांनी त्यांच्या नाट्यसंस्थेत डेग्वेकरांना बोलाविले आणि ते ‘ललितकलादर्श’शी कायमचे जोडले गेले . 'पंडितराज जगन्नाथ' या १९६८ साली आलेल्या नाटकाद्वारे ते नट म्हणून ठळकपणे पुढे आले. या त्यांच्या पहिल्याच नाटकात त्यांनी कलंदरखाँच्या इरसाल भूमिकेत गायलेले 'इश्क के गहरे खतरे में बडे भी खा गये ठोकर' हे कव्वालीवजा पद प्रचंड दाद घेऊन जाई.पंडितराज जगन्नाेथमध्ये कलंदरखाँची भूमिका आधी शंकर घाणेकर करत असत. त्यांनी कंपनी सोडल्यानंतर 'ललितकलादर्श'च्या भालचंद्र पेंढारकरांच्या हाताला चंदू डेगवेकर नावाचा हिरा लागल्याने. डेग्वेकरांनी अगदी आयत्यावेळी पंडितराज जगन्ना'थ या नाटकातली भूमिका वठवली. पुढे 'बावनखणी' या नाटकापर्यंत चंदू डेगवेकर हे 'ललितकलादर्श'चे महत्त्वाचे नट होते. त्यांचा आवाज खणखणीत आणि पल्लेदार असून त्यांना त्यांना टायमिंगचे अत्युत्तम भान आणि संगीताची सुरेख जाण होती. त्यामुळे ते गद्य आणि पद्य दोन्ही प्रकारच्या भूमिकांत सारख्याच सफाईने फिरायचे. सुरेश खरे यांच्या 'रक्त नको मज प्रेम हवे' या गद्य नाटकात ते नायक होते.
'दुरितांचे तिमिर जावो'मधील मा. दत्ताराम आजारी पडल्यानंतर ते करीत असलेली भूमिका चंदू डेग्वेकरांनी पूर्ण जबाबदारीने निभावली. 'मदनाची मंजिरी'मधील चक्रदेव या पागल आशिकाची त्यांची भूमिका अतोनात गाजली. 'मंदारमाला' या विद्याधर गोखले यांच्या गाजलेल्या नाटकातील राम मराठे आणि प्रसाद सावकारांच्या जुगलबंदीत (बसंत की बहार) ते सावकारांचे चेले म्हणून शेजारी बसायचे आणि एक चीज तयारीच्या गायकाप्रमाणे अशी पेश करायचे की प्रेक्षक थक्क व्हायचे. 'जय जय गौरी शंकर' नाटकात ते 'नारायणा रमारमणा' आणि 'भरे मनात सुंदरा' ही पदे बहारीने पेश करायचे. त्यांनी 'सौभद्र'पासून 'स्वरसम्राज्ञी' पर्यंत जवळपास सगळीच संगीत नाटके केली, काही दिग्दर्शितही केली. ही सर्व नाटके त्यांना तोंडपाठ होती.
चंदू डेगवेकर हे दत्तारामांना आदर्श आणि अण्णा पेंढारकरांना आपले गुरू मानत असत.
डेगवेकर यांनी त्या काळात नोकरी सांभाळूनच सर्व नाटके, तालमी व प्रयोग केले. चित्रपटात काम करण्याविषयी त्यांना विचारणा झाली होती. पण चित्रीकरणासाठी अनेक दिवस मुंबईबाहेर जावे लागेल आणि नोकरी करत असताना ते शक्य होणार नाही म्हणून ते चित्रपटाकडे वळलेच नाहीत.
डेगवेकर यांनी आत्तापर्यंत सुमारे ५० संगीत, सामाजिक, ऐतिहासिक नाटके तसेच फार्समधून विविध भूमिका साकार केल्या आहेत. ‘शारदा’ (कांचनभट), ‘सौभद्र’ (बलराम), ‘मृच्छकटीक’ (शकार), ‘मानापमान’ (धैर्यधर), ‘मत्स्यगंधा’ (भीष्म), ‘स्वयंवर’ (शिशुपाल), ‘संशयकल्लोळ’ (फाल्गुनराव),‘भावबंधन’ (प्रभाकर व कामण्णा), ‘एकच प्याला’ (भगीरथ, शरद), ‘पंडितराज जगन्नाथ’ (कलंदर), ‘मंदारमाला’ (भैरव), ‘सुवर्णतुला’ (नारद), ‘जय जय गौरी शंकर’ (शृंगी), ‘स्वरसम्राज्ञी’ (भय्यासाहेब), ‘बावनखणी’ (मोरशास्त्री) ही डेगवेकर यांची गाजलेली संगीत नाटके. ‘दुरितांचे तिमीर जावो’मधील त्यांनी साकारलेला ‘बापू’ही गाजला. ‘बेबंदशाही’, ‘ययाती आणि देवयानी’, ‘उद्याचा संसार’, ‘लग्नाची बेडी’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘देव दिनाघरी धावला’, ‘अपराध मीच केला’, ‘साष्टांग नमस्कार’ आदी ऐतिहासिक, सामाजिक नाटकांतूनतसेच ‘गीत सौभद्र’, ‘महाश्वेता’ आदी संगीतिकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या. डेगवेकर यांना अखिल भारतीय मराठी नाटय़परिषदेच्या ‘जीवनगौरव’पुरस्कारासह गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे पुरस्कार, रंगशारदा संस्थेचा विद्याधर गोखले पुरस्कार, नाटय़ परिषद-पुणे यांचा केशवराव दाते पुरस्कार, गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार आदींनी सन्मानित करण्यात आले आहे. राज्य शासनाचा अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. नव्या पिढीकडून बसवून घेतलेली जुनी संगीत नाटके हे डेगवेकर यांचे सगळ्यात महत्त्वाचे काम आहे. विशेष म्हणजे ही नाटके बसविण्यासाठी, नव्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्या त्या संगीत नाटकातील विविध पात्रे, त्यांच्या भूमिका उलगडून दाखविण्यासाठी त्यांनी कोणताही आर्थिक मोबदला/मानधन आजवर कधीही घेतले नाही. त्यांच्या या निरलस व नि:स्वार्थी सेवेविषयी त्यांना विचारले असता डेगवेकर म्हणतात, संगीत रंगभूमीने मला मान-सन्मान, प्रतिष्ठा, यश, आर्थिक स्थैर्य असे सर्व काही दिले. संगीत रंगभूमीच्या या ऋणातून उतराई होण्यासाठी कोणतेही आणि मराठी संगीत रंगभूमीचा वैभवशाली वारसा जपण्यासाठी मी हे काम केले. शिवरंजनी (पुणे), नादब्रह्म परिवार (चिंचवड), कलाद्वयी (पुणे), ऋतुरंग (डोंबिवली) आदी संस्थांसाठी मी जुनी संगीत नाटके नव्याने बसवून दिली.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 17, 2018
पं. फिरोज दस्तूर यांचा जन्म ३० सप्टेंबर १९१९ रोजी झाला. पं. फिरोज दस्तूर हे पं. भीमसेन जोशी आणि डॉ. गंगूबाई हनगळ यांचे गुरुबंधू होते.
पं. फिरोज दस्तूर हे फार मोठे गायक होते.एका अतिशय प्रतिभावान, प्रेमळ कलाकाराची ओळख पं. दस्तूर हे एक खूप मोठे पण तसे सर्वसामान्यांसमोर फारसे न आलेले कलावंत. पारशी समाजात 'आंग्ल' प्रभाव जास्त असून सुद्धा ते अभिजात हिंदुस्तानी संगिता कडे वळले, उस्ताद अब्दुल करीमखां ह्या त्यांच्या (किराणा)घराण्याच्या अध्वर्युची आठवण व्हावी असेच फिरोजजींचे गायन आहे. सवाईगंधर्व महोत्सवात शेवटच्या दिवशी पहाटे गंगूबाई हनगल, दस्तुरबुवा आणि शेवटी अण्णा हा गाण्याचा क्रम गेली अनेक वर्ष होता.
'गोपाला मेरी करूना' ही अब्दुल करिमखा साहेबांची ठुमरी आणि दस्तुरबुवांचं काय अजब नातं होतं देवच जाणे! सवाईगंधर्व महोत्सवात त्यांना दरवर्षी न चुकता 'गोपाला...' गाण्याची फर्माईश व्हायची आणि दस्तुरबुवही अगदी आवडीने ते गात! फारच अप्रतिम गायचे! साक्षात अब्दुल करीमखा साहेबच डोळ्यासमोर उभे करायचे! पं. भीमसेन जोशी आणि दस्तुर! दोघेही सवाईगंधर्वांचे शिष्य. त्या अर्थाने दोघेही एकमेकांचे गुरुबंधू होते. आणि तसंच त्यांचं अगदी सख्ख्या भावासारखंच एकमेकांवर प्रेमही होतं! सवाई महोत्सवात एके वर्षी दस्तुर गुरुजींनी कोमल रिषभ आसावरी तोडी इतका अफाट जमवला की तो ऐकून अण्णा दस्तुरांना म्हणाले, "फ्रेडी, आज मला गाणं मुश्किल आहे. आज तुमचेच सूर कानी साठवून मी घरी जाणार!" मा.पं. भीमसेन जोशी नेहमी प्रेमाने दस्तुरांना 'फ्रेडी' या नावाने हाक मारायचे!
पं. फिरोज दस्तूर यांचे ९ मे २००८ रोजी निधन झाले. पं.फिरोज दस्तूर यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- तात्या अभ्यंकर
पं फिरोज दस्तूर -। राग मल्हार और ठुमरी
https://www.youtube.com/watch?v=ZoH5gPNElUg
'गोपाला मेरी करूना'
https://www.youtube.com/watch?v=ZZmyWYqA2wo
May 9, 2017
उदयशंकर चौधरी ऊर्फ उदयशंकर मुळचे नाराली गावचे. त्यांचे वडिल जमीनदार होते. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९०० रोजी राजस्थान मधील उदयपुर येथे झाला.हारचौधरी ही त्यांना पदवी होती. पुढे चौधरी हेच रुढ झाले. त्यांचे वडिल संस्कृतचे पंडित होते. त्यांना तीन लहान भावंड होती. राजेंद्रशंकर, देवेंद्रशंकर, भुपेंद्रशंकर व रवीशंकर. पैकी रवीशंकर हे पुढे जगप्रसिद्ध सतार वादक झाले. मा.१९१८ साली शिक्षणा साठी मुंबई जेजे स्कुल ऑफ आर्ट्स येथे प्रवेश घेतला.पुढे गंधर्व महाविद्यालयातही शिक्षण घेतले. १९२० साली लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ आर्ट्स येथे प्रवेश घेतला .
तीथे भारतीय नृत्य व पाश्चात्य नृत्य यांचा सखोल अभ्यास करुन दोन्हीचे फ्युजन केले.
१९३१ साली पँरीस येथे Indian Dance Academy ची स्थापना केली.
जानेवारी १९३३ ला ते अमेरिकेत गेले. न्युयॉर्क मधे पहिला शो झाला. त्या नंतर अमेरिकेतील ८४ शहरात त्यांचे शो झाले. १९६२ साली ' संगीत नाटक अकादमी ' चा पुरस्कार त्यांना मिळाला. १९६५ साली कोलकाता येथे त्यांनी Udayshankar center for dance या संस्थेची स्थापना केली. १९७१ साली भारताच्या सरकारने त्यांना पद्मविभुषणने सन्माननीत केले. संपुर्ण युरोप, अमेरिका ,रशिया सह जगातील अनेक देशात त्यांचे नृत्याचे कार्यक्रम झाले.
त्यांना दोन अपत्य ,आनंदशंकर व ममताशंकर.
आनंदने न्रत्यातच आपले करियर केले. तर ममताने अभिनयात आपला ठसा ऊमटवला.
सत्यजीत रे, मृणाल सेन सारख्या दिग्दर्शका सोबत काम केले. ममताने हॉलीवुड चित्रपटात बालकलाकार म्हणुन काम केले.
बहुदा ती पहिली भारतीय, हॉलीवुड चित्रपटात काम करणारी कलाकार असावी.
उदयशंकर यांच्या कलेने भारतीय न्रुत्य जगभर प्रसिद्ध झाले. उदयशंकर यांचे निधन २६ सप्टेंबर १९७७ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 5, 2017
हा अजित सातघरे कोण ? अनेकांना प्रश्न पडला असे , याला पाहिले नाही कधी टीव्ही वर, कधी ऐकले नाही. तरीपण ह्या माणसाची ओळख करून देणार आहे एक गाण्यामधील आनंदयात्री म्हणून.
November 12, 2019
आज १७ ऑक्टोबर... आज अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार, ग्रंथकार आणि कळकळीचे धर्मसुधारक मा.पांडुरंग दादोबा तर्खडकर यांची पुण्यतिथी.
त्यांचा जन्म ९ मे १८१४ रोजी झाला. प्राथमिक शिक्षण घरी वडिलांजवळ तसेच खाजगी शाळांतून आणि माध्यमिक शिक्षण ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ च्या शाळेत झाले. गुजराती व फार्सी भाषा त्यांना अवगत होत्या. सरकारी नोकरीत शिक्षक, अधीक्षक, उपजिल्हाधिकारी अशा विविध हुद्यांवर त्यांनी काम केले, सेवानिवृत्तिनंतर अल्पकाळ ओरिएंटल ट्रान्स्लेटरच्या हुद्यावर ते होते.
संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करून आणि मराठी भाषेच्या रूपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून मराठी भाषेचे व्याकरण (१८३६) त्यांनी सिद्ध केले. ह्या व्याकरणाच्या अनेक आवृत्या निघाल्या. १८८१ मध्ये दादोबांनी आपल्या व्याकरणाच्या सातव्या आवृत्तीची पूरणिकाही प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही (१८६५) त्यांनी लिहीले. त्याच्याही अनेक आवृत्या निघाल्या. मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदापांडुरंगी (१८६५) ही गद्य टीका त्यांनी लिहिली. तीतून दादोबांची सहृदयता प्रत्ययास येते. ह्या टीकेस इंग्रजी आणि मराठी अशा दोन प्रस्तावना त्यांनी जोडल्या. त्यांपैकी मराठी प्रस्तावनेत त्यांचे वाङ्मयविषयक विविध विचार आलेले आहेत. त्यांचे १८४६ पर्यंतचे आत्मचरित्र (१९४७, संपा. अ. का. प्रियोळकर) महत्त्वाचे आहे. अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या आत्मचरित्राचे महत्त्व आहेच. तथापि त्यांच्या काळातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थितीचे त्यात पडलेले प्रतिबिंबही अभ्यासकांच्या दृष्टीने मोलाचे आहे. स्वतः दादोबांचे जीवन अशा काही चळवळींशी वेगवेगळ्या प्रकारे निगडित झालेले असले, तरी त्यांच्या आत्मचरित्रातून त्या चळवळींबरोबरच दादोबांचे व्यक्तिमत्त्वही स्पष्टपणे प्रत्ययास येते. साधी भाषाशैली आणि प्रांजळ निवेदन ही ह्या आत्मचरित्राची काही उल्लेखनीय वैशिष्ठ्ये.
यांशिवाय मराठी नकाशांचे पुस्तक (१८३६), इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका (१८६०), धर्मविवेचन (१८६८), पारमहंसिक ब्राह्मधर्म (१८८०) आणि शिशुबोध (१८८४) अशी विविध प्रकारची त्यांची ग्रंथरचना आहे, तसेच काही मराठी आणि इंग्रजी स्फुट निबंधही त्यांनी लिहिले. विधवापुनर्विवाहाचे समर्थन करण्यासाठी त्यांनी लिहिलेला ‘विधवाश्रुमार्जन’ हा संस्कृत निबंध बाबा पदमनजी ह्यांच्या यमुनापर्यटन ह्या कादंबरीत अंतर्भूत करण्यात आला होता. विख्यात स्वीडिश तत्वज्ञ स्वीडनबॉर्ग ह्याच्या ग्रंथावर त्यांनी लिहिलेल्या अ हिंदू जंटलमन्स रिफ्लेक्शन्स रिस्पेक्टिंग द वर्क्स ऑफ एमानुएल स्वीडनबॉर्ग (१८७८) ह्या ग्रंथाची यूरोपात प्रशंसा झाली होती. दादोबांच्या साहित्यात साधेपणा आणि विचारप्रवर्तकता आहे. त्यांचे मराठी व्याकरणविषयक कार्य अग्रेसर महत्त्वाचे असून त्यायोगे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले असल्याने ‘मराठी भाषेचे पाणिनी’ हे रास्त बिरुद त्यांना लावले जाते.
ग्रंथलेखनाप्रमाणेच समाजसुधारणेचे कार्यही दादोबांनी केले. सरकारी नोकरी करीत असतानाच लोकहिताच्या कार्यात त्यांनी भाग घेतला. दुर्गाराम मनसाराम मेहेता यांनी सुरतला स्थापन केलेली मानवधर्मसभा (१८४४) आणि राम बाळकृष्ण जयकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली परमहंस सभा (सु. १८४८) या धर्मसुधारक संस्थांमागे दादोबांची प्रेरणा होती. यांशिवाय मराठी ज्ञानप्रसारक सभा, मुंबई विद्यापीठ, पुनर्विवाहोत्तेजक सभा, बॉम्बे असोसिएशन इ. संस्थांच्या कार्यातही त्यांचा सहभाग असे.
भिल्लांचा बंडखोर पुढारी पटाजी नाईक याचे बंड त्यांनी १८५७ साली मोडून काढले व सरकारने रावबहादुर ही पदवी त्यांना बहाल केली. मा.पांडुरंग दादोबा तर्खडकर यांचे १७ ऑक्टोबर १८८२ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.मराठी विश्वकोश/ मालशे, स. गं.
October 17, 2016
त्यांचा जन्म १८ फ़ेब्रुवारी १७४५ रोजी इटलीमधील कोमो इथं झाला. त्याला लहानपणी चर्चमधील पाद्रयांनी शिकवलं. तो इतका हुशार होता की पुढे जाऊन त्यानंही पाद्रीच बनावं यासाठी त्याच्या शिक्षकांनी चक्क त्याला चॉकलेट्स वगैरेंची ‘लाच’ द्यायचा अयशस्वी प्रयत्न करून बघितला. पण त्याच्या घरच्यांना हे कळताच त्यांनी त्याची शाळाच बदलून टाकली! शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला विजेशी संबंधित गोष्टीविषयी अभ्यास करावासा वाटला. वयाच्या २४ व्या वर्षी त्यानं यासंबंधीचा आपला पहिला प्रबंधही लिहून प्रकाशित केला. सुरुवातीचे त्याचे संशोधन हे प्रसिद्ध संशोधक लुई गॅव्हानी यांच्याबरोबर झाले. मात्र, सजीवांमध्ये असणार्याप विजेच्या अनुमानाविषयी गॅव्हानी यांनी केलेले प्रतिपादन त्याला तितकेसे रुचले नाही. त्यामुळे त्याने स्वतंत्रपणे विद्युतघटाविषयी संशोधन करण्याचा निश्चयय केला. दोन वस्तू एकत्र आणून घासून मग दूर करायच्या आणि हे असं सारखं करत राहायचं, की मग त्यातून वीज तयार होऊ शकते ही गोष्ट व्होल्टाच्या लक्षात अगदी लवकर आली होती. स्थिर प्रकारची वीज साठवून ठेवण्यासाठी त्यानं ओट्टो व्हॉन ग्यूरिकपेक्षा जास्त चांगलं यंत्र बनवलं, आणि त्याचं नाव ‘पर्पेच्युअल इलेक्ट्रोफोरस’ असं ठेवलं. ग्यूरिकच्या यंत्रात वीज साठवून ठेवण्यासाठी सतत ते चोळत राहावं लागे. पण व्होल्टाच्या यंत्रात अंबराचा तुकडा आणि सपाट आकाराच्या धातूचं आवरण अशा प्रकारे एकत्र केलं होतं की ते धातूचं आवरण अंबराच्या तुकडय़ाला घासे, आणि मग वेगळं होई; मग ते पुन्हा त्याला घासे, आणि पुन्हा वेगलं होई. या घर्षणक्रियेमुळे त्या यंत्रात सतत वीजनिर्मिती होत राही. ते व्हायचं कारण म्हणजे अंबराच्या तुकडय़ाला या यंत्रात बसवण्याच्या आधी एका केसाळ प्राण्याच्या कातडीवर घासलेलं असे. त्यामुळे त्या दोघांमधले धन आणि ऋण हे विद्युतभार एकाच संख्येचे केले जात. तेव्हा ही धातूची पट्टी त्या अंबराच्या तुकडय़ापासून वेगळी केली जाई, तेव्हा त्या अंबरावर धन आणि धातूच्या पट्टीवर ऋण विद्युतभार आलेला असे. झालं की मग या उपकरणाचं काम! या शोधाबद्दल व्होल्टाला कॉप्ले पुरस्कार आणि इंग्लंडच्या मानाच्या ‘द रॉयल सोसायटी’चं सदस्यत्व मिळालं. मग व्होल्टानं आपलं संशोधन पुढे न्यायचं ठरवलं. विद्युतघट अर्थात बॅटरी म्हणजे रासायनिक शक्तीचे विद्युतशक्तीत रुपांतर करणारे साधन होय. हीच बॅटरी निर्माण करण्याच्या प्रयत्नात शास्रज्ञ अनेक वर्षे होते. सुरुवातीला त्यांनी त्यासाठी मिठाचे पाणी कपामध्ये घेऊन त्यामध्ये निरनिराळय़ा धातूंच्या सळया ठेवून त्याविषयी अभ्यास केला. हा प्रयोग खूपच प्राथमिक अवस्थेत होता. मात्र त्यांनी या अतिशय साध्या अशा उपकरणांच्या साहाय्याने वीजदाब आणि त्याचा विद्युतप्रवाहाशी असणारा संबंध प्रस्थापित केला. दोन वस्तू एकत्र आणून घासून मग दूर करायच्या आणि हे असं सारखं करत राहायचं, की मग त्यातून वीज तयार होऊ शकते ही गोष्ट व्होल्टाच्या लक्षात अगदी लवकर आली होती. १७९० च्या सुमारास त्याला असं आढळलं की, धातूच्या क्षारांच्या द्रावणात चांदी किंवा जस्ताच्या पट्टय़ा ठेवून त्यांना बाहेरून धातूची तार जोडली तर या तारेतून विद्युतप्रवाह जातो.
त्यानं दोन भांडय़ांमध्ये मिठाचं पाणी भरलं आणि त्यांच्यामध्ये दोन वेगवेगळ्या धातूंची मिळून बनलेली प्रत्येकी एक पट्टी ठेवली. त्या पट्टीची एक बाजू तांब्याची तर दुसरी जस्ताची बनलेली होती. यामुळे या दोन भांडय़ांमधल्या विजेच्या प्रमाणात कसला तरी फरक तयार झाला आहे हे त्याला कळालं. (ज्याला आता आपण ‘व्होल्टेज’ असं म्हणतो). ही दोन भांडी आणि या पट्टय़ा मिळून बनलेलं हे एक उपकरण मानलं तर अशी अनेक उपकरणं एका रांगेत ठेवून आणि ती एकमेकांना जोडून मोठं व्होल्टेज तयार करता येईल हे त्याच्या लक्षात आलं. मग त्यानं अशी प्रत्येकी २० भांडी असलेले तीन संच तयार केले. मग त्यानं आपल्या डाव्या हाताचं एक बोट पहिल्या भांडय़ात बुडवून उजव्या हाताचं एक बोट दुसऱ्या भांडय़ात, मग तिसऱ्या भांडय़ात, मग चौथ्या भांडय़ात असं करत करत विसाव्या भांडय़ापर्यंत बुडवत नेलं. त्या वेळी सुरुवातीच्या ४-५ भांडय़ांमध्ये उजव्या हाताचं एक बोट बुडल्यावर त्याला फारसं काही जाणवलं नाही. पण जसजसं तो ते बोट आणखी पुढच्या भांडय़ात बुडवत राहिला, तसतसा त्याला आधीच्या पेक्षा जास्त प्रमाणात विजेचा झटका बसत गेला. विसाव्या भांडय़ात त्याला सगळ्यात मोठा झटका बसला. याचाच अर्थ, व्होल्टाने रासायनिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करण्यात यश मिळवलं होतं. पण, व्होल्टाने ही गोष्ट जाहीरच केली नाही. रॉयल सोसायटीला आपला हा शोध त्याने बऱ्याच उशिरा कळवला. म्हणूनच बॅटरीचा "शोध" लागायला १८०० साल उजाडले होते. जगातला पहिला विद्युतघट तयार करण्याचं श्रेय व्होल्टा याला दिलं जातं. यात मग त्यानं आणखीही काही बदल करून सुधारणा केल्या. त्याला मग नेपोलियननं सुवर्णपदक आणि इतर सन्मानही बहाल केले.
बॅटरीचा शोध लागेपर्यंत विजेचा वापर आणि त्याविषयीचं ज्ञान हे फक्त एकीकडून दुसरीकडे विजेच्या ठिणग्या जाऊ शकतात (‘स्टॅटिक डिसचार्जेस) या माहितीपुरतंच मर्यादित होतं. त्यामुळे त्याविषयीच्या प्रयोगांचा वापर मनोरंजन आणि संशयास्पदरित्या केले जाणारे वैद्यकीय उपचार यांच्यापुरताच मर्यादित असे.
जस्त आणि तांब्याचा वापर करून विद्युतशक्ती साठवून ठेवण्याचे तंत्र व्होल्टाने विकसित केले आणि जगातला पहिला विद्युत घट (बॅटरी) बनवली. यालाच व्होल्टाचा विद्युत घट असे शास्त्रीय नाव आहे. म्हणूनच त्याच्या सन्मानार्थ विद्युतघटाचे विभवांतर (व्होल्टेज) मोजण्याच्या परिमाणाला "व्होल्ट" असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आता अतिशय खात्रीशीररित्या वीज एके ठिकाणी साठवून सातत्यानं ती पुरवत राहण्याच्या व्होल्टाच्या बॅटरीमुळं इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्राची पाळंमुळंच रोवली गेली. यातूनच मग पुढे ‘इलेक्ट्रोकेमिस्ट्री’ आणि ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिझम’ यांच्यातले अनेक प्रयोग करणं शक्य झालं.व्होल्टाच्या कामगिरीचा वापर नंतर तारायंत्र (‘टेलिग्राफ’), दूरध्वनी (‘टेलिफोन’) आणि बिनतारी (‘वायरलेस’) या यंत्रणांच्या संबंधित तंत्रज्ञानांच्या संशोधनात होणार होता! त्यानं त्या काळात तयार केलेल्या ‘व्होल्टाईक पाईल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उपकरणालाच आपण आज सगळीकडे वापरत असलेली बॅटरी म्हणून ओळखतो. अलेझांड्रो व्होल्टा यांचे ५ मार्च १८२७ रोजी निधन झाले..
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. अतुल कहाते / इंटरनेट
March 5, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti