(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • अजित भुरे

    वेगवेगळे आवाज काढण्याची हौस असल्याने अजित भुरे हे पार्श्वभाषक (डबिंग आणि व्हॉइसिंग आर्टिस्ट) म्हणूनही गाजले आहेत.

  • बाळ पळसुले

    पळसुले, बाळ

    बाळ पळसुले यांच्या ठसकेबाज चाली ऐकल्या की अचंबित व्हावे लागायचे. मराठी चित्रपट संगीतात त्यांनी केलेल्या कामगिरीचा त्यांच्या हयातीत तसा सन्मान झाला नसला, तरीही रुपेरी पडद्याच्या इतिहासात त्यांच्या नावे एक पान राखीव राहील, यात शंका नाही. अनेकदा कानावरून गेलेली गाणी त्यांच्या नावावर आहेत हे जेव्हा लक्षात येते, तेव्हा कौतुकमिश्रित आदर वाटू लागतो. कोल्हापूर, सांगली परिसरातील वातावरणात रमलेल्या पळसुले यांच्या रोमारोमात तमाशातला ठसका याच परिसरात भिनला.
    १९६५ पासून सुमारे तीन दशके मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या या संगीतकाराला चिमुरडय़ा पोरीने बसस्थानकाबाहेर त्यांचेच गाणे ऐकवले, तेव्हा खिशातली दहा रुपयांची नोट तिच्या पदरात टाकणाऱ्या पळसुले यांना तेव्हा झालेला आनंद अवर्णनीय वाटत होता. सहज गुणगुणता येणारी आणि कानात राहणारी चाल बांधणे हे पळसुले यांचे वैशिष्टय़. ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ सारखं उडत्या चालीचे गाणे असो, की ‘विठ्ठलनामाची शाळा भरली’ हे सर्वतोपरी झालेले भक्तिगीत असो; पळसुले यांचे वेगळेपण त्या रचनेमध्ये सहजपणे लक्षात यायचे. लावणीतला ठसकादेखील सुंदरपणे व्यक्त करण्याचे त्यांचे कसब होते. चित्रपटासारख्या दुनियेत त्यांच्या बालपणीचा कलापथकातील अनुभव त्यांना उपयोगी पडला, कारण सर्वाच्या ओठात सहज राहतील, अशा रचना करण्याचे शिक्षण त्यांना त्या संस्कारातून मिळाले होते. ‘फटाकडी’, ‘भन्नाट भानू’, ‘भिंगरी’, ‘तेवढं सोडून बोला’,‘रणरागिणी’,‘पंढरीची वारी’ , ‘राजा पंढरीचा’ यासारख्या चित्रपटातील गीते तेव्हा महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी रसिकांची अतिशय आवडती झाली होती. त्यांच्या संगीतामुळे चित्रपटांनाही एक वेगळा नखरेल रंग प्राप्त झाला. यशाने हुरळून जाण्याची पळसुले यांची वृत्ती नव्हती. अंगठय़ांनी भरलेली त्यांची बोटे पेटीवर फिरायला लागली की समोर बसलेले सारे जण एका वेगळ्या विश्वात पोहोचत असत. साधेपणाने संगीताला भिडण्याची त्यांची वृत्ती त्यांच्या स्वभावातून आली होती. चित्रपट मिळावेत, यासाठी कधी कुणाच्या दारापुढे तोंड वेंगाडण्याची त्यांच्यावर वेळच आली नाही, कारण त्यांचे नाणे बावनकशी होते. त्यांच्या निधनाने मराठीतील एक उत्तम संगीतकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

  • यशवंत गोपाळ जोशी

    वहिनींच्या बांगड्या हा त्यांच्या कथेवरुन निघालेला गाजलेला चित्रपट

  • गोविंद वासुदेव कानिटकर

    महाराष्ट्र-प्रबोधनकाळातील एक महत्वाचे अनुवादक गोविंद वासुदेव कानिटकर हे कवीदेखील होते.

  • बापूराव पेंढारकर

    व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर हे मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक होते. बापूराव हे केशवराव भोसले ह्यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे अध्वर्यू होते.

  • अभिनेते दामूअण्णा मालवणकर

    नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात विनोदी अभिनेते दामूअण्णा यांनी विशिष्ट प्रकारे हसण्याची लकब, तिरळा डोळा आणि प्रभावी शब्द फेक याद्वारे आपले विशिष्ट स्थान निर्माण केले होते. त्यांचा जन्म ८ मार्च १८९३ रोजी निपाणी येथे झाला.

    दामूअण्णा मालवणकर यांचे पूर्ण नाव दामूअण्णा बापूशेठ मालवणकर. त्यांच्या वडिलांचा सोनारकामाचा पिढीजात व्यवसाय होता. त्यामुळे दामूअण्णांनी त्यातच लक्ष घालावे अशी त्यांचे वडील बापूशेठ यांची अपेक्षा होती. पण त्यांना लहानपणापासूनच नाटकांचे वेड होते. घरातून या नाटकवेडाला विरोधच होता. त्यामुळे दामूअण्णा चोरून नाटके पाहत असत. तारुण्यात नाटकांच्या ध्यासामुळे त्यांनी घरातून पळून जाऊन महाराष्ट्र कंपनीत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र वडिलांनी त्यांना परत आणून सोनारकामात लक्ष घालण्यास भाग पाडले. मात्र १९१३ साली ते पुन्हा एकदा घरातून बाहेर पडले आणि सांगलीला चित्ताकर्षक मंडळीत गेले. तिथे त्यांना बिनपगारी नोकरी मिळाली.

    चित्ताकर्षक कंपनीत दामूअण्णांना नाटकांच्या जाहिरातींचे फलक ढकलगाडीवर घालून रस्त्यावरून ङ्गिरवून आणण्याचे काम दिले गेले. पडतील ती कामे करण्यात त्यांचा वेळ जात असे. काही काळानंतर चित्ताकर्षक मंडळीच्या ‘त्राटिका’ या नाटकात दामूअण्णांना शिंप्याची भूमिका दिली गेली. ती भूमिका अगदी छोटी होती, मात्र त्यामध्ये त्यांनी प्रेक्षकांना भरपूर हसवले. हे साल होते १९१५. पुढे १९१६ साली चित्ताकर्षक कंपनी बंद पडली आणि दामूअण्णा लोकमान्य नाटक मंडळीत गेले. तिथे त्यांनी मामा वरेरकर लिखित ‘हाच मुलाचा बाप’ या नाटकात डॉ. पशूची भूमिका अगदी तडङ्गेने केली. त्यामुळे त्यांचा नावलौकिक होण्यास सुरुवात झाली. १९१८ साली दामूअण्णा मालवणकर केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्श मंडळीत गेले. तेथे त्यांना काम मिळाले नाही, तेव्हा ते दीनानाथ मंगेशकरांच्या बलवंत नाटक मंडळीत गेले. त्या कंपनीत त्यांनी ‘पुण्यप्रभाव’, ‘मृच्छकटिक’, ‘भावबंधन’, ‘विद्याहरण’, ‘उग्रमंगल’, ‘सन्यस्त खड़्ग’, ‘वेड्यांचा बाजार’ वगैरे नाटकात भूमिका करून चांगलीच प्रसिद्धी मिळवली. पुढे १९३३-३४ साली बलवंत नाटक कंपनी बंद पडली आणि त्याचेच चित्रसंस्थेत रूपांतर झाले. त्यामुळे दामूअण्णा दीनानाथ मंगेशकरांकडेच राहिले.

    १९३४ साली आलेल्या ‘कृष्णार्जुन युद्ध’ या चित्रपटात त्यांना छोटीशी भूमिका देण्यात आली. चित्रपटातल्या त्यांच्या कामांची हीच सुरुवात होती. पुढे ३-४ वर्षात ‘लक्ष्मीचे खेळ’, ‘सत्याचे प्रयोग’, ‘ठकीचे लग्न’ वगैरे चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.

    त्यानंतर १९३८ साली ते कोल्हापूरला आले आणि त्यांनी मा. विनायक यांच्या ‘ब्रह्मचारी’ चित्रपटात आश्रम चालकाची भूमिका केली. या भूमिकेमुळे त्यांना चांगले नाव मिळाले. मा. विनायक यांच्या चित्रपटातच त्यांच्या अभिनयाला चांगला वाव मिळाला. विनोदी चित्रपटांचे नवे दालनच उभे करण्यात मा. विनायक यांना दामूअण्णा मालवणकरांनी मदत केली. १९३९ साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्रँडीची बाटली’ या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका साकारली. ‘बगाराम’च्या भूमिकेत त्यांना आपल्या विनोदी अभिनयाला पूर्ण वाव देता आला आणि ही भूमिका लोकप्रिय झाली. त्यानंतर ‘लग्न पहावं करून’, ‘सावकारी पाहुणे’, ‘गजाभाऊ’ या चित्रपटांतूनही त्यांनी नायकाच्या भूमिका साकारल्या आणि आपल्या विनोदी अभिनयाचा प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला.

    त्यानंतर विनायक यांच्याकडे ‘माझं बाळ’, ‘चिमुकला संसार’, ‘अर्धांगी’, ‘अमृत’, ‘सुखाचा शोध’, ‘संगम’, ‘पहिली मंगळागौर’ या मराठी चित्रपटांत, तसेच ‘सुभद्रा’, ‘बडी मॉं’ या हिंदी चित्रपटात विविध भूमिका केल्या. मा.विनायक यांच्या प्रत्येक चित्रपटात त्यांच्यासाठी खास विनोदी भूमिका असायचीच. १९४७ साली मा. विनायक यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी ‘चूल आणि मूल’ या चित्रपटातून भूमिका केली. पुढे ‘मोरूची मावशी’ (१९४८), ‘ब्रह्मघोटाळा’ (१९४९), ‘गळ्याची शपथ’ (१९४९), ‘बायको पाहिजे’ (१९५०), ‘देव पावला’ (१९५०) या चित्रपटांत त्यांनी नायक म्हणून भूमिका केल्या आणि खर्याी अर्थाने विनोदी अभिनेता म्हणून स्वत:चे आगळेवेगळे स्थान निर्माण केले. त्याशिवायही अनेक मराठी, हिंदी चित्रपटांतून त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या. सुरुवातीच्या काळात बिनपगारी, त्यानंतर दोन आणे रोजगारावर काम करत दामूअण्णा दोन हजार रुपये घेऊन भूमिका करीत असत. चित्रपटातील लोकप्रियता शिगेला पोहोचली, तरीसुद्धा दामूअण्णांना नाटकाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. राजाराम नाटक मंडळीत गंगाधरपंत लोंढे दामूअण्णांना ‘भावबंधन’मधल्या ‘गोकुळ’च्या भूमिकेसाठी खास बोलावून घेत.

    त्या वेळी ते ३५० रुपये नाईटवर काम करत. १९४४ साली लोंढे यांचे निधन झाल्यावर दामूअण्णांनी ‘प्रभाकर नाटक मंडळी’ ही स्वत:ची संस्था सुरू केली आणि वीर माधव जोशी यांचे ‘उधार-उसनवार’ हे नाटक रंगमंचावर आणले. चित्रपटसृष्टीतले काम सांभाळून त्यांनी आठ वर्षे सार्या महाराष्ट्रभर नाटकांचे प्रयोग केले. १९५२ साली ही नाटक कंपनी बंद पडल्यावर दामूअण्णांनी चित्रपट याच आपल्या कार्यक्षेत्रावर पुन्हा भर दिला. राम गणेश गडकरी यांचा ‘तिंबूनाना’, चिं.वि. जोशींचा ‘चिमणराव’ आणि ना.धों. ताम्हणकर यांचा ‘दाजी धडपडे’ हे तिन्ही मानसपुत्र साकार करत दामूअण्णांनी त्या व्यक्तिरेखांना अजरामर केले. त्यांनी जवळपास ७५ हिंदी-मराठी चित्रपटांतून व अंदाजे ५० नाटकांतून विनोदी भूमिका केल्या.

    भारती मंगेशकर म्हणजेच ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर यांच्या पत्नी ह्या दामुअण्णा मालवणकर यांची कन्या. पु.ल नी एकदा भारती मंगेशकर यांना बघितले तेव्हा म्हणाले होते " ही मुलगी बापाचा डोळा चुकवुन जन्माला आली आहे !!!"

    दामूअण्णा मालवणकर यांचे निधन १४ मे १९७५ रोजी झाले.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #DamuAnnaMalvankar

  • खंडेराव रांगणेकर

    प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या झंझावाती व नैसर्गिक खेळाने विरूध्द गोलंदाजाला चकित करणार्‍या, रांगणेकरांना त्यांच्या तमाम भारतीय चाहत्यांकडून, व मुंबई आकाशवाणीचे कॉमेंटेटर होमी तल्यार खान यांजकडून क्रिकेटचा बाजीराव ही मानाची उपाधी मिळाली होती.

  • बाळकृष्ण प्रधान

    बाळकृष्ण प्रधान आणि दादर येथील इंडियन एज्युकेशन सोसायटी यांचे नाते अतूट असे होते. इतके की प्रधान सर म्हणजे इंडियन एज्युकेशन सोसायटीचा चालता बोलता इतिहासच होते.

    २९ मार्च १९१८ रोजी जन्मलेल्या प्रधानांचे प्राथमिक शिक्षण जुन्या जंजिरा संस्थानातील बोरली पंचायतन इथे, तर माध्यमिक शिक्षण ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. वयाच्या १९ व्या वर्षी ते मॅट्रिक, तर १९४१ सालात राम नारायण लोहिया कॉलेजातून बी.एससी. झाले.

    सुरुवातीचा काही काळ त्यांनी इंडिया युनायटेड मिल आणि दिल्ली केमिकल क्लॉथमध्ये केमिस्ट म्हणून काम केले. परंतु त्यांचा स्वाभाविक ओढा शिक्षणक्षेत्राकडे होता. त्यामुळे १९४८ सालापासून त्यांनी अध्यापनाचे काम केले.
    विज्ञान आणि गणित हे विषय ते अतिशय तळमळीने शिकवित असत. वांद्रे येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या वाशी येथील न्यू बॉम्बे हायस्कूलमध्ये त्यांनी प्राचार्य म्हणून काम केले. बहुआयामी व्यकिमत्त्व असलेले प्रधान सर हाडाचे शिक्षक होते. तळमळीने आपला विषय शिकविणे हा त्यांचा सहजस्वभाव होता. विज्ञान आणि गणित यांबाबत आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होण्यासाठी धडपडणार्‍या प्रधान सरांनी अखिल भारतीय शिक्षण परिषदांमध्ये एक तपाहून अधिक काळ सक्रिय सहभाग घेतला. तर १९५० ते १९६५ या काळात त्यांनी 'एज्युकेशन फॉर इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग' या विषयावरील चर्चासत्रांमध्ये सातत्याने भाग घेतला.
    एस.एस.सी. मंडळाच्या विभागीय आणि राज्यस्तरावरील अभ्यासक्रम समितीतही त्यांनी काम केले. १९७२ सालाच्या सुमारास महाराष्ट्रात विज्ञान व गणित या विषायांच्या अभ्यासक्रमात क्रांतिकारक बदल सुचविण्यात आले. त्यावेळेस गणिताच्या अभ्यासक्रमातील बदलांच्या संकल्पना प्रधान सरांनी उचलून धरल्या आणि त्याबाबतच्या चर्चांमध्येही त्यांनी भाग घेतला. शालेय पातळीवरील विज्ञान-गणित या विषयांतील बदल हे बदलत्या काळानुरूप होत आहेत आणि त्याच्या तपशिलाबाबत मतभेद असले तरी तत्त्व म्हणून आपण ते बदल स्वीकारले पाहिजेत, असे प्रधान सरांचे म्हणणे होते. आपली ही मते त्यांनी १९७६ साली झालेल्या 'नॅशनल फोरम ऑफ टिचर सेमिनार ऑन प्रॉब्लेम्स ऑफ एज्युकेशन' या विषयावरील सेमिनारमध्ये मांडली.

    त्यांच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. त्यांच्या शिक्षणसेवेचे कौतुक करण्यात आले. 'निर्मळ बुद्धीत ओलावा असतो आणि निर्मळ हृदयात बुद्धीचा प्रकाश असतो' असे आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणार्‍या प्रधान सरांनी तत्त्वनिष्ठ आणि शाश्वत मूल्यांची आयुष्यभर जोपासना केली. असा हा शिक्षणव्रती १९ जानेवारीला काळाच्या पडद्याआड गेला आणि शिक्षणक्षेत्रातले एक नामवंत व्यक्तिमत्व हरपले.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • राम जाधव

    रत्नागिरी येथे होणाऱ्या ९१व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी राम जाधव यांची झालेली निवड म्हणजे गेली सहा दशके रंगदेवतेची पूजा बांधणाऱ्या एका निरलस पुजाऱ्याचा गौरव आहे. अकोला या आडवळणाच्या गावचा लौकिक जाधव, जाधव, राम

    रसिकाश्रयी असा आहे. नाटक जगवण्याचा अकोलेकरांचा ध्यास खूप जुना आहे. बालगंधर्वाची नाटय़ संस्था कर्जाच्या ओझ्याखाली दबली तेव्हा नाटय़रसिकांनी पुढाकार घेऊन हे कर्ज फेडले आणि बालगंधर्वाना सर्वार्थाने स्वातंत्र्य मिळवून दिले,

    असा गौरवपूर्ण इतिहास अकोलेकरांचा आहे. याच शहरात इतिहास, सूतकताई आणि शारीरिक शिक्षण हे विषय तरुण वयात शिकवणारा राम जाधव नावाचा एक ‘वेडा’ गेली साठ वर्षे रंगदेवतेच्या पूजेत तन्मयतेने सहभागी झाला. राम जाधव रंगदेवतेची सेवा करत नाहीत पूजा करतात इतका भक्तिभाव त्यांच्या मनात आहे. ‘रसिकाश्रय’ ही नाटय़चळवळ १९६० साली संस्थारूपाने सुरू केली. येत्या २२ ते २४ डिसेंबर या कालावधीत रसिकाश्रय ही संस्था सुवर्णमहोत्सव साजरा करण्याच्या तयारीत असतानाच या संस्थेच्या शिरोमणीची अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड व्हावी आणि तीही बिनविरोध हा सुवर्णकांचन योगच म्हणायला हवा. राम जाधव मुळचे बुलढाणा जिल्ह्य़ातले. साडेसहा दशकापूर्वी ते शिक्षणासाठी अकोल्याला आले आणि सर्वार्थाने अकोलेकर झाले. रेल्वेत तिकीट निरीक्षक म्हणून नोकरीला लागल्यावर सततची फिरती आणि रंगभूमीची पूजा या दोन्ही आघाडय़ांवर ‘मामा’ म्हणून अकोल्यात आणि मराठी नाटय़ परिवारात परिचित असलेल्या राम जाधव यांनी स्व-कर्तृत्वाची मोहोर उमटवली. त्या काळात म्हणजे १९५० च्या दशकात आंतरधर्मीय विवाह करून खळबळ माजवणाऱ्या आणि कायद्याची पदवी संपादन केलेल्या राम जाधव यांनी नंतरच्या आयुष्यात अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती आणि नाटय़ चळवळीला रसिकाश्रय मिळवून देण्यासाठी कोणत्याही पदाची तसेच, सन्मानाची अपेक्षा न बाळगता सक्रिय असणारा निरलस कार्यकर्ता, अशी विविधांगी कामगिरी बजावली. या सहा दशकात सुमारे ९० नाटकांची निर्मिती राम जाधव यांनी केली. यात ३ संगीत नाटके आणि ४ हिन्दी नाटकांचा समावेश आहे. विजया मेहता यांच्या संपर्कात आल्यावर १० बालनाटकांची निर्मिती करतानाच विजया मेहता यांनी आयोजित केलेल्या तसेच, विजया मेहता यांच्या नेतृत्वाखाली न झालेल्याही शेकडो नाटय़ प्रशिक्षण शिबिरात एक प्रशिक्षक म्हणून राम जाधव सहभागी झाले. जे काही करायचे ते नीट नेटकेच असले पाहिजे, असा आग्रही कटाक्ष बाळगणारा राम जाधव ‘मि. परफेक्शनिस्ट’ म्हणूनही ओळखले जातात. तरी विविध उपक्रमात सहभागी होताना कोणताही तोरा न बाळगता किंवा इतक्या प्रदीर्घ अनुभवाने आपण नाटय़ चळवळीतले ‘महागुरू’ झालो आहोत, असा अहं न दर्शविता सतरंजी उचलणारा-टाकणारा कार्यकर्ता ते प्रशिक्षक अशा दोन्ही भूमिकात राम जाधव लीलया वावरले. रंगदेवतेची पूजा हीच इतिश्री न मानता भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान युद्धातील मृतांच्या वारशांसाठी निधी संकलन, भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाणे अशा एक ना अनेक सामाजिक उपक्रमात स्वत: आणि रसिकाश्रयच्या सहकाऱ्यांसह धावून जाण्याची संवेदनशीलताही राम जाधव यांनी दाखवली. मराठी रंगभूमीच्या इतिहासात मलाचा दगड धरलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकाचे संक्षिप्तीकरण करण्याचा धाडसी आणि आवाहनात्मक प्रयोगही राम जाधव यांनी यशस्वीपणे पेलला. ‘संक्षिप्त मी नटसम्राट’ हे एक आव्हान असून प्रत्येक प्रयोगात आणखी कठीण होऊन ते आव्हान खुणावत असते, असे सांगत गेली १३ वर्षे राम जाधव हे आव्हान तेवढय़ाच तन्मयतापूर्ण भाविकपणे पेलत आहेत. अकोलेकरांचा नाटय़चळवळीला आश्रय सक्रियपणे देण्याची परंपराही या काळात राम जाधव यांनी एखाद्या व्रतासारखी पाळली आहे. वृद्ध कलावंतांचा उचित गौरव आणि त्यांना सहाय्य मिळवून देण्यासाठी वयाची पंच्याहत्तरी उलटली तरी राम जाधव यांची धडपड आजही सुरू आहे. रसिक मराठी नाटकापासून दुरावत आहेत कारण, त्यांच्या आवडी-निवडीचा विचारच केला जात नाही, अशी खंत राम जाधव यांना आहे. या संदर्भात ठोस काही तरी करण्याचा त्यांचा मनोदय आहे. गेली सहा दशके अशा विविध भूमिकात अग्रणी राहूनही प्रसिद्धीची हौस न बाळगलेल्या राम जाधव यांची नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड त्यांच्या चाहत्यांना सुखावणारी आहे. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्यानंतर म्हणजे सुमारे ४० वर्षांनंतर हा बहुमान विदर्भाच्या वाटय़ाला आला आहे, याचेही अप्रुप वैदर्भीयांना असणे स्वाभाविकच म्हणायला हवे.

    -------------------------------------------------

    राम जाधव - त्यांचा रसिकाश्रय

    भारदस्त व्यक्तिमत्व, पट्टीचा आवाज, भूमिकेची उत्तम समज, सतत नाविन्याचा शोध ही वैशिष्ट्यं असलेले अकोल्याचे राम जाधव नाट्यसंमेलनाध्यक्ष पदाची सूत्रं स्वीकारण्यास सज्ज झाले आहेत...

    बुलडाण्यात लेखक-कलावंतांची उत्तम निपज होते, असं म्हणतात. राम जाधव हेही बुलडाण्याचेच. तिथून आपलं कलावंतपण घेऊन अकोल्याला नोकरीच्या निमित्ताने आले आणि तिथेच रूजले.

    ' रसिकाश्रय' नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. कुठल्याही कलावंतानं आणि रसिकानं हक्कानं आश्रयाला यावं, असं हे कलाघर. ही गोष्ट पन्नास वर्षांपूर्वीची. गेल्या पन्नास वर्षांत रसिकाश्रयचा पसारा इतका वाढत गेला की या वडाच्या पारंब्या पुन्हा मातीत रूजल्या, फांद्यांना फांद्या फुटत गेल्या आणि आज रसिकाश्रयचा हा एकमेव बुंधा स्वत:च त्या झाडाच्या सावलीत बसून वरचा विस्तार शांतपणे बघतो आहे. हौशी रंगभूमीच्या इतिहासात एक संस्था एकाच माणसाच्या आधारावर पन्नास वर्षं टिकल्याचं दुसरं उदाहरण नाही.

    राम जाधवांकडे नाट्यसंमेलनाध्यक्षपद चालत येण्यासाठी एवढं कर्तृत्वही पुरेसं आहे. पण त्यांचं काम तेवढंच नाही. केवळ संस्था उभी करणं आणि ती जिवंत ठेवणं हे अवघड असलं तरी अशक्य नाही. पण ती संस्था चाकोरीबाहेरचे मार्ग चोखाळत धगधगती ठेवणं, तिला ऊर्जा पुरवत राहाणं हे मात्र कठीण काम आहे. जाधव मामांचा पिंड हा जात्याच प्रयोगशील रंगकर्मीचा होता, त्यामुळे सतत वेगळ्या वाटेने जात राहाणं हे त्यांचं भागधेय बनलं. पण ते ज्या भौगोलिक परिसरात राहात होते तिथे राहून वेगळेपणाचा वसा घेणं, हे महाकठीण काम होतं. जाधवमामा ज्या काळात हौशी रंगभूमीवर कार्यरत झाले आणि राज्य नाट्य स्पर्धेसाठी नाटकं करू लागले तो काळच मुळी मराठी रंगभूमीसाठी धामधुमीचा होता. साठ सालानंतर एक नव्या जाणिवेच्या रंगकर्मींची लाटच महाराष्ट्राच्या सर्व भागातून मराठी रंगभूमीवर आली. यात मुंबईतून विजया मेहता, अरविंद देशपांडे होते, पुण्यातून पीडीएचे भालबा केळकर होते, अहमदनगरमधून मधुकर तोरडमल नाटकं घेऊन स्पर्धेत उतरत होते, नागपुरातून पुरूषोत्तम दारव्हेकर येत होते, सोलापुरातून वामन देगांवकर नाटकं करत होते. तुल्यबळांचा मुकाबला राज्य नाट्य स्पधेर्त होत असे. अशा काळात राम जाधव विदर्भातल्या अकोला केंदातून नाटकं करू लागले. त्यांनी स्वत:चं नटपण कमावलेलं होतं. भारदस्त व्यक्तिमत्व, पट्टीचा आवाज, भूमिकेची उत्तम समज, नाटकाचं अर्थनिर्णयन करण्याची तयारी, सतत नाविन्याचा शोध आणि त्यातून आलेला धाडसीपणा एवढ्या भांडवलावर त्यांनी मुंबई-पुण्याकडच्या मंडळींना आपली दखल घ्यायला लावली. त्यांनी स्पर्धेत सादर करण्यासाठी नाटकं निवडली तीच राष्ट्रीय स्तरावर गाजलेली झालेली 'एवम् इंदजीत', 'आषाढ का एक दिन', 'नाटककाराच्या शोधात सहा पात्रे', 'शांतता कोर्ट चालू आहे', 'आणि एक दोणाचार्य', 'उद्ध्वस्त धर्मशाळा' अशी. ही नाटकं अकोल्यातील नाटकवेड्यांना बिल्कुल परिचयाची नव्हती. त्यामुळे त्यांच्या निवडीची चेष्टाही झाली. पण जाधव-मामांनी नेटाने ती केली. या अनवट नाटकांसाठी नटसंच तयार करण्याची, त्यांची तयारी करवून घेण्याची जबाबदारीही त्यांनी न कंटाळता पार पाडली.

    जाधवांच्या व्यक्तिमत्त्वात जसा एक नाटक्या आहे तसाच एक कार्यकर्ताही आहे आणि खमक्या संयोजकही आहे. आपल्या गावातल्या लोकांना नव्या संवेदनेच्या नाटकांसाठी तयार करायचं असेल, नवी अभिरुची घडवायची असेल तर नाटकाच्या बरोबरीने काव्यवाचन, नामवंतांच्या मुलाखती, चर्चा-परिसंवाद असेही कार्यक्रम आयोजित करायला हवेत आणि त्यासाठी नव्या विचारांच्या रंगकर्मींना सतत आपल्या परिसरात बोलवायला हवं, हे ओळखून त्यांनी रसिकाश्रयच्या छत्राखाली मुक्त व्यासपीठच उभं केलं. वसंतराव देशपांडेंच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेलं ८२वं नाट्य संमेलन अकोल्यात भरवण्याचं धाडसही त्यांनी त्यापोटीच केलं. याच संमेलनात 'घाशीराम कोतवाल'वरचा परिसंवाद गाजला होता. याच संमेलनात नेते आपले राजकारणाचे जोडे बाजूला काढून चक्क श्रोत्यांतच बसले होते. याच संमेलनात राम जाधवांनी सादर केलेलं चिं. त्र्यं. खानोलकरांचं 'दोन पिकली दोन हिरवी' हे नाटक (ज्याची रंगावृत्ती कमलाकर सोनटक्के आणि बापू लिमये यांनी केली होती) सर्वत्र चचिर्लं गेलं. संमेलन भव्य झालं, मामांच्या कुशल संयोजनाची ग्वाही सगळीकडे फिरली. पण खर्च अंगाबाहेर गेला. तो निस्तरण्या-साठी जाधवमामांनी 'दोन पिकली'चे प्रयोग लावले. पन्नास-साठ प्रयोगांतून सुमारे दीड लाख रूपये उभे केले आणि देणेक-यांची तोंडं बंद केली. प्रसंगी पदरचे पैसे घातले. पण याबद्दल त्यांनी कधी वाकडा शब्द काढला नाही. प्रायोजक मिळवून संमेलनं फायद्यात नेण्याच्या आजकालच्या दिवसांत मामांचा तो व्यवहार आज चेष्टेचा विषय ठरेल, पण त्यांनी तो कोणतीही वाच्यता न करता निभावला. त्यांचा ऋजु स्वभाव आणि दांडगा लोकसंपर्क या दोन गुणांनी प्रतिकूल परिस्थितीतही त्यांचा तोल कधीच ढळू दिला नाही.

    रेल्वेतली टीसीची नोकरी त्यांनी आनंदाने केली याचं एकमेव कारण त्यांना त्यानिमित्ताने सर्वत्र संचार करण्याची मिळालेली संधी, हेच असावं. आपलं नाट्यवेड जपण्यासाठीच त्यांनी नोकरीत मिळणारी बढती नाकारली आणि टीसीच राहाणं पसंत केलं. सर्व संमेलनांना हजर राहाणं, नाटकाच्या सेन्सॉरबोर्डात सतत क्रियाशील राहाणं, अनेक ठिकाणी कार्यक्रमांसाठी भ्रमंती करणं हे सगळं वयाच्या पंच्याहत्तरीतही ते तबीयतीने करतात. काही वर्षांपूर्वी 'नटसम्राट' संक्षिप्त स्वरूपात सादर करण्याचा वेगळा प्रयत्न त्यांनी यशस्वी करून दाखवला होता. शिरवाडकरांच्या या नाटकातली सगळी स्वगतं एका सूत्रात गुंफून ती ते एका निवेदिकेच्या मदतीने सादर करीत आणि संपूर्ण 'नटसम्राट' पाहिल्याचा अनुभव देत. विदर्भातल्या रसिकांनी या प्रयोगाची खूप प्रशंसा केली.

    तनाने-मनाने सदैव हौशी आणि प्रायोगिकच राहिलेले राम जाधव यांना अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावर विराजमान होण्याचा मिळणारा मान दुर्लभच म्हटला पाहिजे, कारण व्यावसायिक रंगभूमीभोवतीच बहुतेक वेळा फिरत राहिलेल्या नाट्यसंमेलनाला हौशी नाटकवाल्यांची फारशी आठवण आलेलीच नाही. म्हणूनच यावेळी जाधवमामांचा मान हा आपलाच बहुमान समजून महाराष्ट्रातल्या तमाम हौशी रंगकर्मींनी रत्नागिरीच्या संमेलनाला हजर राहिलं पाहिजे.

  • स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रय शं.पोतनीस

    स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक आणि नाशिकच्या ‘गावकरी’,’अमृत’ व ‘रसरंग’ चे संपादक दत्तात्रय.शं.पोतनीस तथा दादासाहेब पोतनीस यांचा जन्म.२२ नोव्हेंबर १९०९ रोजी वाई (जि. सातारा) येथे झाला.

    दत्तात्रय पोतनीस यांचे वडिल शिलाई काम करून चरितार्थ चालवायचे. त्यामुळे त्याचे शालेय शिक्षण वाईतच झाले. नंतर ते पुण्याला आले. मात्र पुण्यात आल्यावर गांधी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी गांधीजींच्या हाकेला ओ देत थेठ नाशिक जिल्हयातील टेंभे गाव गाठले. तेथे अनेक सामाजिक कामं केली. परिसरातील गावात ४५ एक शिक्षकी शाळा सुरू करून ज्ञानयज्ञ आरंभिला. त्यासाठी गावकरी सुरू केले.

    मात्र १९३९ च्या सुमारास त्यांना नाशिकला जाण्यासाठी सांगण्यात आले. ते नाशिकला गेले. गावकरी साप्ताहिक मग नाशिकमधून निघू लागला. तेथे त्यांनी ७००० रूपये गुंतवणूक एक छपाई मशिन घेतले. त्यावर ‘गावकरी’ छापला जायला लागला. मात्र याच वेळेस १९४२ च्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना कारावास झाला. त्यामुळं गावकरीचं प्रकाशन थाबलं. परत आल्यानंतर १९४४ मध्ये पुन्हा गावकरी पहिल्या जोमानं प्रकाशित व्हायला लागला. साप्ताहिकाच्या मर्यादा लक्षात घेऊन १९४७ मध्ये दादासाहेबांनी गावकरीचे दैनिकात रूपातर केलं. मुंबईची वृत्तपत्रं नाशिकात उशिरानं येत. गावकरी मात्र सकाळीच नाशिकात वितरित होऊ लागल्यानं गावकरी नाशिकच्या घराघरात आणि मनामनात घर करून बसला.

    आपल्या वाचकांना उशिरातल्या बातम्या देता याव्यात म्हणून दादासाहेबांनी पीटीआय या वृत्तसंस्थेची सेवा घेतली. ताज्या बातम्या आणि सर्व विचारांना स्थान देणारे गावकरी अल्पावधितच लोकप्रिय दैनिक बनले. गावकरीचा चांगलाच जम बसल्यानंतर दादासाहेबांनी एक नवा प्रयोग कऱण्याचं ठरविलं. इंग्रजीतील रिडर डायजेस्टच्या धर्तीवर ‘अमृत’ हे मासिक सुरू केलं. या मासिकाला महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं. त्यानंतर आणखी एक नवा प्रयोग दादासाहेबांनी केला. कला,क्रीडा आणि मनोरंजनाला वाहिलेलं ‘रसरंग’ हे साप्ताहिक १० मे १९५८ रोजी सुरू केलं. मराठीतला हा प्रयोगही पहिल्यांदाच होत असल्यानं वाचकानं रसरंगवर देखील उडया टाकल्या.व्यावसायिकदृष्टया देखील रसरंग यशस्वी ठरले.

    रसरंग सुरू करून अजून सहा महिनेही झालेले नव्हते तोच दादासाहेबांनी औरंगाबादेतून अजिंठा सुरू करण्याचा निर्णय़ घेतला.निजामी राजवटीतून मुक्त झालेल्या मराठवाड्यात परिपूर्ण दैनिक नव्हते. मराठवाडा होते पण ते साप्ताहिक स्वरूपात निघत होते.ही पोकळी विचारात घेऊन दादासाहेबांनी ३ डिसेंबर १९५८ पासून अजिंठा नावाचे दैनिक औरंगाबादेतून सुरू केलं. अलिकडच्या काळात मराठवाड्यात भांडवलदारी वृत्तपत्रं आल्यानं ध्येयवादी वृत्तपत्रं बंद पडू लागली. अगोदर मराठवाडा बंद पडले. २००० मध्ये अजिंठाही त्याच मार्गाने गेले. मात्र या काळात अजिंठानं मराठवाड्याला पत्रकारिता शिकविली. त्यांनी अनेक नवे पत्रकार निर्माण केले. मराठवाड्यातील अनेक प्रश्न धसास लावले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या निमित्तानं दादासाहेबाची कसोटी लागली होती. कॉंग्रेसमधील एक गट संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करणारा असला तरी दुसरा गट हायकमांडच्या तालावर नाचणारा होता. दादासाहेब स्वतःसंयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशा मताचे होते. गावकरीनं त्याचा पुरस्कार केला पण त्याबद्दल त्याना कॉग्रेसवाल्याकडूनच मोठा त्रास सहन करावा लागला. त्याची त्यांनी पर्वा केली नाही.

    १९६० मध्ये दादासाहेबांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेत आपलं लक्ष नाशिकच्या विकासावर केंद्रीत केलं. नाशिकला त्यांनी औद्योगिक विकास परिषद घेऊन त्यात नाशिकच्या विकासावर सांगोपांग चर्चा घडवून आणली. नाशिक मर्चंटस को ऑपरेटीव्ह बॅंक स्थापन केली.

    नाशिकला एम.आय.डी.सी आणण्यात मोठे योगदान दादासाहेबांचे आहे. नाशिक लोकहितवादी मंडळाचे ते दहा वर्षे अध्यक्ष होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नाशिकला व्हावे यासाठी देखील त्यांनी प्रय़त्न केले. नाशिक सहकारी साखर कारखाना देखील त्याच्याच प्रयत्नांचं फळ आहे.

    राजकारण,गावकरीचा व्याप,आणि समाजसेवेत अडकून पडलेल्या दादासाहेबांनी वेगळं लेखन केलं नसलं तरी त्यांनी जी व्याख्यानं दिली ती “स्नेहयात्रा” या स्मृतीग्रंथात छापली आहेत.

    दादासाहेबांना मुंबई मराठी पत्रकार संघानं आचार्य अत्रे पुरस्कारानं गौरविलं होतं, ग.गो.जाधव पुरस्कारही त्यांना मिळाला होता. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष होण्याचा मानही त्यांना मिळाला. पणजी येथे १९६९ मध्ये झालेल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. पत्रकारितेवर अपार निष्ठा आणि प्रेम असणाऱ्या दादासाहेबांसाठी पत्रकारिता हा एक धर्म होता. वृत्तपत्रांना ते कान व डोळे मानत.पत्रकारिता हे समाजशिक्षण आणि समाज प्रबोधनाचे एक प्रमुख साधन असून ते नैतिक बळ देणारे एक माध्यमही आहे अशी त्यांची धारणा होती. त्यामुळंच त्यांनी एक व्रत समजूनच आयुष्यभर पत्रकारिता केली. पत्रकारितेत नवनवे प्रयोग करून व्यावसायिक यशही संपादन केले.

    दादासाहेब पोतनीस यांचे २७ ऑगस्ट १९९८ रोजी निधन झाले.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #DattatrayPotnis