उदयराज गोडबोले

गोडबोले, उदयराज
भारतीय सांस्कृतिक जगतात १९३१ साली बोलणाऱ्या आणि ‘गाणाऱ्या’ चित्रपटांनी प्रवेश केल्यानंतर मराठी संगीत नाटकाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागणे ही स्वाभाविक प्रतिक्रिया होती. बालगंधर्वासारख्या रसिकांच्या गळय़ातील ताईत बनलेल्या कलावंतालाही चित्रपटात भूमिका करणे क्रमप्राप्त ठरले होते. संगीत नाटक महाराष्ट्राच्या सांस्कृतिकतेचे एक व्यवच्छेदक लक्षण बनले असताना चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेने या नाटकांची आर्थिक स्थिती हलाखीची होणेही स्वाभाविक होते.

नेमक्या याच काळात म्हणजे १९२५ साली उदयराज गोडबोले यांचा जन्म झाला. आयुष्यभर नाटकच करीन, अशी जणू प्रतिज्ञाच त्यांनी तारुण्यात घेतली आणि तिचे पालन करण्यासाठी येणाऱ्या सगळय़ा संधी नाकारत उदयराजांनी फक्त संगीत नाटकांतच भूमिका केल्या. त्यांच्या निधनाने संगीत रंगभूमीवरील एका ज्येष्ठ आणि तपस्वी कलावंताचा अंत झाला आहे. रंगभूमीच्या पडत्या काळात तिला पुन्हा सोनेरी दिवस यावेत, यासाठी प्रयत्न करणाऱ्या कलावंतांमध्ये गोडबोले यांचे स्थान महत्त्वाचे होते. चित्रपटांच्या झंझावातापुढेही संगीत रंगभूमी टिकवून ठेवण्यासाठी छोटागंधर्व, जयराम-जयमाला शिलेदार, चित्तरंजन कोल्हटकर, वसंतराव देशपांडे यांच्यासारखे बिनीचे कलावंत अथक प्रयत्न करीत होते. त्यांच्या या प्रयत्नांना रसिकांकडून पुरेसा प्रतिसादही मिळत होता. उदयराजांना संगीताचे बाळकडू घरातूनच मिळाले, कारण त्यांचे वडील दिनकर रामचंद्र गोडबोले सांगलीच्या संस्थानात दरबारी गायक होते. त्यांनी संगीताची विद्या अब्दुल करीम खाँ यांचे शिष्य जाधवबुवा यांच्याकडून घेतली होती. असे घराणेदार संस्कार असतानाही उदयराजांचे मन मात्र संगीत रंगभूमीकडेच जास्त होते. त्यामुळेच सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी छोटागंधर्वानी अजरामर केलेल्या ‘देवमाणूस’ या नाटकाचा प्रयोग केला आणि जाणकारांची शाबासकी मिळवली. त्याचमुळे असेल कदाचित, पण संगीत रंगभूमीवरील ठेकेदार पंडितराव तरटे यांनी त्यांना नाटकात भूमिका करण्याचे निमंत्रण दिले. उदयराजांच्या दृष्टीने जे हवे होते, तेच घडत होते. घरातूनही त्यांच्या या साहसाला विरोध झाला नाही. त्याच काळात त्यांना एका विमा कंपनीत नोकरी ‘चालून’ आली होती. पण गोडबोले यांचा निर्धार पक्का होता आणि त्यांनी रंगभूमीवरचे पाऊल मागे न घेण्याचे ठरवले. नागेश जोशी यांचे ‘फुलपाखरे’ हे त्यांचे पहिले नाटक. पण ते खऱ्या अर्थाने रसिकमान्य झाले, ते आचार्य अत्रे यांच्या ‘प्रीतिसंगम’ या नाटकामुळे! त्या नाटकातील त्यांची गोविंदबुवाची भूमिका खूपच गाजली. त्याच नाटकात त्यांनी गायलेल्या ‘देह देवाचे मंदिर’ या गाण्याने त्यांचे नाव सर्वतोपरी झाले. त्या नाटकातील गीतांच्या ध्वनिमुद्रिका एवढय़ा गाजल्या की, उदयराज गोडबोले म्हणजे ‘देह देवाचे मंदिर’ असे जणू समीकरणच झाले. ‘अशी बायको हवी’ हे त्यांचे नाटकही गाजले. त्याच वेळी चित्तरंजन कोल्हटकर, रेखा, चंद्रकांत गोखले यांच्यासारख्या कलावंतांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या नटराज थिएटर्सतर्फे ‘संगीत भावबंधन’चे प्रयोग सुरू झाले. उदयराजांना कशाचीच उसंत मिळेना. तरीही त्यांच्या मनात अभिजात शास्त्रीय संगीत शिकण्याची जिद्द होतीच. गाणे शिकायचे तर ते किराणा घराण्याचेच आणि त्यातील तेव्हाचे दिग्गज होते, पंडित भीमसेन जोशी. गोडबोले यांनी गुरुजींना विचारणा केली आणि त्यांचा गंडाच बांधला. त्या गंडाबंधनाच्या कार्यक्रमालाही कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे यांच्यासारखे अनेक मोठे कलावंत आवर्जून उपस्थित होते. भीमसेनजी आणि उदयराज या दोघांनाही सततचे दौरे असायचे. त्यामुळे उदयराजांना प्रत्यक्ष गाणे शिकण्याची संधीच मिळाली नाही. आपल्या विनोदी स्वभावाने उदयराजांनी आयुष्यात अनेक मित्र मिळविले. कोणत्याही कठीण प्रसंगाला धैर्याने तोंड देण्याची त्यांची क्षमता होती. कुणापुढेही आयुष्यात हात पसरायचे नाहीत, हे त्यांच्या जीवनाचे ब्रीदच होते. अशा ज्येष्ठ आणि लोकप्रिय कलावंताच्या निधनामुळे संगीताची आणि संगीत रंगभूमीचीही मोठी हानी झाली आहे.



गोडबोले, उदयराज
भारतीय सांस्कृतिक जगतात १९३१ साली बोलणाऱ्या आणि ‘गाणाऱ्या’ चित्रपटांनी प्रवेश केल्यानंतर मराठी संगीत नाटकाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागणे ही स्वाभाविक प्रतिक्रिया होती. बालगंधर्वासारख्या रसिकांच्या गळय़ातील ताईत बनलेल्या कलावंतालाही चित्रपटात भूमिका करणे क्रमप्राप्त ठरले होते. संगीत नाटक महाराष्ट्राच्या सांस्कृतिकतेचे एक व्यवच्छेदक लक्षण बनले असताना चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेने या नाटकांची आर्थिक स्थिती हलाखीची होणेही स्वाभाविक होते.

नेमक्या याच काळात म्हणजे १९२५ साली उदयराज गोडबोले यांचा जन्म झाला. आयुष्यभर नाटकच करीन, अशी जणू प्रतिज्ञाच त्यांनी तारुण्यात घेतली आणि तिचे पालन करण्यासाठी येणाऱ्या सगळय़ा संधी नाकारत उदयराजांनी फक्त संगीत नाटकांतच भूमिका केल्या. त्यांच्या निधनाने संगीत रंगभूमीवरील एका ज्येष्ठ आणि तपस्वी कलावंताचा अंत झाला आहे. रंगभूमीच्या पडत्या काळात तिला पुन्हा सोनेरी दिवस यावेत, यासाठी प्रयत्न करणाऱ्या कलावंतांमध्ये गोडबोले यांचे स्थान महत्त्वाचे होते. चित्रपटांच्या झंझावातापुढेही संगीत रंगभूमी टिकवून ठेवण्यासाठी छोटागंधर्व, जयराम-जयमाला शिलेदार, चित्तरंजन कोल्हटकर, वसंतराव देशपांडे यांच्यासारखे बिनीचे कलावंत अथक प्रयत्न करीत होते. त्यांच्या या प्रयत्नांना रसिकांकडून पुरेसा प्रतिसादही मिळत होता. उदयराजांना संगीताचे बाळकडू घरातूनच मिळाले, कारण त्यांचे वडील दिनकर रामचंद्र गोडबोले सांगलीच्या संस्थानात दरबारी गायक होते. त्यांनी संगीताची विद्या अब्दुल करीम खाँ यांचे शिष्य जाधवबुवा यांच्याकडून घेतली होती. असे घराणेदार संस्कार असतानाही उदयराजांचे मन मात्र संगीत रंगभूमीकडेच जास्त होते. त्यामुळेच सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी छोटागंधर्वानी अजरामर केलेल्या ‘देवमाणूस’ या नाटकाचा प्रयोग केला आणि जाणकारांची शाबासकी मिळवली. त्याचमुळे असेल कदाचित, पण संगीत रंगभूमीवरील ठेकेदार पंडितराव तरटे यांनी त्यांना नाटकात भूमिका करण्याचे निमंत्रण दिले. उदयराजांच्या दृष्टीने जे हवे होते, तेच घडत होते. घरातूनही त्यांच्या या साहसाला विरोध झाला नाही. त्याच काळात त्यांना एका विमा कंपनीत नोकरी ‘चालून’ आली होती. पण गोडबोले यांचा निर्धार पक्का होता आणि त्यांनी रंगभूमीवरचे पाऊल मागे न घेण्याचे ठरवले. नागेश जोशी यांचे ‘फुलपाखरे’ हे त्यांचे पहिले नाटक. पण ते खऱ्या अर्थाने रसिकमान्य झाले, ते आचार्य अत्रे यांच्या ‘प्रीतिसंगम’ या नाटकामुळे! त्या नाटकातील त्यांची गोविंदबुवाची भूमिका खूपच गाजली. त्याच नाटकात त्यांनी गायलेल्या ‘देह देवाचे मंदिर’ या गाण्याने त्यांचे नाव सर्वतोपरी झाले. त्या नाटकातील गीतांच्या ध्वनिमुद्रिका एवढय़ा गाजल्या की, उदयराज गोडबोले म्हणजे ‘देह देवाचे मंदिर’ असे जणू समीकरणच झाले. ‘अशी बायको हवी’ हे त्यांचे नाटकही गाजले. त्याच वेळी चित्तरंजन कोल्हटकर, रेखा, चंद्रकांत गोखले यांच्यासारख्या कलावंतांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या नटराज थिएटर्सतर्फे ‘संगीत भावबंधन’चे प्रयोग सुरू झाले. उदयराजांना कशाचीच उसंत मिळेना. तरीही त्यांच्या मनात अभिजात शास्त्रीय संगीत शिकण्याची जिद्द होतीच. गाणे शिकायचे तर ते किराणा घराण्याचेच आणि त्यातील तेव्हाचे दिग्गज होते, पंडित भीमसेन जोशी. गोडबोले यांनी गुरुजींना विचारणा केली आणि त्यांचा गंडाच बांधला. त्या गंडाबंधनाच्या कार्यक्रमालाही कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे यांच्यासारखे अनेक मोठे कलावंत आवर्जून उपस्थित होते. भीमसेनजी आणि उदयराज या दोघांनाही सततचे दौरे असायचे. त्यामुळे उदयराजांना प्रत्यक्ष गाणे शिकण्याची संधीच मिळाली नाही. आपल्या विनोदी स्वभावाने उदयराजांनी आयुष्यात अनेक मित्र मिळविले. कोणत्याही कठीण प्रसंगाला धैर्याने तोंड देण्याची त्यांची क्षमता होती. कुणापुढेही आयुष्यात हात पसरायचे नाहीत, हे त्यांच्या जीवनाचे ब्रीदच होते. अशा ज्येष्ठ आणि लोकप्रिय कलावंताच्या निधनामुळे संगीताची आणि संगीत रंगभूमीचीही मोठी हानी झाली आहे.

Author