(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • संतोष जुवेकर

    संतोष जुवेकर अवधूत गुप्ते दिग्दर्शित “झेंडा” या चित्रपटातून प्रकाश झोतात आले. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये “जब मिले छोरा छोरी” आणि “पोलिस लाइन” या चित्रपटाचा समावेश आहे.

  • संभा चव्हाण

    आयुष्याच्या वाटचालीवर वा ज्याला जीवनकर्तृत्त्व असे म्हणण्याचा प्रघात आहे. त्यावर आसपासच्या वातावरणाचा वा संस्कारांचा प्रभाव असतो. वातावरण आणि संस्कार याच्या जोडीला पिंड म्हणून जो काही प्रकार असतो तोच त्या व्यक्तीच्या कर्तृत्वगाथेची उंची ठरवत असतो. आपल्या ८६ वर्षांच्या आयुष्यातील क्षण न क्षण दुसऱ्यासाठी वेचलेल्या आणि कृतार्थ ठरलेल्या संभा चव्हाण यांचा पिंड हा शूर योद्धय़ाचा, लढवय्याचा होता.

    म्हणूनच अंतिम श्वासापर्यंत हा वीर झुंजत राहिला. त्यातील सुमारे ६० वर्षे समाजातील दुर्लक्षितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि अखेरची सात-आठ वर्षे मृत्यूविरुद्ध या योद्धय़ाचा लढा हा असा अखंड होता. कोकणातील देवगडमधील तारामुंब्री हे मूळ गाव असलेल्या संभा चव्हाणांचं संपूर्ण आयुष्य मुंबईत आणि तेही वरळी विभागात गेलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे घट्ट संस्कार आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या विचारांचा गडद प्रभाव त्यांच्यावर पडला होता. स्वातंत्र्याचं तेज उरात घेऊन नवा भारत घडवायला निघालेल्या तळागाळातील आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय तरूण पिढीचा झपाटय़ाने भ्रमनिरास झाला.

    देशप्रेम, साधेपणा, कृतज्ञता, त्याग ही मूल्ये भांडवलशाहीच्या चक्रात नष्ट होत गेली आणि याचसाठी का मिळवले स्वातंत्र्य असा प्रश्न त्या पिढीला पडू लागला. संभा चव्हाण याच भ्रमभारित युवा पिढीचे एक प्रतिनिधी होते. मात्र या चकव्यात त्यांनी स्वत:ला गुंतू दिले नाही. आधी समाज सुधारला की देश सुधारेल, या विचारधारेचे ते पाईक बनले आणि ज्या पोलीस दलात काही काळ त्यांनी सेवा केली, त्या पोलिसांच्या जीवनकल्याणासाठी अखंड झुंजण्याचा निर्धार त्यांनी केला.

    कायदा आणि सुव्यवस्था राबविण्यासाठी जे दल राबते ते पोलिसच अत्यंत हलाखीत राहतात, त्यांना चांगलेवेतन मिळत नाही, त्यांना कायम मानसिक दडपणाखाली काम करावे लागते आणि ज्यांची वरिष्ठ कायम उपेक्षा करतात, त्या महाराष्ट्र पोलिसांवरचा अन्याय दूर करण्यासाठी अखंड लढय़ाला पर्याय नाही, हे संभा चव्हाण यांनी हेरले. म्हणूनच १९६६ साली जगावेगळा असा पोलिसांच्या पत्नींचा मोर्चा त्यांनी पोलीस आयुक्तालयावर नेला. या त्यांच्या कृत्याबद्दल त्यांना कारावासाची शिक्षा झाली. त्या शिक्षेच्या दरम्यान येरवडा तुरुंगात तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यांना जाऊन भेटले. पोलीस कल्याणाचे काम सोडून द्या, आपण म्हणाल त्या पदावर पोलीस दलात आपली नियुक्ती करतो, अशी सुखासीन भविष्याची हमी देणारी ऑफर त्यांनी संभा चव्हाण यांना दिली.

    कारावासात असलेल्या अन्य कोणालाही हा मोहाचा क्षण स्वीकारावासा वाटला असता; त्याचे चित्त डळमळले असते. पण भगवद्गीतेचा संस्कार झालेल्या संभा चव्हाण यांनी आपले पोलीस कल्याणाचे समरांगण अधिक मोठे मानले आणि मुख्यमंत्र्यांची ऑफर निग्रहाने बाजूला सारली. जनसंघाचे कार्यकर्ते आणि मग याच पक्षाच्या तिकीटावर नगरसेवक झालेले संभा चव्हाण कर्मयोद्धा ठरले. याच भूमिकेतून त्यांनी वरळीच्या पोलीस वसाहतीत अनेक सुधारणा घडवून आणल्या. १९५६-५७ साली वरळीच्या गांधीनगरात गुंडांचे साम्राज्य होते.

    दारूच्या भट्टय़ा राजरोस लागायच्या. हे गुंड संभा चव्हाण यांनी संपुष्टात आणले. पत्रकारितेत त्यांनी आचार्य अत्रेंना आपले गुरू मानले होते. अत्रेंची बेधडक, जहाल लेखणी संभा चव्हाणांना प्रिय होती. आपल्या ‘शूर शिपाई’ आणि ‘आमचा हिंदुस्थान’ या नियतकालिकांतून संभा चव्हाण यांनी अत्रेंचाच वारसा जपण्याचा प्रयत्न करीत आपले लेखणी परजली.

    संघ विचार आणि तत्त्वांशी एकनिष्ठ राहताना सुखकर आयुष्यासाठीच्या साऱ्या तडजोडी झुगारून दिलेल्या या लढवय्याची इच्छा महाराष्ट्राच्याविधिमंडळात जाऊन पोलीस कल्याणासाठीचा आवाद बुलंद करण्याची होती. आमदारकी ‘विकत’ घेतली जाण्याच्या आजच्या काळात ती पूर्ण होणे अशक्यच बाब होती. मात्र झाले ते एका अर्थाने चांगलेच झाले. एका झुंजाराची जीवनगाथा शंभर टक्के निष्कलंकच राहिली!

  • संदीप कराजनगी

    बोस्टोन येथील हार्वर्ड मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये सर्जरी विभागात इन्स्ट्रक्टर म्हणून काम करणार्‍या संदीप कराजनगीने पोस्ट डॉक्टरेट अभ्यासादरम्यान एमआयटीमधील तज्ज्ञांसोबत व्होकल कॉर्डच्या आजारांवर उपयुक्त अशा जेलची निमिर्ती केली आहे. आवाजाच्या आजारांवर मात करून आवाजाला पुर्नजन्म देण्यासाठी तो झटत आहे.

    जिद्द, सचोटी आणि महत्त्वाकांक्षा ज्याच्याकडे असेल, त्याला यश हमखास मिळणारच. याच त्रिसूत्रीचा वापर करून डोंबिवलीच्या संदीप कराजनगी या तरुणाने आज जगातील तमाम वैद्यक क्षेत्राचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. गायक, शिक्षक अशा गाण्याच्या किंवा बोलण्याच्या व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना अनेकदा व्होकल कॉर्डचा आजार उद्भवतो. या आजारावर तोडगा काढण्यासाठी २०व्या शतकाच्या अखेरच्या दशकात अमेरिकेत संशोधनाला सुरुवात झाली. त्यानंतर सुमारे १५वर्षांनी अमेरिकेतील मॅसेस्टस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात एमआयटीमधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक रॉबर्ट लँगर यांच्या लॅबमध्ये एका टीमने या संशोधनाला मूर्त स्वरूप देऊन व्होकल कॉर्डसारखं काम करणारं जेल तयार केलं आहे. या टीममध्ये संदीपची भूमिका महत्त्वाची ठरली.

    संदीप लहानपणापासूनच हुशार. डोंबिवलीतील ग्रीन्स इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी असलेला संदीप दहावीत ९१.२८ टक्के गूण मिळवून शाळेतून पहिला आला होता. इंजिनीअरिंग करायचं हे ठरलेलं असल्यामुळे त्याने रुपारेल कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. अभ्यासातील कामगिरी कायम ठेवत संदीपने बारावीत ९८ टक्के मिळवले. केमिकल इंजिनीअरिंग करायचं असल्यामुळे अर्थात पहिलं प्राधान्य त्याने युडीसीटीला दिलं होतं. मात्र तेथे प्रवेश मिळू शकला नाही म्हणून त्यानं विलेपार्ले येथील डी.जे. संघवी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. विद्यापीठ पातळीवरही आपली अव्वल क्रमवारी कायम ठेवत संदीपने इंजिनीअरिंग पूर्ण केलं. हे करत असतानाच त्यानं जीआरई, टोफेल यासारख्या परीक्षा दिल्या. या परीक्षांमधील चांगल्या गुणांमुळे त्याला सुमारे आठ ते दहा परदेशी विद्यापीठांनी पूर्ण स्कॉलरशिप देऊ केली. यातील न्यूयॉर्कमधील ट्रॉय येथे असलेल्या 'रेन्सलर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट'मध्ये त्याने प्रवेश घेतला. या सर्वात विशेष नमूद करायची बाब म्हणजे संदीपने कोणतंही शिक्षण घेण्यासाठी कधी कोचिंग क्लासेसची मदत घेतली नाही. शाळेतील अभ्यास आणि स्व-अभ्यास यावरच त्यानं यशाची शिखरं गाठण्यास सुरुवात केली. याचा त्याला भविष्यातही फायदा झाला.

    २००१मध्ये संदीप केमिकल आणि बायोलॉजिकल इंजिनीअरिंगच्या अॅडव्हान्स अभ्यासासाठी ट्रॉय येथील शैक्षणिक संस्थेत दाखल झाला. तेथे घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेतही तो पहिला आला. यामुळे त्याच्या आवडीचा विषय निवडण्याची संधी त्याला मिळाली. पाच विषयांतून नॅनोटेक्नॉलॉजी हा विषय त्याने निवडला. २००६मध्ये त्याने रेन्सलर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून आपली डॉक्टरेट पदवी मिळवली. हा अभ्यास करताना तो जैवशास्त्रातील नॅनोमटेरिअल्सची नवलाई शोधण्यात गुंतला होता. याबाबतीतील त्याची निरीक्षणं त्याने ११ संशोधन प्रबंधांच्या माध्यमातून विज्ञान जगतासमोर मांडली. यानंतर २००६मध्ये प्रतिष्ठीत अशा एमआयटीमधील प्राध्यापक रॉबर्ट लँगर यांच्या लॅबमध्ये त्याला पोस्ट डॉक्टरेटल संशोधनाचं काम करण्याची संधी मिळाली. एमआयटी आणि मॅसेस्टस जनरल हॉस्पिटल अर्थात एमजीएच या दोन प्रतिष्ठीत संस्थांचा मिळून बायोमटेरिअल आणि टिश्यू इंजिनीअरिंगचा हा अभ्यास होता. यामध्ये व्होकल कॉर्डमध्ये होणार्‍या आजारांवर उपाय म्हणून इंजेक्टेबल बायोमटेरिअल तयार करण्याचं त्याच्यासमोर आव्हान होतं. त्याच्यासोबत तेथील काही तज्ज्ञ डॉक्टरांची टीमही काम करत होती. हे आव्हान स्वीकारून संदीप कामाला लागला आणि त्याने त्यात यशही मिळवलं. संदीप आणि त्याच्या टीमला व्होकल कॉर्डच्या आजाराने त्रस्त असलेल्यांवर उपचार करण्यासाठी व्होकल कॉर्डसारखं काम करणारं काहीतरी कृत्रिम मटेरिअल तयार करायचं होतं. त्यासाठी त्यांनी पूवीर्ची सर्व गृहितकं मागे ठेवून ही समस्या केवळ एक यांत्रिक समस्या आहे, असं समजून त्याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यांनी आवाजाचा दर्जा सुधारण्यासाठी अथवा त्या आजारांवर मात करण्यासाठी उतींचा वापर करणं टाळण्याचा निर्णय घेतला. याला पर्याय काय असू शकेल यावर विचार करत असताना त्यांनी पॉलिथिलीन ग्याकोल अर्थात पीईजीची निवड केली. याचं मुख्य कारण म्हणजे पीईजी हे एफडीएने मान्यता दिलेल्या विविध औषधांमध्ये वापरण्यात येतं. यानंतर संशोधकांनी व्होकल कॉर्डच्या हालचालींसारखी पीईजीची हालचाल कशी करता येईल यावर भर देण्यास सुरुवात केली. यासाठी पीईजीच्या सूक्ष्म कणांचा त्यांनी अभ्यास करण्यास सुरुवात केली. आपली व्होकल कॉर्ड ही फुप्फुसातून येणार्‍या हवेमुळे व्हायब्रेट होत असते. अशाप्रकारेच पीईजीला व्हायब्रेट करण्याची गरज होती. यासाठी व्होकल कॉर्डच्या व्हायब्रेशनचं प्रमाण लक्षात घेणंही गरजेचं होतं. अखेर संशोधकांना एका ठिकाणी पीईजी आणि व्होकल कॉर्डचं व्हायब्रेशन समान जाणवलं. या स्थितीला त्यांनी पीईजी ३० असं नाव दिलं. नव्याने तयार झालेलं हे जेल प्राण्यांमध्ये इंजेक्ट करून चाचण्या यशस्वी करण्यात आल्या. आता मानवावर याची चाचणी करण्यात येणार असून हा प्रयोग यशस्वी झाला तर जगातील अनेक पेशंट्सना दिलासा मिळेल.

    या संदर्भातील रिसर्च पेपर्स प्रसिद्घ करून संदीपचं पोस्ट डॉक्टरेट पूर्ण झालं. त्याच्या या संशोधनाची दखल तेथील प्रसिद्घ वृत्त वाहिनी सीएनएनने घेऊन संदीपची खास मुलाखतही घेण्यात आली. संदीप सध्या हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये सर्जरी विभागात इंस्ट्रक्टर म्हणून काम करत आहे. तो अमेरिकन केमिकल सोसायटी आणि अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनीअर्सचा सभासदही आहे. त्याचं संशोधनाचं काम सुरू असून आवाजाचा हा किमयागार भविष्यात मायदेशी परतणार आहे, हे मात्र निश्चित!

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • संत सोपानदेव

    श्री. निवृत्तीनाथ व संत ज्ञानदेवांचे हे धाकटे बंधू , संत मुक्ताबाई ही यांची धाकटी बहीण.

    निवृत्तीनाथांच्या सांगण्यावरुन संत ज्ञानेश्वरांनी यांना अनुग्रह दिला. तर ज्ञानदेवांच्या सांगण्यावरुन मुक्ताबाई यांची शिष्या झअली. हेही परमार्थातील अधिकारी व्यक्ति होते पण स्वतः प्रसिद्धीपासून दूर राहून त्यांनी मुक्ताबाई करवी अध्यात्म प्रसाराचे कार्य केले.

    जसे ज्ञानदेवांच्या जीवनात निवृत्तीनाथांचे स्थान होते तसेच मुक्ताबाईच्या जीवनात सोपानदेवांचे होते.

    ## Sant Sopandev

  • सतिश मोडखळकर

    प्रत्येक कलावंत हा तोंडाने नाही तर त्याच्या कलेतून बोलत असतो. त्याच्या तत्वांना, भावनांना, व आयुष्यभर जोपासलेल्या स्वप्नांना तो कलेच्या सौंदर्यामध्ये घोळवत असतो, मुर्तरूप देत असतो, त्यांना एका अर्थाने जीवंतच करत असतो. खळबळलेला समुद्र जसं आपल्या मनातलं वादळ व्यक्त करण्यासाठी लाटांचा आधार घेतो, त्याप्रमाणे कलावंत आपल्या कलेतून ही तळमळ रसिकांसमोर मांडत असतो. पायामधील पैंजण ज्याप्रमाणे हळुवार वाजुन पावलं कुठे चालली आहेत याची जाणीव करून देतात, त्याप्रमाणे कलाकाराच्या मनाचा थांगपत्ता हा त्याच्या कलेच्या अविष्कारामधून केवळ दर्दी रसिकांनाच लागु शकतो.

  • संत सेना महाराज

    मध्यप्रदेशातील बांधवगड संस्थानातील ईरची या गावी महाराजांचा जंन्म झाला. सेना महाराजांचे वडील देविदास बांधवगडच्या राजाकडे नाभिकाचे काम करीत असत. आई प्रेमकुंवरबाई सात्विक स्वभावाची गृहिणी होती. वडील देविदासानंतर परंपरेनुसार राजाकडील नाभिकाचे काम सेना महाराजांकडे आले. सेना महाराजांचा लहानपणापासूनच भक्तीमार्गाकडे ओढा होता. त्यांच्या हिंदी मातृभाषेतून ते भक्तीरचना सुध्दा करु लागले. कालांतराने महाराष्ट्रातील त्या काळच्या संतांची माहिती सेना महाराजांना मिळाली. त्या संतांच्या व पंढरपूरच्या विठ्ठल भेटीसाठी ते आतूर झाले. तिर्थयात्रा करित करीत ते इकडे आले संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव व इतर त्यांचे समकालीन संत होते. या महान संतांच्या सान्निध्यात येऊन ते महाराष्ट्राच्या पावनभूमीत रममाण झाले.

    त्यांनी मराठी भाषा आत्मसात करुन मराठी भाषेवर इतके प्रभूत्व मिळविले की मराठी भाषेत त्यांनी अनेक उत्कृष्ट अभंगांची निर्मिती केली. भागवंत संप्रदायातील वारकरी भक्तीरसात त्यांनी स्वतःला झोकून दिले.

    एका हिंदी भाषिक संतांची मराठी भक्तिरचना वाचताना महाराष्ट्रातील भक्तांना जरासुध्दा वेगळेपण जाणवत नाही. ज्ञानेश्वर, तुकारामाइतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठया आवडीने आजतागायत गायले जात आहेत. संतांना प्रदेश, भाषा, जातपात यांच्या मर्यादा नसतात हेच यावरुन सिध्द होते.

    चमत्कारांनी साधुसंतांचे मोठेपण दर्शविणार्‍या लोकांना खोडच जडलेली आहे. ज्ञानेश्वरांनी भिंत चालविली, रेडयाच्या तोंडून वेद म्हणवून घेतले. अशा प्रकारच्या अनेक दंतकथा ज्याप्रमाणे अनेक संतांच्या बाबतीत सांगितल्या जातात तशीच दंतकथा सेना महाराजांच्या बाबतीतही सांगितली जाते. राजाची हजामत करण्यासाठी राजाचा माणूस सेना न्हाव्याकडे निरोप सांगावयास जातो. परंतु भगवंताच्या नामस्मरणात दंग असलेल्या सेना न्हाव्याला निरोप ऐकू जात नाही. उशीर झाल्यामुळे राजा क्रोधीत होऊन सेना न्हाव्याला शिक्षा होईल म्हणून स्वतः भगवंतच धोपटी घेऊन राजाची हजामत करुन जातात.

    नामदेव, तुकाराम, सेना न्हावी, गोरा कुंभार, चोखामेळा अशा अनेक संतांनी त्यांच्या अभंगवाणीतून समाज प्रबोधन केले. संसारात राहून सुध्दा ईश्वर भक्ती करुन परमार्थ साधला जाऊ शकतो हे लोकांना सांगितले. कर्मठ उच्चवर्णियांनी निर्माण केलेली उच्चनीच, जातीभेद ही परंपरा मोडीत काढण्यासाठी उपदेश केला. स्वतःही तसे वागले. त्यांनी निर्माण केलेले काव्य, अभंग, यांचाच जनतेवर इतका प्रचंड प्रभाव पडला की इतर काही चमत्कारांनी त्यांचे मोठेपण सिध्द करण्याची काहीच गरज नसावी.

    नंतर महाराष्ट्रातील वास्तव्य संपवून सेना महाराज पुन्हा त्यांच्या जन्मभूमीस तीर्थाटन करीत निघून गेले. त्यांच्या हिंदी भक्तीरचना उत्तरेकडील सर्व हिंदी प्रदेशातून म्हटल्या जातात. महाराजांनी काही रचना पंजाबी भाषेत सुध्दा केल्या आहेत.

  • संत मुक्ताबाई

    श्री.निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव या अलौकिक भावंडांची मुक्ताबाई ही तितकीच अलौकिक बहीण. इ.स. १२७७ मध्ये हिचा जन्म झाला.

    ज्ञानदेवांच्या सांगण्यावरुन संत सोपानदेवांनी हिला शिष्या करुन घेतले.

    चौदाशे वर्षे जगलेले चांगदेव जेव्हा ज्ञानदेवांना कोरे पत्र पाठवतात तेव्हा इतकी वर्षे जगून हा कोराच असे मुक्ताबाई म्हणते.

    पुढे त्याच चांगदेवांची ती गुरु झाली. इ.स. १२९७ मध्ये तीने समाधी घेतली.
    ## Sant Muktabai
  • संत श्री जानकी आई

    जिच्या पदस्पर्शाने गुजरातमधील गणदेवी हे छोटेसे गाव पवित्र तिर्थक्षेत्र बनले ती श्री जानकी आई अर्थात बायजी.

  • सतीश तारे

    आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने मराठी रंगभूमीसह टीव्ही आणि चित्रपटांत आपला ठसा उमटवणारे विनोदी अभिनेते सतीश तारे यांनी वडिलांच्या नाटकांमधूनच अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली.हौशी व्यक्तिमत्त्वामुळे लेखन, दिग्दर्शन, अभिनय, गायन, नाटय़निर्मिती अशा नाटकाच्या सगळ्याच प्रांतात मुक्तपणे मुशाफिरी केली. प्रा.जयंत तारेंच्या “फुलराणी” या पुण्यातील बालनाट्य चळवळीत अग्रेसर असलेल्या संस्थेतून सतीश तारे यांनी रंगभूमीवर पदार्पण केले.”

  • सतिश प्रधान

    ठाण्याचे माजी महापौर पुढे अनेक महत्त्वाच्या पदांवर आणि खासदार असा सतिश प्रधान यांचा आजवरचा राजकीय प्रवास झाला आहे. १९६६ साली शिवसेना या पक्षाची स्थापना झाल्यापासून सतिश प्रधान संघटनेत सक्रिय होते. १९६७ साली ठाण्यात भगवा फडकल्यानंतर नगराध्यक्षपदावर वसंतराव मराठे यांची निवड झाली. पण काही कारणास्तव मराठे पक्षापासून बाजूला झाल्यानंतर प्रधानांची वर्णी नगराध्यक्षपदावर झाली. त्याच काळात संघटना बळकड व संपूर्ण जिल्ह्यात रुजविण्यासाठी प्रधानांनी प्रचंड मेहनत घेतली. तलासरी, जव्हार, मोखाडा या भागातल्या कम्युनिस्टांशी शिवसेनेने अनेकदा दोन हात केले. पूर्वी राज्य सरकारचे सर्व जीआर इंग्रजीतून पाठविले जात. १९७४ साली प्रधानांनी या इंग्रजी जीआरला कडाडून विरोध करत ते मराठीत पाठवा नाही तर उग्र आंदोलन करू असा इशारा सरकारला दिला. त्यानंतर नमलेल्या राज्य सरकारने मराठीत जीआर काढण्यास सुरवात केली. १९८२ साली ठाणे महापालिकेची स्थापना झाल्यानंतर प्रधान ठाण्याचे पहिले महापौर झाले. त्या दिवसापासून या जिल्ह्याच्या सांस्कृतिक पालटाला खर्‍या अर्थाने सुरूवात झाली. प्रत्येक गोष्टीचे प्रगतीशील परिवर्तन करणे हा त्यांचा खाक्या होता. सतिश प्रधानांनी ठाण्याला नवे बदल स्वीकारण्यास प्रवृत्त केले होते व त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशस्त वास्तूंची निर्मिती झाली. गडकरी रंगायतन व दादोजी कोंडदेव क्रीडा सभागृह ही त्याची बोलकी उदाहरणे आहेत. सांस्कृतिक विकासाद्वारेच त्यांनी लहान मुलांवर मैदानी संस्कार करण्याच्या हेतुने, ठाणे मॅरॅथॉन स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली. विधानसभेच्या निवडणूकीत पराभव पदरी पडल्यानंतर शिवसेनेने त्यांना दोन वेळा राज्यसभेवर पाठविले होते.

    २००४ विधानसभा निवडणुकीत आमदारकीची निवडणुक न लढऊ दिल्यामुळे, प्रधानांनी शिवसेनेला कायम जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये ही मान मिळेनासा झाल्याने प्रधानांनी मनसेची वाट धरली.

    या पक्षातले सर्वात जेष्ठ नेता असल्याने राज त्यांना मानाने वागवत होते. परंतु, पुन्हा विधानसभा निवडणूक लढविण्याच्या आशेने त्यांचा घात केला. राजन राजेंना तिकिट मिळाल्याने नाराज झालेल्या प्रधानांनी मनसेलाही सोडचिठ्ठी दिली.